भाषा आणि जीवन

पायरीबद्ध प्रक्रिया का?

हल्ली कोणाला वाचायला काय आवडतं असं विचारलं, तर जास्तीत जास्त लोकांचा कल 'सेल्फ हेल्प' प्रकारच्या पुस्तकांकडे असतो. यामध्ये सपाटीकरण आलंय. 'सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल', 'ट्वेल्व वेज टु लीड हेल्थी अँड सक्सेसफुल लाइफ', 'टेन स्टेप्स टुवर्डस मेंटल सॅटिस्फॅक्शन', 'एटिफाइव्ह टिप्स टु लुज वेट'. असंच काहीतरी. म्हणजे सगळं आकड्यांच्या किंवा स्टेप्सच्या भाषेत हवं. याचा संबंधसुद्धा आय०टी०मधल्या एका विशिष्ट प्रकारच्या कार्यपद्धतीशी लावता येऊ शकेल.
आय०टी०मध्ये करता येण्याजोग्या प्रत्येक गोष्टीची एक 'प्रोसेस' बनवून टाकलेली आहे. एका विशिष्ट पद्धतीनेच प्रश्नांची उत्तरं शोधली गेली पाहिजेत. एका विशिष्ट पद्धतीनं किंवा क्रमानंच एखादी गोष्ट केली गेली पाहिजे हा आग्रह. कारण एकच : कोणीही ती गोष्ट केली, त्याच क्रमानं केली आणि काही कारणानं ती गोष्ट अयशस्वी झाली तर नेमक्या कोणत्या स्टेपमध्ये गोची आहे हे पटकन लक्षात यावं!

सुचेता कडेठाणकर, साप्ताहिक सकाळ, ५-४-०८

धुळे जिल्ह्यातील दलितांच्या लोकोक्ती आणि त्यांचे सामाजिक संदर्भ

खानदेशातील धुळे जिल्ह्याचा ग्रामीण परिसर म्हणजे अहिराणी बोलीचा केंद्रप्रदेश आहे. या भागात विभागानुसार ज्याप्रमाणे अहिराणी बोलीचे 'क्षेत्रीय भेद' आढळतात; त्याप्रमाणे विविध जाती-जमातींनुसार 'स्तरीय भेद'ही आढळतात. धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात 'महार' ही एक वैशिष्ट्यपूर्ण जात आहे. समाजात दलित किंवा पूर्वास्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या या जातीच्या लोकपरंपरा, लोकवाङ्मय, लोकबोली आपले वेगळेपण जपून आहेत. हे वेगळेपण त्यांच्या लोकबोलीतील लोकोक्तींमधूनही व्यक्त होताना आढळते. महार समाजात प्रचलित असलेल्या लोकोक्तींमध्ये म्हणजेच वाक्प्रचार व म्हणींमध्ये त्यांच्या लोकजीवनाचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ आढळतात. लोकोक्तींमधील शब्दांना लोकरूढी, लोकप्रथा, लोकसंकेत यांमुळे वैचित्र्यपूर्ण आशय प्राप्त झालेला दिसतो.

म्हणी आणि वाक्प्रचार हा लोकवाङ्मयातील वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार आहे. मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय आणि समाजभाषावैज्ञानिक दृष्टीने त्यांचा अभ्यास क्वचितच केला गेला आहे. दैनंदिन जीवनात लोक म्हणींचा वापर अतिशय कुशलतेने करताना आढळतात. सामाजिक संज्ञापन प्रक्रियेतील तो महत्त्वाचा घटक आहे. मानवी स्वभावाचे विविध पैलू मोठ्या कौशल्याने व बुद्धिचातुर्याने म्हणींतून प्रकट होताना आढळतात.

लोकजीवनात प्रचलित असलेल्या म्हणी व वाक्प्रयोगांना लोकजीवनाचे अनेक संदर्भ लाभलेले असल्याचे जाणवते. लोकजीवनात रूढ असलेल्या म्हणी व वाक्प्रचारांना एक परंपरा असते. लोकजीवनातील अनेकविध सार्वत्रिक अनुभव म्हणी किंवा वाक्प्रचारांतून आविष्कृत होतात. त्यामुळे निरनिराळ्या लोकसमूहात एकाच अर्थाच्या म्हणी प्रचलित असलेल्या आढळतात. उदा० 'यत्र यत्र धूम: तत्र तत्र वह्नि:’ 'व्हेअर देअर इज स्मोक देअर इज फायर’, 'विस्तव असल्याशिवाय धूर निघणार नाही’, 'नरम असाबिगर पानी मराव नही’ (=भुसभुशीत जमिनीशिवाय पाणी मुरत नाही) या संस्कृत, इंग्रजी, मराठी व अहिराणी भाषांमधील म्हणींचा लक्ष्यार्थ एकच आहे, असे दिसेल.

लोकजीवन आणि म्हणी यांचा संबंध अतिशय घनिष्ठ आहे. म्हणींच्या वापरामुळे लोकांची भाषावृद्धी होते. म्हणींच्या द्वारे समाजशास्त्राच्या अभ्यासकांना त्या समाजाचा अभ्यास करणे सोपे जाते. कारण म्हणींतून सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ समर्थपणे आविष्कृत होतात. संबंधित समाजाचे सामाजिक-सांस्कृतिक जीवन जतन करण्याचे काम 'लोकोक्ती' करतात. म्हणी भाषेतील लुप्त होऊ पाहणारे शब्द वाचवतात. एकंदरीत लोकजीवनातील विविध रंग लोकोक्तींतून अभिव्यक्त होतात.
धुळे जिल्ह्यातील महार समाजाच्या अहिराणी बोलीत ज्या लोकोक्तींचा वापर होतो त्यांना सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ असल्याचे आढळते. उदा० धुळे जिल्ह्यातील ग्रामीण महार समाजात विवाहविषयक काही प्रथा आहेत. त्या प्रथांविषयी माहिती असल्याशिवाय त्या म्हणींचा अर्थ आपल्याला कळणार नाही. जसे - 'बाईंना फुले बाईले नि शाबासी मन्हा याहीले’ या म्हणीतील प्रत्येक शब्दाचा अभिधात्मक अर्थ आणि लाक्षणिक अर्थ वेगळा आहे आणि त्यातून पुन्हा संपूर्ण म्हणीची लक्षणा वेगळीच आहे. या म्हणींत 'बाई' या शब्दाचा अर्थ नववधू, 'फुले' या शब्दाचा अर्थ लग्नकार्याचा खर्च पेलण्यासाठी वधूपित्याला मिळालेली वरपित्याकडची आर्थिक मदत, 'याही' या शब्दाचा अर्थ व्याही होय. मुलीच्या किंवा नियोजित वधूच्या नावाने मिळालेल्या आर्थिक मदतीतून लग्नाचा खर्च भागविणे; व लोकांच्या धन्यतेस पात्र ठरणे. नवरीच्या नावाने नवरदेवाच्या बापाकडून नवरीच्या बापाला पैशांची मदत केली जाते. त्यातून लग्नसमारंभ पार पडतो व नवरीचा बाप त्याचे काही योगदान नसताना शाबासकीस पात्र ठरतो, असा या म्हणीचा सामाजिक संदर्भ आहे. हा संदर्भ महार जातीच्या विवाहप्रथेतून आलेला आहे. पूर्वीच्या काळी महार समाजात गरीब वधूपित्याला वरपिता जी मदत करायचा त्या मदतीला 'हातबाही' असा शब्द प्रचलित आहे. या 'हातबाही'रूपाने मिळालेल्या मदतीत लग्नसमारंभ पार पाडला जात असे. आज या म्हणीचा अर्थ 'त्याग एकाचा व शाबासकी दुसर्या ला' असा लक्षणेने घेतला जातो.

'रायरंग' ही महार जातीतील एक पोटजात होती. आज ही जात महारांमध्ये विलीन झाली आहे. जुन्या काळात रायरंग हे लोककलावंत महारवाड्यात येऊन रामायण-महाभारतातील कथाभागावर रात्रभर सोंगे वठवून महार स्त्री-पुरुषांचे मनोरंजन करायचे. राजाचे सोंग वठवून रायरंग रात्रभर राजेशाही थाटाने बोलायचा, वागायचा. सकाळी मात्र त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहात नसे. अशा विसंगत अनुभवातून 'रायरंग रातभर राजा नि सकायमा ऊठी पानी कोनी पाजा’ ही म्हण निर्माण झाली आहे. महार जातीत प्रचलित असलेल्या म्हणी महारेतर जातीतील लोकांना कळत नाहीत; कारण या म्हणींचे आकलन होण्यासाठी संबंधित समाजाचे सामाजिक सांस्कृतिक जीवन परिचित असणे गरजेचे आहे. काही गोष्टी तात्कालिक असतात, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. प्रत्येकाचा विशिष्ट काळ असतो. नंतर त्याला समाजात कोणीही विचारत नाही, असा या म्हणीचा अर्थ आहे.
काही म्हणींतून कुटुंबातील विशिष्ट नातेसंबंधातील ताण-तणावांचे दर्शन घडते. सासू-सून, नणंद-भावजय हे नातेसंबंध संघर्षमय आढळतात. त्याला महार समाजही अपवाद नाही. उदा० 'भाडाना घरथीन झोपडी बरी नि रांडमूंड ननीनथीन सयेत बरी’ या म्हणीतून नणंद-भावजयीच्या संघर्षपूर्ण नात्यावर प्रकाश पडतो. ननीन म्हणजेच नणंद मुळातच वाईट त्यात पुन्हा 'रांडमूंड' म्हणजे विधवा असेल तर तिचा मुक्काबम कायमस्वरूपी माहेरी. अशा परिस्थितीत भावजयीच्या उखाळ्या-पाखाळ्या काढून भाऊ-भावजयीचे भांडण लावण्यात तिला धन्यता वाटते. कारण जे सुख तिला मिळाले नाही, ते इतरांनाही मिळू नये, ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. सवत परवडली परंतु नणंद घरात नको, या निर्णयापर्यंत संबंधित घराची सून आलेली असते. अशा कौटुंबिक वास्तवातून प्रस्तुत म्हण निर्माण झाली आहे. काही वेळेस दोन्ही गोष्टी घातकच असतात, तेव्हा कमी घातक कोण, याचा निर्णय घ्यावा लागतो, 'दगडापेक्षा वीट मऊ' या न्यायाने विधवा नणंदेपेक्षा सवत परवडली.
महार समाजात पूर्वीच्या काळी एकापेक्षा जास्त बायका करण्याची प्रथा होती. गावकामासाठी अनेक स्त्रियांची गरज पडण्यातून हा रिवाज निर्माण झाला असावा. किंवा महार जातीतील पुरुषांच्या लैंगिक आसक्तीतून ही प्रथा निर्माण झाली असावी. त्यातून 'दुसार व्हयनी रानी, पयली वाहे पानी’, 'दुसरी उनी घरमा, पयली गयी गोरमा’ अशा म्हणींची निर्मिती झालेली आहे. 'दुसरी’ म्हणजे 'दुसरी बायको’, 'पयली’ म्हणजे 'पहिली बायको’, दुसरी बायको येण्याने पहिल्या बायकोचे हाल होतात; म्हणून ती लवकर मरते म्हणजे 'गोरमा’ जाते 'गोर’ म्हणजे प्रेताला पुरण्याचा खड्डा. महार जातीत मृताला पुरण्याची प्रथा आहे. त्यातून हा शब्द प्रस्तुत म्हणीत आला आहे. दुसरी बायको नवीन असल्यामुळे स्वाभाविकच तिचे नवर्यालकडून हट्ट किंवा लाड पुरविले जायचे व पहिल्या बायकोकडे दुर्लक्ष केले जायचे. अशा अनुभवातून प्रस्तुत म्हण निर्माण झाली आहे. एकाच्या येण्याने दुसर्या्चे महत्त्व कमी होणे, किंवा त्याचे नुकसान होणे असा या म्हणीचा लक्ष्यार्थ आहे.

महार समाजात गंधर्व पद्धतीने स्त्रियांचे पुनर्विवाह होतात, त्याला 'गंदोरं’ किंवा 'मोथीर’ असे म्हणतात. या विवाह प्रकारामध्ये वयस्क माणसाबरोबर विवाहबद्ध व्हावे लागत असे. त्यातून 'धल्ला नवरा कया, कुयले आसरा झाया’ ही म्हण निर्माण झालेली आहे. 'धल्ला नवरा’ म्हणजे म्हातारा नवरा. तो कामजीवनाच्या बाबतीत कमकुवत असला तरी वंश चालविण्यासाठी म्हणजे 'कूय’ 'कूळ’ चालविण्यासाठी आधार असतो. संबंधित स्त्रीला कामजीवनापेक्षा मूल-बाळ होणे जास्त महत्त्वाचे वाटत असे. अशा भावनेतून तरुण स्त्रिया म्हातार्यास नवर्यावबरोबर 'गंदोरं’ पद्धतीने लग्न लावत असत. अशा अनुभवातून प्रस्तुत म्हण निर्माण झाली आहे.’एखादी गोष्ट अजिबात नसण्यापेक्षा काहीतरी असणे बरे’ असा या म्हणीचा लक्ष्यार्थ आहे.

वरील प्रकारच्या विवाहसंबंधातून नवीन समस्या निर्माण होत असे. त्यातून 'धल्ला नवरा सदीमे निजे, जुवान बायको रातभर खिजे’ ही म्हण निर्माण झाली आहे. प्रस्तुत म्हण विजोड संसाराचे चित्र अधोरेखित करते. 'धल्ला नवरा’ म्हणजे लैंगिकदृष्ट्या कमकुवत नवरा व 'जुवान बायको’ म्हणजे 'तरुण पत्नीक’ किंवा तारुण्याने मुसमुसलेली बायको. 'रातभर खिजे’ म्हणजे लैंगिक अतृप्तीतून रात्रभर अस्वस्थता अनुभवणे किंवा तळमळत राहणे. विरोधी गुणधर्माच्या व्यक्ती एकत्र येण्याने समस्या निर्माण होतात, किंवा दु:खच निर्माण होते असा या म्हणीचा लक्ष्यार्थ सांगता येईल.

अशा प्रकारे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ असलेल्या म्हणी महार जातीच्या अहिराणी बोलीत विपुल प्रमाणात आढळतात. अजून काही म्हणींचा उल्लेख करता येईल - (१) 'घरमा फुटेल बोयका नि मांगस दोन-दोन बायका’, [=घरात गाडगे फुटके, बायका मात्र हव्यात दोन-दोन] (२) 'तुले माले सांगाले भगतीन आनी घुमाले’, [=तुम्हांआम्हांला सांगायला भगतीण, प्रत्यक्षात असते वेगळीच] (३) 'नाईकभाऊले वाडा भ्याये नि घरनी बाई बाहेर पये’, [=नाईकाला - वस्तीच्या प्रमुखाला - सगळा गाव घाबरतो, पण त्याच्या बायकोचे संबंध भलत्याशीच] (४) 'भन्दं र्हाायनं देववर भगत गया शीववर’, [=प्रेतात्म्यांना शांत करण्यासाठी तयार केलेले तळलेले पदार्थ घरातील देवाच्या ठाण्याजवळ विसरून गावसीमेवर प्रेतात्म्यांना शांत करण्यासाठी जाणे] (५) 'महारनं आख्खं गाव नि त्याने नही कोठे ठाव’, [=गावकामगार म्हणून महार आख्ख्या गावाचा, पण राहण्यासाठी मात्र त्याला गावात घर नाही. त्याचं ठिकाण गावाबाहेरच] (६) 'खरानं व्हयनं खोटं नि छिनालनी गाव लुटं’, [=चांगल्या शीलाच्या बाईला हास्यास्पद ठरवून छिनाल बाई सार्या' गावाला आपल्या कह्यात ठेवते.] (७) 'गावमा ऊना पोया नि महारले आनन झाया’, [=गावात पोळा असला की गावकामगार महाराला आनंद होतो. (कारण त्याला पोळा सणाला धान्य, कापड असं बलुतं मिळतं.)] (८) 'नदारीमा सिरीमंती ऊनी ते बोबड्या बोले नि, धयडपने दिन ग्यात ते पोट काढी चाले’, [=एखाद्या दरिद्री माणसाला अचानक श्रीमंती आली तर ती त्याला पचत नाही. म्हातारपणी दिवस गेलेली बाई सार्या) गावाला आपलं पोट दाखवत फिरते.] अशा शेकडो म्हणी आढळतात. या म्हणी केवळ दलित-महार समाजाच्या अहिराणी बोलीतच आढळतात. त्यांच्या समाजभाषावैज्ञानिक अभ्यासातून एक नवी बाजू पुढे येईल.
म्हणींप्रमाणेच महार जातीच्या वाक्प्रचारांना सामाजिक-सांस्कृतिक, धार्मिक संदर्भ आढळतात. जसे – 'शीव दाबनी पडी’, 'खोयमा टाकेल से’, 'आकडी धरेल से’ इत्यादी अनेक वाक्प्रचारांना लोकविधी, लोकप्रथांचे संदर्भ आढळतात. महार जातीत पूर्वीपासूनच विधवांचे पुनर्विवाह करण्याची प्रथा रूढ आहे. मात्र असे पुनर्विवाह आजही हळद लावून होत नाहीत. 'गंदोरं’ पद्धतीने हा विवाह अर्ध्या रात्री केला जातो. या पद्धतीने विवाहबद्ध झालेल्या पतिपत्नीनला कोणत्याही धार्मिक किंवा मंगल कार्यात सहभागी होता येत नाही. अशा पद्धतीने विवाहित झालेल्या जोडप्यावर दुष्ट शक्तींची अवकृपा असते म्हणून ज्या रात्री हा विवाह केला जातो त्याच रात्री भगत त्या जोडप्याला गावाच्या सीमेवर म्हणजेच 'शीव’वर घेऊन जातो व मंत्र-तंत्र विधी करून दुष्ट शक्तींना शांत करतो त्याला 'शीव दाबणे’ असे म्हणतात. 'शीव' दाबल्यामुळे दुष्ट शक्ती गावाची सीमा ओलांडू शकत नाहीत असा समज आहे. 'शीव' दाबल्यानंतर त्याच रात्री त्यांचा संबंध आला पाहिजे असा संकेत आहे. अशा रूढीतून प्रस्तुत वाक्प्रयोग निर्माण झाला आहे. अशुभ निवारण करणे, अडथळा दूर करणे अशी या वाक्प्रयोगाची लक्षणा आहे.

धुळे परिसरातील महार जातीत खंडोबा किंवा खंडेराव महाराज या लोकदैवताला धर्मांतरानंतरही महत्त्वाचे स्थान आहे. संकटनिवारक लोकदैवत म्हणून या दैवताकडे पाहिले जाते. खंडोबाच्या नावाने 'गोंदय’ (गोंधळ) देण्याची प्रथा प्रचलित आहे. हा गोंधळाचा कार्यक्रम विशिष्ट प्रसंगी ठेवण्याची प्रथा आहे. जसे कुटुंबातील मोठ्या मुलाचे लग्न करायचे असेल तर लग्न लावण्यापूर्वी 'गोंदय’ देण्याची प्रथा महार जातीत आहे. परंतु संबंधित कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एकाच वेळी गोंधळाचा खर्च व लग्नकार्याचा खर्च पेलण्याइतकी नसेल, तेव्हा नियोजित वराची आई किंवा वडील खंडोबाच्या नावाने 'आकडी' धरतात. 'आकडी धरणे' म्हणजे खंडोबाचा गोंधळ जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत बोकडाचे किंवा मेंढ्याचे मांस न खाण्याची प्रतिज्ञा करणे किंवा निश्चय करणे. 'त्यानी आकडी धरेल से' असा वाक्प्रयोग ह्या प्रथेतून आलेला आहे. ही पार्श्वभूमी कळल्याशिवाय प्रस्तुत वाक्प्रयोगाचा अर्थ कळत नाही. 'आकडी धरणे'चा लाक्षणिक अर्थ प्रतिज्ञा करणे, निश्चय करणे असा आहे.

धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पूर्वी कुणबी दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या मुलाला मृत्यूपासून वाचविण्यासाठी महार स्त्रीच्या 'खोय' म्हणजे ओटीत टाकण्याची प्रथा होती. आजही ही प्रथा काही गावांमध्ये प्रचलित असल्याचे आढळते. कुणबी समाजातील काही जोडप्यांचे अपत्य जन्मल्यानंतर मृत्यू पावत असे. अशा मृत्यूचा अर्थ दुष्ट शक्तींची नजर आहे असा लावला जात असे. या संकटावर उपाय म्हणजे त्या अपत्याला महार स्त्रीच्या ओटीत विधिपूर्वक टाकणे. एकदा हे मूल महार स्त्रीच्या ओटीत टाकले म्हणजे दुष्ट शक्ती त्याचे काहीही करू शकणार नाही अशी समजूत होती. अशा ओटीत टाकलेल्या मुलाचे नाव 'महारू' असे ठेवले जात असे. 'त्याले महारीणना खोयमा टाकं तवय तो जगना’ अशी वाक्ये आजही ऐकायला मिळतात. त्यातून 'खोयमा टाकेल से’ किंवा 'खोयमा टाकणे’ हा वाक्प्रयोग निर्माण झाला आहे. याचे लाक्षणिक अर्थ दुष्ट शक्तींपासून वाचविणे, अवकृपा टाळणे, सुरक्षित ठिकाणी ठेवणे असे घेतले जातात.

अशा प्रकारचे सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ असलेले वाक्प्रयोग महार जातीच्या अहिराणी बोलीत विपुल प्रमाणात आढळतात. जसे - (१) 'देरवट वायेल से’, [=दिराबरोबर भावजयीचे लग्न करणे (घरातील वस्तू घरच्यालाच देणे)] (२) 'महार वर देनं पडीन’, [=महार दांपत्याला जेवू घालणे] (३) 'बाबत्या झेलन्या पडथीन', [=अहेर करणे, साडीचोळी घेऊन देणे] (४) 'सोडवन करनी पडी’, [=(महार स्त्रीच्या ओटीत टाकलेल्या मुलाला लग्नाची हळद लावण्यापूर्वी महार स्त्रीच्या ओटीतून त्याची) विधिपूर्वक सोडवणूक करावी लागते.] (५) 'हातबाही देनी पडी’, [=हाताची बाही (फूल ना फुलाची पाकळी) देणे] (६) 'डेरगं भरनं पडीन’, [=घडा भरणे (मृतात्म्याच्या शांतीसाठी नातेवाईकांनी पक्वान्ने वगैरेनी मातीचा घडा भरण्याचा विधी करणे)] (७) 'न्हानी पूंजनी पडी’, [=सटवीला शांत करणे. बाळंतिणीच्या आंघोळीची जागा पुजणे] (८) 'रिंगन भरनं पडी’, [=कडक मंत्रतंत्रादि उपचार करणे] (९) 'लंगर तोडना पडी’, [=(खंडोबाची) साखळी तोडणे] (१०) 'आठखोय मोडी ल्या’, [=नाट मोडणे, पतिपत्नी'चे मीलन घडविणे] (११) 'पोट खाले येयेल से', [=पहिल्या पतीचे अपत्य सोबत येणे] (१२) 'सल्ल्या काढना पडी', [=सरडा बाहेर काढणे (मनातली शंका दूर करणे - भ्रम दूर करणे] (१३) 'कडी चढी जावो’, [=घराला कुलूप लागणे, सत्यानाश होणे] (१४) 'काटं लागी जावो’, [=घराभोवती काट्यांचे कुंपन लागणे, सत्यानाश होणे] (१५) 'भादीमायनी शप्पत’, [=भादी देवीची शपथ खाणे. (कधीही खोटं न बोलण्याची प्रतिज्ञा करणे)] इत्यादी वाक्प्रयोगांच्या अभिधार्थांना सामाजिक संदर्भ आहेत. हे सामाजिक संदर्भ महार जातीच्या लोकजीवनातून प्राप्त झालेले आहेत. धुळे जिल्ह्यातील महार जातीच्या अहिराणी बोलीत-लोकोक्तींचे समृद्ध भांडार आढळते. प्रस्तुत लोकोक्ती महार जातीचे सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक जीवन अगदी सोप्या भाषेत व्यक्त करताना आढळतात. लोकवाङ्मयातील किंवा लोकबोलीतील हा 'मौलिक ठेवा' नीट जतन करून पुढील पिढीच्या हवाली करणे त्या-त्या समाजाचे कर्तव्य ठरते.
संदर्भ :
(१) 'लोकसाहित्याची रूपरेखा' - दुर्गा भागवत
(२) 'महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश' - संपा० य०रा० दाते, चिं०ग० कर्वे
(३) 'लोकवाङ्मय रूप-स्वरूप' - डॉ० शरद व्यवहारे
मुलाखती :
(१) श्री० शंकर भिवा भामरे, मु०पो० कापडणे, ता०जि० धुळे.
(२) श्री० किसन नथ्थू मोरे, मु०पो० कापडणे, ता०जि० धुळे.
(३) श्रीमती लक्ष्मीबाई अर्जुन भामरे, मु०पो० कापडणे, ता०जि० धुळे.
(४) श्रीमती येसाबाई हिरचंद भामरे, मु०पो० कापडणे, ता०जि० धुळे.
अजिंठा-२८, रघुवीरनगर, खोडाईमाता रोड, नंदुरबार ४२५ ४१२, भ्रमणभाष : ९८२२२९४२५५

सपाटीकरणाची सुरुवात

आय०टी०चं क्षेत्र इथं रुजलं, तशी एकमेकांना केवळ नावानं हात मारायची पद्धत रूढ झाली. पारंपरिक क्षेत्रांना सरावलेल्या आपल्याला सुरवातीला आपल्या मॅनेजरला, इतकंच काय आपल्या कंपनीच्या प्रेसिडेंटलादेखील त्याच्या नावानं हाक मारण्याची कल्पना जड गेली. कामाच्या अमेरिकन संस्कृतीचा एक भाग म्हणून रुजवली गेलेली ही पद्धत खरं म्हणजे सपाटीकरणाचा एक अविभाज्य आणि मूलभूत घटक बनून गेली आहे. जगाच्या त्या कोपर्या त वेगळ्याच अक्षांश-रेखांशावर राहणारा कोणी आपला सहकारी. त्याच्याशी बोलताना जेव्हा Good Morning ची. Mike वरून Hey Mike अशी भाषा येऊ लागली, तेव्हा आपण त्याच्यापेक्षा काही वेगळे नसल्याची भावना निर्माण होणं साहजिक होतं. समुद्रापलीकडे राहणार्याआ त्या लोकांबद्दल वाटणारं अप्रूप, वाटणारी भीती या अशा प्रकारच्या अनौपचारिक संवादांमधून हळूहळू गळून पडली. एकेरीमध्ये संवाद होऊ लागल्यामुळे आपण सर्वच जण समान पातळीवर असल्याची भावना निर्माण झाली. इतकंच नाही तर लातूरचा सोपान, मुंबईचा राहूल, पुण्याची रचना, दिल्लीचा राजीव, चेन्नईचा वेंकट आणि उत्तरांचलचा कैलाश हे सगळेच जण, सारखंच शिक्षण घेतलेले, सारखाच पगार घेणारे... एक टीम म्हणून काम करू लागले आणि एक टीम म्हणून या अमेरिकेच्या मॅनेजरशी एकेरीत संवाद साधू लागले. सर्वांना एकाच पातळीवर आणून ठेवणारी ही फार मोठी आणि वेगळी गोष्ट आय०टी०नं इथल्या वर्ककल्चरमध्ये रुजवली. सपाटीकरणाची सुरवात इथून झाली.

सुचेता कडेठाणकर, साप्ताहिक सकाळ, ५-४-०८

धनगरी ओव्यांचा लोकतत्त्वीय अभ्यास

लोकसाहित्यात पारंपरिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन प्रगट होत असते. समाजात रूढ असणार्या समजुती, भ्रम, मंत्र-तंत्र, लोकरूढी, उत्सव यांचे दर्शन घडत असते. कधी लोकगीतांत, लोककथांत यक्ष, गंधर्व, किन्नर अशा अतिमानवी व्यक्तींचे उल्लेख आढळतात, तर कधी राक्षस, भूत, हडळ, जादूटोणा, प्राणिकथा अशा लोकतत्त्वीय घटकांचा मुक्त आविष्कार आढळतो. समाजात रूढ असणारे विधी, आचार-विचार, शुभ-अशुभाच्या कल्पना, शकून-अपशकुनाच्या कल्पनाही विखुरलेल्या असतात. ज्या समाजात, ज्या काळात ते लोकसाहित्य निर्माण झालेले असते, त्या समाजाचे दर्शन लोकसाहित्यातून घडते. त्या विशिष्ट समाजात रूढ असणार्या प्रथा, समजुती, रूढी-परंपरा त्यातून प्रगट होतात.

प्रस्तुत लेखात धनगरी ओव्यांचा लोकतत्त्वीय अभ्यास करण्याचा प्रयत्ना केला आहे.

धनगर समाज पूर्वी भटक्या अवस्थेत होता. आता तो बर्यायच अंशी स्थिरावला आहे. या धनगर समाजाबद्दल डॉ० सरोजिनी बाबर यांनी उत्पत्तीकथा नमूद केली आहे. एकदा मेंढ्यांचे व शेळ्यांचे कळप वारुळातून निघाले. हे कळप शेताची नासाडी करू लागले. तेव्हा लोकांनी महादेवाची प्रार्थना केली. महादेवाने मेंढरांच्या राखणीसाठी धनगर लोक निर्माण केले.

धनगर लोक बिरोबाचे उपासक आहेत. माळावर, गावाबाहेर बिरोबाचे मंदिर असते. बिरोबाचीही जन्मकथा सांगितली जाते. ही कथा अशी : एका कुणब्याला शेत नांगरताना एक मुलगी मिळाली. कुणब्याने ती मुलगी राजाला दिली. तिचे नाव गंगासुरावंती. गंगासुरावंती वयात आल्यावर राजा तिच्यासाठी वर शोधू लागला; पण गंगासुरावंतीला कौमार्यच हवे होते. पुरुष सहवासाचा तिला तिटकारा होता. म्हणून ती लग्नाला नकार देत राहिली. पण एकदा गायीचा पान्हा पिणारे वासरू तिने पाहिले, त्यामुळे तिच्या मनात वत्सलभाव जागृत झाला. तिला मातृत्व हवेसे वाटू लागले; पण तिला पुरुषाच्या सहवासाशिवाय आई व्हायचे होते. त्यासाठी तिने तप आरंभले. ‘बिनमेघाचे धान्य दे. बिनफुलाचे फळ दे आणि बिनभोगाचा पुत्र दे.' अशी प्रार्थना केली. तिला शंकरपार्वती प्रसन्न झाले. त्यांनी तिला बिनमेघाचे धान्य दिले. त्या धान्याच्या भाकरीत शंकराने प्रवेश केला. ती भाकरी तिने खाल्ली व ती गर्भवती राहिली. यथावकाश गंगासुरावंतीला पुत्र झाला, तोच बिरोबा! धनगरांचे दैवत!

बहुतेक सर्व देवतांचा जन्म असा सामान्यांहून वेगळा, वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे आढळते. हे लोकतत्त्व आहे. दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर रामजन्म झाला. सीता ही भूमिकन्या आहे. द्रौपदीही ‘याज्ञसेनी' आहे. ती यज्ञातून निर्माण झाली. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींच्या अवताराची कथाही अशीच अद्भुत आहे. देव-दैवतांच्या जन्माचे हे लोकतत्त्व अन्य धर्मांतही आढळते.
कोजागिरी पौर्णिमेला बिरोबाची यात्रा भरते. भल्यामोठ्या ढोलाच्या तालावर रात्रभर गीते म्हटली जातात. देवाचे सुंबरान मांडतात. सुंबरान महणजे स्मरण.

‘सुंबरान मांडिलं गा सुंबरान मांडिलं ।
आदि नमन गणाला । पतिव्रता पार्वतीला ।
कैलाशीच्या महादेवाला । काशीलिंग बिरोबाला ।।’
अशा गीताने यात्रा सुरू होते.

कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपतीच्या नमनाने करायची प्रथा लोकमानसात रुजलेली आहे. मग तो कार्यक्रम विवाह, वास्तुशांत यासारखा धार्मिक असेल किंवा संतांनी - पंडितांनी लिहिलेला एखादा ग्रंथ असेल. कोणत्याही पूजेत सुपारीचा गणपती पुजला जातो. ‘ॐ नमोजी आद्या' म्हणत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीची सुरुवात करतात. धनगरांचे सुंबरानही याला अपवाद नाही.
महादेव कैलास पर्वतावर राहतो ही सुद्धा लोकमानसाची श्रद्धा आहे. ‘रामायण', ‘महाभारत' या ग्रंथांत, पुराणात कैलास पर्वताचा उल्लेख आहे. दासबोधातही कैलासाचा उल्लेख आढळतो.
ब्रह्मशृंग तो पर्वताचा । विष्णुशृंग तो मर्गजाचा ।
शिवशृंग तो स्फटिकाचा । कैलास नाम त्याचे ।।
(द० ४, स० १०, ओ० १२)

म्हणजे ब्रह्मदेवाचा सत्यलोक सोन्याचा आहे. विष्णूचा वैकुंठलोक पाचूचा आहे व शंकराचा कैलास स्फटिकाचा आहे. वर उल्लेख केलेल्या धनगरी गीतातही हेच लोकतत्त्व आढळते.

त्याचप्रमाणे बिरोबा हा शंकराचा अवतार आहे अशी धनगर समाजाची श्रद्धा आहे. गंगासुरावंतीला दिलेल्या भाकरीत शंकराने प्रवेश केला होता. म्हणून काशीलिंग बिरोबा असा उल्लेख वरील गीतात आढळतो.
देव बहुतांशवेळी डोंगरावर राहतो. त्याच्या दर्शनाची वाट चढाची, काट्याकुट्याची अवघड असते. भक्ताला त्याचे दर्शन सहजासहजी होत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे. तिरुपती बालाजीच्या दर्शनाला डोंगर चढावा लागतो. पंढरीच्या विठोबाच्या दर्शनासाठी लाखो भक्त आळंदी ते पंढरपूर ही वाट पायी तुडवतात. शंकराची अनेक मंदिरे उंच डोंगरावरच आहेत.
हाच अनुभव धनगर स्त्रीलाही येतो. ही स्त्री म्हणते :
‘देव बीराजीला जाती, माझ्या पायाला आलं फोडं ।
देव बीराजीचं मला बाई लई याडं ।'
‘देव बीराजीला जाती, खडं टोचलं माझ्या पाया ।
देव बीराजी, माझी येऊ दे तुला दया ।'
‘आता नवस बोलली जीवापरीस अवघड
देवा माझ्या बीरयाजी, राहाणं तुजं काटवाण ।'

बीरदेव माळावर, काट्याकुट्यात राहतो, काटवणात राहतो. त्याच्या दर्शनाला जाताना खडे टोचतात. पायाला फोड येतात. तरीही तिला दर्शनाला जायचंच आहे; कारण बीराजीरायाचं वेड तिला लागले आहे.
‘नवस बोलणे' हाही एक लोकाचार आहे. आपल्या मनातील इच्छित पूर्ण व्हावे यासाठी नवस बोलला जातो. कधी देवाला कौल लावला जातो. विचारलेल्या प्रश्नाला मिळणारे दैवी उत्तर ‘कौल' या नावाने ओळखले जाते. कौल लावण्याची प्रथा जागतिक आहे. इजिप्शियन, ग्रीक, रोमन लोकही कौलावर विश्वास ठेवत असत. महाराष्ट्रातही सर्वत्र कौल लावण्याची प्रथा आहे. धनगर स्त्रीही बिरोबाला कौल लावते. हे लोकतत्त्व आहे.
‘बीरयाच्या देवळात मी ग कवाची उभी र्हा्ऊ ।
देव माझा बीरयाजी, आधी कवल माझा लाऊ ।'
धनगरी ओव्यांमध्ये कौलाचा उल्लेख आढळतो, तसाच ‘कंदुरी'चा उल्लेखही आढळतो.
‘अगं नवस बोलली पीरसाहिबा कंदुरी ।
असं पोटीचं माझ्या बाळ, खेळू दे मंदिरी ।'
‘कंदुरी' ही एक लोकप्रथा आहे. देवाला, विशेषत: पीराला नवस बोलला जातो. रोगमुक्तीसाठी किंवा संतती व्हावी म्हणून पीराला नवस बोलण्याचा प्रघात आहे. आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर ‘कंदुरी' केली जाते. उत्सवाच्या दिवशी पीरासमोर बकरं मारून त्याच्या मांसाचे जेवण केले जाते. ही प्रथा महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी सुरू आहे.

नवस बोलणे, कौल लावणे, कंदुरी या सर्व धर्म-कल्पनांचा पगडा केवळ आदिम पातळीवरच होता असे नाही. तर आजच्या विज्ञानयुगातही या धर्मकल्पनांचा पगडा शिक्षित-अशिक्षित सर्वांवर आढळून येतो. धनगर स्त्रीचीही मानसिकता तशीच आहे यात नवल नाही.

यात्वात्मकता ही भारतीयांची धर्मश्रद्धा आहे. भूत, पिशाच्चच, झाड इत्यादी अतिमानवी शक्ती अस्तित्वात आहेत असा बहुतांश लोकांचा समज आहे. या अतिमानवी व्यक्तींना संतुष्ट करणे किंवा त्यांच्यापासून संरक्षण करणे यासाठी मंत्र-तंत्राचा वापर मानव अनेक शतके करत आहे. ताईत भुताखेतांपासून संरक्षण करतो, रोगांचे वा इतर संकटांचे निवारण करतो अशी लोकश्रद्धा आहे. लहान मुलांना दृष्ट लागू नये, देवीच्या साथीपासून त्यांचे रक्षण व्हावे हा हेतूही ताईत बांधण्यामागे असतो. कधी शीतळादेवीची प्रतिमा ताईतामध्ये असते, कधी वाघाचे केस, नखे, कधी महंमद पैगंबरांची कुराणातील वचने लिहिलेला कागद ताईतामध्ये ठेवला जातो.

धनगर स्त्री ताईत बांधण्याच्या प्रथेवर श्रद्धा ठेवते. आपल्या बाळाला दृष्ट लागू नये म्हणून स्वत: पीरसाहेब त्याला ताईत भरून देतो असे तिला वाटते. ती म्हणते,
‘माझा लाडका राघू सर्व्या देवाला म्हाईत,
पीरसाहेब बीराजी देतो भरून ताईत ।'
भंडारा उधळणे ही सुद्धा एक सामाजिक प्रथा आहे. धनगर समाज कोजागिरी पौर्णिमेला, यात्रे-जत्रेच्या दिवशी भंडारा उधळतो. त्याचे चित्रणही धनगरी ओवीत दिसते.
‘दसर्यारच्या महिन्यात हळदीबाईला भाव आला ।
हळदीबाईला भाव आला, देव बीराजी नवरा झाला ।'
‘दसर्याभच्या महिन्यामंदी गजी नाचून आलं घाया ।
तान्ह्या बाळा किती सांगू, लाव भंडारा पड पाया ।'

धनगर समाजाचे ‘गजी' हे लोकनृत्य आहे. कोजागिरी पौर्णिमेला तरुण धनगर गजी नाचतात. नाचून नाचून दमतात. दमलेल्या गजींचा तिला अभिमान वाटतो.
भारतीय मानसिकता साधू-सिद्धांच्या प्रभावाखाली नांदत आली आहे. लोकमानसावर आजही सिद्धांचा प्रभाव आहे. बीरोबाच्या मंदिराशेजारी दावणमलिकाची समाधी आहे. ही समाधी पीराची आहे, तो मुस्लीम आहे याचा विचार धनगर वा हिंदू करत नाहीत. हिंदूंच्या सर्व जाती या पीराची पूजा करतात. समाधीवर बुक्काय वाहतात, फुले वाहतात. त्याला केशरी गंधही लावतात आणि पीरावर हिरवा गलबही घालतात. लोकमानस धर्मांधता जाणत नाही. सिद्धपुरुषांचा प्रभाव, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, लोकमानसावर बिंबलेला आहे. संतान व्हावे म्हणून या पीराला नवस बोलतात. हा पीर धनगर समाजाच्या लोकश्रद्धेचा विषय बनला आहे.
धनगर समाजाच्या मानसात असे सिद्ध पुरुष, गजीनृत्य, भंडारा उधळणे, नवस बोलणे, ताईत बांधणे, कंदुरी, बीरदेवाची अद्भुत जन्मकथा अशा लोकतत्त्वीय धारणांना अढळ स्थान आहे. या एकविसाव्या शतकातही त्यांना आदिम जीवनाची ओढ आहे, परंपरेचा प्रभाव त्यांच्या मनावर आहे.
या सर्व लोकतत्त्वीय धारणा म्हणूनच त्यांच्या गीतांमध्ये दिसतात.

४, बुधवार पेठ, फलटण ४१५ ५२३, जि० सातारा.
दूरभाष : ०२१६६-२२२१२०. भ्रमणभाष : ९४२१२०८५९५

सामाजिक द्रोह

लोकभाषा आणि राजभाषा असलेल्या स्वभाषेचा वापर न करणे किंवा वापर टाळणे हा सामाजिक द्रोह आहे, याची जाणीव अनेकांना नसते. विरोधाभासात्मक वाटेल, पण भाषानिवडीचे अनिर्बंध स्वातंत्र्य हे समाजाला अंतिमत: एकभाषी आणि बहुधा परभाषी समाजाकडे घेऊन जाते. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात, विशेषत: मुंबईसारख्या महानगरीमध्ये ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. स्वभाषेच्या सक्षमीकरणाचे आव्हान न स्वीकारता स्वत:चे आर्थिक सक्षमीकरण करून घेण्यासाठी आधी अभिजन व बुद्धिजीवी वर्गाने आणि आता बहुजन समाजानेही इंग्रजी या परकीय सक्षम भाषेचा स्वीकार करायला सुरुवात केली आहे.

डॉ० प्रकाश परब, ‘भाषा, समाज आणि शासन' ,
‘महाराष्ट्र टाइम्स' (मुंबई) ११-०९-२००८

आगर बोली

दर्यावरचा कोळी, आगरातला आगरकर-आगरी, माळातला माळी आणि रानातला आदिवासी अशा भौगोलिकदृष्ट्या कोकणातल्या आगरातील वसाहती. आगर म्हणजे भात, मीठ, नारळ, सुपारी, भाजीपाला, फळे व मासे संवर्धन करण्याची जागा. असे आगर पिकविणारा तो आगरकर-आगरी. ह्या आगरी समाजाची वस्ती रायगड (पूर्वीचा कुलाबा), ठाणे ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. कोकण सोडून धुळे, जळगाव-पासून गुजरातपर्यंत ती तुरळक प्रमाणात आहे. ह्या समाजाची बोली ती आगरी बोली असे ह्या बोलीचे नामकरण करता येईल; परंतु आगरी ही एक जात समजली जाते; तेव्हा अशी जातीची बोली-आगरी बोली म्हणणे संकुचितपणाचे आहे. शिवाय ही बोली हाच समाज बोलतो असे नाही, तर आगरातील बलुतेदार, आदिवासी यांच्याबरोबर दुकानदार-मारवाडीही प्रसंगपरत्वे ही बोली बोलतात. शिवाय कोळी, माळी हे समाज जवळ असल्याने त्या बोलींची मिश्रता ह्या बोलीत आहे. तेव्हा सर्वसमावेशक दृष्ट्या ह्या बोलीस आगरातील बोली - ‘आगर बोली' म्हणजे सयुक्तिक वाटते.

ही आगर बोली समुद्राकाठची असल्याने हीत उच्‍चार-स्पष्टता हवी तशी नाही. विरार-वसईकडे ही बरीचशी सानुनासिक आहे. तर अलिबागकडे तशी स्पष्ट आहे. ही बोली जवळजवळ प्रत्येक गावानुसार थोडीशी बदलते. मुंबईतील हा मूळ समाज ही बोली विसरला आहे, तर नवी मुंबईतील ही बोली कोळी बोली मिश्रित अशी आहे. वसई-पालघरकडे ही बोली वाडवळ, भंडारी बोली मिश्रित अशी येते.

आगरी समाजाचे पूर्वी (१) शुद्ध आगरी, (२) दस आगरी व (३) वरप आगरी असे पोटजातीत वर्गीकरण होत होते. शुद्ध आगरीत मीठ आगरी, जस आगरी व ढोल आगरी असे उपपोट प्रकार होते. आज मात्र असे प्रकार मानले जात नाहीत. खुद्द मुंबाआईच्या मुंबईत चौदा पाटील, बारा पाटील, आगळे आगरी असे स्तर मानले जात; तेही आता मानले जात नाहीत.

आगर बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘ळ'च्या ऐवजी ‘ल' व ‘ण'च्या ऐवजी ‘न' जसे सकाळ-सकाल, पळव-पलव; कोण-कोन, बाण-बान, वळण-वलन.
ह्या बोलीची रूपे व काही शब्द महानुभाव पंथीय व भागवतधर्मीय ग्रंथलेखनात दिसून येतात. विशेषत: लीळाचरित्र, दृष्टांतपाठ व ज्ञानेश्वरीत ते जास्त प्रमाणात दिसतात. आगरात लोकगीते व लोककथा यांचा भरणा जास्त आहे. ही लोकसंपदा म्हातार्‍या आजीकडून - डोकर्‍यांकडून ऐकायला कर्णमधुर वाटते.

गाय बा चर्‍हतं भीमा तीरी गो,
भीमा तीऽऽरी
गायला राखीत किस्‍न हरी गो,
किस्‍न हऽऽरी
काय बा वर्नू गायची शेपू गो,
गायची शेऽऽपू,
जशी नांगीन घेतं झेपू गो,
नांगीन घेतं झेऽऽपूू
काय बा वर्नू गायच्या मांड्या गो,
गायच्या मांऽऽड्या
जशी पालुखीच्या दांड्या गो
पालुखीच्या दांऽऽड्या -

इथे तेराव्या शतकातील प्राकृत बोलीतील शेपू, नाकू, कानू अशी रूपे साकारलेली दिसतात.
आगर बोलीत लोककथा अमाप आहेत. ह्या लोककथा सांगताना अलिबागच्या आगरात नेहमी गोष्टींच्या ओनाम्याला येते ती तीन भांवडांची गोष्ट-

अकामकची गोष्ट
यक व्हता अका, यक व्हता मका. आन त्या दोघांची यक बह्यनीस व्हती हिजू. त अका, मका आन हिजू गेली खारीन, झोलाला. अकला मिलला निवटा, मकला मिलला खरबा आन हिजूला मिलली कोलबी. तिघाजना आली घरा. अकनी निवटा टाकला चुलीन भुजत, मकनी खरबा आन हिजूनी कोलबी टाकली भुजत. न तिघाजना गेली नदीवर आंग धवला. तिघाजना आंग धऊनशी आली, त हिजूची कोलबी करापली! मंग अकनी दिला डोचूक, मकनी दिला शेपूट आन हिजूचा जवान केला चालता. अशी तिघाजना जवली.
(यक-एक, व्हता-होता, खारीन-खाडीत, झोलाला-मासे पकडायला, निवटा (खरबा, कोलबी) - मासळीचे प्रकार, चुलीन-चुलीत, भुजत-भाजत, आंग धवाला- आंघोळीला, करापली - करपली, डोचूक - डोके, जवान - जेवण.)१

कावला - चिरीची गोष्ट
यकदा कावला आन चिरीनी केली भागीन भातशेती. यलवर पाऊस परला, आगोठ लागली. कावलनी धरला नांगर, चिरीनी केली भातपहिरनी. यलवर लावनी केली. चांगला पाऊस झाला. मस्त मशागत केली. जाम पीक आला. दोघाही मिलून लानी केली, भांदनी केली. मातर कावलनी यकटनीच मलनी कार्‍हली आन भाताच्या भरल्या बारीक गोनी, पलजीच्या भरल्या म्होट्या म्होट्या गोनी. आन चिरीला बोलला, ‘चिरबाय, तुल्हा या म्होट्या गोनी घे, मना बारक्या गोनी दे.' चिरीनी गोनी हालवून बघितल्या. ती कावलचा कावा समाजली. ती बोलली, ‘कावलंदादा, माझा बारका जीव मना बारक्या गोनी दे, तू म्होटा तुला म्होट्या गोनी घे.' पन कावला काय ऐकना. शेवटी परकरन गेला न्यायाधीसाकरं. त्यांनी केला न्याय आन चिरीला तिचा हिस्सा-वाटा मिलवून दिला. चिरी बोलली, ‘कावलंदादा, तुझी आथा वाट यगली. तू तुझे वाटन जा, मी माझे वाटन.'

दृष्टांतपाठात शोभाव्या अशा कितीतरी लोककथा आगर बोलीत आहेत. अशी बोली ऐकताना ह्या बोलीची काही वैशिष्ट्ये नोंदता येतील -

(१) ‘ळ'बद्दल ‘ल' : कंटाळा-कंटाला, नळ-नल, धूळ-धूल.
(२) ‘ण'बद्दल ‘न' : आठवण-आठवन, पण-पन, गोण-गोन.
(३) शद्बारंभी येणारा ‘ड' तसाच राहतो मात्र नंतरच्या ‘ड' चा ‘र' होतो :
डबा-डबा, डसा; कडू-करू, वेडा-यरा, तडांग-तरांग.
(४) शब्दान्ती येणारा ओकार ऊकार होतो : गेलो-गेलू, आलो-आलू.
(५) ओकारान्त शब्द अकारान्त होऊन पुढे ‘स' येतो : घेतो-घेतस,
मारतो - मारतस, करतस, जातस इ०
(६) शब्दान्ती ‘त' ऐवजी ‘व' येतो : घेतलात-घेतलाव, बघितलेत-बघितलाव,
केलाव, तोरलाव इ०
(७) शब्दान्ती ‘ए'चा दीर्घ ‘अ' होतो. : कुठे-कुठं, तिथे-तिथं, इथं.
(८) अनेकवचनी नामाच्या अन्ती ‘ए'चा ‘आ' होतो : झाडे-झारा, पोरे-पोरा,
लाकडा शेता.
(९) अनुस्वार स्पष्ट उच्‍चारला जात नाही : आंबा-आऽबा, चिंच-चिऽच, रंग-रऽग,
हंडा-हाऽडा, पिंपळ-पिपल, खुंट-खूट.
(१०) छ चा सर्रास स होतो : छत्री-सत्री, छोटा-सोटा, छोकरा-सोकरा,
छगन-सगन, छडी-सरी.
(११) शब्दान्ती कठोर व्यंजन येऊन तत्पूर्वी व आला तर व चा अर्धा व होऊन
त्यापुढे महाप्राण येऊन अन्तीच्या कठोर व्यंजनाचा र होतो : केवढा-कव्हरा, तेवढा-त्यव्हरा, जेवढा-जव्हरा.
(१२) शब्दारंभी र चा कधी ल होतो : रडतोय-लरतय, रबर-लबर,
(१३) संयुक्त व्यंजनातील र वेगळा उच्‍चारला जातो : प्रकाश-परकास, मात्र-मातर,
कात्री-कातर, श्रीमंत-शीरीमंत.
(१४) श चा स होतो : शरद-सरद, शाप-सराप, शोध-सोद.
(१५) शब्दारंभीचा वि जाऊन त्याजागी इ येतो : विमान-इमान, विमल-इमल,
विषय-इषय, विरजण-इरजन.
(१६) पण (सुद्धा या अर्थी) ऐवजी पन किंवा बी येते : मीपण-मीपन/बी,
तू पण-तूपन/बी
(१७) ऊन, हून प्रत्ययाऐवजी शी येतो : गर्दीतून-गर्दीशी, गावातून-गावानशी,
लांबून-लांबशी, गावाहून-गावशी.
(१८) ‘ला' या प्रत्ययाऐवजी ल्हा येतो : तुला-तुल्हा, तिला-तिल्हा. मात्र मलाचे
मना होते.
(१९) ‘त' या प्रत्ययाऐवजी न येतो : फुलात-फुलान, रानात-रानान, मनात-मनान.
(२०) नो (संबोधन) ऐवजी नू किंवा हू येतो : पोरांनो-पोरांनू/पोरांहू.
गाववाल्यांनो - गाववाल्यांनू/हू.
(२१) ‘प्रमाणे' ऐवजी सारा/सारी येते : त्याप्रमाणे-त्या सारा/री,
मुलाप्रमाणे-मुलासारा, साखरेप्रमाणे-साकरंसारा.
(२२) ‘होता', ‘नव्हता' ऐवजी ‘व्हता', ‘नता' येते.
(२३) ‘आता'चे ‘आथा' होते : आथा कल्हा लरतस?
(२४) ‘अ'चा सर्रास ‘आ' होतो : अंग-आंऽग, अंतर-आंतर, असा-आसा.
(२५) कशालाचे कन्हाला किंवा कल्हा होते - कन्हाला आलास?
(२६) शब्दारंभी ‘वे' ऐवजी ‘य' येतो : वेडा-यरा, वेस-यस, वेगळा-यगला,
वेद-यद, वेसण-यसन.
(२७) शब्दारंभी ‘म'ऐवजी ‘म्हा' येतो : महादेव-म्हादेव, मोठा-म्होटा,
मारुती-म्हारोती, महाराज-म्हाराज.
(२८) ‘ढ' ऐवजी ‘र्‍ह' येतो : गाढव-गार्‍हव, पेढा-पेर्‍हा, कढी-कऱ्ही.
(२९) शब्दारंभी ‘ओ' ऐवजी ‘व' येतो : ओटा-वटा, ओवा-ववा, ओकारी-वकारी,
ओल-वल.
(३०) शब्दारंभी ‘ए' ऐवजी ‘य' येतो : एक-यक, एकदा-यकदा, एकर-यकर.
(३१) शब्दान्ती ई ऐवजी य येतो : सुई-सुय, रुखमाई-रुखमाय, आई-आय,
घाई-घाय, जावई-जावय.
(३२) शब्दारंभी व्यंजन+ऐ च्या ऐवजी व्यंजन+अ आणि नंतर लगेच ‘ई' असा
बदल होतो : बैल-बईल, म्हैस-म्हईस, वैद्य-वईद, मैल-मईल, खैर-खईर, सैल-सईल,
(३३) शब्दारंभी व्यंजन+औ च्या ऐवजी व्यंजन+अ आणि नंतर लगेच ‘ऊ' असा
बदल होतो : मौज-मऊज, गौर-गऊर, फौज-फऊज, हौद-हऊद, कौल-कऊल,
अशी ही उत्तर कोकणची आगर बोली मराठी सारस्वतात लेखनात न आल्याने फारशी रुळली नाही. पण तशी ही समजण्यास कठीण मात्र नाही. माझ्या कथा, कादंबरी व ललित लेखनातून ही प्रथमच मोठ्या प्रमाणात आली आहे. बरोबरच आदिवासी - कातकरी, कोळी, माळी, कोकणी मुसलमानी, याही कोकणी बोली माझ्या अनेक पुस्तकांतून आल्या आहेत. जिज्ञासूंनी ‘एसईझेड', ‘घरपरसू', ‘गावदरणी', ‘कोसलन', ‘आगरातली माणसं', ‘बलुतेदार', ‘शब्दानुबंध' वगैरे पुस्तके पाहिली तर ह्या बोलींचा परिचय होईल.

‘तुलसी निवास', ए-२०२, विजया बॅंकेजवळ, सेक्टर १९, कोपरखैरणे, नवी मुंबई ४००७०९.
दूरभाष : (९५२२) २७५४५५३१

अपूर्ण कविता

अपूर्ण कविता एकटक पाहत राहतात शेवटच्या ओळीनंतर
कागदावर उरलेल्या मोकळ्या जागेकडं
त्यांना आशा असते की कधी ना कधी तरी त्या पूर्ण केल्या जातील
कुठं ना कुठं एखाद्या कवितेमध्ये उपयोगात येतील त्यांच्या ओळी
कित्येक दिवसांपर्यंत त्या अधून-मधून आपली दारं वाजवतात
जणू आठवून देतात की आम्ही इथंच आहोत बरं का आसपास!
आणि कित्येकदा ईर्षेमुळं नवीन कवितांच्या येण्याला सुद्धा थोपवून धरतात
एखादी नवीन ओळ येऊ-येऊ म्हणते
इतक्यात तिला जोरानं धक्‍का देत येते कुठलीतरी विसरलेली अपूर्ण कविता
अपूर्ण कविता कुरणात हरवलेल्या गायी आहेत ज्या रस्ता शोधत एक दिवस
परत येतात आणि बंद दारापुढं हंबरत राहतात
त्या आपल्या आसपास भटकणारे अतृप्त आत्मे आहेत
पण सारखं असंच होतं असं नाही
कधी कधी त्या निमूटपणे पडलेल्या असतात एखाद्या कागदाच्या कोपर्‍यात
कित्येक दिवस, कित्येक महिने आणि कधी-कधीतर आयुष्यभर
त्या आपल्या विस्मृतीच्या पडद्याआड कुठंतरी लपून बसतात
अनेकदा असं होतं की सारखं सारखं बोलवावं लागतं त्यांना
आणि तरीसुद्धा त्या येत नाहीत
अपूर्ण असल्याची जाणीव किंवा अपूर्णतेची घमेंड
त्यांना इतकं हट्टी बनवते
की त्या आपल्या जागेवरून हूं का चूं करत नाहीत
त्या काही बोलत नाहीत पण काहीतरी सांगताहेत असं वाटतं
आम्ही अपूर्णच ठीक आहोत
अशी कुठली कविता आहे जी पूर्णपणे अवतरली आहे धरतीवर
काहीतरी करून काही जोडून काही तोडून त्या पूर्ण होतात किंवा
पूर्ण केल्यासारख्या केल्या जातात कविता
तसं पाहिलं तर जगात अपूर्ण कवितांचीच संख्या जास्त आहे
पूर्ण कवितेत सुद्धा कुठं ना कुठंतरी राहिलेलीच असते एक अपूर्णता
प्रत्येकाला लिहायची असते एक पूर्ण कविता
दुसर्‍या कवीला दुसर्‍या पद्धतीनं
पण गंमत अशी आहे की असं केल्यानं पहिला कवीही समाधानी होत नाही आणि दुसराही नाही
प्रत्येक कवीला नेहमीच वाटतं की कवितेत कुठंतरी काहीतरी राहून गेलंय
जे असायला पाहिजे होतं... असू शकत होतं...!

आपली भाषा

भाषेतून पुकारण्याच्या आधी ती फक्त एक चिमणी होती
तिला चिमणीसुद्धा आपल्या भाषेनंच म्हटलं
भाषेनंच दिलं त्या झाडाला एक नाव
किंबहुना आपल्या भाषेच्या पलिकडं झाड फक्त झाड होतं
त्याला झाडसुद्धा आपल्या भाषेनंच म्हटलं
अशाच प्रकारे त्या असंख्य नद्या, झरे, पहाड...
कुणालाही माहिती नव्हतं
की आपली भाषा त्यांना कुठल्या नावानं ओळखते

त्यांना आपल्या भाषेशी काही देणं-घेणं नव्हतं
भाषा आपली सोय होती
आपण प्रत्येक गोष्टीला भाषेत रूपांतरित करण्यासाठी उतावीळ होतो
प्रत्येक गोष्टीला घाई-घाईनं भाषेत बसवण्याचा हट्ट
आपल्याला त्या गोष्टींपासून थोडं दूर घेऊन जात होता
कित्येकदा आपल्याला ज्या गोष्टींची नावं माहिती असायची
त्यांचे आकार आपल्याला ठाऊक नसायचे
आपण विचार करायचो की भाषा प्रत्येक गोष्टीला जाणून घ्यायचा दरवाजा आहे
याच तर्काच्या वाटेवरून काही भाषा सत्ताधीश झाल्या
दुबळ्यांची भाषा दुबळी मानून तिचा पराजय व्हायचा
भाषांचे आपापले अहंकार होते

झाडं, दगडं, पक्षी, नद्या, झरे, हवा आणि जनावरांजवळ
त्यांची स्वत:ची अशी भाषा होती की नाही कुणास ठाऊक
पण आपण सातत्यानं त्यांच्यामधून एक भाषा वाचवण्याचा प्रयत्‍न करायचो
अशाप्रकारे आपले अनुमान त्यांची भाषा घडवत होते
आपण विचार करायचो की आपले अनुमान म्हणजेच सृष्टीची भाषा होय
आपण विचार करायचो की या भाषेनं
आपण वाचून काढू अवघं ब्रह्मांड!

(‘दो पंक्तियों के बीच' या साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या संग्रहातून)

दोन ओळींच्या दरम्यान

मी
कवितेच्या दोन ओळींच्या मधली अशी जागा आहे
जी नेहमीच ओसाड दिसत असते

बर्‍याचदा याच ठिकाणी कवीची अदृश्य सावली फिरत असते
मी कवीच्या ब्रह्मांडातील एक गुप्त आकाशगंगा आहे
बर्‍याचदा शब्द इथं येताना नजर चुकवतात
गडबडीत राहून गेलेलं एखादं संयुक्त क्रियापद किंवा एखादा शब्द
कधी-कधी वळचणीला आल्यासारखा एखाद्या कडेला येऊन बसतो
माझ्या परीघातून डोकावतात काही अनुस्वार आणि काही मात्रा
शब्दांमधून चाळत येतात इथं कितीतरी ध्वनी
कधी-कधी तर शब्दांचे काही अर्थ भटकत
येतात इथं
त्या हट्टी मुलासारखे जो फार पूर्वी पळून गेला होता
आपलं घर सोडून

जेवढी दिसते
तेवढी अकंपित, तेवढी निर्विकार जागा नाहीए
मी
बोलता-बोलता अचानक मधेच आलेली स्तब्धता आहे
जिच्यात तरंगत राहतात बोलण्यातले राहून गेलेले तुकडे
कितीतरी चोरवाटा सुरू होतात माझ्या गल्लीतून
ज्या घेऊन जातात
सगळ्यांची नजर चुकवून कवीच्या एका अज्ञात दुनियेपर्यंत
अथांगतेच्या या अरण्यात उड्या मारत असतात
कितीतरी अनोळखी सावल्या
शब्दांच्या उंच आडोशाच्या मध्ये मी एक मोकळं आकाश आहे
कवीच्या मनसुब्यांचे गरुड इथं उत्तुंग भरारी घेत असतात
अदृश्याच्या आडोशामागं लपली आहेत काही अशी भुयारं
जी आपल्या गुप्त रस्त्यानं
घेऊन जातात शब्दांच्या जन्मकथेपर्यंत

इथं येण्यापूर्वी चपला बाहेर सोडून ये
तुझ्या पावलांचा आवाज होऊ नये म्हणून
बाहेरचा जरासुद्धा आवाज नष्ट करेल
माझ्या अख्ख्या मायाजालाच्या गारुडाला!

गाथा सप्तशती'तील मराठीचे दर्शन

सातवाहन राजा हाल याने महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातल्या कवींनी रचलेल्या हजारो गाथा गोळा केल्या. प्रसंगी त्यासाठी भरपूर धनही वेचले. कुंतल देशावर राज्य करणार्याह, स्वत: कवी असलेल्या या राजाने त्यातल्या निवडक गाथांचा संग्रह केला. ‘गाथा सप्तशती' म्हणून हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. या मूळ सातशे गाथांमध्ये नंतर थोडी भर पडली, आणि १००४ गाथा ‘शेफालिका' या नावाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात अनुवादासह वाचायला मिळतात. सुमारे इ०स० २०० ते ४५० या काळात, कदाचित त्याच्याही आधीपासून बोलल्या जाणार्याव महाराष्ट्री प्राकृत भाषेतल्या या अनमोल संग्रहातून आपल्याला त्या काळच्या सामाजिक जीवनाचा परिचय तर होतोच. शिवाय महाराष्ट्री प्राकृत हा मराठी भाषेचा पूर्वावतार असल्यामुळे त्या काळी मराठी माणसाच्या प्रत्यक्ष बोलण्यात असलेल्या बोली मराठी भाषेचा अंधुकसा का होईना अंदाज आपल्याला येतो... आजही आपल्या बोलण्यात असलेले काही शब्द त्या काळी आपले पूर्वजही जसेच्या तसे वापरत होते या जाणिवेने सुखावायला होते ... काही शब्द जसेच्या तसे आणि काही शब्द किंचित वेगळ्या रूपात आलेले पाहून, वाचून आपल्याला त्या काळच्या आपल्या वाणीची थोडीफार का होईना झलक अनुभवता येते. ‘गाथा सप्तशती' वाचताना माझ्या नजरेला आलेल्या काही मराठी - महाराष्ट्री शब्दांची मी नोंद केली आहे. [शब्दांपुढे कंसात शतक क्रमांक व गाथा क्रमांक दिला आहे.]

तेव्हा, शेकडो वर्षापूर्वीही आपण मामीला मामी च म्हटलं, (१.९३), आत्याला कधी अत्ता (४.६९), तर कधी पिउच्छा - पितृस्वंसा - वडलांची बहीण म्हटलं (२.९५), दीर होता दिअर (५.७०), आईला माए (१.४३), तर मावशीला माउआ म्हटलं (४.२३), सवत ही सवत्ती (सपत्नी ) आहे (५.२८), सावली साउलीच आहे (२.६९) (६.५), सुई ही सुइचर् आहे (७.२०), जुनं सुद्धा जुण्ण म्हणून आहे (३.२९), चिख्खल चिक्खलच आहे (१.६७), दिठी दिठ्ठी म्हणून दिसते, (२.३४) आणि अश्रू आहेत अंसू (२.५३), मज्झ - माझे (२.३१), तुज्झ - तुझे (१.७८), १.८९) आढळते. त्याचप्रमाणे मज्झ तुज्झ - माझे तुझे (७.१) ही आढळते. अत्थे म्हटलं जाई आत्ता या अर्थाने (४.३७), अच्छेर म्हणजे आश्चर्य (२.१२), हे की सइ ही सती (२.२८), ही असते सखी प्रमाणे, आणि काकी, (२.२) म्हणजे काकू नसून चक्की कावळी असते! तम्बे (६.३८) म्हणजे हे तांबू गाई. रुन्द म्हणजे रुंदच (७.४९), ओलं आहे ओल्लं (५.४०), कलिअं - कळले, ओळखले (७.१५), गूळ आहे गुलो (५-५४)... आजचा अय्या हा सुंदर उद्गार अव्वाे म्हणून भेटतो! (२.७८).

या काळातल्या आपल्या भाषेत होणं आहे - होसि - अससी (१.६५), वसणं आहे - वसइ - वसती (१.३५), हिंडणं फिरणं आहे - हिण्डन्ती (१.३८), जाणं आहे - वच्चल - तेथ न वचा असा महानुभावकालीनही वापर (२.६०) आढळतो. रमणं आहे - रमिउण रमून (१.९८), रुसणं आहे - रुसेउ (१.९५), प्राप्त करणं, मिळवणं या अर्थी पावणं आहे - पाउम (२.३९), उल्लावो हे बोलणं, संभाषण करणं या अर्थी आहे (५.१४) तर कर्कश - कक्खड बोलणं - बोल्लम ही आहे (१.८१) दीससी - दिसतोस असा सरळ उपयोग आहे (४.८९), दाखवणं आहे - दावेई - दाखवत (३.१५) दावणं असा शब्द आजही कितीतरी लोक वापरतात. फुंकर घालणं आहे - फुक्कथन्तो (१.७६), बुज्जिउ - जाणूनबुजून (७.२) मळणं या अर्थी मर्दन करणं या अर्थी आलंय मलेसि (४.४४) आजही आपण पीठ मळतोच; काढणं आहे - कढ्ढेइ (४.३५), कढ्ढण - कर्षण (३.२४), ओघळणं ओसरणं आहे - ओसरइ (१.७४), झिजणं आहे झिज्जए (२.४१), मोडून पडणं आहे - भज्जिहिसी - मोडून पडशील, (२.२), मोडणं आहे - मोडिअ - नासधूस (५.४९), अमोडिऊण - मोडून, पिरगाळून, भाजणं आहे - भज्जिआ (५.५७), खंतावणं आहे - तम्मइ (४.८३), तमणं, तमत बसणं असा शब्दप्रयोग आजही खेड्यातून आढळतो. मा तम्म (८.४५), खंतावू नकोस. कोळपून जाणं आहे - कुलुत्रिऊण कोळपून, (४.२७), नष्ट होणं आहे - णासइ (२.७२), चुकणं दोन प्रकारे आढळलं : चुक्कुसि - चुकलीस, मुकलीस (४.६५), चुक्कीसंकेआ - जिचा संकेत चुकला आहे (३.१८), ओलं होणं आहे - ओलिज्जन्त (६.२१), त्याचप्रमाणे टुणटुणणंही आहे. टुणटुणन्तो म्हणजे उड्या मारतो, भटकतो (९.७८), शिवशिवणंही आहे! - चुलचुलन्ते (४.८१).

काही शब्द वेगळेच आहेत, थोडे गोंधळात टाकणारे हे शब्द पाहा :
चिउर - केस (२.७३), वराई - बिचारी हा शब्द अनेक ठिकाणी आला आहे. कण्इज्जुआ वराई - बिचारी सरळ सोट अशी (३.५२), ग्द्येप्पइ - आपलेसे होणे (२.८६), किच्छेन - कष्टाने (७.९४), अवउहणस्स - आलिंगनरूपी (३.४४), दुद्दोली - निरगाठ (२.४९), कसवट्ट - कसोटी (६.२६), उच्चटइ - उचलणे वेचणे (२.५९), काएहि खज्जन्ति - कावळेच खातात (२.४८), धम्मिल्लो - वेणी (५.४४).

काही शब्द साधे वाटतील असे देखील आहेत :
नाऽअ - नाटक (१.६८), महग्घम - महाग (१.६८), आईप्पणेण - पिठाच्या पाण्याने - आलेपन (१.६६), झत्ति - झटकन (१.६८), सोणार - सोनार (१.९१), मालारी - माळीण (५.९६), हट्ट - बाजार (७.८७), ओआसो - आवास (९.४७), वई - कुंपण (५.६३), गभहर - गाभारा (७.६५), माहप्पो - मोठेपण (२.६६), खन्ध - खांदा (१.७७), भिउडि - भुवई (९.१४), भुमआ भङ्ग - भुकुटिभंग (९.१३), थणाणं - स्तन - खेड्यात आजही थान शब्द वापरतात (१.१००), भरिअ भरून आलेले (डोळे) (२.८०), पहणुअई - पान्हावती (४.४९), अच्छीसु - डोळ्यात (२.३२), पक्कललो - प्रवीर, निधड्या छातीचा (२.१८), पउत्थो - प्रोशित प्रवासी (२.२९), पामर (२.६४), अप्पाणो - आपल्याला स्वत:ला (२.३३), मा छिवसु - शिवू नकोस (१.९२), पअपरिपाटी - पावलांनी घातलेल्या येरझार्या- (२.४९), छल्लि - साल (२.१५), खुत्त - रुतलेले (२.७६), लग्गन्ति - लागतात (४.२८), धुव्वन्त - धुतलेले (५.६३), णच्चेरी - नाचरी (४.२०), सिढिले - ढिले (३.२४), सहज्झिआ - शेजारीण (८.४१) पाहुणिआ - पाहुणी (९.५६), पङ्गुरणं - पांघरूण (७.७५), कञ्जिएण - कांजीने (२.८६), चंदनपंकाे - चंदनाची उटी (२.८८), सद्धालुई - श्रद्धाळू, आवड निर्माण झालेल्या (४.१५), कल्लि - उद्या. खेड्यात आजही कल हा शब्द उद्या म्हणून वापरला जातो (५.२), अइआअरेण - अतिआदराने, असोशीने (५.१९), किणे चिठ्ठसि (तिष्ठसि) - का उभी आहेस?, थोअं थोअं - थोडे थोडे किंवा हळूहळू (५.५०), विशेष म्हणजे, होइ होउ - होईल ते होऊं दे! (५.२९).

हे असं बरंच काही या गाथांमधून आढळतंच; पण खूपच विलोभनीय आहे या गाथांमधून, तेव्हाच्या मराठीतून प्रकट होणारं तेव्हाच्या मराठी निसर्गाचं चित्र! (४.९१) मधे ज्योत्स्नाजल प्रकटतं, पंसुआण (पंशुक) म्हणजे नरपोपट विहरतात (५.६२) मधे, कन्दोट्ट फुलतंय (६.२२) मधे. नील कमल, तर (६.४) मधे कमळांची शोभा घमघमून सारं जग जिंकते आहे. महम्महई - घमघमते, ६.१ मधे एक्कळक्कं परिरक्षण एकमेकांचे रक्षण करणारे कुरङ्गमिहुन म्हणजे हरणांचं जोडपं भेटतं. (१.७५) मधे दरिअसीह म्हणजे बेफाम झालेला सिंह आहे. मुङकुस म्हणजे मुंगूस दिसते ७.७४ मधे. कइत्थ - कवठ ६.४१ मधे तउसी - काकडीची वेल ५.३४ मधे. मालू - बेलफळ ५.७९ मधे तर गुटिका धनु - कदंब घुटिका - कदंबाचे गेंद फेकण्याच्या धनुचा उल्लेख आढळतो १.७७ मधे. विज्जुज्जोआे - विजेचा झोत झळकतोय ३.१५ मधे तर लंकालता या पिवळसर लाल पळसांच्या नाजूक फांद्या झुलतायत ३.११ मधे आणि ४.४६ मधे तर अद्धप्पइया, अर्धवट, किंचित उडणारी परी दिसते. णइकच्छ - नदीकाठ ४.१६त दिसतो. पाऊसआल - पाऊस काळ ३.९५ मधे आलेला दिसतो. गावातल्या तळ्यात कोणी तरी आभाळ उताणे (उत्ताण) टाकून दिले असल्याची भन्नाट कल्पना २.१० मधे आली आहे! दैनंदिन व्यवहारातला घरगुती ओलावा ६.३७ मधे आढळतो; तर परिमलिआ गोवेण तेण हत्थं पिजाण ओल्लेइ । स च्चिअ धेणू एहिं पेच्छसु कुड दोहिणी जाआ।। = (पूर्वीच्या) गवळ्याने (गाय) अशा रीतीने हाताळली की ती हातदेखील ओलावी ना - (- मग दूध देणं तर दूरच!) पण बघा, आता तीच गाय घागरभर दूध देणारी झाली आहे. तर ९.४६ मधे निसर्ग सौंदर्याची खास बहार आढळून येते :
हंसाणं सरेहिं सिरी सारिज्जइ अह सराणं हंसेहिम् । अण्णोणं चिअ एए अप्पाणं णवर गरुअन्ति । = हंसांचे सौंदर्य सरोवरांनी आणि सरोवरांची शोभा हंसांनी वृद्धिंगत होते. हे दोन्ही एकमेकांचा व स्वत:चाच गौरव करतात!
इथेच थांबून राहावं वाटतंय, नाही का?

शरदिनी मोहिते
ए-१/४, शरयू सरिता नगरी, फेज-२, सिंहगड मार्ग, पुणे ४११ ०३८.
दूरभाष : (०२०) २४२५ १३५३

Pages