पुस्तक-परीक्षण

मराठी कोशवाङ्मयातील मौलिक भर

कलिका मेहता

(परीक्षित पुस्तक : भूगोल कोश, लेखक : एल०के० कुलकर्णी. प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे. पहिली आवृत्ती २००९, पृष्ठे २३ + ३४८ किंमत ` ४००)

ज्ञानभाषा म्हणवून घेण्यासाठी केवळ इंग्रजी हीच योग्य भाषा आहे अशी ओरड करणार्‍यांना एल०के० कुलकर्णी यांचा भूगोलकोश हे सणसणीत उत्तर आहे. वर्षभरात निघालेल्या दोन आवृत्त्या ही भूगोलकोशाच्या यशाची वाचकांनी दिलेली पावतीच आहे.

लेखक स्वत: पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक असून त्यांनी जवळजवळ २५ वर्षे भूगोलाचे अध्यापन केले आहे. त्यामुळेच शालेय स्तरापासूनच उपेक्षित राहिलेल्या या विषयाच्या अध्ययन-अध्यापनातील नेमक्या अडचणी त्यांच्या लक्षात आल्या. त्यांच्या लेखी भूगोल हा सामाजिक शास्त्रांमधील केवळ ४० गुणांइतकेच महत्त्व असणारा विषय नसून जीवनाच्या प्रत्येक अंगाला व्यापून टाकणारी संकल्पना आहे.

भूशास्त्र, हवामानशास्त्र, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र इ० विज्ञानशाखांमधील माहिती व संकल्पनांना भूगोलात अनन्यसाधारण महत्त्व आहे पण त्याबद्दलची जास्तीत जास्त अचूक व परिपूर्ण शास्त्रीय माहिती एकत्रितपणे देणारा असा एकही संदर्भग्रंथ मराठीत तर नाहीच पण इंग्रजीतही नाही. वरील विषयांच्या संदर्भग्रंथातूनच त्याविषयी माहिती मिळवावी लागते.

या समस्येवर उत्तर शोधण्याच्या तळमळीतून आणि आपल्या व्यवसायाबद्दलच्या व विषयाबद्दलच्या निष्ठेतून अध्यापक, विद्यार्थी आणि आजूबाजूच्या घडामोडींकडे कुतूहलपूर्ण नजरेने पाहणारा सामान्य माणूस अशा विस्तृत वाचकवर्गाच्या गरजा एकाच वेळी पुरवणार्‍या दर्जेदार कोशाची निर्मिती झाली. मराठी भाषेच्या कोशदालनात अत्यंत मौलिक अशी भर पडली व भूगोल हा एक विषय न राहता विज्ञान बनले. या कोशनिर्मितीचे वेगळेपण म्हणजे हे वेळखाऊ, खर्चिक काम लेखकाने ११ वर्षांच्या दीर्घ कालावधीत एकट्याने, एकाहाती पूर्ण केले आहे.
या कोशात ३५० भौगोलिक नोंदींचे (त्यांचा उल्लेख लेखकाने ‘संबोध’ असा केला आहे.) स्पष्टीकरण व माहिती दिली आहे. हे संबोध खगोलशास्त्र, भूशास्त्र, भौतिकशास्त्र, हवामानशास्त्र, पाषाणशास्त्र, सागरशास्त्र, भूकंपशास्त्र, जग व भारतातील विविध स्थळे, पर्वत, नद्या, सरोवरे इ०विषयी आहेत. मनोगत, भूमिका, ऋणनिर्देश व कोशवापरासाठीच्या उपयुक्त सूचनानंतर येणार्‍या अनुक्रमणिकेत सर्व संबोधांची यादी वर्णानुक्रमे दिली आहे. संबोधांची ही यादी पाहिली तरीही कोशातील विषयांचा आवाका लक्षात येतो. यात पाऊस, वारे, ढग अशा रोजच्या विषयांपासून भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा अस्मानी आणि ओझोनचा थर, जल व मृदा संधारण, भूतापवृद्धी, प्रदूषण अशा मानवनिर्मित संकटांचा ऊहापोह केला आहे. पण त्यात फक्त भौगोलिक बाबी नसून अमेरिका खंडाच्या अंतर्भागाचा शोध घेणारा अमेरिगो व्हेस्पुसी, नकाशातज्ज्ञ गेरहार्ट मर्केटर, मार्को पोलो, शेर्पा तेनसिंग अशा संशोधकांच्या विक्रमवीरांच्या नोंदी आहेत. एखाद्या विशिष्ट नदीची माहिती देताना सोबतच्या चौकटीत तिचा उगम, लांबी, खोर्‍याचं क्षेत्रफळ, मुख, तिच्या उपनद्या इतकेच नव्हे तर तिच्या काठावरची महत्त्वाची तीर्थक्षेत्रे व शहरे ही माहितीही दिली आहे. अगदी गंगा नदीच्या शुद्धीकरण योजनेबद्दलही एक स्वतंत्र नोंद केली आहे. ग्रहांच्या माहितीबरोबर त्यांची सूर्यापासूनची सरासरी, कमाल व किमान अशी तीनही अंतरे दिली आहेत.

हा कोश परिणामकारक तर आहेच परंतु त्यातील चित्रांमुळे तो रंजकही झाला आहे. गंगोत्री, कैलास पर्वत, सर्वांत उंच शिखर के-टू, एव्हरेस्ट, गिरसप्पा धबधबा या भारतातल्या प्रसिद्ध स्थळांबरोबरच चीनची भिंत, ग्रँड कॅनियन अशा सर्वसामान्यांचे आकर्षण ठरलेल्या ठिकाणांचीही चित्रे यात आहेत. माहिती सर्वप्रकारे कळावी म्हणून ज्वालामुखी, धुमकेतू तारकाविश्व, ग्रहांचे मोठे उपग्रह इ० चित्रेही आहेत. काही संकल्पना उदा० गटपर्वत, खारे-मतलई वारे, गारांची निर्मितिप्रक्रिया आकृत्यांमधून स्पष्ट केल्या आहेत. कोशाचा विषयच भूगोल असल्यामुळे नकाशे हा अविभाज्य भाग तर आहेच.

लेखकाने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य वाचक डोळ्यांसमोर असल्याकारणाने सुबोध, साध्या-सोप्या, सुटसुटीत पण नेमका अर्थ व्यक्त करणार्‍या भाषेचा निकष परिभाषा बनवतानाही लावला आहे. फक्त परिभाषाच नव्हे तर माहिती देतानाही केवळ बुद्धिमत्तेचे व व्यासंगाचे प्रदर्शन न करता कोशाचा उपयोग करणार्‍याची आकलनक्षमता लक्षात घेतली आहे. त्यामुळे कोशाची वाचनीयता वाढली आहे. हे या कोशाचे बलस्थान आहे. संबोधानंतर शब्दार्थ व टिपा हा विभाग असून त्यामध्ये कोशातील विवेचनात आलेले असे अनेक शब्द आहेत की ज्यांचा अर्थ वाचकाला समजणे आवश्यक आहे. उदा० अल्पाईन वनस्पती, बर्फ, पिग्मी, सुंद्री, सूचिपर्णी इ० ह्या शब्दांच्या बरोबरीने एडमंड हिलरी, शीतल महाजन अशा धाडसी वीरांचीही माहिती दिली आहे.
या माहितीनंतर एकूण ८ परिशिष्टे असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय प्रमाण एकके व व्यावहारिक एकके, मोजमापे, रूपांतरणे, उपग्रहांची खगोलशास्त्रीय माहिती, धूमकेतू व उल्कावर्षाव, तेजस्वी तारे, जगातील समुद्र, जगातील देश, त्यांच्या राजधान्या, जागतिक आश्चर्ये इ० अत्यंत उपयुक्त व म्हटले तर वाचकाच्या सामान्यज्ञानाची चाचणी घेणारी पण सहसा कुठेही उपलब्ध नसणारी अशी माहिती देण्यात आली आहे. सहाव्या व सातव्या परिशिष्टात प्रत्येक सामान्य नागरिकाला माहीत असायलाच हवी अशी भारताची माहिती एकत्रितपणे दिली आहे. त्यात नद्यांच्या खोर्‍यांतील प्रकल्पांबरोबरच राज्ये, संघराज्ये त्यांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, राजधान्या, जिल्हे, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांचाही समावेश आहे. शेवटच्या परिशिष्टात भूगोल व खगोलशास्त्राच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण घटनांचा कालपट वाचकांसमोर उलगडला आहे.

त्यानंतर इंग्रजी शब्दांना मराठीत रूढ असलेले द्वीपकल्प, भूशिर यांसारखे वा नव्याने घडवलेले तारकाविश्वासारखे (गॅलक्सी) पारिभाषिक शब्द दिले आहेत. सर्वांत शेवटी इंग्रजी व मराठी संदर्भग्रंथांची यादी आहे.

एकूणच या प्रचंड माहितीसंकलनाला लेखकाने जरी भूगोलकोश म्हटले असले तरी त्याचे स्वरूप ज्ञानकोशाच्या धर्तीचे आहे. ज्ञानकोशाचा आकार महत्त्वाचा नसून त्यामध्ये समाविष्ट ज्ञानाची व्याप्ती पाहिली जाते. ज्ञानकोशाच्या व्याख्येनुसार ज्ञानकोश हा जगाचे यथार्थ, आहे तसे दर्शन घडवणारा जणू आरसाच असतो. चित्रे, नकाशे, आकृत्या, तक्ते, संख्याशास्त्रीय कोष्टके यांची मदत घेऊन त्या त्या बाबीबद्दलची उपलब्ध असलेली सर्व गाभाभूत माहिती सुव्यवस्थितपणे मांडून वाचकांसमोर ठेवणे व त्यायोगे मानवजातीच्या विकासाच्या दिशेने पाऊले उचलणे; हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण असते.

हा कोश विद्यार्थ्यांना व जिज्ञासूंना भूगोलाच्या अभ्यासाची गोडी लावेल. भूगोलाच्या अभ्यासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने उचललेले हे पहिले पाऊलच आहे असे समजायला हरकत नाही. विद्यार्थी, भूगोल अभ्यासक यांच्या बरोबरीन सवर्ससामान्य रसिक वाचकाने संग्रही ठेवावा असा हा भूगोल कोश आहे.

अभ्यासकांसाठी मोलाचे भाषांतर

म०के० ढवळीकर

(परीक्षित पुस्तक : भारतीय लेखविद्या, दिनेशचंद्र सरकार. मराठी भाषांतर : डॉ० शोभना गोखले. काँटिनेंटल प्रकाशन, पुणे. पृ० ४७८ + चित्रे. किंमत दिलेली नाही.)

प्रा० (कै०) दिनेशचंद्र सरकार हे जगविख्यात भारतीय पुरालिपी तज्ज्ञ होते. ते निष्णात संस्कृत पंडितही होते. काही काळ ते कोलकाता विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती या विषयाचे प्राध्यापक होते. नंतर त्यांनी अनेक वर्षे भारत सरकारच्या पुरातत्त्व खात्यात प्रमुख लिपितज्ज्ञ म्हणून काम केले. ‘पिग्राफिया इंद्रिकाए’ हे त्या खात्याचे मुखपत्र, त्याचे ते संपादक होते. त्याच्या प्रत्येक अंकात बहुसंख्य लेख डॉ० सरकारांचे असत. त्यामुळे काही विद्वान त्याला ‘एपिग्राफिया सरकारीका’ म्हणत असत.) डॉ० सरकार यांनी आपल्या हयातीत शेकडो कोरीव लेख प्रसिद्ध केले; त्यातील पुराव्यांच्या आधारे प्राचीन भारतीय इतिहासावर प्रकाश टाकणारे लेख लिहिले आणि अनेक ग्रंथही प्रसिद्ध केले. केंद्रसरकारच्या सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांना कोलकाता विद्यापीठाने पुन्हा प्राध्यापक नेमले. प्राचीन लेखांच्या अभ्यासकांत ते अग्रगण्य होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ जगातील अनेक विद्यापीठांत अभ्यासासाठी नेमले आहेत. त्यांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे ‘इंडियन एपिग्राफी’ त्याचे मराठी भाषांतर डॉ० शोभना गोखले यांनी केले आहे. प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या मराठी भाषिक अभ्यासकांसाठी हे भाषांतर अत्यंत मोलाचे ठरेल यात शंका नाही.

डॉ० सरकार हे स्वत: शिक्षक असल्यामुळे ग्रंथाची रचना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीची केली आहे. एकूण आठ प्रकरणांपैकी पहिल्यात भारतीय पुराभिलेखांचे स्वरूप, इतिहासाची जुळणी करण्याकरता त्यांचा होणारा उपयोग, याची चर्चा केली आहे. या प्रकरणाच्या परिशिष्टात हिंदु-मुस्लिम पुराभिलेखांचीही माहिती आहे. दुसर्‍या प्रकरणात लेखांच्या आर्य आणि द्राविडी भाषांचे वर्णन आहे. प्रथम प्राकृत, नंतर संस्कृत आणि पुढे सहाव्या शतकापासून प्रादेशिक भाषांत लेख लिहिण्यास सुरुवात झाली. लेखनासाठी भूर्जपत्रापासून ताम्रपटापर्यंत लेखनसाहित्य कसे वापरले जात असे हे तिसर्‍या प्रकरणात विशद केले आहे. चौथ्या प्रकरणात लेखनाची चर्चा आहे. यापुढील प्रकरण (पाचवे) अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात ताम्रशासनांसंबंधी माहिती आहे. ताम्रशासनाचे प्रकार, त्यांचे स्वरूप, त्यांतील मजकूर-विशेषत: सुरुवातीचा आणि शेवटचा - त्यावरील राजमुद्रा यांचे तपशीलवार वर्णन आहे.

या ग्रंथाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय हे की, त्यात परदेशातील भारतीय अभिलेखांचीही माहिती दिली आहे. प्राचीन काळी धर्मप्रसारासाठी आणि व्यापारासाठी भारतीय मोठ्या संख्येने भारताबाहेर अनेक ठिकाणी गेले. आग्नेय आशियात तर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. तेथील लोकांना त्यांनी धर्म, भाषा, लिपी, कला दिल्या. त्यांना संस्कृती दिली. त्याचे अवशेष आजही शिल्लक आहेत. भारतीयांनी तेथे राज्य स्थापन केले. शेकडो संस्कृत लेख आजही तेथे उपलब्ध आहेत. त्यांची माहिती सहाव्या प्रकरणात आहे.

प्राचीन लेखांची कालनिश्चिती हे अत्यंत जिकिरीचे काम असते. त्यात निरनिराळ्या कालगणनांचा उल्लेख असतो. आजही आपण शक आणि संवत यांची गल्लत करतो. अनेक राजांनी शककर्ता बनून आपल्या राज्यरोहणापासून आपल्या नावाने शक सुरू केले. त्या सर्वांची माहिती सातव्या प्रकरणात मिळते. शेवटच्या (आठव्या) प्रकरणात पारिभाषिक शब्दप्रयोग दिले आहेत. ग्रंथाच्या शेवटी महत्त्वाच्या कोरीव लेखांची व राजमुद्रांची चित्रे आहेत. त्यामुळे ग्रंथ परिपूर्ण झाला आहे.

भारतात प्राचीन कोरीव लेख हजारोंनी उपलब्ध आहेत आणि दरवर्षी नव्याने शेकडो सापडतात. त्या सर्वांचे परिशीलन करून त्यावर ग्रंथ लिहिणे हे केवळ प्रा० सरकारच करू शकले. या विषयावरचे इतरांचे काही थोडे ग्रंथ उपलब्ध आहेत; परंतु प्रस्तुत ग्रंथाच्या तुलनेत ते तोकडे वाटतात. तेव्हा हा उत्कृष्ट आणि अत्यंत उपयोगी ग्रंथ लिहिल्याबद्दल या विषयाचे अभ्यासक प्रा० सरकारांचे ऋणी आहेत.
डॉ० सरकार यांच्यासारख्या प्रकाण्डपण्डिताच्या ग्रंथातील उणिवा काढणे धाडसाचे ठरेल. परंतु काही शंका निर्माण होतात. उदाहरणार्थ, सातवाहन आणि क्षहरात यांचे लेख - जे महाराष्ट्रातील लेण्यांत आढळतात- ‘‘मूळ ताम्रपटांवर असलेल्या राज्यशासनाच्या प्रतिकृती आहेत.’’ हे विधान पटण्यासारखे नाही (पृ० १०४). एकतर यांपैकी काही लेख खूप मोठे आहेत, ते लिहिण्यासाठी अगणित पत्रे लागले असते; आणि तसे असते तर एखादा तरी पत्रा आजवर सापडला असता. तेव्हा ते प्रथम कापडावर लिहून नंतर कोरक्याला दिले असावेत.

या पाचशे पानांच्या ग्रंथाच्या भाषांतराचे कामही सोपे नव्हते. डॉ० शोभना गोखले हा विषय अनेक वर्षे स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना शिकवत होत्या. त्यांनी भाषांतर सुबोध केले आहे. परंतु एकदोन सूचना कराव्याशा वाटतात. ‘डेटिंग’ला ‘दिनांक’ ऐवजी ‘कालोल्लेख’ हा शब्द अधिक योग्य वाटतो. ‘फलक’ (पृ० १३२) म्हणजे तांब्याचा पत्रा नसून लाकडी फळी असावी. तसेच काही ठिकाणी ‘नीट सांगितले नाही’ अशा शब्दप्रयोगाऐवजी ‘स्पष्ट दिलेले नाही’ असे भाषांतर अधिक योग्य वाटते. परंतु एकूण भाषांतर उत्कृष्ट व वाचनीय झाले आहे, यात शंका नाही.

बोलींचा अभ्यास

विश्वनाथ खैरे

(परीक्षित पुस्तक : बोली : समाज, साहित्य आणि संस्कृती डॉ० कैलास सार्वेकर : प्रतिभास प्रकाशन, परभणी २०१०, पृष्ठे ७ + १६० किंमत : रु०१६०/-)

विविध विद्यापीठांतल्या मराठीच्या अभ्यासक्रमांमध्ये भाषा म्हणून भाषेच्या अभ्यासाला (साहित्य-समीक्षांच्या तुलनेने) खूपच कमी स्थान आहे. जे आहे त्याच्यावर एकोणिसाव्या शतकापासून चालत आलेल्या भारतयुरोपीय ऐतिहासिक प्रणालींचा पगडा आहे. विद्यापीठांमध्ये संशोधनाच्या अंगावर फारसा भर नाही. त्यामुळे भाषाविषयाचे दुपदवीधरसुद्धा नंतरच्या काळात भाषासंशोधनाकडे विशेष वळत नाहीत. जे वळतात ते त्यांच्या आवडीने किंवा त्यांच्या मायबोलीच्या प्रेमाने. त्यांच्या अभ्यासावर किंवा संशोधनावर साहजिकपणेच विद्यापीठातील अभ्यासक्रमाचे परिणाम दिसून येतात. बोलींच्या अभ्यासात सामाजिक आणि मानसिक घटकही काम करतात. असे असले तरी शिक्षणाच्या प्रसारामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातलेही काही अभ्यासक बोलींच्या अभ्यासाकडे वळत आहेत, त्यांच्या अभ्यासू लेखनाची बूज ठेवली पाहिजे आणि आधी सांगितलेल्या प्रभावांची वजावट करून निखळ शास्त्रीय अभ्यासाकडे त्यांना वळवण्यासाठी भाषाविषयक संस्थांनी आणि विद्यापीठांनीही खास प्रयत्न केले पाहिजेत. प्रस्तुत पुस्तकाकडे मुख्यत: या दृष्टीने या लेखात पाहायचे आहे.

पुस्तकाचे लेखक डॉ० कैलास सार्वेकर जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मराठीचे प्रपाठक आहेत. त्यांनी ग्रामीण कविता या विषयावर पीएचडी केली आहे. ते पंचवीस वर्षे नवापुरच्या आदिवासी शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयात मराठीचे अध्यापक होते. तेव्हा त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिक्षणाची गोडी लावण्यासाठी खास प्रयत्न आणि प्रयोग केले. गेल्या सुमारे वीस वर्षांत त्यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख या पुस्तकात संग्रहित केले आहेत. त्यांत नामे, नातेसंबंधाचे शब्द इत्यादी तीनचार लेखरे (लहान लेख) आहेत. बहिणाईंच्या कवितेची बोली लेवा आहे या आशयाचा एक लेख आहे. एक लेख खानदेशातील लोकवाङ्मय आणि ग्रामीण कविता यांचे अनुबंध दाखवणारा आहे.
या सर्वांपेक्षा भाषाभ्यासाशी थेट आणि अधिक संबंध असलेले लेख बोलींवरचे आहेत. 'भाषा : इतिहास आणि भूगोल' (कालेलकर, १९८५) यातल्या विवेचनाचा आधार या लेखांमधल्या अभ्यासाला आहे. सार्वेकरांची मायबोली जामनेरी आहे. इतर बोलींचा अभ्यास त्यांनी मराठीचे अध्यापक असताना केला. खानदेशातील पावरा, कोंकणी आणि जामनेरी या बोलींची ओळख करून देणारे तीन लेख पुस्तकात आहेत. गुजराती आणि अहिराणी या 'भाषाभगिनी'ची तुलना करणारा एक लेख आहे. आदिवासी या नावात मावची, वसाव, कोंकणी, पावरा या चार बोलींचा समावेश आहे. या आदिवासी बोलींमधील म्हणी आणि गीते यांवर दोन लेख आहेत. 'आदिवासी विद्यार्थ्यांमधील भाषिक न्यूनगंड' घालवण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती आणि विद्यार्थ्यांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया यांचे दोन लेख आहेत. त्यांतल्या काही विद्यार्थ्यांनी शब्दजातींसह नोंदलेला आदिवासी बोलींमधला शब्दसंग्रह वर्गवारीने तक्त्यांमध्ये दिला आहे.

महाराष्ट्रात मराठी भाषा चालते आणि निरनिराळ्या बोलींचाही वापर लहानमोठया क्षेत्रांवर होत असतो. त्यांतल्या एखाद्या बोलीचा अभ्यास (१) मराठीची पोटभाषा म्हणून (२) मराठीला लागून असलेल्या भाषा आणि मराठी यांचा तिच्यावरील परिणाम शोधण्यासाठी (३) सध्याच्या प्रमाण-मराठीहून तिचे वेगळेपण दाखवण्यासाठी (४) त्या बोलीचे निव्वळ वर्णन करण्यासाठी - असा विविध प्रकारांनी होऊ शकतो.

पहिल्या प्रकारात ती बोली मराठी भाषेतून ध्वनिबदलाने काळाच्या ओघात सध्याच्या अवस्थेला आल्याचे धरले जाते. भाषाभ्यासातल्या भारतयुरोपीय प्रणालीचे हे गृहीतच होते. या प्रकारात लेखी मराठीतल्या लिपिबद्ध ध्वनींशी बोलीतल्या उच्चारणांची तुलना सार्वेकरांच्या बोलीविषयक लेखांमध्ये आली आहे. कालेलकरांनीच म्हटल्याप्रमाणे भाषा ही अनेक बोलींच्या संमीलनातून सिद्ध होते. भारतीय भाषासंभाराच्या बाबतीत ''लेखी ती भाषा आणि मुखी ती बोली'' अशी व्याख्या करता येईल. लेखी भाषेतून मुखी बोली निर्माण होत नाहीत हे मान्य केले तर प्रमाण मराठीतील अक्षरोच्चारणाला मानदंड मानण्याचे कारण नाही. बोलांचा अर्थ कळण्यासाठी लेखीतले शब्द अर्थातच वापरावे लागतील.

बोली-अभ्यासाचा दुसरा प्रकार म्हणता येईल अशी अहिराणी आणि दक्षिण-गुजराती या बोलींची एकाच कुळातल्या 'भाषाभगिनी' म्हणून तुलना केली आहे. कळत-नकळत अहिराणीला 'भाषा' पदवीला पोचवले आहे. यामागे प्रस्थापित भाषाकुलांच्या संकल्पनेचा प्रभाव आहे. सिंधुसंस्कृतीचे लोक इ०स० पूर्व १९व्या शतकापासून खानदेशात आले याचा आधार परस्परप्रभावासाठी दिला आहे. त्याने भारतीय भाषाकुलाच्या संकल्पनेला छेद मिळतो. सयाजीरावांच्या मराठीसंबंधातील कार्याचा उल्लेख केला आहे त्याचा अहिराणी-गुजराती यांच्या तुलनेत साक्षात संबंध नाही. बोलीविषयक लेखात इतिहास, संस्कृती इत्यादी अनेक बाबींना स्पर्श करणे टाळले पाहिजे. तसेच 'वरील विवेचनावरून अहिराणीने मराठीकडून जशा काही गोष्टी घेतल्या तशा गुजरातीकडूनही घेतल्या. किंबहुना गुजरातीकडून अधिक घेतल्या असे म्हणता येईल' (पृ०३५) यांसारखी अतिव्याप्त विधाने करणे इष्ट नाही.

जामनेरी बोलीवरील लेखाच्या प्रास्ताविकात ही बोली 'आपले काहीएक वेगळेपण आणि स्वतंत्र अस्तित्व' टिकवून आहे असे म्हटले आहे. मुखपृष्ठावरील तक्त्यात मात्र जामनेर लेवा बोलीचा एक मुलूख म्हणून दाखवला आहे. प्रमाण मराठीतील औतचा जामनेरी उच्चार आउत होतो याला 'संयुक्त स्वरांची संधी' म्हटले आहे. 'कृषिजीवनाशी संबंध सांगणार्‍या अनंत म्हणी या बोलीत आहेत' हे अतिशयोक्त विधान आहे. अशा गफलती लेखात आहेत. मायबोलीचा अभिमान हे एक त्याचे कारण संभवते. बोलींना भाषेहून अशुद्ध किंवा खालच्या पायरीवरच्या मानण्याची शिष्टजनांची प्रवृत्ती जशी कमी होत जाईल तशी बोली अभ्यासकांनाही बोलींच्या स्तुतिपर लिहिण्याची गरज वाटणार नाही.

बोलीचे निवळ वर्णन करण्याच्या चौथ्या प्रकारचे उदाहरण 'परिशिष्ट ब - खानदेशी बोलींमधील तुलनात्मक शब्दसंग्रह' या तक्त्यांमध्ये आहे. हे तक्ते सार्वेकरांच्या तेगा पावरा आणि भाईदास बागुल या तृ०व० कला वर्गातल्या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत. वस्तू, शेती, धान्ये, भाज्या, फळे, नातेसंबंध इत्यादींचे सहा बोलींमधले शब्द त्यांत आहेत. घर - गूँ पोंगो, दरवाजा - बाणों बाणों जुपू, माठ - वेंडलो वेंडलो, मका - डोडा डोडा डुडा, भुईमुग - हिंडयो हिंग्या मुंग्या, आई - आयो याहकी, वडील - आबो बाहाको बाबा, भाऊ - बाहा पावुहू, लवकर - माहारी माहारी उतवाल, ही सहज टिपलेली या बोलीतली खास उदाहरणे. बोलींनी स्वतंत्रपणे निर्माण केलेल्या शब्दांची उदाहरणे यांत दिसतात. या याद्या मर्यादित शब्दसंख्येच्या आहेत. पण त्या बोलीच्या जाणकारांनी नोंदल्या आहेत, तशाच मोठया प्रमाणावर मायबोली-अभ्यासकांनी नोंदल्या तर त्या त्या बोलीची विश्वसनीय नोंद आपल्याला मिळू शकेल. बोलीचे मूळ रूप, तिचे प्राचीनत्व, तिच्यावर झालेले इतर भाषा-बोलींचे परिणाम इत्यादी अभ्यास ही पुढची पायरी असेल. त्यांचा खुटपुट समावेश वर्णनात्मक नोंदीमध्ये करण्याची गरज नाही.

बोलींच्या नोंदी हा पदवीधरांच्या कामाचा भाग झाला. बोलीच्या परिसरातून प्रमाणभाषेच्या पदवीपर्यंत पोचण्यात बोलीकांना न्यूनगंडासारखे मानसिक अडथळे पार करावे लागतात. सार्वेकरांनी त्या (महाविद्यालयीन) विद्यार्थ्यांचा न्यूनगंड घालवण्यासाठी प्रयत्न केले. दहा वर्षे मराठी शाळेत शिकूनही त्यांची क्षमता पुरेशी वाढली नव्हती यावरून माध्यमिक पातळीपर्यंतच्या त्यांच्या शिक्षणाची दशा लक्षात येते. त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियांवरून असे दिसते की भाषेच्या लेखीपणाचाच धसका बोलीकांना जास्त बसतो. पहिली-दुसरीत बोलीतून शिकवून बोलीतल्या शब्द-वाक्यांच्या लेखी रूपांनी लिपीची ओळख करून दिली तर हा धसका कमी होईल का याचा विचार आणि प्रयोगात्मक आचार झाला पाहिजे. या न्यूनगंडातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी बोलींचे शब्दसंग्रह करण्याचे कामही केले आहे. अशा विद्यार्थ्यांशी विद्यापीठातील शिक्षकांचा संपर्क राहावा आणि त्यांनी बोलींच्या अभ्यासात अधिक कामगिरी करावी यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. एका लेखात आदिवासी बोलींतल्या म्हणी नोंदल्या आहेत. मार्गदर्शन लाभले तर बोलीक विद्यार्थी त्या म्हणींचा खोल अभ्यास करून बोलीकांचा इतिहास समजण्याला सामग्री देऊ शकतील.

भारतीय भाषा बोलींबाबतचे नोंदीचे किंवा अभ्यासाचे कार्य भारतीय भाषक-बोलीकांनी करणे उचित आणि गरजेचे आहे. विदेशी अभ्यासकांनी इंग्रजीत नोंदलेले अभ्यास प्रमाण मानून त्यांचे संदर्भ भारतीयांनी देण्याचा प्रकार थांबायला हवा. उच्चार नेमके टिपणे, संस्कृतिविषयक अनुबंध समजून घेणे भारतीयांनाच चांगल्या प्रकारे करता येईल. मराठी मुलखातल्या बोलींच्या नोंदी त्या मायबोलीच्या अभ्यासकांनी कराव्या यासाठी विद्यापीठे आणि संशोधनसंस्था यांनी पद्धतशीर प्रयत्न केले पाहिजेत. परिषदा आणि कार्यशाळा वगैरे घेऊन या अभ्यासकांना कामाच्या पद्धती समजावून दिल्या पाहिजेत आणि नोंदी संकलित करणारी यंत्रणा सिद्ध केली पाहिजे.

या पुस्तकावर लिहावे म्हणून संपादकांनी ते माझ्याकडे पाठवले. ते वाचून झाल्यावर पुस्तकात दिलेल्या चलफोनवर मी सार्वेकरांशी सविस्तर बोललो. (संपर्काच्या आधुनिक सोयी!) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठीच्या अभ्यासक्रमात बोलींच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान देण्यासाठी त्यांच्या पदावरून ते प्रयत्न करू शकतात असे त्यांच्याकडून कळले. तो त्यांनी करावा, मायबोलींच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाला अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि उत्तेजन द्यावे आणि लेखनाच्या बाबतीतही या पुस्तकावर थांबू नये.

374 सिंध सोसायटी, औंध, पुणे 411 007
दूरभाष : (020) 2585 1187

स्तिमित करणारा बौद्धिक आवाका

डॉ० अशोक केळकर यांनी १९६४ ते २००५ या चाळीसहून अधिक वर्षांत साहित्य, संगीत, नाटक, नृत्य, शिल्प, वास्तुकला इ० कलांची मीमांसा करताना लिहिलेल्या लेखांचा संग्रह 'रुजुवात' च्या रूपाने मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे. या संग्रहातील काही महत्त्वाचे लेख आतापर्यंत मराठीत प्रकाशित झालेले नव्हते. जे प्रसिद्ध झाले होते ते नियतकालिकांत किंवा ग्रंथांत विखुरलेले होते. डॉ० केळकरांचे हे लेख एकत्र करून छापल्यामुळे त्यांच्या विचार-व्यूहाची अधिक नेमकी ओळख करून घेणे जिज्ञासू वाचकाला आता शक्य झाले आहे.(परीक्षित पुस्तक : रुजुवात - अशोक रा० केळकर. लोकवाङ्मय गृह, मुंबई. २००८. पृष्ठे २४+३१६. किंमत रु० ६००/-)

डॉ० अशोक केळकर यांनी १९६४ ते २००५ या चाळीसहून अधिक वर्षांत साहित्य, संगीत, नाटक, नृत्य, शिल्प, वास्तुकला इ० कलांची मीमांसा करताना लिहिलेल्या लेखांचा संग्रह 'रुजुवात' च्या रूपाने मराठी वाचकांना उपलब्ध होत आहे. या संग्रहातील काही महत्त्वाचे लेख आतापर्यंत मराठीत प्रकाशित झालेले नव्हते. जे प्रसिद्ध झाले होते ते नियतकालिकांत किंवा ग्रंथांत विखुरलेले होते. डॉ० केळकरांचे हे लेख एकत्र करून छापल्यामुळे त्यांच्या विचार-व्यूहाची अधिक नेमकी ओळख करून घेणे जिज्ञासू वाचकाला आता शक्य झाले आहे.

डॉ० केळकरांची प्रज्ञा अनेक विद्याशाखांत अधिकारवाणीने संचार करताना दिसते. बहुतेकांना त्यांची ओळख एक श्रेष्ठ भाषावैज्ञानिक म्हणून असते. या क्षेत्रातील त्यांच्या कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली आहे. पण भाषाविज्ञानाच्या क्षेत्राबरोबरच इतर अनेक क्षेत्रांत त्यांनी अतिशय सूक्ष्मदर्शी, अंतर्दृष्टियुक्त लिखाण केले आहे. या विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कामगिरीच्या संदर्भात एक मार्मिक विधान प्रा० मे०पुं० रेगे यांनी केले आहे. ते या संग्रहाच्या 'भलावणीत' (ब्लर्ब) उद्धृत केलेले आहे. प्रा० रेगे म्हणतात, ''तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, जीवशास्त्र, सांस्कृतिक इतिहास इत्यादी अनेक विद्याशाखांत ज्याची पाळेमुळे विस्तारलेली आहेत अशा भाषाशास्त्राचे (डॉ० अशोक केळकर) अधिकारी पंडित (आहेत). डॉ० केळकरांच्या ''मिस्टिकल अनुभवाकडे पाहण्याची नवी दृष्टी'' देणार्‍या लेखाच्या संदर्भात प्रा० रेगे यांनी हे विधान केले. हे लेखन नंतर 'भेदविलोपन' या पुस्तिकेद्वारे वाचकांना उपलब्ध झाले. ते साहित्य-समीक्षक आहेत, साहित्य मीमांसक आहेत, त्यांना संगीतमीमांसक (म्यूझिकॉलॉजिस्ट) म्हणून संबोधिता येईल अशा प्रकारचे त्यांचे संगीतविषयक चिंतन आहे. नृत्य, शिल्प, वास्तुकला अशा कलाप्रकारांवर त्यांनी त्यांच्या तलस्पर्शी, सूक्ष्मदर्शी आणि अंतर्दृष्टियुक्त चिंतनाने वाचकाला त्या-त्या कलांच्या स्वरूपाबद्दल नव्याने विचार करायला लावील अशा प्रकारचे लिखाण केलेले आहे.

युरोपियन इतिहासामधील विद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या (रिनॅसन्सच्या) काळात अशी अनेक व्यक्तिमत्त्वे होती, ज्यांना आदराने 'रिनॅसन्समॅन' म्हटले जाई. मानव्य विद्यांच्या अनेक शाखांतील त्यांचा अधिकार सर्वमान्य असे. डॉ० केळकरांकडे पाहिले की ते आपल्या काळातील 'रिनॅसन्समॅन'च आहेत असेच त्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते.

डॉ० केळकर स्वत: उत्तम शिक्षक होते आणि शिक्षणप्रक्रियेतही त्यांना विशेष रस होता. प्रस्तुत संग्रहामध्येही 'शिक्षणाचे एक माध्यम - कला', 'अध्यापन आणि कवितेचे अध्यापन' या लेखांतून किंवा व्यावहारिक समीक्षा या चौथ्या विभागातील 'उपरी भाषा आणि थलकरी भाषा : लक्ष्मण माने यांच्या 'उपरा'च्या संदर्भात' या लेखाच्या इतिकथनात जे संदर्भ दिलेले आहेत ते ध्यानात घेतले तरी त्यांची शिक्षकाची भूमिका कळून येते. असेही म्हणता येईल की या ग्रंथातील अनेक लेखांत डॉ० केळकर अतिशय सूक्ष्म, तरल अशा प्रकारचे विश्लेषण करीत असतानाच अनेक प्रश्न उपस्थित करतात. तेव्हाही विद्यार्थ्यांना नव्या दिशांनी विचार करायला लावणार्‍या शिक्षकाचे ते प्रश्न आहेत असेच जाणवते.

या ग्रंथामध्ये संग्रहित केलेल्या लेखांचे वर्गीकरण डॉ० केळकर यांनी चार विभागांत केले आहे. पहिला विभाग सैद्धांतिक समीक्षेचा आहे. यामध्ये डॉ० केळकर यांनी कविता ('कवितेचे असतेपण' - १९६९), 'कवितेचे सांगतेपण, करतेपण' (१९८३), 'शैली आणि तंत्र' (१९८५), 'भाषा आणि साहित्य' (१९७०,८१) 'कलावती वाणी : बोलणे, म्हणणे, गाणे' (१९९६) हे साहित्यविषयक लेख आहेत. त्याचप्रमाणे नाटक या विषयावर 'नाट्यकर्म आणि व्यक्तिमत्त्व विकास' (१९९६) आणि 'नाटक : एक होणे' (१९८७). याचबरोबर संगीत आणि नृत्य यांवरही दोन लेख आहेत. यांपैकी 'कवितेचे असतेपण' हा विशेष महत्त्वाचा लेख आहे. कवितेच्या असतेपणाचा प्रश्न चार प्रश्नमालिकांत दडलेला आहे, असे डॉ० केळकर मानतात. या चार प्रश्नमालिका

१) स्वत्वाचा प्रश्न २) अस्तित्वाचा, अस्तित्वकक्षेचा प्रश्न

३) धर्मित्वाचा प्रश्न ४) अर्थवत्तेचा किंवा तार्किकतेचा प्रश्न

अशा आहेत. या चार प्रश्नमालिकांची सविस्तर मांडणी डॉ० केळकरांनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने काटेकोर चिकित्सकपणे केलेली आहे. डॉ० केळकरांच्या विवेचनशैलीच्या वैशिष्ट्यांसह अशा प्रश्नांच्या विवेचनात नेहमी वापरल्या जाणार्‍या शब्दांचा (संज्ञांचा) वापर चुकीचा आहे हे सांगत असतानाच ते काही धोक्याचे कंदीलही दाखवतात. उदा० कोणत्याच विशिष्ट कवितेचा विचार करायचा नाही. काव्य हा शब्द वर्ज्य. कारण तो 'गोलाकार'. या संग्रहातील बर्‍याच लेखांत डॉ० केळकर अतिशय सूक्ष्मात जाऊन चिकित्सा करतात आणि योग्य अन्वर्थक शब्द मिळाल्यानंतरच त्यांचे विश्लेषण थांबते. हा काथ्याकूट नाही, तर अ‍ॅरिस्टॉटलच्या वचनाप्रमाणे 'अचूक व्याख्या करणे हे बुद्धिमान व्यक्तीचे लक्षण आहे', या विधानाची साक्ष पटविणारे आहे. या लेखातील विश्लेषणातून कवितेच्या व्याख्येकडे ते वाचकाला आणतात. कविता म्हणजे १) संहिता २) एक मुद्दाम रचलेला वाचनीय वा श्रवणीय मजकूर, एक शैलीबद्ध अ-निर्हेतुक, अ-सहज संहिता ३) एक शैलीबद्ध भाषेचा कच्चा माल, द्रव्य म्हणून उपयोग करणारी आणि अर्थसंक्रामक चिन्ह (कम्युनिकेटिव्ह सिंबल) म्हणून वावरणारी स्वायत्त कलाकृती. अशा प्रकारे कवितेच्या नेहमीच्या व्याख्येपेक्षा अगदी निराळीच जाणीव ते करून देतात. म्हणजेच कविता हा भाषिक चिन्ह-व्यवहार आहे असे ते पटवून देतात. त्यांच्या शब्दात, ''कविता वाहनाच्याद्वारे भाषिक संकेतांनुसार कविता-पाठ्य चिन्हित होते आणि कविता पाठ्याद्वारा एक नवीन अनंगवस्तू चिन्हित होते.'' ''पण या नव्या चिन्हीकरण - व्यवहारातून उभी राहते ती एक स्वत:त सामावलेली, आतून अभंग अशी वस्तू'' (पृष्ठ १९). आपली नव्या चिन्हीकरणाची कल्पना आणि दि० के० बेडेकर यांनी मांडलेली 'विकल्पन' ही संकल्पना आणि संस्कृत साहित्य मीमांसेमधील 'भाव' या संज्ञेने सुरुवातीच्या काळात दर्शविली गेलेली संकल्पना एकच आहेत असेही ते नमूद करतात (पृष्ठ १९) आणि अशा प्रकारे कवितेच्या चर्चेला भाषाविज्ञान, चिन्हविज्ञान या शाखांशी जोडतात.

'कवितेचे सांगतेपण, करतेपण' या लेखाची सुरुवात 'कवितेचे असतेपण' या लेखाप्रमाणेच आर्चिबाल्ड मक्लिश या कवीच्या A poem should not mean / But be या विधानाने होते आणि या दोन लेखांमधील दुवाही त्यामुळे सिद्ध होतो. ''कवितेची व्याख्या करणे अवघड, कारण ती जात्या विवादग्रस्त संकल्पना आहे. ... कविता कवितांमध्ये ... फार/तर कुलसाम्य शोधावे हे बरे''. कवितेची व्याख्या करताना निर्माण होणारे वादविषय ध्यानात घेऊन डॉ० केळकरांनी कविता आणि काव्य यांच्या संबंधात १) आनंदवादी २) आशयवादी ३) रूपवादी ४) जीवनवादी आणि ५) आशयरूपवादी असे कविता-वाचकांचे वर्गीकरण केले आहे. हे वर्गीकरण या ग्रंथातील इतर काही लेखांतही आपल्याला भेटते.

कवितेची भाषा आणि सामान्य व्यवहाराची भाषा ह्यांमध्ये फरक आहे हे नमूद करून पाठ्यरूपी कविता आणि कलावस्तुरूपी कविता यांचे नाते स्पष्ट करताना डॉ० केळकर तंत्र आणि शैली यांचे विवेचन करतात. हे विवेचन 'सांगतेपणा'च्या अर्थवत्तेच्या चर्चेचा पुढचा टप्पा गाठते. यानंतर 'सांगतेपणा'-कडून 'करतेपणा'कडे वाचकाला नेताना डॉ० केळकर, 'कलावस्तूमुळे आणखी काही चिन्हित होते का (पृष्ठ ४२) आणि कविता श्रोत्यावर-वाचकावर, श्रोत्यासाठी-वाचकासाठी काय करते, निर्मात्यावर आणि निर्मात्यासाठी काय करते आणि समाजासाठी काय करते असा मुद्दा विचारात घेतात आणि वर नमूद केलेले पाच प्रकारचे 'वादी' काय म्हणतील याची मांडणी करतात.'

कवितेची चर्चा करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यावे लागतात याची ही उत्तम मांडणी आहे.

डॉ० केळकरांनी कल्पिलेले पाच गट/पाच भूमिका हवाबंद नाहीत, हे उघड आहे. त्यांच्यातल्या संभाव्य स्थित्यंतराची दखलही डॉ० केळकरांनी घेतली आहे. त्यामुळे मराठीतील काव्यमीमांसेच्या संदर्भातील त्यांची विधाने जशीच्या तशी स्वीकारणे कठीण आहे. तथापि या वादात वापरण्यात येणार्‍या रूपवाद, जीवनवाद इत्यादी कल्पनांच्या भोंगळ वापराबद्दल ते आपल्याला जागृत (अ‍ॅलर्ट) करतात हे या विवेचनाचे खरे मोल आहे.

या दोन लेखांची नोंद थोडी विस्ताराने घेण्याचे कारण डॉ० केळकरांची मांडणीची पद्धत, त्यांच्या विवेचनपद्धतीच्या लकबी या दोन लेखांत स्पष्ट होतात आणि हीच दृष्टी मग इतर निबंधांतही दिसून येते. फक्त तपशील विषयानुसार बदलत राहतात. डॉ० चंद्रशेखर जहागिरदार यांनी आपल्या प्रस्तावनेत 'डॉ० केळकर... मांडणीची पूर्वतयारी म्हणून संबंधित विषयाचा एक नवीन संकल्पनात्मक नकाशाच व्यवस्थित मांडतात.' (पृष्ठ सात) असे म्हटले आहे. या नकाशात कोणत्या वाटा फसव्या म्हणून बंद आहेत, वर्ज्य आहेत, याचेही दिग्दर्शन डॉ० केळकर करतात अशी त्यात भर घालावीशी वाटते.

याच संदर्भात डॉ० केळकर यांच्या भूमिकेचा प्रश्नही अपरिहार्यपणे उपस्थित होतो. त्याचे उत्तर देताना 'मी स्वत:ची भूमिका मांडण्याचे कटाक्षाने टाळले आहे... तशी भूमिका मांडण्याची तार्किक अपरिहार्यता अंगीकारलेल्या वाटाडयाच्या कामासाठी वाटली नाही म्हणून टाळले आहे,' असे ते म्हणतात. डॉ० केळकरांची वाटाड्याची भूमिका इतर लेखांतही जाणवते. असे असले तरी भूमिकेचा प्रश्न उपस्थित होतोच. स्वत: डॉ० केळकरांनी 'लेखकाचे मनोगत'मध्ये असे म्हटले आहे की ''मी मार्क्सवादी नाही - ना साम्यवादी ना समाजवादी. पुस्तकाच्या अग्रभागी जोडलेली नांदी पाहावी म्हणजे मी तटस्थ नाही एवढा दिलासा निश्चित मिळेल...माझी भूमिका सांगणे कसे गुंतागुंतीचे आहे याचाही उलगडा होईल.'' समीक्षेत तटस्थ कसे राहणार? समीक्षेतली विधाने... व्याख्यादेखील जात्या पक्षपाती आणि म्हणून वादग्रस्त आणि प्रश्नांकित असतात... समीक्षेतली विधाने वाईट अर्थाने वादग्रस्त होऊ नयेत म्हणजे वितंडाग्रस्त होऊ नयेत (म्हणून) सुसंगतपणे एक समान विवादभूमी सादर करणे महत्त्वाचे आहे.'' म्हणजे येथेही डॉ० केळकर एक प्रकारे आपली भूमिका अनुच्चारित ठेवतात. इतरत्रही 'मला स्वदेशीवादाचा, नेटिव्हिझमचा पुरस्कार करायचा नाही' (पृष्ठ २७४) अशा प्रकारची विधाने त्यांच्या लिखाणात आढळतात. तेव्हा आपण डॉ० केळकरांची भूमिका काय याचा पाठपुरावा न करता त्यांनी सादर केलेल्या साहित्यविचाराच्या मांडणीतून काय जाणवते याचा शोध घेणे इष्ट होईल.

१९६०नंतर मराठी समीक्षेमध्ये डॉ० रा०भा० पाटणकर, प्रभाकर पाध्ये यांनी 'जात्या वादग्रस्त संकल्पना' आणि संज्ञांची ओळख करून देऊन समीक्षेची समज वाढवणारी भर घातली. डॉ० केळकर या घडामोडीत सहभागी होते आणि त्यांच्या लिखाणात 'जात्या वादग्रस्त संकल्पना' आपल्याला बर्‍याच वेळा आढळून येते. या दोन व इतर काही लेखांतही त्यांच्या विवेचनामध्ये अमेरिकन नवसमीक्षक आणि इंग्रजी समीक्षकांचा पुष्कळ वेळा उल्लेख येतो. उदा० वेलेक आणि वॉरेन (थिअरी ऑफ लिटरेचर) जॉन क्रो रॅन्सम, टी०एस० एलियट, एल०सी० नाइट्स, आय०ए० रिचर्ड्स आणि प्रत्यक्ष उल्लेख नसला तरी 'इंटेन्शनल फॅलसी', 'अफेक्टिव्ह फॅलसी' या संज्ञांच्या वापरातून सूचित झालेले ब्रुक्स, विम्सॅट, बिअर्ड्सली ह्या टीकाकारांनी मांडलेल्या साहित्य-विचाराचे स्वरूप पाहिले तर काही गोष्टी जाणवतात. त्या, माझ्या मते, डॉ० केळकरांच्या मांडणीलाही लागू होतात.

१. या टीकाकारांची मांडणी विशेष करून 'कविता' या साहित्यप्रकाराशी निगडित आहे. त्यातही विश्लेषणासाठी ते लिरिकचा वापर करताना दिसतात. डॉ० केळकर स्वत: 'कविता' ही 'रोमँटिक लिरिक'पेक्षा निराळी आहे असे म्हणतात आणि 'कविता' अधिक व्यापक करतात. सैद्धांतिक समीक्षा या विभागातील पहिल्या पाच लेखांतील त्यांचे विवेचनही 'कविता' या साहित्य-प्रकाराशीच निगडित आहे. अर्थात त्यांच्या भाषावैज्ञानिक अंतर्दृष्टी (इनसाइट्स) मुळे, तंत्र, शैली यांच्या अतिशय सूक्ष्म, तरल विश्लेषणामुळे आणि चिन्हांकन आणि चिन्हीकरण या संज्ञांच्या वापरामुळे वर नमूद केलेल्या टीकाकारांच्या ते कितीतरी पुढे गेले आहेत असे जाणवते. तरीही विवेचन प्रामुख्याने कवितेविषयी आहे असेच वाटते.

२. अशा कविताकेंद्री मांडणीमुळे साहित्याच्या इतर रूपांकडे उदा० कादंबरी आणि इतर गद्यप्रकार यांच्या सैद्धांतिक समीक्षेला फारसे स्थान उरत नाही. जेव्हा त्यांचा विचार होतो तेव्हा अशा कृती 'कविते'च्या गुणधर्मांनी युक्त असणार्‍या असतात आणि त्यांचा विचारही जणू काही त्या 'कविता' असाव्यात अशा पद्धतीने भाषा, शैली अशा बाबींकडे विशेष लक्ष देऊन केला जातो.

३. अशा प्रकारे लिरिसिझम (कवितात्मता) या बाबीवर लक्ष केंद्रित केले तर साहित्य-विचारातील वास्तव, वास्तववाद यांकडे दुर्लक्ष होते. विम्सॅट आणि ब्रुक्स यांनी लिहिलेल्या 'लिटररी क्रिटिसिझम : ए शॉर्ट हिस्ट्री'मधील 'वास्तववाद' (रिअ‍ॅलिझम) विषयक प्रकरण पाहिले तर अशा मांडणीमुळे साहित्याच्या काही अंगांकडे कसे दुर्लक्ष होते, इतकेच नव्हे तर त्यांच्यावर कसा अन्यायही होतो हे लक्षात येईल. मराठी साहित्याच्या दृष्टीने बोलायचे झाले तर वास्तववादाची सैद्धांतिक मांडणी नसणे ही मोठी उणीव होईल, कारण आधुनिक मराठी साहित्यामध्ये वास्तववाद महत्त्वाचा आहे.

'सैद्धांतिक समीक्षा' विभागातील ''भाषा आणि साहित्य'' या लेखातील मांडणी १९७० साली नक्कीच नवपथप्रदर्शक झाली असणार. आज सुमारे चाळीस वर्षांनंतर त्यातील बहुतेक विवेचन वाचकांच्या अंगवळणी पडले आहे.

''शैली आणि तंत्र'' या लेखातील प्रतिपादन थोडयाफार फरकाने आधीच्या लेखात आलेले आहे. ''कवितेचे सांगतेपण-करतेपण'' या लेखातील आनंददायी, रूपवादी, आशयवादी, जीवनवादी आणि आशयरूपवादी या वर्गीकरणाचा वापर करून या प्रत्येक भूमिकेचे तंत्र आणि शैली यांबाबत काय म्हणणे आहे हे मांडण्यात आले आहे. या विवेचनाच्या शेवटी शैली म्हणजे केवळ भाषासरणी हे समीकरण खोडून काढण्यात आले आहे. शैलीचा विचार माध्यमाशी निगडित आहे आणि म्हणून साहित्यशैलीला भाषाविज्ञानाची शाखा मानल्यामुळे 'शैली माध्यमाच्या पातळीवर असते आणि केवळ भाषा या साधनद्रव्याच्या पातळीवर नसते हे नजरेआड करणे' ही चूक होते. तसेच 'शैलीचा विचार...समीक्षेसारख्या जात्या वादग्रस्त संकल्पना आणि मूल्य-विवेक यात गुंतलेला उद्योग आहे हे लक्षात न घेण्याची चूक' (पृष्ठ ५६) (होते) हा अतिशय मूलगामी आणि महत्त्वाचा विचार कबीर आणि तुकाराम यांच्या चार कवितांचा शैली-विचार करताना मांडला आहे.

'कलावती वाणी' या लेखात वाणीच्या बोलणे, म्हणणे आणि गाणे या तीन आविष्कारांची चर्चा करण्यात आली आहे. 'मनुष्यजीवनाच्या विविध आविष्कारांत वाणी, आणि शास्त्र आणि कला मोडतात.' भाषा ही वाणीची मुख्य परिणती आहे. वाणी हा भाषेचा मुख्य आविष्कार आहे. अनुभवाला आणि वर्तनाला अर्थ देण्याची, 'कशाला काय म्हणू नये' हे ठरवण्याची क्रिया भाषेच्या द्वारे पूर्ण होते.

भाषा ही वाणीची मुख्य परिणती असली तरी वाणी भावाविष्काराचे एक साधन आणि संगीताचे वाहनद्रव्यही असते. त्यामुळे वाणी जेव्हा 'कलावती' होते तेव्हा भावाविष्कार तसेच वाणीचे संगीताशी असलेले नाते विचारात घ्यावे लागते. डॉ० केळकर भाषा आणि संगीत या दोन ध्रुवांच्या दरम्यानची, त्यांना जोडणारी जी साम्यस्थळे आहेत त्यांचे विवेचन करतात. कलावती वाणी ही कलेचे वाहनद्रव्यही बनलेली असते. या वाहनद्रव्याचा जेव्हा आशयद्रव्याशी संयोग होतो तेव्हा कलेचे माध्यम निष्पन्न होते. (पृष्ठ६७) डॉ०केळकर माध्यमाचा तंत्रपातळीवर आणि शैलीपातळीवर सूक्ष्म भेद स्पष्ट करीत विवेचन करतात. त्यामध्ये त्यांनी नाट्यधर्मी आणि लोकधर्मी या संज्ञा वापरताना भरताने त्यांचा दिलेला अर्थ जसाचा तसा ठेवलेला नाही. (डॉ० केळकर यांच्या एक्लेक्टिक - विविध क्षेत्रांतून आपल्याला उपयुक्त आणि आवश्यक 'कच्चा माल' घेऊन त्यातून नवीन मांडणी करण्याच्या - वृत्तीचे हे चांगले उदाहरण आहे.) परिणामत: या विवेचनात नाट्यधर्मी व लोकधर्मी यांच्या संदर्भात अंतर्दृष्टियुक्त (इन्साइटफुल) दिशादर्शक अशी अनेक विधाने आहेत. 'कलावती वाणी' हा या ग्रंथातील एक महत्त्वाचा लेख आहे. इतिकथनात या लेखातील मांडणीच्या उपयोजनाच्या काही दिशाही त्यांनी कळकळीने मांडल्या आहेत. पण गेल्या १४/१५ वर्षांत कुणी प्रतिसाद दिला नाही याची खंतही ते व्यक्त करतात, तिची गंभीर दखल अभ्यासकांनी घेणे आवश्यक आहे. डॉ० केळकरांच्या मते या अनास्थेचे कारण 'सध्याचा वैचारिक गारठा' हे आहे. कदाचित तथाकथित 'वैचारिक' दूधभात गटकन गिळण्याची सवय लागलेल्या वाचकांना हा तोंडाला भरपूर व्यायाम देणारा विचारप्रपंच मानवत नसावा.

या विभागातील ऊर्वरित लेख नाटक, संगीत आणि नृत्य या विषयांवर आहेत. डॉ० केळकरांची 'कलावती वाणी'मध्ये वाणी कलावती कशी आणि कोणत्या व्यवहारात होते हे ध्यानात घेतले तर ही मांडणी अपरिहार्य होते.

कवितेचा विचार करताना वापरलेल्या पद्धतीप्रमाणे येथेही विवेचन आहे. ''सर्जनशील लेखनाचा नाट्य हा सर्वोत्तम आणि सर्वात शाश्वत आविष्कार आहे. काव्याच्या विविध प्रकारांपैकीच नाट्य एक प्रकार आहे.'' (पृष्ठ७८) हे टी०एस० इलियटचे विधान उद्धृत केले आहे. नाटकाला सर्वश्रेष्ठ काव्य का मानतात याचा उलगडा करण्यासाठी डॉ० केळकर नाट्याची तीन वैशिष्टये विशद करतात:

१. कवी-निरपेक्ष आणि रसिक-निरपेक्ष असा अन्योन्य संबंध केंद्रस्थानी असणे.

२. नाट्यकाव्यातला वर्तमान(काळ) भविष्यकाळाला पोटात बाळगणारा, भविष्यकाळावर अवलंबलेला असतो. या वैशिष्ट्याला केळकर 'भविष्यगर्भ वर्तमानकाळ' म्हणतात.

३. नाटक रचणारा कवी असो,... दिग्दर्शन करणारा कविमित्र असो, कविमित्राचे रंगकर्मी मित्र किंवा प्रयोगात तन्मय होणारा रसिक ... आपापल्या जागी राहून पुन्हा एकत्र काम करण्याचा आनंद नाटकात मिळून जातो. (पृष्ठे७६-७८)

आपल्या या विवेचनाच्या पुष्टीसाठी डॉ० केळकर नाट्यकर्मीची स्वभाववैशिष्टये विशद करतात. ती कीट्सच्या दोन सुप्रसिद्ध वचनांच्या आधारे मांडली आहेत. सर्व रंगकर्मींना - नाट्यकवी, नाट्यदिग्दर्शक, रंगकर्मी आणि नाट्यरसिक या सर्वांना 'परकाया प्रवेश' करण्याची क्षमता आवश्यक असते. 'तटस्थता आणि आत्मीयता यांच्या पलीकडे जाणे म्हणजे तन्मयता (पृष्ठ७९)'.

नाटकातल्या 'भविष्यगर्भ वर्तमानाने निर्माण केलेला ताणतणाव हाताळण्यासाठी रंगधर्मीजवळ आवश्यक असणारे स्वभाववैशिष्टय म्हणजे एक प्रकारची बौद्धिक तितिक्षा.'

नाटकाच्या तिसर्‍या वैशिष्ट्याला डॉ० केळकर समाराधन म्हणतात. समाराधन म्हणजे सर्व संबंधितांची एकत्र खुषी होणे आणि एका घटकाने दुसर्‍याची खुषी राखणे.

अशा प्रकारे परकायाप्रवेशाची क्षमता, वैचारिक आणि भावनिक तितिक्षाबळ आणि समाराधनशीलता हे तीनही गुण नाट्यकर्मींच्या अंगी असावे लागतात. नाट्यकर्म आणि व्यक्तिमत्त्व विकास यांचा संबंध दोन्ही दिशांनी आहे. तो परस्परपोषक आहे हे सांगून डॉ० केळकर या दृष्टीने नाट्यकर्मींच्या शिक्षणाच्या दृष्टीने जी मांडणी करतात त्यात शिक्षकी तळमळ व्यक्त होते. तसेच 'या तीन गुणांच्या जोपासनेला एक सामाजिक बाजू आहे' (पृष्ठ८२) याचेही निकडीचे भान त्यांना आहे हे दिसते. या लेखाच्या शेवटच्या भागात हिंदी भाषी प्रदेशात 'नाटका'ची जी अवस्था आहे तिच्याबाबत उद्बोधक विवेचन केले आहे.

'नाटक : एक होणे' हा लेख मांडणीच्या बाबतीत 'कवितेचे असतेपण' या लेखासारखा आहे, हे नाटक म्हणजे काय ह्या अतिशय सूक्ष्म विश्लेषणावरून सिद्ध होते. ह्या लेखाच्या शेवटच्या भागात डॉ० केळकरांनी अनेक प्रश्न असलेल्या दोन कार्यक्रमपत्रिका सादर केल्या आहेत. त्या किंवा लेखाच्या आधीच्या भागात त्यांनी वेळोवेळी उपस्थित केलेले प्रश्न पाहता डॉ० केळकरांची त्यांच्या मांडणीच्या बाबतीत आग्रही भूमिका नसून वाद-संवादातून तत्त्वबोध करून घेणार्‍या अधिकारी जिज्ञासूची आहे असे दिसते.

संगीत किंवा नृत्य या कलाप्रकारांची चिकित्सा करतानाही ('संगीताची भाषा आणि मनोव्यापार : एक प्रश्नाचे मोहोळ,' 'नृत्य, कथक, आणि रोहिणी भाटे : एक सम्यग्दर्शन') यांत डॉ० केळकरांनी अशाच प्रकारची कळकळ दाखवली आहे. त्यांचा संगीतावरचा लेख ते एक उत्तम 'म्युझिकॉलॉजिस्ट' आहेत याचा प्रत्यय देतो. संगीताच्या अभ्यासाच्या तीन पायर्‍या विशद करून भारतीय संगीत परंपरांच्या (उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटकी) अभ्यासात उद्भवणारे काही प्रश्न त्यांनी चिकित्सक पद्धतीने मांडले आहेत. इतर म्युझिकॉलॉजिस्टांप्रमाणे ही मांडणी नाही. ती केवळ अमूर्त, सैद्धांतिक पातळीवरची, पढीक (अ‍ॅकॅडेमिक) नाही तर संगीतव्यवहाराच्या प्रत्यक्ष अवलोकनातून आणि भारतीय संगीत हे जे आपले मोलाचे सांस्कृतिक संचित आहे त्याबद्दलच्या आस्थेतून केलेली मांडणी आहे. 'भारतीय संगीत' हा आपल्या रास्त अभिमानाचा विषय आहे. दुर्दैवाने या संगीताचा जो सैद्धांतिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास भारतात होत आहे त्याबद्दल रास्त अभिमान बाळगण्यासारखी स्थिती नाही' या खेदजनक वस्तुस्थितीमुळे व्यथित होऊन ही मांडणी केली आहे. नाटकावरच्या लेखांप्रमाणेच येथेही डॉ० केळकरांनी चर्चा योग्य दिशेने जाणारी, तत्त्वबोधाचा वेध घेणारी असावी म्हणून प्रश्नांचे मोहोळ उठवलेले आहे.

'द्रव्य', 'माध्यम' आदि संज्ञांचे सूक्ष्म विश्लेषण करून मांडणी करण्याची पद्धतीच नृत्याच्या खास वेगळेपणाची जाण ठेवून त्यांनी वापरली आहे. 'नृत्य' म्हणजे काय आणि काय नाही याची जाणीव वाचकाला या लेखातून मिळते.

ग्रंथाच्या 'आस्वादाकडून समीक्षेकडे' या दुसर्‍या भागात पाच लेख आहेत. 'आस्वाद-व्यापार' हा १९७० पूर्वीचा लेख आहे असे त्याला जोडलेल्या इतिकथनावरून ध्यानात येते. त्या काळी मराठी साहित्यचर्चेमध्ये 'सौंदर्यशास्त्रीय' चर्चेची हवा होती आणि दबदबाही होता. डॉ० रा०भा० पाटणकर, प्रभाकर पाध्ये यांची नावे ठळकपणे आठवतात. सौंदर्यशास्त्रातील बा०सी० मर्ढेकरांचे योगदान पुन्हा एकदा तपासून घेणे हा एक प्रमुख मुद्दा या चर्चांमध्ये असे. डॉ० केळकरांनीही या चर्चेत प्रथमपासूनच महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी 'सौंदर्यशास्त्र' या संज्ञेऐवजी 'आस्वाद-व्यापार' ही संज्ञा सुचवली आहे आणि तिचे त्यांनी दिलेले स्पष्टीकरण 'आस्वाद-व्यापार', 'आस्वाद-मीमांसा' यांचे क्षेत्र अधिक व्यापक करते हे दिसून येते. 'आस्वाद-व्यापाराविषयी' या लेखात आस्वाद-व्यापार, आस्वाद्य वस्तू, आस्वाद घटना, आस्वाद गुण यांचा काटेकोरपणे मागोवा घेतला आहे आणि हे करताना अनेक घोटाळ्यांवर, कमतरतांवर प्रकाश टाकला आहे. शैलीबद्दलचा त्यांचा दृष्टिकोण या ग्रंथातील इतर लेखांमध्येही स्पष्ट झाला आहे. या लेखातही त्यांनी केलेले शैलीचे विवेचन मुळातून पाहावे. 'शैलीमीमांसा कुठल्या पद्धतीने होऊ शकेल आणि आस्वाद-व्यापार मीमांसेचा ती एक महत्त्वाचा भाग कशी ठरते... शैलीचा नीट विचार झाल्याशिवाय आस्वाद-व्यापारासंबंधीच्या कूट प्रश्नांचा उलगडा होणार नाही' अशी ही भूमिका आहे. 'समीक्षक : एक साक्षीभोक्ता' या लेखावर 'थिअरी ऑव्ह लिटरेचर' ची दाट छाया आहे. समीक्षा-व्यवहारामध्ये नेहमी उपस्थित होणार्‍या 'साहित्याचे सर्वस्पर्शित्व लक्षात घेऊन त्याचा आंतरक्षेत्रीय अभ्यास व्हायला पाहिजे' येथून सुरुवात करून 'साहित्यिक रसग्रहणातून साहित्य-समीक्षा' आणि 'समीक्षेचे सहभागी निरीक्षण म्हणजे साहित्य-मीमांसा' (पृष्ठ १५५) असे डॉ० केळकर म्हणतात. काही प्रमाणात या लेखातले प्रतिपादन आता आपल्या अंगवळणी पडले आहे. (ते सर्वस्वी स्वीकारले आहे किंवा स्वीकारावे असे नाही.) पण तरीही डॉ० केळकरांच्या विश्लेषक अन्वेषण पद्धतीचा नमुना म्हणून या लेखाकडे पाहाता येईल.

'मूल्यनिर्णय आणि साहित्यव्यवहार' हा लेख साहित्यकृती विषयक मूल्यनिर्णयाची काटेकोर आणि बहुसमावेशक चौकट निर्माण करतो. येथेही डॉ० केळकरांच्या 'असतेपण, सांगतेपण आणि करतेपण' या त्रयीची उपस्थिती जाणवते. आधीच्या लेखांप्रमाणेच या लेखातले बरेचसे मुद्देही वाचकांच्या परिचयाचे झाले असतील. 'इतिहास, साहित्याचा इतिहास आणि समीक्षकाचे कार्य' हा एक महत्त्वाचा लेख आहे. नेहमीप्रमाणे डॉ० केळकर प्रथम 'इतिहास' ही संकल्पना स्पष्ट करतात आणि या विवेचनात उपस्थित झालेल्या मुद्दयांचा साहित्याच्या इतिहासाशी काय अनुबंध असतो, असावा यांचे दिग्दर्शन करीत साहित्याच्या इतिहासाची मांडणी करतात हे माझ्या मते नोंद घेण्याजोगे आहे.

'कवितेचे सांगतेपण-करतेपण' या लेखात समीक्षेतील पाच विविध भूमिका ते पुन्हा मांडतात आणि या पाच भूमिकांची साहित्य-इतिहासाविषयी काय धारणा असेल याची मांडणी करतात. येथील फरक-साम्य यांच्या विश्लेषणामुळे आपल्या विचाराला नव्याने चालना नक्कीच मिळते.

'कला आणि कलाव्यवहार' या विभागातील पहिले दोन लेख - 'शिक्षणाचे एक माध्यम - कला' आणि 'अध्यापन आणि कवितेचे अध्यापन' - डॉ० केळकरांना शिक्षक या नात्याने कला आणि कविता यांच्याविषयी किती आस्था आहे याची साक्ष देतात.

'व्यावहारिक समीक्षा' या विभागात काही साहित्यकृतींची समीक्षा आहे. 'कोसला'चे परीक्षण आणि लक्ष्मण माने यांच्या 'उपरा'चे परीक्षण सोडता बाकी सर्व परीक्षणे कवितांची आहेत. 'कोसला' तिच्या शैलीमुळे रूढ कादंबरीपेक्षा निराळी आहे आणि 'उपरा'चे विश्लेषण प्रामुख्याने भाषा आणि भाषिक स्थित्यंतर याविषयी आहे हे ध्यानात घेतले तर इथे प्रस्तुत केलेली समीक्षा (ती अतिशय अंतर्दृष्टिपूर्ण आणि कलाकृतींचे अंतरंग सूक्ष्मपणे उलगडून दाखवणारी आहे हे मान्यच आहे.) कविता, शैली आणि भाषाव्यवहार या अंगांनी जाणारी आहे असे दिसते.

'भारतीय ललितकला (आधुनिक) वयात येतात' हा लेख - डॉ० केळकर त्याला निबंध म्हणतात - सांस्कृतिक समीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. एकोणिसाव्या शतकापासून भारतीय समाजजीवनात जो गुणात्मक फरक घडून आला त्याचे स्वरूप आणि व्याप्ती (खरे तर मर्यादा) - ललितकलांच्या संदर्भात - स्पष्ट करणारा हा लेख आहे. या फरकाला किंवा परिवर्तनाला काय म्हणायचे येथून डॉ० केळकर आपल्या विवेचनाला सुरुवात करतात. त्याला रिनेसन्स (पुनरुज्जीवन) म्हणायचे की 'एनलायटन्मेंट' (प्रबोधन) म्हणायचे? नेहमीप्रमाणे डॉ० केळकर दोन्हींची उकल प्रथम करतात. युरोपियन रिनेसन्सचा 'विद्यांचे पुनरुज्जीवन' हा एक पैलू होता. त्याच्या इतर राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक पैलूंचाही डॉ० केळकर मार्मिक खुलासा करतात. एकोणिसाव्या शतकापासून झालेल्या भारतातील पुनरुत्थानाबद्दल विवेचन करताना ते या स्थित्यंतराचा युरोपीय आधुनिकतेशी संबंध जोडतात आणि त्या आधुनिकतेशी निगडित असलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद, उपयुक्ततावाद तसेच समता आणि राष्ट्रभावना ही मूल्ये आणि ऐहिक परतत्त्वाच्या संदर्भात व्यक्तिवादाची कास धरणे आणि आध्यात्मिक परतत्त्वाच्या संदर्भात इहवादाचा आश्रय करणे या वैशिष्टयांचा परामर्श घेतात.

पश्चिमेकडून आलेल्या या विचारांबाबत डॉ० केळकर एक महत्त्वाचा विचार मांडतात. युरोपियन स्थित्यंतर 'आतून उपजलेले' होते तर त्याचा भारतीय उपखंडात झालेला स्पर्श बाह्यप्रेरणेमुळे झाला, यामुळे दोन क्रियांमध्ये जमीन अस्मानाचे अंतर पडले असे ते म्हणतात (पृष्ठ २६७). आणि जरी ते मांडत नसले तरी या अंतराला १९व्या शतकारंभाची भारताची सांस्कृतिक चणही कारणीभूत आहे. त्यामुळे भारतीय पुनरुत्थान अनेकश: दुभंगलेले आहे (पृष्ठ २६७). निरनिराळया जमातींत, प्रदेशांतही हा परिणाम कमीअधिक प्रमाणात जाणवतो. या भारतीय प्रबोधनाचा परिणाम तत्कालीन ललितकलांशी कसा पोचतो हे ऊर्वरित लेखात मांडले आहे. मांडणीचे कार्य 'भावी संशोधनासाठी एक दिशा सुचविणे एवढेच राहील' (पृष्ठ२६८) असे ते स्वत:च म्हणतात. भारतीय ललितकलांचे त्यांनी चार गटांत वर्गीकरण केले आहे. इंग्रजी भाषेचा उपयोग, वापर यांवर या कलांच्यात कमीअधिक प्रमाणात आणि खरीखुरी अथवा व्याज-आधुनिकता येणे कसे अवलंबून होते याचे दिग्दर्शन येथे होते. ब्रिटिशांनी दिलेल्या आश्रयानंतर काही कला अकॅडेमिक झाल्या, तर इतर काही कला ब्रिटिशांच्या आगमनानंतर झालेल्या सामाजिक सांस्कृतिक पुनर्रचनेमध्ये साहित्य मध्यमवर्गाच्या प्रभुत्वाखाली जाण्यात आणि परिणामत: संकुचित होण्यात झाला. या कोंडीतून सुटण्याचे काही मार्ग (लोकसाहित्याचा वाढता प्रभाव) त्यांनी सुचवले आहेत. 'पाश्चात्त्य प्रभाव भारतीय संदर्भात आत्मसात करायचे कुणाच्या मनातही आले नाही' (पृष्ठ २७२), ही 'घटी'ची बाजू मांडल्यावर डॉ० केळकरांनी प्रबोधनातून मिळालेल्या विधायक स्वरूपाच्या जमेची बाजू मांडली आहे. त्यात इतर आशियाई किंवा वसाहती असलेल्या देशांपेक्षा भारतात प्रबोधन अधिक प्रमाणात रुजले आहे. याबाबत 'हिंदूंची एकंदर जीवनदृष्टी आणि आधुनिकतेची मूल्ये यांमध्ये एक लक्षणीय बंध आहे' असे प्रतिपादन डॉ० केळकर करतात.

आधुनिकतेचे आव्हान भारतीयांचे कलाजीवन पेलेल का? हा प्रश्न उपस्थित करून त्यांनी याबाबत देशीवादाचा पुरस्कार त्याज्य ठरवला आहे. त्याबाबतीत 'स्व-राज्य' कल्पनेचा पाठपुरावाच आपल्याला आधुनिकतेला समर्थपणे सामोरे जाण्यासाठी उपयोगी पडणार आहे असे ते सुचवतात.

डॉ० केळकरांच्या विवेचनातल्या तपशिलांबाबत, काही निष्कर्षांबाबत मतभेद होऊ शकतील. एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. डॉ० मीनाक्षी मुखर्जी त्यांच्या 'द पेरिशेबल एंपायर' या पुस्तकात डॉ० डी०आर० नागराज यांना उद्धृत करतात. “It is possible to identify three streams in the existing theories of colonialism : the schools that are defined by the idea of total conquest, the ones that are organised around the idea of a cultural soul and the ones that stress mutual transformation. The first is represented by the likes of Frantz Fanon, Albert Memmi and Edward Said, the second by the likes of Anand Kumarswamy and Sayyad Hossein Nasr, the third by Ashis Nandy.” डॉ० डी०आर० नागराज यांनी आपल्या 'एग्झाइल्ड अ‍ॅट होम' या संग्रहाच्या प्रस्तावनेत हे विवेचन केले आहे. डॉ० मुखर्जी यांनी तिसर्‍या गटात सुप्रसिद्ध समीक्षक हरीश त्रिवेदी यांचाही समावेश केलेला आहे.

डॉ० केळकर यांच्या विवेचनात रवींद्रनाथ ठाकुरांचा दोनतीन वेळा ओझरता उल्लेख येतो, पण आधुनिकतेच्या संदर्भातले रवींद्रनाथांचे योगदान त्यांनी विचारात घेतलेले नाही. कुमारस्वामींचाही उल्लेख नाही. यांच्या विचारांचा परामर्श माझ्या मते जमेची बाजू वाढवणारा आहे. देशीवादाच्या मुद्दयावर डॉ०केळकरांची भूमिका मान्यच करावी लागते. पण स्वत:चा सांस्कृतिक आत्मा ओळखण्याचा आग्रह धरणार्‍या आणि तिसर्‍या गटातल्या, समावेशक असण्याचा आग्रह धरणार्‍या विचारवंत, समीक्षक आणि कलाकारांचाही विचार प्रस्तुत ठरला असता.

या परीक्षणाच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे डॉ० केळकरांचा बौद्धिक आवाका स्तिमित करणारा आहे. त्यांची अन्वेषण-पद्धती मर्मग्राही, अंतर्दृष्टी देणारी आहे. वाचकाशी मोकळेपणाने संवाद करीत (कधीकधी चिमटे काढीत) ते मांडणी करतात. त्यांच्या या प्रचंड बौद्धिक प्रयत्‍नांना साजेसा प्रतिसाद (संवाद, वाद-विवाद या स्वरूपात) मिळत नाही याविषयी ते रास्तपणे दु:खी आहेत. पण हे लेख वाचताना आणि डॉ० केळकरांची व्यथा समजून घेत असताना असेही वाटते की या स्तब्धतेकडे सद्यकालीन (अपरिहार्य?) वैचारिक गारठा असे म्हणून चालणार नाही. डॉ० केळकरांना अभिप्रेत असलेला वाद-संवादाला अनुकूल असा बौद्धिक स्वरूपाचा पुरेसा सशक्त 'पब्लिक स्फिअर' आपण अजूनही निर्माण करू शकलेलो नाही. १९व्या शतकाच्या आरंभी गद्याचा अवतार झाला. त्याच्याशीही सुसंगत असा अत्यंत प्राथमिक स्थितीतल्या वादविवाद-तत्त्वबोधाला आवश्यक असा 'पब्लिक स्फिअर' अस्तित्वात आला होता, पण तो सतत शबल राहिला आहे. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात अशा प्रकारचा 'पब्लिक स्फिअर' निर्माण करण्यात नियतकालिकरूपी व्यासपीठाचा आणि 'कॉफी हाऊस'रूपी सामाजिक संस्थांचा मोठा सहभाग होता. आपण आपल्याभोवती घालून घेतलेल्या अनेक कुंपणांमुळे आपल्याकडे हा 'पब्लिक स्फिअर' पुरेशा परिणामकारकपणे कार्य करू शकत नाही. डॉ० केळकरांनी जन्माला घातलेले 'भाषा आणि जीवन' आता खूपच बाळसेदार झाले आहे. ते अशा प्रकारच्या वादसंवादासाठी आदर्श व्यासपीठ होऊ शकेल आणि त्यातील चर्चांमुळे डॉ० जहागिरदार यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ही 'रुजुवात' सार्थ होईल.

सीताराम रायकर
दूरभाष :०२०-२५४२४४३०८
भ्रमणभाष : ०९८८१९००६०८

आरपार लयीत प्राणांतिक

('आरपार लयीत प्राणांतिक' - प्रज्ञा दया पवार. लोकवाङ्मयगृह, मुंबई. २००९. पृष्ठे ५५. मूल्य रु० ६०/-)

कवयित्री प्रज्ञा पवार यांची 'आरपार लयीत प्राणांतिक' ही दीर्घकविता विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या लावणीसम्राज्ञीच्या जगण्याचे सारसर्वस्व शब्दांकित करण्याचा प्रयत्न करते. काव्यविषय झालेल्या विठाबाईंशी पुस्तकाच्या सुरुवातीला साधलेल्या मनोगतसदृश संवादातून कवयित्रीची लेखनामागची भूमिका लक्षात येते. संस्कृतीचा पोट-संस्कृतीशी अन्वय लावणे, तसेच जातिव्यवस्थेतल्या उतरंडीत सर्वात पायतळी ढकलल्या गेलेल्या बाईची जिद्द आणि कलेची ताकद जाणवून देणे, ही दलित-स्त्रीवादी भूमिका त्यामागे आहे. डॉ० माया पंडित यांनी 'निमित्ताने' या प्रस्तावनेतून दलित-कष्टकरी स्त्रीच्या सांस्कृतिक संघर्षाची वाचकांना जाणीव करून दिली आहे.

'पवळा हिवरगावकर ते विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर,' तसेच 'लावणीसम्राज्ञी ते जोगवा मागणारी असहाय स्त्री' या विठाबाईंच्या दंतकथासदृश जीवनप्रवासाचे - त्यातील चढउताराचे - दर्शन या दीर्घकवितेतून प्रभावीपणे घडते. पुरुषसत्ताक मनोवृत्तीची दांभिकताही त्यातून उजेडात येते. विठाबाईंविषयीची कवयित्रीची सहसंवेदना यात विविध नात्यांनी घट्ट विणली गेली आहे. स्त्री, दलित आणि कलावंत या तीनही पातळयांवर कवयित्रीला विठाबाईंशी नाते जोडता आल्यामुळे विठाबाईंची व्यक्तिरेखा यात विविध परिमाणांतून साकार झाली आहे.

कवयित्रीने मार्मिक प्रतिमांच्या द्वारे विठाबाईंच्या अभावग्रस्त जगण्याचे शोकात्म रूप आणि कलासंपन्न जगण्याचे दिमाखदार रूप यातील अंतर्विरोध सूचित केला आहे. ''बाई असण्याच्या चिरंतन ढोलकाठीचा खेळ', 'अभावाची ढोलकी', 'भुकेचा आदिम वग', 'षड्- विकारांची ओटी' ही यातील रूपके अर्थगर्भ आहेत. ही दीर्घकविता भावकवितेच्या अंगाने विकसित होते. त्यामुळे यात वर्णन-निवेदन यांना फाटा देऊन भावना-संवेदना-चिंतन यांच्या आवेगातून आलेला प्रवाहीपणा जाणवतो. शीर्षकातूनही याचा प्रत्यय येतो. यातील चिंतन स्त्रीत्व आणि दलितत्व यांच्याशी निगडित शोषणापुरतेच मर्यादित नसून नवभांडवलशाहीच्या नावाखाली लावणीकलाकारांची होणारी लैंगिक लूटही लक्षात आणून देणारे आहे.

''नवजात अर्भकाला जन्म देऊन,
दगडानं त्याची नाळ ठेचून,
पुन्हा फडावर रंगबाजी करताना,
तुझ्या मायांगातून ओघळणारा घाम,
वेदना अश्शी कापत जाते
माझ्या संज्ञेला''

अशा यातील ओळी उत्कट आहेत आणि धारदार उपरोधामुळे जिव्हारी झोंबणार्‍याही आहेत.
कवयित्री आणि विठाबाई यांच्या सहसंवेदनेच्या नात्यावर उभ्या राहिलेल्या या दीर्घकवितेचा बाज लयबद्ध तर आहेच, शिवाय आशयगर्भही आहे.

नीलिमा गुंडी
neelima.gundi@gmail.com

अनाग्रही सर्वसमावेशक संशोधन

सुबोध जावडेकर

(परीक्षित पुस्तक : 'ध्वनितांचें केणें' - मा०ना० आचार्य. पद्मगंधा प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे २७८. किंमत रु०२५०/-)

'ध्वनितांचें केणें' हे पुस्तकाचे नाव आपल्याला कोडयात टाकतं. ध्वनित म्हणजे जे उघड नाही ते, आडवळणानं सांगितलेलं, हे आपल्याला माहीत असतं. तेव्हा ध्वनित म्हणजे सूचित किंवा गुह्य असणार. पण 'केणें' म्हणजे काय बुवा? असा प्रश्न बहुतेकांच्या चेहर्‍यावर उमटेल. केणें म्हणजे गाठोडं. 'ध्वनितांचें केणें' म्हणजे गूढार्थाचं गाठोडं. हा ज्ञानेश्वरीतला शब्दप्रयोग आहे. एखाद्या गोष्टीला वरवर दिसतो त्यापेक्षा काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो अशा वेळी हा शब्दप्रयोग वापरतात. प्राचीन साहित्यामध्ये आणि संतवाङ्मयामध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्यांमध्ये वरकरणी दिसतं त्यापेक्षा काहीतरी वेगळंच लेखकाला सांगायचं असतं. अशा जागा नेमक्या हेरून मा०ना० आचार्यांनी हे गूढार्थाचं गाठोडं आपल्यासमोर सोडलेलं आहे.

मा०ना० आचार्य यांचा देवकथांचा, पुराणकथांचा, मिथकांचा दांडगा अभ्यास आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत या भाषांतील साहित्याचं त्यांचं भरपूर वाचन आहे. याचे पुरावे पुस्तकात जागोजागी विखुरलेले आहेत. प्राचीन भारतीय वाङ्मय, वेदपुराणे, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये, संतसाहित्य, याच्याबरोबरीनं आधुनिक साहित्य आणि समीक्षा या सर्व क्षेत्रांत त्यांचा सहज संचार चालू असतो. त्यांच्या या चतुरस्र व्यासंगाला सुरेख ललितशैलीची जोड मिळाल्यामुळे या पुस्तकाला रूढ समीक्षाग्रंथाचं स्वरूप न येता काव्यशास्त्रविनोदाच्या सुरेल मैफलीचं रूपडं आलं आहे.

एखाद्या गोष्टीकडे बघताना वेगवेगळया कोनांतून त्याच्यावर प्रकाश टाकायची आचार्यांना आवड आहे हे तर पुस्तक वाचताना सहजच लक्षात येतं. ज्याबद्दल लिहायचं त्याच्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती मिळवून ती वाचकांपुढे सादर करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. पण हे करताना केवळ संदर्भांचा ढीग वाचकाच्या पुढयात ओतून त्याला चकित करावं, त्याचं डोकं भिरभिरवून टाकावं, असा त्यांचा उद्देश नसतो. तर एकाच विषयाचे अनेकविध पैलू दाखवून वाचकाला त्या विषयाचा सर्वांगानं परिचय करून देण्यावर त्यांचा भर असतो.

पण मला जाणवलेलं या पुस्तकाचं सर्वांत विलोभनीय वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची अनाग्रही, सर्वसमावेशक भूमिका. एखाद्या घटनेचा किंवा कथेचा स्वत:ला जाणवलेला अन्वयार्थ सांगताना केवळ आपलीच बाजू खरी आणि इतरांची चुकीची असा दुराग्रह आचार्य मुळीच धरत नाहीत. उलट आपण सांगितल्यापेक्षा वेगळा अर्थ लावणारा संदर्भ कुठे सापडला तर त्याचा आवर्जून उल्लेख करायला ते बिचकत नाहीत. पुष्कळ पुस्तकांत असं लक्षात येतं की लेखकानं एक कुठलंतरी प्रमेय स्वीकारलेलं असतं. आणि मग स्वत:च्या दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ आपल्या बाजूचे पुरावे, आपल्या गृहिताला पुष्टी देणार्‍या गोष्टी, इतरांचे आपल्या भूमिकेला पाठिंबा देणारे अभिप्राय यांच्या याद्यांच्या याद्या तो लेखक पुस्तकातून सादर करत असतो. 'हा जय नावाचा इतिहास आहे', 'कर्ण खरा कोण होता?' अशी काही सहज आठवणारी उदाहरणे.

मा०ना० आचार्य यांनी मात्र कुठल्याच मुद्द्याच्या संदर्भात अशी बनचुकी भूमिका घेतलेली नाही. एखाद्या गोष्टीच्या अनुषंगाने जेवढे म्हणून उलटसुलट मुद्दे त्यांना आढळले ते सगळेच्या सगळे, काहीही न लपवता, कुठलीही संपादकीय कात्री न लावता, त्यांनी वाचकांच्या समोर ठेवले आहेत. पूर्वसूरींच्याबरोबरीनं समकालीन अभ्यासकांच्या मतांचीही चर्चा केली आहे. सर्व मुद्दे वाचकांसमोर यावेत आणि मग वाचकाने स्वत:च काय तो निष्कर्ष काढावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं. त्यांची भूमिका सच्च्या अभ्यासकाची आहे. विनम्र आणि काहीशी तटस्थ. कुठलाही अभिनिवेश नाही. चलाखी नाही. किंवा डावपेच नाहीत. पूर्वग्रहाचा किंवा अहंकाराचा वारासुध्दा त्यांना कुठं स्पर्शून गेलेला नाही. अशा स्वरूपाचे पुस्तक लिहिताना लेखकाची भूमिका कशी असावी याचा हा वस्तुपाठ आहे.

पुस्तकात पहिल्या भागाला त्यांनी 'भरती' हे नाव दिलंय. या विभागातल्या पाच लेखांत केंद्रीभूत विषयाच्या अनुषंगाने इतरही भरपूर माहिती त्यांनी दिली आहे. गणेश ही देवता, श्रीकृष्ण ही व्यक्ती, अश्वत्थ हा वृक्ष, खेचर ही भूतयोनीसारखी योनी आणि संत नामदेवांचं त्यांच्या अभंगांतून दिसणारं व्यक्तिमत्त्व असे हे पाच विषय आहेत. विषयांची ही केवळ यादी वाचूनच आपण थक्क होतो. किती नानाविध विषय आचार्यांना दिसतात आणि त्यावर लिहिताना ते किती रंगून जातात हे पाहायला मुळातून पुस्तकच वाचायला हवं.

दुसर्‍या 'झडती' या भागामध्ये मान्यवर संशोधकांनी कळत नकळत केलेल्या प्रमादांची झाडाझडती घेतलेली आहे. विवेचनाच्या ओघात डॉ० हे०वि० इनामदार, मंगरूळकर, केळकर, राजवाडे, दांडेकर, न०म० सोमण, गो०म० कुलकर्णी, दुर्गा भागवत, ना०गो० नांदापुरकर, सातवळेकर, स्वामी स्वरूपानंद अशा अनेक विद्वानांच्या मतमतांतराचा धांडोळा त्यांनी इथं घेतलेला आहे. अभंग, ओव्या, भारूड, भागवत, पुराणं, असा त्यांच्या अभ्यासाचा विस्तृत प्रदेश आहे. ज्या ज्या ठिकाणी काही चुकीचे अर्थ लावले गेले आहेत, विचार न करता काहीतरी ठोकून दिलं आहे, त्याचं पुरेपूर माप त्यांनी त्या त्या संशोधकाच्या पदरात घातलं आहे. 'व्यासपर्वाचा पैस' या मोठया लेखात दुर्गाबाईंच्या ललितरम्य भाषेला, अभिजात रसिकतेला, जीवनातलं नाटय नेमकेपणानं टिपणार्‍या प्रतिभेला दाद देतानाच दुर्गाबाईंनी केलेले घोटाळे, गफलती, वाचकांची वंचना यावर कठोर टीकाही केली आहे.

तिसर्‍या 'फिरती' या भागात तीन लेख आहेत. त्यात अहल्या, एकलव्य आणि पुरुरवा यांच्या मूळ कथेत, आणि त्यामुळे अर्थातच आशयात, झालेल्या बदलांचा मागोवा त्यांनी त्यांच्या शैलीत घेतला आहे. तो घेताना केवळ प्राचीन कवींचीच नाही तर विंदा करंदीकर आणि पु०शि० रेगे यांच्यासारख्या अर्वाचीन कवींचीही साक्ष त्यांनी काढलेली आहे. हे लेख लिहिताना त्यांनी केलेली काटेकोर मांडणी बघण्यासारखी आहे.

आचार्यांची भूमिका नम्र असली तरी कुठंही बोटचेपी, गुळमुळीत झालेली नाही. पहिल्या भागात तर अशा काही जागा आहेत की ज्यांच्याबद्दल लिहिताना त्यांना देवदेवतांबद्दल धीट शब्दात लिहावं लागलं आहे. एवढयातेवढयावरून भावना दुखावल्या जाणार्‍या आजच्या युगात अशा नाजूक जागांबद्दल लिहिणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. ती त्यांनी कशी साधली आहे ते बघण्यासाठी 'देवा तू चि गणेशु' या लेखातल्या गणेशजन्माची कथा मुद्दाम डोळयाखालून घालावी.

पुराणग्रंथांचा अभ्यास असला तरी आचार्यांची मनोधारणा अजिबात पारंपरिक, पुराणमतवादी, कोती नाही. उलट ती खरोखरीची उदारमतवादी, कित्येकदा तर प्रखर स्त्रीवादीही आहे हे लक्षात येतं. आपल्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये स्त्रीच्या मुक्त वासनांचा आविष्कार अनेकदा मोकळेपणाने व्यक्त झाला आहे. स्त्रीच्या या आदिम कामभावाबद्दल लिहिताना आचार्यांची लेखणी कुठं अडखळल्याचं जाणवत नाही. द्रौपदी, अहल्या, लोपामुद्रा, यमी यांच्या चित्रणात हे प्रकर्षानं दिसून येतं. आनंदरामायणामध्ये आलेल्या पिंगलेच्या कथेत रामाला वसिष्ठांच्या पायांवर हात ठेवून शपथ घ्यावी लागते व सीतेला आपल्या शुध्दतेची खात्री पटवावी लागते हा भागही गमतीचा आहे. 'अहल्या शिळा...' हा लेख तर फारच सुरेख जमला आहे. त्यात ऋग्वेदापासून थेट विंदा करंदीकरांपर्यंत अनेकांनी अहल्येच्या कथेकडे कसं पाहिलं आहे याचा विचक्षणपणे आढावा घेतला आहे.

विनोद हा अभ्यासू वृत्तीला मारक असतो असा गैरसमज, का कुणास ठाऊक, आपल्याकडे प्रचलित आहे. अत्यंत गांभीर्याने केलेलं लिखाणसुध्दा काडेचिराईताचा काढा पिऊन करायची आवश्यकता नसते. अधूनमधून कोपरखळया, थट्टामस्करी, अवखळपणा असला तरी विषयाच्या गांभीर्याला मुळीच बाधा येत नाही अशी आचार्यांची धारणा आहे. 'अहल्या शिळा...' या लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या 'अपौरुषेय(!)' ओळी आणि त्या चुटक्यानं लेखाची सुरुवात करायची कल्पना तर अफलातूनच आहे. अशा प्रसन्न शैलीमुळे पुस्तकाची वाचनीयता कितीतरी पटीनं वाढली आहे यात शंका नाही.

पुस्तकाचं मुखपृष्ठ रविमुकुल यांचं आहे; त्याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. पिवळया पडलेल्या कागदावर जुन्या पोथ्यांत असतात तशी. बोरूने रेखलेली, फिकट होत चाललेली, ढबोळी अक्षरं आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर 'ध्वनिताचें केणें' असं काळयाभोर ठसठशीत अक्षरात ग्रंथाचं नाव, पुस्तकाचं स्वरूप आणि लेखकाची भूमिका याबद्दल बरंच सांगून जातं.

आचार्यांचं हे पुस्तक वाचताना त्यांची शैली, अभ्यास, भाषा, प्रतिभा, संदर्भसंपन्नता यांबाबतीत 'युगान्त' ह्या इरावती कर्व्यांच्या पुस्तकाची वारंवार आठवण होते. कोणत्याही पुस्तकाचा यापेक्षा जास्त गौरव कुठल्या शब्दांत करता येईल?

5, भागीरथी प्रसाद, 99 शिवाजी पार्क, दादर, मुंबई 400 028
दूरभाष : (022) 24466451

भ्रमणभाष: 09870369372

ई-मेल : subodh.jawadekar@hotmail.com

पुस्तक-परीक्षणः लाटांचे मनोगत

[परीक्षित पुस्तक : 'लाटांचे मनोगत' - डॉ० नीलिमा गुंडी. पद्मगंधा प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे १५९. मूल्य रु० १३०/-]

डॉ० नीलिमा गुंडी या मराठी काव्यसमीक्षेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या विमर्शक आहेत. त्या स्वत: कवयित्री आहेत. तसेच मराठी कवितेच्या काही चांगल्या संपादनांमध्येही त्यांचा सहभाग आहे. 'लाटांचे मनोगत' हे त्यांचे काव्यसमीक्षेचे पहिलेच प्रकाशित पुस्तक होय.

इ०स० १९५० ते २००० या कालखंडातील मराठीतील स्त्रियांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास यातून त्यांनी वाचकांसमोर मांडलेला आहे. 'लाट' ही त्यांना स्त्रीत्वाची प्रतिमा वाटते, असे स्पष्टीकरण प्रास्ताविकात आलेले आहे. परंतु वाचकांना हा अर्थ सहजासहजी जाणवेलच असे नाही. शीर्षकावरून हे ललित गद्य असावे, असा समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशयावर अधिक प्रकाश पडेल, असे शीर्षक जास्त समर्पक झाले असते.

विविध निमित्ताने झालेला या विषयाचा अभ्यास त्यांनी या पुस्तकात एकत्रित केलेला आहे. इ०स० १९५० ते १९७५ व इ०स० १९७५ ते २००० असे दोन टप्पे पाडून त्यामधील स्त्रियांच्या कवितांमधील अनुभव आणि अभिव्यक्ती त्यांनी दोन प्रकरणांमध्ये लक्षात घेतली आहे. तसेच एकूणच स्त्रियांच्या कवितेचे म्हणून लक्षात येणारे काही ठळक पैलूही त्यांनी स्वतंत्र प्रकरणात मांडले आहेत. 'स्त्रीवादी आणि स्त्रीकेंद्री कविता' या विषयावरही स्वतंत्रपणे विवेचन आहे. या सर्व अभ्यासातून जाणवलेल्या तथ्यांच्या आधारे समारोप केला आहे. याशिवाय परिशिष्टांमध्ये पाच परिक्षणे, निवडक आधारग्रंथ व कवयित्रींची निर्देश सूची दिलेली आहे.

स्त्रियांच्या कवितांमधील अनुभव आणि त्याच्या अभिव्यक्तीसंबंधी विवेचन करणारा या पुस्तकामधील भाग हा उद्दिष्टाच्या दृष्टीने त्याचा गाभा म्हणता येईल. इ०स० १९५० ते २००० मधील कवितेची ही चर्चा करणार्‍या प्रकरणांमध्ये स्त्रियांचे विशिष्ट संवेदन, त्यातील उत्कटता, भोवतालच्या जगाविषयीचे त्यांचे आकलन, त्यातले प्रामुख्याने काव्यविषय होणारे घर, नातेसंबंध यांसारखे घटक, बदलत्या काळात बदलत गेलेले स्वत:विषयीचे भान, कळत नकळत जीवानानुभवावरच पडलेली मर्यादा आणि त्यामुळे अभिव्यक्तीवरही येणारी दडपणे अशा विविध मुद्यांच्या आधारे घेण्यात आलेला परामर्श त्या काव्याचे स्वरूप नेमके उलगडून दाखवणारा आहे.

१९७५ पर्यंतच्या कवितांचा विचार करताना या दडपणांचा उल्लेख त्यांनी केला आहे. या कवयित्री परंपरेने उभी केलेली 'मूक सोशिक' स्त्रीची आदर्श प्रतिमा रंगविण्यातच रमल्या होत्या, असे त्या म्हणतात (पृ० ४३). इंदिराबाईंच्या 'कधी कधी न अक्षरात/मन माझे ओवणार' या ओळी उद्धृत करून, हे व्रत घेऊनही तेथे सूचक, तरल प्रतिमांमधून मन व्यक्त होऊ लागल्याचे त्या सांगतात. एक विचार येथे मनात येतो. त्या काळात मौनात केवळ स्त्रीत्वाचीच प्रतिष्ठा होती का? की एकूण मराठी कवितेवरच अभिजातवादी प्रवृत्तींचाही काही प्रभाव होता? कुसुमाग्रजांच्या कवितेतील 'काही बोलायचं आहे/पण बोलणार नाही' सारख्या अनेक ओळींचे येथे स्मरण होते. त्यामुळे स्त्रियांच्या कविता अगदी सुट्या न काढता समकालीन कवी कोणती मूल्ये मानत होते, हेही पाहिले पाहिजे असे वाटते. अन्यत्र या कवितेवर प्रभाव टाकणार्‍या कवींची चर्चा त्यांनी केलेली आहे (पृ० १९). यात बदल झाला त्याला विविध गोष्टी कारणीभूत आहेत. १९७५ नंतर आपल्याकडे पोचलेला 'पर्सनल इज पोलिटिकल' हा स्त्रीवादी विचार हे त्यातले एक ठळक कारण आहे.

इ०स० १९७५ ते २००० या कालखंडातील कवितेबाबत विवेचन करताना त्यात अपरिहार्यपणे स्त्रीवादाचा संदर्भ येतो. स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेचे पुनर्मूल्यांकन या कवयित्री करीत जातात. भोवतालचे वास्तव, प्रेमानुभव, नातेसंबंध, मातृत्व या सार्‍यांविषयीच त्यांची जाणीव अधिक डोळस होते आहे. काव्याच्या आविष्काररूपांवरही या परिवर्तनाचा परिणाम होतो आहे हे डॉ० गुंडी नेमकेपणाने दाखवून देतात. हे स्पष्ट करताना त्यावर पडू पाहणार्‍या मर्यादांचीही त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. या प्रकरणातच समाविष्ट होऊ शकला असता असा भाग 'स्त्रीवादी आणि स्त्रीकेंद्री कविता' म्हणून त्यांनी वेगळा ठेवला आहे. त्यांचे तेथील विवेचन स्त्रीवादाच्या प्रभावातील सकारात्मक अंगाचीही अधिक खोलवर जाऊन दखल घेणारे आहे. (तशी ती घेणे आवश्यकही होते.) हे लेखन पुस्तकरूपात येताना एकत्र करणे सयुक्तिक ठरले असते. इ०स० १९७५ नंतरच्या कवितेचे आकलन त्यामुळे सलग स्वरूपात समोर आले असते.

'स्त्रियांच्या काव्याचे काही पैलू' हे प्रकरण सुटे तीन लेख एकत्र करूनच आकारले आहे. वेगवेगळ्या पैलूंचा विचार असल्याने त्यांचे सुटेपण खटकत नाही. यातील 'वारसा स्त्रीत्वाचा आणि कवितेचा' या शीर्षकाच्या भागातील आई-मुलीच्या नात्याचे बदलते स्वरूप आणि त्याची तशीच वेगळी अभिव्यक्ती यासंबंधीचे विवेचन महत्त्वाचे आहे. स्त्रियांच्या कवितेतील एक वेगळा पदर त्यातून उलगडला जातो. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला वाटणारी संवादाची गरज आणि त्यामुळे कवितेतून सुरू होणारा आत्मसंवाद याबाबतचे 'शब्दवती कविता' या शीर्षकाखाली मांडलेले निरीक्षणही मार्मिक आहे.
परिशिष्टांत कवयित्रींच्या काव्यसंग्रहांची पाच परीक्षणे दिलेली आहेत. हे संग्रह चांगले आहेत. त्यांची वैशिष्ट्ये लेखिकेने नेमकी दिली आहेत, मात्र मुळातल्या शब्दमर्यादेमुळे त्यातली दोन परीक्षणे फार त्रोटक आहेत. लेखिकेकडून विश्लेषणाबाबत असलेल्या अपेक्षा त्यामुळे फारशा पूर्ण होत नाहीत. नियतकालिकांच्या मर्यादेत अधिक विवेचन त्या त्या वेळी शक्य नसले, तरी आता पुस्तकात समावेश करताना त्यात भर घालता आली असती, असे वाटते.

प्रस्तुत पुस्तकातून या कालखंडातील कवयित्रींच्या काव्याच्या स्वरूपावर चांगला प्रकाश पडतो. डॉ० गुंडी यांनीच दिलेल्या आकडेवारीच्या प्रमाणात पाहिले तर त्यापैकी निवडक काव्यसंग्रहांचाच विचार त्या येथे करू शकल्या आहेत, हे लक्षात येते. मात्र त्यांची निवड प्रातिनिधिक म्हणता येईल, अशी आहे. मूळ निबंधांना पुस्तक म्हणून एकत्रित करताना पुनर्लेखनाची गरज होती, असे वाटते. तरीही एकूण विवेचन आणि संदर्भ यामुळे प्रस्तुत पुस्तकही अभ्यासकांस उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

विद्यागौरी टिळक
प्रपाठक, मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७. दूरभाष ०२०-२५६९ ०९८७

पुस्तक-परीक्षणः अक्षरस्पंदन

[परीक्षित पुस्तक : 'अक्षरस्पंदन' - डॉ० नीलिमा गुंडी. उन्मेष प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे १६८. किंमत रु० १२०/-]

साहित्याच्या रसिक वाचकांची अभिरुची प्रत्येक पिढीनुसार बदलत असते. अभिरुचीच्या या घडणीत समकालीन साहित्याचा फार मोठा वाटा असतो. साहित्यातील संक्रमणाची नोंद प्रत्येक पिढी आपापल्या परीने घेत असते. डॉ० नीलिमा गुंडी यांचे 'अक्षरस्पंदन' हे पुस्तक प्रामुख्याने अशा समकालीन कवी आणि लेखकांच्या साहित्याविषयी आपले अनुभवकथन करते. 'रसिकांमधल्या सुप्त प्रतिभाशक्तीला समर्पित' असे हे पुस्तक अनेक प्रतिभावंतांच्या साहित्यनिर्मितीचा मागोवा घेते.

वेगवेगळ्या निमित्ताने निरनिराळ्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे. त्यामध्ये 'कवितेशी गट्टी जडण्याचे (जमण्याचे) दिवस' हा पहिला लेख आहे. आधीच्या पिढीकडून गेय, छंदोबद्ध कवितांमधून काव्य कसे भेटले हे लेखिकेने त्यात सांगितले आहे. 'कवितेचे भावतरंग'मध्ये 'बालभारती'मधील 'झुळुक मी व्हावे' या काहीसे अज्ञात असलेल्या कवी दा०आ० कारे यांच्या कवितेचे रसग्रहण आहे. आज पन्नाशीत असलेल्यांना पाठ्यपुस्तकांमधून मिळालेले 'कवितेचे पाथेय' हा एका लेखाचा विषय आहे. याशिवाय कुसुमाग्रजांची बालकविता, विंदा करंदीकरांची बालकविता, 'विशेषणात न मावणारा कवी' (विंदा करंदीकर), 'विशाखा'ने आम्हांला काय दिले?', 'अष्टपैलू वसंत बापट' असे निवडक कवींवर सहा लेख या संग्रहात आहेत. रेल्वे, पक्षी, झाडे, वसंत ऋतू, पाणवठे, पंढरपूरची रुक्मिणी, आई, बाप आणि मुलगी, बाप आणि दलित काव्य, ईश्वर अशा शीर्षकांखाली असलेल्या कवितांचे तुकडे गोळा करून लेखिकेने जवळपास अकरा लेख लिहिले आहेत. एका लेखात तर कुसुमाग्रजांच्या 'स्वप्नाची समाप्ती' या प्रसिद्ध कवितेची मजरुह सुलतानपुरींच्या एका चित्रपटगीताशी तुलना केली आहे.

'चाळ' (मुंबईतली) या घटकाची साहित्यातील प्रतिबिंबे यावर एक लेख आहे. अर्थात 'कथाकादंबर्‍यांमधील बदलती स्त्री-प्रतिमा' हा प्रबंधाला शोभेल असा भारदस्त विषयही लेखिकेने निवडला आहे. प्रकाश संत यांचा 'लंपन', मिलिंद बोकील यांची 'शाळा,'इरावतीबाईंचे 'ललितलेखन' आणि 'भाषेचे भाष्यकार' हा डॉ० अशोक केळकर यांच्यावरील व्यक्ती आणि वाङ्मयविषयक लेख असे गद्यासंबंधी लेख या संग्रहात आहेत.

लेखिका स्वत: साहित्याची साक्षेपी वाचक आणि मराठी साहित्य या विषयाची प्रदीर्घ काळ अध्यापक आहे. भाषा-विषय शिकवताना कसे शिकवावे याचे नेमके उत्तर लेखिकेजवळ आहे. 'शब्दांचे दुसर्‍या शब्दांशी लागणारे नाते, शब्दाचे अर्थाशी लागणारे नाते, त्या अर्थाचे आपल्या जगण्याशी लागणारे नाते आणि त्याचवेळी संस्कृतीच्या आजवरच्या खळाळत्या प्रवाहाशी लागणारे नाते, या सार्र्‍यांची एकसंधरीत्या प्रचिती येईल असे शिकवावे.' (पृo १७) हा तो गुरुमंत्र आहे. प्रत्यक्षात हे शिक्षण कसे चालते हे शिक्षकांना पुरुषराज अळूरपांडे म्हणजे कोण हे न उमगणे, गवर्‍यांचे उत्तरासह दिलेले कोडे वाचूनही त्याचे उत्तर न समजणे, 'मी कोण होणार' या हुकमी निबंधाचे 'चिमणी' हे उत्तर देऊन सार्‍या वर्गाला निबंध फळ्यावर लिहून दिलेला असणे, असे चालते हे लेखिकाच आपल्याला सांगते.

लेखिकेचे कवी, कवयित्री, गद्यलेखक यांच्याविषयीचे लेख त्यांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करतात. 'लंपनच्या आंतरिक विश्वात... संवेदनाविश्व... भावविश्व आणि विचारविश्व यांना जागा आहे' (पृo २१). हे तिचे निरीक्षण आहे. गाडगीळांच्या खुटमुट्यांच्या चाळीत 'जातीय दंगलीच्या घटनेचा प्रकाश जेव्हा या चाळकरी कारकुनांच्या जगण्यावर पडतो, तेव्हा त्यांच्या रक्तातील अंधार्‍या पेशीसुद्धा दिसू लागतात' असे लेखिकेला वाटते (पृo १४५). 'एकंदर मराठी कविता काळाच्या स्पंदनांशी इमान राखत परंपरेचे सत्त्व पारखून घेत आहे.' हा तिचा निष्कर्ष आहे (पृo १६२). स्त्रीवादी साहित्यात स्वातंत्र्य हे मूल्य महत्त्वाचे बनले; पण 'कशापासून स्वातंत्र्य आणि कशासाठी स्वातंत्र्य याविषयीची भक्कम वैचारिक बैठक सर्वच लेखकांकडे आढळत नाही' असे तिचे निरीक्षण आहे. विंदा करंदीकर हे 'विशेषणात न मावणारे कवी' आहेत तर कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'ने उत्कटतेच्या अंगभूत भरारीचा अनुभव दिला अशी लेखिकेची साक्ष आहे. एकंदरीत हे लेख वाचताना लेखिकेचे मन भावनाशील, उत्कट रसिकाचे आहे हे जाणवते.

परंतु समीक्षापर लेखनाला एवढे पुरेसे नसते. अशा लिखाणातून काही मौलिक असे मुद्दे मांडता येणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे संदर्भांची, वाक्यरचनेची, शब्दयोजनेची अचूकताही अपेक्षित असते. उदाहरणार्थ, पहिल्याच लेखातील 'रे त्या पक्ष्यावर दगड मी' आणि इतर सर्व कवितांच्या कवींची नावे लेखात नाहीत. 'ती जाईची कोमल लतिका' (पृ० ११) च्या २,३,४ या ओळी मात्रांप्रमाणे अचूक लिहिलेल्या नाहीत. 'शाळा' ही कादंबरी संवेदनशीलता आणि मनोविश्र्लेषण या दृष्टीने समीक्षकांनी गौरविलेली कृती आहे. तिच्या समीक्षणात 'मुले घराबाहेर राहतात... त्यांची पावले घराकडे वळावीत अशी घरे घडवणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे' (पृo २७) अशी भूमिका घेणे, 'हा र्‍हासशील काळ आहे.' (पृo २८), 'मुलांना सर्व शिक्षकांविषयी आदरयुक्त प्रेम वाटत नाही' अशी तक्रार करणे (पृo २८) काहीसे बाळबोधपणाचे वाटते. इरावती कर्वे यांच्या 'परिपूर्ती' या लेखात 'स्त्रीसुलभ नात्याचे त्यांना वाटणारे अप्रूप' (पृo ७४) नाही तर इतक्या संपन्न, प्रगल्भ, स्वयंप्रज्ञ आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची ओळख प्रत्येक टप्प्यावर पुरुषांशी असलेल्या नात्याच्या संदर्भातच होते हे इरावतीबाईंनी मांडले आहे. सर्वच समीक्षकांनी एक सुबोध अर्थ घेतल्यावर अखेर आनंद कर्वे यांनी तो खुलासा केला होता.

काही ठिकाणी वाक्यरचना, शब्दयोजना किंवा शब्दांचा क्रम यांमधील सदोषता रसहानी करताना दिसते. लेखिकेची आई खणखणीत स्वरात 'रानात, सांग कानात आपुले नाते' म्हणते; आणि अभावित विनोद घडतो (पृo १०). सर्वांना रसस्नासत होता यावे म्हणून वापरलेले 'शिक्षणाच्या दहीहंडी'चे रूपक (पृo १५) शिक्षकांच्या संख्येच्या प्रमाणात व्यस्त ठरते. 'फुलपाखरू'मधल्या 'मी धरु जाता येई न हाता ' या ओळीत तरलतेला जोडून व्यवहारविमुखता आहे (पृo ४८) हे जरा अतीच वाटते. 'मेंदी'तील इंदिरा संत यांची 'पिळदार अभिव्यक्ती' (पृo ५०) विलक्षण होती म्हणजे काय याचा बोध होत नाही. शान्ता शेळके यांना अत्रे यांच्या सहवासात सहजसोप्या लेखनाचे कानमंत्र (किती?) मिळाले (पृo ६४). (कानमंत्र साधारणपणे एक असतो!) शान्ताबाई आणि बापट यांनी 'काव्यसंग्रह लिहिले!' (पृo ६५, ६९) ते कसे? काही प्रचंड वृक्षांमध्ये (वड, पिंपळ) चाफा (पांढरा, तांबडा) आणि गुलमोहर यांचा समावेश (पृo १०८) कसा होतो? 'प्रेम आणि मरण'मधले झाड एकतर्फी प्रेमाचे की 'मूल्यनिष्ठ जगण्याचे' प्रतीक होते? (पृo १०८). चारित्र्याशी निगडित अशी कोणती मूल्ये ते मानत होते? गौहाटी या शब्दाचा 'सुपारीचा बाजार' हा नवा अर्थ इरावतीबाईंनी शोधलेला नसून (पृo ७४) तो असमिया भाषेत मुळातच आहे. लेखांमधील विवेचनात असे कच्चे दुवे दिसत असल्यामुळे लेखनावर सफाईचा हात फिरला नसल्याचे जाणवते.

काही ठिकाणी वाक्यांच्या रचनेत ढिलेपणा आढळतो. विशेषत: क्रियाविशेषणाची जागा भरकटल्यामुळे वाक्यरचनेचा तोल जातो. उदाहरणार्थ- "जेव्हा आपण हेतुपूर्वक अध्यापनाचा व्यवसाय स्वीकारतो'' (पृo १५), "ग्रंथालयाचा उपयोग अनेक प्रकारे शिक्षणाशी जोडून घ्यायला हवा'' (पृo १५), "या पालक घडवण्याच्या प्रक्रियेला...''(पृo २९), "करंदीकरांच्या अभंगांमध्ये इहवादी वृत्तीचा पीळ जोरकसपणे आहे'' (पृo १५६) अशी त्याची काही उदाहरणे दाखवून देता येतील. काही वाक्ये केवळ वाचली तरी त्यांची सदोष रचना ध्यानात येते. उदाहरणार्थ- "वर्गाला सुरुवातीला एक प्रश्न विचारते.'' (पृo १६), "मुलांचे निसर्गाशी निसर्गत:च एक नाते...'' (पृo ३१), "निसर्गाचे निरागस सौंदर्य'' (पृo ४८), "करंदीकरांनी परंपरेची बलस्थाने नेहमी हेरून'' (पृo ५५), "इ०स० १९४२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'मध्ये... इ०स० १९३२ ते १९४९ दरम्यानच्या कविता समाविष्ट झाल्या आहेत.'' (पृo ६०), "सामाजिक जाणिवेचे नाते... लागलेले आहे.'' (पृo ६१), "रचनेवरील कसब (प्रभुत्व?)'' (पृo ६५), "सानेगुरुजींच्या हरिजनांसाठी मंदिरप्रवेशाच्या प्रवेशदौर्‍यात'' (पृo ६९), "बापटांचे काव्यलेखन आणि काव्यदर्शन'' (पृo ६९), "शिक्षकांचे प्रशिक्षण केले जावे'' (पृo ७८), "त्यांच्या नावावर दोनच छोटेखानी मराठी साहित्यविषयक पुस्तके'' (पृo ८१), "विज्ञानाकडून झालेला अपेक्षाभंग झाला.'' (पृo ८७) "कल्पवृक्ष कन्येसाठीसारख्या काही (म्हणजे किती? ती त्या प्रकारची एकच रचना आहे!) कविता'' (पृo १३२), "द्वेष उफाळून येतो तर नवल नव्हते.'' (पृo १३८), 'झुक झुक झुक झुक आगीन गाडी' ही मामाच्या गावाला नेणारी कविता असताना वि०म० कुलकर्णी यांच्या 'गाडी आली गाडी आली'त तिचा उल्लेख (पृo १००) असावा असे लेखनावरून वाटते. प्रत्यक्षात तो "कोठेही जा, नेऊ तेथे दूरदूरदूर'' असा आहे. इत्यादी लेख पुस्तकात समाविष्ट करण्यापूर्वी त्यांवर संपादकीय संस्करण केले असते तर असे दोष राहिले नसते, असे पुन्हा म्हणावेसे वाटते.

लेखिकेच्या शैलीचा एक विशेष या ठिकाणी सांगावासा वाटतो. लेखिका साधा वर्तमानकाळ किंवा भूतकाळ न वापरता अनाठायी कृदन्तयुक्त रचना वापरते. म्हणजे संस्कार करून जाते (पृo ४३), मोठा प्रभाव पाडून गेली (पृo ४९), जगण्याचे तत्त्वज्ञान सुचवून जातात (पृo ५६), कविता आठवून जातात (पृo ५६), अर्थपूर्ण अनुभव देऊन जातात (पृo ५७), कल्पनाचित्र रेखाटून गेली (पृo ६२), निर्देश होत गेला (पृo ६२), लेखन... दाद मिळवून गेले (पृo ६७), वसंत... आकर्षित करून गेला आहे. (पृo ११३), ईश्वरकल्पना ठसा उमटवून गेली आहे (पृo १५०), बलात्कारातून... बालक... प्रश्नचिन्हे समोर ठेवत जाते (पृo १६४). अशा प्रकारची वाक्यरचना जाताजाता एखादी दुय्यम गोष्ट घडते, त्या वेळी वापरली जाते. साहित्यात काय किंवा समीक्षेत काय असे 'जाताजाता' घडून जाण्यासारखे काही नसते.
एकूण प्राध्यापकी ढंगाचा असलेला हा लेखसंग्रह आपल्या पिढीने साहित्याचे कोणते संचित मिळविले ते सांगतो; मागील पिढीकडून मिळालेल्या ठेव्यात आपल्या वाचनातून महत्त्वाच्या लेखक-कवींचे साहित्य अभ्यासून आपल्याला काय मिळाले यावर प्रकाश टाकतो; आणि हे सर्व आजच्या तरुण पिढीच्या हाती ठेवू पाहातो. त्यात काही सामान्य विषयांसंबंधी असलेल्या कवितांचे/गद्याचे लेख वगळून आणखी काही महत्त्वाच्या लेखकांविषयी लेखिकेने लिहिले असते, तर या पुस्तकाची गुणवत्ता निश्चितच वाढली असती.

सुमन बेलवलकर
F-४४, सुंदरनगरी, ३०८, सोमवार पेठ, पुणे ४१६ ०११. दूरभाष : २६११ १११३

पुस्तक परीक्षणः एक पुस्तक-प्रवासाची कथा

[परीक्षित पुस्तक : 'माझा प्रवास : १८५७च्या बंडाची हकिगत' - विष्णुभट गोडसे वरसईकर. संपादक : मृणालिनी शहा. राजहंस प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे : २३९. किंमत रु. १७५/-]

गोडसे भटजींचे 'माझा प्रवास : १८५७ च्या बंडाची हकिगत' हे पुस्तक प्रथम प्रसिद्ध झाले (१ डिसेंबर १९०७) या घटनेला २००७ मध्ये शंभर वर्षे झाली. तसेच १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यालाही दीडशे वर्षे पूर्ण झाली. हे निमित्त साधून या पुस्तकाची नव्याने संपादित केलेली आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. हे पुस्तक मराठी साहित्यात आजतागायत गाजते आहे, त्याला अनेक कारणे आहेत. पेण तालुक्यातल्या वरसई गावचे विष्णुशास्त्री गोडसे उत्तर हिंदुस्थानात द्रव्य मिळवण्यासाठी जातात आणि १८५७च्या शिपायांच्या बंडात सापडतात; पुढे त्या अनुभवांवर आधारित प्रवासवृत्त लिहितात, ही घटना इतिहासाचे अभ्यासक, साहित्याचे विमर्शक, सुज्ञ वाचक या सर्वांनाच नवलाईची आणि अभ्यसनीय वाटत आलेली आहे.

भारताचार्य चिं०वि० वैद्य यांच्या आग्रहाने गोडसे भटजींनी हे लेखन केले, ते मुळात मोडी लिपीमध्ये. त्याचे बालबोध नागरीमध्ये लिप्यंतर करून पुस्तक म्हणून ते प्रसिद्ध झाले १९०७ मध्ये. पुढे न०र० फाटक यांनी १९४९मध्ये स्वत:च्या प्रस्तावनेसह त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली (चित्रशाळा प्रकाशन). त्यानंतर दत्तो वामन पोतदारांनी 'माझा प्रवास'ची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली (व्हीनस प्रकाशन, पुणे, १९६६, आवृत्ती ८वी २००७). तरीही पुन्हा संपादिका मृणालिनी शहा यांना नव्याने या पुस्तकाचे संपादन करावे असे वाटले; कारण 'शंभर वर्षे एखादे पुस्तक मराठी वाचकांना का आवडावे?' हा प्रश्न त्यांना पडला आणि त्याची उत्तरे शोधताना हे पुस्तक, त्याचे लेखक, त्यांचा गाव यांची चरित्रे लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली, मूळ संहिता पुन्हा सादर करावी असे वाटले; त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या लेखनशैलीचा अभ्यास करणेही त्यांना महत्त्वाचे वाटले.
आपल्या प्रस्तावनेची विभागणी मृणालिनी शहा यांनी विविध उपप्रकरणांमध्ये केली आहे. त्यात त्यांनी सुरुवातच केली आहे ती या पुस्तकाच्या चरित्राने. मूळ मोडीतील हस्तलिखित व नंतर त्याच्या पुस्तकरूपाने सिद्ध झालेल्या आवृत्त्या यांचा कालक्रमानुसार विवेचक आढावा त्यांनी घेतला आहे. त्यात, प्रत्येक आवृत्तीचे वेगळेपण, त्याबाबतची मतमतांतरे, त्यांची परस्परतुलना यांना स्थान दिले आहे. त्यामुळे या पुस्तकाचा आजतागायत झालेला प्रवास वाचकाच्या नजरेसमोर येतो. याच भागात मोडी लिपीची द०वा० पोतदारांनी दिलेली माहितीही संपादिकेने दिली आहे.

'माझा प्रवास' हे लेखन आत्मवृत्त मानावे की प्रवासलेखन मानावे, की इतिहासकथन हा प्रश्न यापूर्वी अनेकांना पडला होता. त्यामुळे या पुस्तकावर जी परीक्षणे वेळोवेळी लिहिली गेली त्यांचा मागोवा संपादिकेने घेतला आहे. हे पुस्तक १९०७ मध्ये प्रसिद्ध झाले असले तरी त्याचे पहिले परीक्षण मे १९४४ मध्ये 'सह्याद्री'च्या अंकात आलेले आहे ही बाब संपादिकेने येथे लक्षात आणून दिलेली आहे. तसेच 'माझा प्रवास' हे प्रवासवर्णनपर लेखनच असल्याचे स्वत:चे मत वाङ्मयीन संकल्पनांच्या आधारे नि:संदिग्धपणे मांडले आहे.

या अनुषंगाने वाङ्मयेतिहासकारांनी या पुस्तकाची घेतलेली अपुरी दखल, त्याचा अभ्यासक्रमात झालेला समावेश यांची चर्चा मृणालिनी शहा करतात. 'माझा प्रवास'- मधील असाधारण जीवनानुभवामुळे थेट १८८४ पासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत ('झाशीची राणी लक्ष्मीबाई' या प्रतिभा रानडे यांच्या २००२ मध्ये आलेल्या पुस्तकापर्यंत) अनेक लेखकांवर या पुस्तकाने प्रभाव गाजवला आहे. तसेच याचे हिंदी भाषांतर अमृतलाल नागर यांनी केले आहे, याचा सविस्तर परामर्श त्यांनी नेटकेपणाने घेतलेला आहे.

गोडसे भटजी यांचे गाव वरसई. संपादिकेने या गावाचे भौगोलिक स्थान व ऐतिहासिक महत्त्व सविस्तर विशद करून गावाचे चरित्रच रेखाटले आहे. त्या पाठोपाठ येते गोडसे कुटुंबाचे चरित्र : घराण्याची ही माहिती त्यांनी गोडसे कुलवृत्तांत, न०र० फाटक यांची प्रस्तावना आणि 'माझा प्रवास' यांच्या आधारे लिहिली आहे.

एकूणच 'माझा प्रवास'चा सर्वांगीण परिचय करून द्यायचा या हेतूने मृणालिनी शहा यांनी या सर्व माहितीचा धांडोळा घेतला आहे. मूळ पुस्तकातच इतिहास, ऐकीव माहिती, प्रवासवर्णन, कौटुंबिक तपशील, समाजदर्शन असे विविध पैलू एकवटलेले असल्यामुळे त्यांचा वेगवेगळा परामर्श घेणे संपादिकेने आपले कर्तव्य मानलेले आहे. या दृष्टीने पाहिले असता या उपप्रकरणांची सांधेजोड करत 'माझा प्रवास'चे एक सलग चित्र वाचकाच्या डोळ्यापुढे उभे राहते. 'सांधेजोड' म्हणण्याचे कारण असे की, वरसई गावाचे चरित्र आणि गोडसे कुटुंबीयांचे चरित्र ही दोन उपप्रकरणे वाङ्मयीन परामर्श घेणार्या भागांच्या शेवटी आली असती तरी चालली असती. पण या निमित्ताने सर्व माहिती एकत्र संकलित झाली हे या पुस्तकाचे फलित आहे.
गोडसे भटजीलिखित संहिता मोडी लिपीत असून ती १९२२ पासून भारत इतिहास संशोधन मंडळाकडे आहे. मंडळासाठी त्याचे लिप्यंतर शंकरराव जोशी यांनी केले. तेच मूळ हस्तलिखित म०म० द०वा० पोतदार यांनी जिज्ञासूंना सादर केले, त्यात कोणतीही काटछाट किंवा गाळसाळ न करता. मृणालिनी शहा यांनी ही पोतदार प्रत स्वीकारलेली नाही, तर भारत इतिहास संशोधन मंडळाकडील मूळ मोडी संहिताप्रत मिळवून नव्याने तिचे लिप्यंतर सुलभा हरके यांच्याकडून करवून घेतले आहे (पृ० ६७ - २०२). मग प्रश्न असा येतो की पोतदार प्रत आणि शहा यांनी करून घेतलेले लिप्यंतर या संहितांमध्ये काही फरक आहे का? वैद्य प्रत, फाटक प्रत आणि राजवाडे प्रत यांची परस्पर तुलना जशी शहा यांनी प्रस्तावनेमध्ये केली आहे तशी, प्रस्तुत प्रतीची तुलना राजवाडे प्रतीशी त्यांनी करणे अपेक्षित होते. त्या दोन्हींमध्ये काही तफावत आहे का, की त्या समरूप आहेत याविषयी त्यांनी मौन बाळगले आहे. मोडीची लेखनपद्धती पाहता - म्हणजे शब्द न तोडता सलग लिहीत जाणे, र्हास्वदीर्घत्व, अनुस्वार क्वचितच देणे, काही शब्दांची संक्षिप्त रूपे करणे, इ० - एकाच संहितेच्या दोन लिप्यंतरांत फरक पडू शकतो. मोडी लिपीमुळे काही शब्द इकडचे तिकडे होतात. (पृ० ६१); "काही शब्द जोडून लिहिल्यामुळे कळत नाही. उदा० पुर्तपणे पूर्णपणे असे शब्दांचे लेखन बरोबर करून घ्यावे लागते... सर्वंानी > सर्वांनी असे वाचावे लागते. वैद्य किंवा पोतदार प्रतीमध्ये सर्वांनी असेच लिहिले आहे." (पृ० ६५) असे शहा म्हणतातच. त्यामुळे नव्या लिप्यंतरात शहा यांनी कोणती दृष्टी, कोणते निकष बाळगले आहेत?

दुसरा मुद्दा इतिहासाचा. गोडसे भटजी द्रव्यार्जनासाठी निघाले ते १८५७ च्या बंडात सापडले. तिथून परत आल्यावर जवळजवळ पंचवीस वर्षांनी त्यांनी त्या आठवणी लिहून काढल्या. त्यामुळे, त्यांत काही ऐतिहासिक तथ्य आहे, काही ऐकीव माहिती आहे आणि प्रवासाच्या मनोरंजक गोष्टीही आहेत. 'जवळजवळ निम्मे पुस्तक इतिहासाने व्यापलेले’ (पृ० ७) असल्यामुळे इतिहासाचे साधन म्हणूनही त्याची चिकित्सा होते. पण संपादिकेने 'आपला इतिहास या विषयाशी प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे इतिहासाच्या दृष्टीने कसलाही अभ्यास या संपादनात नाही’ (पृ० ७) अशी कबुली दिली आहे. वास्तविक १८५७च्या बंडाला १५० वर्षे पुरी झाली हे जमेस धरता या पुस्तकातील ऐतिहासिक वास्तवाची शहानिशा संपादिकेने करायला हवी होती असे वाटते. कारण विविध गॅझेटियर्सही तिने वाचली असावीत असे सूची दर्शविते. संपादिकेने स्वत:ला घालून घेतलेलीही मर्यादा आपण मान्य करू; पण, इतिहासाची दृष्टी बाळगली नाही असे म्हणत असतानाच शहा यांनी वरसई गावाचे, 'माझा प्रवास' या संहितेचे, गोडसे घराण्याचे अशी चरित्रे सादर केली आहेत, तिथे इतिहासाची दृष्टीच बाळगली आहे. हे इतिहास जर इथे येतात तर, प्रत्यक्ष संहितेचा प्राण असलेला इतिहास का दुर्लक्षिला जावा?

या पुस्तकाचा अभ्यास इतिहासकाराच्या दृष्टीतून केलेला नसून भाषाशैलीच्या दृष्टीने केला आहे असे शहा आवर्जून पुन्हापुन्हा सांगतात. "गोडसे भटजींनी वापरलेल्या सहज साध्या शैलीचा अभ्यास या प्रस्तावनेमध्ये आहे." (पृ० ४); "...आणि मुख्य म्हणजे पुस्तकाच्या लेखनशैलीचा अभ्यास केला आहे." (पृ० ७); "भाषाशैलीचा अभ्यास अटळ!" (उपप्रकरण मथळा, पृ० ५८) असे त्या वारंवार म्हणतात. पण प्रत्यक्षात मात्र हे विवेचन भाषाशैली-अभ्यासाच्या दृष्टीने खूपच उणे आणि भाबडे वाटते. गोडसे भटजींच्या भाषेबद्दल बोलताना, 'साध्या वाक्यरचनेचे सौंदर्य’, 'साधीसुधी वाक्ये’, 'मोठी वाक्ये नाहीत किंवा जोड वाक्येही फारशी येत नाहीत’ (पृ० ६२) अशी अत्यंत मोघम विधाने त्या करतात. काही ठिकाणी तर त्यांच्या शैलीविषयक विचारांचा, समजुतींचा गोंधळ त्यांच्या लिहिण्यात प्रतिबिंबित होतो, उदाहरणार्थ,
"'बोली' आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ती भाषा पूर्णपणे बोलीसारखी नसते; पण बोली भाषेची कितीतरी वैशिष्ट्ये तिच्यात आलेली असतात. या लिखित बोलीमध्ये भावनांची अभिव्यक्ती पूर्णपणे होऊ शकते. त्यामुळे या शैलीला कसलेही नाव देता येत नाही, हे खरे." (पृ० ५९)
यातून काय समजायचे? मग यातून सोडवणूक करण्यासाठी संपादिका म्हणते,
"... तरी हे पुस्तक वाचताना जी एक वाचनीयता वाचकांना जाणवते, त्यालाच शैली असे म्हणता येते. नाहीतरी आपले मनोगत व्यक्त व्हावे, यासाठी जी भाषा वापरली जाते तिलाच आपण भाषाशैली म्हणत असतो." (पृ० ५९)
या संदर्भात त्यांनी वापरलेल्या संज्ञाही अचूक नाहीत. "भाषापद्धती किंवा शैली यांचा विचार करताना त्या लेखनाचा शब्दकोश महत्त्वाचा ठरतो." (पृ० ५९) या वाक्यात भाषेचा 'शब्दसाठा' असे शहा यांना म्हणायचे असावे.
वास्तविक शैलीविज्ञानाच्या अंगाने भाषाभ्यास करणार्या(ला 'माझा प्रवास' ही संहिता हा मोठा खजिना आहे. शैलीविज्ञानाशी जुजबी परिचय करून घेतला असता तरी शहा यांना या लेखनाच्या भाषेचे सौंदर्य उलगडून दाखवता आले असते; व वाचकांना त्याचा प्रत्यय देता आला असता. किमान, या गद्यलेखनातील नामपदबंध, क्रियापदे, विशेषण विस्तार, संवादाची लय ओतप्रोत भरलेले गद्य, निवेदकाचा प्रांजळपणा दर्शवणारी त्याची स्वगतवजा वाक्ये इत्यादींच्या आधारे या गद्याचा अभ्यास करायला भरपूर वाव होता. या विश्र्लेषणातून त्यांना अर्थ-व्यापारापर्यंत पोचता आले असते.

या पुस्तकातील काही कठीण शब्दांच्या अर्थाविषयी संपादिकेने काही अंदाज केले आहेत. त्यातील एका शब्दार्थाच्या बाबतीत हा अंदाज धडधडीत चुकलेला दिसतो. तो म्हणजे गोडसे भटजींच्या लेखनात येणारा 'मेखजीन' हा शब्द. या शब्दाच्या अर्थनिर्णयनाविषयी संपादिका शहा म्हणतात,

"'मेखजीन' हा शब्द पाहण्यासारखा आहे. ...काडतुसे शिपायांना धर्मबाह्य वाटत असतात. त्यामुळे शिपाई गुप्त पत्रे रवाना करतात की, 'काडतुसांबाबत प्रत्येकाने आपल्या अधिकार्यांसना सांगावे... त्या त्या छावणीत गोरे असतील ते कापून काढून दारूगोळा, मेखजीन व खजिना गुदात सु ।। आपले ताब्यात घेऊन छावणीस आग लावावी." या वाक्यातील मेखजीन हा सामासिक शब्द आहे. त्या सामासिक शब्दाचा अर्थ लागत नाही. म्हणून मग मेख मोठी खुंटी आणि जीन म्हणजे लक्षणेने घोडा असा अर्थ निघतो (ऐतिहासिक शब्दाकोश - य०न० केळकर) म्हणून मग मेखजीन म्हणजे खुंट्याला बांधलेले घोडे असा अर्थ काढता येतो आणि तो सयुक्तिक वाटतो.’ (पृ० ६१)

'मेखजीन'चा य०न० केळकरांनी लावलेला हा अर्थ संपादिकेने स्वीकारणे निखालस चुकीचे आणि अज्ञानमूलक आहे. कारण मेखजीन हा 'मॅगझीन' (magazine) या इंग्रजी शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण, दारूखाना असा आहे. १८५७च्या बंडाच्या आणि सशस्त्र प्रतिकाराच्या संदर्भात सहज येणारा हा शब्द आहे. त्यामुळे तो सामासिक शब्द समजून त्याच्या अर्थाची अशी ओढाताण करण्याची गरज नव्हती. त्यातून अर्थाचा अनर्थ झाला, ते वेगळेच. एखादी भाषा परभाषेतले शब्द घेते तेव्हा या आदत्त शब्दांचा उच्चातर, घेणार्याझ भाषेच्या उच्चासरण-प्रक्रियेनुसार होतो. इंग्रजीतून मराठीत आलेली तिकिट, मास्तर, माचीस, ठेसन अशी असंख्य उदाहरणे आपल्या परिचयाची आहेत. 'मॅगझीन'चे 'मेखजीन' हे रूप असेच आहे. गोडसे भटजींच्या वृत्तांतील संदर्भातच खरे तर हा अर्थ दडलेला आहे. केळकरांनी लावलेला अर्थ न स्वीकारता संपादिकेने संहितेचेच बारकाईने वाचन केले असते तर तिला हा अर्थ गवसला असता.
संहितेतील जी उदाहरणे आपल्या संपादकीय प्रस्तावनेत शहा देतात, त्यांच्यापुढे त्यांचे पृष्ठक्रमांक त्या देत नाहीत. त्यामुळे ते संदर्भ मुळातून शोधणे व ताडून पाहणे जिकिरीचे होते. शिवाय 'मेखजीन' या संदर्भातली संपादिकेने प्रस्तावनेत उद्धृत केलेली वाक्ये व पुढच्या संहितेतील वाक्ये यांत तफावत आहे. गोडसेभटजींची वाक्ये पुस्तकात अशी आहेत :

'...काळे लोक बेदील होऊन कडामिनीचे बार काढून तोफही सुरू करून दंगा करावयास लागले. ती छावणी लहान. गोरे लोक थोडे होते, ते सर्व त्या पलटणी लोकांनी ठार मारून दारूगोळा, मेखजीन, खजिना, तंबू वगैरे सर्व सामान आपल्या ताबीत घेऊन छावणीस आग लावून बेदिल होऊन सर्व काळे पलटणी निघोन... बाईसाहेबास हाका मारू लागले.’ (पृ० ११२)
(प्रस्तावनेतील अवतरण आणि संहितेतील मजकूर यांच्यात एकवाक्यता नसल्याची आणखीही उदाहरणे आहेत, उदा० पृ० ४९ व पृ० २०१-०२)
या भाषिक अभ्यासात आणखीही बर्या च चुका जाणवल्या. त्यातील आणखी एक उदाहरण पृ० ६० वर मृणालिनी शहा 'बिकीट’ या इंग्रजी पिकेट शब्दाच्या अपभ्रंशाबद्दल म्हणतात,

'पिकेट’ असा उच्चा’र जरी य०न० केळकरांनी लिहिला असला. तरी इंग्रजीमध्ये (Picket) (पिकिट) असा उच्चाटर आहे. ... शिवाय इंग्रजी शब्दारंभी 'प' चा उच्चा.र "ब' किंवा "फ' असा होतो, हे ही येथे आठवले.'' (पृ० ६०)
इंग्रजीत शब्दाच्या आद्यस्थानी येणार्या 'प'चा उच्चाचर "ब' असा कधीच होत नाही. आद्यस्थानी येणार्या [p], [t], [k] या व्यंजनांचा उच्चा‍र महाप्राणयुक्त (ऍस्पिरेटेड) होतो म्हणजे pin, tin, car या शब्दांमधील आद्यस्थानी असलेले व्यंजन महाप्राणयुक्त उच्चाररले जाते. पण याचा 'पिकेट’ > 'बिकट’शी काहीही संबंध नाही.
मोडी लिखिताच्या वैशिष्ट्यांविषयी वाचकांना माहिती देताना मृणालिनी शहा म्हणतात, "...सध्याचे लेखननियम पाळून हे लेखन छापले आहे... मोडी लेखनात अनुस्वार लहरीप्रमाणे देतात किंवा देत नाहीत. काही ठिकाणी उगाच टाक झाडून वाटेल तिथे टिंबे टाकतात... मी या आवृत्तीमध्ये अनुस्वार पदरचे दिले आहेत." (पृ० ६५) पूर्वीच्या लेखनात अनुस्वारांचा अतिरेक होता ही गोष्ट खरी आहे. पण संपादिकेने पूर्ण माहितीच्या अभावी केलेले 'उगाच टाक झाडून’ हे सर्वसाधारण विधान मोडी लेखकांवर अन्याय करणारे आहे. शिवाय, 'सध्याचे लेखननियम पाळून हे लेखन छापले आहे’ असे म्हटल्यावर 'अनुस्वार पदरचे दिले आहेत’ हे विधान चांगलेच खटकते.

एकंदर पुस्तकाच्या निर्मितीत मुद्रणदोषही खूप राहून गेले आहेत. 'प्रायश्चित्त' हा शब्द 'प्रायश्चित्त', 'प्रायश्चित', 'प्रायश्चित्' अशा तीन प्रकारे मुद्रित झाला आहे. 'धु्रव', 'धृ्रव'; 'फलश्रृती', 'फलश्रुती' असे दोन्ही प्रकारे छापलेले आढळते. खेरीज, 'पारंपारिक', 'पुनमुर्दण', 'डोबिंवली', 'व्युप्तन्नता', 'उप्तत्ती', 'अलंकारिकता' ही आणखी काही उदाहरणे. काही ठिकाणी संपादिकेचे वाक्यरचनेकडे दुर्लक्ष झाले आहे, उदाहरणार्थ, "...इत्यादी पुस्तके लिहिले आहे.'' (पृ० ३३); "..आपला नातू मृत्यूने मेल्याचा प्रसंग भोगावा लागतो की काय या शंकेने..." (पृ० ४१). काही शब्दांचे लेखन संहितेत एकप्रकारे तर शब्दार्थसूचीत वेगळ्याप्रकारे आहे. उदा० 'कंटाळी' (१४२), 'कंठाळी' (२१८); 'सलिदा’ (१४२), 'सलीदा’ (२२४), संपादिकेने केलेली काही विधानेही खटकतात. उदाहरणार्थ, 'रामदास हे प्रख्यात पर्यटनपटू आहेत.’ (पृ० ४६) 'या स्थळांना त्यांनी दिलेल्या भेटी या एकजीव होऊन दिलेल्या नाहीत.’ (पृ० ४६)

याच परिच्छेदात पुढे संतसाहित्याबद्दल संपादिकेने केलेले विधान धाडसाचे वाटते, ते असे : 'अशा पद्धतीने प्राचीन साहित्याच्या प्रेरणा धर्मपंथीय असल्यामुळे त्यांनी केलेली प्रवासवर्णनेही धर्मपंथीयच झाली आहेत. शिवाय हे साहित्य पद्यमय आहे आणि मुख्य म्हणजे मुद्रणकलेचा अभाव, या गोष्टींमुळे ते मर्यादित श्रोत्यांपुरते आणि अत्यंत थोडक्या वाचकांपुरते मर्यादित राहिले.’
उलट, भाविक सश्रद्धतेमुळे संतसाहित्याला महाराष्ट्रातच नव्हे; तर भारतभर पूज्य स्थान होते. पारायणे, सप्ताह इत्यादींद्वारे ते फार मोठ्या समाजात पोचले व शेकडो वर्षे टिकून राहिले हे वादातीत सत्य आहे.

भाषेच्या अंगाने लेखनाचा अभ्यास करायचा हा संपादिकेचा संकल्प या पुस्तकातून सिद्धीस गेला नसला तरी अन्य बाबतीत त्यांनी मेहनत घेतलेली जाणवते. 'माझा प्रवास'च्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रतींचा अभ्यास व मूल्यमापन, लेखकाचे चरित्र, त्याच्या प्रवासाचा नकाशा (हा नकाशा वैद्यप्रतीत आहेच!), वाङ्मयीन इतिहासात या पुस्तकाचे स्थान यांचा आढावा घेण्यात त्यांनी कुचराई केलेली नाही. भौगोलिक स्थळे, काही विशेष शब्दांचे अर्थ, संस्कृत ग्रंथ, शब्द, विधी इत्यादींची माहिती, संदर्भसूची इत्यादी परिशिष्टे अभ्यासकाला उपयुक्त ठरतील. ऐतिहासिक सामग्रीचा उपयोग या दृष्टीने करून घेण्यात मृणालिनी शहा यांना यश आले आहे. (मुद्रणदोष वगळता) 'राजहंस'ने पुस्तकनिर्मितीही देखणी केली आहे. आपले उद्दिष्ट या पुस्तकाने एका मर्यादेपर्यंत साध्य केले आहे.
(कंसातील आकडे परीक्षित पुस्तकातील पृष्ठांक आहेत.)

सुप्रिया ६१/१४ एरंडवणे, प्रभात रोड, १४ वी गल्ली
इन्कमटॅक्स ऑफिसजवळ, पुणे ४११ ००४. दूरभाष क्र. ०२० – २५४६ ८६९३

पुस्तक परीक्षणः आधुनिक समीक्षा सिद्धान्त

[परीक्षित पुस्तक : 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त' - मिलिंद मालशे, अशोक जोशी. मौज प्रकाशन, मुंबई. २००७. पृष्ठे ३५२. किंमत रु० २७५/-]

अर्वाचीन मराठी साहित्य समीक्षेमध्ये पाश्चात्य तत्त्वमीमांसा, वादसंकल्पना आणि अनेक संज्ञांचा सढळपणे वापर होत आला आहे. मात्र सन्माननीय अपवाद वगळता, हा वापर नेमकेपणाने, मुळाबरहुकूम, काटेकोरपणे न होता सैलपणे आणि खूपसा बेजबाबदारपणे होत आला आहे आणि त्याला मूलार्थाची प्रतिष्ठाही लाभत आली आहे. असे विपरीत आणि चुकीचे अर्थ प्रस्थापित होऊ नयेत असे वाटत असेल तर अशा लेखनाचे मुळातूनच ज्यांनी व्यवस्थित वाचन केले आहे आणि ज्यांना ते कळले आहे, अशा अभ्यासकांनी मराठीतून त्या त्या विषयावरचे लेखन करायला हवे. इंग्रजी भाषा आणि साहित्यासह पाश्चात्य तत्त्वविचारांचा सखोल अभ्यास आणि ज्ञान असणार्‍या मिलिंद मालशे आणि अशोक जोशी यांनी लिहिलेल्या आणि मुंबई विद्यापीठ व मौज प्रकाशन यांनी संयुक्तरीत्या प्रकाशित केलेल्या 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त', या ग्रंथाचे मोल आणि महत्त्व म्हणूनच लक्षणीय स्वरूपाचे आहे.

प्लेटो/अरिस्टॉटलपासून ते रूसोपर्यंतच्या (१९ व्या शतकापर्यंत) पाश्चात्य साहित्यविचारावर अभिजातवाद आणि स्वच्छंदतावाद यांचा प्रभाव होता. त्या अनुषंगाने साहित्याचा हेतू, आस्वाद आणि निर्मिति-प्रक्रिया, 'अनुकृती सिद्धान्त', 'पुनर्निर्मिती सिद्धान्त' , 'कल्पनाशक्ती', 'काव्यभाषा' अशा सिद्धान्तांचा, संकल्पनांचा समीक्षेत सढळपणे विचार होत होता. पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत या समीक्षेवर 'आधुनिकता'वादाचा प्रभाव राहिला. रूपवाद, प्रतीकवाद, आविष्कारवाद, प्रतिमावाद, वास्तववाद, अतिवास्तववाद, अस्तित्ववाद, फ्रॉईड आणि मार्क्सचे विचार आणि त्यातून निर्माण झालेले मनोविश्लेषण आणि बिंब-प्रतिबिंबवाद, प्रयोगशीलता, कलेची स्वायत्तता, मौलिकता, 'कलेकरिता कला' व्यक्तिवाद, इ० सिद्धान्त, संकल्पना, आणि परिभाषा या प्रभावातून निर्माण झाली. मात्र सर्वसाधारणपणे १९६० नंतर 'उत्तर-आधुनिकता' आणि 'उत्तर-संरचना'वादांचा प्रभाव निर्माण झाला आणि या प्रभावाखाली आजवरच्या अनेक संकल्पनांना आणि गृहीतकांना जबरदस्त धक्के देण्यात आले. या काळातील तत्त्वविचारांच्या केंद्रस्थानी भाषावैज्ञानिक संकल्पनांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले; साहित्य ही स्वायत्त बाब नसून संस्कृतीचा एक आविष्कार आहे, या भूमिकेचा पुरस्कार होऊ लागला आणि साहित्यसमीक्षेचे स्वरूप आंतरविद्याशाखीय बनले. चिन्हात्मकता, विकेंद्रितता, सांस्कृतिक भौतिकवाद, लिंगभेद विचार, अर्थनिर्णयन, संभाषिते, संहितात्मकता, पाया विरोध, विचारतत्त्व विरोध (अँटी-लोगो), सारभूतता-विरोध (अँटी-इसेन्शिऍलिझम), महाकथन-विरोध (अँटी-ग्रॅंडनॅरेटीव्हज्), भेद, बहुतत्त्ववाद, स्त्रीवाद, वाचकवाद नवइतिहासवाद इ० नव्या संकल्पना, संज्ञा आणि त्यांच्या परिभाषा अस्तित्वात आल्या. हे सर्व मराठी समीक्षेला नवे, अपरिचित असल्याने गोंधळात टाकणारे होते आणि अजूनही आहे. मात्र या सार्यामचा वापर आता होऊही लागला आहे. हा वापर नेमकेपणाने होणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त' हा ग्रंथ मार्गदर्शक ठरणारा आहे.

एकूण दहा प्रकरणांतून आस्वाद-समीक्षा-सिद्धान्त, आधुनिकता-उत्तर- आधुनिकता, रूपवाद आणि स्वायत्तता, संरचनावाद आणि चिन्हात्मकता, उत्तर - संरचनावाद आणि विकेंद्रिता, मार्क्सवाद आणि सामाजिकता, मनोविश्लेषण वाद आणि अबोधता, स्त्रीवाद आणि लिंगभेद, वाचकवाद आणि अर्थनिर्णयन, नव-इतिहासवाद, उत्तर-वसाहतवाद आणि संस्कृतिसमीक्षा इ०ची सविस्तर मांडणी, चिकित्सा आणि विवेचन करण्यात आले आहे. विषय-मांडणीचे स्वरूप निव्वळ संकलनात्मक नसून अन्वयार्थक स्वरूपाचे आहे. ग्रंथाच्या शेवटी मराठी/इंग्रजी गं्रथांची/लेखांची संदर्भसूची आणि विषयसूची देण्यात आली आहे. विवेचनात आलेल्या वादांची, संकल्पनांची, तत्त्वांची, संज्ञांची आणि परिभाषांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि तात्त्विक पार्श्वभूमी देण्यात आली आहे. जिथे जिथे मूळ भूमिकेशी मतभेद वा शंका वाटतात, तिथे तिथे तशी नोंद स्पष्टपणे करण्यात आली आहे. एकूण सर्वच विवेचन लेखकद्वयाच्या सखोल अभ्यासाचे, नेमक्या आकलनाचे आणि शास्त्रशुद्ध मांडणीचे दर्शन घडविणारे आहे. समकालीन मराठी समीक्षा त्याच त्याच भूमिकांच्या आणि वादांच्या आवर्तात सापडलेली दिसते. त्यामुळे अनेक समीक्षक अनेक विषयांवर लिहीत असले तरी त्यातून फारसे काही नवीन, मूलभूत स्वरूपाचे आणि म्हणून पुनर्विचार करायला लावणारे हाती लागत नाही; मतमतांचा उथळ खळखळाटच ऐकायला मिळतो. प्रस्तुत ग्रंथामधे आधुनिकोत्तर काळातील ज्या विविध भूमिकांचा ऊहापोह करण्यात आला आहे, त्यांतील वेगवेगळ्या संकल्पनांचे उपयोजन मराठी समीक्षेमधून केले तर या कोंडीतून बाहेर पडून अर्थांच्या नवनवीन खुणा अधारेखित करता येतील; साहित्य संस्कृतीकडे बघण्याची नवी दृष्टी प्राप्त होईल. प्रस्तुत ग्रंथातील विषय बहुसंख्य अभ्यासकांना तसे अपरिचित, गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र स्वरूपाचे असले तरी त्यांचे विवेचन आकलनसुलभ व्हावे अशा पद्धतीने करण्यात आले आहे, हा या ग्रंथाचा खास विशेष होय.

आधुनिक समीक्षा सिद्धांतांमधे रूपवाद आणि मार्क्सवाद यांची कामगिरी महत्त्वाची मानली जाते. साहित्याचा विचार केवळ तथ्यलक्षी आणि वर्णनात्मक करून त्याच्या हेतूवर लक्ष केंद्रित करणार्याआ पारंपरिक विचारातून समीक्षेला बाहेर काढून तिच्या केंद्रस्थानी सौंदर्यविचार आणण्याचे कार्य रूपवादी भूमिकेने केले. त्यासाठी तिने 'कलेची स्वायत्तता' आणि 'वस्तुनिष्ठता', कलेचे रूप आणि अनन्यसाधारणत्व या तत्त्वांचा पुरस्कार केला. रूपवादावरील प्रकरणात यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तात्त्विकविचार, साहित्यविचार, सैद्धांतिक भूमिका आणि उपयोजित समीक्षाविचार यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे, पुढच्या टप्प्यावर रूपवादी भूमिकेचे खंडन 'संरचनावादा'ने केले आणि समीक्षाविचारात नव्या भूमिकांची भर घातली. रूपवादाच्या विरुद्ध टोकावर उभ्या असलेल्या मार्क्सवादाने कलेतील सामाजिकतेचा पुरस्कार केला. प्रस्तुत ग्रंथात मार्क्सवादी साहित्यविचारांची पारंपरिक मांडणी कशी आहे, याची चिकित्सा आली आहेच; पण पुढे या भूमिकेला 'उत्तर-आधुनिकतावादाने' दिलेल्या आव्हानानंतर मार्क्सवादाची पुनर्मांडणी नवमार्क्सवाद्यांनी कशी केली आहे तेही दाखवून देण्यात आले आहे. फ्रॅंकफर्ट प्रणाली, गोल्डमान, फ्रेड्रिक जेमसन, टेरी ईगल्टन, अल्थ्यूजर, नाटककार ब्रेश्ट, ग्राम्ची, इ० विचारवंतांनी मार्क्सवादाचा गाभा कायम ठेवून केलेल्या नव्या-मांडणीची आणि अन्वयार्थांची या ग्रंथातील चिकित्सा - लक्षणीय स्वरूपाची आहे. या विवेचनाच्या शेवटी मराठीतील मार्क्सवादी समीक्षेचा आढावा घेण्यात आला आहे, तो पाहता मराठी मार्क्सवादी समीक्षा मार्क्सवादाच्या पारंपरिक टप्प्यावरच थांबलेली दिसून येते. मार्क्सवाद आता संपला असून मार्क्सवादी समीक्षा आता अनावश्यक आहे, अशी इथल्या प्रतिष्ठित विचारवंतांची आणि समीक्षकांची भूमिका दिसते. मात्र, मार्क्सवादी समीक्षा अजूनही नव्या संदर्भात प्रस्तुत आहे हे पाश्चात्य नवमार्क्सवाद्यांनी दाखवलेल्या चिकित्सेच्या आधारे म्हणता येते. दुर्दैवाने असे प्रयत्ना मराठी समीक्षेत होताना दिसत नाहीत. रूपवादावरील प्रकरणाच्या शेवटीही मराठीतील रूपवादी समीक्षकांचा आणि त्यांच्या लेखनाचा उल्लेख आला आहे; पण तो त्रोटक स्वरूपाचा आहे, तो आणखी सविस्तर यायला हवा होता, म्हणजे मग मराठीतील नवसाहित्याच्या टप्प्यावर आणि नंतरही टेंभा मिरवलेली तथाकथित रूपवादी समीक्षा कशी उथळ आणि फुटकळ स्वरूपाची आहे हे लक्षात आले असते.

संरचनावादाने भाषेला एकूणच तात्त्विक मीमांसांच्या केंद्रस्थानी आणले आणि भाषेचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. फेर्दिनां द सोस्यूरचे भाषाविषयक विवेचन या दृष्टीने पथदर्शक ठरले. भाषाविज्ञानाला अनन्य-साधारण महत्त्व प्राप्त झाले. चिन्हमीमांसा महत्त्वाची ठरू लागली. लेवी स्ट्रॉसने मानववंशशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक संकेत पद्धतींचा अभ्यास करताना, रोलां बार्थने संस्कृतीमधील चिन्हात्मकता तपासताना, लाकाने मनोविश्लेषणात, विशेषत: नेणीवेची रचना तपासताना, फुकोने इतिहास आणि पुरातत्त्वांचा शोध घेताना संरचनावादाचा आधार घेतला. पुढे उत्तर-संरचनावादाच्या टप्प्यावर संरचनावादातील काही तत्त्वे नाकारण्यात आली (उदा० संकेतव्यवस्थेचे सार्वकालिक/सार्वदेशिक स्वरूप, चिन्हीकरणातील अर्थाची स्थिरता, द्विपदी भूमिका, संरचनांतील साम्ये इ०) आणि त्यातून झॅक देरीदाचा 'विरचनावाद' पुढे आला. विरचनावादाने अर्थनिर्णयनातील अनिश्चितता आणि अस्थैर्य दाखवून दिले, ज्ञानकेंद्रित्व, ध्वनिकेंद्रित्व, द्विपदी आकलन नाकारले. उत्तर-संरचनावादी अभ्यासक आणि ल्योतार्द, फुको इ० अन्य विचारवंतांच्या वैचारिक मांडणीतून उत्तर-आधुनिकतावादाची भूमिका साकार झाली. पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये प्लेटोपासून चालत आलेल्या बुद्धीच्या (रीझन) केंद्रवर्ती परंपरेला रूसो, हायडेगर फ्रॉईड आणि मोठ्या प्रमाणात नित्शेने आव्हान दिले होतेच. त्याचा प्रभाव व संस्कार घेऊन उत्तर-आधुनिकतावादाच्या रूपाने हे 'अँटी-रीझन' आव्हान व्यापक प्रमाणात प्रकट झाले. प्रस्तुत ग्रंथातील यासंबंधीचे विवेचन अत्यंत महत्त्वाचे आणि गाभ्याचे आहे. उत्तर-आधुनिकतावादाच्या पर्यावरणातून उत्तर-वसाहतवाद, स्त्रीवाद, नवइतिहासवाद, वाचकवाद आणि संस्कृतिवाद अशा नव्या संकल्पना पुढे आल्या; त्यांचेही सविस्तर विवेचन प्रस्तुत ग्रंथात नेमकेपणाने करण्यात आले आहे. उत्तर-आधुनिकतावादाने युरोपच्या इतिहासातील 'नवजीवनाच्या' (रनेसां) कालखंडापासून ते मार्क्सवादापर्यंतच्या मानवकल्याणाच्या 'प्रगती', 'बुद्धिवाद', 'आशावाद', 'वैज्ञानिक सत्य', 'मानवतावाद', 'विज्ञानाची वस्तुनिष्ठता व तटस्थता', 'महाकथने', 'इतिहासाची सलगता', 'सौंदर्यशास्त्र', 'नैतिकता' अशा अनेक संकल्पना नाकारल्या, आणि काळाच्या ओघातले त्यांचे वैयर्थ्य दाखवण्याचा प्रयत्नव केला, यासंबंधीचे विवेचनही या ग्रंथात आले आहे. उत्तर-आधुनिकतावादाने 'आधुनिकता'वाद नाकारला, त्याचे खंडन हाबरमासने केले आहे आणि 'आधुनिकता' हा महाप्रकल्प अद्यापही अपुरा असून तो अजूनही नव्या काळात महत्त्वाचा आहे असे म्हटले आहे. जेमसने उत्तर-आधुनिकतावाद हा तिसर्या टप्प्यावरील भांडवलशाहीचा सांस्कृतिक आवरणातून प्रकट होणारा आविष्कार असून 'बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या' सोयीचे तत्त्वज्ञान आहे असे म्हटले आहे. हे दोन्ही संदर्भ या ग्रंथात आले आहेत, मात्र टेरी ईगल्टनने जेमसनच्या प्रसिद्ध लेखाला प्रतिसाद म्हणून १९८५ साली 'न्यू लेफ्ट रिव्ह्यू'मधून प्रकाशित केलेल्या 'कॅपिटॅलिझम, मॉडर्नर्निझम अँड पोस्टमॉडर्नर्निझम' या लेखाचा संदर्भ या ग्रंथात आलेला नाही, तो आवश्यक वाटतो; कारण त्यामधून ईगल्टनने जेमसनपेक्षाही वेगळ्या परिप्रेक्ष्यात आणि ठामपणे विरोध नोंदवला आहे. उत्तर-आधुनिकतावादाची स्थापत्यशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि चित्रपट इ० महत्त्वाच्या क्षेत्रांसंबंधी जी वेगळी भूमिका आहे, आणि तिचे त्या त्या क्षेत्रातले जे आधार आणि संदर्भ आहेत, त्यांचे विवेचन या ग्रंथात नाही. तसेच, 'विचारसरणीचा अंत' (दि एण्ड ऑफ आयडियॉलॉजि), 'मानवाचा अंत' (दि एण्ड ऑफ मॅन), 'इतिहासाचा अंत' (दि एण्ड ऑफ हिस्ट्री), 'वास्तवाचा अंत' (दि एण्ड ऑफ द रियल) अशा ज्या कांही नव्या संकल्पना उत्तर-आधुनिकतावादाने पुढे आणल्या आहेत, त्यांचेही विवेचन या ग्रंथात आलेले नाही. मुख्य म्हणजे, उत्तर-आधुनिकतावादाच्या सर्जनशील निर्मितीसंबंधी (कॉन्सेप्ट ऑफ क्रिएशनसंबंधी) प्रस्थापित विचारापेक्षा संपूर्णपणे वेगळा असा विचार आहे, तो या ग्रंथात आलेला नाही. डलझ (Deleuze) आणि गोत्री (Guattari) यांनी 'अ थाउजंड प्लॅट्व्ज'मधून ह्या विचारांचे विवेचन केले आहे. प्लेटोपासून चालत आलेल्या ज्ञानवृक्षाला त्यांनी वृक्षसमान नमुना (आर्बरेसंट मॉडेल) असे म्हटले असून हा वृक्ष, त्याच्या फांद्या आणि मुळांसह आपल्या डोक्यातून आपण प्रथम काढून टाकायला हवा, म्हणजे निर्मितीची नवी संकल्पना रुजवता येईल असे त्यांना ठामपणे वाटते. 'झाडा'च्या ऐवजी हा पर्याय ते रिझोमे (रिझोमे : गवतासारखी कुठलीही वनस्पती)च्या रूपात विशद करतात. झाडाचे वेगवेगळे भाग दाखवता येतात, रिझोमे- सारख्या वनस्पतीची आतली मुळे आणि वरचा विस्तार सुटा सुटा न वाढता एकमेकांत मिसळून क्षितिज समांतर रूपात विस्तीर्णपणे पसरत असतात. त्यांचे सहअस्तित्व गुण्यागोविंदाचे असते. निर्मिती ही अशाच प्रकारे होत असते, असे त्यांना सांगायचे आहे. 'आंतर-संहिता संबंध' किंवा 'लेखकाचा अंत'सारख्या संकल्पनांचा उत्तर-आधुनिकतावादामधे जो विचार आहे, तो या निर्मिति-प्रक्रियेच्या संकल्पनेशी निगडित आहे. निर्मितीप्रमाणेच 'वाचनाचे राजकारण' असते असे ही वादसंकल्पना मानते, त्याचाही विचार प्रस्तुत ग्रंथात करण्यात आलेला नाही. त्या त्या काळामधे साहित्य कशाला म्हणायचे? साहित्यातील श्रेष्ठ-कनिष्ठ कसे ठरवायचे? यासंबंधीचे जे मापदंड (कॅनन्स) कार्यरत असतात, ते निर्माण कोण करते? त्यामागे कशा प्रकारचे 'राजकारण' असते? कुणाच्या सोयीसाठी ते निर्माण करण्यात येते? त्यासाठी कशी 'व्यूहरचना' वैचारिक/सांस्कृतिक क्षेत्रामधे निर्माण केली जाते? अशा काही महत्त्वाच्या प्रश्र्नांकडे ही नवी समीक्षा आपले लक्ष वेधते. या अनुषंगाने 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट' ही संकल्पना कशी पद्धतशीरपणे राबवली जाते हे लक्षात घ्यावे लागते. प्रस्तुत ग्रंथात या संबंधीचे विवेचन आलेले नाही; ते आवश्यक होते असे वाटते.

पारंपरिक विचारसरणीमध्ये साहित्य आणि समीक्षा ही मूलत:च भिन्न क्षेत्रे मानण्यात आली आहेत. या अतिनव समीक्षासिद्धांतांमध्ये त्यांच्यामधे भेद न मानता त्यांना समान दर्जाचे मानले आहे आणि त्यामुळे दोन्हीसाठीही 'संहिता' हा शब्दप्रयोग केला आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या कर्त्यांना ही भूमिका मान्य नाही, मात्र ती 'समजून घेण्याचा' प्रयत्नय त्यांनी केला आहे.

या ग्रंथाच्या सुरवातीला 'आस्वाद, समीक्षा आणि सिद्धान्त' हे प्रकरण देण्यात आले आहे. सर्वसाधारणत: कला-आस्वादामधे 'भावना’ आणि 'विचार' यांना प्रतिद्वंद्वी मानून आस्वादाचा संबंध भावनेशी जोडण्यात येतो. आस्वाद प्रक्रिया अंत:स्फूर्त असते असेही मानण्यात येते. या ग्रंथामधे आस्वादप्रक्रियेतही विचार, संकल्पना, निकष आणि सिद्धांत कसे कार्यरत असतात हे सविस्तरपणे दाखवून दिले आहे. मूल्यमापन हे 'यादृच्छिक' असू नये आणि त्यासाठी निश्चित निकषांची गरज अपरिहार्य आहे असे मानण्याकडे लेखकद्वयाचा कल आहे आणि उत्तर-आधुनिकतावादी समीक्षा-सिद्धान्त मात्र 'यादृच्छिकता' मानणारे आहेत. त्यामुळे ग्रंथाच्या सुरवातीच्या प्रकरणाप्रमाणेच, या नव्या सिद्धांतांची चिकित्सा केल्यानंतर, ग्रंथाच्या शेवटी एका स्वतंत्र प्रकरणातून, एकूणच या समीक्षा-सिद्धांतांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांसंबंधी लेखकद्वयांची भूमिका स्पष्टपणे आणि सविस्तरपणे यायला हवी होती, असे वाटते.

५८/५९, पार्श्वनाथनगर, सांगली-मिरज रस्ता, मु०पो० वानलेसवाडी, मिरज ४१६ ४१४.
दूरभाष : ०२३३ – २२१ २७२० / ९४२२० ४१३१२