मराठी कवितेची बदलती भाषा

आपण सगळे मराठी भाषा बोलतो-लिहितो. भाषा कालानुसार बदलत जाते. स्थळानुसारही बदलते. साहित्याची भाषाही अशी बदलत आलेली आहे. पण जेव्हा आपण कवितेच्या भाषेचा वेगळा विचार करतो, तेव्हा कवितेची भाषा वेगळी असते असे गृहित धरतो. कवितेची म्हणून काही वेगळी भाषा असते का? या संदर्भात मला पु०शि० रेगे यांची दोन विधाने आठवतात. एक : कवितेला ठाम अशी भाषा नसते. दोन : कविता हीच एक भाषा असते. वरवर पाहता ही दोन विधाने परस्परविरोधी वाटतील. पण ती तशी नाहीत. उपलब्ध भाषा कवी कवितेच्या गरजेप्रमाणे वाकवीत असतो.

हेमंत गोविंद जोगळेकर

आपण सगळे मराठी भाषा बोलतो-लिहितो. भाषा कालानुसार बदलत जाते. स्थळानुसारही बदलते. साहित्याची भाषाही अशी बदलत आलेली आहे. पण जेव्हा आपण कवितेच्या भाषेचा वेगळा विचार करतो, तेव्हा कवितेची भाषा वेगळी असते असे गृहित धरतो. कवितेची म्हणून काही वेगळी भाषा असते का? या संदर्भात मला पु०शि० रेगे यांची दोन विधाने आठवतात. एक : कवितेला ठाम अशी भाषा नसते. दोन : कविता हीच एक भाषा असते. वरवर पाहता ही दोन विधाने परस्परविरोधी वाटतील. पण ती तशी नाहीत. उपलब्ध भाषा कवी कवितेच्या गरजेप्रमाणे वाकवीत असतो. त्यामुळे कवितेला ठाम भाषा नसते. आपल्या कवितेत कवी नवी भाषा घडवीत असतो. त्यामुळे कविता हीच एक भाषा होऊन जाते. कवीला असे करायची गरज का भासते? कवीला आपल्या शब्दांतून अनुभव प्रतीत करायचा असतो, पण प्रचलित शब्द वापरून वापरून झिजलेले-गुळगुळीत झालेले असतात. म्हणून कवीला नवे शब्द घडवावे लागतात, असलेले शब्द नव्या तर्हेुने वापरावे लागतात. असे जर असेल तर प्रत्येक कवीची-प्रत्येक कवितेची भाषा वेगळी असेल. तिच्यात होणारे बदल कविसापेक्ष किंवा कवितासापेक्ष असतील. मग समग्र कवितेची अशी काही बदलत गेलेली भाषा असेल का? असेल आणि असते. कारण एका कवीने वापरलेली बदलती भाषा यशस्वी ठरली की अनेक कवी तिला अनुसरतात आणि तशा कवितांची लाटच येते. अशी भाषा एखादा विडंबनकार नेमकी पकडतो. तिचे अतिशयोक्त रूप आपल्या विडंबनकवितेतून सादर करतो आणि या भाषिक लकबी कशी हास्यास्पद होऊ शकतात ते दाखवतो. केशवकुमारांनी केलेले एक विडंबन आहे 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे हे काव्यमय वर्णन पाहा :

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

कवितेत भारदस्त संस्कृत शब्द असलेच पाहिजेत या संकेताची खिल्ली उडविण्यासाठी, केशवकुमार कपात पडलेल्या माशीसाठी जड जड संस्कृत शब्द वापरतात. माशीचा संबंध ओढूनताणून परीक्षित-तक्षकाच्या पुराणकथेशी जोडतात. आणि तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उर्दू शब्द योजण्याची टिंगल करण्यासाठी अफसोसही जाहीर करतात!

संस्कृत ही पूर्वी ज्ञानभाषा होती आणि सामान्य जनांपेक्षा वरच्या पातळीवरून उद्बोधन करण्यासाठी कवी संस्कृत शब्द वापरायचे. आजही वापरतात. पण आज इंग्रजी ही ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा झाली आहे. त्यामुळे आता इंग्रजी शब्द येतात. शहराची कॉस्मोपॉलिटन संस्कृती दाखवण्यासाठी कधी अख्खी मराठी कविता बंबैया हिंदीतूनही अवतरते!

एकाच मुंबई शहराविषयी लिहिणाऱ्या वेगवेवगळ्या कवींच्या कवितांतील भाषा रूढ काव्यभाषेपेक्षा कशी बदलत गेली ते पाहिले तरी या बदलांच्या दिशा दिसू शकतील. सुरुवात मर्ढेकरांनीच केली.

जिथें मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकुरद्वारा,
खडखडते अन् ट्रॅम वाकडी
कंबर मोडुनि, चाटित तारा;

आपल्याला जाणवणारे वेगळे काही वाचकांना प्रतीत करताना शहराचे रूक्ष तपशील आणि यंत्रांच्या प्रतिमा मर्ढेकरांनी नव्याने कवितेत आणल्या. या अचेतन गोष्टींना त्यांनी त्यांच्या कवितेत सचेतन केले. टांग मारणारी कांदेवाडी तेव्हाच्या वाचकांना दचकवून गेली. (मर्ढेकरांनंतरच्या अनेक कवींच्या कवितांतून प्रतिमा अधिकाधिक भडक होत गेल्या, पण संवेदनशीलता कमी होत गेली.) वसंत आबाजी डहाके यांच्या महानगरी कवितेतील हा समुद्र पाहा :

समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते सार्यांयच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.

हीदेखील चेतनगुणोक्तीच पण किती वेगळ्या भाषेतील!

मर्ढेकरांनी कितीही भडक तपशील दिले असले - भले त्यांच्या कवितेवर अश्लीतेच्या आरोपाखाली खटला भरला गेला होता तरी - त्यांच्या कवितेतील भाषा बव्हंशी सभ्य होती. आजच्या अनेक कवींनी ही तथाकथित सभ्यता गुंडाळून ठेवलेली आहे. नामदेव ढसाळ आपल्या मुंबईवरच्या कवितेची सुरुवातच

मुंबई, मुंबई, माझ्या प्रिये रांडे
अशी करतात.
विवेक मोहन राजापुरे त्यांच्या 'प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस' या कवितेत
यार चित्कारतो.
शादी क्या भोसडा करो?
दारिद्र्याच्या पेट्रोलनं
आतवर जळत जाणारी आतडी
कुणाला विकायची?....
यार मागतो उसने पैसे.
अन् वेडसर हसत
घुसतो सपकन् -
ग्रँट रोड स्टेशनालगतच्या मुतारीत,
मी त्याला या प्रचंड दगडी शहराची
पहातो ठसठसती नस होताना.

या प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस कवितेत पकडण्यासाठी या शहराचीच भाषा वापरणे येथे अपरिहार्य होऊन जाते.

मर्ढेकरांनी या शहराचा बकालपणा ठळक करण्यासाठी आपल्या कवितांत जुन्या गाण्यांचे, संस्कृत सुभाषितांचे विडंबन केले होते.

सर्वे जन्तु रुटिना: । सर्वे जन्तु निराशया: ।
सर्वे छिद्राणि पंचन्तु । मा कश्चित् दु:ख-लॉग् भरेत् ॥

'सर्वेऽपि सुखिन: सन्तु' या मूळ संस्कृत प्रार्थनेतील उदात्त आशयाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या जीवनाची क्षुद्रता उठून दिसते. त्यासाठी त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी दोन्हींची सरमिसळ केली. या शहराची ओंगळ बाजू दाखवणाऱ्या कवितेची सुरुवात सलील वाघ 'आषाढस्य प्रथम दिवसे' अशी करतात.

आषाढस्य प्रथम दिवसे कुर्ल्यापाशी
सकाळच्या प्रसन्न गारव्यात
इतकी माणसं हगायला बसतात निर्विकल्प
सकाळच्या प्रसन्न गारव्यात
त्यातलंच एक गाडीखाली येतं.
सकाळच्या प्रसन्न गारव्यात
आरधा तुक्डा इकडं आरधा तिक्डं
आषाढस्य प्रथम दिवसे कुर्ल्यापाशी

आपली तथाकथित महान संस्कृती आणि शहराचे भीषण वास्तव यांतील विरोध वाघ या भाषिक संकराने अधोरेखित करतात. माणसाचे एखाद्या वस्तूसारखे काड्कन तुकडे होणे प्रत्ययाला आणण्यासाठी ते 'तुक्डा' असा शब्द घडवतात. आजचे अनेक कवी प्रमाण-भाषेऐवजी उच्चारानुसारी भाषा वापरतात. आपल्यादेखत माणसाचे असे 'तुक्डे' झाले तरी न ढळणारी आपली स्थितप्रज्ञता जाणवून देण्यासाठी वाघ पुन्हा आषाढस्य प्रथम दिवसे कडे वळतात.

महानगरांत रुजू घेतलेली मॉल संस्कृती, फोफावणारा चंगळवाद आपली स्वत:ची भाषा घेऊन आजच्या कवितांतून येतो. हेमंत दिवट्यांना थांबताच येत नाही.

थांबताच येत नाही अशा जिन्याच्या
कुठल्यातरी पायरीवरून मी सरकतोय
ब्रॅण्डेड खोके सरकताहेत
लेबलं सरकताहेत
कॅटवॉक पाय सटकताहेत
अॅटलनसॉली कुल्ली सरकताहेत
फ्रेश टवटवीत परफ्युम्ड मुली सरकताहेत
संगणक हा आजच्या जीवनाचा भाग झाला आहे. आजच्या अनेक कविता या संगणकीण परिभाषेतून जगणे व्यक्त करतात. जगणे आणि मरणेही.
कुठल्यातरी क्षणी जगण्याचा विमा संपतो
कुठल्यातरी क्षणी आपली नेट होते डाऊन किंवा
आपण आपल्यातून डिस्कनेक्ट करून घेतो जगाला
महाकाय आत्महत्येचा प्रोग्राम हँग होत राहतो
आपल्या मेंदूत
कितीही विचार केला विचार करण्याचा डिलीट
तरीही आपला मेंदू गुंतून पडलेला
एकाच विचारावर डोकं आपटत
आपण बुचकाळून काढतो स्वत:ला
माऊसमेल्या मनात
झपाझप झपाझप बंद करू पाहतो
३६ वर्षं ओपनलेली फाईल

मराठी कवितेच्या बदलत्या भाषेचा हा 'ओपनलेला' लेख येथे तात्पुरता बंद करतो. पण बंद करण्यापूर्वी या लेखातून हाती लागलेले आजच्या मराठी कवितेतले प्रमुख नवे भाषाप्रवाह सेव्ह करून ठेवतो. एक आहे संगणकीय परिभाषेचा, एसेमेस आणि मॉल संस्कृतीचा, इंग्लिश आणि हिंग्लिश शब्दांनी भरलेला. दुसरा आहे स्लँग किंवा असभ्य भाषेचा आणि तिसरा आहे बोलीभाषेचा वापर करणारा - ग्रामीण, प्रादेशिक भाषांतल्या कविताही त्यात आल्या. हे नवे भाषाप्रवाह काहीसे स्थिरावलेले आहेत. त्यांचेही साचे बनू पहात आहेत. हे साचे डिलीट करून त्यांच्या जागी नव्या काव्यभाषेची स्थापना करणारे नवे कवी मराठीत लवकरच उगवतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही!
लेखातील उद्धृत कवितांश

१) अयि-नरांग-मल... कषायपेयपात्रपतित मक्षिकेप्रत - केशवकुमार, 'झेंडूचीं फुलें'
२) जिथें मारते कांदेवाडी... - बा०सी० मर्ढेकर, 'मर्ढेकरांची कविता'
३) उशीरापर्यंत रात्री... समुद्र कोंडून पडलाय - वसंत आबाजी डहाके, 'शुभवर्तमान'
४) मुंबई, मुंबई... मुंबई, मुंबई, माझ्या प्रिय रांडे - नामदेव ढसाळ, 'खेळ'
५) यार चित्कारतो... प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस - विवेक मोहन राजापुरे, 'सामोरा'
६) सर्वे जन्तु रुटिना:... मी एक मुंगी - बा०सी० मर्ढेकर, 'मर्ढेकरांची कविता'
७) आषाढस्य... आषाढस्य प्रथम दिवसे - सलील वाघ, 'सध्याच्या कविता'
८) थांबताच येत नाही अशा... एक प्रचंड लांबीची बेचैन भिंत आहे. हेमंत दिवटे, 'थांबताच येत नाही'
९) कुठल्यातरी क्षणी... कुणी दिला पासवर्ड रिस्टार्ट व्हायला - हेमंत दिवटे, 'थांबताच येत नाही'

हेमलता, 917/19 सी, फर्गसन कॉलेज रस्ता, पुणे 411 004
दूरभाष : (020)2565 5329 /भ्रमणभाष : 094235 82565
ई-पत्ता : hemantjoglekar@yahoo.co.in