दिवाकर मोहनी

मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना

दिवाकर मोहनी

मराठीची प्रमाणभाषा, बोलण्याची नव्हे तर लिहिण्याची, कशी असावी तर तीमध्ये कोणताही विषय मांडता यावा. शास्त्र किंवा विज्ञान यांची सतत वाढ होत असते म्हणजे त्यांचा परीघ वाढत जातो. त्याचप्रमाणे त्या विषयांची खोलीदेखील वाढत जाते. असे सतत वाढत जाणारे विषय आमच्या भाषेला पेलता यावेत आणि तीमध्ये केलेले लेखन नि:संदिग्ध आणि अल्पाक्षर असावे अशी गरज आहे. अलीकडे लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी होत आहे. सुलभीकरणाची गरज आहे असे मानून मी लेखनाच्या विषयात प्रवेश केला. पण सुलभीकरणाची गरज नाही अशा निष्कर्षाला मी आलो आहे.

भाषण आणि वाचन ह्या दोन्ही क्रियांनी आपणाला काही कळते. भाषण कानांना ऐकू येते किंवा ते ऐकायचे असते. आणि लेखन डोळ्यांनी वाचायचे असते. दोन वेगवेगळ्या इंद्रियांचा उपयोग आपण करीत असतो.

आंधळे लोक कानांनी ऐकून आणि बोटांनी स्पर्श करून पुष्कळ गोष्टी शिकतात. डोळ्यांच्या वापराशिवाय त्यांना विषयाचे आकलन होऊ शकते. जन्मापासून बहिरे असलेले, कर्णेंद्रियाचा वापर अजिबात न करणारे लोक वाचायला शिकू शकतात आणि त्या वाचनातून ज्ञान मिळवू शकतात. याचा अर्थ असा की आपल्याला ज्ञान मिळविण्यासाठी कोणतेही एक इंद्रिय पुरेसे असते. आपण जसे ऐकतो तसेच लिहिले गेले पाहिजे असे काही नाही. कोणतीही परकी भाषा शिकायची झाली तर ती दोन प्रकारे शिकता येते. ऐकून किंवा वाचून. व्याकरणाची पुस्तके, शब्दकोश ह्यांच्या साह्याने तिचे उच्चार कसे होतात हे न समजता कोणतीही भाषा शिकणे सहज शक्य आहे, असे माझ्या लक्षात आले. असे जर आहे तर उच्चाराप्रमाणे लिहिण्याची गरज नाही.
एक काळ असा होता की आपल्या देशात सुशिक्षितांची परस्पर-संपर्काची भाषा संस्कृत होती. बंगालमधले संस्कृत पंडित, केरळमधले आणि पंजाबमधले पंडित संस्कृत ग्रंथांमध्ये लिहिलेल्या शब्दांचा उच्चार आपापल्या पद्धतीने, त्यांच्या मुखाला असलेल्या सवयीप्रमाणे करीत. पण ते उच्चार लेखनात आणण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही. संस्कृत भाषेचे लेखन कधीच उच्चारानुसार झालेले नाही. कारण प्रदेश जितका मोठा तितके उच्चारभेद असणारच.
लेखन उच्चार दाखविणारे कमी, तर अर्थ सांगणारे जास्त हवे हे केवळ संस्कृत भाषेतच नाही तर एका अत्यंत परक्या म्हणजे इंग्रजीसारख्या भाषेमध्येही आहे. एकाच उच्चाराच्या शब्दांचे स्पेलिंग निरनिराळे करून ते हे कार्य साधतात : SON, SUN; WRITE, RIGHT; BLUE, BLEW; NEW, KNEW वगैरे.

भाषण आतापर्यंत समोरासमोर होत असे म्हणजे एकाच प्रदेशात आणि काळात बोलणारा आणि ऐकणारा असे. त्यामुळे ऐकणार्‍याला आपले शंकानिरसन तेथल्या तेथे करून घेता येत असे. लेखन मात्र दूरदूरच्या प्रदेशात जाते. इतकेच नव्हे तर लिहिणारा आणि वाचणारा यांच्या काळात काही शतकांचेही अंतर असू शकते. असे लेखन समजून घेताना त्या लेखनाचा उच्चार त्या काळी आणि त्या प्रदेशात कसा होत असे यांच्याशी वाचकाला कसलेही कर्तव्य नसे. आपण वाचताना आपल्याला आलेल्या शंका लेखकाला विचारू शकूच असे नाही, कारण आपण ज्या वेळी ग्रंथ वाचत असू त्या वेळी त्याचा लेखक हयात असेलच असे नाही.

मग एखाद्या शब्दाची शंका फेडायची कशी? अशा वेळी शब्दकोशाचा आश्रय घ्यावा लागतो. क्वचित एखाद्या व्युत्पन्न पंडिताच्या लेखनात तो लेखनाच्या ओघात त्याच्या गरजेप्रमाणे घडवलेले नवीन शब्द वापरतो. त्यांचा अंतर्भाव शब्दकोशांत असेलच असे नाही. अशा ठिकाणी शब्दकोश उपयोगी पडत नाही. पण तो शब्द व्याकरणशुद्ध असेल आणि वाचकालाही तेवढे व्याकरण येत असेल, तर त्याला अशा नव्या शब्दापासूनसुद्धा अर्थबोध होतो. त्या नव्या शब्दाचा उच्चार कसा करायचा हे त्याला माहीत नसले तरी चालते.

लेखननियमांच्या सुलभीकरणाची मागणी करणार्‍यांना तशी गरज का वाटत असावी असा विचार करीत असता मला एक गोष्ट जाणवली. त्यांना आपली भाषा संस्कृतपासून निघालेली आहे आणि जे संस्कृत चांगल्या प्रकारे शिकले आहेत त्यांनी ती सामान्य जनांवर लादली असे वाटत असावे. भाषा पूर्वी जास्त कठीण होती आणि कालमानाप्रमाणे ती सोपी होत चालली आहे आणि ती आणखी सोपी केली पाहिजे असा त्यांचा समज आहे असेसुद्धा मला जाणवले.

येथे मी एक विवाद्य विधान करतो, ते असे की मराठी किंवा तिच्यासारख्या अन्य भारतीय भाषा संस्कृतपासून निघालेल्या नाहीत. संस्कृत त्यांची जननी नाही. आपल्या आजच्या भाषा संस्कृत-प्रभावित आहेत; संस्कृतोद्भव नाहीत असे माझे मत आहे. पण तो वेगळा विषय असल्याकारणाने त्याचा येथे विस्तार करीत नाही.

आपल्या भाषेच्या लेखननियमांचे सुलभीकरण करावे अशी मागणी करणार्‍यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशी मागणी केल्यामुळे त्यांच्या ठिकाणी आकलनशक्ती किंवा बुद्धिमत्ता कमी आहे असा समज पसरतो. वास्तव तसे नसल्यामुळे सुलभीकरणाची मागणी त्यांनी टाकून द्यावी, अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे.

ज्याला शुद्धलेखनाचे जुने नियम म्हणतात त्या नियमांनुसार लिहिलेले वाचायला मला आवडते. याचे कारण असे की त्यातील प्रत्येक वाक्य मला एखाद्या गोफासारखे विणलेले दिसते. कोणत्याही नामाचे लिंग, वचन आणि विभक्ती सतत डोळ्यांसमोर असते. क्रियापदाच्या समोर असलेल्या रूपावरून काळ, कर्त्याचे लिंग, वचन आणि पुरुष ही सारी पुष्कळशा वेळी बरोबर समजतात. नाव (होडी) आणि नाव (नाम) ह्यांतला फरक डोळ्यांना दिसावा म्हणून नाम या अर्थाने जेव्हा तो शब्द लिहिला जातो तेव्हा त्यातल्या ‘ना’ वर अर्थभेददर्शक अनुच्चारित अनुस्वार पूर्वी देत असत तो आता काढून टाकला आहे आणि आपणांस संदर्भावर अवलंबून राहण्यास सांगितले आहे. येथे प्रश्न असा आहे की अर्थभेददर्शक अनुस्वार फक्त नाव किंवा तत्सम शब्दांवरच आहे काय? ‘मला खाऊ दे’ हे वाक्य पूर्वी दोन पद्धतीने लिहिले जात होते. ‘मला खाऊ दे’ आणि ‘मला खाऊं दे’ पहिल्या ‘खाऊ’ चा अर्थ ‘मला खाण्याचा पदार्थ दे’ असा आहे. आणि दुसर्‍या अनुच्चारित अनुस्वारयुक्त ‘खाऊं’चा ‘अर्थ मला खाण्याची क्रिया करू दे’ असा होतो. खाऊ हे एका ठिकाणी नाम आहे तर दुसर्‍या ठिकाणी साहाय्यक क्रियापद आहे. येथे जो बिंदुचिन्हाचा वापर झाला आहे त्यामुळे त्या शब्दाच्या नव्हे, वाक्याच्या ठिकाणी निश्चितार्थ आला आहे. तेवढ्या एका टिंबाने पुष्कळ मोठा संदर्भ मनात निर्माण करण्याचे कार्य केले आहे. हेच वाक्य आपण सुटे वाचले आणि त्यातला अनुच्चारित अनुस्वार नको म्हणून तो दिला नाही तर खाऊ हे नाम की क्रियापद हे कळायला मार्ग नाही. हे वाक्य ज्या वेळेला उच्चारले जाते आणि ते कानांनी ऐकले जाते त्या वेळी संदर्भ तेथे उपस्थित असतो. हे वाक्य डोळ्यांनी वाचत असताना तेथे आविर्भाव नसतात. उच्चारात हेल नसतात आणि त्या वाक्याचा अर्थ स्वतंत्रपणे समजून घेण्याची सोय नसते. जुन्या पद्धतीच्या लेखननियमांत ती सोय होती.

फक्त नाम आणि क्रियापद यांतला फरक दाखविण्यासाठीच टिंबाचा उपयोग होत होता काय? नाही. तो नामाची विभक्ती दाखविण्यासाठीही होत होता. ‘मी गावाला गेलो आणि मी पुस्तक वाचले’ ह्या दोन वाक्यांतील पहिल्या ‘मी’ ची विभक्ती प्रथमा आहे आणि दुसर्‍या ‘मीं’ची विभक्ती तृतीया आहे. ‘डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो’ या चरणाचा कर्ता ‘मी’ की ‘तो’ हे तेथे हा अनुच्चारित अनुस्वार काढून टाकल्यामुळे समजण्याचा मार्ग खुंटला आहे. बघतो, परिसतो, चालतो, चाखतो वगैरे क्रियापदे प्रथमपुरुषी आणि तृतीयपुरुषी कर्ता असताना त्यांचा उच्चार समान असला तरी प्रथमपुरुषी क्रियापदाच्या अंत्याक्षरावर टिंब असते. त्या एका टिंबामुळे वाक्याच्या कर्त्याचा पुरुष माहीत होतो. ‘घोडे पळाले’ येथे एक घोडे की पुष्कळ घोडे पळाले, हे सांगण्यासाठीसुद्धा अनुच्चारित अनुस्वाराचा उपयोग होत होता. ‘घोडें पळालें’ येथे कर्ता नपुंसकलिंगी आहे आणि एकवचनी आहे, हे त्या अनुस्वाराच्या योगाने स्पष्ट होते. दिवाळी-दिवाळीं, वांचाल-वाचाल, जिवाणूं-जीवाणू असे प्रत्येक शब्दाच्या ठिकाणी निश्चितार्थ येण्यासाठी जुने शुद्धलेखन जास्त उपयुक्त आहे, अशा निष्कर्षाला मी आलो आहे. पूर्वीच्या हस्तलेखनात दोन शब्दांमध्ये अंतर ठेवण्याचा प्रघात नव्हता. त्यामुळे दिनचर्या आणि दीन चर्या अशांसारखे शब्द जोडून लिहिले जात होते. ह्या दोन शब्दांतील अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी उच्चाराचे र्‍हस्व-दीर्घत्व सांभाळण्याची गरज आहे. भाषेमध्ये सतत नवनवीन शब्द येतात. त्यांपैकी काहींचे उच्चार पूर्वीच्या एखाद्या शब्दासारखे असू शकतात. अशा दोन शब्दांमधील अर्थभेद स्पष्ट व्हावा यासाठी त्यातील स्वरांचे र्‍हस्व-दीर्घत्व बदलून वा अनुच्चारित अनुस्वाराचा उपयोग करून अर्थभेद दाखविण्याचे कार्य होऊ शकते. पुढे तीन शब्द मी लिहीत आहे. कोणत्याही शब्दाचे अर्थनिश्चयन करण्यासाठी बिंदुचिन्हाचा उपयोग कसा होतो ते दाखविण्यासाठी आहेत. अंगकाठी, जरीकाठी आणि इंद्रायणीकाठी. पूर्वीच्या नियमानुसार ते अंगकाठी, जरीकांठी आणि इंद्रायणीकांठीं असे लिहिले जात असत. काठ हा शब्द किनारा या अर्थाने वापरला गेल्यास ‘कां’वर टिंब देण्याचा प्रघात होता. आणि नदीकांठींमध्ये काठ या शब्दाची सप्तमी विभक्ती आहे हे त्या टिंबाने स्पष्ट होत होते.

नामांपासून अव्यये डोळ्यांना वेगळी ओळखता यावीत ह्यासाठी अव्यये र्‍हस्वान्त ठेवली जात असत. किंवा र्‍हस्व करणे शक्य नसल्यास त्यांवर अनुच्चारित अनुस्वार दिला जात असे. ‘आणी’ हे क्रियापद आणि ‘आणि’ हे अव्यय डोळ्यांना वेगळे दिसावे ह्यासाठी तसे लिहिले जात होते. ‘यथाशक्ती’ सारखी अव्यये आजही र्‍हस्वान्त लिहिली जावीत, असा नियम आहे. पण अव्यये म्हणजे काय हे माहीत नसल्यामुळे आणि सगळेच शब्दांच्या अंती येणारे इकार उकार दीर्घान्त लिहावे एवढाच नियम माहीत असल्यामुळे ते दीर्घान्त लिहिले जाऊ लागले आहेत. मुळे हे नाम आणि मुळें अव्यय; साठी हे नाम व साठीं हे अव्यय. ‘तो जाता झाला’, ‘जातां जातां गाडीत त्याने पुस्तक वाचले.’ ह्या वाक्यांतील पहिला जाता आणि पुढचे जातां जातां ह्यांमधला अर्थभेद डोळ्यांना दाखविण्याची सोय आम्ही गमावली आहे आणि प्रत्येक ठिकाणी संदर्भ लक्षात ठेवण्याची गरज निर्माण केली आहे.

वाचताना संदर्भावर कमीतकमी अवलंबावे लागावे ह्यासाठी शब्दांच्या लेखनामध्ये फरक करण्याची पद्धत बहुतेक सगळ्याच भाषांमध्ये आहे. उर्दूमध्ये तीन भाषांचे मिश्रण आहे. अरबी, फारसी आणि हिंदी. तिचे लेखन पुष्कळसे फारसीप्रमाणे करण्याची पद्धत आहे. परंतु तीमध्ये अरबी शब्द अरबीसारखेच लिहिले जातात. एकच किंवा जवळचे उच्चार दाखविणारी तीन-तीन व्यंजने आहेत. परंतु कधीही एका व्यंजनाची जागा ते दुसर्‍या व्यंजनाला घेऊ देत नाहीत. इंग्लिशमध्येही अर्थभेद दाखविण्यासाठी शब्दाच्या लिखित रूपाने निश्चित अर्थ दाखवावा, अशी सोय असल्याचे पूर्वी सांगितले आहे.

मुद्रणपूर्व काळात पद्य बाळबोधीत (देवनागरीत) आणि गद्य मोडीत लिहिले जात होते. पद्य अल्पाक्षर आणि छंदोबद्ध असल्याकारणाने त्यामध्ये अर्थबोधासाठी त्याचा अन्वय करण्याची गरज असते. त्याचप्रमाणे त्यामध्ये छंदाच्या गरजेसाठी र्‍हस्व-दीर्घाचे बंधन पाळणेही गरजेचे असते. अन्वय करणे सोपे जावे ह्यासाठी लिंग-वचन-विभक्तीच्या, त्याचप्रमाणे काळाच्या आणि अर्थाच्या खुणा सगळ्या शब्दांना अंगावर वागवाव्या लागतात. इतकेच नव्हे तर काही शब्दांचे व प्रत्ययांचे अध्याहरण करावे लागते. पद्यलेखनाच्या वरील गरजांसाठी घडलेले लेखनाचे नियम आपण नंतर गद्यातही वापरू लागलो. हे गद्य मुख्यत: मुद्रणासाठी लिहिले गेले. (आपसातला पत्रव्यवहार मोडीमध्ये चालू होता. मोडीमध्ये एकच वेलांटी आणि एकच उकार आहे. आणि उच्चारित अनुस्वाराचादेखील वापर होत नाही.)

हे सारे घडले ते मुद्रणाच्या गरजेमुळे पण त्याच वेळी मराठीचा इंग्रजीशी संपर्क वाढत चालला होता. आणि आपल्या भाषेमध्ये तोवर कधीच न आलेल्या विषयांचा अंतर्भाव होऊ लागला होता. ह्या नवीन विषयांसाठी नवे पारिभाषिक शब्द घडविण्याची गरज होती आणि ते घडविण्यासाठी संस्कृत भाषेचा आश्रय करावा लागणे अपरिहार्य होते. हे पारिभाषिक शब्द पूर्णपणे नवीन असल्याकारणाने ते कोशगत झाले नव्हते. म्हणून त्या शब्दांचे आकलन होण्यासाठी संस्कृतच्या व्याकरणाच्या ज्ञानाची गरज होती. ते शब्द आपल्या भाषेत पुढे रुळल्यामुळे त्यांच्या ठिकाणी सातत्य हा गुण आला आणि त्या सातत्यामुळेसुद्धा त्यांच्यात निश्चितार्थता आली. भाषेला या शब्दांमुळे प्रौढत्व आणि सौष्ठव प्राप्त झाले. हे सारे शब्द संस्कृत भाषेच्या नियमांप्रमाणे घडविल्यामुळे ते कोणाच्याही उच्चाराप्रमाणे लिहिले गेले नाहीत. तर मुळाप्रमाणे (तत्सम) लिहिले गेले. ह्या नव्या, संस्कृतातून घेतलेल्या, शब्दांची संख्या जशी मराठीत वाढू लागली तशी मोडीलिपी त्यांच्या वापरासाठी अपुरी पडू लागली.

एखादा नवीन विषय भाषेमध्ये आणायचा हे मोठे अवघड काम आहे. त्या विषयाचे आकलन होण्यासाठी वाचकांच्या ठिकाणी कोणतेही संदर्भ असत नाहीत. कारण तो विषय त्यांच्यासाठी पूर्णतया नवीन असतो. तेवढ्याचसाठी प्रत्येक शब्दाने संदर्भावर अवलंबून न राहता नेमका अर्थ व्यक्त करावा अशी गरज असते. हे काम उच्चारानुसारी लेखनामुळे होऊ शकत नाही. कारण त्या शब्दांच्या योगे उच्चार व्यक्त करावयाचा नसतो तर वाचकाच्या मनामध्ये अर्थाचे संक्रमण करावयाचे असते. त्यासाठी ते व्याकरणशुद्ध असावे लागतात. एकदा हे शब्द भाषेत रूढ झाल्यानंतर ते वाचकांच्या डोळ्यांना परिचित झाले. इतकेच नव्हे तर त्या शब्दांपासून एकच अर्थ व्यक्त व्हावा ह्यासाठी त्यांच्या लेखनात सातत्य राखावे लागले. त्या शब्दांना कोशगत करावे लागले. त्यांच्या लेखनात सातत्य राखल्यामुळे एक आनुषंगिक गुण त्यांना प्राप्त झाला. ते ओझरते पाहूनदेखील त्यांचा अर्थ (नित्य परिचयामुळे) वाचकाला समजू लागला.
मराठीच्या बोलीभाषा ह्या घरांत, शेतात किंवा रणांगणावर वापरण्यासाठी घडलेल्या आहेत. रणांच्या गरजेसाठी घडवलेल्या भाषेत देश्य शब्दांच्या बरोबर काही परकीय म्हणजे फारसी, अरबी आणि पोर्तुगीज शब्दही आले. पण ज्या वेळी मराठी ही तीन क्षेत्रे सोडून विज्ञानाच्या वा तत्त्वज्ञानाच्या सभामंडपात शिरली त्या वेळी तिला संस्कृत भाषेचा आश्रय करावा लागला. आणि तत्सम शब्दांचा तिच्यात भरणा झाला. आमची मराठी बोली पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत पूर्णपणे परावलंबी आहे. ह्या परावलंबनामुळे बोलीभाषांची स्वतंत्रपणे होऊ शकणारी वाढ खुंटून गेली. न्यायालयात वापरण्यासाठी संविधानासारखे ग्रंथ रचण्यासाठी वा विश्वकोशातील नोंदी लिहिण्यासाठी जी भाषा वापरावी लागते, ती पूर्णपणे संस्कृतनिष्ठ असल्याकारणाने आमच्या बोलीपासून फार दुरावलेली आहे. परंतु नाइलाजास्तव तीच वापरणे भाग आहे.

अंदाजे गेल्या साठ वर्षांपासून मराठी भाषेच्या शिक्षणाकडे आपले दुर्लक्ष आहे. मला येथे मुद्दा मांडावासा वाटतो तो असा की आम्ही जसे बोलतो तसे लिहितो किंवा तसे लिहावयास पाहिजे ह्या आपल्या समजामुळे ‘‘मातृभाषा काय शिकवायची?’’ असे आम्हांस वाटू लागले. भाषेच्या शिक्षणाच्या नावाने आम्ही थोडे साहित्य शिकविले; परंतु भाषेचे व्याकरण व शब्दांची घडण ह्या दोन गोष्टी शिकविण्याकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष केले. कोणतीही भाषा फक्त साहित्य व त्यातही ललित साहित्य लिहिण्यासाठी वापरली जात नाही. तर तिच्यात जीवनावश्यक सगळेच विषय लिहिले-बोलले जातात. भाषा जर चांगली नसेल तर त्या विषयांच्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत. वाढ खुंटते. गेल्या अनेक वर्षांत, साहित्याचा प्रांत सोडल्यास आपल्या भाषेतून नवीन विचार मांडले गेले नाहीत ते यामुळेच.

भाषण कानांसाठी आहे व लेखन डोळ्यांसाठी हे आपण पूर्वी पाहिलेले आहे. येथे सांगायचे ते असे की, वाचन श्रवणापेक्षा कठीण आहे, त्रासदायक आहे. तोंडाने आवाज करणे व तो कानांनी ऐकणे हे बहुतेक सगळे चार पायांचे प्राणीसुद्धा करतात. ही त्यांची क्षमता माणसांत आली आहे इतकेच नव्हे तर अन्य प्राण्यांपेक्षा पुष्कळ निरनिराळ्या प्रकारचे आवाज काढणे त्याला शक्य झाले आहे. दृश्य संकेत हे अगदी अलीकडे म्हणजे पाचसहा हजार वर्षांपासून माणूस वापरू लागला आहे. हातांनी निरनिराळी चिन्हे काढून त्यांच्या योगाने अर्थबोध करून देणे हे मानवाच्या इतिहासात अगदी नवीन आहे. परंतु त्याचा वापर झपाट्याने वाढणार आहे. कानांनी ऐकताना अर्थबोध करून घेण्यासाठी पूर्ण वाक्य ऐकावे लागते. आणि डोळ्यांनी वाचताना अक्षरन्अक्षर वाचण्याची गरज नसते हे आपणांस ठाऊक आहे. कानांना सिक्वेन्शियल अ‍ॅक्सेस (क्रमेण) असतो आणि डोळ्यांना रँडम अ‍ॅक्सेस (यादृच्छिक) असतो. तेवढ्यामुळेच वाचन लवकर होते. मुद्रण सुरू झाल्यापासून माणसाला वाचनाची गती वाढविणे भाग पडले आहे, आणि शक्यही झाले आहे. सगळ्यांचीच वाचनाची गती दिवसेंदिवस वाढवावी लागणार आणि ते साध्य व्हावे म्हणून मुद्रणात एकसारखेपणा ठेवणे आवश्यक झाले आहे. मुद्रणात एकसारखेपणा असल्याशिवाय वाचनाची गती वाढू शकत नाही. एकसारखेपणा ठेवण्याच्या गरजेमुळेच शुद्धलेखनाचे नियम करावे लागतात आणि जुन्या-नव्या पुस्तकांमध्ये लेखनविषयक सातत्य राखावे लागते.
लेखननियम सुलभ करण्याचा हेतू, ते सर्वांच्या आटोक्यात यावेत हा असतो. पण सगळ्या लोकांची क्षमता सारखी नसते. जे सगळ्यांना सहजपणे अमलात आणता येतील असे नियम अमलात आणणे इष्ट आहे असा समज आहे. पण तो चुकीचा आहे. कारण सध्या सुलभ केलेले नियमही फारच थोड्यांना वापरता येतात व सोपे करण्याच्या भानगडीत त्यांत विसंगती आल्यामुळे ते कठीणही झाले आहेत.

येथे प्रश्न हा पडतो की, गणित हा विषयही सर्वांच्या आटोक्यातला नाही. पण म्हणून गणितातील नियम (सूत्रे) बदलायची का? की शिकविण्याच्या पद्धती बदलायच्या? बीजगणित आणि शून्यलब्धी हे विषय पुष्कळांना जड जातात म्हणून ते कायमचे काढून टाकायचे का?
आज आपल्या भाषेतल्या लेखननियमांच्या बदलत्या स्वरूपामुळे परभाषी लोक मराठी भाषा शिकायला धजत नाहीत. त्याचप्रमाणे जुन्या शुद्धलेखनाचे नियम गेली साठ वर्षे शाळांमधून न शिकविल्यामुळे प्राचीन मराठी वाङ्मयाचा आस्वाद आज कोणालाच घेता येत नाही. व आमची साहित्याची उज्ज्वल परंपराच नष्टप्राय झाल्यामुळे एक मोठी सांस्कृतिक पोकळी निर्माण झालेली मला जाणवते, ती आपल्याला का जाणवत नाही? ही कोण आणि कशी भरून काढणार? चिपळूणकरांच्या पूर्वीचे सर्व गद्य व केशवसुतांच्या पूर्वीचे सर्व पद्य यथामूल म्हणजे जुन्या लेखननियमांप्रमाणेच लिहावे हा नवा नियम करून तर अधिकच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे काही ‘नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे’ ह्यासारख्या म्हणी कशा लिहायच्या असा प्रश्न पडतो. त्या म्हणी चिपळूणकरपूर्वकालीन की उत्तरकालीन, हे कसे ठरवायचे? सोनारें ही सोनार या शब्दाची तृतीया विभक्ती आहे. आणि व्याकरणाच्या नियमाप्रमाणे तृतीया विभक्तीच्या सर्व प्रत्ययांवर अनुच्चारित अनुस्वार देणे आवश्यक आहे. व्याकरण हे शास्त्र पॉझिटिव्ह सायन्स आहे, ते नॉर्मटिव्ह सायन्स नाही. आपली भाषा पूर्वी कशी लिहिली गेली एवढेच व्याकरणशास्त्र सांगते. पुढे ती कशी लिहावी हे सांगण्याचा अधिकार व्याकरणाला नाही. लिहिलेल्या भाषेचे व्याकरण आणि बोलीभाषेचे व्याकरण ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. बोली प्रत्येक दहा कोसांवर बदलते. इतकेच नव्हे तर ती महाराष्ट्रात प्रत्येक जातीप्रमाणेही बदलते. त्यामुळे बोलीचे एकच एक व्याकरण अशक्यप्राय आहे. व्याकरणामध्ये लिंग, वचन आणि विभक्ती इत्यादींचे विकार नामांना कसे होत आले आहेत त्यांचे वर्णन असते. बोलींत ठिकठिकाणी ते विकार बदलतात. त्यामुळे मराठीच्या बोलीभाषांचे एक व्याकरण होऊ शकत नाही. बोलीभाषेतले शब्द प्रमाणभाषेत घेण्यात कसलीच आडकाठी नाही. फक्त ते घेताना त्या त्या शब्दाचे लिंग ठरवून त्याची अनेकवचनी रूपे कशी होतील आणि सामान्य रूप कसे होईल ह्याचा निर्णय करणे व ती कोशगत करणे आवश्यक असते. कोणत्याही भाषेमध्ये शब्दांची भर सतत पडावयासच पाहिजे आणि बोलीभाषेतून मोठ्या संख्येने ते घेतले जावेत.

प्रमाणभाषेचे नियम फक्त छापील मजकुराला लागतात. छापील म्हणजे सार्वजनिक मजकुराला लागतात. खाजगी मजकूर त्यांपासून मुक्त असतो. कोणताही मजकूर छापण्यापूर्वी तो जाणकारांनी पाहून छापण्यास द्यावयाचा असतो. पूर्वीचे प्रकाशक आणि मुद्रकसुद्धा हे काम नियमितपणे करीत होते.

प्रमाणभाषा ही सगळ्यांनाच परकीय भाषेसारखी शिकवायला पाहिजे कारण ती बोलीभाषेपासून अगदी वेगळी असते. ती उच्चारबोधक असण्यापेक्षा जास्त प्रमाणात अर्थबोधक असते. ती इतिहासाकडे वळलेली असते आणि ती कानांसाठी नसून डोळ्यांसाठी असते.
येथे मराठी भाषेची इंग्रजीशी केलेली तुलना अप्रस्तुत होणार नाही. इंग्रजी आता ज्ञानभाषा म्हणून जगात प्रतिष्ठा पावली आहे. तिचा शब्दसंग्रह विशाल आहे. हा शब्दसंग्रह त्या भाषेने इतर भाषांमधून उचल केल्यामुळेच वाढला आहे. तांत्रिक, वैज्ञानिक त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाचे विषय जेव्हा इंग्रजीला नवीन होते तेव्हा तिने ग्रीक आणि लॅटिन भाषेतून शब्द घेऊन आपली निकड भागवली. त्यानंतर जसजसा इतर भाषांशी तिचा संपर्क वाढला तसतसे त्या भाषांतले शब्द तिने आत्मसात केले. ते तसे करताना त्या शब्दांचे स्पेलिंग कसे करावयाचे हे ठरविले म्हणजे त्यांना तत्सम शब्दांसारखे वागवून कोशामध्ये स्थान दिले. ते एकदा कोशगत झाल्यानंतर त्यांच्या स्पेलिंगमध्ये कधीही बदल घडू दिला नाही.

इंग्लंडमधल्या लोकांची मातृभाषा ‘प्रमाणभूत इंग्लिश’ आहे असे आपण समजतो. परंतु ते बरोबर नाही. तेथे पुष्कळ बोली आहेत आणि त्यांचा वापर त्या-त्या प्रदेशात अनौपचारिकपणे होत असतो. इंग्लंडमधील लोकांची मातृभाषा जरी इंग्लिश असली आणि त्यांना आयुष्यभरात दुसरी भाषा शिकण्याची गरज नसली तरी तेथल्या सर्व नागरिकांना प्रमाणइंग्लिश बिनचूक लिहिता येते असे नाही. औपचारिक प्रसंगी वापरावयाची भाषा सर्वांनाच वेगळी शिकावी लागते. आणि काही जणच तीमध्ये प्रवीण होतात. ते तिचे लेखनविषयक नियम काटेकोरपणे पाळतात. एकदा स्वीकारलेल्या प्रमाणभाषेत त्यांनी वेळोवेळी बदल केला आहे असे आढळत नाही. आमच्या देशात अर्थातच इंग्लंडमधील बोलीभाषा शिकवल्या जात नाहीत. प्रमाण इंग्रजी भाषाच शिकवली जाते. आणि त्या आमच्यासाठी नवख्या असलेल्या भाषेचे नियम आम्ही सगळेच निमूटपणे पाळतो.

आपली भाषा ज्ञानभाषा व्हावी असे जर आपल्याला वाटत असेल तर तिला शास्त्रशुद्ध बैठकीवरच बसवावे लागेल. आणि तिचे शिक्षण औपचारिकपणे सर्वांना घ्यावे लागेल. इंग्रजी भाषा जशी आपण तिच्या व्याकरणाविषयी कुरकुर न करता स्वीकारतो, तिच्यामधील शब्दांचे स्पेलिंग पाठ करतो, तसेच आपल्याही औपचारिक मराठी भाषेचे म्हणजेच प्रमाणभाषेचे नियम आपण स्वीकारले पाहिजेत. त्याचप्रमाणे जुन्या-नव्या नियमांमध्ये सातत्य राखले पाहिजे.

वर्ण आणि अक्षर

दिवाकर मोहनी

संदर्भ : 'शासनसंमत मराठी वर्णमाला', 'भाषा आणि जीवन' : वर्ष २८ अंक १ व २

प्रा० अर्जुनवाडकर ह्यांचा मुद्दा विचारणीय आहे. आपण उच्चार करताना बुङ्ढा, विट्ठल, सक्खा असाच करीत असतो. पण... आणि हा पण फार महत्त्वाचा आहे; आपण नेहमी जसा उच्चार करतो तसे लिहीत नाही आणि आपण पूर्वीपासून जसे लिहीत आलो तसेच पुढेही लिहीत राहिल्याने आपले वाचन सुकर होत असते.

दुसरा मुद्दा असा की, आपल्या बोलीभाषा आणि संस्कृत ह्यांचे उच्चारच वेगवेगळे आहेत. आपल्या बोलीमध्ये म्हणजे देशज शब्दांमध्ये एकाच व्यंजनाचे द्वित्व करण्याचा प्रघात आहे. गप्पा, अप्पा, अण्णा, घट्ट, हट्ट, कच्चा, पक्का, हल्ला, किल्ला, पत्ता, गुत्ता, बत्ता असे उच्चार आम्हांला सहजपणे करता येतात. स्वास्थ्य, नि:स्पृहत्व, धृष्टद्युम्न असे शब्द आम्हांला प्रयत्नाने उच्चारावे लागतात.

एकाच व्यंजनाचे द्वित्व करावयाचे हे आमच्या मनात अगदी पक्के ठसले असल्यामुळे आम्ही महाप्राण व्यंजनांचेसुद्धा लेखनात द्वित्व करतो. तसा उच्चार करणे प्राय: अशक्य असले तरी! वाचनसौकर्यासाठी हा लेखनदोष स्वीकारणे आवश्यक आहे असे मला वाटते.

प्रा० अशोक केळकर ह्यांनी सुचविलेल्या रु, रू लाही तेवढ्याचसाठी माझा आक्षेप आहे. ज्या अक्षरांची आपल्या डोळयांना सवय झाली आहे ती मोडू नये ही एक गोष्ट आणि जुनी पुस्तकेही लोकांच्या वाचनात येत राहणार असल्यामुळे ह्या दोन प्रकारच्या अक्षरांचा डोळयांना त्रास होईल ही दुसरी. म्हणून लेखनात फरक करण्याऐवजी अक्षरांतील ऱ्हस्वत्वाच्या खुणा डावीकडे वळतात आणि दीर्घत्वाच्या उजवीकडे (रु, रू) हे वाचकाला एकदा नीट समाजवून देणे इष्ट असे माझे मत आहे. (बघा : मि मी, मु मू)

डॉ० केळकर ह्यांच्या पत्रात अर्धचन्द्र हा शब्द एकदा आला आहे; अर्धचन्द्र ह्या शब्दाला निराळा संदर्भ आहे. त्यांना तेथे 'चन्द्र' अपेक्षित आहे हे उघड आहे. कारण चन्द्र ह्या शब्दाने पौर्णिमेचा पूर्ण चन्द्र सूचित होत नाही. चन्द्राची चतुर्थीची किंवा पंचमीची कलाच सूचित होते. ( ॅ)

केवल-व्यंजनांच्या मालेला वर्णमाला म्हणणे आणि सस्वर-व्यंजनांच्या मालेला अक्षर-माला म्हणणेही चुकीचे आहे. आपल्या नागरी लिपीत ज्याचा उच्चार होऊ शकत नाही असे काहीही लिहिता येत नाही. केवल व्यंजनांचा उच्चार कोणालाही करता येत नाही. उत्, ऋक्, धिक्, वत्, विद् ह्या शब्दांतील व्यंजने मागच्या स्वराच्या आधाराने उच्चारली गेली आहेत. त्यांच्यापुढे स्वर आल्याबरोबर ती व्यंजने पुढच्या स्वराला जाऊन चिकटतात. उन्नयन, ऋक्साम, विद्वान्, सदसद्विवेक अशी त्यांची शेकडो उदाहरणे आहेत. एवढ्याचसाठी वर्णमाला क् ख् ग् घ् ङ् अशी कधीही लिहू नये. ती क ख ग घ ङ अशीच लिहावी. वाटल्यास उच्चारसौकर्यासाठी ती तशी लिहिली आहे असे सांगावे.

वर्ण हा अर्थशून्य असतो तर अक्षर हे अर्थपूर्ण असते. त्याचप्रमाणे 'वर्ण' हा समूहाचा एक घटक असतो. ख, भू ही वाक्यात वापरली तर 'अक्षरे' - क ख ग घ, भ भा भि भी भु भू हे वर्ण - हे जाणून जुन्या संज्ञा बदलू नयेत. मंत्र, वृत्ते ही सारी अक्षरसंख्येने ओळखली जातात, वर्णसंख्येने नाही!

गौरीवंदन, 123, शिवाजीनगर, नागपूर 440 010
भ्रमणभाष : 098819 00608

मराठीतील आघातांचे उच्चार व लेखन

(उच्चारदर्शनासाठी नागरी लिपीची अपर्याप्तता)

आपल्या मराठीसाठी वापरण्यात येत असलेली लिपी ही नागरी किंवा देवनागरी ह्या नावाने ओळखली जाते. हिंदी, मराठी आणि नेपाळी ह्या तीन भारतीय भाषांनी पूर्वी संस्कृतच्या लेखनासाठी वापरली जाणारी लिपी जशीच्या तशी उचलली. मराठी भाषेसाठी ती आपण अंदाजे एक हजार वर्षांपासून वापरीत आहोत. तिचा स्वीकार करताना ती आपल्या भाषेच्या उच्चारांसाठी पुरी पडते की नाही हे पाहिले गेले नाही.

त्या वेळी व तसे पाहिल्यास मुद्रण सुरू होईपर्यंत केल्या गेलेल्या लेखनाचा उपयोग मोठ्याने वाचण्यासाठी होत असे. तेसुद्धा स्वत: लिहिलेले स्वत:च मोठ्याने वाचून दाखविण्यासाठी जास्त. वाचन हे बहुधा प्रकट होत असे. (आपली काही आडनावेसुद्धा त्याची साक्ष देतात : पाठक, पुराणिक, व्यास वगैरे). साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते. पोस्ट ऑफिस नव्हते आणि ग्रंथांची सुरुवात 'श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिलेंजी येथ' अशी होत होती.

लोक बोलून व ऐकून भाषा शिकत होते. वाचिक आणि लिखित असे दोन्ही संकेत स्वतंत्रपणे, म्हणजेच परस्परनिरपेक्षपणेदेखील अर्थबोध करून देण्यास समर्थ आहेत हे तेव्हा माहीत झालेले नव्हते. दृष्टिगम्य संकेतांचे स्वत:च श्राव्य संकेतांमध्ये रूपांतर करून (म्हणजे शब्दांचा मोठ्याने उच्चार करून) मग त्या श्राव्य संकेतांपासून म्हणजे ध्वनीपासून लोक अर्थग्रहण करीत होते. अर्थ समजून घेण्यासाठी ते स्वत:ला व इतरांना ऐकवीत होते. लहान मुले वाचावयाला शिकतात तेव्हा त्यांना मोठ्याने वाचावे लागते. मनातल्या मनात वाचून चालत नाही. म्हणजे अर्थग्रहण करता येत नाही. पूर्वीचे वाचक जुन्या पोथ्यांवरून स्वत: नकलून घेऊन मोठ्याने वाचत असत त्यामुळे स्वत: मोठ्याने वाचताना त्यांच्या लेखनात झालेल्या चुका त्यांना त्रास देत नसत. उच्चारसातत्य कायम राखता येत असे. लेखनातल्या र्‍ह्स्वदीर्घांचे महत्त्व नसे. श्रोत्यांच्या कानांना नीट वाटेल (डोळ्यांना नव्हे) असे त्यांना उच्चारता येत असे. आपली हेमाडपंती मोडी अशाच हेतूने आजच्या शॉर्टहॅण्डसारखी वापरली जात होती. ती लिहिणार्‍याच्या मनातले बहुतेक सारे संदर्भ ती वाचणार्‍याला बहुधा माहीत असत.

आज मुद्रणविद्येच्या प्रसारामुळे कोणीएकाने लिहिलेले लाखो लोक वाचतात. नवीन नवीन विषयच नव्हे तर भाषासुद्धा पुस्तकावरून शिकतात. त्यामुळे पूर्वी शब्दांचे जे उच्चार ऐकून माहीत होत होते ते आता नवसाक्षरांसाठी किंवा नवीन विषयांत पुस्तकांच्या माध्यमांतून प्रवेश करणार्‍यांसाठी (त्यांच्या वाचनात अपरिचित शब्द येतात त्यामुळे) अक्षरांच्या साह्याने दाखविण्याची सोय करावी लागणार आहे; पण ही सोय, अर्थात केवळ उच्चार समजावून देण्यापुरती असावी, नित्य लेखनासाठी नको. त्याची कारणे पुढे येतील.

आजपर्यंत लिपिशुद्धीचे विचार, चारदोन अपवाद वगळता, आपल्या लिपीला मुद्रणसुकर बनविण्यासाठी आणि तिच्यातील 'जोडाक्षरांची' संख्या कमी करून तिला यंत्रारूढ करण्यासाठीच झालेले आहेत. आपले यथार्थ उच्चार दाखविण्यासाठी तिच्यात पुरेशा सुधारणा झाल्या नाहीत. केंद्र सरकारने पुरस्कारिलेल्या परिवर्धित देवनागरीमध्येसुद्धा याविषयी पुरेसा विचार झालेला नाही. नि:संदिग्ध अर्थ समजण्यासाठी लेखनात आणि उच्चारात सातत्य पाहिजे आणि तेवढयासाठीच लिप्यंतर नको.

संस्कृत आणि मराठी ह्या दोन अगदी वेगळ्या भाषा आहेत. त्यांमध्ये जननीजन्यभाव नाही असे माझे मत आहे. त्यांची प्रत्येकीची उच्चारप्रकृती वेगळी आहे. त्यामुळे मराठीचे काही उच्चार संस्कृतमध्ये नाहीत आणि संस्कृतचे मराठीत नाहीत. संस्कृतमधल्या स्वरांपैकी 'ऋ''लृ' आणि अर्थात 'ॠ' 'लृ' मराठीत नाहीत. व्यंजनांपैकी 'ञ' नाही. 'मी त्याला यूं यूं बनविले', ह्यामध्ये किंवा यंव्-त्यंव् ह्यामधले उच्चार ञ् किंवा ञो सारखे होतात पण त्याखेरीज ञ चा उच्चार मराठीत अन्यत्र कोठेही आढळला नाही. व्यंजनासारख्या संस्कृत शब्दांमधला ञ् आपल्याकडे न् सारखा उच्चारला जातो. मूर्धन्य ष चा उच्चार मराठीत नाही. ष हा वर्णच नाही म्हणून क्ष नाही. आपल्या ज्या शब्दांमध्ये क्ष हा वर्ण येतो तो शब्द आपण संस्कृतमधून घेतला आहे असे निश्चित समजावे.

संस्कृत नसलेले रिक्षा, बक्षी, नक्षी असे काही शब्द आम्ही वापरतो पण त्यांचे उच्चार रिक्शा, बक्शी असेच आहेत. आम्ही त्यांमधला क्ष हा वर्ण केवळ लेखनसौकर्यासाठी घेतला आहे. मराठीमध्ये ञ नाही म्हणून ज्ञ (ज्ञ) हा वर्णदेखील नाही. ज्ञ चा उच्चार आपण कोठे द्र्य सारखा तर कोठे निव्वळ ग्य सारखा करतो. इतकेच काय तर वँ‌् हा उच्चारसुद्धा मूळ मराठीत कोठेही नाही. तसाच तो उत्तर भारतीय भाषांमध्येही नाही. सिंह, मांस, दंश, वंश, संस्कृत, हंस, संरक्षण, संशय ह्या सर्व शब्दांचा उच्चार करण्यास आम्हांला फार जास्त प्रयत्न करावा लागतो. तो उच्चार करावयाचा मराठी लोक संकोच करतात किंवा मांस, नपुंसक अशांसारख्या शब्दांमध्ये ते तो करीतच नाहीत. अन्यभाषी सिंहला सिंग किंवा सिन्हा, संवादाला सम्वाद असे करीत असतात. आपणही नरसिंहाला हाक मारताना नरसिंग असेच करीत असतो. संयममध्ये सञ्यम सारखा उच्चार होतो पण हा शब्द किंवा 'किंवा' सारखी अव्यये हे सारे शब्द तत्सम म्हणजे संस्कृत आहेत. आपल्या भाषेत तत्सम शब्दांचा भरणा फार मोठा आहे. हे तत्सम शब्द संस्कृत, हिंदी, कानडी, तेलुगू, अरबी, फारसी, गुजराती आणि इंग्लिश ह्या भाषांमधून आलेले ज्ञात आहेत. ह्यांपैकी आपल्या उच्चारप्रकृतीचा परिणाम होऊन जे मुळापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रतिपादनाच्या सोईसाठी तद्भव किंवा देश्य असे मानले आहे.

ह्या निबंधात मराठी किंवा मराठी भाषा हे शब्द जेथे जेथे पूर्वी वापरले आहेत किंवा पुढे वापरले जातील तेथे तेथे ते तत्समशब्दविरहित मराठीचे द्योतक आहेत असे मानावे आणि मराठी म्हणजे तद्भव किंवा देश्य शब्दांनीच बनलेली भाषा असे ह्या निबंधापुरते समजावे.

ह्यानंतर संस्कृत म्हणजे तत्सम शब्दांची उच्चारप्रकृती आणि मराठी म्हणजे तद्भव वा देश्यशब्दांमधून आढळणारी उच्चारप्रकृती ह्यांतील फरक अधिक विस्ताराने पाहू. यासाठी 'जोडाक्षरे' व अनुस्वार, तसेच रेफ (रफार) आणि विसर्गादी चिन्हे ह्यांचा विचार करावा लागेल.

संस्कृतमध्ये सर्व संयुक्ताक्षरांचे उच्चार आघातयुक्त होतात. त्याला अपवादच नाही. म्हणजे येथे छन्द:शास्त्रातील संज्ञा वापरावयाची तर अशा सर्व संयुक्ताक्षरांपूर्वी येणार्‍या वर्णांचा उच्चार दोन मात्रांनी युक्त होऊन त्यांच्या ठिकाणी गुरुत्व येते. मराठीमध्ये मात्र ज्यांचा आघातयुक्त उच्चार होत नाही अशी जोडाक्षरे पुष्कळ आहेत. य ह्या वर्णाने युक्त, ह या वर्णाने युक्त आणि अनुनासिके. जे अनुस्वाराच्या योगाने दाखविले जाते त्याने युक्त असलेली बव्हंश जोडाक्षरे बहुधा निराघात जोडाक्षरे आहेत.

'य' ने किंवा खरे सांगावयाचे तर 'या' ने युक्त जोडाक्षरे फार जास्त आहेत. उद्या, मातक्यात्, म्यान, दरम्यान यांसारखे काही सुटे शब्द ह्या निराघात 'या' वर्णाने युक्त आहेत. पण मुख्य म्हणजे संबोधने : तात्या, बन्या, बग्या, बाळ्या, मन्या, पिल्या, बाब्या, मोळीविक्या, लाकूडतोड्या, हुजर्‍या, पाणक्या, पुतण्या अशा सर्व संबोधनांमध्ये व नामांमध्ये हा निराघात या येत असतो.

दुसरा फार मोठा वर्ग अनेकवचनांचा आहे. वाटया, गाड्या, माड्या, होड्या, वाड्या, साड्या, बांगड्या, ताटल्या, पुर्‍या, सुर्‍या, दर्‍या, कादंबर्‍या इ०

आणखी एक मोठा वर्ग सामान्य रूपांचा आहे. त्याच्या, माझ्या, तुझ्या, पुण्याला, करण्यासाठी, आचार्‍याला, त्याला, दिव्याखाली, खोर्‍याने वगैरे.

ह्या निराघात 'या' चा उच्चार फक्त मराठीत आहे. संस्कृतात नाही. आपण संस्कृतची लिपी घेतली. त्यामुळे विद्या, उद्यान, ह्यांमध्ये येणारा द्या आणि उद्या, लाद्या, गाद्या ह्यांतला द्या ह्यांमध्ये आपण फरक करू शकलो नाही. संस्कृतामध्ये उद्या हा शब्दच नाही त्यामुळे त्याचा उच्चार दाखविण्याची त्यांनी सोय केली नाही. त्यामुळे ती मराठीतही आली नाही. पण मराठीला तिची गरज आहे.

उद्यासारख्या शब्दांमधल्या 'या' मुळे होणारे जोडाक्षर निराघात असल्यामुळे तेथले य हे व्यंजन केवलव्यंजन नसून तो अर्धस्वर आहे असे मी मानतो. ह्या अर्धस्वर य पासून जसा मराठीत या होतो तसे यी आणि ये सुद्धा होतात. उदा० गायी (गाई), सोयी (सोई), हुजर्‍ये, पाणक्ये, पुतण्ये, लाकूडतोड्ये, दात्ये, साठ्ये, परांजप्ये, मोत्यें, मी जात्ये, येत्ये वगैरे.

वर उल्लेखिलेल्या सर्व शब्दांमधील य चा उच्चार निराघात आणि त्यामुळे स्वरसदृश आहे. प्रमाण आणि नि:संदिग्ध उच्चारदर्शनासाठी हा स्वरसदृश उच्चार, मराठीत वेगळा दाखविणे, त्याची सोय करणे आवश्यक आहे.

'य' ह्या अर्धस्वरानंतर आपण आता व्यंजन ह आणि महाप्राण यांतील फरक लक्षात घेऊ. हा विचार मांडताना मी पुढे कदाचित चुकीची परिभाषा वापरीन, किंवा जुन्या पारिभाषिक शब्दांचा नवीन अर्थाने वापर करीन. त्याकडे दुर्लक्ष करून आपण त्यातला विचार समजून घ्यावा.

कचटतप आणि गजडदब ह्यांपासून अनुक्रमे खछठथफ आणि घझढधभ होताना ते पहिले वर्ण महाप्राणयुक्त होतात असे मी पुढे म्हटले आहे. माझ्या मनातील कल्पना स्पष्ट होण्यासाठी ही व्यंजने अल्पप्राणाची महाप्राण झाली असे न म्हणता ती महाप्राणयुक्त झाली अशी भाषा मी वापरली आहे. त्यामुळे काहीसाठी माझे प्रतिपादन कदाचित दुर्बोध होईल.

मराठीमध्ये महाप्राण खछठथफ आणि घझढधभ ह्या वर्णांप्रमाणेच ण्ह न्ह म्ह य्ह र्‍ह ल्ह व्ह ह्या वर्णांमध्येही येत असतो. संस्कृतात तो येथे कोठेही येत नाही. (मी निराघात य हा अर्धस्वर आणि निराघात ह ला महाप्राण असे मानतो. ह्यामधली णनम ही अनुनासिके तर यवरल हे अर्धस्वर आहेत हे ध्यानात घेण्याजोगे आहे. यवरल ह्या वर्णांचा उपयोग व्यंजनांसारखा आणि अर्धस्वरांसारखा असा दोनही प्रकारांनी होऊ शकतो. व्यंजनांसारखा केल्यास त्यांचा उच्चार आघातयुक्त तर अर्धस्वरासारखा केल्यास जोडाक्षरांमधला त्यांचा उच्चार निराघात होतो. त्यामुळे य्ह व्ह र्‍ह ल्ह यामध्ये कोणतेच व्यंजन नाही, असे म्हणणे भाग आहे. अर्थात शब्दांमध्ये त्यांचा उच्चार निराघात होत असल्यास जेथे असा अर्धस्वर आणि महाप्राण ह्यांचा संयोग झाला आहे तेथे त्यांच्या ठिकाणचे पौर्वापर्य ठरविणे दुष्कर आहे. आजच्या लेखनामध्ये अडचण अशी की ही अक्षरे व्यंजने कधी असतात ते कळत नाही.

ण्ह- कण्हणे, न-न्हावी, उन्हाळा, पन्हे, पन्हाळा, तान्हुल्याला पाहून आईला पान्हा फुटला, म्ह-म्हशी, म्हातारा, म्हणून, आम्ही, य्ह-बय्हा (बावळट ह्या अर्थाचा नागपुरी शब्द) र्‍ह्-तर्‍हा, पर्‍हा, गोर्‍हा, ल्ह-कल्हई, कोल्हापूर, विल्हेवाट, वल्हवणे, वेल्हाळ, व्हा-जिव्हाळा, जिव्हारी, न्हावाशेव्हा, चव्हाण, पाव्हणा, देव्हारा इ० आता उच्चारलेल्या सर्व शब्दांमधला हा हे व्यंजन नसून तो महाप्राण आहे, असे मी मानतो ह्याचे कारण महाप्राणाचे लक्षण अर्धस्वराप्रमाणे निराघात उच्चार हे आहे असे मला वाटते. ह हे येथे व्यंजन असते तर त्याचा येथे साघात उच्चार करावा लागला असता. हा महाप्राण आपण व्यंजनासारखा लिहितो, हा आपल्या मराठी लेखनातला दोष आहे. आपण अशा दोषांसाठी रोमन आणि उर्दू या लिप्यांना हसतो, पण आपल्या मराठीच्या लेखनातला हा दोष अतिपरिचयामुळे आपल्याला त्रास देत नाही. तो पुरतेपणी आपल्या ध्यानातही आला नाही.

महाप्राण सगळीकडेच व्यंजनाप्रमाणे लिहिला तर काय होईल बघा. क मध्ये महाप्राण घातल्यावर तो क्ह असा होत नसतो तर ख असा होत असतो. अखण्ड ह्या शब्दाचा उच्चार ह हे व्यंजन वापरून केल्यास अक् हण्ड असा होईल, साघात होईल कारण दोन व्यंजनांचा उच्चार ती एकाच वर्णात आली असताना साघात करावयास हवा आणि त्याच नियमाप्रमाणे साघातमधील घा चा उच्चार साग्हात असा करावा लागेल. ह्या दोन उच्चारांवरून महाप्राण आणि व्यंजन ह ह्यांचा उच्चारांमध्ये कसा फरक आहे ते कळून येईल. पाहा (क-ख, ग-घ, च-छ, ज-झ, ट-ठ, ड-ढ, त-थ, द-ध, प-फ, ब-भ) का बनविली ते कळून येईल. आघातयुक्त उच्चाराबद्दलही काही गैरसमज आहेत. दिव्यातून आणि दिव्यांतून यामधील दुसर्‍या दिव्यामध्ये दोन व येतात असा काहींचा समज आहे. तेथे एकदाच व् आणि त्यानंतर दुसरे व्यंजन य हे आले असल्यामुळे त्याचा उच्चार आघातयुक्त होतो इतकेच.

'छ' ह्या अक्षराचा उच्चार मात्र वरच्या नियमाला अपवादात्मक आहे. ते महाप्राणयुक्त लिहिले जात असले तरी तेथे मुद्दाम आघात घ्यावा अशी संस्कृत भाषेची सूचना आहे. (मराठीची नाही.) त्यासाठी 'ह्रस्वस्य पिति कृति तुक्' असे सूत्र आहे. ह्या सूत्राप्रमाणे कोठल्याही ह्रस्व वर्णापुढे छ हा वर्ण आल्यास नियमाने आणि दीर्घ वर्ण आल्यास विकल्पाने तुगागम करावा, (तेथे एक जास्तीचा त् घालावा) असा नियम सांगितला आहे. उदा० वि+छेद = विच्छेद, परि+छेद = परिच्छेद, शब्द+छल = शब्दच्छल, मातृ+छाया = मातृच्छाया, पितृ+छत्र = पितृच्छत्र इ० एखाद्या दीर्घस्वरानंतर विकल्पाने तुगागम होत असल्यामुळे लक्ष्मीछाया आणि लक्ष्मीच्छाया अशी दोनही शुद्ध रूपे सिद्ध होतात. नाहीतरी दीर्घ वर्णांच्या उच्चारानंतर आघाताची आवश्यकता कमी झालेली असते. आघात घेण्याचा हेतू उच्चारात त्या वर्णाच्या ठिकाणी गुरुत्व आणणे असा आहे. तो हेतू दीर्घत्वामुळे साध्य झालेलाच असतो. शिवाय च्छ आणि च्ह ह्यांच्या उच्चारांमध्येही सकृद्दर्शनी जाणविण्यासारखा भेद नाही.

मराठीमध्ये पडछायासारखे 'छ' चे निराघात उच्चार होत असतात. परिणामी मराठीत अन्नछत्र, पितृछत्र, मातृछाया, मुक्तछंद, नाटयछटा, रंगछटा अशी संस्कृत शब्दांची (चुकीची) सामासिक रूपे रूढ झाली आहेत. उलट संस्कृत भाषेची जेथे शक्य असेल तेथे आघात घेण्याची प्रकृती असल्यामुळे तिच्यामध्ये उद्+हर = उद्धर, तस्मिन् + एव =तस्मिन्नेव्, इन्+अन्त = इन्नन्त असे संधी होत असतात. मराठीमध्ये एक+एक = एकैक असा संधी होत नाही तर एकेक असा उच्चार आपण करीत असतो.

खघछ ह्याविषयी सांगून झाले. ठथफझढधभ ह्या महाप्राणयुक्त अक्षरांबद्दल वेगळे सांगण्यासारखे काही नाही.

व्यंजन र् हा वर्णदेखील मराठीत नसल्यासारखाच आहे. र हा स्वरयुक्त (अजन्त-एकाच्) वर्ण मराठीत आहे. पण संस्कृतमध्ये (व्यंजन र्) पुष्कळ ठिकाणी वापरला जातो. तसा तो मराठीत आढळत नाही. व्यंजन र् चे चिन्ह संस्कृतात रेफ किंवा रफार (र् ) हे आहे. ते ज्या शब्दांमध्ये आहे ते सर्व शब्द मराठीतर आहेत असे समजावे. ह्या रेफाने युक्त शब्द बघा : अर्क, मूर्ख, वर्ग, अर्घ, शार्ङ, अर्चा, जर्जर, निर्झर, अर्णव, आर्त, अर्थ, सूर्य, पूर्व, कीर्ती, मूर्ती असे असंख्य.

मराठीमध्ये सर्रास, हर्रास, किर्र, कोकर्डेकर, किर्लोस्कर, वगैरे शब्दांमधला रेफ व्यंजन र् चा द्योतक नसून निभृत र चा आहे. किरलोसकर (गावाचे मूळ नाव किरलोसी असे आहे.) कोकरडेकर (गावाचे नाव कोकरडा, स्थानिक उच्चार कोकल्डा असासुद्धा होतो.) असे हे मूळचे शब्द, शब्दांमधल्या काहींचे मधल्या किंवा शेवटच्या अक्षरांचे उच्चार निभृत करण्याच्या आपल्या पद्धतीप्रमाणे आणि उच्चारानुरूप केलेल्या लेखनामुळे किर्लोस्कर, कोकर्डेकर असे लिहिले जाऊ लागले.

सर्रास, हर्रास आणि किर्र ह्या शब्दांमध्ये मात्र व्यंजन र् चा उच्चार होतो असे मला वाटू लागले आहे. ह्या ठिकाणी ह्या शब्दांमुळे मराठीच्या उच्चारप्रकृतीचा आणखी एक विशेष आपल्या लक्षात येणार आहे. मराठीत किंबहुना सर्वच देश्य उत्तर भारतीय भाषांमध्ये जी आघातयुक्त जोडाक्षरे आहेत ती बहुधा ज्यांच्यामध्ये एकाच व्यंजनाचे द्वित्व झालेले आहे अशी आहेत. या नियमाला मला आतापर्यंत दोनचारच अपवाद दिसले आहेत. आधी नियम पाहू व मग अपवाद.

नियम असा की मराठी शब्दांमध्ये असलेली जोडाक्षरे एकाच वर्णाचे द्वित्व होऊन होतात. उदा० कल्ला, किल्ला, गल्ला, हल्ला, हल्ली, गिल्ला, गिल्ली, दिल्ली, सल्ला, बल्ली, फल्ली, कच्चा, पक्का, खड्डा, जख्ख, मख्ख, चक्क, गच्ची, खच्ची, कच्चीबच्ची, लुच्चा, थुच्चा, सच्चा, झक्की, नक्की, चक्की, कित्ता, पत्ता, भत्ता, गुत्ता, ढिम्म, घुम्म, गप्प, मुद्दा, गुद्दा, हुद्दा, पट्टा, बट्टा, थट्टा, चिठ्ठी, विट्टी, सुट्टी, पट्टी, बट्टी, चट्टी, भट्टी, खट्ट, घट्ट, गट्ट, मठ्ठ, लठ्ठ, आप्पा, बाप्पा, अण्णा, भय्या, अय्या, इश्श, वगैरे वगैरे.

अपवाद फक्त स्त, क्त ह्या वर्णांचा (गोष्ट हा शब्दसुद्धा गोठ असा उच्चारला जात असे) उदा० फस्त, मस्त, शिस्त, भिस्त, सुस्त, स्वस्त, जास्त, दुरुस्त, फक्त, मक्ता वगैरे.

आपण मराठीत ज्याला अनुस्वार म्हणतो ते पुष्कळ ठिकाणी नुसते बिन्दुचिन्ह असते. मराठीतल्यासारखा त्याचा गैरवापर अन्यत्र क्वचित झाला असेल. ते एकच चिन्ह मराठीने संस्कृत भाषेतील अनुस्वार म्हणून ङ्ञ्ण्न्म् आणि वँ् या अनुनासिक व्यंजनांच्या ऐवजी; अं, हं, सारख्या अनुनासिका उच्चारांसाठी; दोन सारख्या शब्दांमधला अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी, नामांच्या ठिकाणी तृतीया, सप्तमी अशा विभक्तींचा, बहुवचनाचा, नपुंसकलिंगाचा आणि क्रियापदांच्या ठिकाणी अपूर्ण वर्तमानकाळाचा आणि प्रथमपुरुषी कर्त्याचा असे निर्देश करण्यासाठी इतकेच नव्हे तर खास मराठीचे जे उच्चार आहेत - झालं, केलं, गेलं इत्यादी, ते दाखविण्यासाठीही सरसहा वापरले आहे. त्यामुळे वाचकाची कोठे अर्थ समजण्याच्या बाबतीत सोय तर कोठे उच्चार करण्याच्या बाबतीत गैरसोय झाली आहे.

अनुच्चारित अनुस्वार हा वदतोव्याघात आहे. मराठीत आपण वापरतो ते वास्तविक बिन्दुचिन्ह आहे. म्हणून अनुस्वार व बिन्दुचिन्ह ह्यांच्या खुणा वेगळया असणे आवश्यक आहे. अनुच्चारित अनुस्वार म्हणून आपण संस्कृतची परिभाषा चुकीच्या अर्थाने वापरीत आहोत. 'सर्वांशी मिळून मिसळून राहा म्हणजे तू सर्वांशी यशस्वी होशील' ह्या वाक्यांतील दुसर्‍या सर्वांशी (सर्व अंशांनी) हा उच्चार मराठीत नाही आणि पहिला उच्चार संस्कृतात नाही.

अनुस्वार (बिन्दुचिन्हे नव्हे) आणि रफार ही दोनही व्यंजनचिन्हे आहेत. ही दोनच व्यंजने शिरोरेखेच्या वर येणारी व्यंजने होत. ज्या अक्षरांवर ती येतात ती अक्षरे त्यामुळे जोडाक्षरे मानली गेली पाहिजेत. रेफ हे चिन्ह नेहमीच अक्षरातील स्वरांशाला चिकटलेले असते आणि अनुस्वार तसा नसतो. त्यामुळे रेफ हा त्याच्या खाली लिहिलेल्या अक्षराच्या आधी उच्चारला जातो आणि न चिकटलेला अनुस्वार नंतर.

अनुस्वार आणि चंद्रबिंदू यांच्यातही फरक करणे भाग आहे. अनुस्वार हा अनुनासिक व्यंजनाचा आघातयुक्त उच्चार असून चंद्रबिंदू हा स्वरांना होणारा विकार आहे व त्यामुळे तो निराघात आहे. पण मग इंग्रजी शब्दांमधले अँड, बँक सारखे उच्चार दाखविण्यासाठी निराळी सोय करावी लागेल. आणि आपला चंद्रबिंदू कँवरसाहेब, हँ हँ आणि हँ हँ हँ (हं हं आणि हं हं हं हे श्री० दिनकर देशपांडे यांच्या एका नाटकाचे नाव आहे) अशा उच्चारांसाठी वापरला तर अँ साठीही वेगळे चिन्ह शोधावे लागेल.

बिन्दुचिन्हांचे प्रकार

1. खणखणीत अनुनासिक व्यंजन उदा० (क) शिंके, पंखा, गंगा, तंटाभांडण, भिंत, तिंबूनाना (येथे परसवर्णाप्रमाणे अनुस्वाराचा उच्चार होतो.)
2. चिंच, मांजर, पंछी, पंजा (येथे परसवर्णाप्रमाणे उच्चार होत नाही कारण मराठीत ञ् आणि वँ नाहीत.)
2. अनेकवचनदर्शक : उदा० शब्दांमध्ये, लोकांसाठी, सर्वांपर्यंत
3. अनुनासिक स्वर उदा० अं, आं, इं, ईं, उं, ऊं, - अं, हं! वगैरे
4. झालं, केलं, गेलं असे उच्चार.

अनुच्चारित (नवीन प्रमाण लेखन-नियमांनुसार हे अनुस्वार लिहिले जात नाहीत.)

1. विभक्तिप्रत्यय - (मीं, तूं, आम्हीं) काळ (जातां, जातां) करूं - कर्ता (डोळयांनी बघतों, ध्वनी परिसतों कानीं, पदीं चालतों)
2. अर्थभेद - (नांव, कांच, पांच) - (क्रियापदें, आज्ञार्थी क्रियापदें, करीं, देईं)
3. लिंग - नपुंसकत्वाचा निर्देश (गुरुं, कुत्रीं, कार्टीं, कोकरूं, लेकरूं लिंबूं)
4. अव्यये - मुळें, साठीं, करितां

मराठीत पुष्कळशा अक्षरांचे उच्चार निभृत होत असतात. त्यांपैकी काही दाखविण्याचा तर काही न दाखविण्याचा प्रघात पडला आहे. दोन्ही, तिन्ही, चार्‍ही मधील निभृत उच्चार व्यंजनांसारखे दाखविले आहेत. उदगीर, नागपूर, यांमध्ये तसे ते होत असले तरी ते दाखविण्याची पद्धत नाही.

संस्कृत भाषेसाठी वापरल्या जाणार्‍या चिन्हांनी मराठीत निभृत उच्चार दाखवू नयेत. त्यासाठी वेगळी चिन्हे निर्माण करावीत. अर्थात हा विचार यथार्थोच्चार-दर्शनाबाबत आहे. नित्यलेखनासाठी नाही.

विसर्गाचा विचार केल्याखेरीज आघातविचार पूर्ण होत नाही. विसर्गाचा उच्चार मराठीच्या प्रकृतीला पूर्णपणे परका आहे. जोडाक्षरांच्या ठिकाणी फक्त एकदाच कोठेतरी आघात घ्यावयाचा इतकेच मराठीला माहीत आहे. त्यामुळे विसर्ग व त्यापुढे 'जोडाक्षरे' असे एका शब्दात एकापुढे एक आले की विसर्गाचा लोप करून फक्त जोडाक्षराचा उच्चार करावयाचा अशी मराठीची प्रकृती आहे. नि:श्वास, नि:स्पृह, मन:स्वास्थ्य, मन:क्षोभ, यश:श्री अशांसारख्या शब्दांचे उच्चार निश्वास, निस्पृह, मनस्वास्थ्य, मनक्षोभ, यशश्री असे होतात. 'दु:ख'चा उच्चार, दुक्ख किंवा दुख्ख असा होतो. विसर्ग आणि जोडाक्षर एकापुढे एक आल्यामुळे एकाच शब्दामध्ये दोन आघात घ्यावे लागतात. पण आघात कमी घेण्याकडे मराठीचा कल असल्यामुळे आणि सरधोपट उच्चार करण्याची तिची प्रवृत्ती असल्यामुळे दोन आघातांचे उच्चार मराठीत कधीच होत नाहीत. उदा० उद्ध्वस्त, उद्द्योत, तज्ज्ञ, महत्त्व इ० महाप्राण, विसर्ग आणि व्यंजन 'ह' ह्यांमधील भेद मराठीला माहीत नसल्यामुळे अक्षरश: सारखे शब्द अक्षरशहाप्रमाणे धिक्कार, धि:कारप्रमाणे, अध:पात, अन्त:करण हे अधप्पात, अंतक्करणाप्रमाणे उच्चारले जातात व त्यामुळे ते तसे लिहिले जातात.

मराठीची उच्चारप्रकृती शक्यतो निराघात उच्चार करण्याची असल्यामुळे जेथे कोठे आघातामुळे गुरुत्व येते तेथे दीर्घत्वाची गरज नाही असे मराठी बोलणारे लोक समजतात. ह्या कारणामुळे प्राविण्य, नाविन्य, प्रित्यर्थ, धुम्रपान, रविन्द्र, दिक्षित, आशिर्वाद, तिर्थरूप, पुर्ण, पुर्व, सुर्य, किर्तन, जिर्णोद्धार, परिक्षा, अधिक्षक असे उच्चार करतात व तसेच लिहितात. मराठीमध्ये शब्दाच्या अन्त्यस्थानी 'अ' स्वर व उपान्त्यस्थानी 'इ' किंवा 'उ' असल्यास ते दीर्घ लिहावे असा नियम आहे. तद्भव शब्दांच्या बाबतीत मराठीची उच्चारप्रकृती लक्षात घेऊन, शिस्त, भिस्त, उंट, सुरुंग, तुरुंग, चिंच, भिंत असे शब्द वर सांगितलेल्या नियमाला अपवादस्वरूप मानावे असे सांगितले आहे. संस्कृत भाषेमध्ये स्वरांचे दीर्घत्व आणि आघात हे दोनही वेगवेगळे मानले गेल्यामुळे कीर्ती, तीर्थक्षेत्र, जीर्णोद्धार, आशीर्वाद, सूर्य, पूर्व, मूर्ख अशा सर्व शब्दांमध्ये दीर्घत्व कायम ठेवून आघात घेतला जातो.

काही सूचना - (कोशांमध्ये उच्चारदर्शनासाठीच वापरण्यासाठी; नेहमी लिहिण्यासाठी नाही.) रेफ किंवा रफार हे चिन्ह दर्या-दर्‍या, आचार्यांना-आचार्‍यांना अशा उच्चारांतील फरक दाखविण्यासाठी आपण वापरीत असतो. ते तसेच वापरीत राहावे. अर्धस्वर दाखविण्याची सोय जर वेगळया पद्धतीने करता आली तर अर्धा र् (र्‍) त्या चिन्हाची गरज पडणार नाही, कारण ते सध्या निराघात व्यंजन र् दाखविण्यासाठी वापरले जात आहे.

निराघात 'या' दाखविण्यासाठी विनोबांनी लोकनागरीमध्ये सुचविलेला म् असा कान्या वापरण्यास काही हरकत नाही. त्यामुळे रजा आणि राज्य ह्या दोन शब्दांचे सामान्यरूप डोळयांस वेगळे दिसेल.

आपल्या लिपीतील एका स्वरयुक्त उच्चारासाठी एक अक्षर ही कल्पनाच मोठी मनोरम आहे. उध्द्वस्तमधल्या ध्द्व मध्ये तीन व्यंजने व त्यांच्याबरोबर एक स्वर, धाष्टर्य मध्ये चार व्यंजनांच्या सोबत एक स्वर, कार्त्स्न्यमध्ये पाच व्यंजने-स्वराच्या आधी व एक नंतर अशा सहा व्यंजनांचे एक अक्षर आपण लिहितो. कमी अक्षरांमुळे नि:संदिग्धता येण्यास मदत होते. जलद वाचनास व अर्थग्रहणासही साह्य होते हा आपल्या लिपीचा गुण नष्ट होऊ देऊ नये. आपल्या डोळयांना एकाच प्रकारच्या जोडाक्षरांची सवय व्हावी असे मी मानतो. एकच जोडाक्षर जर नेहमी वापरावयाचे तर ते पूर्वीपासूनचेच का नको असा मला प्रश्न पडतो. त्यासाठी एक आपद्गस्त हा शब्द मी लिहून दाखवितो : 'आपद््‍ग््‍रद्ग्रस्त', 'आपद्ग्रस््त', 'आपद्गरस्त', 'आपद्गरस्त' - वगैरे. हे अनेक पर्याय डोळयांना त्रासदायक होतात म्हणून त्यांच्यापैकी एका रूपाचे प्रमाणीकरण करावे. छापताना सर्वत्र एकच प्रमाणित रूप वापरावे. थोडक्यात काय तर वाचकाची सोय लेखकाने आणि मुद्रकानेही पाहावी.

मराठीतले दंत्यतालव्य च, ज, झ, देहे दु:ख हे सूख मानीत जावे ह्यांतील र्‍ह्स्व एकार, कोठे र्‍ह्स्व ओकारही असेल, एका मात्रेपेक्षा कमी असलेले काही वर्णांचे अर्ध्या किंवा पाव मात्रेचे उच्चारही असतील. त्यांचा विचार पूर्वी पुष्कळांनी केला आहे. म्हणून मी तो येथे केलेला नाही. त्यातून हा निबंध मुख्यत: आघाताविषयी आहे. म्हणून येथे त्याचाच विस्तार केलेला आहे.

दिवाकर मोहनी
मोहनीभवन, धरमपेठ, नागपूर 440010
भ्रमणभाष : 09881900608