मराठीचे लेखनसंकेत
आपली सध्याची शुद्धलेखनाविषयीची जी चर्चा चालू आहे ती प्रामुख्याने शब्दलेखनचर्चा आहे. गेल्या शंभर वर्षांतली चर्चासुद्धा प्रामुख्याने शब्दलेखनाचीच चर्चा आहे. हल्ली शुद्धलेखनकोश तयार केले जात आहेत; पण ते नेहमी अपूर्णच राहणार आहेत. मराठीसारख्या समृद्ध भाषेची एकूण शब्दसंख्या आज सहज दोनअडीच लाखांच्या घरात जाईल. आणि या शुद्धलेखनकोशांत जास्तीत जास्त वीसएक हजार शब्द आतापर्यंत आले आहेत. त्या कोशांपेक्षा बृहत्कोशातच शब्दांचे शुद्ध रूप का पाहू नये? अलीकडे तर शब्दांच्या विकृतीसुद्धा शब्दकोशात दाखवल्या जात आहेत. त्यामुळे शुद्धशब्दलेखनकोशांची गरजच आता खरे तर राहिलेली नाही.
दुसरे असे की, शुद्धलेखनचर्चेत फक्त शब्दांच्याच लेखनाबद्दल चर्चा असते. त्यातही ती चर्चा र्हतस्व दीर्घ ‘उ' आणि ‘इ' आणि अनुच्चाशरित अनुस्वार एवढ्यापुरतीच मर्यादित असते. पण त्यापेक्षा शुद्धलेखनाची चर्चा अधिक व्यापक स्वरूपात झाली पाहिजे. त्यामध्ये अक्षरलेखन, शब्दलेखनाचे संकेत, विकृत शब्दांचे लेखन, व्याकरणाला मान्य असलेली वाक्यरचना, शब्दांचे अर्थ व त्यांचे अचूक प्रयोग, लेखनाच्या विविध शैली इ० सर्व मुद्द्यांचा विचार झाला पाहिजे.
‘शुद्धलेखना'साठी ‘लेखननियम' असाही एक पर्याय सुचवण्यात आला आहे. मला ‘नियम' शब्द वापरावासा वाटत नाही. त्याला आदेशात्मक अर्थ आहे. त्याऐवजी ‘लेखनसंकेत' असा पर्याय मी सुचवू इच्छितो. तसे केल्याने शुद्धलेखनाचे सामाजिक अंग स्पष्ट होते. संकेत हे सर्व समाजाने स्वीकारलेले असतात आणि एकदा स्वीकारल्यानंतर ते पाळण्याचे बंधन आपोआपच त्या त्या समाजघटकांवर येते.
हे संकेत समाजमान्य असावे लागतात. त्यात कोणी एखादी दुसरी व्यक्ती बदल करू शकत नाही. पीटर बिक्सेल या जर्मन लेखकाच्या ‘ein Tisch ist ein Tisch' (‘टेबल म्हणजे टेबल') या कथेचा श्रीमती वर्षा क्षीरसागर यांनी केलेला अनुवाद ‘भाषा आणि जीवन'च्या दुसर्या वर्षाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. आपल्या मनाने सर्व भाषायंत्रणेत बदल करून तो वापरू पाहणार्या' एका म्हातार्या ची शोकांतिका त्या कथेत मोठ्या परिणामकारकतेने सांगितली आहे. सामाजिक संकेत सर्व समाजाने निर्माण केलेले असतात. ते समाजाच्या संमतीनेच बदलता येतात. शुद्धलेखनाच्या बाबतीत शब्दान्ती र्हास्व इकार, उकार दीर्घ करण्याचा संकेत आपण समाजाच्या मान्यतेनेच निर्माण केला. अनुच्चाारित अनुस्वार असेच काढून टाकले. समाजाच्या मागणीचा रेटा वाढताच समासान्तर्गत घटकातील र्हयस्वान्त इकार, उकार आपल्याला काढावेच लागतील. पण असे संकेत अजिबात नसावेत अशी मागणी अराजक निर्माण करणारी ठरेल.
आपण जसे बोलतो तसेच लिहिले पाहिजे अशी मागणी सध्या केली जात आहे. वस्तुत: बोली-स्वरूपात असलेल्या भाषेच्या लेखनात आपण तसेच लिहितो आहोत. बोलीसाठी लेखनसंकेतांचा आग्रह धरलाच जात नाही, पण प्रमाण भाषेच्या संदर्भात मात्र तसा आग्रह धरला पाहिजे. कारण बोली आणि प्रमाणभाषा यांत मूलत:च फरक आहे. प्रमाणभाषा वापरण्याची क्षेत्रं आणि बोली वापरण्याची क्षेत्रं यात खूप फरक आहे. आपण बोलीभाषेचा वापर अनौपचारिक संभाषणात करतो. आपलं कुटुंब अथवा परिवार यांच्यापुरताच हा अनौपचारिक भाषा व्यवहार मर्यादित असतो. पण प्रमाणभाषा ही प्रामुख्याने लिखित भाषा असते. आपण त्या भाषेत सहसा बोलत नाही. औपचारिक बोलण्यात ती येते. अध्यापन क्षेत्र, न्यायालयीन व्यवहार, कार्यालयीन व्यवहार, वैचारिक लेखन, वृत्तपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी यांवरील निवेदने, पाठ्यपुस्तके, सर्व विषयांवरील गंभीर लेखन या सर्व ठिकाणी आपल्याला औपचारिक भाषेतच लिहावे लागते. बोली- वापराच्या क्षेत्रापेक्षा या लिखित औपचारिक क्षेत्राची व्याप्ती कितीतरी अधिक आहे. म्हणून बोलींना मर्यादित संज्ञापनाची भाषा असे म्हणतात. तर प्रमाणभाषेला व्यापक अथवा विस्तारित संज्ञापनाची भाषा असे म्हणतात. भाषेच्या या दोन अंगांची सरमिसळ आपण करता कामा नये.
शुद्धलेखनाच्या चर्चांमध्ये अभिनिवेशाने बर्या च वेळा अशी गल्लत होत असते.
कोणत्याही एका भाषेच्या क्षेत्रात जेवढे म्हणून सामाजिक गट निर्माण होतात त्या प्रत्येक गटाची एकेक बोली निर्माण होत असते. जात, धर्म, लिंग, वय, शिक्षण, व्यवसाय, इ० अनेक कारणांनी हे गट निर्माण होतात. त्या गटांच्या बोलींना आपण सामाजिक बोली म्हणतो. त्या भाषेच्या विस्तारानुसार तिच्यात प्रादेशिक भेद निर्माण होतात. त्यांना आपण भौगोलिक अथवा प्रादेशिक म्हणून संबोधतो. या अनेक बोली परस्पर संपर्काच्या प्रमाणानुसार कमीअधिक आकलनक्षम असतात. संपर्क जेवढा अधिक तेवढे दोन बोलींतील अंतर कमी आणि संपर्क जसजसा कमी होत जातो तसतसे हे अंतर वाढत जाते. काही बोली तर दुर्बोध होत जातात. पण प्रमाणभाषेचे तसे नाही. ती या सर्व बोलींशी समान अंतर ठेवून असते. त्यामुळे तिच्यातील लेखन त्या समग्र भाषाक्षेत्राला आकलनक्षम असते. पाठ्यपुस्तके, प्रसारमाध्यमे, न्यायालये, अध्यापनकेंद्रे या सर्व ठिकाणची भाषा सर्वत्र सारखीच असते, असावी लागते. तिच्या बाबतीत सवता-सुभा निर्माण करता येत नाही.
प्रमाणभाषा ही लिखित स्वरूपात जास्त करून असते. बोली या प्रत्यक्षात अनौपचारिक क्षेत्रात बोलल्या जातात. लिखित भाषा आणि बोली यांच्या स्वरूपातच त्यामुळे फरक निर्माण होतो. बोलीतील शब्दसंग्रह आणि प्रमाण भाषेतील संग्रह यात फरक पडतो. व्याकरणाच्या बाबतीतही फरक पडतो. उदा० तो जातो. तो जात आहे. या दोन्हींचा नकार लिखित भाषेत ‘तो जात नाही' असाच करतात. पण बोलीत मात्र दुसर्यान वाक्याचा नकार ‘तो जात नाहीए' असा होतो. ‘मी जात असे' या रचनेची संपूर्ण रूपावली बोली भाषेत सांगता येत नाही. पण लिखित भाषेत ती सांगता येत असे. आणखी बरेच व्याकरणभेद सांगता येतील. अर्थक्षेत्रही भिन्न होते. आपण बोलीत पल्लेदार वाक्ये वापरू शकत नाही. लिखित भाषेत ती चालू शकतात. सामासिक शब्दांचे प्रमाणही बोलीत कमी असते. आलंकारिक बोलणे बोलीत जास्त प्रमाणात चालत नाही. कायद्याची भाषा तर अगदी काटेतोल असते. सामान्य व्यवहारातील ढिसाळ शब्द तेथे चालत नाहीत. नेमका अर्थ सांगणार्याभ पारिभाषिक शब्दांचीच तेथे आवश्यकता भासते. मराठीत ‘गहाण टाकणे' असे आपण म्हणतो. पण न्यायालयात तेवढ्याने भागत नाही. तेथे हॅपॉथिकेट (Hypothicate), प्लेज (pledge), मॉर्गेज (mortgage) इ० पर्यायांतून निवड करावी लागते. हेच शास्त्रीय लेखनातही अपेक्षित आहे. नेमका अर्थ सांगणारी परिभाषाच तेथे वापरली जाते. या कारणांमुळे प्रमाणभाषा बोलीपेक्षा मूलत:च वेगळी असते.
म्हणून प्रमाणभाषेच्या लेखनपद्धतीत फार मोठी ढवळाढवळ करून चालत नाही. समजा, बोलीत श, ष असा भेद आढळत नाही या कारणाने आपण ‘ष' हे अक्षर काढून टाकले तर नवीन पिढीला प्राचीन वाङ्मय वाचताना अडचण येईल. आजच ङ् आणि ञ ही अक्षरे शिक्षणातून वगळली गेली असल्यामुळे ‘ङ्' या अक्षराचे ‘ड' असं वाचन करणारी अनेक मुलं भेटतात. ‘वाङ्मय'चा उच्चावर ‘वाडमय' असा करणारे अनेक विद्यार्थी मला भेटलेले आहेत. दीर्घ ‘रू' आणि र्हरस्व ‘रु' यातील भेद अनेक मुलांना माहीत नसतो. टंकयंत्रात पूर्वी तो नव्हता, त्याचा हा परिणाम असावा.
अलीकडे तर अक्षरे लिहिण्याची पद्धतही शुद्धलेखनात समाविष्ट करावी अशी गरज मला वाटते आहे. विशिष्ट अक्षरे विशिष्ट क्रमानेच लिहिली पाहिजेत. त्या अक्षराच्या लेखनातील टप्पेच विद्यार्थ्यांना माहीत नसतात. अक्षरांची उंची, त्यांचे टप्पे यासगळ्यांचे शिक्षण देणारे कित्ते आज बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनात आणि त्या अनुषंगाने वाचनातही दोष निर्माण झाले आहेत. ‘स्त्री' हा शब्द ‘स्री' असा लिहिला जातो. ‘स्रीमुक्ती' असा उच्चाेर अनेक वेळा ऐकायला मिळतो. ‘सहस्त्र', ‘स्त्रोत', असे चुकीचे उच्चा र व लेखन मोठमोठे विद्वानही करताना आढळतात. ‘बुद्धी, युक्ती, द्वार, आप्त' यांच्याही लेखनात चुकीचा क्रम वापरला जात आहे. जोडाक्षरे लिहिण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार वापरण्यात येणारी आगगाडी-पद्धतही चुकीची वाटते. त्यामुळे जुने ग्रंथ वाचणे तर कठीण होऊन जाते आणि लेखनसौष्ठवही नाहीसे होते.
संस्कृताचे शिक्षणातून उच्चाथटन झाल्यामुळे शुद्धलेखनात चुका होतात अशा तक्रारीत थोडेफार तथ्य असेलही. पण ५०-६० वर्षांपूर्वी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसणारे विद्यार्थी, ‘व्हर्नाक्युलर फायनल' परीक्षा देणारे विद्यार्थी कुठे संस्कृत शिकले होते? पण त्यांचे शुद्धलेखन निर्दोष असे. कारण प्राथमिक शाळांतून शुद्धलेखन हा शिक्षकांच्या आस्थेचा विषय होता. तसा तो आता राहिलेला नाही. शुद्धलेखनाच्या दुरवस्थेचे तेच एक मुख्य कारण आहे.
आणखी एक मुद्दा इथे स्पष्ट करावासा वाटतो. आपण बोलतो तसे लिहिता आले पाहिजे, अशी काही लोकांची मागणी असते. पण ती अवास्तव आहे. जगात अनेक भाषांना लेखनपद्धती आहेत. पण बोलतो तसे लिहिण्याची व्यवस्था असलेली एकही नैसर्गिक भाषा अस्तित्वात नाही. याचे कारण बोली स्वरूपातील भाषेच्या परिवर्तनाचा वेग आणि लिखित स्वरूपाच्या भाषेतील परिवर्तनाचा वेग यात मूलत:च फरक आहे. लिखित भाषा कमी वेगाने बदलते. त्यामुळे बोली प्रमाणे लेखन असे सूत्र कितीही अंमलात आणायचे ठरवले तरी हे अंतर पडणारच. याच कारणामुळे भाषेत ‘स्पेलिंग' निर्माण होते. स्पेलिंग म्हणजेच लेखनसंकेत होय. आपण ‘तुमचा' असे लिहितो. प्रत्यक्ष उच्चातर मात्र ‘तुम्चा' असा करतो. ‘अ'कारान्त शब्द लिहिण्यासाठी अनुस्वाराचा वापर, च, च यांच्यासाठी एकाच अक्षराचा वापर आपण सर्रास करतो. याचाच अर्थ मराठीतही स्पेलिंग असते. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची असते. ‘ऋषी' शब्दाचा उच्चा र कसाही करा पण लेखन मात्र तसेच केले पाहिजे.
कल्याण काळे
ए-५, प्रज्ञानगड, नवश्या मारुती गल्ली, वीटभट्टी, सिंहगड रस्ता, पुणे ४११ ०३०.
दूरभाष ०२० २४२५३१३६