दोघींचे भांडण, तिसरीचा लाभ

वास्तविक पाहता भारतीय समाजातील भाषाभेद हे भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे मूलाधार आहेत. या भाषाभेदांची समाजातील जातिभेदांशी तुलना करून त्यांना विकृती मानणे गैर आहे. अज्ञानमूलक आहे. ज्या भारतीय संस्कृतीचा आपण अभिमान बाळगतो ती भारतीय संस्कृती प्रादेशिक भाषाभेदांनी वैशिष्ट्यपूर्ण केलेल्या प्रादेशिक संस्कृतींनीच बनलेली आहे. प्रादेशिक भाषा व संस्कृती वजा करून 'भारतीय संस्कृती' असे काहीच उरत नाही. म्हणूनच इंग्रजी भाषेचे वाजवी महत्त्व मान्य करत प्रादेशिक भाषांचे जतन व संवर्धन करण्याची आज गरज आहे. ही जबाबदारी भारतीय नागरिक म्हणून सर्वांचीच आहे. स्थानिकांची तसेच स्थलांतरितांचीही. अर्थार्जनासाठी आपापला प्रांत आणि भाषा सोडून देशांतर्गत स्थलांतर करणार्‍यांनी स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर करायला शिकले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. आम्ही आमची भाषा सोडली, तुम्ही तुमची सोडा, या वृत्तीमुळे इंग्रजीसारख्या तिसर्‍या भाषेचे फावते.

डॉ० प्रकाश परब, 'भाषा, समाज आणि शासन',
'महाराष्ट्र टाइम्स' (मुंबई) ११-०९-२००८