हेमंत गोविंद जोगळेकर

मराठी कविता : प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे

हेमंत गोविंद जोगळेकर

एका भाषिक प्रदेशातील बोलीभाषा स्थलानुसार बदलत असली तरी लिखित भाषा मात्र बव्हंशी एकच प्रमाणभाषा असते. कवितेची भाषा लिखित गद्य भाषेपेक्षा वेगळी राहिलेली आहे. तिला केवळ सांगायचे नसते. ते सांगणे प्रतीतही करायचे असते. त्यासाठी ती प्रमाणभाषेकडून बोलीभाषेकडे वळत असते. काव्य संस्कृताधिष्ठित असताना केशवसुतांची कविता साध्या मराठीतून आली. त्यासाठी त्यांना त्या काळी शब्ददरिद्रीही म्हणवून घ्यावे लागले. त्यांचा नवा शिपाई

जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत
सर्वत्र खुणा माझ्या मजला घरच्या दिसताहेत
असे साध्यासुध्या मराठीतून सांगतो. पण या खुणा पटवताना तो म्हणतो,
कोठेही जा पायाखाली तृणावृता भू दिसते
कोठेही जा डोईवरती दिसते नीलांबर ते

आपल्याला जे जाणवते आहे ते मात्र साधेसुधे नाही. त्याचे असामान्यत्व दाखविण्यासाठीच की काय, केशवसुतांना 'तृणावृता भू' 'नीलांबर' असे संस्कृत शब्द वापरावेसे वाटले असावेत.

पुढे बोलीभाषेतूनही मराठी कविता येऊ लागल्या. रविकिरण मंडळातल्या किरणांनी ग्रामीण भाषेत कविता लिहिल्या, पण त्यांतली मानसिकता नागर वाटत राहिली. आता गावाकडच्या निवेदकाच्या भावभावना आणि प्रगल्भ जाणिवा व्यक्त करण्यासाठी ग्रामीण भाषा समर्थ आणि समर्पक असल्याची प्रचीती अनेक कवींनी आणून दिली आहे. ग्रामीण भाषेत लिहिलेल्या बर्यािच कविता, अभंग, ओवी, लोकगीतांच्या छंदातून आल्या. आजही येत आहेत. पण कवितेतली गावकडची - शेतकर्याकची भाषा कालानुसार हैब्रीड झाली आहे.

हैब्रीड
वाणीकिणीचा पाऊस
असा आला तसा गेला
शिवाराचा बांधेसूद
देह निम्माअर्धा ओला.
सोन्याहून महागले
हैब्रीडाचे बी बियाणे
गेले साल घटावले
गावरान पेरल्याने.
अशा निर्वाणीच्या वेळी
जरी हैब्रीड पेरले
पुढे पावसाचे कोणी
शब्दचित्र रेखाटले?
आज तरी पावसाचा
नाही मागमूस कोठे
हैब्रीडाच्या बियाण्याला
गावरान रडू फुटे.

शशिकांत शिंदे यांच्या या कवितेत 'वाणीकिणी'सारख्या गावरान शब्दाबरोबर 'हैब्रीड'सारखा हैब्रीड शब्द सहज आणि सार्थ होऊन येतो. पण अनेक छंदोबद्ध ग्रामीण कवितांची भाषा आणि भाव तसाच रोमँटिक राहिलेला आहे. शंकर सखारामांच्या कवितेत भेटणारी 'एकटी पोर' एकटी नाही. अनेक कवींच्या अनेक कवितांतून तसाच 'झिनझिनाट' उठवणार्याभ पोरी भेटतात.

गावाच्या पांदीत
झाडांच्या सांदीत
भेटलीस पोरी
एकटी गऽऽ
शेवटच फक्त थोडा वेगळा आहे
घातली सरी
दादल्या घरी
गेलीस पोरी
एकटी गऽऽ
हेच शंकर सखाराम मुक्तछंदातही समर्थ कविता लिहितात. समर्थ आणि वेगळीही.
तुझ्या-माझ्या खुणेचा डोंगर
तुझा रोज निरोप सांगतो
तुझ्या पुसू गेल्या कुंकवासाठी
मला गळ घालतो.
डोंगर नि मी
हवा खात बसतो
मुकाट मनात
काळोखात बुडतो.
रातच्याला आभाळ ठिबकू लागते
डोंगर हरवलेला असतो
झाडे तू झालेली असतात.
केशव सखाराम देशमुखांच्या कवितेत भाषा चरित्रक्रमानुसार नागर होताना दिसते.
भाकरीचा अभ्यासक्रम
मिरोग पोटभर बरसून गेला म्हणजे
संपूर्ण शिवारात औतांची यात्रा भरून
दिसे
कुणब्याची खरी आषाढी
औतांच्या दांडीत आणि नांगरांच्या
फाळात
असल्याचा प्रत्यय औतं पाहिले की होई.
त्याआधी
शेतभर औतपाळी चाले
वखरावर दगड बांधून
वखर भूमीत नीट घुसावा म्हणून
बाप औत जोमानं हाणी
पाळी करण्यासाठी
मी वखरावर बसे
बैल झपझप चालून
रान विंचरून काढीत
माझ्या,
बैलांच्या,
बापाच्या
अशा तिहेरी जीवांच्या दैना
आज आठवल्या की झोप कडू होते.
भाकर गोड लागत नाही.
बळ
देणारे
ते
दिवस
आज आयुष्याचाच च्यवनप्राश झाले आहेत.

तेव्हाच्या 'मिरोगा'ने सुरू होणारी कविता निवेदकाच्या आजच्या नागरभाषेत सहज शिरते.

देशावरच्या ग्रामीण भाषेव्यतिरिक्त मराठीच्या इतरही बोलीभाषांतून कविता अवतरल्या आहेत. विठ्ठल वाघ वर्हारडी बोलीत लिहितात. महेश केळुसकरांचा झिनझिनाट मालवणीतून प्रत्ययाला येतो. वाहरू सोनवणे आदिवासी मुलाच्या सूक्ष्म जाणिवा अहिराणी भाषेतून व्यक्त करतात. पण मराठी वाचकांसाठी तिचा मराठी तर्जुमा द्यावा लागतो. निवेदकाची अस्सल भाषा म्हणून बंबैय्या हिंदीतून आपली मराठी कविता लिहायला आजचे कवी कचरत नाहीत आणि आपणही या कविता वाचायला! वर्जेश सोलंकींच्या 'शब्बाखैर' कवितेची निवेदिका बारबाला आहे. ही कविता संपूर्णपणे बंबैय्या हिंदीतून आहे. इंग्रजी ही आज ज्ञानभाषा आणि संपर्कभाषाही झालेली आहे. अनेक इंग्रजी शब्द मराठी कवितेत अगदी घरच्यासारखे वावरतात. सलील वाघांच्या 'चॅट'सारख्या कवितेत रोमन लिपीतून चॅट केलेले आहे. त्यांच्या 'भूर्जपत्र'सारख्या कवितेत संस्कृत, इंग्रजीबरोबर कानडीही येते, तेव्हा आपण हसण्याखेरीज काहीच करू शकत नाही!

मात्रा कुण्डलिनी ज्ञेया ध्यानमस्य प्रवक्षते॥
(नारदस्मृती ५६ पं०ग०हे०-भा०लि०मौ०ए०)
चॅरिटेबल ट्रस्टच्या तोर्यायत फणकाऱ्याने सांगायचे
झाल्यास; औदु निर्दिष्ट अक्षरवन्नु वैयक्तिक अभिरुचिगे
तक्कन्ते अळवडिसिकोंडु मूलत:बदलावणेगळन्नु
माडदे बरेयबहुदु बल्लेबल्ले

नागर बोलीभाषाही कवींना वापरावीशी वाटते. तथाकथित काव्यात्म शब्दांऐवजी साधे बोलण्यातले शब्द असलेली बोलगाणी पाडगावकर लिहितात. आपण लिहिताना व्याकरणशुद्ध भाषा लिहितो. पण बोलताना ती उच्चारसुलभ करून बोलतो. अशा भाषेचा वापर नितिन कुलकर्णी आपल्या कवितांतून खुबीने करतात. त्यांची ही 'केसाच्या अंतरावर' :

केसाच्या अंतरावर कटिंगवाला
पावलाच्या अंतरावर चप्पलवाला
पिशवीच्या अंतरावर भाजीवाला
अंडीलोणीदूधगिर्णी अगदी लागुन लागुन
शाळाकॉलेजं ऑफिसंफिफिसं अगदी लागुन लागुन
पूर्व-घराचा प्रवेश, ईशान्य-देवघर
उत्तरेकडे उत्तमांग करून कधीच झोपत नाए
उघड्या दारातून उभी चूल कधीच दिसत नाए
दक्षिण भिंतीवरती एक छिद्रसुद्धा ठेवलेलं नाए
म्हणजे आता, सगळं कसं अगदी सेफैनाए?

उच्चारानुसारी भाषेतून लिहिताना येथे नितिन कुलकर्णी आजच्या शहरवासियांची जीवनदृष्टीही व्यक्त करतात. उच्चारानुसारी भाषा ते इतकी ताणतात की आपल्याला हसू येते. पण आपण या भाषेला हसताना या जीवनदृष्टीलाही नकळत हसतो. या जीवनदृष्टीवर कोणतेही भाष्य न करता केवळ या भाषेच्या वापरातून कवी या जीवनदृष्टीची योग्यायोग्यता प्रश्नांकित करतो.

प्रमाणभाषेत नसलेले व्याकरण-अशुद्ध वाक्प्रयोगही काही कवी वापरत असतात. हे वाक्प्रयोग त्या कवितेच्या निवेदकाच्या व्यक्तिमत्त्वाचे रंगच स्पष्ट करीत असतात. मंगेश नारायण काळे यांच्या निवेदकाचे हे दृष्टान्त.

नि माणूस हा बिनशेपटीचा वानरच आहे
हे तर लिहिल्याच गेलेलं नाहीये अजून
फार्फार वर्षापूर्वी शेपूट गळून पडल्यावरही

भाषेशी खेळण्याचा आणखी एक प्रकार आहे जुने शब्द मोडण्याचा, त्यातून नवे घडवण्याचा आणि त्यायोगे वेगळेच काही सुचवण्याचा. मर्ढेकर, पु०शि० रेगे, अरुण कोलटकर अशा अनेक मातब्बर कवींनी तो खेळलेला आहे. मर्ढेकरांच्या कवितेत अरुणोदयाऐवजी गिरिणोदय होतो. पु०शि० रेग्यांनी जे 'पाहिले न पाहिले' ते झनन-झांजरे, ठिवक-ठाकडे, बहर-बावरे असते. अरुण कोलटकरांच्या बेहद्द नाममात्र घोड्याची दौड 'खोडदौड' असते. नितिन कुलकर्णी, सलील वाघ यांच्यासारखे अलीकडचे कवी हा खेळ अधिक मिष्किलपणे खेळतात. नितीन कुलकर्णींच्या या
'टिव्हीसांजेच्या कविता' :

टिव्हीतल्या टिव्हीतल्या टिव्हीतुन
टिव्हीतल्या टिव्हीत हरवणे
टिव्हीतल्या टिव्हीत हसणे
दुभंग की तिभंग
आईची कटकट
टिव्हीत लपून टिव्हीत सापडणे
डोकं स्तब्ध तिरकी मान तोंड उघडं
सताड टिव्हेलागण
रिमोटपणे निमूट दाबणे
मनातल्या मनात विस्फारणे
खोलीतल्या अंधारात / टिव्हीच्या उजेडात पसारा
गादी उशी पांघरूण / माझा शहारा
टैवाहिक जीवन / सुखात आणि समाधानात

टीव्हीने आपले जीवन व्यापून टाकलेले आहे. ते दाखवायला नितिन कुलकर्णी टीव्ही या शब्दापासून नवे अर्थ नव्या जाणिवा सुचविणारे शब्द घडवतात. टिव्हीसांज म्हटले की आपल्याला तिन्ही सांजा आठवतात, आणि तिन्ही सांजांशी निगडित असलेली हुरहूर टिव्हीसांजेत हरपल्याची जाणीव होते. आता दिवेलागणीऐवजी टिव्हेलागण होते आणि वैवाहिक सुखाची जागा टैवाहिक सुख बळकावते! नादसाधर्म्य असलेले असे शब्द कवितेत आणखी काही सुचवतात. सलील वाघांची ही 'बैठकीची लावणी':

अवं राया / लॉगीन करताय न्हवं...

लॉगीनचे 'लगीन'शी असलेले साधर्म्य वाचकांना गुदगुल्या करते. तिने इंटरनेटवर कनेक्ट होण्यासाठी दिलेल्या ह्या निमंत्रणात शृंगार गर्भित आहे. पण हा शृंगार (दूर) बसून करायचा आहे, म्हणून ही 'बैठकीची' लावणी!

'लॉग इन' हा इंग्रजी शब्द संगणक-इंटरनेटच्या वापरामुळे मराठीत रुळला आहे. एसेमेसची, संगणकाची, मॉल संस्कृतीची, इंग्रजी शब्दांनी भरलेली एक नवीच भाषा आज मराठी कवितेत मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे. अशा कवितांची एक लाटच किंवा लाटाच येऊन राहिल्या आहेत.

उद्धृत कविता / कवितांश
१. नवा शिपाई - केशवसुत
२. हैब्रीड - शशिकांत शिंदे, शरणागताचे स्तोत्र
३. गावच्या पांदीत ... वादळ वार्याऊत - शंकर सखाराम, झाडातल्या कविता
४. तुझ्या माझ्या खुणेचा डोंगर.... शंकर सखाराम, झाडातल्या कविता
५. भाकरीचा अभ्यासक्रम - केशव सखाराम देशमुख, अनवाणी चालणारे पाय
६. मात्रा कुण्डलिनी - भूर्जपत्र, सलील वाघ, रेसकोर्स आणि इतर कविता
७. केसाच्या अंतरावर - नितिन कुलकर्णी, सगळं कसं अगदी सेफैनाए
८. माणूस हा शब्द कसाही लिहिता येतो - मंगेश नारायण काळे, नाळ तुटल्या पुरुषाचे दृष्टान्त
९. टिव्हीसांजेच्या कविता - नितिन कुलकर्णी
१०. बैठकीची लावणी - सलील वाघ, रेसकोर्स आणि इतर कविता

मराठी कवितेची बदलती भाषा

आपण सगळे मराठी भाषा बोलतो-लिहितो. भाषा कालानुसार बदलत जाते. स्थळानुसारही बदलते. साहित्याची भाषाही अशी बदलत आलेली आहे. पण जेव्हा आपण कवितेच्या भाषेचा वेगळा विचार करतो, तेव्हा कवितेची भाषा वेगळी असते असे गृहित धरतो. कवितेची म्हणून काही वेगळी भाषा असते का? या संदर्भात मला पु०शि० रेगे यांची दोन विधाने आठवतात. एक : कवितेला ठाम अशी भाषा नसते. दोन : कविता हीच एक भाषा असते. वरवर पाहता ही दोन विधाने परस्परविरोधी वाटतील. पण ती तशी नाहीत. उपलब्ध भाषा कवी कवितेच्या गरजेप्रमाणे वाकवीत असतो.

हेमंत गोविंद जोगळेकर

आपण सगळे मराठी भाषा बोलतो-लिहितो. भाषा कालानुसार बदलत जाते. स्थळानुसारही बदलते. साहित्याची भाषाही अशी बदलत आलेली आहे. पण जेव्हा आपण कवितेच्या भाषेचा वेगळा विचार करतो, तेव्हा कवितेची भाषा वेगळी असते असे गृहित धरतो. कवितेची म्हणून काही वेगळी भाषा असते का? या संदर्भात मला पु०शि० रेगे यांची दोन विधाने आठवतात. एक : कवितेला ठाम अशी भाषा नसते. दोन : कविता हीच एक भाषा असते. वरवर पाहता ही दोन विधाने परस्परविरोधी वाटतील. पण ती तशी नाहीत. उपलब्ध भाषा कवी कवितेच्या गरजेप्रमाणे वाकवीत असतो. त्यामुळे कवितेला ठाम भाषा नसते. आपल्या कवितेत कवी नवी भाषा घडवीत असतो. त्यामुळे कविता हीच एक भाषा होऊन जाते. कवीला असे करायची गरज का भासते? कवीला आपल्या शब्दांतून अनुभव प्रतीत करायचा असतो, पण प्रचलित शब्द वापरून वापरून झिजलेले-गुळगुळीत झालेले असतात. म्हणून कवीला नवे शब्द घडवावे लागतात, असलेले शब्द नव्या तर्हेुने वापरावे लागतात. असे जर असेल तर प्रत्येक कवीची-प्रत्येक कवितेची भाषा वेगळी असेल. तिच्यात होणारे बदल कविसापेक्ष किंवा कवितासापेक्ष असतील. मग समग्र कवितेची अशी काही बदलत गेलेली भाषा असेल का? असेल आणि असते. कारण एका कवीने वापरलेली बदलती भाषा यशस्वी ठरली की अनेक कवी तिला अनुसरतात आणि तशा कवितांची लाटच येते. अशी भाषा एखादा विडंबनकार नेमकी पकडतो. तिचे अतिशयोक्त रूप आपल्या विडंबनकवितेतून सादर करतो आणि या भाषिक लकबी कशी हास्यास्पद होऊ शकतात ते दाखवतो. केशवकुमारांनी केलेले एक विडंबन आहे 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत.' चहाच्या पेल्यात पडलेल्या माशीचे हे काव्यमय वर्णन पाहा :

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके,!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,
'क्या हुवा अफसोस!' मक्षिके

कवितेत भारदस्त संस्कृत शब्द असलेच पाहिजेत या संकेताची खिल्ली उडविण्यासाठी, केशवकुमार कपात पडलेल्या माशीसाठी जड जड संस्कृत शब्द वापरतात. माशीचा संबंध ओढूनताणून परीक्षित-तक्षकाच्या पुराणकथेशी जोडतात. आणि तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी उर्दू शब्द योजण्याची टिंगल करण्यासाठी अफसोसही जाहीर करतात!

संस्कृत ही पूर्वी ज्ञानभाषा होती आणि सामान्य जनांपेक्षा वरच्या पातळीवरून उद्बोधन करण्यासाठी कवी संस्कृत शब्द वापरायचे. आजही वापरतात. पण आज इंग्रजी ही ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा झाली आहे. त्यामुळे आता इंग्रजी शब्द येतात. शहराची कॉस्मोपॉलिटन संस्कृती दाखवण्यासाठी कधी अख्खी मराठी कविता बंबैया हिंदीतूनही अवतरते!

एकाच मुंबई शहराविषयी लिहिणाऱ्या वेगवेवगळ्या कवींच्या कवितांतील भाषा रूढ काव्यभाषेपेक्षा कशी बदलत गेली ते पाहिले तरी या बदलांच्या दिशा दिसू शकतील. सुरुवात मर्ढेकरांनीच केली.

जिथें मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकुरद्वारा,
खडखडते अन् ट्रॅम वाकडी
कंबर मोडुनि, चाटित तारा;

आपल्याला जाणवणारे वेगळे काही वाचकांना प्रतीत करताना शहराचे रूक्ष तपशील आणि यंत्रांच्या प्रतिमा मर्ढेकरांनी नव्याने कवितेत आणल्या. या अचेतन गोष्टींना त्यांनी त्यांच्या कवितेत सचेतन केले. टांग मारणारी कांदेवाडी तेव्हाच्या वाचकांना दचकवून गेली. (मर्ढेकरांनंतरच्या अनेक कवींच्या कवितांतून प्रतिमा अधिकाधिक भडक होत गेल्या, पण संवेदनशीलता कमी होत गेली.) वसंत आबाजी डहाके यांच्या महानगरी कवितेतील हा समुद्र पाहा :

समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते सार्यांयच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.

हीदेखील चेतनगुणोक्तीच पण किती वेगळ्या भाषेतील!

मर्ढेकरांनी कितीही भडक तपशील दिले असले - भले त्यांच्या कवितेवर अश्लीतेच्या आरोपाखाली खटला भरला गेला होता तरी - त्यांच्या कवितेतील भाषा बव्हंशी सभ्य होती. आजच्या अनेक कवींनी ही तथाकथित सभ्यता गुंडाळून ठेवलेली आहे. नामदेव ढसाळ आपल्या मुंबईवरच्या कवितेची सुरुवातच

मुंबई, मुंबई, माझ्या प्रिये रांडे
अशी करतात.
विवेक मोहन राजापुरे त्यांच्या 'प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस' या कवितेत
यार चित्कारतो.
शादी क्या भोसडा करो?
दारिद्र्याच्या पेट्रोलनं
आतवर जळत जाणारी आतडी
कुणाला विकायची?....
यार मागतो उसने पैसे.
अन् वेडसर हसत
घुसतो सपकन् -
ग्रँट रोड स्टेशनालगतच्या मुतारीत,
मी त्याला या प्रचंड दगडी शहराची
पहातो ठसठसती नस होताना.

या प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस कवितेत पकडण्यासाठी या शहराचीच भाषा वापरणे येथे अपरिहार्य होऊन जाते.

मर्ढेकरांनी या शहराचा बकालपणा ठळक करण्यासाठी आपल्या कवितांत जुन्या गाण्यांचे, संस्कृत सुभाषितांचे विडंबन केले होते.

सर्वे जन्तु रुटिना: । सर्वे जन्तु निराशया: ।
सर्वे छिद्राणि पंचन्तु । मा कश्चित् दु:ख-लॉग् भरेत् ॥

'सर्वेऽपि सुखिन: सन्तु' या मूळ संस्कृत प्रार्थनेतील उदात्त आशयाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या जीवनाची क्षुद्रता उठून दिसते. त्यासाठी त्यांनी संस्कृत आणि इंग्रजी दोन्हींची सरमिसळ केली. या शहराची ओंगळ बाजू दाखवणाऱ्या कवितेची सुरुवात सलील वाघ 'आषाढस्य प्रथम दिवसे' अशी करतात.

आषाढस्य प्रथम दिवसे कुर्ल्यापाशी
सकाळच्या प्रसन्न गारव्यात
इतकी माणसं हगायला बसतात निर्विकल्प
सकाळच्या प्रसन्न गारव्यात
त्यातलंच एक गाडीखाली येतं.
सकाळच्या प्रसन्न गारव्यात
आरधा तुक्डा इकडं आरधा तिक्डं
आषाढस्य प्रथम दिवसे कुर्ल्यापाशी

आपली तथाकथित महान संस्कृती आणि शहराचे भीषण वास्तव यांतील विरोध वाघ या भाषिक संकराने अधोरेखित करतात. माणसाचे एखाद्या वस्तूसारखे काड्कन तुकडे होणे प्रत्ययाला आणण्यासाठी ते 'तुक्डा' असा शब्द घडवतात. आजचे अनेक कवी प्रमाण-भाषेऐवजी उच्चारानुसारी भाषा वापरतात. आपल्यादेखत माणसाचे असे 'तुक्डे' झाले तरी न ढळणारी आपली स्थितप्रज्ञता जाणवून देण्यासाठी वाघ पुन्हा आषाढस्य प्रथम दिवसे कडे वळतात.

महानगरांत रुजू घेतलेली मॉल संस्कृती, फोफावणारा चंगळवाद आपली स्वत:ची भाषा घेऊन आजच्या कवितांतून येतो. हेमंत दिवट्यांना थांबताच येत नाही.

थांबताच येत नाही अशा जिन्याच्या
कुठल्यातरी पायरीवरून मी सरकतोय
ब्रॅण्डेड खोके सरकताहेत
लेबलं सरकताहेत
कॅटवॉक पाय सटकताहेत
अॅटलनसॉली कुल्ली सरकताहेत
फ्रेश टवटवीत परफ्युम्ड मुली सरकताहेत
संगणक हा आजच्या जीवनाचा भाग झाला आहे. आजच्या अनेक कविता या संगणकीण परिभाषेतून जगणे व्यक्त करतात. जगणे आणि मरणेही.
कुठल्यातरी क्षणी जगण्याचा विमा संपतो
कुठल्यातरी क्षणी आपली नेट होते डाऊन किंवा
आपण आपल्यातून डिस्कनेक्ट करून घेतो जगाला
महाकाय आत्महत्येचा प्रोग्राम हँग होत राहतो
आपल्या मेंदूत
कितीही विचार केला विचार करण्याचा डिलीट
तरीही आपला मेंदू गुंतून पडलेला
एकाच विचारावर डोकं आपटत
आपण बुचकाळून काढतो स्वत:ला
माऊसमेल्या मनात
झपाझप झपाझप बंद करू पाहतो
३६ वर्षं ओपनलेली फाईल

मराठी कवितेच्या बदलत्या भाषेचा हा 'ओपनलेला' लेख येथे तात्पुरता बंद करतो. पण बंद करण्यापूर्वी या लेखातून हाती लागलेले आजच्या मराठी कवितेतले प्रमुख नवे भाषाप्रवाह सेव्ह करून ठेवतो. एक आहे संगणकीय परिभाषेचा, एसेमेस आणि मॉल संस्कृतीचा, इंग्लिश आणि हिंग्लिश शब्दांनी भरलेला. दुसरा आहे स्लँग किंवा असभ्य भाषेचा आणि तिसरा आहे बोलीभाषेचा वापर करणारा - ग्रामीण, प्रादेशिक भाषांतल्या कविताही त्यात आल्या. हे नवे भाषाप्रवाह काहीसे स्थिरावलेले आहेत. त्यांचेही साचे बनू पहात आहेत. हे साचे डिलीट करून त्यांच्या जागी नव्या काव्यभाषेची स्थापना करणारे नवे कवी मराठीत लवकरच उगवतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही!
लेखातील उद्धृत कवितांश

१) अयि-नरांग-मल... कषायपेयपात्रपतित मक्षिकेप्रत - केशवकुमार, 'झेंडूचीं फुलें'
२) जिथें मारते कांदेवाडी... - बा०सी० मर्ढेकर, 'मर्ढेकरांची कविता'
३) उशीरापर्यंत रात्री... समुद्र कोंडून पडलाय - वसंत आबाजी डहाके, 'शुभवर्तमान'
४) मुंबई, मुंबई... मुंबई, मुंबई, माझ्या प्रिय रांडे - नामदेव ढसाळ, 'खेळ'
५) यार चित्कारतो... प्रचंड दगडी शहराची ठसठसती नस - विवेक मोहन राजापुरे, 'सामोरा'
६) सर्वे जन्तु रुटिना:... मी एक मुंगी - बा०सी० मर्ढेकर, 'मर्ढेकरांची कविता'
७) आषाढस्य... आषाढस्य प्रथम दिवसे - सलील वाघ, 'सध्याच्या कविता'
८) थांबताच येत नाही अशा... एक प्रचंड लांबीची बेचैन भिंत आहे. हेमंत दिवटे, 'थांबताच येत नाही'
९) कुठल्यातरी क्षणी... कुणी दिला पासवर्ड रिस्टार्ट व्हायला - हेमंत दिवटे, 'थांबताच येत नाही'

हेमलता, 917/19 सी, फर्गसन कॉलेज रस्ता, पुणे 411 004
दूरभाष : (020)2565 5329 /भ्रमणभाष : 094235 82565
ई-पत्ता : hemantjoglekar@yahoo.co.in