सुशांत शंकर देवळेकर

मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ०

सुशान्त शंकर देवळेकर

‘भाषा आणि जीवन’च्या (व० २८, अं० ३) अंकात आलेला ‘संगणकव्यवहाराचे मराठीकरण’ हा लेख ‘उपक्रम’ ह्या संकेतस्थळावर घातला गेला व त्याला प्रतिसाद देताना माझ्या लेखातील काही मुद्दयांबाबत काही उपक्रमींनी मतभेद व्यक्त केले आहेत. त्या संदर्भातील काही मुद्दयांचे स्पष्टीकरण करण्याचा इथे प्रयत्न केला आहे.

उद्दिष्टांत जे मुद्दे आले आहेत ते शब्द कोणते घ्यायचे ह्याविषयी आलेले नसून मराठीकरण का करायचे ह्याविषयी आहेत. व्यावहारिक विचार करायचा तर मुळात मराठीकरण करण्यात जी शक्ती घालवायची ती कशासाठी असा प्रश्न निर्माण होतो. सध्याच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचा विचार केला तर मराठीकरण न करणे हे अधिक सोयीचे आहे. तरीही जर मराठीकरण करायचेच असे ठरवले तर त्याची उद्दिष्टे लेखात दिलेल्या क्रमाने असतील. पहिले अस्मितेचा आविष्कार हे उद्दिष्ट असेल तर मराठीकरण केलेच पाहिजे. दुसरे भाषासमृद्धी हे उद्दिष्ट मानले तर मराठीकरण करणे बरे ठरेल. तिसरे आकलनसुलभता हेच उद्दिष्ट असेल तर ते साधण्यासाठी मराठीकरण केलेच पाहिजे असे नाही. त्यासाठी इतर मार्ग उपलब्ध आहेत.
भाषाभाषांतील देवघेव आणि भाषासमृद्धी ह्याबद्दल एक समज असा आहे की इतर भाषांतील शब्द स्वीकारल्याने भाषा समृद्ध होते. मला हा समज पूर्णपणे पटत नाही. भाषेची समृद्धी आपण कशी मोजतो हा खरा प्रश्न आहे.

त्यातला सर्वांत सोपा मार्ग म्हणजे भाषेतील (संकल्पनांचे वैविध्य दाखवणार्‍या) शब्दांची संख्या पाहणे (समान संकल्पना असणारे शब्द तात्पुरते वगळून). ह्या दृष्टीने विचार केला तर इतर भाषांतल्या शब्दांमुळे भाषा समृद्ध होते हे खरे आहे. पण त्यासाठी इतर भाषांतून शब्द घेणे अटळ नाही. कारण माझ्या भाषेत तितक्या संकल्पना व्यक्त करणारे शब्द मी घडवू शकलो तरी भाषा समृद्ध होणारच असते.

भाषेची समृद्धी दुसर्‍या प्रकारेही मोजता येईल. मला ही समृद्धी अधिक महत्त्वाची वाटते. एखादी भाषा मानवी जीवनातील किती प्रकारच्या व्यवहारांत वापरण्यात येते हे पाहता येईल. अशा व्यवहाराची परंपरा त्या भाषेत किती प्रमाणात रुजली आहे ह्यानुसार तिची समृद्धी जोखता येईल. अशा तर्‍हेच्या समृद्धीत इतर भाषांतून येणारे शब्द काही वाटा उचलू शकतील. पण तेही अनिवार्य नाही. इथेही मी त्या शब्दांऐवजी स्वत:च्या भाषेत नव्या संज्ञा घडवल्या तर समृद्धी उणावणार नसतेच. थोडक्यात भाषेची समृद्धी आणि शब्दांची देवघेव ह्यांचा तर्कदृष्ट्या अनिवार्य संबंध नाही. त्यामुळे भाषासमृद्धीसाठी इतर भाषांतून शब्द घ्यायलाच हवेत असे नाही.

इंग्रजी भाषेने इतर भाषांतून शब्द घेतले आहेत ह्याचा त्या भाषेच्या समृद्धीची संबंध जोडता येणार नाही. इंग्रजी भाषा समृद्ध आहे, कारण त्या भाषेला विविध जीवनक्षेत्रांतील व्यवहाराची मोठी परंपरा आहे. इंग्रजी भाषकांचे राजकीय वर्चस्व, त्यांची ज्ञानलालसा, ह्या दोहोंतून उभ्या राहिलेल्या ज्ञानव्यवहार आणि इतर व्यवहार ह्यांच्या व्यवस्था ही त्या परंपरेची कारणे आहेत. इंग्रजी ही केवळ इंग्रजांनी दुसर्‍या भाषांतून शब्द घेतले म्हणून समृद्ध झाली नाही. तसे म्हणणे हा काकतालीय न्याय झाला. त्यांनी जगभरातले ज्ञान आपल्या भाषेत आणले आणि नव्या ज्ञानाच्या परंपरा आपल्या भाषेतून आरंभल्या. ‘इतर भाषांतले शब्द घेतले म्हणून इंग्रजी समृद्ध झाली’ असा संबंध नसून ‘इंग्रजी भाषा समृद्ध झाली आणि तिने इतर भाषांतले शब्दही स्वीकारले’ असा संबंध आहे. विविध भाषकांचा संबंध आल्याने त्यांच्या भाषांतील शब्दांचीही देवघेव होत असते. ते साहजिक आहे. पण तिचा समृद्धीशी कारण म्हणून संबंध जोडणे हे योग्य नाही. तात्पर्य इतर भाषांतील शब्द घेतल्याने भाषा समृद्ध होते ही कारणमीमांसा मला मान्य नसल्याने इतर भाषांतून शब्द घेतल्याने इंग्रजी समृद्ध झाली हेही मला मान्य नाही. त्यामुळे तशा प्रकारची तथाकथित समृद्धी ही प्रशंसनीय वा निंद्य वाटण्याचे कारणच नाही.

इतर भाषांतले शब्द घेणे हे समृद्धीचे कारण नसले तरी तसे घेण्यात सोय आहे की नाही? सोय आहे हे मान्य करायला पाहिजे. विशेषत: आपण ज्या परिस्थितीत आहोत तिथे. नव्या ज्ञानाची निर्मिती, मांडणी आपल्याकडे आपल्या भाषांतून क्वचितच होते. त्यामुळे एखाद्या नव्या ज्ञानाची ओळख आपल्याला इंग्रजीद्वारे होते. त्यासंदर्भातील संकल्पना आपण इंग्रजी संज्ञा वापरूनच शिकतो. त्या संकल्पनासंबंधीचा व्यवहारही मुख्यत्वे इंग्रजी भाषेतून किंवा इंग्रजी भाषेतील संज्ञा वापरून होत असतो. मराठीत आपण जो व्यवहार करणार तो बर्‍याचदा फक्त उपयोजनात्मक असतो. अशा वेळी मराठीत वेगळी संज्ञा तयार करणे, तिचा संकेत रूढ करण्याचा प्रयत्न करणे ही कामे अधिक कष्टाची आहेत हे खरे आहे. त्यातून आपला उद्देश हा केवळ आकलन होणे इतकाच असेल तर नव्या संज्ञेपेक्षा परिचित अशी जुनीच संज्ञा अधिक सोयीची.

वरील युक्तिवाद नक्कीच प्रभावी आहे. पण तरीही मला तो स्वीकारावासा वाटत नाही. एक तर केवळ सोय हा मुद्दा नेहमीच विवेकी असेल असे नाही. सर्वांनीच आपापल्या भाषा सोडून इंग्रजीतच व्यवहार करणे हे अधिक सोयीचे आहे असेही कुणी पटवून देऊ शकेल. असे सांगणारे लोक मला भेटले आहेत. दुसरे म्हणजे मराठी संज्ञा घडवणे हेच मला अधिक सोयीचे वाटते. ह्याची कारणे दोन आहेत. १. राजकीय बलाबलाचा मुद्दा २. बौद्धिक आनंदाचा मुद्दा.

मी इंग्रजीतील कोणतीही संज्ञा मराठीत वापरू नये अशा मताचा नाही. पण इंग्रजीतून कमीत कमी संज्ञा स्वीकाराव्या अशा मताचा नक्कीच आहे. ह्याचे कारण इंग्रजी आणि मराठी ह्या भाषांचे सामाजिक-राजकीय बलाबल. इंग्रजी आणि मराठी ह्यांचा संबंध आपापल्या स्थानी राहून समृद्ध होणे आणि देवघेव करीत राहणे इतकाच नाही, तर किती जीवनक्षेत्रांतील व्यवहारांत कुणी टिकून राहावे असा आहे. उद्या मराठी भाषकांची भाषा बदलली तर ती कोणती भाषा होण्याची शक्यता अधिक आहे? तर ती भाषा इंग्रजी असेल हे उघड आहे. मराठी भाषकांनी इंग्रजी शब्द वापरणे म्हणजे केवळ आपली सोय पाहणे इतकाच अर्थ नाही. तर ह्या व्यवहारात मराठी शब्द वापरणे शक्य नाही असे मान्य करणेही आहे. मराठीचे वापरक्षेत्र उणावून इंग्रजीचे वापरक्षेत्र वाढवणे असाही आहे.

पण इंग्रजी संज्ञा नाकारून नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल असे थोडेच आहे? नुसत्या मराठी संज्ञा वापरल्याने मराठीचे सामाजिक-राजकीय बल वाढेल हे काही शक्य वाटत नाही. पण तसे करून मराठीचे वेगळेपण आणि स्पर्धेत असणे अधोरेखित होईल. एखादी गोष्ट टिकून राहण्यासाठी पहिल्यांदा तिचे वेगळे अस्तित्व टिकून राहावे लागते. मराठी जिंकेल की नाही हे शेवटी बलाबलानेच ठरेल.

दुसरा मुद्दा असा आहे की नवीन संज्ञा घडवणे आणि तिचा संकेत रूढ करणे हे कष्टाचे असले तरी आनंद देणारे काम आहे असे मला वाटते. नवीन संज्ञा घडवताना त्या संकल्पनेचा परिचय अधिक दृढ होतो. संलग्न संकल्पना अधिक नेमकेपणे उमगून येतात. आपण संकल्पनांच्या अधिक जवळ जातो. आपल्या भाषेचे सामर्थ्य तिच्या मर्यादा ह्यांची जाण प्रगल्भ होते. अर्थात घडवलेली प्रत्येकच संज्ञा अशी असते असे म्हणणे नाही. पण ह्या प्रक्रियेबद्दल आस्था असणारांचा असा अनुभव आहे. ह्या कारणांमुळे मला नव्या संज्ञा घडवण्याचा मार्ग अधिक योग्य वाटतो.
संज्ञा घडवणे आणि ती रूढ होणे / करणे ह्या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. संज्ञेचा अर्थ कळण्यासाठी कोणत्या तरी मार्गाने संकेत उमजावा लागतो. नव्या संज्ञा घडवणे शक्य आहे कारण संकेत समजावून देणे शक्य आहे. संज्ञा रूढ करण्यासाठी मात्र कळणे पुरेसे नाही. पुरेशा वारंवारतेने ती संज्ञा त्या विशिष्ट संदर्भात वापरण्यात आली पाहिजे. भ्रमणध्वनी ही संज्ञा कशासाठी वापरतात हे मराठीशिक्षित व्यक्तींना आजकाल माहीत असते. त्याचा वापर कमी प्रमाणात का होईना होतो. पण जो रूढ होण्यासाठी अनिल थत्ते ह्यांची वृत्तपत्रांतून वांरवार येणारी जाहिरातही कारणीभूत ठरली आहे. ड्राइव्हला ‘खण’ म्हटल्याने पहिल्या वेळी त्यामागची संकल्पना कळणार नाही हे मला मान्य आहे. पण ती कधीच कळणार नाही असे नाही. किंबहुना मी प्रात्यक्षिक दाखवत ‘खण’ हा शब्द वापरला तर कळायला अडचणही येणार नाही. ड्राइव्ह ह्या शब्दाचा संगणकासंबंधीचा अर्थ मला तरी असाच कळला होता. तेच खण ह्या संज्ञेबाबतही घडेल.
भाषाशुद्धीच्या भूमिकेमुळे रुळलेल्या शब्दांची हकालपट्टी होते आणि त्यामुळे भाषा बोजड / दुर्बोध होते असा एक मुद्दा आहे. दुर्बोधपणा रुळलेले शब्द बदलल्यामुळे अवतरतो हा ध्वनी मात्र सर्वस्वी योग्य नाही. जर दिलेला पर्याय चांगला नसेल तर दुर्बोधपणा येऊ शकेल. पण असे नेहमीच होईल असे नाही. दुर्बोधपणा टळावा ह्यासाठी काही काळजी घ्यावी लागेल. ट्रॅक्टरला शासन-व्यवहार-कोशात कर्षित्र असा पर्याय सुचवला आहे. तो नक्कीच दुर्बोध आहे. पण त्याऐवजी नांगरगाडा म्हटले तर ते दुर्बोध वाटणार नाही.

भाषेतले शब्द हे केवळ भाषाशुद्धीच्या चळवळीमुळेच बदलतात असे नाही. वेगवेगळ्या प्रभावांमुळेही बदलतात. अलीकडे इंग्रजीच्या प्रतिष्ठेमुळे अनेक लोक रूढ मराठी शब्दांच्या जागी सर्रास इंग्रजी शब्द वापरतात. सोमवारला मण्डे, भाताला राईस, वाढण्याला सर्व्ह कर, नवर्‍याला मिष्टर, बायकोला मिसेस, चुलतभावाला / आतेभावाला / मामेभावाला कझीन असे म्हणतात. ते हेतुत: करत नसतील पण त्यामुळे रुळलेले शब्द हद्दपार होतच असतात. खरे तर भाषा बदलते हे एकदा मान्य केले की ती वेगवेगळ्या कारणांनी बदलू शकते हे आलेच.

परकीय शब्दांना मराठीची व्याकरणव्यवस्था लावून मराठी करून घेणे हा एक मार्ग आहे आणि तो मला मान्य आहे. पण तो मी सगळीकडे वापरणार नाही. मला चांगली मराठी संज्ञा सुचत असेल तर मी ती आधी वापरीन. ‘क्लिक्’करता मला ‘टिकटिकव’ हा धातू सुचला. त्यामुळे मी ‘अमुक अमुक ठिकाणी टिकटिकवा’ असे म्हणतो. संज्ञा सुचत नसेल तिथे मराठी व्याकरण लावून ते शब्द चालतील.

भाषेत खर्‍या अर्थी लोकशाही असते, लोक जे शब्द वापरतात तेच टिकून राहतात; हे मत बरोबर असेल तर मग कुणी रूढ शब्दांना वेगळ्या संज्ञा वापरल्या तर आपण त्याला बिचकायचे खरे तर कारणच नाही; पण आपण बिचकतो ह्याचे कारण लोकांनी कोणते शब्द वापरावे ह्याबद्दल आपल्या काही धारणा असतात आणि कोणत्या तरी प्रभावामुळे लोक कोणते शब्द वापरतात हे बदलू शकेल हे आपल्याला जाणवत असते. हा प्रभाव अनेक प्रकारचा असू शकतो. प्रतिष्ठितांच्या भाषेचा, कोणत्या तरी चळवळीचा, बदलत्या परिस्थितीचा इ० त्यामुळे नव्या संज्ञा घडवा इंग्रजीतल्या सरसकट वापरू नका हे म्हणणार्‍यांचाही काही प्रभाव पडणे शक्य आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण ह्या सर्व संज्ञा घडवू पण संगणकाच्या पडद्यावर मला इंग्रजीच संज्ञा दिसणार असतील आणि व्यवहारात इतरांशी बोलताना त्याच वापराव्या लागणार असतील तर हा व्यापार व्यर्थ नव्हे का? मुद्दा अत्यंत योग्य आहे. त्याचे अंतिम उत्तर आज माझ्यापाशी नाही. पण परिस्थिती आहे तशीच राहत नाही. प्रयत्नांनी समाजात काही बदल घडवता येतात ह्यावर माझा विश्वास आहे. तोवर चांगल्या मराठी संज्ञा घडवता आल्या तर त्या घडवाव्या, रुळवता आल्या तर रुळवाव्या असा प्रयत्न नक्की करता येईल.

संगणकव्यवहाराचे मराठीकरण

सुशान्त शंकर देवळेकर

जागतिकीकरणाच्या प्रक्रियेबरोबरच उत्पादनांच्या स्थानिकीकरणाची संकल्पनाही महत्त्वाची ठरते. किंबहुना ह्या दोन्ही प्रक्रिया एकमेकींशी नाते राखणार्‍या आहेत. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत जगातील एका टोकाला असलेली वस्तू जगाच्या दुसर्‍या टोकाला सहज उपलब्ध होऊ लागली आहे. पण त्याबरोबरच जगाच्या त्या टोकाला ती वस्तू पुरवताना तिथल्या स्थानिक आवश्यकता काय आहेत हेही ध्यानात घेण्याची आवश्यकता आहे ह्याचे भान आता येऊ लागले आहे. संगणकक्षेत्रातही ह्या स्थानिकीकरणाला विशेष महत्त्व लाभले आहे.

मराठीकरणाची उद्दिष्टे

ज्या विशिष्ट सामाजिक-राजकीय परिस्थितीत आपण वावरत आहोत तिचे भान न ठेवता जर आपण संगणकव्यवहाराचे मराठीकरण करू गेलो तर ते निव्वळ उपचार म्हणून केलेले काम ठरेल. आपले मराठीकरण हे असे असू नये. ह्यासाठी मराठीकरणाच्या उद्दिष्टांतले विविध घटक लक्षात घेणे आवश्यक आणि हितकारक आहे. आपल्याला केवळ शब्दान्तर करायचे नाही. उपचारापुरते शब्दाला शब्द उभे करायचे नाहीत. संगणकाविषयी मराठीतून नेमकेपणे बोलता येईल ह्यासाठी पूर्वसिद्धता करायची आहे. मराठीकरणामागचे हेतू कोणते हे पाहू गेल्यास पुढील उद्दिष्टे ध्यानात येतात.

(अ) अस्मितेचा आविष्कार : मराठी ही माझी स्वभाषा आहे आणि मला माझा ज्ञानाविष्कार मराठीतूनच करायचा आहे अशी भूमिका घेणारे काही लोक असतात. भाषा हा त्यांच्या अस्मितेचा भाग असतो. मला माझ्या भाषेतून हे करता येते हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे असते. (अशा तर्‍हेची) भाषिक अस्मिता हा फार महत्त्वाचा मुद्दा ठरतो. जपान, चीन, स्पेन, फ्रान्स अशा देशांत आपल्या स्वभाषेतच आपला ज्ञानव्यवहार आणि इतर सर्व व्यवहार करू इच्छिणारा फार मोठा वर्ग अस्तित्वात आहे. खरे तर जगात विविध ठिकाणी असलेल्या अशा वर्गाच्या अस्तित्वामुळेही जागतिक संगणकव्यवहाराच्या स्थानिकीकरणात भाषा ह्या घटकाला महत्त्व लाभते आहे.

(आ) भाषासमृद्धी : जीवनव्यवहाराच्या विविध क्षेत्रांत वापरी जाणारी भाषा त्या त्या व्यवहारासोबत आपोआप समृद्ध होत असते. आपली भाषा ही ह्या संगणकीय व्यवहारक्षेत्राची (आणि अशाच इतर अनेक व्यवहारक्षेत्रांची) स्वाभाविक भाषा असती तर आपल्याला हा सगळा स्थानिकीकरणाचा खटाटोप करावाच लागला नसता. पण दुर्दैवाने तशी परिस्थिती नाही. अशा वेळी आपल्याला एक तर हा व्यवहार आपल्या भाषेत करताच येणार नाही असे म्हणून गप्प बसावे किंवा आपल्या भाषेची क्षमता ओळखून ती भाषा अशा व्यवहाराला तयार होईल असे प्रयत्न करावेत. असे प्रयत्न नेटाने झाल्यास भारतीय भाषांना लाभलेली वाङ्मयाची परंपरा अधिक समृद्ध होऊ लागेल. आपल्या भाषेचा लवचीकपणा, शब्दसिद्धीची प्रक्रिया ह्या सर्वांची जाण ह्या उद्दिष्टात महत्त्वाची ठरते.

(इ) आकलनसुलभता : अजूनही आपल्याकडचा फार मोठा समाज आपला ज्ञानव्यवहार आणि सामाजिक व्यवहार मराठीत करत असतो. (हे संख्याबळ किती काळ टिकेल हा प्रश्न आता सहज दुर्लक्षिता येणार नाही.) अशा समाजाला संगणकीय व्यवहार सहज कळावा हे आपले एक उद्दिष्ट असणार आहे. अनेकांना आकलनसुलभता हा मुद्दा ह्या उद्दिष्टांच्या क्रमात शेवटी घातलेला पाहून आश्चर्य वाटले असेल. पण आपण ज्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत जगत आहोत तिच्यात हा मुद्दा पहिला मुद्दा होऊ शकत नाही. इंग्रजीत चाललेला ज्ञानव्यवहार कळत नाही ह्यावर आपण इंग्रजीतूनच शिकणे आणि आपण इंग्रजीतच ज्ञानव्यवहार करत राहणे हा एक मार्ग आहे. बहुसंख्य अभिजनांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच हा मार्ग अवलंबलेला आहे आणि आपल्याकडचा बहुजनसमाजही आता त्या मार्गाकडे वेगाने वाटचाल करतो आहे. शासनाचा आणि लोकप्रतिनिधींचा ह्या मार्गालाच पाठिंबा आहे. तेव्हा निव्वळ आकलनाचा मुद्दा हा मर्यादित ठरतो. केवळ ह्या मुद्याला महत्त्व द्यायचे असेल तर मराठीत हा व्यवहार आणण्याच्या खटाटोपापेक्षा मराठीला सोडून देऊन इंग्रजीशरण होण्याचा मार्ग हा कमी कष्टाचा आहे असेही अनेकांना वाटतं.

पण मराठीकरणाच्या दृष्टीने आपण हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. त्यामुळे केवळ उपचार म्हणून भाषान्तर करण्याच्या प्रवृत्तीला काही आळा बसण्याची शक्यता निर्माण होते. आपण केलेले मराठीकरण हे लोकांना हा विषय कळावा ह्यासाठी आहे ह्याची जाण असणे आवश्यक आहे.

संगणकव्यवहार आणि मानवी भाषा

संगणकव्यवहारात एखाद्या मानवी भाषेचा वापर आपण दोन प्रकारे करतो. एक म्हणजे वापरकर्‍यांच्या सोयीसाठी संगणकीय यंत्रणेचा भाग म्हणून संवादपटलावर आपण मानवी भाषा वापरतो. ह्यात व्यक्ती जेव्हा संगणक वापरते तेव्हा संगणकाच्या पडद्यावर तिला विविध सूचना दिसतात. त्यातून कोणत्या क्रियेनंतर त्या वापरकरी व्यक्तीने काय करणे अभिप्रेत आहे ह्याचे मार्गदर्शन मिळते. दुसर्‍या प्रकारात वापरकरी व्यक्ती आपल्या भाषेतील माहिती संगणकावर नोंदवते, साठवते, हवी तेव्हा त्यातील माहिती हुडकून वापरू इच्छिते, तिची देवाणघेवाण करू इच्छिते. आपण ह्यांपैकी पहिल्या प्रकारच्या भाषिक व्यवहाराचा विचार करत आहोत.

घडवलेल्या संज्ञा आणि स्वीकारलेल्या संज्ञा

जो ज्ञानव्यवहार आपल्याकडचा नाही, जो आपण कुणा इतरांकडून शिकलो आहोत, त्या व्यवहारासाठी संज्ञाही त्याच भाषेतून घ्यायला काय हरकत आहे असे एक मत आहे. नाहीतरी विविध भाषा बोलणारे लोक एकमेकांच्या संपर्कात आले म्हणजे त्यांच्या भाषांमध्ये परस्परांत देवघेव होतच असते. संगणकविज्ञान आणि संगणकतंत्रज्ञान आपण युरोप-अमेरिकेकडून घेतले तेव्हा त्यांनी वापरलेल्या संज्ञाच आपण का स्वीकारू नयेत? उगाच मराठी संज्ञा शोधत बसण्याची कटकट कशाला हवी! ही भूमिका काही नवी नाही. पण भाषाभाषांतील देवघेव ही जितकी स्वाभाविक आहे असे भासते वा भासवण्यात येते तशी ती खरोखर असतेच असे नाही हेही आपण ध्यानात घ्यायला हवे. त्यातली स्वाभाविकता आणि अगतिकता ह्या दोन्ही गोष्टी चिकित्सक बुद्धीने तपासायला हव्यात. ज्या दोन भाषांच्या संबंधांबाबत आपण बोलतो आहोत त्या भाषांचे राजकीय-सामाजिक बलाबल काय ह्याचे भान ठेवले नाही तर ह्या तथाकथित स्वाभाविक देवघेवीची परिणती ही एका भाषेने स्वाभाविकपणे दुसरा भाषा मटकावण्यात होते. हा विचार केल्यास सध्याच्या परिस्थितीत इंग्रजीतले शब्द मराठीत सरसकट घेणे टाळावे. अगदी निरुपाय असेल तरच घ्यावे. शक्यतो मराठी धाटणीचे नवे शब्द घडवावे असे प्रस्तुत लेखकाला वाटते. फाइल, फोल्डर, ड्राइव्ह ह्यांना धारिका, संचिका, खण हे किंवा अधिक चांगले इतर मराठी पर्याय वापरणे चांगले.

पारिभाषिक संज्ञा

संज्ञांना भाषाव्यवहारात एक उद्दिष्ट असते ते म्हणजे वस्तुबोधाचे. संज्ञा आपण वापरतो त्या एखाद्या गोष्टीचा निर्देश व्हावा म्हणून. पारिभाषिक संज्ञा हा संज्ञांचा विभाग होतो तो विशिष्ट संदर्भाच्या सापेक्षतेने. इथे संज्ञांचा अर्थ हा मूलत: एका मर्यादित क्षेत्रातल्या व्यवहारानुसार ठरतो. पारिभाषिक संज्ञांचा वापर हा मुख्यत्वे त्या क्षेत्रातील जाणकार करत असतात. डॉ० अशोक केळकर ह्यांनी दिलेले उदाहरण वापरायचे तर पाणी ही संज्ञा व्यवहारात आपण वापरतो ती पिण्याजोगा, धुण्यासाठी वापरायचा द्रवरूप पदार्थ अशा अर्थाने. पण रसायनविज्ञानात त्याच्या ह्या संदर्भापेक्षा त्याची घडण महत्त्वाची ठरते. पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्यांच्या अणूंचे संयुग आहे ह्याला तिथे प्राधान्य असते. मराठीकरणाचा विचार करताना संज्ञाव्यवहाराचे हे वैविध्य ध्यानात घ्यायला हवे.

मराठीकरणाच्या प्रक्रियेविषयी

सर्वसाधारणपणे संगणकप्रणाल्यांच्या देशीकरणात जी पद्धत वापरतात ती म्हणजे इंग्रजीतली संज्ञांची यादी देऊन त्यांना देशी भाषांत कोणते पर्याय आहेत ते लोकांना नोंदवायला सांगणे. पण ह्या पद्धतीत काही तोटे आहेत. ह्या पद्धतीत संज्ञाव्यवहार तुकड्यातुकड्यांत विखुरलेला असतो. त्याचे भान राहतेच असे नाही. संज्ञांचे एकमेकांशी असलेले संबंध, वापराचे संकेत ह्या सगळयांचे एकत्रित भान येतेच असे नाही.
संज्ञांचे पर्याय निवडण्यासाठी देताना स्रोतभाषेतील संज्ञा आणि तिच्यापुढे पारिभाषिक अर्थ अशी सामग्री आपल्यापुढे आपण ठेवली तर संदर्भांचा घोटाळा होणार नाही आणि मराठीकरणही चपखल होईल. त्यामुळे स्रोतभाषेतील संज्ञांचे व्यवहारातले अर्थ आपोआपच गळतील.

दुसरे म्हणजे सुट्या संज्ञा देण्यापेक्षा वाक्येच जर समोर असली तर अर्थाचे संदर्भ स्पष्ट होतात. ह्या दृष्टीने 'साहाय्य' ह्या विभागातील नोंदींचे मराठीकरण प्रथम करण्याचा प्रयत्न झाल्यास अधिक रेखीव संज्ञा उपलब्ध होऊ शकतील. आणि वापरकर्‍यांच्या दृष्टीने पाहता त्यांना फार निकडीची असणारी सोय ह्यातून आपोआप लाभले.

नेमके अर्थसंदर्भ

सर्वसामान्यपणे भाषेतील शब्दाशी विविध संदर्भ निगडित असू शकतात. अशा वेळी शब्दाचा नेमका संदर्भ नीट कळणे आणि तो नीट व्यक्त होणे हे आवश्यक आहे. अनेकदा शब्दाच्या पारिभाषिक अर्थापेक्षा व्यवहारातल्या सामान्य अर्थाच्याच आधारे संज्ञांचा विचार होतो. त्यातून उगीचच बोजडपणा येऊ शकतो. उदा० 'ऑथेंटिफिकेशन'ला 'अधिप्रमाणन' म्हणण्याची आवश्यकता नाही. ह्या संज्ञेच्या वापराचा संदर्भ पाहिला तर 'खातरजमा' हा शब्द अधिक योग्य वाटतो.

एखाद्या गोष्टीशी अनेक संदर्भ निगडित असताना संज्ञा ही त्यातील एखाद्याच संदर्भाला महत्त्व देऊन रचलेली असू शकते. उदा० मराठीत सध्या अनेक लोक ज्यासाठी न्याहाळक अशी संज्ञा वापरतात त्याला इंग्रजीत ब्राव्जर अशी संज्ञा आहे (त्याला अनुसरून काही लोक चाळकही म्हणतात.) ह्या दोन्ही संज्ञा ह्या ह्या गोष्टीच्या एका एका धर्माचा निर्देश करतात. मुळात संगणकावर महाजालावरील संकेतस्थळ पाहण्याची सोय करणारी संगणकप्रणाली हा अर्थ इथे मुख्य आहे आणि तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही संज्ञांच्या सामान्य व्यवहारातील अर्थांत तंतोतंत गवसत नाही. त्यांचा पारिभाषिक वापर लक्षात घेतला तरच ह्या संज्ञा योग्य वाटतात.

ह्या व्यवहाराचा पारिभाषिकपणा लक्षात घेणे ही एक पायरी झाली. ती लक्षात घेऊनही नव्याने एखाद्या भाषेत चपखल संज्ञा सुचवणे हे काम सोपे नाही. मराठीत नव्या संज्ञा आणताना जाणवलेल्या मर्माच्या जागा खाली मांडत आहे.

तंतोतंत जुळणारी संज्ञा

एका भाषेत एखादा शब्द जितक्या विविध संदर्भांशी निगडित असतो तितक्याच संदर्भांशी निगडित असलेली पर्यायी संज्ञा शोधण्यात अनेकदा भाषान्तरकारांची शक्ती खर्च होते. निदान शास्त्रीय भाषाव्यवहारात तरी बहुतेक वेळां ह्याची आवश्यकता नसते. उदा० 'यूजर इण्टरफेस'साठी मराठीत संवादपटल ही संज्ञा सुचवली तर इण्टरफेसचे इतर संदर्भ उदा० दोन संगणकीय यंत्रणांना जोडणारी मध्यस्थ यंत्रणा ही संवादपटल ह्या संज्ञेत समाविष्ट होत नाही. पण अशा विविध अर्थांसाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरात येतात (संवादपटल आणि मध्यस्था) हे ध्यानात घेतले तर सगळे संदर्भ तंतोतंत जुळतील अशाच संज्ञा हव्यात हा हट्ट उरणार नाही.

आपला सांस्कृतिक शब्दकोश

अनेकदा असे वाटते की मराठीचा आपला सामूहिक शब्दकोश हरवत चालला आहे. आपल्याला नवा शब्द घडवायचा झाला तर आपण संस्कृतातल्या शब्दसिद्धीची प्रक्रिया अधिक वापरू जातो. (तीही बर्‍याचदा अज्ञानमूलक असते, ते असो.) संगणकाची आज्ञावली रचताना त्यात एक विशिष्ट रचनाबंध वापरतात. त्यात एखादी क्रिया विशिष्ट टप्प्यानंतर परत परत करण्यात येते. पुढची आज्ञा मिळेपर्यंत हे परत परत करणे चालूच असते. इंग्रजीत ह्या रचनाबंधाला 'लूप' असे म्हणतात. मराठीत काय म्हणाल असे विचारले तर बहुतेक लोक पुनरावर्तन वगैरे म्हणू लागतात. निष्कारण संस्कृतात शिरतात. त्याला फेरा म्हणता येईल हे आपल्याला पटकन सुचत नाही. फेरा हा शब्द एकदा सुचला की जन्ममरणाचा फेरा, फेर्‍यातून सुटणे इ० शब्दप्रयोग आठवून ही संज्ञा अधिक चपखल आहे हे सहज लक्षात येते. पण हे जरा सुचायला हवे. मराठीकरण करताना ह्या गोष्टीचे भान असल्यास मराठीकरण अधिक स्वाभाविक होईल असे वाटते.

संस्कृतचा अनावश्यक वापर

संस्कृतचा वापर अनेकदा नको तितका झाल्यानेही असा पारिभाषिक भाषाव्यवहार क्लिष्ट होतो. संस्कृततज्ज्ञांच्या दृष्टीने एखादा संस्कृत शब्द चपखल असला तरी मराठीत सोपा शब्द देणे शक्य असताना तो संस्कृत शब्द वापरणे टाळावे. 'नेव्हिगेटर'ला मार्गनिर्देशक म्हणण्यापेक्षा वाटाड्या म्हणणे केव्हाही चांगलेच.

सामासिक पदांची घटकपदे

अनेकदा स्रोतभाषेतली संज्ञा ही सामासिक स्वरूपाची असते. अशा संज्ञांना पर्यायी संज्ञा सुचवताना काळजी घ्यायला हवी. उदा० इंग्रजी संज्ञा जर सामासिक असेल तर तिच्या घटकपदांचे कोशातले अर्थ सुटे सुटे लक्षात घेऊन पर्यायी संज्ञा घडवली तर ती बर्‍याचदा अभिप्रेत संदर्भात चपखल वाटत नाही. उदा० 'बुकमार्क'चा पर्याय म्हणून पुस्तकखूण ही संज्ञा वापरली तर अर्थ कळेलच. पण स्मरणखूण अधिक बरी वाटते. मूळ अर्थ काय अभिप्रेत आहे? तर आपण नेहमी वापरतो ते संकेतस्थळांचे पत्ते पुन्हा पुन्हा लिहावे लागू नयेत म्हणून संगणकाने ते नोंदवून घेणे. हे झाले म्हणजे एकदा टिकटिकवल्याने (क्लिक केल्याने) काम भागते. ह्याला मराठीत स्मरणखूण असे म्हणणे अधिक बरे. पुस्तकखूण म्हणजे पुस्तकात ठेवायची खूण तिचा अर्थ आपण कुठवर वाचले त्याची आठवण करून देणे, त्यावरून संकेतस्थळाचा पत्ता लक्षात ठेवण्याची संगणकातली सोय एवढा लांबलचक प्रवास करण्याची आवश्यकता नाही.

व्याकरणिक रचनाविशेष

भाषांचे व्याकरणिक रचनाविशेष अनेकदा काही बंधने आणत असतात ती ध्यानात घ्यायला हवीत. उदाहरणच घ्यायचे तर शब्दसिद्धीच्या दृष्टीने पाहता मराठी भाषेत धातूंना आख्याताचे (म्हणजे काळ आणि आज्ञार्थ इ० अर्थ ह्यांचे वाचक असे) प्रत्यय लागताना त्यांना उपसर्ग लागत नाहीत. संस्कृत वा इंग्रजीत ते लागतात. उदा० हृ ह्या धातूपासून हरति असे क्रियापद बनते तसेच संहरति, विहरति, आहरति, प्रहरति इ० रूपे होतात. इंग्रजीत संस्कृताइतके नसतील पण री, अन् असे काही उपसर्ग लागून काही रूपे होतात. उदा० री-डू, अन्-कव्हर, ऑटो-चेक इ० मराठीत धातूला थेट उपसर्ग लागून होणारी अशी रूपे घडताना दिसत नाहीत. मराठीत पुनर् इ० शब्द नामांच्याच अगोदर येतात. उदा० पुनर्मिलन, पुनर्विचार, फेरनिवड इ० एखादा मनुष्य फेरनिवडला असं मराठीत म्हणत नाहीत त्याला पुन्हा निवडले किंवा त्याची फेरनिवड झाली असे म्हणतात. इंग्रजीतून मराठीत अशा रूपांचे भाषांतर करताना क्रियाविशेषण आणि धातू अशा रचना वापरणे भाग आहे.

अशा प्रकल्पांत संगणकतज्ज्ञ आणि भाषेचे जाणकार अशा दोहोंचा सहभाग असायला हवा आणि त्यांची चर्चा होईल असे एखादे व्यासपीठ उपलब्ध व्हावे. असे झाल्यास ह्या प्रयत्नांचा पाया अधिक भक्कम होईल, अशी आशा वाटते. ह्या विवेचनात संज्ञांचा प्रत्यक्ष विचार केलेला नाही, पण काही गोष्टी ध्यानात घेतल्या तर मराठीकरण अधिक नेटके, अधिक स्वाभाविक होऊ शकेल असे वाटले म्हणून काही निरीक्षणे नोंदवली आहेत.

भ्रमणभाष : 097698 35310
ई-पत्ता : sushant.devlekar@gmail.com

पुढादीगणातील शब्द

पुढे, मागे, वर, खाली, इकडे, तिकडे इ० शब्दांना मराठीच्या बहुतेक व्याकरणकारांनी आणि कोशकारांनी क्रियाविशेषण ह्या गटात घातलेले आढळते. पुढील, पुढचा, पुढला इ० शब्दरूपे ही अर्थातच विशेषण ह्या गटात जातात. अशीच आणखीही काही शब्दरूपे आहेत. ह्या शब्दरूपांचे बारकाईने निरीक्षण केले तर असे आढळते की ह्या शब्दांचा एक सबंध गट आहे आणि ह्या शब्दरूपांची आणखी फोड करायला वाव आहे.
मराठी नामिकांची१ म्हणजेच सलिंगसवचन शब्दांची घराचा, बागेभोवती अशी रूपे पाहिली (सलिंग शब्दांनाच वचनाचा विकार होतो) तर त्यांची रचना [(सलिंग शब्द + (विकरण) + उत्तरयोगी (प्रत्यय/शब्दयोगी)] अशी आढळते. ह्यांपैकी काही प्रत्यय आणि शब्दयोगी हे सलिंग नसणार्यान पुढ्सारख्या शब्दांनाही लागलेले आढळतात. उदा० पुढपर्यंत, पुढवर, पुढे, पुढून इ० उदाहरणांत पर्यंत, वर, ए, ऊन हे प्रत्यय / उत्तरयोगी पुढ्सारख्या शब्दांना लागलेले आहेत. घरापासून, शाळेपाशी ह्यांतील पासून, पाशी असे काही शब्दयोगी हे मुळात ह्याच गटातल्या शब्दांपासून बनलेले दिसतात. उदा० पास् = > पासून, पाशी, पासचा इ०

पुढादीगणातील शब्दांची वैशिष्ट्ये

ह्या शब्दांचा एक गट करून ह्या शब्दांना 'पुढादीगणातले शब्द' असे नाव देता येईल. ह्या गणातील शब्दांची काही वैशिष्टये पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१. हे शब्द अलिंग असतात. आपल्याला असे विधान करता येणे शक्य आहे कारण एरवी एखाद्या शब्दाचे लिंग कळण्यासाठी तो शब्द आणि क्रियापदाशी आणि अन्य पदांशी त्याच्या रूपाची जुळणी ह्यावरून आपल्याला लिंगाची जाणीव होते. उदा० काळा घोडा, पांढरी गाय, घोडा पळाला, गाय चरते. अशा रूपाला प्रथमेचे रूप किंवा सरळ रूप असे म्हणतात. पण ह्या पुढादीगणातल्या शब्दांची रूपे अशी थेट प्रथमेतील नसतात. त्यांची प्रथमेतली रूपे अन्य घटक (शब्दसिध्दीचा सलिंग प्रत्यय उदा० आ > पुढ् + आ = पुढा) मध्ये येऊन तयार होतात.
२. हे शब्द स्थान वा दिशा ह्यांचे वाचक असतात. पुढे इ० शब्दांची पुढ् + ए अशी फोड होते. ह्यातील ए हा प्रत्यय अधिकरणार्थी आहे आणि त्याचा अर्थ विशिष्ट ठिकाणी असा होतो. हा प्रत्यय ज्या शब्दाला लागतो तो प्रत्ययाआधीचा पुढ् हा शब्द ते विशिष्ट स्थान वा दिशा कोणती आहे ते सांगतो.
३. ह्यांना वेगवेगळे प्रत्यय लागून नामिके आणि अव्यये तयार होतात. उदा० खाली, खालचा, वरले, मागची.
४. ह्यांपैकी काही रूपे नामिक शब्दांच्या पुढे (सामान्य रूपांपुढे) येतात. त्यांना अशा वेळी शब्दयोगी ह्या गटात घालता येते. उदा० दारासमोरून, वाडयापुढे इ०

पुढादीगणातील सिद्ध आणि साधित शब्द

पुढगणातील शब्दांचे सिद्ध आणि साधित असे दोन वर्ग करता येतात.
१. सिद्ध शब्द : ह्या शब्दांची आणखी अवयवांत फोड होत नाही. ह्या गणात पुढील शब्द आढळतात.
अ) पुढ्, माग्, कड् : पुढे, मागे, कडे
आ) खाल्, पाठ् : खाली, पाठी
इ) वर्, बाहेर्, समोर्, लांब्, जवळ, आत्, आड् :
२. साधित शब्द : ह्या शब्दांची, अवयव वेगळे करीत, अजून फोड करता येते.
अ) जतकहची रूपे : एरवी सर्वनामांची आणि सार्वनामिक विशेषणे म्हणवणार्याआ शब्दरूपांपैकी काही रूपेही ह्या गटात घालता येतात. ह्या शब्दरूपांतही एक आकृतिबंध आढळतो. ह्या शब्दरूपांच्या आरंभी ज्, त्, क्, ह् हे विशिष्ट दिशावाचक / निर्देशी अवयव आढळतात. म्हणून ह्या रूपांना जतकहची२ रूपे म्हटले आहे.
क) ज् : पूर्वनिर्देशी वा उद्देशवाचक : उदा० जेथे जातो तेथे तू माझा सांगाती
ख) त् : उत्तरनिर्देशी वा दूरत्वनिर्देशी : तिथून पाणी आणावे लागेल.
ग) क् : प्रश्ननिर्देशी : ही बस कुठपर्यंत जाणार आहे?
घ) ह : समस्थानकालनिर्देशी : इथला माल जगभर विकला जातो.
जिथ्, जेथ्, तिथ्, तेथ्, इथ्, येथ्, (एथ्), कुठ्, कोठ् ह्या शब्दरूपांना पुढ् इ० प्रमाणेच प्रत्यय लागून रूपे बनतात.
ज् + एथ् = जेथ् : जेथे, जेथून, जेथील
त् + एथ् = तेथ् : तेथे, तेथून, तेथील
क् + ओठ् = कोठ् : कोठे, कोठून, कोठील
ह२ + एथ् = येथ् : येथे, येथून, येथील
आ) कड्ची रूपे : कड् ह्या पुढगणातील शब्दाच्या आधी काही घटक येऊन ही रूपे तयार होतात. उदा० इकड्, तिकड्, सगळीकड् इ० ह्यांना मग अधिकरणाचे इ० प्रत्यय / उत्तरयोगी लागून इकडे, तिकडे, सगळीकडून अशी रूपे तयार होतात. ह्यात कडच्या आधी काहीएक घटक आलेलाच असतो. निव्वळ कडे, कडून असा प्रयोग आढळत नाही. जतकह हे वर उल्लेखलेले अवयवही कड्च्या आधी येतात आणि ज + इ + कड् > जिकड्, तिकड्, इकड्, कुणीकड् अशी रूपे घडतात.
काही सलिंग विशेषणांच्या (शेवटी स्वर असल्यास) शेवटच्या स्वराला ईचा आदेश होऊन आणि ती व्यंजनान्त असल्यास त्यांना ई लागून त्यापुढे कड् येऊन काही रूपे बनतात. ही रूपे क्रियेचे स्थान दाखवतात. उदा०
सगळा > सगळी + कड् = सगळीकड् तिसरा > तिसरी + कड् = तिसरीकड्
वेगळा > वेगळी + कड् = वेगळीकड् सारा > सारी + कड् = सारीकड्
डावा > डावी + कड् = डावीकड् (ऐल्) > अली + कड् = अलीकड्
उजवा > उजवी + कड् = उजवीकड् (पैल्) > पली + कड् = पलीकड्
भलता > भलती + कड् = भलतीकड् एक > एकी + कड् = एकीकड्
दुसरा > दुसरी + कड् = दुसरीकड्
इ) पास्ची रूपे : पास् ह्या शब्दाला ई लागताना शेवटच्या सकाराचा शकार होतो आणि पाशी असे रूप तयार होते. तसेच ह्या शब्दाला ऊन लागून पासून असा शब्द तयार होतो. हे शब्द पहिल्या गटातल्या शब्दाच्या पुढे येतात. आणि पुढपासून, जिथपासून अशी रूपे तयार होतात.

लागणारे प्रत्यय

पुढगणातील वर सांगितलेल्या शब्दरूपांपासून काही अधिकरण हा कारक संबंध असलेली रूपे बनतात तर काही विशेषणे वा कर्तृपदेही तयार होतात.
ए/ई : हे दोन्ही अधिकरणार्थी प्रत्यय आहेत. ह्या प्रत्ययांचा अर्थ ही क्रिया अमुक स्थानी घडली असे दाखवतो. 'मी घरी आलो' ह्यात येण्याची क्रिया 'घर' ह्या स्थानावर झाली असा अर्थ व्यक्त होतो.
खाल्, पाठ् ह्या शब्दांना ई हा प्रत्यय वरील अर्थानेच लागतो आणि खाली्, पाठ् अशी शब्दरूपे घडतात.
वर, समोर, बाहेर्, आत् ह्या शब्दांत ई ह्या प्रत्ययाचा लोप होतो (आत् ह्या शब्दाचा अपवाद वगळता वरी, समोरी, बाहेरी अशी रूपे जुन्या ग्रंथांत आढळतात.)
ऊन : हा प्रत्यय अपादानार्थी आहे. तो पुढगणातल्या शब्दांना थेट लागतो. उदा० पुढून, मागून, वरून, खालून, आतून, बाहेरून, आडून, इकडून, तिकडून, जिकडून, कुठून, कोठून, डावीकडून, उजवीकडून, सगळीकडून, वेगळीकडून, भलतीकडून, एकीकडून, दुसरीकडून, तिसरीकडून, सारीकडून, पलीकडून, अलीकडून.
पास् ह्या शब्दाला ऊन लागून 'पासून' असे रूप बनते. ते केवळ उत्तरयोगी म्हणूनच वापरतात आणि ते काही पुढगणांतल्या शब्दांनाही लागते. पुढपासून, मागपासून, वरपासून, खालपासून, इथपासून, तिथपासून, जिथपासून, कुठपासून, आतपासून, बाहेरपासून, घरापासून इ०
नाम, धातू इ० शब्दांची निर्मिती
पुढादीगणातील शब्दांपासून काही धातू तसेच काही सलिंग शब्दही तयार होताना दिसतात. पण ही प्रक्रिया घडताना ती आधी उल्लेखिलेल्या रूपांइतकी सार्वत्रिक नाही असे दिसते.
सलिंग प्रत्ययाचा लोप होऊन तयार होणारे सलिंग शब्द
माग (पू) : ह्या शब्दाचा अर्थ मागे राहून हुडकून काढण्याची क्रिया असा होतो.
पाठ (स्त्री) : शरीराच्या मागचा अवयव

साधित धातू

१. पुढार् (पुढ् + आर्) : पुढे होण्याची क्रिया. ह्यापासून पुढारतो इ० धातुरूपे तसेच पुढारलेला, पुढारणे, पुढारी, पुढारपण इ० धातुसाधित नामिके घडतात. तसेच पुढे असण्याची क्रिया म्हणजे पुढाकार (पु), पुढली बाजू म्हणजे पुढा (पु) हे शब्दही घडलेले आढळतात.
२. मागास् (माग् + आस्) : मागे पडणे, मागासले, मागासलेला, मागासणे इ०
३. खालाव् (खाल् + आव्) : खाली येणे (लक्षणेने : गुणवत्ता घसरणे). खालावते, खालावलेले.

संदर्भसूची

अर्जुनवाडकर, कृष्ण श्रीनिवास. १९८७. मराठी व्याकरण : वाद आणि प्रवाद; सुलेखा प्रकाशन, पुणे.
दामले, मोरो केशव. १९७०. शास्त्रीय मराठी व्याकरण; (संपा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर), देशमुख आणि कंपनी; पुणे
धोंगडे, रमेश वामन. १९८३. अर्वाचीन मराठी : काँटिनेंटल प्रकाशन, पुणे

ई-पत्ता : sushant.devlekar@gmail.com
भ्रमणभाष : 097698 35310
------------
टिपा :
१) 'नामिक' ही संज्ञा कृ०श्री० अर्जुनवाडकर ह्यांनी वापरली आहे. लिंग आणि वचनाचा विकार होणार्या), तसेच धातू आणि अव्यये ह्यांपासून वेगळया अशा शब्दांसाठी त्यांनी ही संज्ञा वापरली आहे.
२) जतकहची इतर रूपे : जो, जेव्हा, जिथला, जिथे, जेथे, जितका, जेवढा, जितपत, जोवर, जसा, जितवा, तो, तेव्हा, तिथला, तिथे, तेथे, तितका, तेवढा, तितपत, तोवर, तसा, हा, एव्हा, इथला, इथे, येथे, इतका, एवढा, इतपत, असा, कोण, केव्हा, कुठला, कुठे, कोठे, कितका, केवढा, कितपत, कसा, कितवा.
३) इथे आकाराव्यतिरिक्तचा स्वर पुढे आल्यास हकाराचा लोप होतो. तसेच ए ह्या स्वराआधी य् हा वर्ण येऊन ये असे अक्षर येते. लेखनात ही यकारयुक्त रूपेच वापरतात. उदा० येथे, येथला, येथचा इ०