पानपूरके

पानपूरके

भाषा प्रयोगातील दोन प्रवृत्ती
भाषाशक्तीचा आविष्कार भाषा प्रयोगात होतो तेव्हा त्यात दोन प्रवृत्ती दिसून येतात. एक प्रवृत्ती असते ती समाजजीवनातील निरनिराळी रूपे आणि अनेक विभाजने यांच्यामुळे भाषाव्यवस्थेत येणार्‍या विविधतेची, विकेंद्रीकरण होण्याची, भाषाप्रयोगात जीविकागत, प्रदेशगत आणि पिढीगत भेद निर्माण होण्याची आणि भाषांची विविधता कायम राहण्याची. याउलट दुसरी प्रवृत्ती आहे ती परिष्करणाची, प्रमाणीकरणाची, स्थिरीकरणाची, एकरूपतेची. विविध प्रकारच्या जीविका, प्रदेश, पिढ्या जोडण्याची प्रेरणा, प्रबळ केंद्र निर्माण करण्याची प्रेरणा येथे सक्रिय होताना दिसते.

शैली आणि तंत्र
‘शैली आणि तंत्र’ या पारंपारिक भारतीय साहित्यविचारातल्या संज्ञा नाहीत. त्या अनुक्रमे ‘स्टाईल’ आणि ‘टेक्नीक’ या इंग्लिश संज्ञांना पर्याय म्हणून मराठीत स्थिर झाल्या आहेत..... संस्कृतमध्ये ‘शील’ म्हणजे अनुशासनयुक्त संस्कारित अवस्था. माझ्या समजुतीप्रमाणे जनार्दन सखाराम गाडगीळ यांनी ‘शैली’ हा शब्द मराठीत प्रथम (कदाचित भारतीय भाषांत प्रथम) ‘स्टाईल’ या शब्दाला पर्याय म्हणून वापरला. (‘‘लिहिण्याची शैली’’ मराठी ज्ञानप्रसारक, एप्रिल,मे १८६३) ज्यामुळे कर्त्याचे शील प्रकट होते ती ‘शैली’ असा काही विचार ‘शैली’ शब्दाची निवड करण्यामागे असावा. साहित्यचर्चेत ‘टेक्नीक’ शब्द (आणि त्यामुळे ‘तंत्र’ शब्दही) बर्‍याच उशिरा शिरला. त्यापूर्वी ‘क्राफ्ट’ ह्या शब्दावर भागत असे. (मराठीतही ‘कुसर’ किंवा ‘कारागिरी’ हे शब्द वापरतात.) मराठी साहित्य चर्चेत ‘तंत्र’ शब्द प्रथम कुणी वापरला आणि ‘मंत्र’ शब्दाशी त्याची सांगड कुणी घातली याचाही शोध घ्यायला पाहिजे. (संस्कृतमध्ये तांत्रिक विद्येच्या संबंधात मंत्र, तंत्र, यंत्र असे एक त्रिक आहे; सुदैवाने मराठी साहित्य चर्चेत कुणी ‘यंत्र’ शब्द आणलेला नाही!) ‘टेक्नीक’ या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ ‘विशिष्ट काम साधण्याची विशिष्ट पद्धत’ ... ‘स्टाईल’ आणि ‘टेक्नीक’ हे शब्द इंग्लिशमध्ये साहित्याखेरीज इतर ललित कलांच्या संबंधातही वापरतात. (‘शैली’ आणि ‘तंत्र’ शब्दांच्या बाबतीत मराठीतही आता थोड्या उशिरा तेच घडते आहे.)
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ५0

काव्य, नाटय आणि नृत्य
‘नट’ ही संज्ञा सर्वच रंगकर्मींना लागू करण्यात येत असे- नाट्यातील आणि नृत्यातील रंगकर्मींना, नटेश्वर म्हणजे शंकर हे जसे नाटय-रंगकर्मींचे दैवत तसेच नृत्य-रंगकर्मींचे दैवत.
‘नृत्य’ ही संज्ञा भरताने व्यापक अर्थाने सर्वच नर्तनाला लावली आहे. केवळ नर्तन म्हणजे ‘नृत्त’ आणि सभिनय नर्तन म्हणजे ‘नृत्य’ हा फरक नंतरचा. मात्र आजही आपण ‘नृत्य’ ही संज्ञा मूळच्या व्यापक अर्थाने पुष्कळदा वापरतो. हा घोटाळा टाळण्यासाठी साभिनय नर्तनासाठी आपण काव्यनृत्य ही संज्ञा वापरू.
काव्याचे आपण भावकाव्य, कथनकाव्य, आणि नाटयकाव्य असे उपप्रकार मानले आहोत. ते उपप्रकार काव्यनृत्यालाही लागू पडतात असे दिसते.
भावनृत्य हाही वर्तमानकेंद्री स्वसंवाद असतो. कथक किंवा भरतनाटयम् शैलीमधील एकल काव्यनृत्य पुष्कळदा भावनृत्य स्वरूपाचे असते, एक भावस्थिती पकडून तिचा निरनिराळ्या अंगांनी विस्तार करणे हे अशा नृत्याचे कार्य राहते. सोबत भावकवित्व असेल वा नसेलही.
कथकनृत्य हा भूतकेंद्री अन्यसंवाद असतो. यक्षगान किंवा ‘कथा कहे सो कथक’ या मूळ प्रकृतीच्या जवळ राहणारे कथक या स्वरूपाचे असते. नृत्याला जोडून येणारे कथनगीत हे त्याला अंगभूत असते.
नाटयनृत्य हा भविष्यकेंद्री अन्योन्यसंवाद असतो. वगावर आधारलेले लावणीनृत्य किंव अभिजात भारतीय नृत्यावर आधारित अर्वाचीन काळातील ‘बॅले’ - सदृश् नृत्य या स्वरूपाचे असते. नृत्याला जोडून येणारी नाटयगीते किंवा नाटयसंवाद ही त्याला अंगभूत असतात.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ८५

मोहरमच्या सणात शोक व्यक्त करण्यासाठी मुस्लीम मंडळी या ‘हसन, या हुसेन’ असा आक्रोश करतात. ‘हाय दोस्त दूलाह बेधूला’ असे म्हणत छाती पिटतात. भराभर उच्चारताना (‘जा पोरी जा’चं जसं ‘झपूर्झा’ झालं) पहिल्या तीन शब्दाचं ‘हैदोसधुल्ला’ झालं. इंग्रजांच्या कानांना ‘या हसन या हुसेन’ हे शब्द अनाकलनीय भासत. रमजानची वर्णने विलायतेस कळवणार्‍यांनी या शोकघोषाचा कधी ‘जॅक्सम बॉक्सम’, तर कधी ‘हॉब्सन-जॉब्सन’ असा उल्लेख केला. भारतातील कंपनीच्या गोर्‍या नोकरवर्गांत अगदी ओळखीचा असणारा हा वाक्प्रचार कोशाच्या वेगळ्या वाटेकडे लक्ष वेधणारा ठरला. शिवाय रचनाकर्त्यांच्या जोडगोळीचाही अप्रत्यक्ष निर्देश त्यात सूचित झाला (अ व्हेल्ड इंटिमेशन ऑफ डयुअल ऑथरशिप).
- श्री०बा० जोशी (‘उत्तम मध्यम’मधील ‘हॉब्सन-जॉब्सन’मधून)
(प्रेषक : विजय पाध्ये)

शब्दार्थाची सांस्कृतिकता
भाषेतील शब्द, अर्थ आणि त्यांची जोडणी (शब्दार्थसंबंध) ही सगळीच एक सांस्कृतिक निर्मिती आहे हे साहित्याचा अनुवाद करताना, विशेषत: परकी भाषेत करताना, तेव्हाच ध्यानात येते. जो मजकूर मराठी भाषकांच्या कानाला गोड वाटेल तो बांगला भाषकाच्या कानाला खरखरीत वाटू शकेल, जो मजकूर मराठीत रोखठोक/आर्जवी वाटेल तो हिंदीत अनुक्रम उद्धट/रोखठोक वाटेल. जर एखाद्या भाषेमध्ये रोखठोक/आर्जवी, औपचारिक/अनौपचारिक अशा वाक्सरणी उपलब्ध असल्या तर त्यांना एक मानसिक परिमाणही असते. उदाहरणार्थ, मजकुरात स्वर, लकार, नासिक्य व्यंजने यांची रेलचेल असली तर तो कोणत्याही भाषेत कानाला गोड लागण्याचा संभव अधिक किंवा कुणाच्या भाषाप्रयोगात छोटी छोटी वाक्ये नेहमीच अधिक असली तर त्या व्यक्तीची विचार धारण करण्याची क्षमता तोकडी असावी किंवा तिला संबोधित व्यक्तीच्या ग्रहणशक्तीचा भरवसा वाटत नसावा असे लक्षात येते.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २१९

सहेतुक भाषासरणी
भाषा आणि साहित्य ह्यांना जोडणारी संकल्पना म्हणजे ‘शैली’ (style). शैलीचा आपण प्रथम भाषेच्या अंगाने विचार करू, नंतर साहित्याच्या अंगाने.
‘शैली’ची व्याख्या भाषेच्या अंगाने द्यायची तर ती ‘सहेतुक भाषासरणी’ अशी देता येईल.
समजा, आपल्याला एक खुर्ची बनवायची आहे. ती बनवताना कच्चा माल, पैसा, हत्यारे, वेळ, बळ, कौशल्य इत्यादिकांची आपल्याजवळ जी काय उपलब्धी आहे तिच्या काही मर्यादा आपल्यावर पडतील. तसेच आपल्याला काय उपलब्ध करायचे आहे, काय साधायचे आहे ह्याचीही बंधने आपल्यावर आहेत. इतके वजन पेलायचे आहे, गुरुत्वमध्य इतका खाली आणायचा आहे, खर्ुच्या वाहून न्यायला आणि एकावर एक डाळून ठेवायला सोप्या असाव्यात ह्या किंवा अशा अटी आपल्याला पाळायच्या आहेत. प्रत्यक्ष खुर्ची तयार झाल्यावर, तिचे रंगरूप निश्चित झाल्यावर तिच्याकडे पाहिले तर ह्या दोन्ही प्रकारच्या मर्यादा कमीअधिक यशस्वी रीतीने संभाळल्याचे आपल्या ध्यानात येते. मात्र हा मर्यादापालनाचा हिशोब आपण वजा घातला तर खुर्चीच्या निर्मात्याने निवडीचे स्वातंत्र्य उपभोगल्याचे दिसून येते. ही श्रीशिल्लक म्हणजे शैली. (शैलीहीनता आणि कुशैली ह्यांमध्ये रेषा ओढायला हवी.)
उपलब्धी आणि उपयुक्तता ह्यांमधून वेगळी वाट काढून साध्य गाठणे म्हणजे शैली. मग ती शैली त्या व्यक्तीने स्वतंत्र शिल्पिलेली असो किंवा संस्कृतीने उपलब्ध करून दिलेल्या तयार वळणांपैकी एकाचे थोड्याफार फरकाने केलेले अनुकरण असो किंवा विशिष्ट कालखंडात विशिष्ट संस्कृतीने उपलब्ध केलेल्या एकच एक पर्यायाची पृथगात्मता असो.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २६

कवितेचे करतेपण
कवितेच्या करतेपणाबद्दल आपल्याला तीन प्रश्न उपस्थित करता येतील. एक म्हणजे : कविता आपल्या श्रोत्यावर-वाचकावर आणि श्रोत्यासाठी-वाचकासाठी काय कार्य करते? दुसरा प्रश्न : कविता आपल्या निर्मात्यावर आणि निर्मात्यासाठी काय कार्य करते? तिसरा प्रश्न : काव्य आपल्या श्रोते-वाचक आणि निर्माते-कवी मिळून बनलेल्या समाजावर आणि समाजासाठी काय कार्य करते? हे तीनही प्रश्न (अर्थातच!) वादग्रस्त आहेत. त्या सर्वांच्या संभाव्य उत्तरांचा शोध आपण घेतला तर कवितेच्या कर्तृत्वाच्या, करामतीचा म्हणा पाहिजे तर थोडा अंदाज आपल्याला यावा.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० ४३-४४

शैलीचे दुहेरी स्वरूप
शैलीचा प्रादुर्भाव होण्याचे व्यक्तिनिर्मित, व्यक्तिनिर्वाचित, आणि समाजनिर्वाचित असे जे तीन प्रकार सांगितले, त्यांपैकी दुसरा प्रकारच भाषेच्या बाबतीत सामान्यत: दिसून येतो. एकापेक्षा अधिक सरणी भाषा उपलब्ध करते. उदाहरणार्थ ‘माझा भाऊ हल्ली नाशकालाच असतो’ आणि ‘आमच्या बंधूंचे वास्तव्य सांप्रत नाशिक येथेच असते’ अशा अनुक्रमे साहजिक आणि प्रौढ सरणी मराठीच्या प्रमाणबोलीत उपलब्ध आहेत. वधूपित्याशी बोलायला किंवा कुणाची थट्टा करायला ही प्रौढ सरणी उपयोगी पडते. क्वचित एखाद्या व्यक्तीची ती स्थायी सरणी ठरेल आणि इतरांना ते अती औपचारिक वागणुकीचा किंवा अहंमन्य व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार वाटेल... भाषागत शैलीचा हा सोपा प्रकार. त्याहून सोपा प्रकार म्हणजे भाषाच बदलणे, निदान बोली बदलणे. मनची गोष्ट बोलायला गावाकडच्या बोलीचा आश्रय घेणे किंवा ठासून सांगण्यासाठी इंग्लिशचा आश्रय घेणे हा प्रकार मराठी भाषिकांमध्ये आढळतो. परंतु भाषा जे पर्याय उपलब्ध करते ते नेहमीच अशा जवळजवळ रेडीमेड शैलींच्या स्वरूपाचे नसतात. त्याऐवजी पर्यायांच्या फुटकळ जोड्या किंवा लहान पुंज भाषेत नेहमी हजर असतात. त्यांपैकी काही निर्हेतुक असतात. उदा०, ‘चावी’ आणि ‘किल्ली’, ‘कर्मणूक’ आणि ‘करम्णूक’, ‘बस’ आणि ‘बैस’, ‘तू आंबा खाल्ला’ आणि ‘तू आंबा खाल्लास’, ‘जात असे’ आणि ‘जाई’, ‘ऐशी’ आणि ‘एेंशी’ (सानुनासिक ऐ). बोलणारा किंवा लिहिणारा कोणता पर्याय निवडतो ह्यावरून ग्रहणकर्ता काही अनुमाने कदाचित् काढीलही - उदाहरणार्थ, बोलणारा परगावचा दिसतो, वयस्क असावा, इत्यादी... पण ही अनुमाने शैलीची प्रतीती ह्या स्वरूपाची नाहीत...मात्र त्यांच्यापैकी काही पर्याय-पुंज सहेतुक निवडीला अवसर देतात - उदा०, ‘मला ताप आला’ आणि ‘ताप मला आला’ (आणि लाड मात्र तुझे झाले); ‘जाणार आहे’ आणि ‘जाईल’; ‘साडेतीनशे’ आणि ‘तीनशे पन्नास’; ‘तू’, ‘तुम्ही’, आणि ‘आपण’; ‘लहान’, ‘बारका’ आणि ‘छोटा’; ‘जायला हवे’, ‘गेले पाहिजे’, ‘जाणे जरूर आहे’, आणि ‘जाणे आवश्यक आहे’, ‘आई’, ‘माता’, आणि ‘जननी’. अशा पुंजांतून जी निवड होईल तिच्यावरून ग्रहणकर्त्याला प्रेषकाचा हेतू स्पष्ट होतो. हा हेतू त्या मजकुराच्या आशयाच्या बाजूला जमा होतो हे खरे, पण त्याचबरोबर एका सलग वाक्यबंधनातून असे जे सहेतुक निवडीचे कण येतील त्यांच्यामधून एक शैलीही आकार घेते हेही तितकेच खरे. अभिव्यक्ती ही नुसता आशयाचा आविष्कार करीत नाही, तर आशयात भर घालते. भाषागत शैलींचे स्वरूप असे दुहेरी आहे.
- डॉ० अशोक रा० केळकर, ‘रुजुवात’ पृ० २७, २८

पानपूरके



इंग्रजीचे गुलाम!

काही वर्षांपूर्वी सोव्हियट यूनियनचे कॉन्सुलेट जनरल इगोर बोनी नागपूरला आले होते. तेव्हा येथील काही लोकांनी त्यांचे धनवटे रंगमंदिरात भव्य स्वागत केले. त्या सभेचे अध्यक्ष न्या० अभ्यंकर आणि स्वागताध्यक्ष होते कॉ० बर्धन! सत्कारमूर्तींच्या आधी ह्या दोघांची भाषणे इंग्रजीत झाली. पण त्यांचा अनुवाद करण्यात आला नाही. नंतर इगोर बोनी यांनी भाषणाला सुरुवात करताना म्हटले, ''मी इंग्रजी बोलू शकतो. पण ती विदेशी भाषा आहे. मी जर रशियन भाषेत बोललो, तर ते आपणांस समजणार नाही. आणि म्हणून मी हिंदीत बोलणार आहे.'' असे म्हणून त्यांनी हिंदुस्थानवासीयांच्या श्रीमुखात एक मखमली मारली. ते एक तास वीस मिनिटे धारावाहिक बोलले. त्यानंतर मी त्यांना माउंट हॉस्पिटलमध्ये भेटलो. तेव्हा ते मला म्हणाले, ''हिंदुस्थानी लोक तनाने स्वतंत्र झालेत, पण मनाने अजूनही इंग्रजीचे गुलाम आहेत. तुमच्या देशाला स्वत:ची राष्ट्रभाषा नाही.''
- वा०रा० गाणार
(दै० सामना, उत्सव पुरवणी, दि० २७ डिसेंबर २००९)
प्रेषक : मनोहर राईलकर




अरबी 'फी'

अरबीत 'फी' म्हणजे 'आहे'. हा फी शब्द घातला की त्या परीसस्पर्शाने बाकीच्या कसल्याही सावळ्या गोंधळाची व्याकरणशुद्ध अरबी होते अशी बहुतेक भारतीयांची समजूत असते.
सहा वर्षं उम्म खद्रामध्ये काम केल्यावर आमची लेबर वॉर्डातली नर्स, शकू, एखाद्या पहिलटकरणीला नीट कळा द्यायला सांगताना म्हणे,
'अना फी कलाम फी अन्ता फी अहसन.' (शब्दश: = मी आहे बोलते आहे तू आहेस अधिक चांगला) (अभिप्रेत = मी सांगते आहे ते तुझ्या भल्यासाठीच)
पहिलटकरीण ही अरबीची फे फे जाणतेपणाने समजून घेई!
डॉ० उज्ज्वला रेगे, 'सोन्याच्या धुराचे ठसके', पृ० ११०



काशी विश्व हिंदू विश्वविद्यालयात मराठी

काशी हिंदू विश्वविद्यालयात मराठीबरोबरच तमीळ, तेलगू, कन्नड, नेपाळी याही भाषा शिकविल्या जातात. या भाषांच्या विकासासाठी सुमारे दहा वर्षांपूर्वी तामिळनाडू, आंध्र व कर्नाटक सरकारांनी पाच-पाच लाख रुपयांची अनुदाने या विद्यापीठांना देऊन त्या रकमांच्या व्याजातून अध्यासन निर्माण करून प्रोफेसरचे पद व पीएच०डी० करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय केली आहे. नेपाळी सरकार स्वखर्चाने एका लेक्चररची नियुक्ती करीत असते... साठ वर्षांपासून जेथे मराठीचे अध्यापन अव्याहतपणे होत आहे अशा काशी हिंदू विश्वविद्यालयामधील दृढमूल मराठी विभागाला आर्थिक आधार देण्याचे औचित्य व औदार्य महाराष्ट्र शासनाने का दाखवू नये?
डॉ० सुरेश भृगुवार, 'नवभारत', फेब्रुवारी २०१०. पृ० ३०-३१




लीळाचरित्राची भाषा

(लीळाचरित्र) ग्रंथाचे पुनर्लेखन, मुसलमान महाराष्ट्रात स्थिरावल्यावर तीस-बत्तीस वर्षांनी होऊनही त्यात अपवाद म्हणून एक देखील पर्शोअरेबिक वंशाचा शब्द येत नाही. हे या भाषेचे सर्वात महत्त्वाचे ऐतिहासिक सत्य आहे. कथन साहित्याला आवश्यक अशा या गद्यात समाजातून आलेली भाषा आहे. तिच्यात निरनिराळ्या व्यावसायिकांच्या व्यवसायांमधून पडलेली शब्दसंपत्तीची भर आहे, बोलींचा सढळ, पात्रानुरूप वापर आहे. समाजाच्या निरनिराळ्या स्तरांवर वावरणार्‍या व्यक्तींच्या औपचारिक, अनौपचारिक संभाषणांचे स्वाभाविक नमुने आहेत. केवळ संबोधनवाचक शब्द घेतले तरी या भाषेच्या सामाजिक अंगाचे वैशिष्टय लक्षात येते. कन्नडसारख्या शेजारी भाषेतून मिसळलेला शब्दसंग्रह, आज सामाजिक संदर्भ लुप्त झाल्यामुळे भाषेतून निघून गेलेले, काही पूर्णपणे दुर्बोध वाटणारे असे अनेक शब्द या ग्रंथात आढळतात. वाक्संप्रदाय, म्हणी, लोकोक्ती आणि चक्रधरांच्या वाणीतून सहज बाहेर पडलेली 'अनावर मर्‍हाठी' वचने यांनी समृद्ध (अशी ही भाषा आहे.)
- सुमन बेलवलकर, 'लीळाचरित्रातील समाजदर्शन' पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. पृ० ३३-३४




साहित्यकला

अहो, जगात अशी एकच कला आहे की, जी इंद्रियाने आस्वादायची नसते, मनाने आस्वादायची असते. संगीत, नृत्य, शिल्प, चित्र या इंद्रियगोचर कला आहेत. साहित्यकला ही अशी एकुलती एक कला आहे की जी मानसगोचर कला आहे... साहित्याचा रसिक केवळ आस्वादक नसतो, तर कवीची कविता आपल्या मनात मुरवून तो तिची नवनिर्मिती करीत असतो .... आस्वादासाठी हवे असते आर्ष, म्हणजे अनघड मन.... नवनिर्मितीसाठी हवे असते सुघड मन.
- डॉ० द०भि० कुलकर्णी
अध्यक्षीय भाषण, ८३ वे अ०भा०म० साहित्यसंमेलन

मराठीचा ओढा

हैदराबादेतील मराठी समाजाचे मराठी विषयाचे प्रेम जागृत होते व ते अस्सल होते. १९५५ ते १९५८ हा काळ अंशत: संभ्रमात गेला. त्याच वेळी दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या सरकारमान्य व विद्यापीठमान्य ओरिएंटल लॅंग्वेजिज या परीक्षांचे अभ्यासक्रम समोर आले. प्राज्ञ, विशारद ऐवजी ओरिएंटल लॅंग्वेज पदविका व पदवी हे नामाभिधान झाले. हे कार्य करण्यासाठी मराठी संस्था असणे गरजेचे होते. त्यातून समाजाची ऊर्मी ओळखून संस्था स्थापन झाली - मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश व लगेच वर्गांना आरंभ झाला. विद्यापीठीय मान्यतेचे सोपस्कार चटकन उरकले व पाहता पाहता आजच्या मराठी महाविद्यालयाने जन्म घेतला. त्याचे मूळ सामाजिक गरजेपोटी व मराठीच्या ऊर्मीपोटी होते. शासनमान्यता व विद्यापीठमान्यता होती. परंतु ह्या वर्गांना शिकवायचे कुणी? संस्था तर नवीन होती. जवळ काहीच नाही, एका निष्ठेशिवाय. सगळ्या मराठीच्या प्राध्यापकांनी आपापले काम वाटून घेतले. कधी काळी श्री० दि०कृ० केळकर संस्कृत घेऊन एम०ए० झाले होते. ते धोतराचा काचा मारून वकिलीची पुस्तके बाजूला ठेवून 'उत्तररामचरित' शिकवायला मैदानात उतरले. 'ओढा सार्‍यांना मराठीच्या पाशात' हा मंत्र मुळात हैदराबादचा आहे. दत्तो वामन पोतदारांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या १९४३च्या नांदेड संमेलनात तो उच्चारला होता व तो महामंत्र ठरला.

त्या वेळीही स्वाध्याय मंडळ चालू होतेच. एखाद्या पुस्तकावर, कवितेवर चर्चा, वादविवाद होत असत. याच काळात बा०सी० मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ इ० नवकविता, नवकथा लिहिणारी मंडळी येऊन गेली. तेव्हा त्यांच्याबरोबरची चर्चाही अतिशय रंगली. त्या वेळी केवळ मराठीचेच नव्हे तर इतर भाषाविषयांचे प्राध्यापकही या स्वाध्याय मंडळात येत असत. मला आठवतं, विंदांची 'दाताकडून दाताकडे' ही कविता ए०वि० जोशी यांनी इतकी छान समजावून दिली होती की ती विसरणे अशक्यच. हाच प्रकार 'त्रिधा राधे'चा.

तर ही वीणा म्हणा वा माळ म्हणा कहाळेकरांनी द०पं० जोशींच्या गळ्यात अडकवली. एवढे खरे की हा गजर अद्याप चालूच आहे. मराठी मंत्र वातावरणात घुमतो आहे.

डॉ० उषा जोशी, "म-मराठीचा'' (मराठी महाविद्यालय सुवर्णमहोत्सव स्मरणिका) २००८, पृ० ५

दोघींचे भांडण, तिसरीचा लाभ

वास्तविक पाहता भारतीय समाजातील भाषाभेद हे भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे मूलाधार आहेत. या भाषाभेदांची समाजातील जातिभेदांशी तुलना करून त्यांना विकृती मानणे गैर आहे. अज्ञानमूलक आहे. ज्या भारतीय संस्कृतीचा आपण अभिमान बाळगतो ती भारतीय संस्कृती प्रादेशिक भाषाभेदांनी वैशिष्ट्यपूर्ण केलेल्या प्रादेशिक संस्कृतींनीच बनलेली आहे. प्रादेशिक भाषा व संस्कृती वजा करून 'भारतीय संस्कृती' असे काहीच उरत नाही. म्हणूनच इंग्रजी भाषेचे वाजवी महत्त्व मान्य करत प्रादेशिक भाषांचे जतन व संवर्धन करण्याची आज गरज आहे. ही जबाबदारी भारतीय नागरिक म्हणून सर्वांचीच आहे. स्थानिकांची तसेच स्थलांतरितांचीही. अर्थार्जनासाठी आपापला प्रांत आणि भाषा सोडून देशांतर्गत स्थलांतर करणार्‍यांनी स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर करायला शिकले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. आम्ही आमची भाषा सोडली, तुम्ही तुमची सोडा, या वृत्तीमुळे इंग्रजीसारख्या तिसर्‍या भाषेचे फावते.

डॉ० प्रकाश परब, 'भाषा, समाज आणि शासन',
'महाराष्ट्र टाइम्स' (मुंबई) ११-०९-२००८

पायरीबद्ध प्रक्रिया का?

हल्ली कोणाला वाचायला काय आवडतं असं विचारलं, तर जास्तीत जास्त लोकांचा कल 'सेल्फ हेल्प' प्रकारच्या पुस्तकांकडे असतो. यामध्ये सपाटीकरण आलंय. 'सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल', 'ट्वेल्व वेज टु लीड हेल्थी अँड सक्सेसफुल लाइफ', 'टेन स्टेप्स टुवर्डस मेंटल सॅटिस्फॅक्शन', 'एटिफाइव्ह टिप्स टु लुज वेट'. असंच काहीतरी. म्हणजे सगळं आकड्यांच्या किंवा स्टेप्सच्या भाषेत हवं. याचा संबंधसुद्धा आय०टी०मधल्या एका विशिष्ट प्रकारच्या कार्यपद्धतीशी लावता येऊ शकेल.
आय०टी०मध्ये करता येण्याजोग्या प्रत्येक गोष्टीची एक 'प्रोसेस' बनवून टाकलेली आहे. एका विशिष्ट पद्धतीनेच प्रश्नांची उत्तरं शोधली गेली पाहिजेत. एका विशिष्ट पद्धतीनं किंवा क्रमानंच एखादी गोष्ट केली गेली पाहिजे हा आग्रह. कारण एकच : कोणीही ती गोष्ट केली, त्याच क्रमानं केली आणि काही कारणानं ती गोष्ट अयशस्वी झाली तर नेमक्या कोणत्या स्टेपमध्ये गोची आहे हे पटकन लक्षात यावं!

सुचेता कडेठाणकर, साप्ताहिक सकाळ, ५-४-०८

सामाजिक द्रोह

लोकभाषा आणि राजभाषा असलेल्या स्वभाषेचा वापर न करणे किंवा वापर टाळणे हा सामाजिक द्रोह आहे, याची जाणीव अनेकांना नसते. विरोधाभासात्मक वाटेल, पण भाषानिवडीचे अनिर्बंध स्वातंत्र्य हे समाजाला अंतिमत: एकभाषी आणि बहुधा परभाषी समाजाकडे घेऊन जाते. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईसारख्या महानगरीमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. स्वभाषेच्या सक्षमीकरणाचे आव्हान न स्वीकारता स्वत:चे आर्थिक सक्षमीकरण करून घेण्यासाठी आधी अभिजन व बुद्धिजीवी वर्गाने आणि आता बहुजन समाजानेही इंग्रजी या परकीय सक्षम भाषेचा स्वीकार करायला सुरुवात केली आहे.

डॉ० प्रकाश परब, ‘भाषा, समाज आणि शासन' ,
‘महाराष्ट्र टाइम्स' (मुंबई) ११-०९-२००८

आगळा वेगळा सन्मान...

मुंबईजवळ एका गावात संगणक-चलित कापडमाग जुळवण्याचे काम चालू होते. इटालियन यंत्रतंत्रज्ञानाच्या सूचना मी आपल्या गिरणीकामगारांना हिंदी भाषेतून सांगत होतो. अवघ्या दोन दिवसांत १० कापडमाग जुळवून झाले व कापड-उत्पादन सुरू करण्याची वेळ येऊन ठेपली. इटालियन तंत्रज्ञ स्वतःवर व एका विशेष तरबेज कामगारावर इतका खूष झाला, की त्याला मागे एक लाथच मारली. परिणाम उलटा झाला. काम थांबले. हमरीतुमरीवर येऊन तो कामगार इटालियन तंत्रज्ञाशी भांडू लागला. बाकीचे त्याला सामील झाले. 'माध्यम' आणि 'मध्यस्थ' या दोन्ही भूमिका करून मी ते भांडण सोडवले. उत्पादन सुरू झाले, तशी तो इटालियन गाऊ, नाचू लागला, टाळ्या पिटू लागला. मी त्याच्यापासून दहा पावले दूर सरकलो व टाळ्या पिटू लागलो. काही इटालियन लाथ मारून कौतुक करतात, हे नवीन ज्ञान मला झाले होते.

— य०चिं० देवधर (डॉ० कल्याण काळे व डॉ० अंजली सोमण संपादित 'भाषांतरमीमांसा' ह्या पुस्तकातून)

कमरखुलाई

    भाषा आणि जीवन - एक प्रकारे अद्वैतच. जीवनात अनुभव नेमक्या शब्दात सांगण्याचे साधन म्हणजे भाषा. फार नाही पण साधारण दिडशे वर्षांपूर्वीचे हिशेबाचे कागद वाचत असताना एका ठिकाणी 'कमरखुलाई रु.१०/- दिले' असा उल्लेख होता. वाटले की कमरदुखीवर औषध असावे. पण अर्थ असा होतो की त्या कमरखुलाईला आता भारदस्त शब्द सुचत नाही. पण व्यवहार मात्र तसाच चालू आहे.

    शब्दकोशातील अर्थ असा -- अपराधी कुळाकडे -- गुन्हेगारी कारणाकरिता आलेल्या शिपायासकंबर सोडावयास द्यावे लागणारे द्रव्य सरकारी शिपाई हा त्रास देऊन उकळून घेतो. एरव्ही गुन्हेगाराला देहधर्म इ.ही करून देत नाही. म्हणजे खुल्लमखुल्ला व्यवहार होतो. आता गुन्हेगार प्रतिष्ठित असतात. तेव्हा त्यांना सोडविण्याचे मार्ग तितके प्रतिष्ठित असावे लागतात.त्याला कमरखुलाई कसे म्हणावे? पण लगेच पुढचा खर्च होता. 'अंत्यस्त' रु. ५/- आता अंत्यस्त शब्दही भारदस्त. अर्थ -- टेबलाखालून दिलेले पैसे. जीवनाचे प्रतिबिंब भाषेत पडते ते असे. भाष्याची आवश्यकता नाही.  
        --श्रीधर विश्वनाथ सहस्रबुद्धे, पुणे