मराठी कविता : प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे
हेमंत गोविंद जोगळेकर
एका भाषिक प्रदेशातील बोलीभाषा स्थलानुसार बदलत असली तरी लिखित भाषा मात्र बव्हंशी एकच प्रमाणभाषा असते. कवितेची भाषा लिखित गद्य भाषेपेक्षा वेगळी राहिलेली आहे. तिला केवळ सांगायचे नसते. ते सांगणे प्रतीतही करायचे असते. त्यासाठी ती प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे वळत असते. काव्य संस्कृताधिष्ठित असताना केशवसुतांची कविता साध्या मराठीतून आली. त्यासाठी त्यांना त्या काळी शब्ददरिद्रीही म्हणवून घ्यावे लागले. त्यांचा नवा शिपाई
जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या मजला घरच्या दिसताहेत
असे साध्यासुध्या मराठीतून सांगतो. पण या खुणा पटवताना तो म्हणतो,
कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते
कोठेही जा डोईवरती दिसते नीलांबर ते
आपल्याला जे जाणवते आहे ते मात्र साधेसुधे नाही. त्याचे असामान्यत्व दाखविण्यासाठीच की काय, केशवसुतांना 'तृणावृता भू' 'नीलांबर' असे संस्कृत शब्द वापरावेसे वाटले असावेत.
पुढे बोलीभाषेतूनही मराठी कविता येऊ लागल्या. रविकिरण मंडळातल्या किरणांनी ग्रामीण भाषेत कविता लिहिल्या, पण त्यांतली मानसिकता नागर वाटत राहिली. आता गावाकडच्या निवेदकाच्या भावभावना आणि प्रगल्भ जाणिवा व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भाषा समर्थ आणि समर्पक असल्याची प्रचीती अनेक कवींनी आणून दिली आहे. ग्रामीण भाषेत लिहिलेल्या बर्यािच कविता, अभंग, ओवी, लोकगीतांच्या छंदातून आल्या. आजही येत आहेत. पण कवितेतली गावकडची - शेतकर्याकची भाषा कालानुसार हैब्रीड झाली आहे.
हैब्रीड
वाणीकिणीचा पाऊस
असा आला तसा गेला
शिवाराचा बांधेसूद
देह निम्माअर्धा ओला.
सोन्याहून महागले
हैब्रीडाचे बी बियाणे
गेले साल घटावले
गावरान पेरल्याने.
अशा निर्वाणीच्या वेळी
जरी हैब्रीड पेरले
पुढे पावसाचे कोणी
शब्दचित्र रेखाटले?
आज तरी पावसाचा
नाही मागमूस कोठे
हैब्रीडाच्या बियाण्याला
गावरान रडू फुटे.
शशिकांत शिंदे यांच्या या कवितेत 'वाणीकिणी'सारख्या गावरान शब्दाबरोबर 'हैब्रीड'सारखा हैब्रीड शब्द सहज आणि सार्थ होऊन येतो. पण अनेक छंदोबद्ध ग्रामीण कवितांची भाषा आणि भाव तसाच रोमँटिक राहिलेला आहे. शंकर सखारामांच्या कवितेत भेटणारी 'एकटी पोर' एकटी नाही. अनेक कवींच्या अनेक कवितांतून तसाच 'झिनझिनाट' उठवणार्याभ पोरी भेटतात.
गावाच्या पांदीत
झाडांच्या सांदीत
भेटलीस पोरी
एकटी गऽऽ
शेवटच फक्त थोडा वेगळा आहे
घातली सरी
दादल्या घरी
गेलीस पोरी
एकटी गऽऽ
हेच शंकर सखाराम मुक्तछंदातही समर्थ कविता लिहितात. समर्थ आणि वेगळीही.
तुझ्या-माझ्या खुणेचा डोंगर
तुझा रोज निरोप सांगतो
तुझ्या पुसू गेल्या कुंकवासाठी
मला गळ घालतो.
डोंगर नि मी
हवा खात बसतो
मुकाट मनात
काळोखात बुडतो.
रातच्याला आभाळ ठिबकू लागते
डोंगर हरवलेला असतो
झाडे तू झालेली असतात.
केशव सखाराम देशमुखांच्या कवितेत भाषा चरित्रक्रमानुसार नागर होताना दिसते.
भाकरीचा अभ्यासक्रम
मिरोग पोटभर बरसून गेला म्हणजे
संपूर्ण शिवारात औतांची यात्रा भरून
दिसे
कुणब्याची खरी आषाढी
औतांच्या दांडीत आणि नांगरांच्या
फाळात
असल्याचा प्रत्यय औतं पाहिले की होई.
त्याआधी
शेतभर औतपाळी चाले
वखरावर दगड बांधून
वखर भूमीत नीट घुसावा म्हणून
बाप औत जोमानं हाणी
पाळी करण्यासाठी
मी वखरावर बसे
बैल झपझप चालून
रान विंचरून काढीत
माझ्या,
बैलांच्या,
बापाच्या
अशा तिहेरी जीवांच्या दैना
आज आठवल्या की झोप कडू होते.
भाकर गोड लागत नाही.
बळ
देणारे
ते
दिवस
आज आयुष्याचाच च्यवनप्राश झाले आहेत.
तेव्हाच्या 'मिरोगा'ने सुरू होणारी कविता निवेदकाच्या आजच्या नागरभाषेत सहज शिरते.
देशावरच्या ग्रामीण भाषेव्यतिरिक्त मराठीच्या इतरही बोलीभाषांतून कविता अवतरल्या आहेत. विठ्ठल वाघ वर्हारडी बोलीत लिहितात. महेश केळुसकरांचा झिनझिनाट मालवणीतून प्रत्ययाला येतो. वाहरू सोनवणे आदिवासी मुलाच्या सूक्ष्म जाणिवा अहिराणी भाषेतून व्यक्त करतात. पण मराठी वाचकांसाठी तिचा मराठी तर्जुमा द्यावा लागतो. निवेदकाची अस्सल भाषा म्हणून बंबैय्या हिंदीतून आपली मराठी कविता लिहायला आजचे कवी कचरत नाहीत आणि आपणही या कविता वाचायला! वर्जेश सोलंकींच्या 'शब्बाखैर' कवितेची निवेदिका बारबाला आहे. ही कविता संपूर्णपणे बंबैय्या हिंदीतून आहे. इंग्रजी ही आज ज्ञानभाषा आणि संपर्कभाषाही झालेली आहे. अनेक इंग्रजी शब्द मराठी कवितेत अगदी घरच्यासारखे वावरतात. सलील वाघांच्या 'चॅट'सारख्या कवितेत रोमन लिपीतून चॅट केलेले आहे. त्यांच्या 'भूर्जपत्र'सारख्या कवितेत संस्कृत, इंग्रजीबरोबर कानडीही येते, तेव्हा आपण हसण्याखेरीज काहीच करू शकत नाही!
मात्रा कुण्डलिनी ज्ञेया ध्यानमस्य प्रवक्षते॥
(नारदस्मृती ५६ पं०ग०हे०-भा०लि०मौ०ए०)
चॅरिटेबल ट्रस्टच्या तोर्यायत फणकाऱ्याने सांगायचे
झाल्यास; औदु निर्दिष्ट अक्षरवन्नु वैयक्तिक अभिरुचिगे
तक्कन्ते अळवडिसिकोंडु मूलत:बदलावणेगळन्नु
माडदे बरेयबहुदु बल्लेबल्ले
नागर बोलीभाषाही कवींना वापरावीशी वाटते. तथाकथित काव्यात्म शब्दांऐवजी साधे बोलण्यातले शब्द असलेली बोलगाणी पाडगावकर लिहितात. आपण लिहिताना व्याकरणशुद्ध भाषा लिहितो. पण बोलताना ती उच्चारसुलभ करून बोलतो. अशा भाषेचा वापर नितिन कुलकर्णी आपल्या कवितांतून खुबीने करतात. त्यांची ही 'केसाच्या अंतरावर' :
केसाच्या अंतरावर कटिंगवाला
पावलाच्या अंतरावर चप्पलवाला
पिशवीच्या अंतरावर भाजीवाला
अंडीलोणीदूधगिर्णी अगदी लागुन लागुन
शाळाकॉलेजं ऑफिसंफिफिसं अगदी लागुन लागुन
पूर्व-घराचा प्रवेश, ईशान्य-देवघर
उत्तरेकडे उत्तमांग करून कधीच झोपत नाए
उघड्या दारातून उभी चूल कधीच दिसत नाए
दक्षिण भिंतीवरती एक छिद्रसुद्धा ठेवलेलं नाए
म्हणजे आता, सगळं कसं अगदी सेफैनाए?
उच्चारानुसारी भाषेतून लिहिताना येथे नितिन कुलकर्णी आजच्या शहरवासियांची जीवनदृष्टीही व्यक्त करतात. उच्चारानुसारी भाषा ते इतकी ताणतात की आपल्याला हसू येते. पण आपण या भाषेला हसताना या जीवनदृष्टीलाही नकळत हसतो. या जीवनदृष्टीवर कोणतेही भाष्य न करता केवळ या भाषेच्या वापरातून कवी या जीवनदृष्टीची योग्यायोग्यता प्रश्नांकित करतो.
प्रमाणभाषेत नसलेले व्याकरण-अशुद्ध वाक्प्रयोगही काही कवी वापरत असतात. हे वाक्प्रयोग त्या कवितेच्या निवेदकाच्या व्यक्तिमत्त्वाचे रंगच स्पष्ट करीत असतात. मंगेश नारायण काळे यांच्या निवेदकाचे हे दृष्टान्त.
नि माणूस हा बिनशेपटीचा वानरच आहे
हे तर लिहिल्याच गेलेलं नाहीये अजून
फार्फार वर्षापूर्वी शेपूट गळून पडल्यावरही
भाषेशी खेळण्याचा आणखी एक प्रकार आहे जुने शब्द मोडण्याचा, त्यातून नवे घडवण्याचा आणि त्यायोगे वेगळेच काही सुचवण्याचा. मर्ढेकर, पु०शि० रेगे, अरुण कोलटकर अशा अनेक मातब्बर कवींनी तो खेळलेला आहे. मर्ढेकरांच्या कवितेत अरुणोदयाऐवजी गिरिणोदय होतो. पु०शि० रेग्यांनी जे 'पाहिले न पाहिले' ते झनन-झांजरे, ठिवक-ठाकडे, बहर-बावरे असते. अरुण कोलटकरांच्या बेहद्द नाममात्र घोड्याची दौड 'खोडदौड' असते. नितिन कुलकर्णी, सलील वाघ यांच्यासारखे अलीकडचे कवी हा खेळ अधिक मिष्किलपणे खेळतात. नितीन कुलकर्णींच्या या
'टिव्हीसांजेच्या कविता' :
टिव्हीतल्या टिव्हीतल्या टिव्हीतुन
टिव्हीतल्या टिव्हीत हरवणे
टिव्हीतल्या टिव्हीत हसणे
दुभंग की तिभंग
आईची कटकट
टिव्हीत लपून टिव्हीत सापडणे
डोकं स्तब्ध तिरकी मान तोंड उघडं
सताड टिव्हेलागण
रिमोटपणे निमूट दाबणे
मनातल्या मनात विस्फारणे
खोलीतल्या अंधारात / टिव्हीच्या उजेडात पसारा
गादी उशी पांघरूण / माझा शहारा
टैवाहिक जीवन / सुखात आणि समाधानात
टीव्हीने आपले जीवन व्यापून टाकलेले आहे. ते दाखवायला नितिन कुलकर्णी टीव्ही या शब्दापासून नवे अर्थ नव्या जाणिवा सुचविणारे शब्द घडवतात. टिव्हीसांज म्हटले की आपल्याला तिन्ही सांजा आठवतात, आणि तिन्ही सांजांशी निगडित असलेली हुरहूर टिव्हीसांजेत हरपल्याची जाणीव होते. आता दिवेलागणीऐवजी टिव्हेलागण होते आणि वैवाहिक सुखाची जागा टैवाहिक सुख बळकावते! नादसाधर्म्य असलेले असे शब्द कवितेत आणखी काही सुचवतात. सलील वाघांची ही 'बैठकीची लावणी':
अवं राया / लॉगीन करताय न्हवं...
लॉगीनचे 'लगीन'शी असलेले साधर्म्य वाचकांना गुदगुल्या करते. तिने इंटरनेटवर कनेक्ट होण्यासाठी दिलेल्या ह्या निमंत्रणात शृंगार गर्भित आहे. पण हा शृंगार (दूर) बसून करायचा आहे, म्हणून ही 'बैठकीची' लावणी!
'लॉग इन' हा इंग्रजी शब्द संगणक-इंटरनेटच्या वापरामुळे मराठीत रुळला आहे. एसेमेसची, संगणकाची, मॉल संस्कृतीची, इंग्रजी शब्दांनी भरलेली एक नवीच भाषा आज मराठी कवितेत मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. अशा कवितांची एक लाटच किंवा लाटाच येऊन राहिल्या आहेत.
उद्धृत कविता / कवितांश
१. नवा शिपाई - केशवसुत
२. हैब्रीड - शशिकांत शिंदे, शरणागताचे स्तोत्र
३. गावच्या पांदीत ... वादळ वार्याऊत - शंकर सखाराम, झाडातल्या कविता
४. तुझ्या माझ्या खुणेचा डोंगर.... शंकर सखाराम, झाडातल्या कविता
५. भाकरीचा अभ्यासक्रम - केशव सखाराम देशमुख, अनवाणी चालणारे पाय
६. मात्रा कुण्डलिनी - भूर्जपत्र, सलील वाघ, रेसकोर्स आणि इतर कविता
७. केसाच्या अंतरावर - नितिन कुलकर्णी, सगळं कसं अगदी सेफैनाए
८. माणूस हा शब्द कसाही लिहिता येतो - मंगेश नारायण काळे, नाळ तुटल्या पुरुषाचे दृष्टान्त
९. टिव्हीसांजेच्या कविता - नितिन कुलकर्णी
१०. बैठकीची लावणी - सलील वाघ, रेसकोर्स आणि इतर कविता