प्रा. प्र. ना. परांजपे

मराठी भाषेच्या विकासाच्या वाटा - ६ : राजाश्रय व लोकाश्रय

कुठल्याही भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी राजाश्रय व लोकाश्रय या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. यातल्या कोणत्याही एका आश्रयाच्या अभावी भाषेच्या विकासाचा प्रवाह अवरुद्ध होतो, कुंठित होतो. निदान हव्या त्या वेगाने तो वाहू शकत नाही. या दोन आश्रयांपैकी कोणता अधिक महत्त्वाचा हे ठरविणे अवघड आहे. सोव्हिएट रशियामध्ये रशियन भाषेला भक्कम आश्रय होता. पण त्या संघराज्यातील उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान अशा अनेक राज्यांमध्ये रशियन भाषा फारशी प्रभावी ठरू शकली नाही; भारताच्याही विविध भागांत वेगवेगळ्या काळात पर्शियन, इंग्रजी, फ्रेंच, पोर्तुगीज या राजभाषा होत्या. पण त्या अल्पसंख्य सुशिक्षितांपर्यंतच मर्यादित राहिल्या. इंग्लंडमध्ये मात्र १६व्या शतकापासून इंग्रजीला राजाश्रय व लोकाश्रय यांचा लाभ झाला आणि त्यामुळे इंग्रजीचा विस्तार व विकास झपाट्याने झाला.
१९६० पूर्वी मराठीला राजाश्रय कधीच नव्हता. मराठीच्या गळचेपीविरुद्ध, तिला मिळणार्याश दुय्यम वागणुकीविरुद्ध ज्ञानेश्वरांना बंड करावे लागले. शहाजी राजांच्या पदरी असलेल्या कवींच्या यादीत मराठी कवींची संख्या संस्कृत कवींच्या तुलनेने अत्यल्प होती. शिवाजी महाराजांचा आश्रय होता तो भूषण या हिंदी कवीला. त्यांनी राज्यव्यवहारकोश तयार करवून घेतला तो संस्कृतच्या धर्तीवर. रामदास, तुकाराम यांचा राज्यकर्त्यांनी गौरव केला तो ते साधू, संत होते म्हणून; कवी होते म्हणून नव्हे! पेशवाईतही प्रतिष्ठा होती ती संस्कृतला. १८१८नंतर राज्यकारभाराच्या सोयीसाठी मराठीची गरज भासू लागली. त्यामुळे इंग्रज राज्यकर्त्यांनी मराठी-इंग्रजी (मोल्सवर्थ) व इंग्रजी-मराठी (कॅंडी) हे दोन कोश तयार केले. दक्षिणा प्राइझच्या रूपाने मराठीतील ग्रंथरचनेला, भाषांतरांना उत्तेजन दिले. शालेय व पुढे महाविद्यालयीन पातळीवरील शिक्षणात मराठीचा समावेश केला. पण प्रशासन, न्यायालय इत्यादी ठिकाणी मराठीला स्थान नव्हते; प्रतिष्ठेच्या जागेवर संस्कृतच्याऐवजी इंग्रजी आली होती.
पण या काळात मराठीला लोकाश्रय मात्र होता. संत-पंत-तंत यांच्या काव्याला लाभलेली प्रतिष्ठा व लोकप्रियता यामुळे मराठीचा, मंद गतीने का होईना, विकास होत राहिला. तिच्या भाषकांना तिच्याबद्दल अभिमान वाटत राहिला. तिचे पांग फेडण्याची ओढ त्यांना वाटत राहिली. त्यामुळे व्याकरण, पत्रकारिता, साहित्य, कोशरचना अशा तिला सशक्त करण्याच्या अनेक प्रयत्नांदची परंपरा निर्माण झाली. दुर्दैवाने असे प्रयत्न् राजाश्रयाच्या अभावामुळे एकांड्या शिलेदारीने होत राहिले. त्यांना संघटित, संस्थात्मक स्वरूप न लाभल्यामुळे त्यांच्यात सातत्य राहिले नाही. नवीन प्रयत्नांेना पूर्वप्रयत्नांाच्या अनुभवांचा व फलनिष्पत्तीचा आधार मिळत न राहिल्यामुळे प्रत्येकाला परत परत श्रीगणेशाय नम:पासून प्रारंभ करावा लागला.

१९६०नंतर हे चित्र काहीसे बदलले. पूर्वी कधी नव्हता तो राजाश्रय मराठीला लाभला. या वस्तुस्थितीला सुमारे पन्नास वर्षे झाली.

मराठीला राजभाषेचा दर्जा मिळून पन्नास वर्षे होत आली, पण पूर्वीच्या संस्कृत व नंतरच्या इंग्रजीची प्रतिष्ठा मराठीला लाभली आहे, असे म्हणता येत नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या दरवर्षी वाढते आहे आणि मोठ्या शहरातील मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या घटते आहे. मराठीचा प्राध्यापक असलेल्या एका मंत्र्याने इयत्ता पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा निर्णय अंमलात आणून इंग्रजीच्या प्रतिष्ठेत भर घालण्याचे पुण्यकर्म केले. शब्दकोश, विश्वकोश अजून पूर्ण झालेले नाहीत. भाषा-आयोग नेमणे, मराठीच्या बोलींची पाहणी, नोंद, दस्तावेजीकरण याची निकड शासनाला अद्याप जाणवलेली नाही. मंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सर्व पुढारी चित्रवाणीला मुलाखती, मतप्रदर्शन, माहिती देताना मराठीचा आग्रह धरत नाहीत. शासनाने भाषाभिवृद्धीसाठी किती पैसे खर्च केले एवढा एकमेव निकष मराठीचा राजाश्रय सिद्ध करायला पुरेसा आहे का? मराठीकडे पाहण्याची दृष्टी, मराठीला वागविण्याची तर्हाआ, मराठीसाठी करावयाच्या कामांची तड लावण्याची आच - अशा गोष्टींकडे पाहिले तर मराठीला राजाश्रय आहे यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

मग लोकाश्रयाचे काय? मराठीला पूर्वी असणारा लोकाश्रय आज त्या प्रमाणावर आणि त्या पातळीवरचा आहे का? खरं पाहाता, राजाश्रयामुळे लोकाश्रयात वाढ व्हायला हवी. त्याची व्याप्ती व खोली वाढायला हवी. भाषेच्या विकासाला वेग यायला हवा. पण मराठीच्या बाबतीत तसे चित्र आज दिसत नाही. मराठीबद्दलचा अतिरिक्त (आणि बर्या च वेळा असमंजस) अभिमान वेळोवेळी दिसून आला तरी त्याचे परिवर्तन भक्काम व भरीव कृतीत होत नाही. मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या व गुणवत्ता वाढण्याऐवजी त्या बंद पडत आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणून पालक धडपडत आहेत; त्यासाठी देणगी व अव्वाच्या सव्वा शुल्क मोजायची त्यांची तयारी आहे. नऊ-दहा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती ५०० प्रतींची असते! इंग्रजी बोलायला शिकवणार्यां खासगी वर्गांच्या जाहिरातींनी वर्तमानपत्रांचे रकाने भरलेले असतात; पण मराठी शिकवणार्याल वर्गाची जाहिरात औषधालाही आढळत नाही. मराठी वृत्तपत्रांना इंग्रजी शीर्षकांच्या पुरवण्याच नव्हे तर इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्याची आवश्यकता वाटते. ही सगळी लक्षणे मराठीच्या लोकाश्रयाची आहेत असे म्हणता येईल का?

आज मराठीचा राजाश्रय तोंडदेखला आहे, औपचारिक आहे आणि लोकाश्रय तकलादू आहे. लोकांना हे जाणवते; व्यवहारात त्याचा त्यांना अनुभव येतो. दुकानांवर देवनागरीतील पाट्या लागल्या तरी दुकानांत मराठी बोलले जाईलच असे नाही. मराठीचा विकास व्हायचा असेल राज्यकर्त्यांच्या वृत्तीत व आचरणात मूलभूत फरक व्हायला पाहिजे; मराठीला खर्याय अर्थाने राजाश्रय मिळायला पाहिजे. तो मिळाला की लोकांच्या दृष्टिकोनात फरक पडायला वेळ लागणार नाही. आणि तसे झाले की लोकाश्रय भक्केम होईल.
मग मराठीच्या विकासाला कुणीही, कसल्याही सीमा घालू शकणार नाही.

प्र० ना० परांजपे

शंका आणि समाधान

...समाधान

(संदर्भ: भाषा आणि जीवन : अंक २५.४ दिवाळी २००७)

१. स्वल्पविराम - 'की'च्या आधी की 'की'नंतर ?

शंभराव्या अंकाचे संपादकीय: साहित्याचे सांस्कृतिक संदर्भ आणि भाषांतर

विल्यम गोल्डिंगच्या 'लॉर्ड ऑफ दी फ्लाईज' या कादंबरीच्या अखेरीस येणार्‍या ब्रिटिश नाविक अधिकार्‍याच्या तोंडी एक वाक्य आहे.: "I know Jolly good show, Like the Coral Island" ("आय नो, जॉली गुड शो, लाइक द कोरल आयलंड"). या कादंबरीचे जी०ए० कुलकर्णी यांनी मराठी भाषांतर केले आहे. त्यात या वाक्याचे भाषांतर म्हणून पुढील वाक्ये येतात : "आलं ध्यानात ! तुम्ही येथे सगळी मजाच केली म्हणायची ! प्रवाळ-द्वीपविषयीच्या पुस्तकात नेहमी असते तशी! निळे स्वच्छ पाणी, सोनेरी वाळू, पिकलेली रसरशीत, सहज हाताला येणारी फळे, निष्पाप गोड खेळ, नाटके, खोट्या खोट्या लढाया, गोड गोड गाणी! आणि मग सगळं विसरून एकमेकांच्या गळ्यात गळा घालून चांदण्याखाली गोड स्वप्न पाहात घेतलेली गुलाबी झोप - चांगली चैन केलीत तुम्ही!"

असं का व्हावं? एका 'कोरल आयलंड'च्या भाषांतरासाठी जी०एं०ना इतका विस्तार करण्याची आवश्यकता का भासली?

ललित साहित्याच्या भाषांतरामध्ये येणार्‍या एका महत्त्वाच्या समस्येचं दर्शन यातून घडते. आणि या समस्येच्या सोडवणुकीचा एक निश्चित, प्रमाण असा मार्ग नाही.

काय आहे ही समस्या? 'कोरल आयलंड' ही आर०एम० बॅलंटाइन या ब्रिटिश लेखकाची १८५७ मध्ये प्रसिद्ध झालेली रोमँटिक कादंबरी आहे. एका बेटावर अडकलेल्या तीन ब्रिटिश मुलांची साहसकथा आहे. त्या कादंबरीचा उल्लेख करून गोल्डिंगने आपल्या कादंबरीला एक संदर्भ चौकट दिली आहे. गोल्डिंगच्या कादंबरीतही एका बेटावर अडकलेली मुले आहेत; पण त्यांचे वर्तन 'कोरल आयलंड'मधील मुलांच्यापेक्षा फार भिन्न आहे. स्वार्थ, मत्सर, हेवेदावे, खोटेपणा, अंधश्रद्धा आणि हिंसा यांमुळे ती सुसंस्कृत, शिस्तबद्ध मुले हळूहळू रानटी 'आदिवासी' बनत जातात. 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज'मध्ये या बदलाचे धक्‍कादायक दर्शन होते. मुले निष्पाप असतात, ती 'देवाघरची फुले' असतात, या १९व्या शतकात लोकप्रिय असलेल्या समजुतीला छेद देणारी ही कादंबरी १९५४ मध्ये (म्हणजे 'कोरल आयलंड'नंतर ९७ वर्षांनी प्रसिद्ध झाली. आपल्या कादंबरीने वाचकांना 'कोरल आयलंड'ची आठवण व्हावी आणि त्यांच्यात व्यक्त होणार्‍या दृष्टिकोणांमधील विरोध वाचकांच्या लक्षात यावा म्हणून गोल्डिंगने नाविक अधिकार्‍याच्या तोंडी 'कोरल आयलंड'चा उल्लेख घातला आहे.

(ज्या वाचकांनी 'कोरल आयलंड' वाचली आहे त्यांना तिच्या उल्लेखामुळे 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' सुन्न करील, अंतर्मुख करील यात शंका नाही. माणूस समजण्याच्या बाबतीत १९व्या शतकातील लोक भाबडे होते का?)

दोन महायुद्धांमुळे (लॉर्ड ऑफ दी फ्लाइज'मधील काळ तिसर्‍या महायुद्धाचा आहे.) माणसात मूलभूत फरक पडला आहे का? स्वार्थ-द्वेष-मत्सर-हेवा व हिंसा यांमुळे माणूस स्वतःचाच नाश ओढवून घेणार आहे का? असे अनेक प्रश्न त्याला पडतील. त्यामुळे ब्रिटिश वाचकांच्या दृष्टीने 'कोरल आयलंड'चा उल्लेख महत्त्वाचा आहे यात शंका नाही.

पण मराठी वाचकांचे काय? मराठी वाचकांनी 'कोरल आयलंड' वाचली असेल असे गृहीत धरता येत नाही. मग भाषांतरकाराने हा उल्लेख जशाच्या तसा ठेवायचा ? की तो पूर्णतः वगळायचा? की जी०एं०नी केला आहे त्याप्रकारे त्या उल्लेखाचा विस्तार करावयाचा ? की त्यावर एक पदटीप देऊन त्याचा अर्थ स्पष्ट करायचा ? या प्रश्नाला सर्वांना मान्य होईल असे एक 'प्रमाण' उत्तर नाही, हे उघड आहे.

'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' या कादंबरीचे शीर्षकच पाहा. त्याचे भाषांतर करायचे नाही असा निर्णय भाषांतरकार व प्रकाशकांनी घेतला. बायबलच्या 'सेकंड बुक ऑफ दी किंग्ज' च्यापहिल्या प्रकरणाच्या दुसर्‍या परिच्छेदात बाल्झेबब (Balwze-bub) चा उल्लेख आहे. हिब्रू भाषेत त्याचा अर्थ ' माश्यांचा स्वामी' असा आहे. खोट्या देवांच्या पैकी तो एक आहे. ग्रीक भाषेत त्याचा अर्थ 'सैतान' असा आहे. ('न्यू टेस्टामेंट'मधील मॅथ्यूच्या पुस्तकातील १२व्या प्रकरणात परिच्छेद २४ व २७ मध्येही बील्झेबबचा उल्लेख आहे.) कादंबरीत मृत वैमानिकाच्या प्रेतावर माश्या घोंघावत आहेत आणि पॅरॅशूटमध्ये अडकलेले ते प्रेत वार्‍यामुळे मागेपुढे हलताना दिसते. त्यालाच मुले 'लॉर्ड ऑफ दी फ्लाइज' समजतात. त्याला प्रसन्न करण्याचे बेत आखतात. अर्थात हा 'माश्यांचा स्वामी' म्हणजे मुलांच्या मनातील भीतीचेच प्रतीक आहे. (देवांचा जन्म अशा गूढ अनामिक भीतीतूनच होतो.) या शीर्षकाला असलेला बायबलचा संदर्भ लक्षात यावा म्हणून इंग्रजी शीर्षकात बदल करण्यात आला नसावा. (अर्थात याचे भाषांतर 'सैतान' असे होऊ शकते आणि मुलांच्या मनात जाग्या होऊ पाहणार्‍या दुरिताचा तो अन्वर्थक ठरू शकतो. शिवाय सैतान या शब्दाला ख्रिश्चन धर्माचा - पर्यायाने बायबलचा संदर्भ आहे. पण ते शीर्षक फार भडक ठरण्याचा धोका आहे.) साहित्यात मुरलेले सांस्कृतिक संदर्भ भाषांतरकारापुढे समस्या निर्माण करतात त्या अशा !

प्र०ना० परांजपे

पन्नासाव्या अंकाचे संपादकीय : पन्नासावा अंक

'भाषा आणि जीवन'चा हा अंक पन्नासावा आहे. 'भाषा आणि जीवन'ची मातृसंस्था, मराठी अभ्यास परिषद, १ जानेवारी, १९८२ रोजी अस्तित्वात आली. आता संस्थाही पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहे; आणि 'महाराष्ट्र फाउंडशेन'ने प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या पारितोषिकासाठी निवडलेल्या तीन वैचारिक नियतकालिकांमध्ये 'भाषा आणि जीवन'ची नुकतीच निवड केली आहे. म्हणून या टप्प्यावर थोडे मागे वळून पाहावे, असे वाटणे साहजिकच आहे. या नियतकालिकाचे नाव दुपदरी आहे. 'मराठी अभ्यास परिषद पत्रिका' हा त्यातील एक पदर. नियतकालिकांच्या नोंदणी करणार्‍या कार्यालयाच्या दृष्टीने हे नाव अधिकृत आणि निरपदवाद. वर्णनात्मक आणि दुसर्‍या कुणी न वापरलेले. पण मातृसंस्थेच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने 'भाषा आणि जीवन' हा दुसरा पदर अधिक महत्त्वाचा, कारण त्यातून मातृसंस्थेचा दृष्टिकोन व्यक्त होतो. 'भाषेत जीवन काठोकाठ भरलेले असले, तर भाषाही जीवनात शिगोशीग भरून राहिलेली आहे.' (अंक १, पृष्ठ १)

'भाषा आणि जीवन' हे धंदेवाईक विचारवंतांनी धंदेवाईक विचारवंतांसाठी चालविलेले नियतकालिक नाही. भाषातज्ज्ञ आणि इतरेजन यांनी विचारांची आणि अनुभवांची देवाणघेवाण करावी, परस्परांपासून शिकण्यासारखे असेल, ते शिकावे, आणि त्याद्वारे आपल्या समाजाचे भाषिक आणि सामाजिक जीवन विकसित आणि समृद्ध व्हावे, या हेतूने निर्माण केलेले हे व्यासपीठ आहे. मराठीतून हे प्रकाशित होत असले, तरी ते मराठीपुरते मर्यादित नाही. मराठी भाषकांच्या सर्वच गरजा भागविण्याचा प्रयत्‍न करणे हे मराठी अभ्यास परिषदेचे उद्दिष्ट आहे आणि ते साध्य करण्याचे 'भाषा आणि जीवन' हे एक साधन आहे. भाषिक गरजा या केवळ शिक्षण, व्यवसाय, अर्थार्जन यांच्यापुरत्या सीमित नसतात. व्यक्तीचे व समाजाचे मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पोषण भाषेतून घडत असते. त्यासाठी कोणतीही एकच भाषा पुरी पडण्याचा संभव — जागतिकीकरणाच्या आधुनिक रेट्यात तर विशेषत्वाने— कठीण दिसते. इतर भाषांतील ज्ञान, साहित्य यांचा यथार्थ परिचय व संस्कार आपल्या भाषेच्या विकासाला हातभार लावू शकतो. जीवनाच्या बदलत्या रूपांना व आव्हानांना सामोरे जाण्याइतकी क्षमता व लवचिकता भाषेमध्ये असेल, तर ती तिचा वापर करणार्‍यांच्या गरजा भागवू शकते. केवळ प्रतिशब्द, परिभाषा, भाषांतरे करण्याने भाषा विकसित होऊ शकत नाही. त्यासाठी नवीन संकल्पना, नवे अनुभव भाषेत व जीवनात मुरवावे लागतात. या मुरण्याच्या प्रक्रियेला हातभार लावण्याच्या प्रयत्‍न 'भाषा आणि जीवन'ने आपल्या परीने गेल्या ४९ अंकांतील २५०० हून अधिक पृष्ठांमध्ये केला आहे. आमचे हे उद्दिष्ट वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्‍न 'भाषा आणि जीवन'च्या सर्व अंगांतून वाचकांना जाणवला असेल. नियतकालिकाचे पहिले दर्शन असते, ते त्याच्या मुखपृष्ठाचे. 'भाषा आणि जीवन'च्या पहिल्या चार वर्षांतील अंकांवर अनिल अवचटांनी रेखांकित केलेले मोर वाचकांना भेटले. (मोर हे सरस्वतीचे वाहन आणि आपला राष्ट्रीय पक्षी आहे.) त्यानंतर पाच वर्षे भाषिक संज्ञापनाचे व्यंग्यचित्ररूप दर्शन शि०द० फडणिसांनी घडविले. बालम केतकरांची चित्र-कविता, शाम देशपांड्यांची लिपिचित्रे, संतकाव्यातली वेचक उद्धृते, आणि लोककला यांचे दर्शन नंतरच्या अंकांच्या मुखपृष्ठावर घडले. या मुखपृष्ठांची अर्थपूर्णता वाचकांच्या नक्‍कीच लक्षात आली असेल.

'भाषा आणि जीवन'ची संपादकीये संपादन-समितीच्या सभासदांनी लिहिलेली असतात. मातृसंस्थेच्या उद्दिष्टांशी सुसंगत अशा विषयांवरील या संपादकीयांमध्ये त्यामुळे विषय, दृष्टिकोन, मांडणी व शैली या बाबतींत विविधता आली. 'भाषा आणि जीवन'मधील विविध सदरे, त्या सदरांची नावे, पानपूरके यांमधूनही आमच्या प्रयत्‍नांचा प्रत्यय वाचकांना यावा. 'दखलपात्र', 'ज्याची त्याची प्रचीती, 'पुनर्भेट', 'विचारसंकलन', 'भाषानिरीक्षण', 'शंका आणि समाधान', 'पुस्तक-परीक्षण', इत्यादी सदरांमध्ये तज्ज्ञ आणि इतरेजन यांना सारखाच वाव आहे. 'भाषा आणि जीवन'मध्ये कवितांना स्थान आहे, साहित्याला स्थान आहे, त्याचप्रमाणे प्रशासन, कायदा, वैद्यक यांनाही आवर्जून जागा देण्यात आली आहे. त्याच्यात मराठी भाषकांबरोबरच गुलाबदास ब्रोकर, श्यामविमल, इरिना ग्लुश्कोव्हा, मॅक्सीन बर्नसन अशा अन्य भाषकांनीही लेखन केले आहे. भाषाविज्ञान, भाषाध्यापन, सुलेखन, नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे, मुलाखत, लोकशिक्षण, अनुवाद, अशा अनेक विषयांवरील लेख 'भाषा आणि जीवन'ने छापलेले आहेत. लेखसूची, संदर्भसूची, लेखनसूची, साहित्यसूची, शब्दसूची परिभाषासूची अशा विविध सूची उपलब्धतेनुसार छापण्यावरही आमचा कटाक्ष आहे. केवळ मराठीच नव्हे, तर अन्य भाषांबद्दलचे लेखन आणि अन्य भाषांमधील लेखनाचे अनुवादही आम्ही छापले.

भाषेच्या अभिमानाचे दुरभिमानात, हेकटपणात आणि इतर भाषांबद्दलच्या तुच्छतेत रूपांतर होऊ नये, असे मराठी अभ्यास परिषदेला वाटते. त्या भूमिकेचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्‍न आम्ही 'भाषा आणि जीवन'मध्ये केला आहे. भाषा आणि जीवन'चे अंक ठरवलेल्या वेळीच प्रकाशित होतात, असे नाही. याची आम्हाला जाणीव आहे. अलीकडच्या एक-दोन अंकांतील छपाईही समाधानकारक नव्हती. आम्हांला जाणवणार्‍या तीन अडचणींचे ते दृश्य रूप आहे. लेखनाचा तुटवडा, कबूल केलेले लेखन वेळेवर (कधी अजिबात) हाती न येणे ही पहिली अडचण. लेखकांशी प्रत्यक्ष व टपालाने संपर्क साधणे, नवीन लेखक शोधणे, विषयांची यादी देऊन त्यावरील लेख पाठविण्याचे जाहीर आवाहन करणे असे काही उपाय या पहिल्या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही वापरले. दुसरी अडचण आर्थिक क्षमतेच्या अभावाची. सभासदांची वर्गणी, साहित्य, आणि संस्कृती मंडळाचे अनुदान आणि आता महाराष्ट्र फाउंडेशनने दिलेले पारितोषिक यांमुळे आर्थिक अडचण काही प्रमाण काही प्रमाणात दूर होते. तरीही कागद व मुद्रणाच्या वाढत्या दरांमुळे आणि टपालखर्चामुळे आर्थिक अडचण आमची यापुढेही सोबत करीत राहील, अशी शक्यता आहे. मुद्रणतंत्रात होणारे बदल आणि त्यामुळे वेळोवेळी करावी लागलेली नवी मुद्रणव्यवस्था ही आमची तिसरी अडचण. तीही आम्ही प्रयत्‍नपूर्वक दूर करीत आहोत. आत्तापर्यंत आम्हांला वाचकांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे. आमच्या प्रयत्‍नांचे त्यांनी स्वागत केले, कौतुक केले, काही वेळा आमच्या चुकाही दाखवून दिल्या. पण त्यांच्या यापेक्षा अधिक सहभागाची आम्हाला अपेक्षा आहे. प्रसिद्ध झालेल्या लेखनाबद्दलच्या प्रतिक्रिया पाठवण्याबरोबरच त्यांनी लेखनसहकार्यही करायला हवे. ऐकू येणारे संवाद, इतरत्र वाचायला मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण लेखन, भाषेच्या वापराबद्दलची आपली निरीक्षणे, इ० अनेक गोष्टींबद्दल त्यांना लिहिता येईल. विशेषतः पानपूरकांसाठी त्यांना मजकूर पाठवता येईल. पानपूरके हे 'भाषा आणि जीवन'चे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांची संख्या रोडावल्यामुळे 'भाषा आणि जीवन'मधील पांढर्‍या जागेचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. वाचक जागरूक राहिले, तर पुन्हा एकदा पानपूरकांचे पीक चांगले येईल, अशी आम्हांला आशा आहे.

'मराठी अभ्यास परिषदे'ची स्थापना १ जानेवारी, १९८२ ला झाली आणि १९८३ च्या तिसर्‍या तिमाहीत 'भाषा आणि जीवन'चा पहिला अंक बाहेर पडला. त्यानंतर 'का०स० वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था', 'महाराष्ट्र प्रतिष्ठान' या अशासकीय संस्थांची आणि शासनपुरस्कृत 'राज्य मराठी विकास संस्थे'ची स्थापना झाली. त्यामुळे मराठी अभ्यास परिषदेने आपल्यासाठी आखून घेतलेले कार्यक्षेत्र किती महत्त्वाचे व तातडीचे आहे, हे सिद्ध झाले. एखाद्या कार्याला जेवढे जास्त हात लागतील, तितके ते अधिक हलके होते आणि आटोक्यातही येते. शासकीय पातळीवरील संस्थेकडे जशा अनेक सुविधा असतात, तशा तिच्यावर अनेक मर्यादाही असतात. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या विविध कामांमध्ये शासनाला अशासकीय संस्थांचे भरघोस व महत्त्वाचे साहाय्य होऊ शकते ही वस्तुस्थिती आता केंद्र व राज्य शासनांनीही मान्य केली आहे. म्हणून शासकीय पातळीवरील संस्थेने उद्या एखादे नियतकालिक सुरू केले, तर 'भाषा आणि जीवन'ची गरज संपणार नाही. नुकत्याच जाहीर केलेल्या पारितोषिकामुळे 'भाषा आणि जीवन'बद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि त्यामुळे आमची जबाबदारीही वाढली आहे, याची आम्हांला जाणीव आहे. वाचकांच्या प्रेमाबरोबरच त्यांचा सक्रिय सहभाग वाढत्या प्रमाणात मिळाला, तर आमचे काम सोपे होईल, असा आम्हांला विश्वास वाटतो.

प्रभाकर नारायण परांजपे