भाषा आणि जीवन

पुस्तक-परीक्षणः लाटांचे मनोगत

[परीक्षित पुस्तक : 'लाटांचे मनोगत' - डॉ० नीलिमा गुंडी. पद्मगंधा प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे १५९. मूल्य रु० १३०/-]

डॉ० नीलिमा गुंडी या मराठी काव्यसमीक्षेच्या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या विमर्शक आहेत. त्या स्वत: कवयित्री आहेत. तसेच मराठी कवितेच्या काही चांगल्या संपादनांमध्येही त्यांचा सहभाग आहे. 'लाटांचे मनोगत' हे त्यांचे काव्यसमीक्षेचे पहिलेच प्रकाशित पुस्तक होय.

इ०स० १९५० ते २००० या कालखंडातील मराठीतील स्त्रियांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास यातून त्यांनी वाचकांसमोर मांडलेला आहे. 'लाट' ही त्यांना स्त्रीत्वाची प्रतिमा वाटते, असे स्पष्टीकरण प्रास्ताविकात आलेले आहे. परंतु वाचकांना हा अर्थ सहजासहजी जाणवेलच असे नाही. शीर्षकावरून हे ललित गद्य असावे, असा समज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशयावर अधिक प्रकाश पडेल, असे शीर्षक जास्त समर्पक झाले असते.

विविध निमित्ताने झालेला या विषयाचा अभ्यास त्यांनी या पुस्तकात एकत्रित केलेला आहे. इ०स० १९५० ते १९७५ व इ०स० १९७५ ते २००० असे दोन टप्पे पाडून त्यामधील स्त्रियांच्या कवितांमधील अनुभव आणि अभिव्यक्ती त्यांनी दोन प्रकरणांमध्ये लक्षात घेतली आहे. तसेच एकूणच स्त्रियांच्या कवितेचे म्हणून लक्षात येणारे काही ठळक पैलूही त्यांनी स्वतंत्र प्रकरणात मांडले आहेत. 'स्त्रीवादी आणि स्त्रीकेंद्री कविता' या विषयावरही स्वतंत्रपणे विवेचन आहे. या सर्व अभ्यासातून जाणवलेल्या तथ्यांच्या आधारे समारोप केला आहे. याशिवाय परिशिष्टांमध्ये पाच परिक्षणे, निवडक आधारग्रंथ व कवयित्रींची निर्देश सूची दिलेली आहे.

स्त्रियांच्या कवितांमधील अनुभव आणि त्याच्या अभिव्यक्तीसंबंधी विवेचन करणारा या पुस्तकामधील भाग हा उद्दिष्टाच्या दृष्टीने त्याचा गाभा म्हणता येईल. इ०स० १९५० ते २००० मधील कवितेची ही चर्चा करणार्‍या प्रकरणांमध्ये स्त्रियांचे विशिष्ट संवेदन, त्यातील उत्कटता, भोवतालच्या जगाविषयीचे त्यांचे आकलन, त्यातले प्रामुख्याने काव्यविषय होणारे घर, नातेसंबंध यांसारखे घटक, बदलत्या काळात बदलत गेलेले स्वत:विषयीचे भान, कळत नकळत जीवानानुभवावरच पडलेली मर्यादा आणि त्यामुळे अभिव्यक्तीवरही येणारी दडपणे अशा विविध मुद्यांच्या आधारे घेण्यात आलेला परामर्श त्या काव्याचे स्वरूप नेमके उलगडून दाखवणारा आहे.

१९७५ पर्यंतच्या कवितांचा विचार करताना या दडपणांचा उल्लेख त्यांनी केला आहे. या कवयित्री परंपरेने उभी केलेली 'मूक सोशिक' स्त्रीची आदर्श प्रतिमा रंगविण्यातच रमल्या होत्या, असे त्या म्हणतात (पृ० ४३). इंदिराबाईंच्या 'कधी कधी न अक्षरात/मन माझे ओवणार' या ओळी उद्धृत करून, हे व्रत घेऊनही तेथे सूचक, तरल प्रतिमांमधून मन व्यक्त होऊ लागल्याचे त्या सांगतात. एक विचार येथे मनात येतो. त्या काळात मौनात केवळ स्त्रीत्वाचीच प्रतिष्ठा होती का? की एकूण मराठी कवितेवरच अभिजातवादी प्रवृत्तींचाही काही प्रभाव होता? कुसुमाग्रजांच्या कवितेतील 'काही बोलायचं आहे/पण बोलणार नाही' सारख्या अनेक ओळींचे येथे स्मरण होते. त्यामुळे स्त्रियांच्या कविता अगदी सुट्या न काढता समकालीन कवी कोणती मूल्ये मानत होते, हेही पाहिले पाहिजे असे वाटते. अन्यत्र या कवितेवर प्रभाव टाकणार्‍या कवींची चर्चा त्यांनी केलेली आहे (पृ० १९). यात बदल झाला त्याला विविध गोष्टी कारणीभूत आहेत. १९७५ नंतर आपल्याकडे पोचलेला 'पर्सनल इज पोलिटिकल' हा स्त्रीवादी विचार हे त्यातले एक ठळक कारण आहे.

इ०स० १९७५ ते २००० या कालखंडातील कवितेबाबत विवेचन करताना त्यात अपरिहार्यपणे स्त्रीवादाचा संदर्भ येतो. स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेचे पुनर्मूल्यांकन या कवयित्री करीत जातात. भोवतालचे वास्तव, प्रेमानुभव, नातेसंबंध, मातृत्व या सार्‍यांविषयीच त्यांची जाणीव अधिक डोळस होते आहे. काव्याच्या आविष्काररूपांवरही या परिवर्तनाचा परिणाम होतो आहे हे डॉ० गुंडी नेमकेपणाने दाखवून देतात. हे स्पष्ट करताना त्यावर पडू पाहणार्‍या मर्यादांचीही त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. या प्रकरणातच समाविष्ट होऊ शकला असता असा भाग 'स्त्रीवादी आणि स्त्रीकेंद्री कविता' म्हणून त्यांनी वेगळा ठेवला आहे. त्यांचे तेथील विवेचन स्त्रीवादाच्या प्रभावातील सकारात्मक अंगाचीही अधिक खोलवर जाऊन दखल घेणारे आहे. (तशी ती घेणे आवश्यकही होते.) हे लेखन पुस्तकरूपात येताना एकत्र करणे सयुक्तिक ठरले असते. इ०स० १९७५ नंतरच्या कवितेचे आकलन त्यामुळे सलग स्वरूपात समोर आले असते.

'स्त्रियांच्या काव्याचे काही पैलू' हे प्रकरण सुटे तीन लेख एकत्र करूनच आकारले आहे. वेगवेगळ्या पैलूंचा विचार असल्याने त्यांचे सुटेपण खटकत नाही. यातील 'वारसा स्त्रीत्वाचा आणि कवितेचा' या शीर्षकाच्या भागातील आई-मुलीच्या नात्याचे बदलते स्वरूप आणि त्याची तशीच वेगळी अभिव्यक्ती यासंबंधीचे विवेचन महत्त्वाचे आहे. स्त्रियांच्या कवितेतील एक वेगळा पदर त्यातून उलगडला जातो. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीला वाटणारी संवादाची गरज आणि त्यामुळे कवितेतून सुरू होणारा आत्मसंवाद याबाबतचे 'शब्दवती कविता' या शीर्षकाखाली मांडलेले निरीक्षणही मार्मिक आहे.
परिशिष्टांत कवयित्रींच्या काव्यसंग्रहांची पाच परीक्षणे दिलेली आहेत. हे संग्रह चांगले आहेत. त्यांची वैशिष्ट्ये लेखिकेने नेमकी दिली आहेत, मात्र मुळातल्या शब्दमर्यादेमुळे त्यातली दोन परीक्षणे फार त्रोटक आहेत. लेखिकेकडून विश्लेषणाबाबत असलेल्या अपेक्षा त्यामुळे फारशा पूर्ण होत नाहीत. नियतकालिकांच्या मर्यादेत अधिक विवेचन त्या त्या वेळी शक्य नसले, तरी आता पुस्तकात समावेश करताना त्यात भर घालता आली असती, असे वाटते.

प्रस्तुत पुस्तकातून या कालखंडातील कवयित्रींच्या काव्याच्या स्वरूपावर चांगला प्रकाश पडतो. डॉ० गुंडी यांनीच दिलेल्या आकडेवारीच्या प्रमाणात पाहिले तर त्यापैकी निवडक काव्यसंग्रहांचाच विचार त्या येथे करू शकल्या आहेत, हे लक्षात येते. मात्र त्यांची निवड प्रातिनिधिक म्हणता येईल, अशी आहे. मूळ निबंधांना पुस्तक म्हणून एकत्रित करताना पुनर्लेखनाची गरज होती, असे वाटते. तरीही एकूण विवेचन आणि संदर्भ यामुळे प्रस्तुत पुस्तकही अभ्यासकांस उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

विद्यागौरी टिळक
प्रपाठक, मराठी विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे ४११ ००७. दूरभाष ०२०-२५६९ ०९८७

मराठीचा ओढा

हैदराबादेतील मराठी समाजाचे मराठी विषयाचे प्रेम जागृत होते व ते अस्सल होते. १९५५ ते १९५८ हा काळ अंशत: संभ्रमात गेला. त्याच वेळी दक्षिण भारतात प्रचलित असलेल्या सरकारमान्य व विद्यापीठमान्य ओरिएंटल लॅंग्वेजिज या परीक्षांचे अभ्यासक्रम समोर आले. प्राज्ञ, विशारद ऐवजी ओरिएंटल लॅंग्वेज पदविका व पदवी हे नामाभिधान झाले. हे कार्य करण्यासाठी मराठी संस्था असणे गरजेचे होते. त्यातून समाजाची ऊर्मी ओळखून संस्था स्थापन झाली - मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश व लगेच वर्गांना आरंभ झाला. विद्यापीठीय मान्यतेचे सोपस्कार चटकन उरकले व पाहता पाहता आजच्या मराठी महाविद्यालयाने जन्म घेतला. त्याचे मूळ सामाजिक गरजेपोटी व मराठीच्या ऊर्मीपोटी होते. शासनमान्यता व विद्यापीठमान्यता होती. परंतु ह्या वर्गांना शिकवायचे कुणी? संस्था तर नवीन होती. जवळ काहीच नाही, एका निष्ठेशिवाय. सगळ्या मराठीच्या प्राध्यापकांनी आपापले काम वाटून घेतले. कधी काळी श्री० दि०कृ० केळकर संस्कृत घेऊन एम०ए० झाले होते. ते धोतराचा काचा मारून वकिलीची पुस्तके बाजूला ठेवून 'उत्तररामचरित' शिकवायला मैदानात उतरले. 'ओढा सार्‍यांना मराठीच्या पाशात' हा मंत्र मुळात हैदराबादचा आहे. दत्तो वामन पोतदारांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या १९४३च्या नांदेड संमेलनात तो उच्चारला होता व तो महामंत्र ठरला.

त्या वेळीही स्वाध्याय मंडळ चालू होतेच. एखाद्या पुस्तकावर, कवितेवर चर्चा, वादविवाद होत असत. याच काळात बा०सी० मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ इ० नवकविता, नवकथा लिहिणारी मंडळी येऊन गेली. तेव्हा त्यांच्याबरोबरची चर्चाही अतिशय रंगली. त्या वेळी केवळ मराठीचेच नव्हे तर इतर भाषाविषयांचे प्राध्यापकही या स्वाध्याय मंडळात येत असत. मला आठवतं, विंदांची 'दाताकडून दाताकडे' ही कविता ए०वि० जोशी यांनी इतकी छान समजावून दिली होती की ती विसरणे अशक्यच. हाच प्रकार 'त्रिधा राधे'चा.

तर ही वीणा म्हणा वा माळ म्हणा कहाळेकरांनी द०पं० जोशींच्या गळ्यात अडकवली. एवढे खरे की हा गजर अद्याप चालूच आहे. मराठी मंत्र वातावरणात घुमतो आहे.

डॉ० उषा जोशी, "म-मराठीचा'' (मराठी महाविद्यालय सुवर्णमहोत्सव स्मरणिका) २००८, पृ० ५

पुस्तक-परीक्षणः अक्षरस्पंदन

[परीक्षित पुस्तक : 'अक्षरस्पंदन' - डॉ० नीलिमा गुंडी. उन्मेष प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे १६८. किंमत रु० १२०/-]

साहित्याच्या रसिक वाचकांची अभिरुची प्रत्येक पिढीनुसार बदलत असते. अभिरुचीच्या या घडणीत समकालीन साहित्याचा फार मोठा वाटा असतो. साहित्यातील संक्रमणाची नोंद प्रत्येक पिढी आपापल्या परीने घेत असते. डॉ० नीलिमा गुंडी यांचे 'अक्षरस्पंदन' हे पुस्तक प्रामुख्याने अशा समकालीन कवी आणि लेखकांच्या साहित्याविषयी आपले अनुभवकथन करते. 'रसिकांमधल्या सुप्त प्रतिभाशक्तीला समर्पित' असे हे पुस्तक अनेक प्रतिभावंतांच्या साहित्यनिर्मितीचा मागोवा घेते.

वेगवेगळ्या निमित्ताने निरनिराळ्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे. त्यामध्ये 'कवितेशी गट्टी जडण्याचे (जमण्याचे) दिवस' हा पहिला लेख आहे. आधीच्या पिढीकडून गेय, छंदोबद्ध कवितांमधून काव्य कसे भेटले हे लेखिकेने त्यात सांगितले आहे. 'कवितेचे भावतरंग'मध्ये 'बालभारती'मधील 'झुळुक मी व्हावे' या काहीसे अज्ञात असलेल्या कवी दा०आ० कारे यांच्या कवितेचे रसग्रहण आहे. आज पन्नाशीत असलेल्यांना पाठ्यपुस्तकांमधून मिळालेले 'कवितेचे पाथेय' हा एका लेखाचा विषय आहे. याशिवाय कुसुमाग्रजांची बालकविता, विंदा करंदीकरांची बालकविता, 'विशेषणात न मावणारा कवी' (विंदा करंदीकर), 'विशाखा'ने आम्हांला काय दिले?', 'अष्टपैलू वसंत बापट' असे निवडक कवींवर सहा लेख या संग्रहात आहेत. रेल्वे, पक्षी, झाडे, वसंत ऋतू, पाणवठे, पंढरपूरची रुक्मिणी, आई, बाप आणि मुलगी, बाप आणि दलित काव्य, ईश्वर अशा शीर्षकांखाली असलेल्या कवितांचे तुकडे गोळा करून लेखिकेने जवळपास अकरा लेख लिहिले आहेत. एका लेखात तर कुसुमाग्रजांच्या 'स्वप्नाची समाप्ती' या प्रसिद्ध कवितेची मजरुह सुलतानपुरींच्या एका चित्रपटगीताशी तुलना केली आहे.

'चाळ' (मुंबईतली) या घटकाची साहित्यातील प्रतिबिंबे यावर एक लेख आहे. अर्थात 'कथाकादंबर्‍यांमधील बदलती स्त्री-प्रतिमा' हा प्रबंधाला शोभेल असा भारदस्त विषयही लेखिकेने निवडला आहे. प्रकाश संत यांचा 'लंपन', मिलिंद बोकील यांची 'शाळा,'इरावतीबाईंचे 'ललितलेखन' आणि 'भाषेचे भाष्यकार' हा डॉ० अशोक केळकर यांच्यावरील व्यक्ती आणि वाङ्मयविषयक लेख असे गद्यासंबंधी लेख या संग्रहात आहेत.

लेखिका स्वत: साहित्याची साक्षेपी वाचक आणि मराठी साहित्य या विषयाची प्रदीर्घ काळ अध्यापक आहे. भाषा-विषय शिकवताना कसे शिकवावे याचे नेमके उत्तर लेखिकेजवळ आहे. 'शब्दांचे दुसर्‍या शब्दांशी लागणारे नाते, शब्दाचे अर्थाशी लागणारे नाते, त्या अर्थाचे आपल्या जगण्याशी लागणारे नाते आणि त्याचवेळी संस्कृतीच्या आजवरच्या खळाळत्या प्रवाहाशी लागणारे नाते, या सार्र्‍यांची एकसंधरीत्या प्रचिती येईल असे शिकवावे.' (पृo १७) हा तो गुरुमंत्र आहे. प्रत्यक्षात हे शिक्षण कसे चालते हे शिक्षकांना पुरुषराज अळूरपांडे म्हणजे कोण हे न उमगणे, गवर्‍यांचे उत्तरासह दिलेले कोडे वाचूनही त्याचे उत्तर न समजणे, 'मी कोण होणार' या हुकमी निबंधाचे 'चिमणी' हे उत्तर देऊन सार्‍या वर्गाला निबंध फळ्यावर लिहून दिलेला असणे, असे चालते हे लेखिकाच आपल्याला सांगते.

लेखिकेचे कवी, कवयित्री, गद्यलेखक यांच्याविषयीचे लेख त्यांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करतात. 'लंपनच्या आंतरिक विश्वात... संवेदनाविश्व... भावविश्व आणि विचारविश्व यांना जागा आहे' (पृo २१). हे तिचे निरीक्षण आहे. गाडगीळांच्या खुटमुट्यांच्या चाळीत 'जातीय दंगलीच्या घटनेचा प्रकाश जेव्हा या चाळकरी कारकुनांच्या जगण्यावर पडतो, तेव्हा त्यांच्या रक्तातील अंधार्‍या पेशीसुद्धा दिसू लागतात' असे लेखिकेला वाटते (पृo १४५). 'एकंदर मराठी कविता काळाच्या स्पंदनांशी इमान राखत परंपरेचे सत्त्व पारखून घेत आहे.' हा तिचा निष्कर्ष आहे (पृo १६२). स्त्रीवादी साहित्यात स्वातंत्र्य हे मूल्य महत्त्वाचे बनले; पण 'कशापासून स्वातंत्र्य आणि कशासाठी स्वातंत्र्य याविषयीची भक्कम वैचारिक बैठक सर्वच लेखकांकडे आढळत नाही' असे तिचे निरीक्षण आहे. विंदा करंदीकर हे 'विशेषणात न मावणारे कवी' आहेत तर कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'ने उत्कटतेच्या अंगभूत भरारीचा अनुभव दिला अशी लेखिकेची साक्ष आहे. एकंदरीत हे लेख वाचताना लेखिकेचे मन भावनाशील, उत्कट रसिकाचे आहे हे जाणवते.

परंतु समीक्षापर लेखनाला एवढे पुरेसे नसते. अशा लिखाणातून काही मौलिक असे मुद्दे मांडता येणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे संदर्भांची, वाक्यरचनेची, शब्दयोजनेची अचूकताही अपेक्षित असते. उदाहरणार्थ, पहिल्याच लेखातील 'रे त्या पक्ष्यावर दगड मी' आणि इतर सर्व कवितांच्या कवींची नावे लेखात नाहीत. 'ती जाईची कोमल लतिका' (पृ० ११) च्या २,३,४ या ओळी मात्रांप्रमाणे अचूक लिहिलेल्या नाहीत. 'शाळा' ही कादंबरी संवेदनशीलता आणि मनोविश्र्लेषण या दृष्टीने समीक्षकांनी गौरविलेली कृती आहे. तिच्या समीक्षणात 'मुले घराबाहेर राहतात... त्यांची पावले घराकडे वळावीत अशी घरे घडवणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे' (पृo २७) अशी भूमिका घेणे, 'हा र्‍हासशील काळ आहे.' (पृo २८), 'मुलांना सर्व शिक्षकांविषयी आदरयुक्त प्रेम वाटत नाही' अशी तक्रार करणे (पृo २८) काहीसे बाळबोधपणाचे वाटते. इरावती कर्वे यांच्या 'परिपूर्ती' या लेखात 'स्त्रीसुलभ नात्याचे त्यांना वाटणारे अप्रूप' (पृo ७४) नाही तर इतक्या संपन्न, प्रगल्भ, स्वयंप्रज्ञ आणि विकसित व्यक्तिमत्त्वाची ओळख प्रत्येक टप्प्यावर पुरुषांशी असलेल्या नात्याच्या संदर्भातच होते हे इरावतीबाईंनी मांडले आहे. सर्वच समीक्षकांनी एक सुबोध अर्थ घेतल्यावर अखेर आनंद कर्वे यांनी तो खुलासा केला होता.

काही ठिकाणी वाक्यरचना, शब्दयोजना किंवा शब्दांचा क्रम यांमधील सदोषता रसहानी करताना दिसते. लेखिकेची आई खणखणीत स्वरात 'रानात, सांग कानात आपुले नाते' म्हणते; आणि अभावित विनोद घडतो (पृo १०). सर्वांना रसस्नासत होता यावे म्हणून वापरलेले 'शिक्षणाच्या दहीहंडी'चे रूपक (पृo १५) शिक्षकांच्या संख्येच्या प्रमाणात व्यस्त ठरते. 'फुलपाखरू'मधल्या 'मी धरु जाता येई न हाता ' या ओळीत तरलतेला जोडून व्यवहारविमुखता आहे (पृo ४८) हे जरा अतीच वाटते. 'मेंदी'तील इंदिरा संत यांची 'पिळदार अभिव्यक्ती' (पृo ५०) विलक्षण होती म्हणजे काय याचा बोध होत नाही. शान्ता शेळके यांना अत्रे यांच्या सहवासात सहजसोप्या लेखनाचे कानमंत्र (किती?) मिळाले (पृo ६४). (कानमंत्र साधारणपणे एक असतो!) शान्ताबाई आणि बापट यांनी 'काव्यसंग्रह लिहिले!' (पृo ६५, ६९) ते कसे? काही प्रचंड वृक्षांमध्ये (वड, पिंपळ) चाफा (पांढरा, तांबडा) आणि गुलमोहर यांचा समावेश (पृo १०८) कसा होतो? 'प्रेम आणि मरण'मधले झाड एकतर्फी प्रेमाचे की 'मूल्यनिष्ठ जगण्याचे' प्रतीक होते? (पृo १०८). चारित्र्याशी निगडित अशी कोणती मूल्ये ते मानत होते? गौहाटी या शब्दाचा 'सुपारीचा बाजार' हा नवा अर्थ इरावतीबाईंनी शोधलेला नसून (पृo ७४) तो असमिया भाषेत मुळातच आहे. लेखांमधील विवेचनात असे कच्चे दुवे दिसत असल्यामुळे लेखनावर सफाईचा हात फिरला नसल्याचे जाणवते.

काही ठिकाणी वाक्यांच्या रचनेत ढिलेपणा आढळतो. विशेषत: क्रियाविशेषणाची जागा भरकटल्यामुळे वाक्यरचनेचा तोल जातो. उदाहरणार्थ- "जेव्हा आपण हेतुपूर्वक अध्यापनाचा व्यवसाय स्वीकारतो'' (पृo १५), "ग्रंथालयाचा उपयोग अनेक प्रकारे शिक्षणाशी जोडून घ्यायला हवा'' (पृo १५), "या पालक घडवण्याच्या प्रक्रियेला...''(पृo २९), "करंदीकरांच्या अभंगांमध्ये इहवादी वृत्तीचा पीळ जोरकसपणे आहे'' (पृo १५६) अशी त्याची काही उदाहरणे दाखवून देता येतील. काही वाक्ये केवळ वाचली तरी त्यांची सदोष रचना ध्यानात येते. उदाहरणार्थ- "वर्गाला सुरुवातीला एक प्रश्न विचारते.'' (पृo १६), "मुलांचे निसर्गाशी निसर्गत:च एक नाते...'' (पृo ३१), "निसर्गाचे निरागस सौंदर्य'' (पृo ४८), "करंदीकरांनी परंपरेची बलस्थाने नेहमी हेरून'' (पृo ५५), "इ०स० १९४२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कुसुमाग्रजांच्या 'विशाखा'मध्ये... इ०स० १९३२ ते १९४९ दरम्यानच्या कविता समाविष्ट झाल्या आहेत.'' (पृo ६०), "सामाजिक जाणिवेचे नाते... लागलेले आहे.'' (पृo ६१), "रचनेवरील कसब (प्रभुत्व?)'' (पृo ६५), "सानेगुरुजींच्या हरिजनांसाठी मंदिरप्रवेशाच्या प्रवेशदौर्‍यात'' (पृo ६९), "बापटांचे काव्यलेखन आणि काव्यदर्शन'' (पृo ६९), "शिक्षकांचे प्रशिक्षण केले जावे'' (पृo ७८), "त्यांच्या नावावर दोनच छोटेखानी मराठी साहित्यविषयक पुस्तके'' (पृo ८१), "विज्ञानाकडून झालेला अपेक्षाभंग झाला.'' (पृo ८७) "कल्पवृक्ष कन्येसाठीसारख्या काही (म्हणजे किती? ती त्या प्रकारची एकच रचना आहे!) कविता'' (पृo १३२), "द्वेष उफाळून येतो तर नवल नव्हते.'' (पृo १३८), 'झुक झुक झुक झुक आगीन गाडी' ही मामाच्या गावाला नेणारी कविता असताना वि०म० कुलकर्णी यांच्या 'गाडी आली गाडी आली'त तिचा उल्लेख (पृo १००) असावा असे लेखनावरून वाटते. प्रत्यक्षात तो "कोठेही जा, नेऊ तेथे दूरदूरदूर'' असा आहे. इत्यादी लेख पुस्तकात समाविष्ट करण्यापूर्वी त्यांवर संपादकीय संस्करण केले असते तर असे दोष राहिले नसते, असे पुन्हा म्हणावेसे वाटते.

लेखिकेच्या शैलीचा एक विशेष या ठिकाणी सांगावासा वाटतो. लेखिका साधा वर्तमानकाळ किंवा भूतकाळ न वापरता अनाठायी कृदन्तयुक्त रचना वापरते. म्हणजे संस्कार करून जाते (पृo ४३), मोठा प्रभाव पाडून गेली (पृo ४९), जगण्याचे तत्त्वज्ञान सुचवून जातात (पृo ५६), कविता आठवून जातात (पृo ५६), अर्थपूर्ण अनुभव देऊन जातात (पृo ५७), कल्पनाचित्र रेखाटून गेली (पृo ६२), निर्देश होत गेला (पृo ६२), लेखन... दाद मिळवून गेले (पृo ६७), वसंत... आकर्षित करून गेला आहे. (पृo ११३), ईश्वरकल्पना ठसा उमटवून गेली आहे (पृo १५०), बलात्कारातून... बालक... प्रश्नचिन्हे समोर ठेवत जाते (पृo १६४). अशा प्रकारची वाक्यरचना जाताजाता एखादी दुय्यम गोष्ट घडते, त्या वेळी वापरली जाते. साहित्यात काय किंवा समीक्षेत काय असे 'जाताजाता' घडून जाण्यासारखे काही नसते.
एकूण प्राध्यापकी ढंगाचा असलेला हा लेखसंग्रह आपल्या पिढीने साहित्याचे कोणते संचित मिळविले ते सांगतो; मागील पिढीकडून मिळालेल्या ठेव्यात आपल्या वाचनातून महत्त्वाच्या लेखक-कवींचे साहित्य अभ्यासून आपल्याला काय मिळाले यावर प्रकाश टाकतो; आणि हे सर्व आजच्या तरुण पिढीच्या हाती ठेवू पाहातो. त्यात काही सामान्य विषयांसंबंधी असलेल्या कवितांचे/गद्याचे लेख वगळून आणखी काही महत्त्वाच्या लेखकांविषयी लेखिकेने लिहिले असते, तर या पुस्तकाची गुणवत्ता निश्चितच वाढली असती.

सुमन बेलवलकर
F-४४, सुंदरनगरी, ३०८, सोमवार पेठ, पुणे ४१६ ०११. दूरभाष : २६११ १११३

दोघींचे भांडण, तिसरीचा लाभ

वास्तविक पाहता भारतीय समाजातील भाषाभेद हे भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे मूलाधार आहेत. या भाषाभेदांची समाजातील जातिभेदांशी तुलना करून त्यांना विकृती मानणे गैर आहे. अज्ञानमूलक आहे. ज्या भारतीय संस्कृतीचा आपण अभिमान बाळगतो ती भारतीय संस्कृती प्रादेशिक भाषाभेदांनी वैशिष्ट्यपूर्ण केलेल्या प्रादेशिक संस्कृतींनीच बनलेली आहे. प्रादेशिक भाषा व संस्कृती वजा करून 'भारतीय संस्कृती' असे काहीच उरत नाही. म्हणूनच इंग्रजी भाषेचे वाजवी महत्त्व मान्य करत प्रादेशिक भाषांचे जतन व संवर्धन करण्याची आज गरज आहे. ही जबाबदारी भारतीय नागरिक म्हणून सर्वांचीच आहे. स्थानिकांची तसेच स्थलांतरितांचीही. अर्थार्जनासाठी आपापला प्रांत आणि भाषा सोडून देशांतर्गत स्थलांतर करणार्‍यांनी स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर करायला शिकले पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. आम्ही आमची भाषा सोडली, तुम्ही तुमची सोडा, या वृत्तीमुळे इंग्रजीसारख्या तिसर्‍या भाषेचे फावते.

डॉ० प्रकाश परब, 'भाषा, समाज आणि शासन',
'महाराष्ट्र टाइम्स' (मुंबई) ११-०९-२००८

पुस्तक परीक्षणः एक पुस्तक-प्रवासाची कथा

[परीक्षित पुस्तक : 'माझा प्रवास : १८५७च्या बंडाची हकिगत' - विष्णुभट गोडसे वरसईकर. संपादक : मृणालिनी शहा. राजहंस प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे : २३९. किंमत रु. १७५/-]

गोडसे भटजींचे 'माझा प्रवास : १८५७ च्या बंडाची हकिगत' हे पुस्तक प्रथम प्रसिद्ध झाले (१ डिसेंबर १९०७) या घटनेला २००७ मध्ये शंभर वर्षे झाली. तसेच १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यालाही दीडशे वर्षे पूर्ण झाली. हे निमित्त साधून या पुस्तकाची नव्याने संपादित केलेली आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. हे पुस्तक मराठी साहित्यात आजतागायत गाजते आहे, त्याला अनेक कारणे आहेत. पेण तालुक्यातल्या वरसई गावचे विष्णुशास्त्री गोडसे उत्तर हिंदुस्थानात द्रव्य मिळवण्यासाठी जातात आणि १८५७च्या शिपायांच्या बंडात सापडतात; पुढे त्या अनुभवांवर आधारित प्रवासवृत्त लिहितात, ही घटना इतिहासाचे अभ्यासक, साहित्याचे विमर्शक, सुज्ञ वाचक या सर्वांनाच नवलाईची आणि अभ्यसनीय वाटत आलेली आहे.

भारताचार्य चिं०वि० वैद्य यांच्या आग्रहाने गोडसे भटजींनी हे लेखन केले, ते मुळात मोडी लिपीमध्ये. त्याचे बालबोध नागरीमध्ये लिप्यंतर करून पुस्तक म्हणून ते प्रसिद्ध झाले १९०७ मध्ये. पुढे न०र० फाटक यांनी १९४९मध्ये स्वत:च्या प्रस्तावनेसह त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली (चित्रशाळा प्रकाशन). त्यानंतर दत्तो वामन पोतदारांनी 'माझा प्रवास'ची चौथी आवृत्ती प्रसिद्ध केली (व्हीनस प्रकाशन, पुणे, १९६६, आवृत्ती ८वी २००७). तरीही पुन्हा संपादिका मृणालिनी शहा यांना नव्याने या पुस्तकाचे संपादन करावे असे वाटले; कारण 'शंभर वर्षे एखादे पुस्तक मराठी वाचकांना का आवडावे?' हा प्रश्न त्यांना पडला आणि त्याची उत्तरे शोधताना हे पुस्तक, त्याचे लेखक, त्यांचा गाव यांची चरित्रे लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली, मूळ संहिता पुन्हा सादर करावी असे वाटले; त्याचप्रमाणे या पुस्तकाच्या लेखनशैलीचा अभ्यास करणेही त्यांना महत्त्वाचे वाटले.
आपल्या प्रस्तावनेची विभागणी मृणालिनी शहा यांनी विविध उपप्रकरणांमध्ये केली आहे. त्यात त्यांनी सुरुवातच केली आहे ती या पुस्तकाच्या चरित्राने. मूळ मोडीतील हस्तलिखित व नंतर त्याच्या पुस्तकरूपाने सिद्ध झालेल्या आवृत्त्या यांचा कालक्रमानुसार विवेचक आढावा त्यांनी घेतला आहे. त्यात, प्रत्येक आवृत्तीचे वेगळेपण, त्याबाबतची मतमतांतरे, त्यांची परस्परतुलना यांना स्थान दिले आहे. त्यामुळे या पुस्तकाचा आजतागायत झालेला प्रवास वाचकाच्या नजरेसमोर येतो. याच भागात मोडी लिपीची द०वा० पोतदारांनी दिलेली माहितीही संपादिकेने दिली आहे.

'माझा प्रवास' हे लेखन आत्मवृत्त मानावे की प्रवासलेखन मानावे, की इतिहासकथन हा प्रश्न यापूर्वी अनेकांना पडला होता. त्यामुळे या पुस्तकावर जी परीक्षणे वेळोवेळी लिहिली गेली त्यांचा मागोवा संपादिकेने घेतला आहे. हे पुस्तक १९०७ मध्ये प्रसिद्ध झाले असले तरी त्याचे पहिले परीक्षण मे १९४४ मध्ये 'सह्याद्री'च्या अंकात आलेले आहे ही बाब संपादिकेने येथे लक्षात आणून दिलेली आहे. तसेच 'माझा प्रवास' हे प्रवासवर्णनपर लेखनच असल्याचे स्वत:चे मत वाङ्मयीन संकल्पनांच्या आधारे नि:संदिग्धपणे मांडले आहे.

या अनुषंगाने वाङ्मयेतिहासकारांनी या पुस्तकाची घेतलेली अपुरी दखल, त्याचा अभ्यासक्रमात झालेला समावेश यांची चर्चा मृणालिनी शहा करतात. 'माझा प्रवास'- मधील असाधारण जीवनानुभवामुळे थेट १८८४ पासून अगदी अलीकडच्या काळापर्यंत ('झाशीची राणी लक्ष्मीबाई' या प्रतिभा रानडे यांच्या २००२ मध्ये आलेल्या पुस्तकापर्यंत) अनेक लेखकांवर या पुस्तकाने प्रभाव गाजवला आहे. तसेच याचे हिंदी भाषांतर अमृतलाल नागर यांनी केले आहे, याचा सविस्तर परामर्श त्यांनी नेटकेपणाने घेतलेला आहे.

गोडसे भटजी यांचे गाव वरसई. संपादिकेने या गावाचे भौगोलिक स्थान व ऐतिहासिक महत्त्व सविस्तर विशद करून गावाचे चरित्रच रेखाटले आहे. त्या पाठोपाठ येते गोडसे कुटुंबाचे चरित्र : घराण्याची ही माहिती त्यांनी गोडसे कुलवृत्तांत, न०र० फाटक यांची प्रस्तावना आणि 'माझा प्रवास' यांच्या आधारे लिहिली आहे.

एकूणच 'माझा प्रवास'चा सर्वांगीण परिचय करून द्यायचा या हेतूने मृणालिनी शहा यांनी या सर्व माहितीचा धांडोळा घेतला आहे. मूळ पुस्तकातच इतिहास, ऐकीव माहिती, प्रवासवर्णन, कौटुंबिक तपशील, समाजदर्शन असे विविध पैलू एकवटलेले असल्यामुळे त्यांचा वेगवेगळा परामर्श घेणे संपादिकेने आपले कर्तव्य मानलेले आहे. या दृष्टीने पाहिले असता या उपप्रकरणांची सांधेजोड करत 'माझा प्रवास'चे एक सलग चित्र वाचकाच्या डोळ्यापुढे उभे राहते. 'सांधेजोड' म्हणण्याचे कारण असे की, वरसई गावाचे चरित्र आणि गोडसे कुटुंबीयांचे चरित्र ही दोन उपप्रकरणे वाङ्मयीन परामर्श घेणार्या भागांच्या शेवटी आली असती तरी चालली असती. पण या निमित्ताने सर्व माहिती एकत्र संकलित झाली हे या पुस्तकाचे फलित आहे.
गोडसे भटजीलिखित संहिता मोडी लिपीत असून ती १९२२ पासून भारत इतिहास संशोधन मंडळाकडे आहे. मंडळासाठी त्याचे लिप्यंतर शंकरराव जोशी यांनी केले. तेच मूळ हस्तलिखित म०म० द०वा० पोतदार यांनी जिज्ञासूंना सादर केले, त्यात कोणतीही काटछाट किंवा गाळसाळ न करता. मृणालिनी शहा यांनी ही पोतदार प्रत स्वीकारलेली नाही, तर भारत इतिहास संशोधन मंडळाकडील मूळ मोडी संहिताप्रत मिळवून नव्याने तिचे लिप्यंतर सुलभा हरके यांच्याकडून करवून घेतले आहे (पृ० ६७ - २०२). मग प्रश्न असा येतो की पोतदार प्रत आणि शहा यांनी करून घेतलेले लिप्यंतर या संहितांमध्ये काही फरक आहे का? वैद्य प्रत, फाटक प्रत आणि राजवाडे प्रत यांची परस्पर तुलना जशी शहा यांनी प्रस्तावनेमध्ये केली आहे तशी, प्रस्तुत प्रतीची तुलना राजवाडे प्रतीशी त्यांनी करणे अपेक्षित होते. त्या दोन्हींमध्ये काही तफावत आहे का, की त्या समरूप आहेत याविषयी त्यांनी मौन बाळगले आहे. मोडीची लेखनपद्धती पाहता - म्हणजे शब्द न तोडता सलग लिहीत जाणे, र्हास्वदीर्घत्व, अनुस्वार क्वचितच देणे, काही शब्दांची संक्षिप्त रूपे करणे, इ० - एकाच संहितेच्या दोन लिप्यंतरांत फरक पडू शकतो. मोडी लिपीमुळे काही शब्द इकडचे तिकडे होतात. (पृ० ६१); "काही शब्द जोडून लिहिल्यामुळे कळत नाही. उदा० पुर्तपणे पूर्णपणे असे शब्दांचे लेखन बरोबर करून घ्यावे लागते... सर्वंानी > सर्वांनी असे वाचावे लागते. वैद्य किंवा पोतदार प्रतीमध्ये सर्वांनी असेच लिहिले आहे." (पृ० ६५) असे शहा म्हणतातच. त्यामुळे नव्या लिप्यंतरात शहा यांनी कोणती दृष्टी, कोणते निकष बाळगले आहेत?

दुसरा मुद्दा इतिहासाचा. गोडसे भटजी द्रव्यार्जनासाठी निघाले ते १८५७ च्या बंडात सापडले. तिथून परत आल्यावर जवळजवळ पंचवीस वर्षांनी त्यांनी त्या आठवणी लिहून काढल्या. त्यामुळे, त्यांत काही ऐतिहासिक तथ्य आहे, काही ऐकीव माहिती आहे आणि प्रवासाच्या मनोरंजक गोष्टीही आहेत. 'जवळजवळ निम्मे पुस्तक इतिहासाने व्यापलेले’ (पृ० ७) असल्यामुळे इतिहासाचे साधन म्हणूनही त्याची चिकित्सा होते. पण संपादिकेने 'आपला इतिहास या विषयाशी प्रत्यक्ष संबंध नाही. त्यामुळे इतिहासाच्या दृष्टीने कसलाही अभ्यास या संपादनात नाही’ (पृ० ७) अशी कबुली दिली आहे. वास्तविक १८५७च्या बंडाला १५० वर्षे पुरी झाली हे जमेस धरता या पुस्तकातील ऐतिहासिक वास्तवाची शहानिशा संपादिकेने करायला हवी होती असे वाटते. कारण विविध गॅझेटियर्सही तिने वाचली असावीत असे सूची दर्शविते. संपादिकेने स्वत:ला घालून घेतलेलीही मर्यादा आपण मान्य करू; पण, इतिहासाची दृष्टी बाळगली नाही असे म्हणत असतानाच शहा यांनी वरसई गावाचे, 'माझा प्रवास' या संहितेचे, गोडसे घराण्याचे अशी चरित्रे सादर केली आहेत, तिथे इतिहासाची दृष्टीच बाळगली आहे. हे इतिहास जर इथे येतात तर, प्रत्यक्ष संहितेचा प्राण असलेला इतिहास का दुर्लक्षिला जावा?

या पुस्तकाचा अभ्यास इतिहासकाराच्या दृष्टीतून केलेला नसून भाषाशैलीच्या दृष्टीने केला आहे असे शहा आवर्जून पुन्हापुन्हा सांगतात. "गोडसे भटजींनी वापरलेल्या सहज साध्या शैलीचा अभ्यास या प्रस्तावनेमध्ये आहे." (पृ० ४); "...आणि मुख्य म्हणजे पुस्तकाच्या लेखनशैलीचा अभ्यास केला आहे." (पृ० ७); "भाषाशैलीचा अभ्यास अटळ!" (उपप्रकरण मथळा, पृ० ५८) असे त्या वारंवार म्हणतात. पण प्रत्यक्षात मात्र हे विवेचन भाषाशैली-अभ्यासाच्या दृष्टीने खूपच उणे आणि भाबडे वाटते. गोडसे भटजींच्या भाषेबद्दल बोलताना, 'साध्या वाक्यरचनेचे सौंदर्य’, 'साधीसुधी वाक्ये’, 'मोठी वाक्ये नाहीत किंवा जोड वाक्येही फारशी येत नाहीत’ (पृ० ६२) अशी अत्यंत मोघम विधाने त्या करतात. काही ठिकाणी तर त्यांच्या शैलीविषयक विचारांचा, समजुतींचा गोंधळ त्यांच्या लिहिण्यात प्रतिबिंबित होतो, उदाहरणार्थ,
"'बोली' आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ती भाषा पूर्णपणे बोलीसारखी नसते; पण बोली भाषेची कितीतरी वैशिष्ट्ये तिच्यात आलेली असतात. या लिखित बोलीमध्ये भावनांची अभिव्यक्ती पूर्णपणे होऊ शकते. त्यामुळे या शैलीला कसलेही नाव देता येत नाही, हे खरे." (पृ० ५९)
यातून काय समजायचे? मग यातून सोडवणूक करण्यासाठी संपादिका म्हणते,
"... तरी हे पुस्तक वाचताना जी एक वाचनीयता वाचकांना जाणवते, त्यालाच शैली असे म्हणता येते. नाहीतरी आपले मनोगत व्यक्त व्हावे, यासाठी जी भाषा वापरली जाते तिलाच आपण भाषाशैली म्हणत असतो." (पृ० ५९)
या संदर्भात त्यांनी वापरलेल्या संज्ञाही अचूक नाहीत. "भाषापद्धती किंवा शैली यांचा विचार करताना त्या लेखनाचा शब्दकोश महत्त्वाचा ठरतो." (पृ० ५९) या वाक्यात भाषेचा 'शब्दसाठा' असे शहा यांना म्हणायचे असावे.
वास्तविक शैलीविज्ञानाच्या अंगाने भाषाभ्यास करणार्या(ला 'माझा प्रवास' ही संहिता हा मोठा खजिना आहे. शैलीविज्ञानाशी जुजबी परिचय करून घेतला असता तरी शहा यांना या लेखनाच्या भाषेचे सौंदर्य उलगडून दाखवता आले असते; व वाचकांना त्याचा प्रत्यय देता आला असता. किमान, या गद्यलेखनातील नामपदबंध, क्रियापदे, विशेषण विस्तार, संवादाची लय ओतप्रोत भरलेले गद्य, निवेदकाचा प्रांजळपणा दर्शवणारी त्याची स्वगतवजा वाक्ये इत्यादींच्या आधारे या गद्याचा अभ्यास करायला भरपूर वाव होता. या विश्र्लेषणातून त्यांना अर्थ-व्यापारापर्यंत पोचता आले असते.

या पुस्तकातील काही कठीण शब्दांच्या अर्थाविषयी संपादिकेने काही अंदाज केले आहेत. त्यातील एका शब्दार्थाच्या बाबतीत हा अंदाज धडधडीत चुकलेला दिसतो. तो म्हणजे गोडसे भटजींच्या लेखनात येणारा 'मेखजीन' हा शब्द. या शब्दाच्या अर्थनिर्णयनाविषयी संपादिका शहा म्हणतात,

"'मेखजीन' हा शब्द पाहण्यासारखा आहे. ...काडतुसे शिपायांना धर्मबाह्य वाटत असतात. त्यामुळे शिपाई गुप्त पत्रे रवाना करतात की, 'काडतुसांबाबत प्रत्येकाने आपल्या अधिकार्यांसना सांगावे... त्या त्या छावणीत गोरे असतील ते कापून काढून दारूगोळा, मेखजीन व खजिना गुदात सु ।। आपले ताब्यात घेऊन छावणीस आग लावावी." या वाक्यातील मेखजीन हा सामासिक शब्द आहे. त्या सामासिक शब्दाचा अर्थ लागत नाही. म्हणून मग मेख मोठी खुंटी आणि जीन म्हणजे लक्षणेने घोडा असा अर्थ निघतो (ऐतिहासिक शब्दाकोश - य०न० केळकर) म्हणून मग मेखजीन म्हणजे खुंट्याला बांधलेले घोडे असा अर्थ काढता येतो आणि तो सयुक्तिक वाटतो.’ (पृ० ६१)

'मेखजीन'चा य०न० केळकरांनी लावलेला हा अर्थ संपादिकेने स्वीकारणे निखालस चुकीचे आणि अज्ञानमूलक आहे. कारण मेखजीन हा 'मॅगझीन' (magazine) या इंग्रजी शब्दाचा मराठी अपभ्रंश आहे. त्याचा अर्थ दारूगोळा ठेवण्याचे ठिकाण, दारूखाना असा आहे. १८५७च्या बंडाच्या आणि सशस्त्र प्रतिकाराच्या संदर्भात सहज येणारा हा शब्द आहे. त्यामुळे तो सामासिक शब्द समजून त्याच्या अर्थाची अशी ओढाताण करण्याची गरज नव्हती. त्यातून अर्थाचा अनर्थ झाला, ते वेगळेच. एखादी भाषा परभाषेतले शब्द घेते तेव्हा या आदत्त शब्दांचा उच्चातर, घेणार्याझ भाषेच्या उच्चासरण-प्रक्रियेनुसार होतो. इंग्रजीतून मराठीत आलेली तिकिट, मास्तर, माचीस, ठेसन अशी असंख्य उदाहरणे आपल्या परिचयाची आहेत. 'मॅगझीन'चे 'मेखजीन' हे रूप असेच आहे. गोडसे भटजींच्या वृत्तांतील संदर्भातच खरे तर हा अर्थ दडलेला आहे. केळकरांनी लावलेला अर्थ न स्वीकारता संपादिकेने संहितेचेच बारकाईने वाचन केले असते तर तिला हा अर्थ गवसला असता.
संहितेतील जी उदाहरणे आपल्या संपादकीय प्रस्तावनेत शहा देतात, त्यांच्यापुढे त्यांचे पृष्ठक्रमांक त्या देत नाहीत. त्यामुळे ते संदर्भ मुळातून शोधणे व ताडून पाहणे जिकिरीचे होते. शिवाय 'मेखजीन' या संदर्भातली संपादिकेने प्रस्तावनेत उद्धृत केलेली वाक्ये व पुढच्या संहितेतील वाक्ये यांत तफावत आहे. गोडसेभटजींची वाक्ये पुस्तकात अशी आहेत :

'...काळे लोक बेदील होऊन कडामिनीचे बार काढून तोफही सुरू करून दंगा करावयास लागले. ती छावणी लहान. गोरे लोक थोडे होते, ते सर्व त्या पलटणी लोकांनी ठार मारून दारूगोळा, मेखजीन, खजिना, तंबू वगैरे सर्व सामान आपल्या ताबीत घेऊन छावणीस आग लावून बेदिल होऊन सर्व काळे पलटणी निघोन... बाईसाहेबास हाका मारू लागले.’ (पृ० ११२)
(प्रस्तावनेतील अवतरण आणि संहितेतील मजकूर यांच्यात एकवाक्यता नसल्याची आणखीही उदाहरणे आहेत, उदा० पृ० ४९ व पृ० २०१-०२)
या भाषिक अभ्यासात आणखीही बर्या च चुका जाणवल्या. त्यातील आणखी एक उदाहरण पृ० ६० वर मृणालिनी शहा 'बिकीट’ या इंग्रजी पिकेट शब्दाच्या अपभ्रंशाबद्दल म्हणतात,

'पिकेट’ असा उच्चा’र जरी य०न० केळकरांनी लिहिला असला. तरी इंग्रजीमध्ये (Picket) (पिकिट) असा उच्चाटर आहे. ... शिवाय इंग्रजी शब्दारंभी 'प' चा उच्चा.र "ब' किंवा "फ' असा होतो, हे ही येथे आठवले.'' (पृ० ६०)
इंग्रजीत शब्दाच्या आद्यस्थानी येणार्या 'प'चा उच्चाचर "ब' असा कधीच होत नाही. आद्यस्थानी येणार्या [p], [t], [k] या व्यंजनांचा उच्चा‍र महाप्राणयुक्त (ऍस्पिरेटेड) होतो म्हणजे pin, tin, car या शब्दांमधील आद्यस्थानी असलेले व्यंजन महाप्राणयुक्त उच्चाररले जाते. पण याचा 'पिकेट’ > 'बिकट’शी काहीही संबंध नाही.
मोडी लिखिताच्या वैशिष्ट्यांविषयी वाचकांना माहिती देताना मृणालिनी शहा म्हणतात, "...सध्याचे लेखननियम पाळून हे लेखन छापले आहे... मोडी लेखनात अनुस्वार लहरीप्रमाणे देतात किंवा देत नाहीत. काही ठिकाणी उगाच टाक झाडून वाटेल तिथे टिंबे टाकतात... मी या आवृत्तीमध्ये अनुस्वार पदरचे दिले आहेत." (पृ० ६५) पूर्वीच्या लेखनात अनुस्वारांचा अतिरेक होता ही गोष्ट खरी आहे. पण संपादिकेने पूर्ण माहितीच्या अभावी केलेले 'उगाच टाक झाडून’ हे सर्वसाधारण विधान मोडी लेखकांवर अन्याय करणारे आहे. शिवाय, 'सध्याचे लेखननियम पाळून हे लेखन छापले आहे’ असे म्हटल्यावर 'अनुस्वार पदरचे दिले आहेत’ हे विधान चांगलेच खटकते.

एकंदर पुस्तकाच्या निर्मितीत मुद्रणदोषही खूप राहून गेले आहेत. 'प्रायश्चित्त' हा शब्द 'प्रायश्चित्त', 'प्रायश्चित', 'प्रायश्चित्' अशा तीन प्रकारे मुद्रित झाला आहे. 'धु्रव', 'धृ्रव'; 'फलश्रृती', 'फलश्रुती' असे दोन्ही प्रकारे छापलेले आढळते. खेरीज, 'पारंपारिक', 'पुनमुर्दण', 'डोबिंवली', 'व्युप्तन्नता', 'उप्तत्ती', 'अलंकारिकता' ही आणखी काही उदाहरणे. काही ठिकाणी संपादिकेचे वाक्यरचनेकडे दुर्लक्ष झाले आहे, उदाहरणार्थ, "...इत्यादी पुस्तके लिहिले आहे.'' (पृ० ३३); "..आपला नातू मृत्यूने मेल्याचा प्रसंग भोगावा लागतो की काय या शंकेने..." (पृ० ४१). काही शब्दांचे लेखन संहितेत एकप्रकारे तर शब्दार्थसूचीत वेगळ्याप्रकारे आहे. उदा० 'कंटाळी' (१४२), 'कंठाळी' (२१८); 'सलिदा’ (१४२), 'सलीदा’ (२२४), संपादिकेने केलेली काही विधानेही खटकतात. उदाहरणार्थ, 'रामदास हे प्रख्यात पर्यटनपटू आहेत.’ (पृ० ४६) 'या स्थळांना त्यांनी दिलेल्या भेटी या एकजीव होऊन दिलेल्या नाहीत.’ (पृ० ४६)

याच परिच्छेदात पुढे संतसाहित्याबद्दल संपादिकेने केलेले विधान धाडसाचे वाटते, ते असे : 'अशा पद्धतीने प्राचीन साहित्याच्या प्रेरणा धर्मपंथीय असल्यामुळे त्यांनी केलेली प्रवासवर्णनेही धर्मपंथीयच झाली आहेत. शिवाय हे साहित्य पद्यमय आहे आणि मुख्य म्हणजे मुद्रणकलेचा अभाव, या गोष्टींमुळे ते मर्यादित श्रोत्यांपुरते आणि अत्यंत थोडक्या वाचकांपुरते मर्यादित राहिले.’
उलट, भाविक सश्रद्धतेमुळे संतसाहित्याला महाराष्ट्रातच नव्हे; तर भारतभर पूज्य स्थान होते. पारायणे, सप्ताह इत्यादींद्वारे ते फार मोठ्या समाजात पोचले व शेकडो वर्षे टिकून राहिले हे वादातीत सत्य आहे.

भाषेच्या अंगाने लेखनाचा अभ्यास करायचा हा संपादिकेचा संकल्प या पुस्तकातून सिद्धीस गेला नसला तरी अन्य बाबतीत त्यांनी मेहनत घेतलेली जाणवते. 'माझा प्रवास'च्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रतींचा अभ्यास व मूल्यमापन, लेखकाचे चरित्र, त्याच्या प्रवासाचा नकाशा (हा नकाशा वैद्यप्रतीत आहेच!), वाङ्मयीन इतिहासात या पुस्तकाचे स्थान यांचा आढावा घेण्यात त्यांनी कुचराई केलेली नाही. भौगोलिक स्थळे, काही विशेष शब्दांचे अर्थ, संस्कृत ग्रंथ, शब्द, विधी इत्यादींची माहिती, संदर्भसूची इत्यादी परिशिष्टे अभ्यासकाला उपयुक्त ठरतील. ऐतिहासिक सामग्रीचा उपयोग या दृष्टीने करून घेण्यात मृणालिनी शहा यांना यश आले आहे. (मुद्रणदोष वगळता) 'राजहंस'ने पुस्तकनिर्मितीही देखणी केली आहे. आपले उद्दिष्ट या पुस्तकाने एका मर्यादेपर्यंत साध्य केले आहे.
(कंसातील आकडे परीक्षित पुस्तकातील पृष्ठांक आहेत.)

सुप्रिया ६१/१४ एरंडवणे, प्रभात रोड, १४ वी गल्ली
इन्कमटॅक्स ऑफिसजवळ, पुणे ४११ ००४. दूरभाष क्र. ०२० – २५४६ ८६९३

पुस्तक परीक्षणः आधुनिक समीक्षा सिद्धान्त

[परीक्षित पुस्तक : 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त' - मिलिंद मालशे, अशोक जोशी. मौज प्रकाशन, मुंबई. २००७. पृष्ठे ३५२. किंमत रु० २७५/-]

अर्वाचीन मराठी साहित्य समीक्षेमध्ये पाश्चात्य तत्त्वमीमांसा, वादसंकल्पना आणि अनेक संज्ञांचा सढळपणे वापर होत आला आहे. मात्र सन्माननीय अपवाद वगळता, हा वापर नेमकेपणाने, मुळाबरहुकूम, काटेकोरपणे न होता सैलपणे आणि खूपसा बेजबाबदारपणे होत आला आहे आणि त्याला मूलार्थाची प्रतिष्ठाही लाभत आली आहे. असे विपरीत आणि चुकीचे अर्थ प्रस्थापित होऊ नयेत असे वाटत असेल तर अशा लेखनाचे मुळातूनच ज्यांनी व्यवस्थित वाचन केले आहे आणि ज्यांना ते कळले आहे, अशा अभ्यासकांनी मराठीतून त्या त्या विषयावरचे लेखन करायला हवे. इंग्रजी भाषा आणि साहित्यासह पाश्चात्य तत्त्वविचारांचा सखोल अभ्यास आणि ज्ञान असणार्‍या मिलिंद मालशे आणि अशोक जोशी यांनी लिहिलेल्या आणि मुंबई विद्यापीठ व मौज प्रकाशन यांनी संयुक्तरीत्या प्रकाशित केलेल्या 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त', या ग्रंथाचे मोल आणि महत्त्व म्हणूनच लक्षणीय स्वरूपाचे आहे.

प्लेटो/अरिस्टॉटलपासून ते रूसोपर्यंतच्या (१९ व्या शतकापर्यंत) पाश्चात्य साहित्यविचारावर अभिजातवाद आणि स्वच्छंदतावाद यांचा प्रभाव होता. त्या अनुषंगाने साहित्याचा हेतू, आस्वाद आणि निर्मिति-प्रक्रिया, 'अनुकृती सिद्धान्त', 'पुनर्निर्मिती सिद्धान्त' , 'कल्पनाशक्ती', 'काव्यभाषा' अशा सिद्धान्तांचा, संकल्पनांचा समीक्षेत सढळपणे विचार होत होता. पुढे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत या समीक्षेवर 'आधुनिकता'वादाचा प्रभाव राहिला. रूपवाद, प्रतीकवाद, आविष्कारवाद, प्रतिमावाद, वास्तववाद, अतिवास्तववाद, अस्तित्ववाद, फ्रॉईड आणि मार्क्सचे विचार आणि त्यातून निर्माण झालेले मनोविश्लेषण आणि बिंब-प्रतिबिंबवाद, प्रयोगशीलता, कलेची स्वायत्तता, मौलिकता, 'कलेकरिता कला' व्यक्तिवाद, इ० सिद्धान्त, संकल्पना, आणि परिभाषा या प्रभावातून निर्माण झाली. मात्र सर्वसाधारणपणे १९६० नंतर 'उत्तर-आधुनिकता' आणि 'उत्तर-संरचना'वादांचा प्रभाव निर्माण झाला आणि या प्रभावाखाली आजवरच्या अनेक संकल्पनांना आणि गृहीतकांना जबरदस्त धक्के देण्यात आले. या काळातील तत्त्वविचारांच्या केंद्रस्थानी भाषावैज्ञानिक संकल्पनांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले; साहित्य ही स्वायत्त बाब नसून संस्कृतीचा एक आविष्कार आहे, या भूमिकेचा पुरस्कार होऊ लागला आणि साहित्यसमीक्षेचे स्वरूप आंतरविद्याशाखीय बनले. चिन्हात्मकता, विकेंद्रितता, सांस्कृतिक भौतिकवाद, लिंगभेद विचार, अर्थनिर्णयन, संभाषिते, संहितात्मकता, पाया विरोध, विचारतत्त्व विरोध (अँटी-लोगो), सारभूतता-विरोध (अँटी-इसेन्शिऍलिझम), महाकथन-विरोध (अँटी-ग्रॅंडनॅरेटीव्हज्), भेद, बहुतत्त्ववाद, स्त्रीवाद, वाचकवाद नवइतिहासवाद इ० नव्या संकल्पना, संज्ञा आणि त्यांच्या परिभाषा अस्तित्वात आल्या. हे सर्व मराठी समीक्षेला नवे, अपरिचित असल्याने गोंधळात टाकणारे होते आणि अजूनही आहे. मात्र या सार्यामचा वापर आता होऊही लागला आहे. हा वापर नेमकेपणाने होणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी 'आधुनिक समीक्षा सिद्धान्त' हा ग्रंथ मार्गदर्शक ठरणारा आहे.

एकूण दहा प्रकरणांतून आस्वाद-समीक्षा-सिद्धान्त, आधुनिकता-उत्तर- आधुनिकता, रूपवाद आणि स्वायत्तता, संरचनावाद आणि चिन्हात्मकता, उत्तर - संरचनावाद आणि विकेंद्रिता, मार्क्सवाद आणि सामाजिकता, मनोविश्लेषण वाद आणि अबोधता, स्त्रीवाद आणि लिंगभेद, वाचकवाद आणि अर्थनिर्णयन, नव-इतिहासवाद, उत्तर-वसाहतवाद आणि संस्कृतिसमीक्षा इ०ची सविस्तर मांडणी, चिकित्सा आणि विवेचन करण्यात आले आहे. विषय-मांडणीचे स्वरूप निव्वळ संकलनात्मक नसून अन्वयार्थक स्वरूपाचे आहे. ग्रंथाच्या शेवटी मराठी/इंग्रजी गं्रथांची/लेखांची संदर्भसूची आणि विषयसूची देण्यात आली आहे. विवेचनात आलेल्या वादांची, संकल्पनांची, तत्त्वांची, संज्ञांची आणि परिभाषांची ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि तात्त्विक पार्श्वभूमी देण्यात आली आहे. जिथे जिथे मूळ भूमिकेशी मतभेद वा शंका वाटतात, तिथे तिथे तशी नोंद स्पष्टपणे करण्यात आली आहे. एकूण सर्वच विवेचन लेखकद्वयाच्या सखोल अभ्यासाचे, नेमक्या आकलनाचे आणि शास्त्रशुद्ध मांडणीचे दर्शन घडविणारे आहे. समकालीन मराठी समीक्षा त्याच त्याच भूमिकांच्या आणि वादांच्या आवर्तात सापडलेली दिसते. त्यामुळे अनेक समीक्षक अनेक विषयांवर लिहीत असले तरी त्यातून फारसे काही नवीन, मूलभूत स्वरूपाचे आणि म्हणून पुनर्विचार करायला लावणारे हाती लागत नाही; मतमतांचा उथळ खळखळाटच ऐकायला मिळतो. प्रस्तुत ग्रंथामधे आधुनिकोत्तर काळातील ज्या विविध भूमिकांचा ऊहापोह करण्यात आला आहे, त्यांतील वेगवेगळ्या संकल्पनांचे उपयोजन मराठी समीक्षेमधून केले तर या कोंडीतून बाहेर पडून अर्थांच्या नवनवीन खुणा अधारेखित करता येतील; साहित्य संस्कृतीकडे बघण्याची नवी दृष्टी प्राप्त होईल. प्रस्तुत ग्रंथातील विषय बहुसंख्य अभ्यासकांना तसे अपरिचित, गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र स्वरूपाचे असले तरी त्यांचे विवेचन आकलनसुलभ व्हावे अशा पद्धतीने करण्यात आले आहे, हा या ग्रंथाचा खास विशेष होय.

आधुनिक समीक्षा सिद्धांतांमधे रूपवाद आणि मार्क्सवाद यांची कामगिरी महत्त्वाची मानली जाते. साहित्याचा विचार केवळ तथ्यलक्षी आणि वर्णनात्मक करून त्याच्या हेतूवर लक्ष केंद्रित करणार्याआ पारंपरिक विचारातून समीक्षेला बाहेर काढून तिच्या केंद्रस्थानी सौंदर्यविचार आणण्याचे कार्य रूपवादी भूमिकेने केले. त्यासाठी तिने 'कलेची स्वायत्तता' आणि 'वस्तुनिष्ठता', कलेचे रूप आणि अनन्यसाधारणत्व या तत्त्वांचा पुरस्कार केला. रूपवादावरील प्रकरणात यामागची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तात्त्विकविचार, साहित्यविचार, सैद्धांतिक भूमिका आणि उपयोजित समीक्षाविचार यांचा सविस्तर ऊहापोह केला आहे, पुढच्या टप्प्यावर रूपवादी भूमिकेचे खंडन 'संरचनावादा'ने केले आणि समीक्षाविचारात नव्या भूमिकांची भर घातली. रूपवादाच्या विरुद्ध टोकावर उभ्या असलेल्या मार्क्सवादाने कलेतील सामाजिकतेचा पुरस्कार केला. प्रस्तुत ग्रंथात मार्क्सवादी साहित्यविचारांची पारंपरिक मांडणी कशी आहे, याची चिकित्सा आली आहेच; पण पुढे या भूमिकेला 'उत्तर-आधुनिकतावादाने' दिलेल्या आव्हानानंतर मार्क्सवादाची पुनर्मांडणी नवमार्क्सवाद्यांनी कशी केली आहे तेही दाखवून देण्यात आले आहे. फ्रॅंकफर्ट प्रणाली, गोल्डमान, फ्रेड्रिक जेमसन, टेरी ईगल्टन, अल्थ्यूजर, नाटककार ब्रेश्ट, ग्राम्ची, इ० विचारवंतांनी मार्क्सवादाचा गाभा कायम ठेवून केलेल्या नव्या-मांडणीची आणि अन्वयार्थांची या ग्रंथातील चिकित्सा - लक्षणीय स्वरूपाची आहे. या विवेचनाच्या शेवटी मराठीतील मार्क्सवादी समीक्षेचा आढावा घेण्यात आला आहे, तो पाहता मराठी मार्क्सवादी समीक्षा मार्क्सवादाच्या पारंपरिक टप्प्यावरच थांबलेली दिसून येते. मार्क्सवाद आता संपला असून मार्क्सवादी समीक्षा आता अनावश्यक आहे, अशी इथल्या प्रतिष्ठित विचारवंतांची आणि समीक्षकांची भूमिका दिसते. मात्र, मार्क्सवादी समीक्षा अजूनही नव्या संदर्भात प्रस्तुत आहे हे पाश्चात्य नवमार्क्सवाद्यांनी दाखवलेल्या चिकित्सेच्या आधारे म्हणता येते. दुर्दैवाने असे प्रयत्ना मराठी समीक्षेत होताना दिसत नाहीत. रूपवादावरील प्रकरणाच्या शेवटीही मराठीतील रूपवादी समीक्षकांचा आणि त्यांच्या लेखनाचा उल्लेख आला आहे; पण तो त्रोटक स्वरूपाचा आहे, तो आणखी सविस्तर यायला हवा होता, म्हणजे मग मराठीतील नवसाहित्याच्या टप्प्यावर आणि नंतरही टेंभा मिरवलेली तथाकथित रूपवादी समीक्षा कशी उथळ आणि फुटकळ स्वरूपाची आहे हे लक्षात आले असते.

संरचनावादाने भाषेला एकूणच तात्त्विक मीमांसांच्या केंद्रस्थानी आणले आणि भाषेचे सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. फेर्दिनां द सोस्यूरचे भाषाविषयक विवेचन या दृष्टीने पथदर्शक ठरले. भाषाविज्ञानाला अनन्य-साधारण महत्त्व प्राप्त झाले. चिन्हमीमांसा महत्त्वाची ठरू लागली. लेवी स्ट्रॉसने मानववंशशास्त्र आणि सामाजिक सांस्कृतिक संकेत पद्धतींचा अभ्यास करताना, रोलां बार्थने संस्कृतीमधील चिन्हात्मकता तपासताना, लाकाने मनोविश्लेषणात, विशेषत: नेणीवेची रचना तपासताना, फुकोने इतिहास आणि पुरातत्त्वांचा शोध घेताना संरचनावादाचा आधार घेतला. पुढे उत्तर-संरचनावादाच्या टप्प्यावर संरचनावादातील काही तत्त्वे नाकारण्यात आली (उदा० संकेतव्यवस्थेचे सार्वकालिक/सार्वदेशिक स्वरूप, चिन्हीकरणातील अर्थाची स्थिरता, द्विपदी भूमिका, संरचनांतील साम्ये इ०) आणि त्यातून झॅक देरीदाचा 'विरचनावाद' पुढे आला. विरचनावादाने अर्थनिर्णयनातील अनिश्चितता आणि अस्थैर्य दाखवून दिले, ज्ञानकेंद्रित्व, ध्वनिकेंद्रित्व, द्विपदी आकलन नाकारले. उत्तर-संरचनावादी अभ्यासक आणि ल्योतार्द, फुको इ० अन्य विचारवंतांच्या वैचारिक मांडणीतून उत्तर-आधुनिकतावादाची भूमिका साकार झाली. पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये प्लेटोपासून चालत आलेल्या बुद्धीच्या (रीझन) केंद्रवर्ती परंपरेला रूसो, हायडेगर फ्रॉईड आणि मोठ्या प्रमाणात नित्शेने आव्हान दिले होतेच. त्याचा प्रभाव व संस्कार घेऊन उत्तर-आधुनिकतावादाच्या रूपाने हे 'अँटी-रीझन' आव्हान व्यापक प्रमाणात प्रकट झाले. प्रस्तुत ग्रंथातील यासंबंधीचे विवेचन अत्यंत महत्त्वाचे आणि गाभ्याचे आहे. उत्तर-आधुनिकतावादाच्या पर्यावरणातून उत्तर-वसाहतवाद, स्त्रीवाद, नवइतिहासवाद, वाचकवाद आणि संस्कृतिवाद अशा नव्या संकल्पना पुढे आल्या; त्यांचेही सविस्तर विवेचन प्रस्तुत ग्रंथात नेमकेपणाने करण्यात आले आहे. उत्तर-आधुनिकतावादाने युरोपच्या इतिहासातील 'नवजीवनाच्या' (रनेसां) कालखंडापासून ते मार्क्सवादापर्यंतच्या मानवकल्याणाच्या 'प्रगती', 'बुद्धिवाद', 'आशावाद', 'वैज्ञानिक सत्य', 'मानवतावाद', 'विज्ञानाची वस्तुनिष्ठता व तटस्थता', 'महाकथने', 'इतिहासाची सलगता', 'सौंदर्यशास्त्र', 'नैतिकता' अशा अनेक संकल्पना नाकारल्या, आणि काळाच्या ओघातले त्यांचे वैयर्थ्य दाखवण्याचा प्रयत्नव केला, यासंबंधीचे विवेचनही या ग्रंथात आले आहे. उत्तर-आधुनिकतावादाने 'आधुनिकता'वाद नाकारला, त्याचे खंडन हाबरमासने केले आहे आणि 'आधुनिकता' हा महाप्रकल्प अद्यापही अपुरा असून तो अजूनही नव्या काळात महत्त्वाचा आहे असे म्हटले आहे. जेमसने उत्तर-आधुनिकतावाद हा तिसर्या टप्प्यावरील भांडवलशाहीचा सांस्कृतिक आवरणातून प्रकट होणारा आविष्कार असून 'बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या' सोयीचे तत्त्वज्ञान आहे असे म्हटले आहे. हे दोन्ही संदर्भ या ग्रंथात आले आहेत, मात्र टेरी ईगल्टनने जेमसनच्या प्रसिद्ध लेखाला प्रतिसाद म्हणून १९८५ साली 'न्यू लेफ्ट रिव्ह्यू'मधून प्रकाशित केलेल्या 'कॅपिटॅलिझम, मॉडर्नर्निझम अँड पोस्टमॉडर्नर्निझम' या लेखाचा संदर्भ या ग्रंथात आलेला नाही, तो आवश्यक वाटतो; कारण त्यामधून ईगल्टनने जेमसनपेक्षाही वेगळ्या परिप्रेक्ष्यात आणि ठामपणे विरोध नोंदवला आहे. उत्तर-आधुनिकतावादाची स्थापत्यशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि चित्रपट इ० महत्त्वाच्या क्षेत्रांसंबंधी जी वेगळी भूमिका आहे, आणि तिचे त्या त्या क्षेत्रातले जे आधार आणि संदर्भ आहेत, त्यांचे विवेचन या ग्रंथात नाही. तसेच, 'विचारसरणीचा अंत' (दि एण्ड ऑफ आयडियॉलॉजि), 'मानवाचा अंत' (दि एण्ड ऑफ मॅन), 'इतिहासाचा अंत' (दि एण्ड ऑफ हिस्ट्री), 'वास्तवाचा अंत' (दि एण्ड ऑफ द रियल) अशा ज्या कांही नव्या संकल्पना उत्तर-आधुनिकतावादाने पुढे आणल्या आहेत, त्यांचेही विवेचन या ग्रंथात आलेले नाही. मुख्य म्हणजे, उत्तर-आधुनिकतावादाच्या सर्जनशील निर्मितीसंबंधी (कॉन्सेप्ट ऑफ क्रिएशनसंबंधी) प्रस्थापित विचारापेक्षा संपूर्णपणे वेगळा असा विचार आहे, तो या ग्रंथात आलेला नाही. डलझ (Deleuze) आणि गोत्री (Guattari) यांनी 'अ थाउजंड प्लॅट्व्ज'मधून ह्या विचारांचे विवेचन केले आहे. प्लेटोपासून चालत आलेल्या ज्ञानवृक्षाला त्यांनी वृक्षसमान नमुना (आर्बरेसंट मॉडेल) असे म्हटले असून हा वृक्ष, त्याच्या फांद्या आणि मुळांसह आपल्या डोक्यातून आपण प्रथम काढून टाकायला हवा, म्हणजे निर्मितीची नवी संकल्पना रुजवता येईल असे त्यांना ठामपणे वाटते. 'झाडा'च्या ऐवजी हा पर्याय ते रिझोमे (रिझोमे : गवतासारखी कुठलीही वनस्पती)च्या रूपात विशद करतात. झाडाचे वेगवेगळे भाग दाखवता येतात, रिझोमे- सारख्या वनस्पतीची आतली मुळे आणि वरचा विस्तार सुटा सुटा न वाढता एकमेकांत मिसळून क्षितिज समांतर रूपात विस्तीर्णपणे पसरत असतात. त्यांचे सहअस्तित्व गुण्यागोविंदाचे असते. निर्मिती ही अशाच प्रकारे होत असते, असे त्यांना सांगायचे आहे. 'आंतर-संहिता संबंध' किंवा 'लेखकाचा अंत'सारख्या संकल्पनांचा उत्तर-आधुनिकतावादामधे जो विचार आहे, तो या निर्मिति-प्रक्रियेच्या संकल्पनेशी निगडित आहे. निर्मितीप्रमाणेच 'वाचनाचे राजकारण' असते असे ही वादसंकल्पना मानते, त्याचाही विचार प्रस्तुत ग्रंथात करण्यात आलेला नाही. त्या त्या काळामधे साहित्य कशाला म्हणायचे? साहित्यातील श्रेष्ठ-कनिष्ठ कसे ठरवायचे? यासंबंधीचे जे मापदंड (कॅनन्स) कार्यरत असतात, ते निर्माण कोण करते? त्यामागे कशा प्रकारचे 'राजकारण' असते? कुणाच्या सोयीसाठी ते निर्माण करण्यात येते? त्यासाठी कशी 'व्यूहरचना' वैचारिक/सांस्कृतिक क्षेत्रामधे निर्माण केली जाते? अशा काही महत्त्वाच्या प्रश्र्नांकडे ही नवी समीक्षा आपले लक्ष वेधते. या अनुषंगाने 'मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट' ही संकल्पना कशी पद्धतशीरपणे राबवली जाते हे लक्षात घ्यावे लागते. प्रस्तुत ग्रंथात या संबंधीचे विवेचन आलेले नाही; ते आवश्यक होते असे वाटते.

पारंपरिक विचारसरणीमध्ये साहित्य आणि समीक्षा ही मूलत:च भिन्न क्षेत्रे मानण्यात आली आहेत. या अतिनव समीक्षासिद्धांतांमध्ये त्यांच्यामधे भेद न मानता त्यांना समान दर्जाचे मानले आहे आणि त्यामुळे दोन्हीसाठीही 'संहिता' हा शब्दप्रयोग केला आहे. प्रस्तुत ग्रंथाच्या कर्त्यांना ही भूमिका मान्य नाही, मात्र ती 'समजून घेण्याचा' प्रयत्नय त्यांनी केला आहे.

या ग्रंथाच्या सुरवातीला 'आस्वाद, समीक्षा आणि सिद्धान्त' हे प्रकरण देण्यात आले आहे. सर्वसाधारणत: कला-आस्वादामधे 'भावना’ आणि 'विचार' यांना प्रतिद्वंद्वी मानून आस्वादाचा संबंध भावनेशी जोडण्यात येतो. आस्वाद प्रक्रिया अंत:स्फूर्त असते असेही मानण्यात येते. या ग्रंथामधे आस्वादप्रक्रियेतही विचार, संकल्पना, निकष आणि सिद्धांत कसे कार्यरत असतात हे सविस्तरपणे दाखवून दिले आहे. मूल्यमापन हे 'यादृच्छिक' असू नये आणि त्यासाठी निश्चित निकषांची गरज अपरिहार्य आहे असे मानण्याकडे लेखकद्वयाचा कल आहे आणि उत्तर-आधुनिकतावादी समीक्षा-सिद्धान्त मात्र 'यादृच्छिकता' मानणारे आहेत. त्यामुळे ग्रंथाच्या सुरवातीच्या प्रकरणाप्रमाणेच, या नव्या सिद्धांतांची चिकित्सा केल्यानंतर, ग्रंथाच्या शेवटी एका स्वतंत्र प्रकरणातून, एकूणच या समीक्षा-सिद्धांतांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांसंबंधी लेखकद्वयांची भूमिका स्पष्टपणे आणि सविस्तरपणे यायला हवी होती, असे वाटते.

५८/५९, पार्श्वनाथनगर, सांगली-मिरज रस्ता, मु०पो० वानलेसवाडी, मिरज ४१६ ४१४.
दूरभाष : ०२३३ – २२१ २७२० / ९४२२० ४१३१२

'छंदोरचने'च्या भाषांतराची निकड

डॉ० माधवराव पटवर्धन यांचा 'छंदोरचना' हा ग्रंथ १९३७ साली प्रकाशित झाला. छंद हे पद्याचे आवश्यक अंग आहे. या छंदाचे नियमन करणार्याथ छंद:शास्त्राचा प्राचीन आणि संपन्न वारसा आपल्याला लाभलेला असला तरी 'पद्य म्हणजे लयबद्ध अक्षररचना' हा सिद्धांत डॉ० पटवर्धन यांनी मांडला आणि समग्र पद्यरचनेला लावून दाखविला. त्यामुळे छंद:शास्त्राच्या पारंपरिक अभ्यासाला एक नवी दिशा आणि एक नवे परिमाण मिळाले. छंद:शास्त्राच्या विकासाला ही बाब उपकारक ठरली. त्यांनी अभ्यासिलेल्या त्रिविध प्रकारच्या छंदोरचनांपैकी अक्षरछंद वगळता उर्वरित (१) अक्षरगणवृत्ते व (२) मात्रावृत्ते व जाति या मुळात संस्कृतातील छंदोरचना असल्यामुळे त्यांचा प्रसार भारतवर्षात झालेला आहे. भारतभरातील प्रादेशिक भाषांमध्ये या वृत्तांचा- जातिरचनांचा आढळ होत असल्याचे दिसून येते. तेव्हा डॉ० पटवर्धनांचा लयविषयक सिद्धांत या भाषांतील पद्यरचनांना देखील लागू आहेच. जसे मूळ संस्कृत 'शादूर्लविक्रीडित' वृत्त मराठीत जसेच्या तसे आल्याने त्यातील गण-याति-मात्रा मराठी भाषेतही संस्कृतप्रमाणेच लागू असल्याचे आपल्या नित्य परिचयाचे आहेच. तेव्हा अशा मूलभूत स्वरूपाचे लयतत्त्व पद्यरचनांना लावून दाखविणारा 'छंदोरचने'सारखा ग्रंथ प्रकाशित होऊनही त्यातील विचारांची पाहिजे तशी दखल इतर भाषांतील छंद:शास्त्रकारांनी घेतलेली दिसत नाही. असे समजण्याचे एक कारण म्हणजे कोलकाता येथील आशुतोष महाविद्यालयातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ० अमूल्यधन मुखर्जी यांनी लिहिलेला 'संस्कृतमधील छन्दांचा एका नवीन दृष्टिकोणातून अभ्यास’ या शीर्षकाचा लेख. प्रस्तुत लेखाचा अनुवाद डॉ० पु०द० नवाथे यांनी केला असून तो 'प्राचीन भारतीय विद्येचे पुनर्दर्शन’ या नावाने प्रकाशित केलेल्या वेदशास्त्रोत्तेजक सभा शताब्दी स्मारक ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे.

आपल्या या लेखात त्यांनी मांडलेले छंदोविषयक विचार, डॉ० पटवर्धन यांच्या एतद्विषयक विचारांशी मिळतेजुळते आहेत हे त्यांच्या पुढील विवेचनावरून लक्षात येईल. डॉ० अमूल्यधन मुखर्जींच्या प्रतिपादनातील मुद्दे असे आहेत :-
(१) भारतीय वाङ्मयाच्या इतिहासात अगदी प्राचीन काळापासून छन्द अथवा वृत्त
या विषयाला पंडितांच्या अभ्यासात महत्त्वाचे स्थान असले तरी खेदाची बाब अशी की संस्कृत काव्यातून योजिलेल्या छन्दांचे शास्त्रीय अथवा पद्धतशीर रीतीने विवेचन करण्याच्या दिशेने फारच थोडी प्रगती झाली.
(२) छंदाच्या नमुन्यांचे असंख्य प्रकारसंकलित करणारे ग्रंथ तयार झाले असले
तरी छंद:शास्त्रकारांनी छंदाच्या लयविषयक अंगाविषयी काहीच विचार केला नाही.
(३) एखाद्या पद्यातील अक्षरांची संख्या तसेच त्यातील लघुगुरूंचा विशिष्ट क्रम,
यासारख्या केवळ बाह्य अथवा वरवरच्या बाबींकडेच त्यांनी लक्ष पुरविले.
(४) परिणामी छंदाच्या लयतत्त्वमूलक वैशिष्ट्यांवर आधारलेले योग्य असे वर्गीकरण होऊ शकले नाही.
(५) अत्यंत भिन्न अशा लयतत्त्वविषयक वैशिष्ट्यांनी युक्त अशी वृत्ते एका गटात
घुसडली गेली आणि याच्या उलट एकाच गटात मोडणार्या वृत्तप्रकारांमध्ये असणारे साम्य क्वचितच ओळखले गेले.
(६) तेव्हा ऐतिहासिक दृष्टीचा मागमूसही नव्हता, तसेच विकसनाची प्रक्रिया अथवा
तत्संबद्ध इतर घटक यांची जाणीवही अभावानेच होती.
(७) वृत्ताच्या बांधणीच्या मागे यति आणि लयबद्धता यांचा काही परस्परसंबंध आहे,
या गोष्टीचा छडा लावण्याच्या दृष्टीने जुने शास्त्रकार अयशस्वी ठरले.
(८) परिणामी पद्यरचनेत उघड उघड दिसणार्या लयबद्धतेच्या वैशिष्ट्यांचे आकलन
त्यांना झाले नाही.

आता डॉ० माधवराव पटवर्धन यांनी आपल्या 'छंदोरचनेत' (पृ० ५६३) व्यक्त केलेले एतद्विषयक विचार बघू.
छंद:शास्त्राचा गेल्या १५०० हून अधिक वर्षांचा इतिहास पाहिला की एक प्रकारचे असमाधानच वाटते. पद्य म्हणजे लयबद्ध अक्षरचना होय. या मूलभूत सिद्धांताच्या जवळजवळ छंद:शास्त्रकार पुन्हा रुळलेल्या मार्गाने जातात. येऊन छंद:शास्त्राची पुनर्घटना करण्याचा कोणी प्रयत्नज करीत नाही. कोणी थोडी वृत्ते देतो, कोणी पुष्कळ वृत्ते देतो. लक्षण सांगण्याची कोणी त्रिकावलंबी (=त्र्यक्षरी गण-पद्धती) पद्धत घेतो तर कोणी विशिष्ट परिभाषा निर्माण करून त्या भाषेने सांगतो, यापलीकडे त्यांच्या कृतीत भेद नाही. कोणी दुसर्यांृनी रचिलेली उदाहरणे देतात. कोणी ती स्वत: रचून घालतात. पण वाङ्मयाचे मंथन करून छंद:प्रकार कसे परिणत होत आले याचे विवेचन कोणी करीत नाही. आधार देण्याची बुद्धी तर कोणालाच होत नाही. ज्या सामग्रीवरून एखादा सिद्धांत ठरवायचा वा दुसर्या.चा सिद्धांत पारखायचा तीच पुढे नसल्याने त्या सिद्धांताची चर्चा होऊ शकत नाही.''
या दोन्ही छंद:शास्त्रकारांच्या वरील विवेचनावरून त्यांच्यात (१) प्राचीन छंद:शास्त्रकारांनी छंदाचे शास्त्रीय वा पद्धतशीर विवेचन न करता केवळ बाह्य व वरवरच्या बाबींकडेच लक्ष पुरविले व (२) लयबद्धता हेच छंदाचे मूलतत्त्व आहे आणि या लयतत्त्वमूलक वैशिष्ट्यावर पद्याचे वर्गीकरण व्हावयास हवे - या दोन मुख्य मुद्यांबाबत असलेली एकवाक्यता लक्षात येते. मात्र महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डॉ० पटवर्धनांनी आपल्या 'छंदोरचने'त छंद:शास्त्रात आजवर चालत आलेल्या कुंठितावस्थेवर जसे नेमके बोट ठेवले तसेच त्याची भरभक्केम अशा सैद्धांतिक बैठकीवर उभारणी करून त्याच्या प्रगतीच्या चाकाला दिशा आणि गतीही दिली. या त्यांच्या १९३७ साली केलेल्या कार्याची नोंद मात्र १९७८ साली प्रकाशित झालेल्या डॉ० मुखर्जी यांच्या प्रस्तुतच्या लेखातून घेतली गेलेली दिसत नाही. वास्तविक पूर्वसूरींचे ऋण मान्य करणार्या० व छंदोविषयक विवेचनात मोलाची भर घालणार्याद छंद:शास्त्रकारांना त्यांनी त्यांचे श्रेय दिलेले आहे असे या त्यांच्या लेखातून जाणवते. तेव्हा डॉ० माधवराव पटवर्धनांचा या संदर्भात उल्लेख नसल्याचे कारण सकृतदर्शनी तरी असे असावे की भाषांतराअभावी मराठी भाषेतील हा मोलाचा छंद:शास्त्रीय ग्रंथ बंगाली भाषकांना अपरिचित राहिला असावा. अन्यथा आपला समानधर्मा भेटल्याची खूण त्यांना पटली असती आणि छंद:शास्त्रीय अभ्यासाला मिळालेली गती बघून वाटलेला आनंदही त्यांनी आपल्या या लेखातून व्यक्त केला असता.

पूर्वी शास्त्रकारांची भाषा संस्कृत होती आणि तत्कालीन विद्वानांना, पंडितांना ती अवगत असल्याने त्यातील ज्ञानाचा प्रसार अखिल भारतीय पातळीवर होणे शक्य होत असे. आज प्रादेशिक भाषेत तयार झालेले हे मोलाचे विचारधन भाषिक अडथळ्यामुळे कदाचित योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचत नसावे. तेव्हा अशा मौलिक ग्रंथांच्या भाषांतराची निकड या निमित्ताने जाणवते हे खरे!

डॉ० मुखर्जी यांनी छंदोविषयक काही मुद्द्यांबाबत डॉ० पटवर्धन यांच्यापेक्षा वेगळा विचारही मांडला आहे. त्यावरही साधक-बाधक चर्चा होणे आवश्यक आहे. या मतभिन्नता नोंदविणार्याा मुद्द्यांबाबत मात्र स्वतंत्रच लेख लिहावा लागणार आहे.
[डॉ० अमूल्यधन मुखर्जी यांचे हे छंदोविषयक विचारधन बंगाली भाषेतून मराठीत आणल्याबद्दल डॉ० पु०द० नवाथे यांचे आभार.]

११/इ-२१, सरकारी वसाहत, हाजी अली, मुंबई ४०० ०३४.
दूरभाष : ९८७०३११५३४

स्वयंपाकघरातील हरवलेले शब्द

स्वयंपाकघराच्या रचना, तेथील वस्तू, त्यांचा वापर - सारेच बदलत आहे. आठवलं एका अगदी छोट्या टोपलीवरून. माझ्याहून सहासात वर्षांनी मोठी असलेली माझी आतेबहीण माझ्याकडे ती टोपली पाहून उद्गारली, 'अगो बाई मीना, तुझ्याकडे किती छान कुरकुला आहे.'' किती वर्षांनी कानावर पडला तो शब्द, मग आठवली दुरडी - तांदूळ धुण्यासाठी. परडी सुद्धा, पण ती फुले वेचून देवघरात ठेवण्यासाठी! सर्वात मोठा तो हारा. पण ते नित्याचे नव्हेत. हाराभर, फुले, हाराभर आंबे असे कार्यप्रस्था-लाच लागत. अशावेळी मंडईतील हारेवाली भाजी घेऊन आपल्या सोबत घरी येई.

नंतर आठवतात झाकण्या - गोठाच्या. वेळण्या बिनगोठाच्या. भांड्यांवर चपखल बसणार्याय. भातातलं पाणी वेळून टाकणं त्यामुळे सोपं जात असे. छोट्या मंडळींना पाणी पिण्यासाठी गडू, चंबू, बुडकुली किंवा झारी. मोठ्यांना फुलपात्र आणि गडवा, लोटी किंवा तांब्या. पूजेसाठी पंचपात्र. पातळ पदार्थ एकदाच भरपूर वाढता यावा- खेळत बसायला लागू नये म्हणून 'ओगराळं'. प्रवासात फिरकीचे तांबे; पेढेघाटी डबे, चटणी, मिठासाठी दगड्या. तुपासाठी तांबुली किंवा सतेलं. भात-वरणाच्या तपेल्या, आमटी भाजीच्या बोगण्या. निरुंद तोंडाचा गुंड आणि उभा गंज. निखार्‍यावर साखरपाकाच्या वड्या बनवण्यासाठी 'लंगडी', चुलीला जोडलेला 'वैल'. लोणच्याच्या बरणीला बांधायचा 'दादरा'. मोठ्या वाट्या - म्हणजे वाडगे. तर छोटे घमेले म्हणजे तसराळे. भाकरीचे पीठ मळायला काथवट. वरचे झाकण टोपीदार असणारं मोदकपात्र. छोटी ती मडकी. त्याहून मोठं गाडगं. मडक्याहून लहान बोळकं. त्याहूनही लहान 'खुलं.' गाडग्यात पीठ साठवणे किंवा तांदळाच्या वड्याचे पीठ भिजवणे. तर मडक्यात दहीभात ठेवून त्यावर पाणी ओतून ठेवला व सकाळी पाणी काढून टाकून खाल्ला तर भाताचा उंडा/उंडी - उन्हाळ्यात थंडावा देणारी! भाज्यांमध्ये डाळ-दाणे म्हणजे व्यंजन. विरघळणारे म्हणजे 'हसणारे' अनारसे. 'चंदेरी' घाटाच्या वाट्या. धान्य मोजायच्या अधोल्या, पायल्या, पासरी. आणि सर्वात छोटा हाताचा 'पसा'. हंडा ठेवायची घडवंची, तर घागरी खाली चुंबळ. तुम्हांला आठवतात अजून काही?

३९/३५, विजय अपार्टमेंट्स, कर्वे रस्ता, पुणे ४११ ००४. दूरभाष : २५४२ ४४८०

हद्दपार शब्द

भाषेमध्ये शब्द नाण्यासारखे असतात. ते बोलीभाषेत, व्यवहारात, वाङ्मय-व्यवहारात सतत 'चालते' हवेत. नाण्याला फक्त अर्थ असतो. परंतु शब्द अर्थपूर्ण असतो. तो जीवनाशी साक्षात जोडलेला असतो. तो ज्यावेळी जीवनापासून तुटतो तेव्हा तो भाषेतून हद्दपार होण्याची प्रक्रिया नकळत सुरू होते. पूर्वी ग्रामीण जीवनात विवाहातून नाती निर्माण होत, ती जवळपासच्या गावातूनच. त्यामुळे नवीन येणारी सून या ग्रामव्यवहाराशी निगडित असे. शब्द तिला ठाऊक असत. आता शहरातील मुलगी सून म्हणून गावात गेली की ती या शब्दांविषयी अनभिज्ञ असते. एक घरचाच अनुभव सांगते. माझ्या भावाची नातसून आली. घरातीलच शेती. त्यामुळे वाडीत जाणे, काम करवून घेणे सारे ओघाने आलेच. नुकतीच गुहागरला गेले तेव्हा ती आणि मी वाडीत गेलो. तिथे वाडी बेणणार्‍या बायकांना तिने सांगितले, 'वाडीतील सारं गदळ एकत्र करून जाळून टाका' मी सहज विचारले- "यात काय काय आहे माहीत आहे तुला?'' "त्यात काय असणार? ते सारं गदळ.'' मी त्या ढिगाशी उभी राहिले आणि तिला सांगू लागले - ही झावळी, याची उभी दोन कांडी केली की दोन 'तळकटं' होतात. तळकट स्वतंत्र विणून परत ती एकत्र बांधली की 'झाप' होतो. ही माडाची पोय, नारळ लागतात त्याच्या मागील जो भाग असतो त्याला लगटून आहेत या 'पिचोंदर्‍या'. पातळ जाळीदार अशा.

झावळीच्या पुढचा बुडखा कापला की तो होतो 'खाका'. झावळीच्या पात्या स्वतंत्र करून बांधायचा तो 'बिंडा'. पाती तासून काढली की मधे लवलवीत लांब तीन साडेतीन फूट पातळ पिवळसर भाग हाती राहातो तो 'हीर'. हिराची केरसुणी बांधायची. या केरसुणीची ही कितीतरी रूपे. केरसुणी सुंभाने 'पिंढर्‍या वर' (लाकडाचे पिढे) ठोकून काथ्याने-सुंभाने बांधायची. प्रथम ती असते 'लक्ष्मी'. ती देवघरात फिरते. मग होते 'वाढवण.' तिचा वावर माजघर, कोठी, स्वयंपाकघर असा. 'वाढवण' वापरून जरा कमी होते, ती 'केरसुणी.' ती ओटी, पडवी, अंगणात फिरू लागते. ती आणखी बुटकी होते, की होतो 'खराटा' तो थेट गोठ्यात पोहचतो शेण लोटायला. बाथरूम धुवायला, सारवायला. आता 'लक्ष्मी', 'वाढवण', 'केरसुणी', 'खराटा' ही एकाच वस्तूची बदलती रूपे.

'रामा गडी' नारळाच्या झाडावर 'पायंडा' अडकवून चढतो. तो सुंभाचा असतो. पण 'पायंडी' म्हणजे समुद्राकडे जाणारी छोटी वाट. नारळ पाडणारा 'पाडेकरी'. तो नारळाच्या 'पेंडीं' उतरवतो. 'पेंडसाने' निसतो (सोलतो) नारळ 'श्रीफल' फक्त देवघरात. नारळ देवापुढे 'वाढवतात' आणि स्वयंपाकासाठी 'फोडतात'. फोडलेल्या नारळाच्या दोन वाट्या. त्याला 'बक्काल'ही म्हणतात. नारळाची वाटी खरवडली की 'करवंटी' होते. ती घासून गुळगुळीत केली की रांगोळी ठेवायला 'भेली' होते. करवंटी फुटली की 'नरोटी' होते. 'वाटी', 'बक्कयल', 'करंवटी', 'भेली', 'नरोटी' - एकाच वस्तूची ही रूपे. गाईला गोर्‍हा होतो, पाडस होते. म्हशीला रेडा किंवा रेडी होते. पण नवजात रेड्याला श्रीवर्धन भागात 'खोगा' म्हणतात.

वाडीत सुपार्‍या गोळा करायला 'रोवळा' असतो; पण स्वयंपाकघरात तांदूळ धुवायला तिचे रूप संकोचते, बेताचे होते आणि ती 'रोवळी' होते. वाडीत नारळ भरून आणायला 'हारा' असतो. निसलेले नारळ घरात येतात ते 'पाटी'तून. हीच पाटी जरा साजिरं आणि बाळरूप घेऊन स्वयंपाकघरात अवतरते. ती होते 'दुरडी'. पोहे कांडायची 'साळ' धुवायला ती लागतेच.

आता गावात गोठे नाहीत. तिथेही पिशवीतून दूध येते. पोहे दुकानात मिळतात. त्यामुळे 'उखळ', 'कांडप', 'मुसळ', 'सारणी', 'दोमुखं' (दोन ठिकाणी मुख असलेले मातीचे मडके. त्यात पोह्याची साळ भाजली जायची) साळ भाजायचे 'घाटणे' हे सारे शब्द राहाणे मुश्कीलच नाही का?

'निवणी' आणि 'अडणी' हे दोन शब्द. शंखाखाली देवघरात 'अडणी' असते ती कदाचित माहीत असेल. कोकणात बालपणी आमच्याकडे दूधदुभत्यासाठी विविध आकाराची मातीची मडकी होती. ती जमिनीवर स्थिर रहाण्यासाठी त्याच्याखाली आई 'निवणी' ठेवायची. 'निवणी' म्हणजे काश्यापासून केलेली गोल आकाराची वस्तू. मडक्याच्या आकारानुसार ही निवणी असायची. ताकाच्या डेर्‍यायखाली लहान मुलाच्या मनगटाएवढी जाड गोल निवणी असायची. आता ताकमेढी (घुसळखांब) गेला, निवणी गेली, दुधाणीही गेली; कारण त्यांची गरजच संपली.

आज स्वयंपाकघरातील असे कितीतरी शब्द नवीन मंडळींना ठाऊक नाहीत. ते कदाचित कोशात रहातील. त्यांची जरा या ठिकाणी नोंद करते. पूर्वी भात चुलीवर शिजायचा. तांब्याचं एक मोठं सतेलं सतत चुलीवर असायचं. ते बाहेरून मशेरीने पूर्ण काळं व्हायचं. त्याला म्हणायचं 'मेशरं' किंवा 'मशेरकं'. स्वयंपाकाला पाणी सारखं त्यातून घ्यायचं. भात करायला आकारानुसार तांब्याची तपेली, सतेली असायची. शेरभर भात मावेल ते 'शेरकं', तसंच 'दशेरकं' असायचं. तांदूळ मोजायला लाकडांचे 'निठवं' असायचं. भाताला तांदूळ काढायचे त्याला 'ओयरा' म्हणायचे आणि शिजत लावताना तो तपेल्यात 'वैरायचा'. फोडणी करायच्या मोठ्या लोखंडी पळीला म्हणायचे 'थावर'. भरपूर ताक ठेवायला असायचा 'गुंड'. तो कथलाचा असायचा. ताक वाढायला 'कथली' तर तूप वाढायला 'तांबली.' चूल पेटायची 'शेणी' किंवा 'गोवरी'ने. तिला 'थापट्या' पण म्हणत. ओगराळे, तसराळे, टोप, वेळणी (ताटली) रोवळी (बुरडाचीच असायची) वरणभात (एकात वरण एकात भात असं जोड भांडं. वर दांडा असे) बोगणी, भगुलं अशी नाना भांडी आठवताहेत.

कोकणात शंभर वर्षापूर्वीचं माझं घर आहे. ही सारी भांडी मी एका पेटार्‍याअत जपून ठेवली आहेत. माझ्या नातीला गंमत म्हणून दाखवते. आता संसार स्टीलचे आणि प्लॅस्टिकने चकाचक सजले. पितळ्याचे भांडे आता घरात दिसणेच कठीण. काही भांड्यांनी स्टीलचे आकार स्वीकारले. त्यामुळे पिंप, हंडा, परात, कळशी हे शब्द रहातील. पण 'बोगणी,' 'वरणभात,' 'कथली', 'गुंड' हे शब्द आता स्वयंपाकघरातून हद्दपार झाले. अजून दोन पिढ्यांत ते भाषेतून हद्दपार होतील आणि कदाचित कोशात रहातील. हे अटळ आहे. तरीसुद्धा जड वस्तूशीही माणसाचे मन जोडलेले असते. म्हणून त्यांची ही नोंद.

या सार्‍या शब्दांशी आमच्या पिढीचं भावपूर्ण नातं होतं. आता या शब्दांचं प्रेम नवीन पिढीला कसे राहणार? बदलते जीवन नवीन शब्द घेऊन येणे अपरिहार्य आणि अटळच आहे. या शब्दांनी आता राहायचे कोशात आणि कधी हाकारले तर साहित्यात!

लीला दीक्षित
'धृवा', ४९/२, सहजानंद, कोथरूड, पुणे ४११ ०३८ भ्रमणभाष : ९४२२५ २६०४१

भाषेतील म्हणींचे संचित

भाषेतील विविध अवस्थांतरांचे दर्शन प्रामुख्याने भाषेतील म्हणी, वाक्प्रचार आदी भाषिक रूपांतून घडते. एखाद्या समाजाचे जीवन, त्या समाजातील प्रचलित समजुती, त्या समाजाची संस्कृती या सार्‍यांचे संदर्भ भाषेतील म्हणी, वाक्प्रचारांसारख्या भाषेच्या अवशेषांतून मिळतात. वास्तविक भाषेतील म्हणी, वाक्प्रचारांतून मिळणारे ज्ञान हे अनुमानाचे ज्ञान असते. पहिल्या पिढीच्या अनुभवाला आलेले प्रत्यक्ष ज्ञान दुसर्‍या पिढीकडे जाताना अनुमानाच्या पातळीवर येते आणि म्हणूनच भाषेतील म्हणी म्हणजे भाषेचे संचित अथवा भाषेतील लेणी असे मानले जाते. अर्थात वर्तमानकालीन समाजात भाषेतील या म्हणींकडे जरी फारसे लक्ष दिले जात नसले तरी समाजाच्या एकूण इतिहासात असलेले म्हणींचे महत्त्व नाकारता येत नाही. आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे 'अनुभवाचे बोल ते न ठरती फोल' ही गोष्ट आजच्या समाजाला तितकीशी पटणारी नाही. प्रत्येक पिढीतच नव्हे; तर एकाच पिढीत सुद्धा समस्येचे स्वरूप बदलत गेलेले दिसते. त्यामुळे आजोबाचे शहाणपणाचे बोल नातवाच्या समस्या सोडविण्यास तर अपुरे ठरतातच; पण बर्या.चवेळा पुढच्याला ठेच लागून पाठच्याने शहाणे होण्यासारखीही परिस्थिती असतेच असे नाही. म्हणी म्हणजे अनुभवाचे सार सांगणार्या चटकदार, अर्थगर्भ अशा उक्ती होत. आपल्या बोलण्यात प्रसंगानुरूप चटकदार अशा तयार उक्तींचा वापर करणे ही एकेकाळी बोलीची लकब तर होतीच; पण त्याचबरोबर ते भाषेचे भारदस्तपणही मानले जाई. चटकदार अशा छोट्याशा उक्तीमधून एखादे जीवनविषयक तत्त्वज्ञान, जीवनदृष्टी अथवा जीवनाचे सार सांगून त्यातून बोलणारा समोरच्या माणसासमोर नकळतपणे अनुभवाचे दालन उघडे करीत असे. कारणे कोणतीही आणि कितीही असली तरी एकेकाळी भाषेचे चैतन्य असलेल्या म्हणी आज मात्र भाषिक अवशेषरूपात राहिल्या आहेत. बदलती सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे भाषेत व्यक्त झालेले हे अनुमानाचे ज्ञान नष्ट होईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.

समाजाच्या संस्कृतीतील प्राकृतिकतेचे दर्शन तसे पाहता म्हणींतूनच घडते. समाज ही संकल्पनाच मुळी भाषेशी जोडली गेली आहे. कारण एक भाषा बोलतो तो एक समाज असे स्थूलपणे मानले जाते. अर्थात एक मातृभाषा असलेला वा एक प्रादेशिक भाषा बोलणारा समाज तसा एकसंध असला तरी एकसुरी नसतो. कोंकणी समाजाचा विचार करताना वरील विधानाची यथार्थता पटते. 'कोंकणी समाज' ही संकल्पना स्थूलपणे कोंकणात राहणारा आणि संज्ञापनासाठी कोंकणी भाषेचा वापर करणारा समाज याच्यासाठी वापरली जाते. संज्ञापनासाठी कोंकणीचा उपयोग करणारा सर्व जातीजमातींचा, संपूर्ण कोंकणप्रदेशात विखुरलेला छोटा-मोठा प्रादेशिक समाजगट म्हणजे कोंकणी समाजगट होय. कोंकणी बोलणारा समाजगट मग तो प्रांतीयदृष्ट्या महाराष्ट्रीय (मालवणी) असो, गोमंतकीय असो वा मंगळुरी असो; शिवाय तो प्रत्यक्ष व्यवसाय वा शिक्षणाच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही वावरणारा असो त्याचे सहजोद्गार, त्याची मानसिकता, त्याची एकूण व्यक्तिगत अभिव्यक्ती ही पारंपरिक म्हणजे कोंकणीच असते. प्रमाणभाषा, व्यावसायिक भाषा म्हणून जरी व्यावहारिकदृष्ट्या त्याला कोणतीही भाषा स्वीकारावी लागली तरी त्याची आत्म्याची भाषा ही पारंपरिक आणि सांस्कृतिक वारसाच घेऊन येताना दिसते. म्हणूनच समाजाच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी भाषेतील म्हणी उपयुक्त ठरतात. कोंकणी समाजाच्या अंतरंगाचे दर्शन घडविणार्याह कोंकणी म्हणींमधून कोंकणातील चालीरिती, नातेसंबंध, सण-उत्सव, प्रादेशिक संदर्भ अशा एक ना अनेक विस्तारित जीवनानुभवांचे दर्शन घडते. म्हणी म्हणजे भाषेतील गोठवलेले ज्ञान होय. अशा या गोठवलेल्या भाषिक रूपातून कोंकणी माणसाची प्राकृतिक जडण-घडण, कोंकणातील निसर्ग, पशु-पक्षी या सार्यांाचे प्राकृतिकतेशी नाते जोडणारे या म्हणींमधील संज्ञापन जितके नैसर्गिक आहे तितकेच ते रांगडेही आहे. श्लील-अश्लीलतेच्या पलीकडे जाणारे हे अनुभव- प्रकटीकरण असल्याने त्यांमध्ये कोंकणी समाजमनाचे अत्यंत उघडे-वाघडे दर्शन घडते आणि त्याचबरोबर बदलत्या परिस्थितीनुसार बदलत जाणारे रंगही दिसतात. मौखिक परंपरेने जपून ठेवलेल्या आणि आता केवळ लोकपरंपरेचे संकलन करावे म्हणून संकलित करून ठेवलेल्या म्हणींमध्ये स्थलकालानुसार झालेले बदल हा भाषिक परिवर्तनाचा एक प्रकार म्हणता येईल.

कोंकणप्रदेशात मौखिक परंपरेने सांभाळून ठेवलेल्या काही म्हणी मालवणी, कोंकणी (गोमंतकी) आणि काही प्रमाणात मराठी या तीनही भाषांमध्ये सारख्याच आढळतात. काही म्हणींमध्ये प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार शब्दभेद झालेला दिसतो, तर काही म्हणी पूर्णतया परिवर्तित रूपांत पुढे येताना दिसतात. एकूणच लघुता, व्यावहारिकता आणि लोकमान्यता हे तीन गुण घेऊन आलेले कोंकणीमधील हे भाषिक धन म्हणजे कोंकणी म्हणी होत. म्हणींचे रूप आटोपशीर असावे लागते आणि हे आटोपशीर रूप लवचीक असल्यामुळेच स्थलकालपरिस्थितीनुरूप अनुभव जिवंतपणे व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात असते. पूर्वजांच्या संचित ज्ञानाचा कोश असलेल्या कोंकणी भाषेतील म्हणींमधून कोंकणी माणसाच्या मार्मिकपणाचे रोखठोक स्पष्टपणाचे तसेच त्याच्यातील रांगडेपणाचेही दर्शन घडते.
मालवण किंवा सिंधुदुर्ग प्रदेश हा भौगोलिक दृष्ट्या गोमंतकाला जवळ जाणारा असला तरी राजकीय दृष्ट्या गेली कित्येक दशके तो महाराष्ट्राशी जोडलेला आहे त्यामुळेच मराठी आणि गोमंतकी कोंकणीतील अनेक सामाजिक तसेच सांस्कृतिक संदर्भ मालवणी बोलीत सहज सापडतात. बोलताना म्हणींचा सहज वापर करणे ही मालवणी बोलीची खास लकब होय. मालवणीत वापरल्या जाणार्याआ या म्हणींचा तौलनिक अभ्यास केल्यास त्यांत गोमंतकी कोंकणी, तसेच मराठीतील अनेक संदर्भ सापडतात. काही ठिकाणी केवळ भाषिक परिवर्तन दिसत असले तरी काही ठिकाणी प्रदेशानुसार झालेले अर्थपरिवर्तनही दिसते. उदा० मालवणी कोंकणीत 'आग खांव काय वाघ खांव' ही म्हण आलेला प्रचंड राग व्यक्त करते, तर मराठीत हाच अर्थ 'दही खाऊं की मही खाऊं' या म्हणीतून व्यक्त होतो आहे. 'आगासला ता मागासला पाठसून इल्ला गुरवार जाला' या म्हणीतून नंतर आलेल्याने अगोदर आलेल्यापेक्षा प्रगती करणे असा अर्थ व्यक्त होत असून 'कानामागून आली आणि तिखट झाली' ही मराठीतील म्हण जवळजवळ याच अर्थाची छटा घेऊन येते. काही जाणकारांनी कानामागून हा पानामागून या शब्दाचा झालेला शब्दविपर्यास असून मिर्ची पानानंतर येते आणि पानापेक्षा तिखटपणा दाखवते असा अर्थ असल्याचीही शक्यता व्यक्त केली आहे 'आवशीची भयण मावशी, जीवाक जीवशी, बापाशीची भयण आका, डोळ्यांमुखार नाका', या मालवणी कोंकणीतील म्हणीप्रमाणेच 'आका दोळ्यामुखार नाका, मावशी ती मावशी खावपांक भरपूर दिवशी' अशी म्हण गोमंतकीय असून 'आना भयनी आका तूं म्हाका नाका, अम्मा भयिनी मावशी म्हाका पावशी' अशी म्हण मंगळुरी कोंकणीत वापरली जाते. मराठीतील 'माय मरो; पण मावशी उरो' या म्हणीतील थोडासा संदर्भ घेऊन येणार्या या सर्व म्हणींमधून आईच्या बेंबीशी संबंध असलेल्या मावशी या नात्यातील जैविक संबंध व्यक्त झालेला दिसतो. 'आये आतकारीण, बाये पातकारीण, गिरजा धाकटेकारीण तुया तसला तर मियां असला' या मालवणी कोंकणीतील म्हणींच्या अर्थाला समांतर जाणारी गोमंतकी कोंकणीतील म्हण म्हणून 'म्हगेले धस्स, तुगेले फस्स' या म्हणीकडे पाहता येते. मालवणी कोंकणीत 'आमचो बाबगो काय करी, आसलाला नाय करी' अशी म्हण नालायक माणसाने काम न करता कामाचे बारा वाजवणे या अर्थाने वापरली जाते. याच अर्थासाठी गोमंतकी कोंकणीत 'कुड्डी उदकांक गेली आनी बुडकुलो फोडून घरां आयली' अशी वापरली जाते. 'गावात म्हाळ आणि कुत्र्याक बोवाळ' या मालवणी म्हणीचा अर्थ व्यक्त करणारी गोमंतकी कोंकणीमधील म्हण म्हणजे 'कोणाच्या व्हराडां कोण मुरड' ही होय. कधी कधी केवळ भाषांतरातूनही म्हणीचे वेगळेपण राखलेले दिसते. उदा० 'चेडक्या बांयत पडला आणि बोंद्राचो चिखल गेलो,' या मालवणी

कोंकणीतील म्हणीचे गोमंतकी कोंकणीत 'सोबले बायंत पडले आनी कापड नितळ जाले' असे भाषांतरित रूप दिसते. 'बाळो माजो बाळो कोलत्यांनी खेळुं, घर जळल्यार जळूं पुण बाळो माजो खेळूं' या मालवणी कोंकणीतील म्हणीचे रूप गोमंतकी कोंकणीत 'निळू म्हजों निळू खलतें खेळूं, निळू म्हजो खेळूं' या म्हणीत कोलती म्हणजेच जळते लाकूड या मालवणी म्हणीतील शब्दाचा विपर्यास होऊन खलते असा झाला असला तरी कोंकणीत आज प्रचलित असलेला अर्थ खलते म्हणने खलबत्त्यातील खल हा होय. खल ही अत्यंत जड लोखंडी वस्तू असून ती मुलाला खेळण्यासाठी देणे हा लाडाचा एक खास प्रकारच आहे. मराठीत हाच अर्थ घेऊन येणारी म्हण म्हणजे 'लाडे लाडे केले वेडे' ही होय. 'घोवाच्या भयान घेतला रान, थंय भेटेलो मुसलमान, तेणां कापला नाक कान' या मालवणी कोंकणीतील म्हणीप्रमाणेच गोमंतकी कोकणीत 'मडक्यातल्यान कायलेन पडलो, कायलेतल्यान उज्यान पडलो, जळून गोबर जालो' असा अनुभव येतो. मराठीतील 'आगीतून सुटला फोफाट्यात पडला' या अनुभवाशी जवळ जाणारा असा हा अनुभव आहे. 'रिकामको सुतार बायलेचे कुले ताशी' या मालवणी म्हणीत पायलेचे या शब्दाचे परिवर्तित रूप दिसते. पायली हे धान्य मोजण्याचे लाकडी माप ज्याचा तळ फार जाड असतो, त्यामुळे ही म्हण प्रचलित झाली असावी; परंतु कालांतराने पायलेचे या शब्दाचे विकृत असे रूप प्रचलित झाले असावे. गोमंतकी कोंकणीत हीच म्हण 'बेकार मेस्त गांड तासता' अशी वापरली जाते; तर मराठीत 'रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी' अशा रूपात ती येताना दिसते. 'वेताळाक नाय होती बायल आणि भावका देवीक नाय होतो घोव' या मालवणी म्हणीचा अर्थ व्यक्त करणारी गोमंतकी कोंकणीतील म्हण म्हणजे 'आरेल्या न्हवर्याकक भुरेली व्हंकल' ही होय. 'नगार्या ची घाय थंय तुणतुण्याचा काय?' या मालवणी म्हणीतील अनुभव 'हागर्याकफुडे वागरे खंचे?' या गोमंतकी कोंकणीतील म्हणीत सापडतो. 'उधार तेल खंवटा' या मालवणी कोंकणीतील म्हणीचा अर्थ 'सवाय खाण पॉंट फुगयता' या म्हणीतून व्यक्त होतो.

एकूणच कोंकणीतील म्हणींचा खजिना अमर्याद असाच आहे. 'माराक आयला काय दिवाड म्हारवाडातच जाता', 'राजाचा न्हेसाण ता मडवळाचा पायपोसाण', 'माझा माका थोडा व्यायान धाडला घोडा', 'उपाजली कुळीया, दिली म्हादळीया दो हाती टाळिया वाजविली', 'जायाचा गो मोती, मुराडशीत किती, लाथ मारतीत आणि धेवन जातीत', 'म्हस घेवच्या आदि दाव्याचो गजाली कित्याक?', 'अधिक ऊ तेका खाज नाय, अधिक ऋण तेका लाज नाय’, अशा किती तरी म्हणींचा अभ्यास समाजजीवनाच्या अभ्यासास उपयुक्त ठरू शकतो. 'तोंणान मोग पोटांत फोग’ (=मूँह में राम बगलमें छूरी), 'उदकान आसा मासो मोल करता पिसो’ (=बाजारात तुरी, भट भटणीला मारी), 'वानात तकली घालतकीर मुसळाचो कसलो भय', 'जळोव आसा म्हण मरणांक उबो रांव?' अशा किती तरी म्हणी या थोड्या प्रमाणात मनोवैज्ञानिक अभ्यासाला दिशा देऊ शकतील. थोड्या प्रमाणात का होईना, पण आजही कोंकणातील जनसमुदाय या अशा भाषिक संचिताचा वापर करताना दिसतो आणि म्हणूनच जागतिकीकरणाच्या रेट्यात अडकलेल्या या भाषिक खजिन्याचे रक्षण करण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे.

पी०ई०एस०एस०आर०एस०नाईक महाविद्यालय
फर्मागुडी - फोंडा (गोवा.)
दूरभाष : ०८३२-२३१२६३५/२३३५१७१

Pages