ज्याची त्याची प्रचीती

भाषेवर वर्चस्व कुणाचं?

मनोहर राईलकर

‘भाषा आणि जीवन’च्या पावसाळा २००४ (२२:३) च्या अंकात वृषाली देहाडरायांचा ‘गमती भाषेच्या’ अशा शीर्षकाचा लेख आहे. प्रत्यक्षात असं काही असतं का, ह्याबद्दल मला शंका आहे. कारण तशी उदाहरणं घेऊन भाषेवर स्त्रियांचंच वर्चस्व असतं, हे मी दाखवू शकेन. तोच ह्या लेखाचा उद्देश आहे. खरं तर भाषा ह्या शब्दापासूनच ह्या वर्चस्वाची ‘सुरुवात’ होते. (आरंभ होतो, असं मुद्दामच म्हटलं नाही!)

श्रीमती देहाडरायांनी पुंलिंगी आणि नपुंसकलिंगी एकाच पोतडीत बांधली आहेत आणि संस्कृतचा विचार केला तर त्यात पाच अष्टमांश तथ्यही आहे. कारण आठ विभक्तींपैकी (पुन्हा स्त्रीलिंगीच?) प्रथमा, द्वितीया, संबोधन वगळता सगळ्या प्रकारच्या नपुंसकलिंगी शब्दांची रूपं पुंलिंगी शब्दांसारखीच असतात. आणि संबोधन शब्द जरी नपुंसकलिंगी असला तरी (ती) विभक्तीच!

श्रीमती देहाडरायांनी दिलेली काही उदाहरणंच घेऊन आपण पाहू या. त्या म्हणतात, मोठा असेल तर डबा आणि लहान असेल तर डबी. पण अगदीच लहान असलं तर त्याला डबडं म्हणतात ना. मोठा असेल तो बंगला आणि लहान असेल ती झोपडी. त्यावर मी असं म्हणतो की तो बंगला असला तरी दहा-दहा पंधरा-पंधरा मजली इमारत ‘ती’च असते की! इतकासा असलेला खटारा पुंलिंगीच पण लांबलचक सोळा-अठरा-वीस डब्यांची झाली तरी रेल्वेगाडी स्त्रीलिंगीच. (अगदी ‘मेल’ गाडी असली तरीसुद्धा). म्हणजे आकारावरून लिंग ठरतं असं काही सिद्ध होत नाही. एखादा प्रचंड दगड, पत्थर जरी पुंलिंगी असला तरी इमारतीची कोनशिलाच नाव मिळवून आणि भाव खाऊन जाते की नाही? आणि तेही कायमचं! बिचारे पत्थर कायमचे पायात गाडले जातात. त्यांना पुन्हा कधी सूर्यदर्शन होण्याचा सुतराम् संभव नाही. भूकंपात मोठमोठाली बांधकामं उद्ध्वस्त झाली तरी त्या कोनशिला तशाच तगल्याची प्रकाशचित्रं तुम्ही पाहिली नाहीत का?

प्रकाशचित्रं नावावरून आठवलं! वास्तविक ‘प्रकाश’चित्र हा शास्त्रशुद्ध शब्द. पण
फोटोकरता प्रथम ‘छाया’चित्र हेच नाव कुणीतरी ठरवलं आणि आता कितीही धडपड केली तरी ‘प्रकाश’वरची छायेची छाया काही जाणार नाही. ती ‘प्रकाश’ला ग्रासूनच राहणार. कारण शास्त्राद्रूढिर्बलीयसी! पुन्हा इथंही नपुंसकलिंगी शास्त्रापेक्षा स्त्रीलिंगी रूढीच प्रभावी! अहो एवढा मोठा सूर्य. पण पृथ्वीच्या पावपट असलेल्या चंद्राची छाया त्याला झाकतेच की नाही? शिवाय स्त्रीलिंगी पृथ्वीची स्त्रीलिंगी छाया पुंलिंगी चंद्रालाही ग्रासतेच की!

एक आंबा पुंलिंगी असला तरी आंब्यांच्या शेकडो झाडांची आमराई स्त्रीलिंगीच असते. आणि तो कागद असला तरी अनेक कागदांची वही किंवा चोपडी स्त्रीलिंगीच! अनेक पुंलिंगी दुवे एकत्र जोडल्यावरच स्त्रीलिंगी साखळी बनते ना? आणि अनेक पुंलिंगी डबे जोडल्यानंतरच स्त्रीलिंगी रेल्वे बनते.

जरी दरवाजा स्वत: पुंलिंगी असला तरी त्याला जन्मभर स्त्रीलिंगी चौकटीतच अडकून राहावं लागते, हे तर सर्वज्ञातच आहे. आणि त्याचं काम बंद करणार्‍या कडीची सर्वांवर कडीच नाही का? अनेक नारळ एकाच पेंडीच्या आश्रयाला असतात. कितीही पुरुष असले तरी त्यांची समितीच बनते. पैसा पुंलिंगी असला तरी त्याला स्त्रियांच्या पर्समध्येच राहावं लागतं. आणि फार झाला तर तो तिजोरीत किंवा बँकेच्याच आश्रयाला जातो. सर्वत्र स्त्रियाच! परकर, पायजमा पुंलिंगी असले तरी स्त्रीलिंगी नाडीशिवाय जागेवर राहतात काय? हार आणि हारातले मणी भले पुंलिंगी असतील. पण त्या सर्व मण्यांना एकत्र बांधून हाराच्या पायरीपर्यंत नेणारी दोरीच की नाही? पुन्हा पायरीसुद्धा स्त्रीच.
शिवणारा दोरा स्वत: पुंलिंगी असला तरी त्याला सुई जशी नेईल, तिच्यामागून तसंच फरफटत जावं लागतं, हा सार्वत्रिक अनुभव आहे. शिवाय करून सवरून मोकळी होते, ती सुईच. दोरा तिथंच अडकून राहतो, कायमचा, जन्मभराच्या गाठी! पुन्हा दोर्‍याची कधीच मुक्तता होऊ नये म्हणून त्याला आधी आणि शेवटीही मारलेल्या गाठीही स्त्रीलिंगीच की! पतंगही पुंलिंगी असला तरी त्याचं नियंत्रण स्त्रीलिंगी दोरीच करीत राहते ना? आणि काही कारणानं तीच कापली गेली तर बिच्चारा पतंग! कुठंतरी भरकटत जातो. मुसळ जरी नपुंसकलिंगी असलं तरी त्याला उखळीच्या बाहेर जाता येत नाहीच. गेलंच तर कांडणार्‍याच्या किंवा कांडणारणीच्या पायावर दणका! पलंग खरा तर पुंलिंगी. पण त्यावर गादी, चादर असल्याशिवाय निरुपयोगीच ना?

ओंडका जरी पुंलिंगी असला तरी त्याला कापणारी करवत स्त्रीलिंगीच असते. शंख जरी पुंलिंगी असला तरी त्याला ज्या अडणीवर बसून राहावं लागतं ती स्त्रीलिंगीच असते. तीच गत माठाची. त्यालाही तिवईच्या आश्रयानंच राहावं लागतं. खिळ्याला भिंतीच्या अंतरंगात शिरायचं असलं तर डोक्यावर स्त्रीलिंगी हातोडीचे घाव सहन करावे लागतातच. एरवी भिंत त्याला दाद थोडीच देईल? इतकंच काय, तो खिळा भिंतीतून पुन्हा उपटून बाहेर काढायचा झाला तर, नावाप्रमाणंच मजबूत पकड असलेली पकडच लागते. अहो बिचार्‍या पुंलिंगी दगडालाही टाकीचे किंवा छिन्नीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळतं का कधी?
पायात काटा गेला तर त्यालाही हुसकावून, उपटून काढण्याकरता सुईच लागते. आणि पुंलिंगी आजाराला पळवून लावण्याकरताही सुईच लागते. चंद्र तो असला तरी त्याला पृथ्वीच्या कक्षेतच फिरावं लागतं!

दुसर्‍याच्या (झाडाच्या किंवा वृक्षाच्या) आधारावर वाढणार्‍या वेलीला स्त्रीलिंगी मानलं जातं आणि जगावं लागतं, असं श्रीमती देहाडराय म्हणतात. पण वेल शब्द पुंलिंगीही आहेच. कार्ल्याचा, तोंडलीचा, पडवळाचा, भोपळ्याचा वेल असतो. त्यांच्या आधारानंच कार्ली, टोमॅटो, भोपळा, कलिंगड सर्व पुंलिंगी आणि नपुंसकलिंगी मंडळी वाढतात. वेलु जरी गगनावरि गेला तरी बिच्चार्‍या भोपळ्याला कुठंही जाता येत नाही, कायमचं जमिनी(!) वरच अडकून पडावं लागतं. शिवाय, ह्या सर्वच वेलांना वाढण्याकरता झाडाच्या फांदीचा किंवा जमिनीत रोवलेल्या काठीचाच आधार लागतो.

संगणक तर पुंलिंगीच. अगदी परम १०,००० क्षमतेचा झाला तरी. पण, सर्वार्थानं त्या संगणकाचं नियंत्रण करण्याकरता चिप नावाची जी क्षुद्र आयसी लागते, ती तर स्त्रीलिंगीच नाही का?

वास्तविक पूर्वीच्या काळी लेखनाकरता बोरू वापरले जायचे. त्याला नीट तासून त्याची जीभ कापावी लागे. तेव्हा ती ‘द्विजिह्वा न च सर्पिणी’ बाई चुरुचुरू लेखन कार्य करी. आणि बोरू जरी पुंलिंगी असला तरी त्याचं काव्यमय वर्णन लेखणी याच सदरात केलं जाई. कशानंही लिहिलं तरी कुणी लेखनकार्यासारखं बोरनकार्य किंवा बोरीव काम म्हणत नसे. म्हणून तर ‘साहित्यिकांनो लेखण्या मोडा आणि तरवारी घ्या’, असं आवाहन केलं गेलं. आणि आमच्या लहानपणी तरवार श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ असा वाद रंगत असे. तिथं कुणी बोरू शब्द वापरीत नसे. रंगणार्‍या दोन्ही स्त्रियाच!

ही नावं बघा सीताराम किंवा जानकीजीवनराम, राधाकृष्ण किंवा राधामोहन, उमामहेश्वर किंवा उमाशंकर, लक्ष्मीनारायण, किंवा रमामाधव सर्व नावांत स्त्रिया प्रथम! इतकंच कशाला? शंकराला आवाहन करायचं तर पार्वतीपते असं म्हणून मगच हरहर महादेव म्हणावं लागतं. आणि रामालाही सीतापते राम असंच संबोधावं लागतं ना?

आता तंबोरा पाहू. त्याचा दांडा आणि भोपळासुद्धा पुंलिंगीच. पण तारा, त्या ज्यांच्यावरून जातात त्या घोड्या आणि तारा सुरांत लावण्याकरता पिळायच्या खुंट्या. सगळं महिलामंडळच! पण इतक्यानं भागतंय होय? सुरांना गांभीर्य प्राप्त व्हावं म्हणून जवार लावायची तीही स्त्रीलिंगीच. तेव्हा कुठं त्या गवयाचं समाधान व्हायचं! आणि त्याच्या गळ्यातून सा लागायचा!

आता एक शेवटचा मुद्दा. तबला किंवा पखवाज पुंलिंगी. पण एरवी त्यांना नुसतंच खोड (नपुंसकलिंगी. स्त्रीलिंगी नव्हे!) असं नामाभिधान असतं. त्यांना मढवण्याकरता पुडी लागते. मुळात कातडं (नपुं०) त्याचीच पुडी होते. त्या पुडीला शाई लावावी लागते, तिला चाट लागते. त्या पुडीला सर्व बाजूंनी वेणी घालायची, त्या वेणीतून वादी ओवायची. वादीला पुरेसा ताण राहण्याकरता खुंट्या अडकवायच्या. मगच तो मढवला जायचा. पण हे सर्व महिलामंडळच. पण तेवढ्यानं भागलं म्हणता का? हातोडीनं सर्व बाजूनं त्याला व्यवस्थित ठोकल्याशिवाय तो सुरांत बोलेल का? नाव नाही. पखवाजाची तर फारच दयनीय अवस्था. कारण त्याला दोन्ही बाजूंनी स्त्रीलिंगी पुड्या लावून मढवायचा. वरचं सगळं महिलामंडळ तर हवंच. पण एका बाजूनं तबल्यासारखा आहे म्हणून हातोडीनं ठोकून तो जरी सुरांत लावला तरी तो मृदुंग, म्हणजे ज्याचं अंगही स्त्रीलिंगी मातीचं आहे, त्यालाही मुखलेप हवाच. हा मुखलेप (पुं०) वाटत असला तरी प्रत्यक्षात कणीकच (स्त्री०) वापरायची! मगच तो मधुरध्वनी करतो. शिवाय दोन्ही बाजूंनी स्त्रियांनी जखडलेल्या अवस्थेत बिचार्‍याला दोन्ही हातांनी वादकाच्या थपडा (!) खाव्या लागतात. आणि त्या खाताना थापेचा (!) मधुर आवाज केल्याशिवाय गत्यंतरच नाही! हाय रे दैवा!

हिंदीचे अतिक्रमण आता मराठीच्या पाठयपुस्तकातही!

अनिल शेळके

आज इंग्रजीपेक्षा हिंदीचे मराठी भाषेवरील आक्रमण हा खरा कळीचा मुद्दा आहे. प्रसार माध्यमातून मराठी मुलांवर हिंदी शब्दांचा अव्याहत मारा चालू असतो. त्यामुळे हिंदी शब्दांचा चुकीचा अर्थ लावून मराठी मुले मराठी भाषा बोलत आहेत.

हा प्रभाव इतका आहे की, मूळ सार्थ मराठी शब्दच मुलांना ठाऊक नाहीत असे दिसून येते. आजच्या पिढीवर ओठावर डास, कासव, अतिरेकी या मराठी शब्दांऐवजी मच्छर, कछुआ, आतंकवादी हे शब्दच येतात. आता तर हे हिंदीचे भयावह अतिक्रमण मराठी विषयाच्या पाठयपुस्तकातही दिसू लागले आहे.

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने ३१ जानेवारी २००९ रोजी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील आठव्या इयत्तेसाठी प्रसिद्ध केलेल्या सुलभ भारती या मराठी विषयाच्या पाठयपुस्तकामध्ये ‘विलक्षण पैज’ ही केशव फडणीस यांची कथा समाविष्ट केली आहे.

या कथेत "मी तुमच्या त्या लालजीकडून खाली हात परत फिरणार" (पृष्ठ ५९). "तुम्ही खाली हात परत आला तर मी तुम्हांला ५० सुवर्णमुद्रा देईन" (पृष्ठ ६०), आणि "मला जर खाली हात परत जावे लागले तर..." असा तीन वेळा रिकाम्या हातांनी परत येणे या अर्थाने ‘खाली हात’चा उल्लेख झालेला आहे.

राम, 3657 स्टेशन रोड, बार्शी, जि० सोलापूर 413 401
दूरभाष : (02184) 226301
भ्रमणभाष : 094201 33013

‘ण’ की ‘प’?

मेघना सामंत

आमच्या मालवणी प्रकारच्या माशांच्या आमटीची कृती एका मित्राला सांगत असताना एक गंमत लक्षात आली. मी सांगत होते, "वाटपात अमुक अमुक घालायचं... मग वाटप उकळायचं..."तर तो अडवून म्हणाला, "वाटप काय वाटप? वाटण म्हणायचंय ना तुला?" एक क्षण मला गोंधळायला झालं. कारण आई-आजी सगळयांच्या तोंडी वाटप, वाटपाची तयारी, वाटपाची आमटी हेच शब्द ऐकलेले, मग वाटप हा शब्द चुकीचा कसा? तितक्यात हा मित्र म्हणतो कसा, "वाटप म्हणजे बक्षीस वाटप किंवा वह्यावाटप, धान्यवाटप, खातेवाटप वगैरे आणि तुला म्हणायचंय ते वाटण."आमच्यात वाटपच म्हणतात असं मी ठासून सांगितलं खरं, पण मग थोडं विचारचक्र सुरू झालं. आमच्या भागात दळणाला सर्रास दळण म्हणतात. ‘आमच्या येथे सर्व प्रकारच्या धान्याचे दळप व कांडप करून मिळेल’ अशी पाटी मी कोल्हापुरात कुठेतरी बघितलेली आठवली. त्यावरून कांडपीण हा शब्द आठवला. कांडपिणींवरून रांधपिणी आठवल्या. म्हणजे रांधप हा शब्द असणारच. तसाच वाढप (आणि वाढपी) हे शब्द तर चांगलेच प्रचारात असलेले. उसाचा ‘गाळप’ हंगामही वाचलेला आहे. अशाच प्रकारचा आणखी एक शब्द म्हणजे वाजप. हा फक्त सिंधुदुर्ग भागात ऐकायला मिळेल. याला प्रमाण-भाषेत बहुधा प्रतिशब्द नसावा. लग्नात वगैरे - ‘बहु गल्बला न करणे’ अशी सूचना देऊनही वाजंत्री जो गल्बला करतच राहतात तो म्हणजे वाजप.

यावरून एक गोष्ट लक्षात आली की काही ठरावीक क्रियापदांची ‘ण’ ऐवजी ‘प’ लावून केलेली नामंच आमच्या बोलीत रुजली असावीत. क्रियापद (वाटणे) एकच असून, ‘वाटप’ म्हटलं की वितरण आणि ‘वाटण’ म्हटलं की ओल्या चटणीसारखी, अनेक पदार्थांची एकत्र वाटून केलेली गोळी असं पुण्यामुंबईकडच्या भाषेने ठरवलं असलं तरी आम्ही बुवा वाटप हा शब्द वापरणारच.

ता० क० नुकताच आणखी एक ‘प’कारान्त शब्द सापडला - पाडप. हाही कोकणातलाच. माडांवरून नारळ उतरवायच्या कामाला पाडप म्हणतात.

सी-202, सॅटलाईट पार्क, गुंफा रोड, जोगेश्वरी पूर्व, मुंबई 400 060
ई-पत्ता : askwhy.meghana@gmail.com

बदलणारी मराठी भाषा

अ०पां० देशपांडे

भाषा दर १० कोसांवर बदलते असे मानतात; तशी ती दर दहा वर्षांनीही बदलते हे का बरे मांडले जात नाही? काळ जसा प्रवाही आहे तशी भाषाही प्रवाही आहे. त्यामुळे जुने रीतीरिवाज, संस्कृती, शिक्षणपद्धती, परिमाणे इ० बदलतात तसतशी जुनी भाषा कालबाह्य होते आणि त्यात आता बदलत्या तंत्रज्ञानाचा झपाटा आला आहे. त्यामुळे ही भाषा बदलते आहे.

दर दहा कोसांवर भाषा बदलते हे वाक्य आजच्या तरुणांना समजतेच असे नाही. कारण कोस म्हणजे काय? दोन मैलांचा एक कोस होतो. पण आता अमेरिका सोडता इतरत्र मैलांचे किलोमीटर झाले. त्यामुळे कोस फारच दूर राहिला. मग आता १० कोसांचे रूपांतर करून भाषा दर ३२ कि०मी० वर बदलते असे म्हणायचे का? शिवाय मैल या एका संज्ञेवरून आपण त्याचा विविध प्रकारे वापर करत आलो त्याचे काय करणार? त्यास अजून तरी पर्याय आले नाहीत. उदा० मोटारगाडीत, आगगाडीत, विमानात वेग मोजण्यासाठी जे मीटर वापरतात त्याला मायलोमीटर म्हणतात. दर ताशी किती मैलांचे काहीही होवो हा मीटर मायलोमीटरच राहील? उदा० एकेकाळी मुंबई-पुणे डाक घोड्यावरून जाई. मुंबईहून सुटलेला घोडा बदलून दुसरा घोडा वापरला जाई. अशा जागेला त्या वेळी बदलापूर (कल्याण-कर्जत दरम्यान असलेले गाव, रेल्वेस्थानक इ०) म्हणत. आज डाक पाठवण्याचे मार्ग बदलले तरी गावाचे नाव बदलापूरच राहिले. तसे मैल गेले तरी मायलोमीटर हे नाव तसेच चालू ठेवावे का? मैलावरून वापरला जाणारा वाक्प्रचार म्हणजे माईलस्टोन हा आहे. अंतर दर्शविण्यासाठी रस्त्यावर मैलांचे दगड उर्फ माईलस्टोन असतात. आता मैल गेल्यावर ते मैलाचेच दगड राहणार का? शिवाय संस्थेच्या आयुष्यात, माणसाच्या आयुष्यात, विज्ञानाच्या इतिहासात काही महत्त्वाच्या घटना घडतात त्याला आपण मैलांचे दगड म्हणतो. उदा० चाकाचा शोध हा वैज्ञानिक क्रांतीतील मैलाचा दगड आहे असे मानतात. मी मैलो न मैल चालत गेलो (म्हणजे खूप लांबवर चालत गेलो) किंवा इंग्रजीत माइलेज असा शब्द व त्यावरून रुळलेला शब्दप्रयोगही आहे. उदा० एखाद्याला एसएससीच्या यशामुळे खूप माइलेज मिळाले असे आपण म्हणतो.

फूट, इंच, यार्ड ही परिमाणे आपण मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटरमध्ये बदलल्याने यांवरून पडलेली भाषा गेली. अगदी वसंत बापटांची इंच इंच लढवू छातीही गेली. इंग्रजीतील एक छान उध्दृत आठवले, 'दोज हू स्पीक इन यार्ड्स अँड मूव्ह इन इंचेस, बी टिन्टेड विथ फूट', 'ए, तू आता इथून फूट' हेही गेले.

दुसरी गोष्ट - फार पूर्वी छोट्या वजनांसाठी गुंजा, मासा वापरीत आणि तोळाही. (१६ गुंज = १ तोळा, ९६ तोळे = १ शेर (अंदाजे १ किलो). वैद्यलोक पूर्वी ही मापे औषधे देताना वापरत. त्यामुळे ती भाषा त्यांच्या तोंडात होती. त्यावरून एखाद्या रुग्णाची तब्येत खूप नाजूक झाली असेल तर त्याचे वर्णन अमूक एखाद्या रुग्णाची तब्येत तोळा-मासा झाली आहे, असे म्हणत. आता गुंज फक्त पाहायला मिळत असल्याने दारू प्यायलेल्या माणसाचे डोळे गुंजेसारखे लाल झाले असे म्हटले तर म्हणणार्‍यालाच दारूबाज म्हणेल, तू काय म्हणतोस ते मला समजत नाही. तू काही गांजा-भांग घेतली आहेस का? पावशेर किंवा पाव किलो वा पाव लिटर, पाव म्हणजे एक चतुर्थांश राहिले पण पावावरून अदपाव (अर्धा पाव) आणि छटाक (पावचा पाव अथवा पावाचा एक चतुर्थांश) ही मापे गेली. पण पूर्वी दारू पिऊन आलेल्याला काय रे पावशेर मारून आला का म्हणत, तेही गेले.

१६ आणे = एक रुपया होता. त्यावरून डॉक्टर, वैद्य एखाद्याची तब्येत ५० टक्के बरी झाली म्हणायच्या ऐवजी आठ आणे सुधारली म्हणत. एखाद्याचे काम १०० टक्के झाले की १६ आणे काम फत्ते म्हणत. दुष्काळामुळे ७५ टक्के पीक गेले तर ४ आणे पीक वाचले म्हणत.
तंत्रज्ञानामुळे जुन्या गोष्टी संपून नव्या आल्या. जसे कार्बन पेपर जाऊन आता झेरॉक्स आले तेव्हा अमूक एक माणूस दुसर्‍यासारखाच आहे असे म्हणताना तो त्याची कार्बन कॉपी आहे असे आपण म्हणत असू. कॉपिंग पेन्सिल गेली. सायक्लोस्टाइलिंग गेले. टाइपरायटर कॉम्प्युटरवर चढला पण टाइपरायटरची ओळ संपत येताना घंटा वाजे ती घंटाही गेली.

न०चिं० केळकरांची एकसष्टी साजरी झाली तेव्हा 'मी आता म्हातारा झालो' म्हणायच्याऐवजी 'मला आता टाईपरायटरची घंटा ऐकू येऊ लागली', असे ते म्हणाले होते.

तसेच ५०-१०० वर्षांपूर्वीचे साहित्य आणि त्यांचे लेखकही कालबाह्य झाले. एका मुलाच्या घरी त्याला पाहायला माणसे आली. मुलाचे वडील बाहेर गेले होते. दरम्यान काकांनी कारभार सांभाळला. मुलाचे वडील आल्यावर ते पाहुण्यांना म्हणाले, 'हाच मुलाचा बाप!' सर्व हसले. पण छोटयांना मामा वरेरकरांचे या नावाचे नाटक होते हे काय माहीत?

अशी जुनी भाषा कालबाह्य होताना पोकळी राहत नाही. नवी भाषा, नवे तंत्रज्ञान, नवे रीतिरिवाज त्यात डोकावतात. उदा० आजची मुले तुझा फंडा क्लिअर नाही म्हणतात. उशिरा लक्षात येणार्‍याला, त्याची टयुबलाईट आता फकफकली म्हणतात.

प्रसिद्ध विचारवंत आणि लेखक डॉ० स०ह० देशपांडे यांच्या लिखाणात काही जुने शब्द आवर्जून येतात. एकदा मी त्यांना विचारलेसुद्धा की हे सध्या लोकांना न समजणारे शब्द तुम्ही का वापरता? तर ते म्हणाले, असे शब्द कुणीच वापरले नाहीत तर ते चलनातून निघून जातील.

याचा अर्थ भाषेसारखा मोठा विषय पण तो अगदी त्या-त्या भागापुरता, त्या-त्या काळापुरता, त्या-त्या जातीपुरता, त्या-त्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक पातळीपुरता राहतो की शेवटी तो सांकेतिक ठरतो अशी शंका यावी.

भाषेची मुळं लोकजीवनात!

विजया देव

आपली भाषा ही काही आपल्यापेक्षा कुणी वेगळी वस्तू नसते किंवा ती व्यवहाराचं निर्जीव साधन नसते. आपणच आपल्या जीवनातून तिला घडवत असतो. अनुभवाच्या बारीकसारीक अर्थछटा सुचवायला आपल्याला वेगवेगळे शब्द लागतात, आपल्या भोवतालची सर्व वस्तुजात त्यातल्या बारकाव्यांनिशी टिपण्यासाठी आपण नेमके शब्द शोधत असतो. उदाहरणार्थ, 'रवाळ', 'कणीदार', 'भरड', 'जाडसर' असे शब्द काही नुसत्या शब्द घडवणार्‍या सोसातून निर्माण झालेले नसतात. त्या पदार्थांचा नेमका गुणधर्म, पोत, स्पर्श, दृश्यरूप असं सगळं विचारात घेऊन ते भाषेत येतात आणि तो अर्थ समजून ते वापरले तर कृतीचं सार्थक होतं. नाहीतर 'आणि अमुक मिक्सीवर बारीक करून घ्यावं.' या सूचनेतून काय बोध होणार?

पण काळाच्या रेट्याची आणि माहितीप्रपाताची सबब सांगून आपणच नेमकेपणाला, योग्य पर्याय शोधण्याला तिलांजली देऊन काम भागवत असतो. मग सुरू होतं भाषेचं सपाटीकरण. प्रसारमाध्यमांच्या भाषेत, वृत्तपत्रीय लेखनात तर असे सरधोपट, मोघमपणाने वापरलेले शब्द जागोजाग भेटत राहतात. शब्दांचा असा अनादर करणारा ढिसाळ वापर वाचकांच्या लक्षात येत नाही असं नाही, पण वाचकच समजूतदारपणाने 'म्हणजे लेखकाला असं म्हणायचं असावं' अशी सूट देऊन टाकतो. कारण वाचकालाही बरंच काही वाचायचा रेटा असतोच.

अलीकडेच एका वृत्तपत्रीय पुरवणीत असाच एक शब्द निरागसपणे चुकीच्या अर्थाने वापरलेला आढळला आणि भाषाअभ्यासक म्हणून या निमित्ताने मी लिहिती झाले.
लेख आहे पिस्त्यांची शिफारस करणारा (सेहत के वास्ते, खाओ पिस्ते, शुभदा रानडे, लोकसत्ता पुरवणी, गुरुवार १९ नोव्हेंबर २००९). लेख मराठीतला, त्याविषयीची माहिती इंग्रजीतून घेतलेली असावी आणि शीर्षक हिंदी! पण ते असो!

वजन घटवण्यासाठी आणि पोषक आहारमूल्यं मिळवण्यासाठी पिस्त्यांची बरीच शिफारस या लेखात केलेली आहे. त्यात पिस्त्यांची वर्गवारी 'सालं काढलेले' आणि 'सालीसकट' अशी केलेली आहे. डॉ० पेंटर यांनी सालं काढलेल्या आणि सालींसकट अशा दोन्ही प्रकारच्या पिस्त्यांचा अभ्यास केला. 'सालींसकट पिस्ते खायला दिले की पिस्ते ४५% कमी खाल्ले जातात कारण सालं काढण्यात वेळ जातो. तेच सालांशिवाय पिस्ते दिले तर जास्त प्रमाणात पिस्ते खाल्ले जातात.' वगैरे वगैरे.

हे वाचून लक्षात आलं की लेखिकेला इथे 'साल' नसून 'टरफल' अभिप्रेत आहे. साल आणि टरफल ही दोन्ही आवरणं असली तरी त्या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. हा फरक समजून न घेता लेखिकेनं 'टरफल' हा शब्द गावीही नसल्यासारखा सर्रास 'साल' या शब्दाचा उपयोग केला आहे. टरफल हा शब्द आणि त्याचा अर्थ उपयोग माहीत नसेल असे नाही, पण इंग्रजीतून घेतलेल्या माहितीचं मराठीकरण करताना शब्दांच्या निवडीबद्दल आळस केला गेला असावा. वास्तविक या लेखासोबत टरफलासहित पिस्त्यांचं ठळक चित्र आहे. साल म्हटलं काय, टरफल म्हटलं काय, लक्षात येतंय ना, असा दृष्टिकोन असला तरी पिस्त्याला अंगची सालही असतेच, आणि वर कठीण टरफल असतं. आपण टरफल काढून पिस्ते खातो, साल काढून नव्हे. वेगळे शब्द हे पदार्थाच्या भिन्न गुणधर्मासाठीच योजलेले असतात. साल हे फळांचं अंगचं आवरण असतं. उदा० चिकूची साल, केळ्याची साल. ती फळाच्या गरालगत मऊ, नरम असते. ती सोलून किंवा साल काढण्याच्या यंत्रानं काढता येते. कच्च्या बटाट्याची साल आपण यंत्रानं सोलतो, उकडलेल्या बटाट्याची साल सहज सुटते, बदामाला अंगची साल असते, बदाम भिजवले की ती सोलता येते. तशीच पिस्त्यालाही असते, पण त्यावर जे कठीण आवरण असतं ते त्याचं टरफल; साल नव्हे. भुईमुगाच्या शेंगांच्या टरफलांबद्दलची लोकमान्य टिळकांच्या विद्यार्थिदशेतील गोष्ट प्रसिद्धच आहे. शेंगांमधले दाणे काढून मुलांनी टरफलं वर्गात टाकली होती, ती काही भाजलेल्या दाण्यांची सालं नव्हती.

टरफलापेक्षा कठीण असेल ते कवच. बदामाचं कवच, ते फोडून निघते ती बदाम बी. पूजेत लागतात ते अख्खे बदाम, म्हणजे कवचासहित बदाम. नारळ, कवठ ही आणखी कठीण कवचांची फळं. साल आपण सोलतो, टरफल आपण काढतो आणि कवच फोडावंच लागतं. नारळाला बिचार्‍याला साल नसते. करवंटीपासून सुटलेली वाटी (ओल्या नारळाची किंवा सुक्या खोबर्‍याची) किसणीवर धरून किसली तर खाली पांढराशुभ्र कीस पडतो, आणि किसणीवर हातात राहते ती 'पाठ', साल नव्हे. या नारळाच्या नावांची गंमतही बघा. मानानं द्यायचं ते श्रीफल, पूजेसाठी असोला नारळ, पाणीवालं शहाळं, ओल्या खोबर्‍याचा तो नारळ आणि करवंटीपासून सुटून गोटा झाला की सुकं खोबरं (आणि 'सुकं'च, 'वाळलेलं' नव्हे.)
आपल्या प्रदेशातलं हवामान, निसर्ग जे आपल्याला देतो, ज्या वनस्पती तिथे वाढतात त्या आपल्या आहाराचा भाग बनतात. ऋतुमान आणि पदार्थांचा गुणधर्म पाहून आपण त्यांचा आहारात वापर करतो, मग त्या गोष्टींना स्वतंत्र नाव देणं आलंच. नारळ हा एक प्रमुख घटक, म्हणून त्याच्या वेगवेगळ्या अवस्थांना वेगवेगळी नावं. पण ज्या हवामानात वाढणारं हे झाड नव्हे, तिथे त्या प्रदेशात तो आहाराचा भागही नव्हे. म्हणून त्या प्रदेशातल्या भाषेत नारळाला एवढी नावंही नाहीत. उदाहरणार्थ, उत्तरेत, हिंदीत ओल्या नारळाला, शहाळ्याला, सुक्या खोबर्‍याला वेगवेगळे शब्द नाहीतच. 'नारियल' या शब्दातच सगळं सामावतं. यापेक्षा वेगळी गंमत मल्याळी भाषेत दिसते. मल्याळममध्ये नारळाला 'नालिगेरम्' आणि शहाळ्याला 'एळनीर' म्हणतात. पण सुके खोबरे हा आहाराचा भाग नसल्यामुळे त्याला शब्द नाही. गरजच पडली तर 'कोपरा' म्हणून काम भागवलं जातं. पण तो मल्याळममधला शब्द नव्हे. या एकाच वस्तूची कालमानानुसार पक्व झालेली तीन वेगवेगळी रूपं आणि त्यासाठी वेगवेगळे शब्द, मला वाटतं, फक्त मराठीतच दिसतात.
फळ म्हटलं की त्यात बी आलीच. (बिनबियांची द्राक्षं आणि बिनबियांची पपई सोडून देऊ.) त्यांना सरसकट बिया म्हटलं जात असलं तरी काही फळं मात्र आपलं स्वत्व आणि सत्त्व वेगळं राखतात. चिकू, जांभूळ, पेरू यांच्या त्या बिया, पण आंब्याची मात्र बाठ किंवा कोय; फणसाची आठळी आणि चिंचेचा चिंचोका.

उसाला बिचार्‍याला बीच नाही, त्याच्या पेराशी असतात 'डोळे'. तिथूनच तो रुजतो आणि उसाला खालीवर असतात शेंडे-बुडखे. एखाद्या गोष्टीला शेंडा बुडखा नसणं हा वाक्प्रचार त्या उसावरूनच आलेला आहे. उसाच्या तळाचा भाग तो बुडखा आणि वरचा तो शेंडा. हा आगापिछा ज्या गोष्टीला नाही तिच्यावर विश्वास कसा ठेवणार?

भाषेचा बुडखा, भाषेची मुळं तर परंपरेत, लोकजीवनात, संस्कृतीत खोलवर रुजलेली असतात. त्यांच्यातून सत्त्व घेऊनच मोकळ्या वातावरणात तिला नव्या आविष्काराचे नवे शेंडे, धुमारे, फुटत असतात, विस्तारत असतात. एवढ्यासाठीच भाषेकडे 'डोळस' दृष्टीनं पाहायला हवं. तरच भाषेची गोडी चाखता येईल.

सुप्रिया, 61/14 एरंडवणे, प्रभात रोड, 14वी गल्ली
इन्कमटॅक्स ऑफिसजवळ, पुणे 411 004
भ्रमणभाष : 094230 09522

क्रियापदाचे बदलले स्थान

सलील वाघ

मराठी आहे एतद्देशीयांची भाषा. तिच्यात होत आहेत काही बदल, विशेष ठळक. काही गोष्टी जाणवतात. काही खुपतात. काही करतात संभ्रमित आणि विचारप्रवण. इंग्रजी भाषेच्या वाक्यरचनेत येते क्रियापद अगोदर. मराठीतही ते येत नाही असे नाही. ते येते, शक्यतो ललित साहित्यात किंवा अपवादात्मक परिस्थितीत. परंतु आता झाली आहे सर्वसाधारण परिस्थितीच अपवादात्मक! दूरदर्शनवर वाढली बातम्यांची चॅनेल्स. २००५ नंतर बनली परिस्थिती जास्त गंभीर. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या कामगारांचा होता त्यात जास्त भरणा. त्यांची बोली गेली लगेच उचलली. हिंदीवर लगेचच पडला त्याचा प्रभाव. मराठी भाषा म्हणून रेटा किंवा रोध शून्य. कारण मराठी माणूस एकतर (परक्यांसाठी) मनमिळाऊ. त्यातून बुद्धिवादी. शिवाय सहिष्णू. वर समाजकारण राजकारणात माहीर. मात्र भाषेबद्दल अव्वल अनास्था. प्रस्तुत लेखकाने केले एक अनौपचारिक सर्वेक्षण. यात निरीक्षली मराठीतली प्रमुख वृत्तपत्रे, दोन हजार पाच सालापासून. 'महाराष्ट्र टाइम्स,' 'लोकसत्ता', 'सकाळ', 'केसरी', 'लोकमत', 'पुढारी' ही वृत्तपत्रे आणि आजतक, स्टार, अल्फा, झी, आयबीएन, साम ही बातम्यांची चॅनेल्स, यांचे केले वाचन - आणि घेतली नोंद. त्यातून लक्षात आली ही बाब. मराठीवर पडतो आहे प्रभाव. शब्दक्रमासहित वाक्यरचनेचे केले जाते आहे अनुकरण. त्यामुळे क्रियापदाचे बदलले स्थान! ही नुसती नाही निव्वळ एक भाषाशास्त्रीय गोष्ट. याला आहे उद्याची अनेक मानवी परिमाणे. आज संस्कारक्षम वयात असलेली (४ ते १४) मराठी पिढी मोठी होणार आहे ऐकून हीच भाषा. आपण होत चाललो आहोत का जास्त जास्त अ‍ॅक्शन ओरिएंटेड? आपल्याला हवी 'क्रिया' अगोदर म्हणून येत आहे 'क्रियापद' अगोदर. याला नाही केवळ एक व्याकरणिक परिमाण. याचे संदर्भ आहेत अजून खोलवर. क्रिया म्हणजे ‍अ‍ॅक्शन. अ‍ॅक्शन म्हणजे एक्साइटमेंट. समकालीन मराठीभाषकाचे सार्वजनिक जीवन झाले आहे सवंग. खाजगी जीवन झाले आहे खोखले. त्यामुळे ही दोन्हीकडची पोकळी भरून काढण्यासाठी त्याला काहीही करून हवी आहे एक्साइटमेंट. एक्साइटमेंटला वापरू इथे मराठी शब्द 'सनसनाटी'. मराठयांना हवी आहे सनसनाटी. म्हणून सरकले आहे क्रियापद आधी.

स्वयंपाकघरातील हरवलेले शब्द

स्वयंपाकघराच्या रचना, तेथील वस्तू, त्यांचा वापर - सारेच बदलत आहे. आठवलं एका अगदी छोट्या टोपलीवरून. माझ्याहून सहासात वर्षांनी मोठी असलेली माझी आतेबहीण माझ्याकडे ती टोपली पाहून उद्गारली, 'अगो बाई मीना, तुझ्याकडे किती छान कुरकुला आहे.'' किती वर्षांनी कानावर पडला तो शब्द, मग आठवली दुरडी - तांदूळ धुण्यासाठी. परडी सुद्धा, पण ती फुले वेचून देवघरात ठेवण्यासाठी! सर्वात मोठा तो हारा. पण ते नित्याचे नव्हेत. हाराभर, फुले, हाराभर आंबे असे कार्यप्रस्था-लाच लागत. अशावेळी मंडईतील हारेवाली भाजी घेऊन आपल्या सोबत घरी येई.

नंतर आठवतात झाकण्या - गोठाच्या. वेळण्या बिनगोठाच्या. भांड्यांवर चपखल बसणार्याय. भातातलं पाणी वेळून टाकणं त्यामुळे सोपं जात असे. छोट्या मंडळींना पाणी पिण्यासाठी गडू, चंबू, बुडकुली किंवा झारी. मोठ्यांना फुलपात्र आणि गडवा, लोटी किंवा तांब्या. पूजेसाठी पंचपात्र. पातळ पदार्थ एकदाच भरपूर वाढता यावा- खेळत बसायला लागू नये म्हणून 'ओगराळं'. प्रवासात फिरकीचे तांबे; पेढेघाटी डबे, चटणी, मिठासाठी दगड्या. तुपासाठी तांबुली किंवा सतेलं. भात-वरणाच्या तपेल्या, आमटी भाजीच्या बोगण्या. निरुंद तोंडाचा गुंड आणि उभा गंज. निखार्‍यावर साखरपाकाच्या वड्या बनवण्यासाठी 'लंगडी', चुलीला जोडलेला 'वैल'. लोणच्याच्या बरणीला बांधायचा 'दादरा'. मोठ्या वाट्या - म्हणजे वाडगे. तर छोटे घमेले म्हणजे तसराळे. भाकरीचे पीठ मळायला काथवट. वरचे झाकण टोपीदार असणारं मोदकपात्र. छोटी ती मडकी. त्याहून मोठं गाडगं. मडक्याहून लहान बोळकं. त्याहूनही लहान 'खुलं.' गाडग्यात पीठ साठवणे किंवा तांदळाच्या वड्याचे पीठ भिजवणे. तर मडक्यात दहीभात ठेवून त्यावर पाणी ओतून ठेवला व सकाळी पाणी काढून टाकून खाल्ला तर भाताचा उंडा/उंडी - उन्हाळ्यात थंडावा देणारी! भाज्यांमध्ये डाळ-दाणे म्हणजे व्यंजन. विरघळणारे म्हणजे 'हसणारे' अनारसे. 'चंदेरी' घाटाच्या वाट्या. धान्य मोजायच्या अधोल्या, पायल्या, पासरी. आणि सर्वात छोटा हाताचा 'पसा'. हंडा ठेवायची घडवंची, तर घागरी खाली चुंबळ. तुम्हांला आठवतात अजून काही?

३९/३५, विजय अपार्टमेंट्स, कर्वे रस्ता, पुणे ४११ ००४. दूरभाष : २५४२ ४४८०

हद्दपार शब्द

भाषेमध्ये शब्द नाण्यासारखे असतात. ते बोलीभाषेत, व्यवहारात, वाङ्मय-व्यवहारात सतत 'चालते' हवेत. नाण्याला फक्त अर्थ असतो. परंतु शब्द अर्थपूर्ण असतो. तो जीवनाशी साक्षात जोडलेला असतो. तो ज्यावेळी जीवनापासून तुटतो तेव्हा तो भाषेतून हद्दपार होण्याची प्रक्रिया नकळत सुरू होते. पूर्वी ग्रामीण जीवनात विवाहातून नाती निर्माण होत, ती जवळपासच्या गावातूनच. त्यामुळे नवीन येणारी सून या ग्रामव्यवहाराशी निगडित असे. शब्द तिला ठाऊक असत. आता शहरातील मुलगी सून म्हणून गावात गेली की ती या शब्दांविषयी अनभिज्ञ असते. एक घरचाच अनुभव सांगते. माझ्या भावाची नातसून आली. घरातीलच शेती. त्यामुळे वाडीत जाणे, काम करवून घेणे सारे ओघाने आलेच. नुकतीच गुहागरला गेले तेव्हा ती आणि मी वाडीत गेलो. तिथे वाडी बेणणार्‍या बायकांना तिने सांगितले, 'वाडीतील सारं गदळ एकत्र करून जाळून टाका' मी सहज विचारले- "यात काय काय आहे माहीत आहे तुला?'' "त्यात काय असणार? ते सारं गदळ.'' मी त्या ढिगाशी उभी राहिले आणि तिला सांगू लागले - ही झावळी, याची उभी दोन कांडी केली की दोन 'तळकटं' होतात. तळकट स्वतंत्र विणून परत ती एकत्र बांधली की 'झाप' होतो. ही माडाची पोय, नारळ लागतात त्याच्या मागील जो भाग असतो त्याला लगटून आहेत या 'पिचोंदर्‍या'. पातळ जाळीदार अशा.

झावळीच्या पुढचा बुडखा कापला की तो होतो 'खाका'. झावळीच्या पात्या स्वतंत्र करून बांधायचा तो 'बिंडा'. पाती तासून काढली की मधे लवलवीत लांब तीन साडेतीन फूट पातळ पिवळसर भाग हाती राहातो तो 'हीर'. हिराची केरसुणी बांधायची. या केरसुणीची ही कितीतरी रूपे. केरसुणी सुंभाने 'पिंढर्‍या वर' (लाकडाचे पिढे) ठोकून काथ्याने-सुंभाने बांधायची. प्रथम ती असते 'लक्ष्मी'. ती देवघरात फिरते. मग होते 'वाढवण.' तिचा वावर माजघर, कोठी, स्वयंपाकघर असा. 'वाढवण' वापरून जरा कमी होते, ती 'केरसुणी.' ती ओटी, पडवी, अंगणात फिरू लागते. ती आणखी बुटकी होते, की होतो 'खराटा' तो थेट गोठ्यात पोहचतो शेण लोटायला. बाथरूम धुवायला, सारवायला. आता 'लक्ष्मी', 'वाढवण', 'केरसुणी', 'खराटा' ही एकाच वस्तूची बदलती रूपे.

'रामा गडी' नारळाच्या झाडावर 'पायंडा' अडकवून चढतो. तो सुंभाचा असतो. पण 'पायंडी' म्हणजे समुद्राकडे जाणारी छोटी वाट. नारळ पाडणारा 'पाडेकरी'. तो नारळाच्या 'पेंडीं' उतरवतो. 'पेंडसाने' निसतो (सोलतो) नारळ 'श्रीफल' फक्त देवघरात. नारळ देवापुढे 'वाढवतात' आणि स्वयंपाकासाठी 'फोडतात'. फोडलेल्या नारळाच्या दोन वाट्या. त्याला 'बक्काल'ही म्हणतात. नारळाची वाटी खरवडली की 'करवंटी' होते. ती घासून गुळगुळीत केली की रांगोळी ठेवायला 'भेली' होते. करवंटी फुटली की 'नरोटी' होते. 'वाटी', 'बक्कयल', 'करंवटी', 'भेली', 'नरोटी' - एकाच वस्तूची ही रूपे. गाईला गोर्‍हा होतो, पाडस होते. म्हशीला रेडा किंवा रेडी होते. पण नवजात रेड्याला श्रीवर्धन भागात 'खोगा' म्हणतात.

वाडीत सुपार्‍या गोळा करायला 'रोवळा' असतो; पण स्वयंपाकघरात तांदूळ धुवायला तिचे रूप संकोचते, बेताचे होते आणि ती 'रोवळी' होते. वाडीत नारळ भरून आणायला 'हारा' असतो. निसलेले नारळ घरात येतात ते 'पाटी'तून. हीच पाटी जरा साजिरं आणि बाळरूप घेऊन स्वयंपाकघरात अवतरते. ती होते 'दुरडी'. पोहे कांडायची 'साळ' धुवायला ती लागतेच.

आता गावात गोठे नाहीत. तिथेही पिशवीतून दूध येते. पोहे दुकानात मिळतात. त्यामुळे 'उखळ', 'कांडप', 'मुसळ', 'सारणी', 'दोमुखं' (दोन ठिकाणी मुख असलेले मातीचे मडके. त्यात पोह्याची साळ भाजली जायची) साळ भाजायचे 'घाटणे' हे सारे शब्द राहाणे मुश्कीलच नाही का?

'निवणी' आणि 'अडणी' हे दोन शब्द. शंखाखाली देवघरात 'अडणी' असते ती कदाचित माहीत असेल. कोकणात बालपणी आमच्याकडे दूधदुभत्यासाठी विविध आकाराची मातीची मडकी होती. ती जमिनीवर स्थिर रहाण्यासाठी त्याच्याखाली आई 'निवणी' ठेवायची. 'निवणी' म्हणजे काश्यापासून केलेली गोल आकाराची वस्तू. मडक्याच्या आकारानुसार ही निवणी असायची. ताकाच्या डेर्‍यायखाली लहान मुलाच्या मनगटाएवढी जाड गोल निवणी असायची. आता ताकमेढी (घुसळखांब) गेला, निवणी गेली, दुधाणीही गेली; कारण त्यांची गरजच संपली.

आज स्वयंपाकघरातील असे कितीतरी शब्द नवीन मंडळींना ठाऊक नाहीत. ते कदाचित कोशात रहातील. त्यांची जरा या ठिकाणी नोंद करते. पूर्वी भात चुलीवर शिजायचा. तांब्याचं एक मोठं सतेलं सतत चुलीवर असायचं. ते बाहेरून मशेरीने पूर्ण काळं व्हायचं. त्याला म्हणायचं 'मेशरं' किंवा 'मशेरकं'. स्वयंपाकाला पाणी सारखं त्यातून घ्यायचं. भात करायला आकारानुसार तांब्याची तपेली, सतेली असायची. शेरभर भात मावेल ते 'शेरकं', तसंच 'दशेरकं' असायचं. तांदूळ मोजायला लाकडांचे 'निठवं' असायचं. भाताला तांदूळ काढायचे त्याला 'ओयरा' म्हणायचे आणि शिजत लावताना तो तपेल्यात 'वैरायचा'. फोडणी करायच्या मोठ्या लोखंडी पळीला म्हणायचे 'थावर'. भरपूर ताक ठेवायला असायचा 'गुंड'. तो कथलाचा असायचा. ताक वाढायला 'कथली' तर तूप वाढायला 'तांबली.' चूल पेटायची 'शेणी' किंवा 'गोवरी'ने. तिला 'थापट्या' पण म्हणत. ओगराळे, तसराळे, टोप, वेळणी (ताटली) रोवळी (बुरडाचीच असायची) वरणभात (एकात वरण एकात भात असं जोड भांडं. वर दांडा असे) बोगणी, भगुलं अशी नाना भांडी आठवताहेत.

कोकणात शंभर वर्षापूर्वीचं माझं घर आहे. ही सारी भांडी मी एका पेटार्‍याअत जपून ठेवली आहेत. माझ्या नातीला गंमत म्हणून दाखवते. आता संसार स्टीलचे आणि प्लॅस्टिकने चकाचक सजले. पितळ्याचे भांडे आता घरात दिसणेच कठीण. काही भांड्यांनी स्टीलचे आकार स्वीकारले. त्यामुळे पिंप, हंडा, परात, कळशी हे शब्द रहातील. पण 'बोगणी,' 'वरणभात,' 'कथली', 'गुंड' हे शब्द आता स्वयंपाकघरातून हद्दपार झाले. अजून दोन पिढ्यांत ते भाषेतून हद्दपार होतील आणि कदाचित कोशात रहातील. हे अटळ आहे. तरीसुद्धा जड वस्तूशीही माणसाचे मन जोडलेले असते. म्हणून त्यांची ही नोंद.

या सार्‍या शब्दांशी आमच्या पिढीचं भावपूर्ण नातं होतं. आता या शब्दांचं प्रेम नवीन पिढीला कसे राहणार? बदलते जीवन नवीन शब्द घेऊन येणे अपरिहार्य आणि अटळच आहे. या शब्दांनी आता राहायचे कोशात आणि कधी हाकारले तर साहित्यात!

लीला दीक्षित
'धृवा', ४९/२, सहजानंद, कोथरूड, पुणे ४११ ०३८ भ्रमणभाष : ९४२२५ २६०४१

तेलुगु-मराठी शब्दयोजन

प्रत्येक भाषेची काही एक विशिष्ट प्रवृत्ती असते. काही विशिष्ट वाक्प्रयोग असतात. तत्सम शब्दांचे अर्थ व भावही त्यात अनेक वेळा बदललेले दिसतात. मराठीपेक्षा वेगळ्या वाटणाऱ्या तेलुगूतील शब्दांच्या अर्थच्छटांचा विचार करून पुढील उतारा सिद्ध केला आहे. उताऱ्यातील अधोरेखित शब्द हे तत्सम शब्द आहेत तर अन्य अधोरेखित शब्द हे त्या त्या ठिकाणी उपयोजिल्या जाणाऱ्या तेलुगु शब्दांचे अनुवाद होत. मराठी वर्तमानपत्रात त्या जागी प्रायः कोणते शब्द येतात, हे कंसांत दर्शविले आहे.

काही दिवसांपासून असलेली कल्लोलित (अशांत) परिस्थिती आता बरीच शांत झाली. कर्फ्यू उचलून फेकून दिल्यावर  (उठवल्यावर) एकही अवांछनीय (अप्रिय) संघटना (घटना) घडली नाही. कर्फ्यूच्या काळात काही लोकांनी आवेशाने (रागाने) घरे व दुकाने जाळली. अशा दौर्जन्य (गुंडगिरी) करणाऱ्या लोकांना शासन कडक शिक्षा करील, असे मुख्यमंत्री एका बहिरंग सभेत (जाहीर सभेत) म्हणाले. दोन्ही जमातींच्या एका समावेशात (बैठकीत) प्रत्येक धर्मियास आपापल्या संप्रदायाप्रमाणे (परंपरेप्रमाणे) वागण्याचा हक्क आहे असे प्रतिपादले, व भद्रंगा (शांततेने) राहण्याचे आवाहन केले. जातीय (राष्ट्रीय) ऐक्याच्या गोष्टी आपण बोलतो पण कुलवाद (जातीयता) आपल्या समाजातून अजून गेला नाही. तिकडे तिकडे (कुठे कुठे) तेव्हा तेव्हा (कधी कधी) अशा घटना घडणे वेगळे, पण आता तो नित्याचाच भाग होऊन बसला आहे. भारताचे चरित्र (इतिहास) अशाच घटनांनी भरलेले आहे. एखाद्या प्रमादाने (अपघाताने) माणसे दगावणे वेगळे व आपणच आपणांस मारणे वेगळे. यावर उपाय म्हणजे निम्नस्तरीय लोकांची आर्थिक सुधारणा व्हायला हवी असे काही वक्त्यांनी एका संतापसभेत (शोकसभेत) सांगितले. काही वक्त्यांनी कारखान्यांचे जातीयीकरण (राष्ट्रीयीकरण) करावे असे सुचविले. मुख्य म्हणजे निरुद्योगी (बेकार) लोकांना काम मिळावे. शांतता निर्माण करणाऱ्या लोकांना बहुमति (बक्षीस) द्यावी, असेही एकाने सुचविले. कर्फ्यूमुळे कामकाज स्तंभित (ठप्प) होते, हे समाजाच्या दृष्टीने बरे नव्हे. परिस्थिती तृप्तिकारक (समाधानकारक) झाल्यास कर्फ्यू लावण्याचा अवसर (आवश्यकता) येणार नाही, हेही खरे. शासनाने दंगलपीडित लोकांना उचितरीतीने (विनामूल्य) धान्य देण्याची व्यवस्था मात्र केली पाहिजे, व अन्य सदुपायही (सोयीही) पुरवावेत, स्वच्छंद संस्था (स्वायत्तसंस्था) यांनीही याबाबतीत थोडा भार उचलला पाहिजे. आता अंकितभावाने  (समर्पित वृत्तीने) काम करणारी माणसेच दुर्मीळ झाली आहेत. दुरभिप्रायातून (गैरसमजातून) अनेकदा कलह निर्माण होतात, ते टाळले पाहिजे, म्हणजे प्रदेशाची सर्व रंगांत (क्षेत्रांत) प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. या भूमिकेस कुणाचेही अभ्यंतर (आक्षेप) राहणार नाही.