अपूर्ण कविता
अपूर्ण कविता एकटक पाहत राहतात शेवटच्या ओळीनंतर
कागदावर उरलेल्या मोकळ्या जागेकडं
त्यांना आशा असते की कधी ना कधी तरी त्या पूर्ण केल्या जातील
कुठं ना कुठं एखाद्या कवितेमध्ये उपयोगात येतील त्यांच्या ओळी
कित्येक दिवसांपर्यंत त्या अधून-मधून आपली दारं वाजवतात
जणू आठवून देतात की आम्ही इथंच आहोत बरं का आसपास!
आणि कित्येकदा ईर्षेमुळं नवीन कवितांच्या येण्याला सुद्धा थोपवून धरतात
एखादी नवीन ओळ येऊ-येऊ म्हणते
इतक्यात तिला जोरानं धक्का देत येते कुठलीतरी विसरलेली अपूर्ण कविता
अपूर्ण कविता कुरणात हरवलेल्या गायी आहेत ज्या रस्ता शोधत एक दिवस
परत येतात आणि बंद दारापुढं हंबरत राहतात
त्या आपल्या आसपास भटकणारे अतृप्त आत्मे आहेत
पण सारखं असंच होतं असं नाही
कधी कधी त्या निमूटपणे पडलेल्या असतात एखाद्या कागदाच्या कोपर्यात
कित्येक दिवस, कित्येक महिने आणि कधी-कधीतर आयुष्यभर
त्या आपल्या विस्मृतीच्या पडद्याआड कुठंतरी लपून बसतात
अनेकदा असं होतं की सारखं सारखं बोलवावं लागतं त्यांना
आणि तरीसुद्धा त्या येत नाहीत
अपूर्ण असल्याची जाणीव किंवा अपूर्णतेची घमेंड
त्यांना इतकं हट्टी बनवते
की त्या आपल्या जागेवरून हूं का चूं करत नाहीत
त्या काही बोलत नाहीत पण काहीतरी सांगताहेत असं वाटतं
आम्ही अपूर्णच ठीक आहोत
अशी कुठली कविता आहे जी पूर्णपणे अवतरली आहे धरतीवर
काहीतरी करून काही जोडून काही तोडून त्या पूर्ण होतात किंवा
पूर्ण केल्यासारख्या केल्या जातात कविता
तसं पाहिलं तर जगात अपूर्ण कवितांचीच संख्या जास्त आहे
पूर्ण कवितेत सुद्धा कुठं ना कुठंतरी राहिलेलीच असते एक अपूर्णता
प्रत्येकाला लिहायची असते एक पूर्ण कविता
दुसर्या कवीला दुसर्या पद्धतीनं
पण गंमत अशी आहे की असं केल्यानं पहिला कवीही समाधानी होत नाही आणि दुसराही नाही
प्रत्येक कवीला नेहमीच वाटतं की कवितेत कुठंतरी काहीतरी राहून गेलंय
जे असायला पाहिजे होतं... असू शकत होतं...!