दखलयोग्य

राज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे

प्रकाश परब

नवीन मराठी शाळांना परवानगी नाकारून आणि शासनमान्य नसलेल्या प्रयोगशील मराठी शाळांना टाळे लावण्याची धमकी देऊन महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना अभूतपूर्व अशी आदरांजली वाहिली आहे. मराठी शाळांबाबत पारतंत्र्याच्या काळातील ब्रिटिश सरकारलाही लाजवणारे धोरण स्वीकारून राज्य सरकारने साडेदहा कोटी महाराष्ट्रीय जनतेचा अपमान केला आहे.
मराठी शाळांवरील बंदी तात्पुरती असून बृहत् आराखडा तयार झाल्यानंतर मराठी शाळांना परवानगी देण्याचा विचार करू असा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री करीत असले तरी मुळात मागेल त्याला इंग्रजी शाळा व मराठी शाळांच्या परवानगीला स्थगिती हा आगाऊपणा झालाच कसा; हा प्रश्न उरतोच. मागे खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच मराठी शाळा हे एक ओझे असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. आता लोकांनाच मराठी शाळा नको आहेत तर शासन दुसरे काय करणार; असा बचावही शासनामार्फत केला जातो. लोकांची मागणी लक्षात घेऊन काही महापालिकांनी मराठी शाळांचे इंग्रजी शाळांत रूपांतर केलेलेही आपण पाहातो. हे काय चालले आहे? आणि याची परिणती कशात होणार आहे? यासाठीच महाराष्ट्र या भाषिक राज्याची स्थापना झाली का? इंग्रजी शाळांची मागणी करणारे कोण लोक आहेत? लोकांना मराठी शाळा खरेच नको असतील तर त्या का नको आहेत, याचा शासनाने कधी विचार केला आहे काय?
मराठी शाळा दोन कारणांसाठी आवश्यक आहेत. एक - मातृभाषेतून शिकण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, आणि दोन - मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी.

मातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेला व्यक्तिगत व सामाजिक परिमाणे आहेत. व्यक्तीच्या सर्जनशीलतेचा, तर्कबुद्धीचा जलद व स्वाभाविक विकास तिची जन्मापासून सोबत करणार्‍या मातृभाषेत जितका होईल तितका तो परभाषेतून होणार नाही. शिक्षण हे जर माणसातील पूर्णत्वाचे प्रकटीकरण असेल तर ते सिद्ध होण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे माध्यम नाही. शिक्षणातील आणि एकूणच मानवी जीवनातील मातृभाषेचे हे महत्त्व ओळखून तिला मातृभूमीप्रमाणे व्यक्तिगत, तात्कालिक उपयुक्ततेपलीकडचे मूल्य प्राप्त झालेले आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हा व्यक्तीचा केवळ विशेषाधिकार न राहता ते एक सामाजिक, सांस्कृतिक दायित्वही बनते. मातृभाषेतून न शिकल्यामुळे व्यक्तिविकासाला मर्यादा तर पडतातच; पण एका अलिखित सामाजिक कराराचा भंगही होतो. महाराष्ट्रात मराठी शाळांतून शिकणे हा एक सामाजिक करार आहे आणि त्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे.

मराठी शाळांचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक प्रश्न नाही. तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्नही आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ती केवळ प्रशासकीय सोय नव्हती तर जगातील प्रमुख २५ भाषांपैकी एक आणि थोर ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या स्वतंत्र राज्याची स्थापना होती. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि लोकभाषा आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे आणि तो पार पाडायचे म्हणजे मराठी भाषेचा शक्य तितक्या सर्व व्यवहारांत गुणवत्तापूर्ण वापर करणे. असा वापर करायचा म्हणजे मराठी शिकणे व शिकवणे आलेच. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार कोणत्याही भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक असतो. भाषेचे पिढ्यांतर्गत संक्रमण कोणत्याही भाषेच्या अस्तित्वाच्या व विकासाच्या केंद्रस्थानी असते असे भाषेचे अभ्यासक सांगतात. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे भाषेचे संक्रमण करण्यासाठी ती भाषा शिक्षणाचे माध्यम असावी लागते. केवळ एक विषय म्हणून तिचा अभ्यास पुरेसा नाही. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार नसेल तर तिच्या अन्य व्यवहारांना उत्तरोत्तर गळती लागते व ते कालान्तराने नष्ट होतात. मराठी नाटक, चित्रपट, साहित्य, पत्रकारिता व अन्य सार्वजनिक व्यवहार हे मराठी शिक्षणावर आणि अधिक नेमकेपणाने बोलायचे तर मराठी शाळांवर अवलंबून आहेत. जणू मराठी शाळा या मराठी भाषेची मुळे आहेत, तीच नष्ट झाली तर मराठी भाषावृक्षाचा वरचा विस्तार हळूहळू मातीला मिळेल. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत. कारण त्यांच्यावरच मराठी भाषेचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच शिक्षणाच्या माध्यमाबाबत तटस्थ राहून मागणी तसा पुरवठा असे धोरण स्वीकारता येणार नाही. मराठी ही महाराष्ट्राची भाषिक, सामाजिक व सांस्कृतिक ओळख आहे. ती अबाधित व वर्धिष्णू ठेवायची असेल तर मराठी शाळांचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवला गेला पाहिजे. जागतिकीकरणामुळे वाढलेले इंग्रजी भाषेचे प्रस्थ, शिक्षणाचे खासगीकरण, मराठीशी सोयरसुतक नसलेल्या अन्य भाषकांचे राज्यातील वाढते स्थलांतर आणि राजकीय इच्छाशक्तीचा संपूर्ण अभाव यामुळे मराठी भाषेपुढे ‘न भूतो’ असे आव्हान उभे राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी होती. आता तेवढीच मोठी चळवळ उभारण्याची गरज आहे ती मराठी राज्य टिकविण्यासाठी. भाषेकडे तटस्थपणे पाहणार्‍यांना आणि स्वभाषेविषयी कसलाच मूल्यभाव नसणार्‍यांना ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल. पण मराठी शाळांची ही लढाई आपण हरलो तर मराठीची अख्खी लढाई आपण हरल्यासारखे आहे. मराठी शाळा हा मराठीचा आत्मा आहे. तो जपला पाहिजे.

मात्र राज्यशासनाने मराठी शाळांना परवानगी न देण्याचे आपले धोरण बदलले तरी मराठी शाळा टिकतील असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. मराठी शाळांचा लोकाश्रय वाढून त्यांना इंग्रजीप्रमाणे सामाजिक स्वीकृती व प्रतिष्ठा मिळायची असेल तर पन्नास टक्के सक्ती आणि पन्नास टक्के संधी हे धोरण स्वीकारावे लागेल. लोकांना इंग्रजी शाळा का हव्यात? त्यांना इंग्रजीविषयी प्रेम आहे म्हणून? मुळीच नाही. भाषा अस्मितेवर जगत नाहीत. त्या लोकांच्या पोटावर जगतात. इंग्रजी ही पोटापाण्याची, अर्थार्जनाची, सुखसमृद्धीची भाषा आहे. मराठी भाषेने याबाबतीत उपयुक्ततेचा नीचांक गाठलेला आहे आणि म्हणून लोक असहायतेपोटी इंग्रजीकडे वळत आहेत. मराठीचा अभिमान बाळगणार्‍यांची मुलेही इंग्रजी माध्यमात शिकतात हा विरोधाभास त्यातूनच निर्माण झालेला आहे. पण मराठी शाळांवर ही पाळी कोणी आणली? साठ-सत्तरच्या दशकात प्रगतिपथावर असलेल्या मराठी शाळांना आताच का घरघर लागावी? गेल्या दोन दशकांत असे काय घडले म्हणून लोकांचा मराठी शाळांवरचा विश्वास उडाला? या काळात मराठी भाषेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने कोणती सकारात्मक पावले उचलली? मराठीचे व्यावहारिक कुपोषण करून जगण्यासाठी एक निरुपयोगी भाषा अशी तिची प्रतिमा कोणी निर्माण केली?

मराठी माणूस मराठी शाळांपासून खुशीने दूर गेलेला नाही, तर राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठीचे काही खरे नाही अशी हाय खाऊन त्याने इंग्रजी शाळांचा रस्ता धरलेला आहे. केवळ उच्चभ्रूच नव्हे तर तळागाळातील लोकांनीही आपल्या सामाजिक आणि आर्थिक अभ्युदयाची भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हे प्रमाण इतके वाढले की मराठीवरील प्रेमापोटी मुलांना मराठी शाळांत पाठवणारे पालक मागासलेले व वेडे ठरू लागले! अशी परिस्थिती केवळ आपल्याकडेच आहे असे नसून भारतातील इतर प्रांतांत विशेषत: मागासलेल्या राज्यांतही आढळते. मध्यंतरी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर असताना एका खेड्यात उतरले. एका पददलित लेकुरवाळ्या महिलेची विचारपूस करताना मुले कोणत्या माध्यमात शिकतात म्हणून सहज विचारले. ती म्हणाली, ‘‘इंग्रजीत’’. राहुल गांधींनी आश्चर्याने विचारले, ‘‘इंग्रजीतच का हिंदीतून का नाही?’’ त्यावर या महिलेने जे उत्तर दिले ते भारतातील प्रादेशिक भाषांच्या अवनतीचे व इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाचे मर्म सांगणारे आहे. ती महिला म्हणाली ‘‘तुम्ही लोक चॉकलेटच्या वेष्टनावरही इंग्रजीतून लिहिणार मग आमच्या मुलांनी हिंदीत शिकून करायचे काय?’’ पोटा-पाण्याचे व्यवहार ज्या भाषेत होत नाहीत ती भाषा कोण आणि कशासाठी शिकणार?

मराठी शाळा वाचवायच्या असतील तर शाळांवर इलाज करून चालणार नाही; त्यासाठी व्यवहारातील मराठीवर इलाज करावा लागेल. मराठी भाषेचे व्यावहारिक, आर्थिक सक्षमीकरण करावे लागेल. म्हणजे प्रशासनाप्रमाणेच राज्यांतर्गत उद्योग, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च व व्यावसायिक शिक्षण, न्यायालयीन व्यवहार यात मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल. त्यासाठी सक्तीचा मार्ग अवलंबिण्यात काहीही गैर नाही. पण आपल्याकडे मराठीच्या बाजूने कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. राज्यातील विद्यापीठांनी मराठीतूनही उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे विद्यापीठ कायदा सांगतो; पण प्रत्यक्षात विद्यापीठांनी इंग्रजीच्या वर्चस्ववादाला खतपाणी घातले. राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाड्यांसह संपूर्ण कामकाज इंग्रजीऐवजी मराठीतून करावे असा राज्य शासनाचा व उच्च न्यायालयाचा आदेश आहे. पण तो संबंधितांनी धाब्यावर बसवला. राज्यातील केंद्रीय आस्थापनांनी आपल्या कामकाजात त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर करावा अशी तरतूद असताना लिपिसाधर्म्याचा फायदा घेऊन केवळ इंग्रजी-हिंदीचा वापर करून मराठीची फसवणूक केली. मराठीच्या या व इतर व्यावहारिक अवमूल्यनामुळे लोकांची अशी समजूत झाली की, यापुढे इंग्रजी हीच व्यवहारभाषा असणार आहे. आपल्या राज्याला कसले भाषाधोरण नसल्याचा हा पुरावा आहे आणि आता तर लोकांनाच मराठीऐवजी इंग्रजी शाळा हव्या आहेत; असे सांगून राज्यकर्ते स्वत:च्या पापाचे खापर लोकांच्याच डोक्यावर फोडत आहेत.

दै० लोकसत्ता, दि० २२ नोव्हेंबर २०१०

हिपटुल्ला

सआदत हसन मंटो

“श्यामनं या पत्रात ‘हिपटुल्ला’ असा एक शब्दप्रयोग वापरला आहे. त्याचा अर्थ स्पष्ट करणं मनोरंजक आहे.”
मी बॉम्बे टॉकीजमध्ये नोकरीला होतो. त्या दिवसांत कमाल अमरोहीच्या ‘हवेली’ या चित्रपटकथेविषयी बोलणं सुरू होतं. (या कथेवरील चित्रपट ‘महल’ या नावानं नंतर प्रदर्शित झाला...)
सर्वसाधारण गप्पागोष्टीत वाङ्मयीन शब्दप्रयोग करण्याची कमाल अमरोहीला सवय आहे. माझ्यासाठी ते एक संकट असायचं...
एक दिवस सकाळी घरून बॉम्बे टॉकीजला निघालो तेव्हा ट्रेनमध्ये वर्तमानपत्रातील खेळाची बातमी देणारं पान उघडलं. ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेटचा सामना सुरू होता. एका खेळाडूचं नाव फार विचित्र होतं : हिपटुल्ला - एचइपीटीयुएलएलएएचए हे नाव विचित्र का? याचा विचार करू लागलो. पण माझ्या डोक्यात प्रकाश पडेना. कदाचित हबेतुल्लाह या नावाचा अपभ्रंश असणार ते नाव असावं.

स्टुडिओत पोहोचलो. कमाल अमरोहीच्या कथेवर बोलणं सुरू झालं. कमालनं आपल्या खास साहित्यिक व प्रभाव पाडणार्‍या शैलीत एक प्रसंग ऐकवला. अशोकनं (अशोक कुमारनं) माझं मत विचारलं, ‘‘काय मंटो?’’
का कोण जाणे, माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले,
‘‘ठीक आहे. पण हिपटुल्ला नाही!’’
शेवटी जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं. ‘हिपटुल्ला’ या शब्दप्रयोगातून ते व्यक्त झालं होतं. कथेतील प्रसंगाचा अनुक्रम लक्षात घेतला तर या प्रसंगात फार दम नाही, हे मला सांगायचं होतं.
‘‘काही वर्षांनंतर हसरत (गीतकार हसरत जयपुरी)च्या बाबतीत, त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग केला. त्यानं माझं मत विचारलं तेव्हा सांगितलं, ‘‘भाई हसरत काही जमलं नाही... काहीतरी हिपटुल्ला सारखं सादर कर. हिपटुल्ला...’’
दुसर्‍यांदा हिपटुल्ला म्हणून सर्वांची प्रतिक्रिया काय झाली ते पाहू लागलो. हा शब्दप्रयोग आता सर्वसामान्य झाला होता. त्यामुळे फारसा विचार न करता मी त्याचा उपयोग करू लागलो. ‘हिपटिलेटी’ नव्हे तर ‘हिपटोलाईज’ करायला हवं. इत्यादी इत्यादी. एक दिवस मला अशोकनं विचारलं,
‘‘हिपटुल्लाचा मूळ अर्थ काय आहे? कोणत्या भाषेत हा शब्दप्रयोग आहे?’’
अशोकनं मला अर्थ विचारला तेव्हा श्यामदेखील हजर होता. तो जोरजोरात हसू लागला. त्याचं डोकं आकुंचित झालं. त्या क्रिकेटपटूच्या विचित्र नावाकडे मी त्याचं लक्ष वेधलं, तेव्हा तो माझ्याबरोबर ट्रेनमध्ये होता. हसत हसत त्यानं सर्वांना सांगितलं,
‘‘ही मंटोची नवी मंटोगिरी आहे... त्याला काही ना काही नवं करायचं असतं... काही सुचलं नाही म्हणून त्यानं हिपटुल्लाला पकडून चित्रपटसृष्टीत आणलं आहे.’’
सांगायचं म्हणजे फारशी ताणातणी न होता हा शब्दप्रयोग मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील शब्दप्रयोगात रूढ झाला.

(सआदत हसन मंटो - दस्तावेज खंड ५मधील ‘मुरली की धुन’ या प्रसिद्ध अभिनेता श्यामवरील लेखातून. मंटोच्या सर्व लेखनाचे एकूण ५ खंड ‘राजकमल प्रकाशन’नं प्रसिद्ध केले आहेत.)

हिपटुल्ला

सआदत हसन मंटो

“श्यामनं या पत्रात ‘हिपटुल्ला’ असा एक शब्दप्रयोग वापरला आहे. त्याचा अर्थ स्पष्ट करणं मनोरंजक आहे.”
मी बॉम्बे टॉकीजमध्ये नोकरीला होतो. त्या दिवसांत कमाल अमरोहीच्या ‘हवेली’ या चित्रपटकथेविषयी बोलणं सुरू होतं. (या कथेवरील चित्रपट ‘महल’ या नावानं नंतर प्रदर्शित झाला...)
सर्वसाधारण गप्पागोष्टीत वाङ्मयीन शब्दप्रयोग करण्याची कमाल अमरोहीला सवय आहे. माझ्यासाठी ते एक संकट असायचं...
एक दिवस सकाळी घरून बॉम्बे टॉकीजला निघालो तेव्हा ट्रेनमध्ये वर्तमानपत्रातील खेळाची बातमी देणारं पान उघडलं. ब्रेबॉर्न स्टेडियमवर क्रिकेटचा सामना सुरू होता. एका खेळाडूचं नाव फार विचित्र होतं : हिपटुल्ला - एचइपीटीयुएलएलएएचए हे नाव विचित्र का? याचा विचार करू लागलो. पण माझ्या डोक्यात प्रकाश पडेना. कदाचित हबेतुल्लाह या नावाचा अपभ्रंश असणार ते नाव असावं.

स्टुडिओत पोहोचलो. कमाल अमरोहीच्या कथेवर बोलणं सुरू झालं. कमालनं आपल्या खास साहित्यिक व प्रभाव पाडणार्‍या शैलीत एक प्रसंग ऐकवला. अशोकनं (अशोक कुमारनं) माझं मत विचारलं, ‘‘काय मंटो?’’
का कोण जाणे, माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले,
‘‘ठीक आहे. पण हिपटुल्ला नाही!’’
शेवटी जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं. ‘हिपटुल्ला’ या शब्दप्रयोगातून ते व्यक्त झालं होतं. कथेतील प्रसंगाचा अनुक्रम लक्षात घेतला तर या प्रसंगात फार दम नाही, हे मला सांगायचं होतं.
‘‘काही वर्षांनंतर हसरत (गीतकार हसरत जयपुरी)च्या बाबतीत, त्याचा वेगळ्या प्रकारे उपयोग केला. त्यानं माझं मत विचारलं तेव्हा सांगितलं, ‘‘भाई हसरत काही जमलं नाही... काहीतरी हिपटुल्ला सारखं सादर कर. हिपटुल्ला...’’
दुसर्‍यांदा हिपटुल्ला म्हणून सर्वांची प्रतिक्रिया काय झाली ते पाहू लागलो. हा शब्दप्रयोग आता सर्वसामान्य झाला होता. त्यामुळे फारसा विचार न करता मी त्याचा उपयोग करू लागलो. ‘हिपटिलेटी’ नव्हे तर ‘हिपटोलाईज’ करायला हवं. इत्यादी इत्यादी. एक दिवस मला अशोकनं विचारलं,
‘‘हिपटुल्लाचा मूळ अर्थ काय आहे? कोणत्या भाषेत हा शब्दप्रयोग आहे?’’
अशोकनं मला अर्थ विचारला तेव्हा श्यामदेखील हजर होता. तो जोरजोरात हसू लागला. त्याचं डोकं आकुंचित झालं. त्या क्रिकेटपटूच्या विचित्र नावाकडे मी त्याचं लक्ष वेधलं, तेव्हा तो माझ्याबरोबर ट्रेनमध्ये होता. हसत हसत त्यानं सर्वांना सांगितलं,
‘‘ही मंटोची नवी मंटोगिरी आहे... त्याला काही ना काही नवं करायचं असतं... काही सुचलं नाही म्हणून त्यानं हिपटुल्लाला पकडून चित्रपटसृष्टीत आणलं आहे.’’
सांगायचं म्हणजे फारशी ताणातणी न होता हा शब्दप्रयोग मुंबईच्या चित्रपटसृष्टीतील शब्दप्रयोगात रूढ झाला.

(सआदत हसन मंटो - दस्तावेज खंड ५मधील ‘मुरली की धुन’ या प्रसिद्ध अभिनेता श्यामवरील लेखातून. मंटोच्या सर्व लेखनाचे एकूण ५ खंड ‘राजकमल प्रकाशन’नं प्रसिद्ध केले आहेत.)

अरबी - मराठी

उज्ज्वला रेगे

सुरुवातीच्या दिवसांत एकदा मी बायकांच्या ओपीडीत एका पेशंटला तपासलं. त्यानंतर ती कपडे, अबाया चढवत होती. खुर्चीवर काढून ठेवलेल्या तिच्या काळ्या शेल्याकडे बोट दाखवून ती मला म्हणाली,

"आतोनी शेला. (दे मला शेला)"

मी दचकले. ही बेदू बाई मला समजावं म्हणून शेला शब्द वापरते आहे का? हिला कसा कळला मराठी शब्द? माझं गांगरणं तिच्या लक्षात आलं. पण तिला वाटलं की मला शेला या शब्दाचा अर्थ कळला नाही. समजावणीच्या सुरात तिने सांगितलं.

"त्या खुर्चीवर ते जे काळं कापड आहे ना माझं पांघरायचं, त्याला अरबीत शेला म्हणतात."

पण तेव्हापासून मी कान टवकारले. तेव्हा "दुकान, सैल, कंदील, मंदील" हे शब्द रोजच्या संभाषणात सर्रास ऐकू आले. खद्रातली लहान मुलं आपल्या वडलांना आमच्या मुलांसारखीच, "बाबाऽऽ" अशीच हाक मारत हे लक्षात आलं. 'मरवा, ऊद, अत्तर' हे सुगंधी शब्द सापडले. 'व' या उभयान्वयी अव्ययाने तर अगदी 'हे' व 'ते' अशा थाटात खुद्रा व मुंबई जोडून टाकली.
राशीद अश्शम्मरीने रागारागाने मला 'तंबी' दिली. मी त्या तंबी शब्दावर खूश झाले म्हणून तो आणखीच रागावला. पण मग 'खुलासा' केल्यावर तो 'खजील' झाला. याखेरीज मला 'मुद्दत, फुरसत, हरकत' या मराठी शब्दांच्या त्याच अर्थाच्या 'मुद्दा, फुरसा, हरका' या चुलतबहिणी तोंडवळ्यावरून ओळखता आल्या. 'वार'भर कापडाचा 'हिसाब' आणि रोज 'रतलाचा रतीब' हे ऐकून तर मन आजोळी, बाळपणात जाऊन पोचलं. 'मनुका' खात खात मी 'कंसा'तला 'मजकूर' वाचला. मग 'इभ्रत, इलाखा, कपार, कनात, कयास, कसब, कायदा, कुवत, पुण्याच्या कसबा पेठेतला कसबा (= शहराचा जुना भाग), खंदक,' असे माहेरचे पाठीराखे जिथेतिथे भेटायला लागले.

उर्दू-हिंदीच्या मध्यस्थीशिवाय मराठीशी थेट ऋणानुबंध साधणार्‍या अशा कित्येक फारसी शब्दांनी माझं स्वागत केलं. मग अरबी बोलायच्या प्रयत्नात जेव्हा जेव्हा एखादा शब्द अडला तेव्हा तेव्हा मी मराठी शब्द दडपून दिला. आणि कित्येक ठिकाणी तो खपूनही गेला. अरबी ही माझ्या मायमराठीशी नातं जोडणारी, माझी मामी*च, मला त्या दूरच्या देशात नव्याने लाभली.

(*मावशी म्हटलं असतं. पण मराठी IndoEuropean आणि अरबी AfroAsiatic. त्यामुळे या दोन भाषा एका वंशातल्या नाहीत.)

'सोन्याच्या धुराचे ठसके', पृ० १११-११२

विल्यम सफायर

'वॉटरबोर्डिंग्ज' (Waterboardings) हा शब्द ऐकला आहे? दहशतवाद्यांच्या छावण्यांमध्ये त्यांना बोलते करण्यासाठी छळण्याचा हा एक मार्ग आहे. सफायर यांनी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला होता. वॉटरबोर्डिंग म्हणजे एका सी-सॉसारख्या फळीवर कैद्याला जखडायचे आणि मग त्याचे डोळे पाण्याखाली असे दाबायचे, की त्याला आपण बुडतोय असे वाटायला लागेल. (सुप्रसिद्ध राजकीय व भाषाविषयक स्तंभलेखक, पुलित्झर पारितोषिक विजेते, आणि रिचर्ड निक्सन यांचे काही काळ सल्लागार असलेले विल्यम सफायर यांचे २५ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले.)

एका लेखात त्यांनी रिट्रोनिम (Retronym) या शब्दाचा विचार केला आहे. रिट्रोनिम म्हणजे एखाद्या नव्या आधुनिक प्रकारच्या वस्तूच्या आगमनामुळे, त्या वस्तूच्या आधी वापरल्या जाणार्‍या जुन्या वस्तूला दिलेले नाव उदा० ई-मेल आल्यानंतर पोस्टाच्या माध्यमातून पाठवायच्या टपालाला आता स्नेल मेल (snail mail) (स्नेल म्हणजे गोगलगाय) म्हटले जाते. जुन्या वस्तूला हे जे नवे नाव मिळाले, त्यालाच रिट्रोनिम असे म्हणतात. डिजिटल प्रकारची रिस्टवॉचेस आल्यावर जुन्या प्रकारच्या मनगटी घड्याळांना आता अ‍ॅनालॉग वॉचेस हे नाव मिळाले. आजकाल सर्वजण इलेक्ट्रिक गिटारच वापरतात. म्हणून त्यांना नुसते गिटार असे म्हणायचे आणि त्यांच्या आधीच्या गिटारना आता 'अकूस्टिक गिटार' असे म्हटले जाते. 'वॉटरबोर्डिंग्ज' (Waterboardings) हा शब्द ऐकला आहे? दहशतवाद्यांच्या छावण्यांमध्ये त्यांना बोलते करण्यासाठी छळण्याचा हा एक मार्ग आहे. सफायर यांनी या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला होता. वॉटरबोर्डिंग म्हणजे एका सी-सॉसारख्या फळीवर कैद्याला जखडायचे आणि मग त्याचे डोळे पाण्याखाली असे दाबायचे, की त्याला आपण बुडतोय असे वाटायला लागेल. सफायर यांना एका चित्रपटाच्या पहिल्या खेळासाठी आलेल्या आमंत्रणपत्रिकेत म्हटले होते, 'कॉकटेल अटायर'. याचा अर्थ छान कपडे असा होतो. नेहमीचेच कपडे नव्हेत, की भडकही नव्हेत!

एन०डी० आपटे
दै० सकाळ, दि० 5 ऑक्टोबर २००९

मुरुडची भाषा

नावाचा उच्चार विशेषणाने करणे हा आणखी एक इथला विशेष आहे. हे विशेषण त्या माणसाच्या विशिष्ट कृतीवरून किंवा त्यांच्या घराण्यात घडलेल्या एखाद्या गोष्टीवरून दिले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकाची अति हौस असलेल्या एखाद्या दत्तात्रय नावाच्या माणासला 'नाटकी दत्तू' म्हणून ओळखले जाते. नारळांचा मोठा व्यापारी असलेल्या कुणा मधू नावाच्या माणसाला 'नारळी मधू' म्हटले जाते. विवाहित स्त्रीचा उल्लेख तर तिच्या नवर्‍याच्याच नावाने होतो. म्हणजे नवर्‍याचे नाव 'शिवराम' असेल, तर पत्नीला 'शिवरामी' म्हणतात.

विनायक नारायण बाळ

माझ्या गावकर्‍यांची भाषा अगदी रोखठोक. ते बोलताना तोंडाऐवजी नाकाचा वापर करतात की काय, असे ऐकणार्‍याला वाटेल.

बरेचसे शब्द त्यांनी मोडून घेऊन मुखात बसविलेले आहेत! म्हणजे घ्यायचं, द्यायचं, करायचं असे म्हणायचं असेल, तर घैचं, दैचं, कराचं असे बोलतात.

सरळ नावाने कुणी हाक मारत नाही. मारली, तर ऐकणाराही 'ओ' देत नाही! सीतारामला 'शित्या', परशुरामला 'पर्शा' पुकारले, तरच त्यांच्या कानात शिरते!

नावाचा उच्चार विशेषणाने करणे हा आणखी एक इथला विशेष आहे. हे विशेषण त्या माणसाच्या विशिष्ट कृतीवरून किंवा त्यांच्या घराण्यात घडलेल्या एखाद्या गोष्टीवरून दिले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या नाटकाची अति हौस असलेल्या एखाद्या दत्तात्रय नावाच्या माणासला 'नाटकी दत्तू' म्हणून ओळखले जाते. नारळांचा मोठा व्यापारी असलेल्या कुणा मधू नावाच्या माणसाला 'नारळी मधू' म्हटले जाते. विवाहित स्त्रीचा उल्लेख तर तिच्या नवर्‍याच्याच नावाने होतो. म्हणजे नवर्‍याचे नाव 'शिवराम' असेल, तर पत्नीला 'शिवरामी' म्हणतात.

एखाद्या घरी स्वत: पैसे देऊन राहिलेल्या म्हणजे 'पेईंग गेस्ट' माणसाला चक्क 'पोषण्या' म्हणून ओळखतात.

देवळामधील देवाचा उल्लेख त्याच्या नावाने न करता फक्त 'श्री' म्हटले जाते. 'श्रीच्या देवळात', 'श्रीला अर्पण', 'श्रीच्या आशीर्वादाने' असे उल्लेख येतात.

असे जवळपास प्रत्येक व्यक्तीला मूळ नावापेक्षा इतर नावानेच गावात अधिक ओळखले जाते.

दिवसभरात तोंडातून एकही शिवी गेली नाही, तर तो निश्चितच या गावचा नव्हे!

शिव्यांच्या वापराने सांगायची गोष्ट व्यवस्थित ठसविली जाते, असा दृढ समज असावा! अगदी प्रेमाने सांगितलेल्या गोष्टीतही शिवी येणारच! लोकांच्या तोंडून येणार्‍या म्हणी खास लक्ष द्याव्या अशा आहेत. त्यांतल्या काही वानगीदाखल अर्थासह पाहू या-

'बोडकीला न्हाव्याची लाज कशाला?' - पतिनिधनानंतर केशवपन केलेली स्त्री म्हणजे बोडकी. थोडक्यात ताकाला जाऊन गाडगे लपविणे अशा अर्थी.

बेत बाजीरावाचे प्रकाश सनकडयांचे - हाती काहीच नाही पण स्वप्नं मात्र भली मोठी रंगवायची.

सनकड्या म्हणजे काटक्या-कुटक्या. पूर्वी अगदी गरीब कुटुंबांच्या घरात त्या पेटवून उजेडाची गरज कशीतरी भागली जायची.

'भट सांगेल, ती आमुश्या (अमावस्या) न्हावी ठेवील त्या मिशा, राजा दाखवील ती दिशा' - एखादी गोष्ट अगदी अपरिहार्यपणे स्वीकारावी लागणे अशा अर्थी.

'चौघात मरण लग्नासमान' - सगळ्यांच्या बरोबरीने दु:ख आले, तरी आनंदासारखे मानणे.

या म्हणीला जोडून दुसरी एक म्हण प्रचलित आहे, ती अशी

'मेहुणीच्या लग्नात जावई कस्पटासमान' - मेहुणीच्या लग्नाच्या वेळी दुसर्‍या जावयाचे स्वागत करायला सासुरवाडी उत्सुक असते. त्या गडबडीत मोठ्या जावयाकडे फारसे लक्ष दिले जात नाही. थोडक्यात, जुलुमाचा रामराम.

'मांडीखाली आरी, चांभार पोरांना मारी' - म्हणजे काखेत कळसा गावाला वळसा.

आरी हे चर्मकामातले हत्यार आहे.

(प्रेषक : राम पटवर्धन)

मानवी भाषेचे वय - अज्ञात!

ध्वनिविशेषांची मर्यादा ओलांडून माणूस पहिले-वहिले मोडके-तोडके शब्द कधी वाणीबद्ध करू लागला, त्यातून शब्दसंकुल कसे करू लागला, वाक्यरचना आणि शब्दांची संवादी योजना करू लागला, यांबद्दलचे संशोधन अजून बरेच प्राथमिक अवस्थेत आहे. जुने हाडांचे सापळे वा कवटया सापडू शकतात, पण जुने शब्द कसे सापडणार? ते तर केव्हाच - म्हणजे बोलता बोलताच हवेत विरून जात होते. (शब्द बापुडे केवळ वारा!) त्यामुळे प्राचीन माणूस बोलायला लागल्यापासून ते त्या भाषेला संकेत संवादाचे रूप प्राप्त होईपर्यंत नक्की किती वर्षे गेली असावीत, हे अजूनतरी निश्चितपणे सांगता आलेले नाही.

- कुमार केतकर,
दै० लोकसत्ता दि० २९ ऑगस्ट २००९
(प्रेषक : दिशा केळकर)

जागतिकीकरणाच्या संदर्भात मराठी अस्मिता

अस्मिता याचा अर्थ आपल्या सत्त्वाची जाणीव असणे. अभिमान याचा अर्थ कदाचित गर्व असाही होईल. त्यामध्ये दंभ असू शकतो. दंभ अगर गर्वामध्ये अहंकार आहे. अस्मितेमध्ये सत्त्व आहे. भाषिक अस्मिता याचा अर्थ असाही होऊ शकतो की, माझ्या सत्त्वाची मला जाणीव आहे. माझे स्वतंत्र अस्तित्व ही माझी 'ओळख' आहे. ती पुसताना वेदना होणार आहेत. 'विज्ञान आणि तंत्रज्ञाना'त झालेल्या क्रांतीमुळे, आधुनिक मानवाला आपल्या 'संस्कृती'चा शोध घेताना इतरांकडून घेण्याची आपली क्षमता किती आहे, यावर 'अस्तित्व' अवलंबून आहे. 'अस्तित्व' टिकवल्यानंतरच 'अस्मिते'चा जन्म होतो. आजच्या संक्रमणकाळात त्याचबरोबर जागतिकीकरणातून जे घडू लागले आहे, त्यातून 'माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांती'ने जगभरातील अनेक बोलीभाषा मृत्युपंथाला लागतील, असे भाषा वैज्ञानिक सांगू लागले आहेत.

आजचे सामाजिक वास्तव काय आहे? आजचा प्रगत समाज तो आहे की, ज्यांना या व्यवस्थेत सर्व प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांची प्रगती झाली आहे. जे संधीपासून वंचित आहेत, ते मागास राहिले आहेत. जे मागासलेले आहेत त्यांचा 'बुद्ध्यंक' कमी आहे, असा याचा अर्थ नाही. मागासलेपण हे संधीमधील विषमतेचे 'अपत्य' आहे. आज इंग्रजी ही प्रगत ज्ञान-विज्ञानाची, उच्च शिक्षणाची भाषा बनली आहे. केवळ इंग्रजांची ही भाषा राहिलेली नाही. भारतात इंग्रजी बोलणार्‍यांची संख्या ही इंग्लंडपेक्षाही जास्त आहे. हा वर्ग सर्व प्रकारच्या निर्णयप्रक्रियेमध्ये आहे. 'बहुजन समाज' हा आपल्या मातृभाषेतून आपला दैनंदिन भाषिक व्यवहार करतो आहे. बहुजनांना आपली उन्नती करून घ्यायची असेल, तर त्यांना 'निर्णयप्रक्रिये'त सहभागी व्हावे लागेल. त्यासाठी त्यांना ज्या भाषेत 'निर्णयप्रक्रिया' सुरू आहे, त्या भाषिक व्यवहारात सहभागी व्हावे लागेल. तरच त्यांचे 'अस्तित्व' टिकणार आहे.

अशा या संभ्रमित कालखंडात प्रगत समाज हा बहुभाषिक समाज असणार आहे. एकभाषिक समाज हा मागासलेला समाज असणार आहे. 'भाषिक अस्मिता' ही आपल्या सत्त्वाशी निगडित असल्याने इतर 'प्रगत भाषा' अवगत करताना आपल्या 'मातृभाषे'वर हे आक्रमण आहे, असा भ्रम होऊ शकतो. परंतु 'भाषा- विज्ञान' असे म्हणते की, मातृभाषेचा पाया उखडून कोणतीही इतर भाषा आत्मसात करणे चुकीचे आहे. ज्यांचे मातृभाषेवर प्रभुत्व असते, तेच इतरही भाषांवर प्रभुत्व मिळवू शकतात. आपल्या मातृभाषेतून भाषिक व्यवहार करणे कमीपणाचे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. मातृभाषा चांगली असल्याखेरीज जगातील कोणतीही भाषा चांगली येऊ शकत नाही. बहुभाषिक प्रगत समाजात अनेक भाषा 'प्रथम-भाषा' राहणार आहेत. पूर्वी मानवी विकासाच्या पहिल्या टप्प्यात 'एकभाषिक' समाज होता. समाजाचे अभिसरण गतीने सुरू असल्याने 'बहुभाषिक' समाजाकडे वाटचाल होत आहे. काही मानववंशशास्त्रज्ञ आणि भाषा वैज्ञानिक असे म्हणू लागले आहेत की, मानवी समाज पुढे एकवंशीय आणि जगाची एकच भाषा असणारा बनेल. आजही एकभाषिक वसाहतवादी इथेही आहे. 'वसाहतवादी' हे शोषण करीत असतात.

'भारतीय भाषां'मध्ये सर्वांत प्राचीन भाषा 'तमिळ' आहे. 'मराठी'ला हजार एक वर्षांची परंपरा आहे. ज्ञानग्रहणाची परंपरा संस्कृतमधून होती. बुद्ध, महावीर आणि बसवेश्वर यांनी भाषिक क्रांती करून जनसामान्यांच्या भाषांना धर्मभाषा बनविले. चक्रधरांनी मराठीला धर्मभाषेचा दर्जा दिला. इतिहास असेही सांगतो की, प्रतिक्रांती करून यांना संपविण्यात आले. बहुजनांची पुन्हा अधोगती झाली. वर्ण आणि जातिसंघर्ष हा भारतीय समाजात सतत मध्यवर्ती राहिलेला आहे. सर्व प्रकारच्या सत्तेपासून जो समाज दूर फेकला जाईल, तो प्रगती करू शकत नाही. इंग्रजी ही आज जागतिकीकरणाची भाषा आहे. सर्वच भारतीय भाषांना थोर परंपरा आहे, तरीही त्यांना त्या-त्या प्रदेशाच्या मर्यादा आहेत. याचा अर्थ, त्यांच्या वैचारिकतेलाही मर्यादा आहेत असे नाही. तरीही इंग्रजांपासून दूर राहाल तर फेकले जाल.

समाजातील नवशिक्षितवर्ग हा आपल्या मातृभाषेपासून अलग होऊ पाहतो आहे. इंग्रजी भाषा ही जरी प्रगत समाजाच्या भाषिक व्यवहाराची भाषा असली, तरी एकच मातृभाषा असणारे दोन बुद्धिजीवी आपल्या मातृभाषेतून संवाद न करता इंग्रजीतून संवाद करताना दिसतात. इतरांपासून आपण वेगळे आहोत हे त्यातूनच दाखविणे किंवा आपल्या मातृभाषेतून बोलणे मागासलेपणाचे आहे असे वाटणे, यातील फरक आपण समजून घेत नाही. त्यामुळे आपल्या मातृभाषेच्या विकासाला मर्यादा पडतात. आपल्या मातृभाषेची शब्दसंख्याही मर्यादित राहते. ज्या भाषांनी जगभरच्या भाषांतील शब्दांचा स्वीकार केला, त्याच भाषा समृद्ध बनल्या आहेत. म्हणून आपल्याकडून इतरांनी किती घेतले यावरून आपली उंची मोजत बसण्यापेक्षा इतरांकडून, इतर भाषांकडून आपण किती घेतले, हे अधिक महत्त्वाचे आहे. यातूनच आपल्या भाषेचा विकास होणार आहे. आपले जीवन समृद्ध बनणार आहे.

मानव हा अनेक भाषा बोलणारा आहे. त्यामुळे प्रगत समाज हा बहुभाषिक समाज असणार आहे. भारतातील 'शहरे' हे त्याचे मॉडेल राहणार आहे. या प्रगत समाजात आपल्याच मातृभाषेतून संवाद करण्यासाठी आपल्याच मातृभाषेतील समूह सभोवताली असणार नाही. त्यांच्या मातृभाषा वेगवेगळ्या असणार आहेत. त्यांची संपर्कभाषा म्हणून 'इंग्रजी' घडली आहे. तिला आज दुसरा पर्याय नाही. इतरांशी संवाद साधणे हेच भाषेचे प्रधान उद्दिष्ट आहे. वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळया 'ध्वनी व्यवस्था' निर्माण झाल्या. प्रत्येक भाषा वेगळी आहे; कारण प्रत्येक भाषेची 'ध्वनी व्यवस्था' वेगळी आहे. मानवी प्रयत्नांतून ती निर्माण झाली आहे. लिपी ही तर 'ग्राफिक सिंबॉल' आहे. ती उच्चारशास्त्राप्रमाणे असेलच असे नाही.

मानवाला प्रथम आपल्या 'अस्तित्वा'साठी संघर्ष करावा लागेल. जोवर आपण आपल्या मातृभाषांतून दैनंदिन भाषिक व्यवहार करीत राहू, तोवरच त्या भाषा जिवंत राहणार आहेत. दरवर्षी अनेक भाषा मरत आहेत; कारण ते समूह लहान आहेत. आफ्रिकेतील अनेक भाषा मृत्युपंथाला लागल्या आहेत. मराठीतून मोठ्या प्रमाणात व्यवहार आजही सुरू आहे. इंग्रजी भाषा हे आक्रमण नसून इंग्रजी आत्मसात करूनच मराठी जिवंत राहणार आहे; कारण भारतातील 'बहुजन' हे 'बहुभाषिक' आहेत.

इरगोंडा पाटील
दै० महाराष्ट्र टाइम्स, दि० १ मे २००८

आग्रह आणि दुराग्रह

भाषा हा तुमचा माझा श्वास आहे. भाषा ही केवळ उच्चारलेल्या किंवा छापलेल्या शब्दांनी बनत नाही. भाषा हा तुम्ही-आम्हीच नाही तर अनेक वर्षे आपल्या पूर्वजांनी केलेला विचार आहे, जगलेले आयुष्य आहे. त्यामुळे आपण मराठीविषयी बोलतो तेव्हा आपण आपल्या जगण्याविषयी बोलतो, आपल्या संस्कृतीविषयी बोलतो. इंग्रजीने तुम्हां-आम्हांला पुष्कळ दिले हे खरे, मात्र इंग्रजी माध्यमाकडे वळणार्‍या लोकांविषयीची तक्रार आहे ती इंग्रजीशी भांडण आहे म्हणून नाही, तर ती माणसे कुठेच रुजत नाहीत म्हणून. ती धड इंग्रजीही होऊ शकत नाहीत आणि मराठीशीही त्यांचा संबंध तुटलेला असतो!पुष्पा भावे

भाषा हा तुमचा माझा श्वास आहे. भाषा ही केवळ उच्चारलेल्या किंवा छापलेल्या शब्दांनी बनत नाही. भाषा हा तुम्ही-आम्हीच नाही तर अनेक वर्षे आपल्या पूर्वजांनी केलेला विचार आहे, जगलेले आयुष्य आहे. त्यामुळे आपण मराठीविषयी बोलतो तेव्हा आपण आपल्या जगण्याविषयी बोलतो, आपल्या संस्कृतीविषयी बोलतो. इंग्रजीने तुम्हां-आम्हांला पुष्कळ दिले हे खरे, मात्र इंग्रजी माध्यमाकडे वळणार्‍या लोकांविषयीची तक्रार आहे ती इंग्रजीशी भांडण आहे म्हणून नाही, तर ती माणसे कुठेच रुजत नाहीत म्हणून. ती धड इंग्रजीही होऊ शकत नाहीत आणि मराठीशीही त्यांचा संबंध तुटलेला असतो!

सत्यजित राय हे वास्तविक पाहता पूर्णत: बंगाली कलाकार. त्यांनी जो अनुभव मांडला तो बंगालमधला; पण आज जगातील प्रत्येक शहरात सत्यजित राय यांचा चित्रपट पोचला आहे. हे आहे वैश्विक होत जाणे!

मुख्य मुद्दा आहे तो संस्कृती रुजवण्याचा. कुठेतरी संस्कृतीत आपल्याला रुजावे लागते. आपण मराठी असू तर मराठीत रुजू. पण मराठी असणे याचा अर्थ केवळ मिरवणुका काढणे किंवा केवळ प्रतीके वापरणे असा होत नाही. मराठी नावाची संस्कृती आहे. त्या संस्कृतीचा साध्या राहणीवर विश्वास होता. दुर्गाबाई भागवत का 'दुर्गाबाई' होऊ शकल्या? कारण त्यांना दोन खादीच्या साडया पुरत होत्या. आज त्या प्रकारे साधे आणि म्हणून स्वतंत्र राहणे अनेकांना अवघड झाले आहे. एवढे सर्वजण वेगवेगळया हव्यासाने बांधले गेले आहेत. मराठी असणे म्हणजे केवळ शिवाजी महाराजांचे नाव घेणे नाही, तर शिवाजी महाराज काय होते ते समजावून घेणे. आज शिवाजी महाराजांचे नाव घेणार्‍यांना ते फार समजले आहेत असे मला वाटत नाही. शिवाजी महाराजांनी आपली लाडकी लेक बजाजी निंबाळकरांना दिली होती, ज्या बजाजी निंबाळकरांनी आपल्या इच्छेने धर्मांतर केले होते. त्यामागे सामंजस्याची भूमिका होती. सरदारांच्या हातातून शस्त्र काढून घेऊन शिवाजी महाराजांनी ते मावळयांच्या हातात दिले तेव्हा त्यांनी हातात तलवार घेणार्‍यांचे या देशातील सगळे शास्त्रच बदलले. त्यामुळे कुठल्याही मराठीपणाचा विचार करताना, आपल्याला हे जे संचित मिळाले आहे त्याचा विचार करावा लागेल.

आपल्या भाषेचा आग्रह जरूर असायला हवा; पण आग्रह स्वत:साठी, दुसर्‍यांसाठी नाही. आपल्याकडे दुसर्‍याच्या भाषेचा विचार करण्याचा सुंदर इतिहास आहे. गुजरातीचे पहिले व्याकरण लिहिले आपल्याकडील गांधीवादी काकासाहेब कालेलकर यांनी. ख्रिस्तपुराण फादर स्टीफन्सनी लिहिले. आपल्या संस्कृतीचा आग्रह धरणे आवश्यक, पण तो आग्रह धरत असताना दुसर्‍या संस्कृतीचा अधिक्षेप होता कामा नये. ज्या सहजपणे आपण सरदारजींचे विनोद सांगतो, त्या सहजपणे आपण स्वत:ची चेष्टा करतो/सहन करतो का? विनोदामध्ये स्वत:कडे पाहून हसणे हे खूप महत्त्वाचे असते. पण आपण चटकन दुसर्‍याला लक्ष्य करतो. भारत ही अनेक संस्कृतींची भूमी आहे, भाषांची भूमी आहे हे अत्यंत ताकदीचे आहे. प्रांतवर भाषारचना नंतर आली. त्याआधी भारताची भाषा नैसर्गिक रचनेनुसार असे. सोलापूरला जा, माणसे द्वैभाषिक होताना दिसतात. ती मराठी बोलतात, कानडी बोलतात, तेलगूही बोलतात. सीमेवरील माणसे एकापेक्षा अधिक भाषा बोलतात. त्यामुळे भाषा हा भांडणाचा मुद्दा करण्याची गरज नाही.

आपण प्रत्येकाने स्वत:ला विचारून पाहावे की मराठीचा वापर कमी झाला आहे याला मी स्वत: जबाबदार आहे की नाही? व्यवहाराचा मुद्दा सांगून आपण मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो तेव्हा हे विसरतो की जयंत नारळीकर बनारसला हिंदी भाषेतून शिकले, जे जगविख्यात वैज्ञानिक झाले आणि नंतर त्यांनी मराठीतून विज्ञानकथांचे लेखन केले. माणसाला अधिक भाषांचे संचित मिळाले की मनुष्य अधिक संपन्न होतो. केवळ संपन्नच नव्हे तर उदारहृदयी होतो, त्याची नजर विस्तृत होते.

माझा आक्षेप आहे तो मुठी आपटून भाषेविषयी बोलण्यावर. आज या मुठी आपटणार्‍यांचा तरुणांवर खूप प्रभाव आहे. या तरुणांनी मुठी आपटणार्‍यांच्या मागे राहावे यासाठी भाषाभिमानाचे कारण पुढे केले जाते; तेव्हा त्या तरुणांच्या प्रयत्नांची ईर्ष्या कमी होते. ही ईर्षा कमी होण्याला माझा आक्षेप आहे. तुम्हांला नोकर्‍या मिळत नाहीत, कारण परभाषकांना नोकर्‍या मिळतात. तुम्हांला नोकर्‍या मिळत नाहीत, कारण परप्रांतीयांना नोकर्‍या मिळतात... हे सारखे-सारखे सांगत राहण्याने ते सोपे वाटत जाते.

एका संस्थेतील नोकरीची संधी मराठी तरुणांना मिळावी म्हणून कानाकोपर्‍यात त्याची जाहिरात पोहोचविली, माहिती दिली; पण फक्त दोन मराठी मुले आली आणि बाकी सर्व अमराठी, असेही अनुभव आहेत. त्यामुळे आपण मराठी मुलांना त्यांची गुणवत्ता वाढवण्याचे प्रोत्साहन देणार की नाही? सारखी सोपी कारणे दाखविली तर ते गप्प बसणार, कधी तरी आपले नेते आपले भले करतील अशी आशा बाळगत राहणार. अशी आशाळभूतांची सेना समाजाला वर येऊ देईल का? मराठी पेय प्या यासारख्या अनेक गोष्टी जागतिकीकरणाविरोधी प्रचार करताना आम्ही गावोगावी सांगतो. पण या वरवरच्या गोष्टींनी मराठीपण येईल का? खरोखर मराठी मराठी म्हणून ओरडणारी माणसे मराठी वाचतात का? मराठीकडे गंभीरपणे पाहतात का असाच माझा प्रश्न आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासारखी संस्था डबघाईला येऊन अनेक वर्षे झाली. आम्ही खूप प्रयत्न केले. दुर्गाबाई आणि मी उपोषणाला बसलो. तरी पुढे काही झाले नाही. अशी एखादी संस्थासुद्धा आपल्याला चालवता येत नाही? लाखो रुपये खर्च करून जिथे प्रत्येक उपनगरात देवळे बांधली जातात त्या महाराष्ट्र देशी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय चालत नाही, मराठीच्या संशोधनासाठी जागा निर्माण होत नाहीत याला केवळ शासनच नव्हे; तर आपणही जबाबदार आहोत.

एक काळ होता गौरवाचा. केतकरांनी एकहाती ज्ञानकोश तयार केला. शास्त्रीबुवांनी संस्कृतिकोश केला, पण आता त्यासाठी संस्था उभ्या कराव्या लागतील. ही कामे प्राधान्याने हाती घ्यावी लागतील. त्यासाठी झिजणारे तरुण हवेत. केवळ घोषणांनी मराठीचे भले कसे होणार? आंदोलने महत्त्वाची आहेतच; पण तोंडात भडकावली; त्याऐवजी हात जोडून सत्याग्रह केला असता तर मराठीची शान वाढली असती.

प्रत्येक गोष्ट मला किंवा माझ्या नेत्याला पटलीच पाहिजे हे विपरीत आहे. लोकशाहीविरोधी आहे. सगळे आपल्या मनाप्रमाणे घडू शकणार नाही. सेन्ससचे भाषांतर करताना आपण शिरगणती हा शब्द वापरतो. धडगणती म्हणत नाही. ज्याला खांद्यावरचा विचार करण्याचा भाग आहे तो नागरिक. नेतृत्वाची केवळ भाषा संमोहक असणे पुरेसे नाही; लोकशाहीतील वक्तृत्व दुसर्‍याच्या विचारांना प्रवृत्त करणारे असावे. हात उचलून संवाद कसा होईल? थोडीशी त्या हातालापण शिस्त लावायला हवी. हाही मराठी संस्कृतीचाच भाग आहे.

मराठी संस्कृतीला तर इतके आयाम आहेत, ती अभिजनांची आहे, बहुजनांची आहे. ज्यांना ज्ञानेश्वर हा शब्द उच्चारता येत नाही त्यांनी ग्यानबा-तुकोबा म्हणत मराठीला जपले. छपाई नसताना, पाठांतराने वाढवले. मराठी या सगळया वेगवेगळ्या लोकांची आहे. बायाबापड्यांची आहे याची कृतज्ञता जाणली पाहिजे. त्यांच्या जगण्याशी माझे काय नाते आहे याचा विचार आजच्या पिढीला शिकवला नाही तर मराठीविषयी ओरडणार आणि नंतर डिस्कोला जाणार अशी विसंगती निर्माण होते.

मराठी भाषा आणि मराठी असण्याबद्दलचा अभिमान बरोबर आहे. पण त्या अभिमानाचा अहंकार आणि पोकळ अहंकार होणार नाही; हे पाहिले पाहिजे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विद्यार्थी म्हणून आम्ही सहभागी होतो. आम्ही जी स्वप्ने पाहिली ती आजही पूर्ण झालेली नाहीत. अनेक शासकीय समित्यांवर काम केल्यावर आज मी अत्यंत ठामपणे सांगू शकते की शासनाच्या पातळीवरील मराठीला मराठी कारकूनच जास्त विरोध करतात. इंग्रजी तर्जुमा तयार असतो, तो मराठीत आणायचा आळस! आज अनेक ठिकाणी हा आळस दिसतो आहे. विचार करण्याचाही आळस आला आहे.

नवीन पिढीतील अनेक मराठी तरुणतरुणी अनेक क्षेत्रांत पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याने मराठीला निश्चितच उंची मिळेल. अशा वेळी आम्ही ठरवू चित्रपटांत काय दाखवायचे ते आणि आम्ही ठरवू कलाकारांनी काय करायचे ते असे बोलून कसे चालेल? चार मूठभर माणसांनी एकत्र येऊन सर्वांचे मत ठरवणे हे लोकशाहीच्या विरोधात असल्याचे महात्मा फुल्यांनीही सार्वजनिक सत्यधर्मात सांगितले आहे. त्यामुळे या प्रकारचा दुराग्रह मोडावा लागेल. मराठीच्या गाभ्यात फार सुंदर गोष्टी आहेत. त्या आपण विसरत चाललो आहोत. तुम्ही मिरवणुकीत किती मिरवता हे महत्त्वाचे नाही. या गोष्टी जपण्यासाठी, तरुणांना तेथपर्यंत नेण्यासाठी, विचार करण्यासाठी प्रयत्न झाले तर काहीतरी निर्माण झाले असे म्हणता येईल. क्रौर्यालाच शौर्य मानणार्‍या, आवेशाला बळी पडणार्‍या तरुणांच्या फौजा निर्माण करण्याने काहीही साधणार नाही.

दै० लोकमत, दि० २९ नोव्हेंबर २००९

शब्दांकन : दीप्ती राऊत

(प्रेषक : नीलिमा गुंडी)

...हिचे पांग फेडू

भाषा आणि जीवन अंक : दिवाळी २००७ 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाची रौप्यमहोत्सवी वाटचाल म्हणजे मराठीच्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणातील एक महत्त्वाची घटना आहे. १ जानेवारी १९८२ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या मराठी अभ्यास परिषदेचे हे नियतकालिक. भाषेचा विकास होण्यासाठी तिचा प्रसार होणे जसे महत्त्वाचे असते. तसेच भाषेला प्रतिष्ठा मिळण्यासाठी तिचा कस टिकवणेही गरजेचे असते. यासाठी कार्यरत राहिलेल्या 'भाषा आणि जीवन' ला महाराष्ट्र फाउंडेशनचा वैचारिक नियतकालिकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे.
२००७ मध्ये 'भाषा आणि जीवन' या त्रैमासिकाच्या पंचविसाव्या वर्षातील अंक वाचकांपर्यंत पोहोचले आहेत. 'भाषा आणि जीवन'ची ही रौप्यमहोत्सवी वाटचाल म्हणजे मराठीच्या भाषिक-सांस्कृतिक पर्यावरणातील एक महत्त्वाची घटनाच आहे. १ जानेवारी १९८२ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'चा हा नियतकालिकाचा उपक्रम १९८३ पासून अखंड चालू आहे.
मराठी माणसांच्या भाषाविषयक गरजा पूर्ण करणे, हे परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. माणसाला जश्या काही मूलभूत गरजा असतात, तशाच काही सांस्कृतिक गरजाही असतात. भाषा ही तर सुसंस्कृत मानवाची चौथी मूलभूत गरज मानायला हवी. मराठीच्या विकासासाठी पायाशुद्ध अशी सैद्धांतिक बैठक तयार करणे विशेष गरजेचे असते. भाषिक प्रश्नांचा केवळ भावनिक पातळीवरून पाठपुरावा करून चालत नाही, त्यामागे वस्तुनिष्ठ अशी वैज्ञानिक दृष्टी असावी लागते.


परिषदेने या भूमिकेतून आजवर काम केले. 'इंग्रजीची खिडकी, मराठीचे डोळे' असे घोषवाक्य समोर ठेवून अस्मितेचा प्रश्न संकुचित वर्तुळात अडकू दिला नाही. विविध चर्चासत्रे, व्याख्याने यांच्या माध्यमातून परिषदेने भाषाविषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले आहे. १ मे या महाराष्ट्रदिनी संस्थेने मराठी भाषेच्या विकासासाठी पूरक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा परिपाठ चालू ठेवला आहे. 'भाषा आणि जीवन' हे परिषदेचे त्रैमासिक म्हणजे 'भाषा' या सूत्राला वाहिलेले एकमेव नियतकालिक आहे. 'भाषा' या संकल्पनेची यातून व्यापक दृष्टीने ओळख करून दिली जाते. भाषेत जडलेले जीवन आणि जीवनाच्या अनेक क्षेत्रांत व्यापून राहिलेली भाषा यांच्या नात्याचा यात विविध प्रकारे वेध घेतला जातो. मराठी भाषकांच्या भाषिक गरजा या केवळ 'मराठी एके मराठी' अशा असून चालणार नाहीत. वाचकांच्या बौद्धिक व सांस्कृतिक भरणपोषणासाठी तात्त्विक स्वरूपाचे लेखन, उत्तम अनुवाद यांचीही गरज असते. अनुवादित साहित्यातून इतर भाषाविश्वांशी ओळख होते. त्यातून वाचकांचे भाषाविषयक अपेक्षांचे क्षितिज विस्तारते. त्यांच्या अनुभवाचा आवाका वाढत जातो. भाषांतराची शास्त्रीय चिकित्सा करणारे 'भाषा आणि जीवन'चे विशेषांक तसेच लोकशिक्षणावरील विशेषांक यादृष्टीने उपयुक्त आहेत. भाषेची निर्मिती, तिचा प्रसार, लिपिविषयक प्रश्न, भाषेतील सामाजिक पेच, भाषा आणि साहित्य यांतील अनुबंध, भाषातज्ज्ञांच्या विचारांचे परीक्षण इत्यादीविषयीचे लेखन अंकामध्ये समाविष्ट असते. व्याकरण, भाषासंशोधन, भाषाविज्ञान अशा अनेक गंभीर विषयांवरील लेख जसे त्यात असतात, तसेच हलकीफुलकी भाषिक निरीक्षणे, मार्मिक पानपूरके असा गमतीदार भागही असतो. मराठीला केवळ राजभाषा म्हणून मान्यता मिळून पुरेसे नाही. तिच्या विकासासाठी लोकभाषा आणि ज्ञानभाषा या दोन्ही पातळ्यांवर तिचे महत्त्व प्रस्थापित होणे आवश्यक आहे. प्रशासन, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध व्यवसाय या लोकव्यवहाराच्या वाढत्या परिमाणांमुळे मराठीच्या विकासालाही चालना मिळायला हवी. त्या शक्यता अजमावण्याचे प्रयत्न 'भाषा आणि जीवन' मधील लेखांमधून होत असतात. मराठी ही एक सक्षम ज्ञानभाषा होण्याचा संबंध अनेक शैक्षणिक बाबींशी जोडलेला असतो. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम, पाठ्यपुस्तकांचे मूल्यमापन, भाषाशिक्षकांसाठी मार्गदर्शन याही दिशेनं अंकात विचारमंथन चालू असते.


वाचकांच्या भाषाविषयक शंकांना तज्ज्ञांकडून उत्तरे दिली जातात. 'संपादकीय' मधून विचारांची दिशा सुचवली जाते. पुस्तक परीक्षणे आणि वर्षभरातील भाषाविषयक लेखनसूची यांचा अभ्यासकांना उपयोग होतो. एखाद्या बोलीभाषेविषयीचा परिचयात्मक लेखव 'भाषा आणि जीवन' मधील अनेक सदरे भाषेतील स्थित्यंतरावर प्रकाश टाकतात. 'दखलपात्र' गोष्टींची त्यात नोंद घेतली जाते. 'ज्याची त्याची प्रचीती' त्यात सादर होते. दैनंदिन भाषाव्यवहाराची खेळकरपणाने दखल घेणारी पानपूरके हा तर या नियतकालिकाचा एक महत्त्वाचा घटकच आहे. 'शंका आणि समाधान' मधून वाचकांच्या भाषाविषयक प्रश्नांना तज्ज्ञांकडून उत्तरे दिली जातात. 'संपादकीय' मधून विचारांची दिशा सुचवली जाते. पुस्तक परीक्षणे आणि वर्षभरातील लेखनसूची यांचा अभ्यासकांना उपयोग होतो. एखाद्या बोलीभाषेविषयीचा परिचयात्मक लेख वाचकांना भाषेचा वेगळा लहेजा जाणवून देतो. एखाद्या परकीय भाषेतील अनुवादित कविता, एखाद्या भारतीय भाषेचा तुलनात्मक अभ्यास यांनाही अंकात स्थान असते. एक प्रकारे मराठीचा विकास होण्यासाठी उपयुक्त अशा गोष्टींबरोबरच विविध भाषांचे शांततापूर्ण सहजीवनही त्यात चालू असते. 'भाषा आणि जीवन'ची मुखपृष्ठेही वाचकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत. भाषाविषयक अशी कवितेतील अवतरणे, भाषातज्ज्ञांची छायाचित्रे, शि. द. फडणीस यांची मिश्किल व्यंगचित्रे, श्याम देशपांडे, अनिल अवचट यांची आकर्षक रेखाचित्रे, विनय सायनेकर व सुप्रिया खारकर यांनी संगणकीय मदतीने तयार केलेली चित्तवेधक मांडणीची मुखपृष्ठे यांचाही आवर्जून उल्लेख करायला हवा.


'भाषा आणि जीवन'च्या प्रमुख संपादकपदाची धुरा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषावैज्ञानिक डॉ. अशोक रा. केळकर यांनी सुरुवातीला अनेक वर्षे वाहिली. त्यांनी संस्थेला आणि अंकालाही भक्कम तात्त्विक बैठक दिली आणि विकासाच्या दिशाही लक्षात आणून दिल्या. पुढच्या काळात डॉ. कल्याण काळे, डॉ. विजया देव, डॉ. मृणालिनी शहा यांनीही या परंपरेचे पालन केले. सध्या संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक प्रा. प्र. ना. परांजपे हे प्रमुख संपादक असून डॉ. विजया देव, डॉ. मृणालिनी शहा, डॉ. नीलिमा गुंडी संपादक मंडळात कार्यरत आहेत. या सर्वांबरोबरच डॉ. मॅक्सिन बर्नसन, डॉ. द. दि. पुंडे, डॉ. गं. ना. जोगळेकर, डॉ. अंजली सोमण, आशा मुंडले, यशवंत कानिटकर, डॉ. नीती बडवे यांचाही 'भाषा आणि जीवन'च्या आजवरच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण सहभाग आहे. भाषेचा विकास टिकवण्यासाठी तिचा प्रसार होणे जसे महत्त्वाचे असते तसेच भाषेला प्रतिष्ठा मिळण्यासाठी तिचा कस टिकवणेही गरजेचे असते. यासाठी कार्यरत राहिलेल्या 'भाषा आणि जीवन'ला महाराष्ट्र फाउंडेशनचा वैचारिक नियतकालिकाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे, हे येथे नोंदवायला हवे. भाषेचा विकास ही एक गतिमान प्रकिया असते. त्यासाठी सनदशीर मार्गाने लोकजागृती करण्याबरोबरच उत्तमाची बूजही राखावी लागते. परिषदेने यासाठी 'बॅंक ऑफ महाराष्ट्र'च्या सहकार्याने १९८३ पासून भाषाविषयक उत्कृष्ट लेखनासाठी महाबॅंक लेखन पुरस्कार (रु. ५०००) सुरू केला आहे. आजवर हा पुरस्कार प्रा. मिलिंद मालशे, डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. दिलीप धोंडगे, प्रा. कृ. श्री. अर्जुनवाडकर, प्रा. वसंत आबाजी डहाके आदी मान्यवरांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळालेल्या ग्रंथांमध्ये 'पाणिनीय व्याकरण आणि भाषा तत्त्वज्ञान' (पं. वामनशास्त्री भागवत), 'केशवसुतांच्या कवितेचा शैलीवैज्ञानिक अभ्यास' (डॉ. शकुंतला क्षीरसागरांचा अप्रकाशित प्रबंध), डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचे 'झाडी बोली' विषयीचे पुस्तक, 'अ डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी' (ऍन फेल्डहाऊस आणि शं. गो. तुळपुळे), 'शब्दानुबंध' (शंकर सखाराम) अशा विविध प्रकारच्या भाषाविषयक ग्रंथांचा समावेश आहे. मराठीचा भाषाविषयक अभ्यासाचा प्रदेश अलीकडे विस्तृत होत आहे. पूर्वी पुरस्कारासाठी एखादा लेखही विचारात घेतला जात असे, कारण पुस्तकांची संख्या कमी असे. आता ती उणीव राहिलेली नाही. यंदा हा पुरस्कार 'भाषाव्यवहार आणि भाषाशिक्षण' (प्रकाशक - कासेगाव एज्युकेशन सोसायटी) या सुरेंद्र गावस्कर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाला मिळाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने संस्थेचाभोवतालच्या भाषिक व्यवहारांशी दृढ असा संबंध राहतो, हे महत्त्वाचे!'


अलीकडे अनेक नियतकालिकांमध्ये भाषाविषयक सदरांना स्थान मिळू लागले आहे. भाषाविषयक भान जागे ठेवण्याच्या परिषदेच्या प्रयत्नांची ही फलश्रुती तर नव्हे? अर्थात एवढेच पुरेसे नाही. आजच्या कालात भाषाविषयक प्रश्नांचा पोत बदलत आहे. या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी तरुण व उत्साही कार्यकर्ते आणि विचक्षण वाचक यांचे वाढते पाठबळ संस्थेला हवे आहे. म्हणजे 'हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू' हे कविवर्य माधव जूलियन यांनी मराठीला समस्त मराठी भाषकांच्या वतीने दिलेले आश्वासन पाळणे शक्य होईल. परिषद याबाबतीत आशावादी आहे. सरकारी अनुदानाबरोबरच अनेक समविचारी संस्था आणि भाषाप्रेमी व्यक्ती यांच्या मदतीने 'भाषा आणि जीवन' आज रौप्यमहोत्सवाचा टप्पा साजरा करू शकले आहे. पुढच्या कालखंडातही 'भाषा आणि जीवन' आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान टिकवून ठेवेल आणि भाषाविकासाच्या प्रश्नांना चालना देण्यात ठोस भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

डॉ. नीलिमा गुंडी
(कार्यवाह, मराठी अभ्यास परिषद)