भाषा आणि जीवन

मराठीतील आघातांचे उच्चार व लेखन

(उच्चारदर्शनासाठी नागरी लिपीची अपर्याप्तता)

आपल्या मराठीसाठी वापरण्यात येत असलेली लिपी ही नागरी किंवा देवनागरी ह्या नावाने ओळखली जाते. हिंदी, मराठी आणि नेपाळी ह्या तीन भारतीय भाषांनी पूर्वी संस्कृतच्या लेखनासाठी वापरली जाणारी लिपी जशीच्या तशी उचलली. मराठी भाषेसाठी ती आपण अंदाजे एक हजार वर्षांपासून वापरीत आहोत. तिचा स्वीकार करताना ती आपल्या भाषेच्या उच्चारांसाठी पुरी पडते की नाही हे पाहिले गेले नाही.

त्या वेळी व तसे पाहिल्यास मुद्रण सुरू होईपर्यंत केल्या गेलेल्या लेखनाचा उपयोग मोठ्याने वाचण्यासाठी होत असे. तेसुद्धा स्वत: लिहिलेले स्वत:च मोठ्याने वाचून दाखविण्यासाठी जास्त. वाचन हे बहुधा प्रकट होत असे. (आपली काही आडनावेसुद्धा त्याची साक्ष देतात : पाठक, पुराणिक, व्यास वगैरे). साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते. पोस्ट ऑफिस नव्हते आणि ग्रंथांची सुरुवात 'श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिलेंजी येथ' अशी होत होती.

लोक बोलून व ऐकून भाषा शिकत होते. वाचिक आणि लिखित असे दोन्ही संकेत स्वतंत्रपणे, म्हणजेच परस्परनिरपेक्षपणेदेखील अर्थबोध करून देण्यास समर्थ आहेत हे तेव्हा माहीत झालेले नव्हते. दृष्टिगम्य संकेतांचे स्वत:च श्राव्य संकेतांमध्ये रूपांतर करून (म्हणजे शब्दांचा मोठ्याने उच्चार करून) मग त्या श्राव्य संकेतांपासून म्हणजे ध्वनीपासून लोक अर्थग्रहण करीत होते. अर्थ समजून घेण्यासाठी ते स्वत:ला व इतरांना ऐकवीत होते. लहान मुले वाचावयाला शिकतात तेव्हा त्यांना मोठ्याने वाचावे लागते. मनातल्या मनात वाचून चालत नाही. म्हणजे अर्थग्रहण करता येत नाही. पूर्वीचे वाचक जुन्या पोथ्यांवरून स्वत: नकलून घेऊन मोठ्याने वाचत असत त्यामुळे स्वत: मोठ्याने वाचताना त्यांच्या लेखनात झालेल्या चुका त्यांना त्रास देत नसत. उच्चारसातत्य कायम राखता येत असे. लेखनातल्या र्‍ह्स्वदीर्घांचे महत्त्व नसे. श्रोत्यांच्या कानांना नीट वाटेल (डोळ्यांना नव्हे) असे त्यांना उच्चारता येत असे. आपली हेमाडपंती मोडी अशाच हेतूने आजच्या शॉर्टहॅण्डसारखी वापरली जात होती. ती लिहिणार्‍याच्या मनातले बहुतेक सारे संदर्भ ती वाचणार्‍याला बहुधा माहीत असत.

आज मुद्रणविद्येच्या प्रसारामुळे कोणीएकाने लिहिलेले लाखो लोक वाचतात. नवीन नवीन विषयच नव्हे तर भाषासुद्धा पुस्तकावरून शिकतात. त्यामुळे पूर्वी शब्दांचे जे उच्चार ऐकून माहीत होत होते ते आता नवसाक्षरांसाठी किंवा नवीन विषयांत पुस्तकांच्या माध्यमांतून प्रवेश करणार्‍यांसाठी (त्यांच्या वाचनात अपरिचित शब्द येतात त्यामुळे) अक्षरांच्या साह्याने दाखविण्याची सोय करावी लागणार आहे; पण ही सोय, अर्थात केवळ उच्चार समजावून देण्यापुरती असावी, नित्य लेखनासाठी नको. त्याची कारणे पुढे येतील.

आजपर्यंत लिपिशुद्धीचे विचार, चारदोन अपवाद वगळता, आपल्या लिपीला मुद्रणसुकर बनविण्यासाठी आणि तिच्यातील 'जोडाक्षरांची' संख्या कमी करून तिला यंत्रारूढ करण्यासाठीच झालेले आहेत. आपले यथार्थ उच्चार दाखविण्यासाठी तिच्यात पुरेशा सुधारणा झाल्या नाहीत. केंद्र सरकारने पुरस्कारिलेल्या परिवर्धित देवनागरीमध्येसुद्धा याविषयी पुरेसा विचार झालेला नाही. नि:संदिग्ध अर्थ समजण्यासाठी लेखनात आणि उच्चारात सातत्य पाहिजे आणि तेवढयासाठीच लिप्यंतर नको.

संस्कृत आणि मराठी ह्या दोन अगदी वेगळ्या भाषा आहेत. त्यांमध्ये जननीजन्यभाव नाही असे माझे मत आहे. त्यांची प्रत्येकीची उच्चारप्रकृती वेगळी आहे. त्यामुळे मराठीचे काही उच्चार संस्कृतमध्ये नाहीत आणि संस्कृतचे मराठीत नाहीत. संस्कृतमधल्या स्वरांपैकी 'ऋ''लृ' आणि अर्थात 'ॠ' 'लृ' मराठीत नाहीत. व्यंजनांपैकी 'ञ' नाही. 'मी त्याला यूं यूं बनविले', ह्यामध्ये किंवा यंव्-त्यंव् ह्यामधले उच्चार ञ् किंवा ञो सारखे होतात पण त्याखेरीज ञ चा उच्चार मराठीत अन्यत्र कोठेही आढळला नाही. व्यंजनासारख्या संस्कृत शब्दांमधला ञ् आपल्याकडे न् सारखा उच्चारला जातो. मूर्धन्य ष चा उच्चार मराठीत नाही. ष हा वर्णच नाही म्हणून क्ष नाही. आपल्या ज्या शब्दांमध्ये क्ष हा वर्ण येतो तो शब्द आपण संस्कृतमधून घेतला आहे असे निश्चित समजावे.

संस्कृत नसलेले रिक्षा, बक्षी, नक्षी असे काही शब्द आम्ही वापरतो पण त्यांचे उच्चार रिक्शा, बक्शी असेच आहेत. आम्ही त्यांमधला क्ष हा वर्ण केवळ लेखनसौकर्यासाठी घेतला आहे. मराठीमध्ये ञ नाही म्हणून ज्ञ (ज्ञ) हा वर्णदेखील नाही. ज्ञ चा उच्चार आपण कोठे द्र्य सारखा तर कोठे निव्वळ ग्य सारखा करतो. इतकेच काय तर वँ‌् हा उच्चारसुद्धा मूळ मराठीत कोठेही नाही. तसाच तो उत्तर भारतीय भाषांमध्येही नाही. सिंह, मांस, दंश, वंश, संस्कृत, हंस, संरक्षण, संशय ह्या सर्व शब्दांचा उच्चार करण्यास आम्हांला फार जास्त प्रयत्न करावा लागतो. तो उच्चार करावयाचा मराठी लोक संकोच करतात किंवा मांस, नपुंसक अशांसारख्या शब्दांमध्ये ते तो करीतच नाहीत. अन्यभाषी सिंहला सिंग किंवा सिन्हा, संवादाला सम्वाद असे करीत असतात. आपणही नरसिंहाला हाक मारताना नरसिंग असेच करीत असतो. संयममध्ये सञ्यम सारखा उच्चार होतो पण हा शब्द किंवा 'किंवा' सारखी अव्यये हे सारे शब्द तत्सम म्हणजे संस्कृत आहेत. आपल्या भाषेत तत्सम शब्दांचा भरणा फार मोठा आहे. हे तत्सम शब्द संस्कृत, हिंदी, कानडी, तेलुगू, अरबी, फारसी, गुजराती आणि इंग्लिश ह्या भाषांमधून आलेले ज्ञात आहेत. ह्यांपैकी आपल्या उच्चारप्रकृतीचा परिणाम होऊन जे मुळापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रतिपादनाच्या सोईसाठी तद्भव किंवा देश्य असे मानले आहे.

ह्या निबंधात मराठी किंवा मराठी भाषा हे शब्द जेथे जेथे पूर्वी वापरले आहेत किंवा पुढे वापरले जातील तेथे तेथे ते तत्समशब्दविरहित मराठीचे द्योतक आहेत असे मानावे आणि मराठी म्हणजे तद्भव किंवा देश्य शब्दांनीच बनलेली भाषा असे ह्या निबंधापुरते समजावे.

ह्यानंतर संस्कृत म्हणजे तत्सम शब्दांची उच्चारप्रकृती आणि मराठी म्हणजे तद्भव वा देश्यशब्दांमधून आढळणारी उच्चारप्रकृती ह्यांतील फरक अधिक विस्ताराने पाहू. यासाठी 'जोडाक्षरे' व अनुस्वार, तसेच रेफ (रफार) आणि विसर्गादी चिन्हे ह्यांचा विचार करावा लागेल.

संस्कृतमध्ये सर्व संयुक्ताक्षरांचे उच्चार आघातयुक्त होतात. त्याला अपवादच नाही. म्हणजे येथे छन्द:शास्त्रातील संज्ञा वापरावयाची तर अशा सर्व संयुक्ताक्षरांपूर्वी येणार्‍या वर्णांचा उच्चार दोन मात्रांनी युक्त होऊन त्यांच्या ठिकाणी गुरुत्व येते. मराठीमध्ये मात्र ज्यांचा आघातयुक्त उच्चार होत नाही अशी जोडाक्षरे पुष्कळ आहेत. य ह्या वर्णाने युक्त, ह या वर्णाने युक्त आणि अनुनासिके. जे अनुस्वाराच्या योगाने दाखविले जाते त्याने युक्त असलेली बव्हंश जोडाक्षरे बहुधा निराघात जोडाक्षरे आहेत.

'य' ने किंवा खरे सांगावयाचे तर 'या' ने युक्त जोडाक्षरे फार जास्त आहेत. उद्या, मातक्यात्, म्यान, दरम्यान यांसारखे काही सुटे शब्द ह्या निराघात 'या' वर्णाने युक्त आहेत. पण मुख्य म्हणजे संबोधने : तात्या, बन्या, बग्या, बाळ्या, मन्या, पिल्या, बाब्या, मोळीविक्या, लाकूडतोड्या, हुजर्‍या, पाणक्या, पुतण्या अशा सर्व संबोधनांमध्ये व नामांमध्ये हा निराघात या येत असतो.

दुसरा फार मोठा वर्ग अनेकवचनांचा आहे. वाटया, गाड्या, माड्या, होड्या, वाड्या, साड्या, बांगड्या, ताटल्या, पुर्‍या, सुर्‍या, दर्‍या, कादंबर्‍या इ०

आणखी एक मोठा वर्ग सामान्य रूपांचा आहे. त्याच्या, माझ्या, तुझ्या, पुण्याला, करण्यासाठी, आचार्‍याला, त्याला, दिव्याखाली, खोर्‍याने वगैरे.

ह्या निराघात 'या' चा उच्चार फक्त मराठीत आहे. संस्कृतात नाही. आपण संस्कृतची लिपी घेतली. त्यामुळे विद्या, उद्यान, ह्यांमध्ये येणारा द्या आणि उद्या, लाद्या, गाद्या ह्यांतला द्या ह्यांमध्ये आपण फरक करू शकलो नाही. संस्कृतामध्ये उद्या हा शब्दच नाही त्यामुळे त्याचा उच्चार दाखविण्याची त्यांनी सोय केली नाही. त्यामुळे ती मराठीतही आली नाही. पण मराठीला तिची गरज आहे.

उद्यासारख्या शब्दांमधल्या 'या' मुळे होणारे जोडाक्षर निराघात असल्यामुळे तेथले य हे व्यंजन केवलव्यंजन नसून तो अर्धस्वर आहे असे मी मानतो. ह्या अर्धस्वर य पासून जसा मराठीत या होतो तसे यी आणि ये सुद्धा होतात. उदा० गायी (गाई), सोयी (सोई), हुजर्‍ये, पाणक्ये, पुतण्ये, लाकूडतोड्ये, दात्ये, साठ्ये, परांजप्ये, मोत्यें, मी जात्ये, येत्ये वगैरे.

वर उल्लेखिलेल्या सर्व शब्दांमधील य चा उच्चार निराघात आणि त्यामुळे स्वरसदृश आहे. प्रमाण आणि नि:संदिग्ध उच्चारदर्शनासाठी हा स्वरसदृश उच्चार, मराठीत वेगळा दाखविणे, त्याची सोय करणे आवश्यक आहे.

'य' ह्या अर्धस्वरानंतर आपण आता व्यंजन ह आणि महाप्राण यांतील फरक लक्षात घेऊ. हा विचार मांडताना मी पुढे कदाचित चुकीची परिभाषा वापरीन, किंवा जुन्या पारिभाषिक शब्दांचा नवीन अर्थाने वापर करीन. त्याकडे दुर्लक्ष करून आपण त्यातला विचार समजून घ्यावा.

कचटतप आणि गजडदब ह्यांपासून अनुक्रमे खछठथफ आणि घझढधभ होताना ते पहिले वर्ण महाप्राणयुक्त होतात असे मी पुढे म्हटले आहे. माझ्या मनातील कल्पना स्पष्ट होण्यासाठी ही व्यंजने अल्पप्राणाची महाप्राण झाली असे न म्हणता ती महाप्राणयुक्त झाली अशी भाषा मी वापरली आहे. त्यामुळे काहीसाठी माझे प्रतिपादन कदाचित दुर्बोध होईल.

मराठीमध्ये महाप्राण खछठथफ आणि घझढधभ ह्या वर्णांप्रमाणेच ण्ह न्ह म्ह य्ह र्‍ह ल्ह व्ह ह्या वर्णांमध्येही येत असतो. संस्कृतात तो येथे कोठेही येत नाही. (मी निराघात य हा अर्धस्वर आणि निराघात ह ला महाप्राण असे मानतो. ह्यामधली णनम ही अनुनासिके तर यवरल हे अर्धस्वर आहेत हे ध्यानात घेण्याजोगे आहे. यवरल ह्या वर्णांचा उपयोग व्यंजनांसारखा आणि अर्धस्वरांसारखा असा दोनही प्रकारांनी होऊ शकतो. व्यंजनांसारखा केल्यास त्यांचा उच्चार आघातयुक्त तर अर्धस्वरासारखा केल्यास जोडाक्षरांमधला त्यांचा उच्चार निराघात होतो. त्यामुळे य्ह व्ह र्‍ह ल्ह यामध्ये कोणतेच व्यंजन नाही, असे म्हणणे भाग आहे. अर्थात शब्दांमध्ये त्यांचा उच्चार निराघात होत असल्यास जेथे असा अर्धस्वर आणि महाप्राण ह्यांचा संयोग झाला आहे तेथे त्यांच्या ठिकाणचे पौर्वापर्य ठरविणे दुष्कर आहे. आजच्या लेखनामध्ये अडचण अशी की ही अक्षरे व्यंजने कधी असतात ते कळत नाही.

ण्ह- कण्हणे, न-न्हावी, उन्हाळा, पन्हे, पन्हाळा, तान्हुल्याला पाहून आईला पान्हा फुटला, म्ह-म्हशी, म्हातारा, म्हणून, आम्ही, य्ह-बय्हा (बावळट ह्या अर्थाचा नागपुरी शब्द) र्‍ह्-तर्‍हा, पर्‍हा, गोर्‍हा, ल्ह-कल्हई, कोल्हापूर, विल्हेवाट, वल्हवणे, वेल्हाळ, व्हा-जिव्हाळा, जिव्हारी, न्हावाशेव्हा, चव्हाण, पाव्हणा, देव्हारा इ० आता उच्चारलेल्या सर्व शब्दांमधला हा हे व्यंजन नसून तो महाप्राण आहे, असे मी मानतो ह्याचे कारण महाप्राणाचे लक्षण अर्धस्वराप्रमाणे निराघात उच्चार हे आहे असे मला वाटते. ह हे येथे व्यंजन असते तर त्याचा येथे साघात उच्चार करावा लागला असता. हा महाप्राण आपण व्यंजनासारखा लिहितो, हा आपल्या मराठी लेखनातला दोष आहे. आपण अशा दोषांसाठी रोमन आणि उर्दू या लिप्यांना हसतो, पण आपल्या मराठीच्या लेखनातला हा दोष अतिपरिचयामुळे आपल्याला त्रास देत नाही. तो पुरतेपणी आपल्या ध्यानातही आला नाही.

महाप्राण सगळीकडेच व्यंजनाप्रमाणे लिहिला तर काय होईल बघा. क मध्ये महाप्राण घातल्यावर तो क्ह असा होत नसतो तर ख असा होत असतो. अखण्ड ह्या शब्दाचा उच्चार ह हे व्यंजन वापरून केल्यास अक् हण्ड असा होईल, साघात होईल कारण दोन व्यंजनांचा उच्चार ती एकाच वर्णात आली असताना साघात करावयास हवा आणि त्याच नियमाप्रमाणे साघातमधील घा चा उच्चार साग्हात असा करावा लागेल. ह्या दोन उच्चारांवरून महाप्राण आणि व्यंजन ह ह्यांचा उच्चारांमध्ये कसा फरक आहे ते कळून येईल. पाहा (क-ख, ग-घ, च-छ, ज-झ, ट-ठ, ड-ढ, त-थ, द-ध, प-फ, ब-भ) का बनविली ते कळून येईल. आघातयुक्त उच्चाराबद्दलही काही गैरसमज आहेत. दिव्यातून आणि दिव्यांतून यामधील दुसर्‍या दिव्यामध्ये दोन व येतात असा काहींचा समज आहे. तेथे एकदाच व् आणि त्यानंतर दुसरे व्यंजन य हे आले असल्यामुळे त्याचा उच्चार आघातयुक्त होतो इतकेच.

'छ' ह्या अक्षराचा उच्चार मात्र वरच्या नियमाला अपवादात्मक आहे. ते महाप्राणयुक्त लिहिले जात असले तरी तेथे मुद्दाम आघात घ्यावा अशी संस्कृत भाषेची सूचना आहे. (मराठीची नाही.) त्यासाठी 'ह्रस्वस्य पिति कृति तुक्' असे सूत्र आहे. ह्या सूत्राप्रमाणे कोठल्याही ह्रस्व वर्णापुढे छ हा वर्ण आल्यास नियमाने आणि दीर्घ वर्ण आल्यास विकल्पाने तुगागम करावा, (तेथे एक जास्तीचा त् घालावा) असा नियम सांगितला आहे. उदा० वि+छेद = विच्छेद, परि+छेद = परिच्छेद, शब्द+छल = शब्दच्छल, मातृ+छाया = मातृच्छाया, पितृ+छत्र = पितृच्छत्र इ० एखाद्या दीर्घस्वरानंतर विकल्पाने तुगागम होत असल्यामुळे लक्ष्मीछाया आणि लक्ष्मीच्छाया अशी दोनही शुद्ध रूपे सिद्ध होतात. नाहीतरी दीर्घ वर्णांच्या उच्चारानंतर आघाताची आवश्यकता कमी झालेली असते. आघात घेण्याचा हेतू उच्चारात त्या वर्णाच्या ठिकाणी गुरुत्व आणणे असा आहे. तो हेतू दीर्घत्वामुळे साध्य झालेलाच असतो. शिवाय च्छ आणि च्ह ह्यांच्या उच्चारांमध्येही सकृद्दर्शनी जाणविण्यासारखा भेद नाही.

मराठीमध्ये पडछायासारखे 'छ' चे निराघात उच्चार होत असतात. परिणामी मराठीत अन्नछत्र, पितृछत्र, मातृछाया, मुक्तछंद, नाटयछटा, रंगछटा अशी संस्कृत शब्दांची (चुकीची) सामासिक रूपे रूढ झाली आहेत. उलट संस्कृत भाषेची जेथे शक्य असेल तेथे आघात घेण्याची प्रकृती असल्यामुळे तिच्यामध्ये उद्+हर = उद्धर, तस्मिन् + एव =तस्मिन्नेव्, इन्+अन्त = इन्नन्त असे संधी होत असतात. मराठीमध्ये एक+एक = एकैक असा संधी होत नाही तर एकेक असा उच्चार आपण करीत असतो.

खघछ ह्याविषयी सांगून झाले. ठथफझढधभ ह्या महाप्राणयुक्त अक्षरांबद्दल वेगळे सांगण्यासारखे काही नाही.

व्यंजन र् हा वर्णदेखील मराठीत नसल्यासारखाच आहे. र हा स्वरयुक्त (अजन्त-एकाच्) वर्ण मराठीत आहे. पण संस्कृतमध्ये (व्यंजन र्) पुष्कळ ठिकाणी वापरला जातो. तसा तो मराठीत आढळत नाही. व्यंजन र् चे चिन्ह संस्कृतात रेफ किंवा रफार (र् ) हे आहे. ते ज्या शब्दांमध्ये आहे ते सर्व शब्द मराठीतर आहेत असे समजावे. ह्या रेफाने युक्त शब्द बघा : अर्क, मूर्ख, वर्ग, अर्घ, शार्ङ, अर्चा, जर्जर, निर्झर, अर्णव, आर्त, अर्थ, सूर्य, पूर्व, कीर्ती, मूर्ती असे असंख्य.

मराठीमध्ये सर्रास, हर्रास, किर्र, कोकर्डेकर, किर्लोस्कर, वगैरे शब्दांमधला रेफ व्यंजन र् चा द्योतक नसून निभृत र चा आहे. किरलोसकर (गावाचे मूळ नाव किरलोसी असे आहे.) कोकरडेकर (गावाचे नाव कोकरडा, स्थानिक उच्चार कोकल्डा असासुद्धा होतो.) असे हे मूळचे शब्द, शब्दांमधल्या काहींचे मधल्या किंवा शेवटच्या अक्षरांचे उच्चार निभृत करण्याच्या आपल्या पद्धतीप्रमाणे आणि उच्चारानुरूप केलेल्या लेखनामुळे किर्लोस्कर, कोकर्डेकर असे लिहिले जाऊ लागले.

सर्रास, हर्रास आणि किर्र ह्या शब्दांमध्ये मात्र व्यंजन र् चा उच्चार होतो असे मला वाटू लागले आहे. ह्या ठिकाणी ह्या शब्दांमुळे मराठीच्या उच्चारप्रकृतीचा आणखी एक विशेष आपल्या लक्षात येणार आहे. मराठीत किंबहुना सर्वच देश्य उत्तर भारतीय भाषांमध्ये जी आघातयुक्त जोडाक्षरे आहेत ती बहुधा ज्यांच्यामध्ये एकाच व्यंजनाचे द्वित्व झालेले आहे अशी आहेत. या नियमाला मला आतापर्यंत दोनचारच अपवाद दिसले आहेत. आधी नियम पाहू व मग अपवाद.

नियम असा की मराठी शब्दांमध्ये असलेली जोडाक्षरे एकाच वर्णाचे द्वित्व होऊन होतात. उदा० कल्ला, किल्ला, गल्ला, हल्ला, हल्ली, गिल्ला, गिल्ली, दिल्ली, सल्ला, बल्ली, फल्ली, कच्चा, पक्का, खड्डा, जख्ख, मख्ख, चक्क, गच्ची, खच्ची, कच्चीबच्ची, लुच्चा, थुच्चा, सच्चा, झक्की, नक्की, चक्की, कित्ता, पत्ता, भत्ता, गुत्ता, ढिम्म, घुम्म, गप्प, मुद्दा, गुद्दा, हुद्दा, पट्टा, बट्टा, थट्टा, चिठ्ठी, विट्टी, सुट्टी, पट्टी, बट्टी, चट्टी, भट्टी, खट्ट, घट्ट, गट्ट, मठ्ठ, लठ्ठ, आप्पा, बाप्पा, अण्णा, भय्या, अय्या, इश्श, वगैरे वगैरे.

अपवाद फक्त स्त, क्त ह्या वर्णांचा (गोष्ट हा शब्दसुद्धा गोठ असा उच्चारला जात असे) उदा० फस्त, मस्त, शिस्त, भिस्त, सुस्त, स्वस्त, जास्त, दुरुस्त, फक्त, मक्ता वगैरे.

आपण मराठीत ज्याला अनुस्वार म्हणतो ते पुष्कळ ठिकाणी नुसते बिन्दुचिन्ह असते. मराठीतल्यासारखा त्याचा गैरवापर अन्यत्र क्वचित झाला असेल. ते एकच चिन्ह मराठीने संस्कृत भाषेतील अनुस्वार म्हणून ङ्ञ्ण्न्म् आणि वँ् या अनुनासिक व्यंजनांच्या ऐवजी; अं, हं, सारख्या अनुनासिका उच्चारांसाठी; दोन सारख्या शब्दांमधला अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी, नामांच्या ठिकाणी तृतीया, सप्तमी अशा विभक्तींचा, बहुवचनाचा, नपुंसकलिंगाचा आणि क्रियापदांच्या ठिकाणी अपूर्ण वर्तमानकाळाचा आणि प्रथमपुरुषी कर्त्याचा असे निर्देश करण्यासाठी इतकेच नव्हे तर खास मराठीचे जे उच्चार आहेत - झालं, केलं, गेलं इत्यादी, ते दाखविण्यासाठीही सरसहा वापरले आहे. त्यामुळे वाचकाची कोठे अर्थ समजण्याच्या बाबतीत सोय तर कोठे उच्चार करण्याच्या बाबतीत गैरसोय झाली आहे.

अनुच्चारित अनुस्वार हा वदतोव्याघात आहे. मराठीत आपण वापरतो ते वास्तविक बिन्दुचिन्ह आहे. म्हणून अनुस्वार व बिन्दुचिन्ह ह्यांच्या खुणा वेगळया असणे आवश्यक आहे. अनुच्चारित अनुस्वार म्हणून आपण संस्कृतची परिभाषा चुकीच्या अर्थाने वापरीत आहोत. 'सर्वांशी मिळून मिसळून राहा म्हणजे तू सर्वांशी यशस्वी होशील' ह्या वाक्यांतील दुसर्‍या सर्वांशी (सर्व अंशांनी) हा उच्चार मराठीत नाही आणि पहिला उच्चार संस्कृतात नाही.

अनुस्वार (बिन्दुचिन्हे नव्हे) आणि रफार ही दोनही व्यंजनचिन्हे आहेत. ही दोनच व्यंजने शिरोरेखेच्या वर येणारी व्यंजने होत. ज्या अक्षरांवर ती येतात ती अक्षरे त्यामुळे जोडाक्षरे मानली गेली पाहिजेत. रेफ हे चिन्ह नेहमीच अक्षरातील स्वरांशाला चिकटलेले असते आणि अनुस्वार तसा नसतो. त्यामुळे रेफ हा त्याच्या खाली लिहिलेल्या अक्षराच्या आधी उच्चारला जातो आणि न चिकटलेला अनुस्वार नंतर.

अनुस्वार आणि चंद्रबिंदू यांच्यातही फरक करणे भाग आहे. अनुस्वार हा अनुनासिक व्यंजनाचा आघातयुक्त उच्चार असून चंद्रबिंदू हा स्वरांना होणारा विकार आहे व त्यामुळे तो निराघात आहे. पण मग इंग्रजी शब्दांमधले अँड, बँक सारखे उच्चार दाखविण्यासाठी निराळी सोय करावी लागेल. आणि आपला चंद्रबिंदू कँवरसाहेब, हँ हँ आणि हँ हँ हँ (हं हं आणि हं हं हं हे श्री० दिनकर देशपांडे यांच्या एका नाटकाचे नाव आहे) अशा उच्चारांसाठी वापरला तर अँ साठीही वेगळे चिन्ह शोधावे लागेल.

बिन्दुचिन्हांचे प्रकार

1. खणखणीत अनुनासिक व्यंजन उदा० (क) शिंके, पंखा, गंगा, तंटाभांडण, भिंत, तिंबूनाना (येथे परसवर्णाप्रमाणे अनुस्वाराचा उच्चार होतो.)
2. चिंच, मांजर, पंछी, पंजा (येथे परसवर्णाप्रमाणे उच्चार होत नाही कारण मराठीत ञ् आणि वँ नाहीत.)
2. अनेकवचनदर्शक : उदा० शब्दांमध्ये, लोकांसाठी, सर्वांपर्यंत
3. अनुनासिक स्वर उदा० अं, आं, इं, ईं, उं, ऊं, - अं, हं! वगैरे
4. झालं, केलं, गेलं असे उच्चार.

अनुच्चारित (नवीन प्रमाण लेखन-नियमांनुसार हे अनुस्वार लिहिले जात नाहीत.)

1. विभक्तिप्रत्यय - (मीं, तूं, आम्हीं) काळ (जातां, जातां) करूं - कर्ता (डोळयांनी बघतों, ध्वनी परिसतों कानीं, पदीं चालतों)
2. अर्थभेद - (नांव, कांच, पांच) - (क्रियापदें, आज्ञार्थी क्रियापदें, करीं, देईं)
3. लिंग - नपुंसकत्वाचा निर्देश (गुरुं, कुत्रीं, कार्टीं, कोकरूं, लेकरूं लिंबूं)
4. अव्यये - मुळें, साठीं, करितां

मराठीत पुष्कळशा अक्षरांचे उच्चार निभृत होत असतात. त्यांपैकी काही दाखविण्याचा तर काही न दाखविण्याचा प्रघात पडला आहे. दोन्ही, तिन्ही, चार्‍ही मधील निभृत उच्चार व्यंजनांसारखे दाखविले आहेत. उदगीर, नागपूर, यांमध्ये तसे ते होत असले तरी ते दाखविण्याची पद्धत नाही.

संस्कृत भाषेसाठी वापरल्या जाणार्‍या चिन्हांनी मराठीत निभृत उच्चार दाखवू नयेत. त्यासाठी वेगळी चिन्हे निर्माण करावीत. अर्थात हा विचार यथार्थोच्चार-दर्शनाबाबत आहे. नित्यलेखनासाठी नाही.

विसर्गाचा विचार केल्याखेरीज आघातविचार पूर्ण होत नाही. विसर्गाचा उच्चार मराठीच्या प्रकृतीला पूर्णपणे परका आहे. जोडाक्षरांच्या ठिकाणी फक्त एकदाच कोठेतरी आघात घ्यावयाचा इतकेच मराठीला माहीत आहे. त्यामुळे विसर्ग व त्यापुढे 'जोडाक्षरे' असे एका शब्दात एकापुढे एक आले की विसर्गाचा लोप करून फक्त जोडाक्षराचा उच्चार करावयाचा अशी मराठीची प्रकृती आहे. नि:श्वास, नि:स्पृह, मन:स्वास्थ्य, मन:क्षोभ, यश:श्री अशांसारख्या शब्दांचे उच्चार निश्वास, निस्पृह, मनस्वास्थ्य, मनक्षोभ, यशश्री असे होतात. 'दु:ख'चा उच्चार, दुक्ख किंवा दुख्ख असा होतो. विसर्ग आणि जोडाक्षर एकापुढे एक आल्यामुळे एकाच शब्दामध्ये दोन आघात घ्यावे लागतात. पण आघात कमी घेण्याकडे मराठीचा कल असल्यामुळे आणि सरधोपट उच्चार करण्याची तिची प्रवृत्ती असल्यामुळे दोन आघातांचे उच्चार मराठीत कधीच होत नाहीत. उदा० उद्ध्वस्त, उद्द्योत, तज्ज्ञ, महत्त्व इ० महाप्राण, विसर्ग आणि व्यंजन 'ह' ह्यांमधील भेद मराठीला माहीत नसल्यामुळे अक्षरश: सारखे शब्द अक्षरशहाप्रमाणे धिक्कार, धि:कारप्रमाणे, अध:पात, अन्त:करण हे अधप्पात, अंतक्करणाप्रमाणे उच्चारले जातात व त्यामुळे ते तसे लिहिले जातात.

मराठीची उच्चारप्रकृती शक्यतो निराघात उच्चार करण्याची असल्यामुळे जेथे कोठे आघातामुळे गुरुत्व येते तेथे दीर्घत्वाची गरज नाही असे मराठी बोलणारे लोक समजतात. ह्या कारणामुळे प्राविण्य, नाविन्य, प्रित्यर्थ, धुम्रपान, रविन्द्र, दिक्षित, आशिर्वाद, तिर्थरूप, पुर्ण, पुर्व, सुर्य, किर्तन, जिर्णोद्धार, परिक्षा, अधिक्षक असे उच्चार करतात व तसेच लिहितात. मराठीमध्ये शब्दाच्या अन्त्यस्थानी 'अ' स्वर व उपान्त्यस्थानी 'इ' किंवा 'उ' असल्यास ते दीर्घ लिहावे असा नियम आहे. तद्भव शब्दांच्या बाबतीत मराठीची उच्चारप्रकृती लक्षात घेऊन, शिस्त, भिस्त, उंट, सुरुंग, तुरुंग, चिंच, भिंत असे शब्द वर सांगितलेल्या नियमाला अपवादस्वरूप मानावे असे सांगितले आहे. संस्कृत भाषेमध्ये स्वरांचे दीर्घत्व आणि आघात हे दोनही वेगवेगळे मानले गेल्यामुळे कीर्ती, तीर्थक्षेत्र, जीर्णोद्धार, आशीर्वाद, सूर्य, पूर्व, मूर्ख अशा सर्व शब्दांमध्ये दीर्घत्व कायम ठेवून आघात घेतला जातो.

काही सूचना - (कोशांमध्ये उच्चारदर्शनासाठीच वापरण्यासाठी; नेहमी लिहिण्यासाठी नाही.) रेफ किंवा रफार हे चिन्ह दर्या-दर्‍या, आचार्यांना-आचार्‍यांना अशा उच्चारांतील फरक दाखविण्यासाठी आपण वापरीत असतो. ते तसेच वापरीत राहावे. अर्धस्वर दाखविण्याची सोय जर वेगळया पद्धतीने करता आली तर अर्धा र् (र्‍) त्या चिन्हाची गरज पडणार नाही, कारण ते सध्या निराघात व्यंजन र् दाखविण्यासाठी वापरले जात आहे.

निराघात 'या' दाखविण्यासाठी विनोबांनी लोकनागरीमध्ये सुचविलेला म् असा कान्या वापरण्यास काही हरकत नाही. त्यामुळे रजा आणि राज्य ह्या दोन शब्दांचे सामान्यरूप डोळयांस वेगळे दिसेल.

आपल्या लिपीतील एका स्वरयुक्त उच्चारासाठी एक अक्षर ही कल्पनाच मोठी मनोरम आहे. उध्द्वस्तमधल्या ध्द्व मध्ये तीन व्यंजने व त्यांच्याबरोबर एक स्वर, धाष्टर्य मध्ये चार व्यंजनांच्या सोबत एक स्वर, कार्त्स्न्यमध्ये पाच व्यंजने-स्वराच्या आधी व एक नंतर अशा सहा व्यंजनांचे एक अक्षर आपण लिहितो. कमी अक्षरांमुळे नि:संदिग्धता येण्यास मदत होते. जलद वाचनास व अर्थग्रहणासही साह्य होते हा आपल्या लिपीचा गुण नष्ट होऊ देऊ नये. आपल्या डोळयांना एकाच प्रकारच्या जोडाक्षरांची सवय व्हावी असे मी मानतो. एकच जोडाक्षर जर नेहमी वापरावयाचे तर ते पूर्वीपासूनचेच का नको असा मला प्रश्न पडतो. त्यासाठी एक आपद्गस्त हा शब्द मी लिहून दाखवितो : 'आपद््‍ग््‍रद्ग्रस्त', 'आपद्ग्रस््त', 'आपद्गरस्त', 'आपद्गरस्त' - वगैरे. हे अनेक पर्याय डोळयांना त्रासदायक होतात म्हणून त्यांच्यापैकी एका रूपाचे प्रमाणीकरण करावे. छापताना सर्वत्र एकच प्रमाणित रूप वापरावे. थोडक्यात काय तर वाचकाची सोय लेखकाने आणि मुद्रकानेही पाहावी.

मराठीतले दंत्यतालव्य च, ज, झ, देहे दु:ख हे सूख मानीत जावे ह्यांतील र्‍ह्स्व एकार, कोठे र्‍ह्स्व ओकारही असेल, एका मात्रेपेक्षा कमी असलेले काही वर्णांचे अर्ध्या किंवा पाव मात्रेचे उच्चारही असतील. त्यांचा विचार पूर्वी पुष्कळांनी केला आहे. म्हणून मी तो येथे केलेला नाही. त्यातून हा निबंध मुख्यत: आघाताविषयी आहे. म्हणून येथे त्याचाच विस्तार केलेला आहे.

दिवाकर मोहनी
मोहनीभवन, धरमपेठ, नागपूर 440010
भ्रमणभाष : 09881900608

आरपार लयीत प्राणांतिक

('आरपार लयीत प्राणांतिक' - प्रज्ञा दया पवार. लोकवाङ्मयगृह, मुंबई. २००९. पृष्ठे ५५. मूल्य रु० ६०/-)

कवयित्री प्रज्ञा पवार यांची 'आरपार लयीत प्राणांतिक' ही दीर्घकविता विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर या लावणीसम्राज्ञीच्या जगण्याचे सारसर्वस्व शब्दांकित करण्याचा प्रयत्न करते. काव्यविषय झालेल्या विठाबाईंशी पुस्तकाच्या सुरुवातीला साधलेल्या मनोगतसदृश संवादातून कवयित्रीची लेखनामागची भूमिका लक्षात येते. संस्कृतीचा पोट-संस्कृतीशी अन्वय लावणे, तसेच जातिव्यवस्थेतल्या उतरंडीत सर्वात पायतळी ढकलल्या गेलेल्या बाईची जिद्द आणि कलेची ताकद जाणवून देणे, ही दलित-स्त्रीवादी भूमिका त्यामागे आहे. डॉ० माया पंडित यांनी 'निमित्ताने' या प्रस्तावनेतून दलित-कष्टकरी स्त्रीच्या सांस्कृतिक संघर्षाची वाचकांना जाणीव करून दिली आहे.

'पवळा हिवरगावकर ते विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर,' तसेच 'लावणीसम्राज्ञी ते जोगवा मागणारी असहाय स्त्री' या विठाबाईंच्या दंतकथासदृश जीवनप्रवासाचे - त्यातील चढउताराचे - दर्शन या दीर्घकवितेतून प्रभावीपणे घडते. पुरुषसत्ताक मनोवृत्तीची दांभिकताही त्यातून उजेडात येते. विठाबाईंविषयीची कवयित्रीची सहसंवेदना यात विविध नात्यांनी घट्ट विणली गेली आहे. स्त्री, दलित आणि कलावंत या तीनही पातळयांवर कवयित्रीला विठाबाईंशी नाते जोडता आल्यामुळे विठाबाईंची व्यक्तिरेखा यात विविध परिमाणांतून साकार झाली आहे.

कवयित्रीने मार्मिक प्रतिमांच्या द्वारे विठाबाईंच्या अभावग्रस्त जगण्याचे शोकात्म रूप आणि कलासंपन्न जगण्याचे दिमाखदार रूप यातील अंतर्विरोध सूचित केला आहे. ''बाई असण्याच्या चिरंतन ढोलकाठीचा खेळ', 'अभावाची ढोलकी', 'भुकेचा आदिम वग', 'षड्- विकारांची ओटी' ही यातील रूपके अर्थगर्भ आहेत. ही दीर्घकविता भावकवितेच्या अंगाने विकसित होते. त्यामुळे यात वर्णन-निवेदन यांना फाटा देऊन भावना-संवेदना-चिंतन यांच्या आवेगातून आलेला प्रवाहीपणा जाणवतो. शीर्षकातूनही याचा प्रत्यय येतो. यातील चिंतन स्त्रीत्व आणि दलितत्व यांच्याशी निगडित शोषणापुरतेच मर्यादित नसून नवभांडवलशाहीच्या नावाखाली लावणीकलाकारांची होणारी लैंगिक लूटही लक्षात आणून देणारे आहे.

''नवजात अर्भकाला जन्म देऊन,
दगडानं त्याची नाळ ठेचून,
पुन्हा फडावर रंगबाजी करताना,
तुझ्या मायांगातून ओघळणारा घाम,
वेदना अश्शी कापत जाते
माझ्या संज्ञेला''

अशा यातील ओळी उत्कट आहेत आणि धारदार उपरोधामुळे जिव्हारी झोंबणार्‍याही आहेत.
कवयित्री आणि विठाबाई यांच्या सहसंवेदनेच्या नात्यावर उभ्या राहिलेल्या या दीर्घकवितेचा बाज लयबद्ध तर आहेच, शिवाय आशयगर्भही आहे.

नीलिमा गुंडी
neelima.gundi@gmail.com

(भाषा) शिक्षणाचा खेळ(खंडोबा) - संपादकीय

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या सुमारास शिक्षण मंत्र्यांना जाग येते आणि विविध शासकीय आदेश, धोरणे व योजना जाहीर होऊ लागतात. त्यातून सरकार आणि/किंवा शिक्षणमंत्री नवीन असेल तर विचारायलाच नको. काय करू आणि काय नको असे त्यांना होऊन जाते. 'ज्याचे हाती शिक्षणाच्या नाड्या तोच देशाचा (व भावी पिढ्यांचा) उद्धारकर्ता' असे वाटत असल्याने आपल्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या पोतडीतून नवनवीन चिजा ते काढू लागतात. पाचवीऐवजी आठवीपासून इंग्रजी सुरू करण्याचा १९४८ सालचा खेर मंत्रिमंडळाचा निर्णयच पाहा. त्याचा परिणाम इंग्रजीचे महत्त्व वाढण्यात, इंग्रजी माध्यमाचे स्तोम निर्माण होण्यात आणि शेवटी पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात झाला. असे निर्णय घेताना पुरेसा गृहपाठ, संभाव्य ताबडतोबीच्या व दीर्घकालीन परिणामांचा विचार होतो की नाही अशी शंका त्यामुळे निर्माण होते.

दहावीच्या परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण झालेल्यांना एटीकेटी (अलाऊड टु कीप टर्म्ज), अकरावीच्या प्रवेशासाठी ९०%-१०%चा निर्णय, गेल्या वर्षीचा पर्सेण्टाइलच्या निर्णयाचा फियास्को, महाराष्ट्रात माध्यमिक शालान्त शिक्षण मंडळाचा शिक्षणक्रमच शिकवण्याची सर्वच शाळांना सक्ती करण्याचा विचार, अकरावीचे प्रवेश 'ऑनलाईन' पद्धतीने करण्याचे प्रयत्न अशा अनेक गोष्टी ताज्या आहेत. त्यातच दहावीची माध्यमिक शालान्त परीक्षाच रद्द करण्याच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांच्या निर्णयाची भर पडली आहे. याच संदर्भात आपल्या राज्यातील शाळांमध्ये कन्नड माध्यमाची सक्ती करण्याचा कर्नाटक सरकारचा निर्णय व त्यासंबंधीचे उच्च व सर्वोच्च न्यायालयांतील दावे व त्यांवरील निर्णय आठवतात. शिक्षण हा विषय घटनाकारांनी राज्य व केंद्र सरकार या दोहोंच्याही अखत्यारीत ठेवलेला असल्यामुळे असा गोंधळ होत असावा असे ठरवून आता केंद्र सरकारने या बाबतीतले राज्यांचे अधिकार कमी करण्याचा किंवा ते मर्यादित करण्याचा विचार सुरू केला आहे.

शिक्षणात भाषेचा (खरं म्हणजे भाषांचा) दुहेरी संबंध येतो; एक विषय म्हणून आणि कोणताही विषय शिकण्या-शिकविण्याचे माध्यम म्हणून. पण या वस्तुस्थितीकडे आपण पुरेशा गंभीरपणाने पाहात नाही. मुळात कार्यक्षम वापर करण्याइतकी भाषा आत्मसात होण्याआधीच - आणि इंग्रजी (किंवा प्रमाण मराठी)च्या बाबतीत घर, परिसर व वातावरण यांत ती किती प्रमाणात उपलब्ध आहे याचा विचार न करता - आपण तिच्यावर अन्य विषयांचा भार टाकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिकवण्याचा आपल्याला आटापिटा करावा लागतो. त्यातून ३५% गुणांना 'उत्तीर्ण' मानणे, अनुत्तीर्णांचे प्रचंड प्रमाण, त्यामुळे होणारी गळती, आत्महत्या, बेकारी असे प्रश्न निर्माण होतात.

महाराष्ट्र शासनाने मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर केलेला करार हा अलीकडे उजेडात आलेला विषय. मूळ करार तीन वर्षांपूर्वीच करण्यात आला आहे. त्यानुसार मायक्रोसॉफ्ट कंपनी संगणक शिक्षक तयार करणार, ते शिक्षक इतर शिक्षकांना शिकवणार आणि त्यांच्यामार्फत महाराष्ट्रातले सारे विद्यार्थी संगणक-शिक्षित होऊन नोकऱ्या व व्यवसायांसाठी तयार होणार! या सगळयात आपण पुन्हा एकदा बौद्धिक गुलामगिरीकडे वाटचाल करण्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरची सक्ती, इंग्रजी अपरिहार्य ठरण्याची शक्यता आणि हे शिक्षण मराठीतून उपलब्ध झालेच तर त्या मराठीची संभाव्य भीषण अवस्था या सगळयातून आपण करत असलेला शिक्षणाचा व विशेषत: भाषा शिक्षणाचा खेळखंडोबा अधोरेखित होतो.

प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या पायावर उच्च शिक्षणाचा डोलारा उभा असतो. आपला हा पायाच कच्चा व डळमळीत आहे. कोठारी, राम जोशी, यशपाल यांच्या अहवालांची अंमलबजावणी करण्याऐवजी नवनवीन समित्या नेमण्यात व त्याद्वारे काहीतरी 'भरीव' काम केल्याचे समाधान मिळविण्यात आपण धन्यता मानतो. व्यावसायिक शिक्षणाच्या पुरेशा सोयी नसल्यामुळे महाविद्यालये ओसंडून वाहात आहेत हे लक्षात घेत नाही.

शिक्षणाचा आणि विशेषत: भाषा शिक्षणाचा हा खेळखंडोबा कोण, कसा व केव्हा थांबवणार हाच खरा आपल्या पुढचा प्रश्न आहे.

- प्र०ना० परांजपे

'बंगलो'

'भाषा आणि जीवन' (उन्हाळा २००९)च्या अंकातील' शब्दजिज्ञासा'मधल्या ब्रह्मानंद देशपांडे यांचा 'बंगला' हा लेख वाचला. बंगला या शब्दाच्या व्युत्पत्तीसंबंधी त्यांनी चांगली माहिती दिली आहे.

इथे दोन संदर्भग्रंथांची आठवण होते. इंग्रजांच्या काळात बरेच भारतीय शब्द इंग्रजीत वापरले गेले. त्या शब्दांबद्दल माहिती देणारे दोन शब्दकोश म्हणजे जॉर्ज क्लिफर्ड व्हिटवर्थ यांचा 'अँग्लो-इंडियन शब्दकोश' आणि हॉब्सन-जॉब्सन 'अँग्लो-इंडियन शब्दकोश'. या दोन्ही कोशांमध्ये इंग्रजी 'बंगलो' या शब्दाबद्दल खालीलप्रमाणे माहिती दिलेली आहे.

व्हिटवर्थच्या शब्दकोशात इंग्रजीमधला 'बंगलो' हा शब्द बंगालच्या बांग्लाचा अपभ्रंश असल्याचं म्हटलं आहे. बंगलो म्हणजे वाळलेल्या गवताच्या छपराचं एकमजली घर किंवा जमिनीवर स्वतंत्रपणे उभं असलेले कोणतेही घर, असं म्हटलं आहे.

हॉब्सन-जॉब्सन शब्दकोशात 'बंगलो' या इंग्रजी शब्दाचं 'एकमजली कौलारू घर' असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. बंगल्याबद्दलचं किंवा बंगालचं काहीतरी ते बांग्ला असं पूर्वी हिंदुस्थानात म्हटलं जाई. त्यामुळे युरोपियनांनी बंगालसारखी घरं इतरत्र बांधली, तेव्हा त्याला बंगला, बंगाली पद्धतीचे घर अशी नावे दिली. इंग्रजी 'बंगलो' ही संज्ञा बंगालमधील युरोपियनांनी स्थानिक घरांच्या पद्धतीवरून घेतली असल्याचं हॉब्सन-जॉब्सन शब्दकोशात म्हटलं आहे.

या दोन्ही कोशांबद्दल आणखी थोडी माहिती देते. व्हिटवर्थ यांचा शब्दकोश केगन पॉल, ट्रेंच आणि कंपनी, लंडन यांनी १८८५ मध्ये प्रकाशित केला आणि १९७६ साली इंडिया डॉक्युमेंटेशन सर्व्हिस, गुरगाव यांनी पुनर्मुद्रित केला. त्या वेळी वापरात असलेले आणि भारतीय संदर्भात विशिष्ट अर्थ असलेले पण नेहमीच्या इंग्रजी किंवा भारतीय शब्दकोशांत स्पष्टीकरण नसलेले शब्द व संज्ञा या व्हिटवर्थच्या शब्दकोशात घेतलेल्या आहेत. कलम, कच्चा, पिठोरी, लाख, कडिया इ० अशा जवळजवळ ५ हजारापर्यंत शब्दांची व्युत्पत्ती किंवा भारतीय संदर्भ त्यात दिलेले आहेत. ३५० पानांचा हा शब्दकोश संशोधकांसाठी आणि भारतीय इतिहास व संस्कृती यांमध्ये रुची असणार्‍यांसाठी उत्तम संदर्भग्रंथ आहे.

हॉब्सन-जॉब्सन अँग्लो इंडियन शब्दकोश हा हेन्‍री यूल व ए०सी० बर्नेल यांनी तयार केला आहे. १९०३ मध्ये लंडनच्या जॉन मरे यांनी मूलत: प्रकाशित केलेल्या ह्या कोशाचं दुसरं पुनर्मुद्रण नवी दिल्लीच्या एशियन एज्युकेशनल सर्व्हिसेसने २००६ साली केलं आहे. यामध्येही अचार, बझार, घी, लोटा, फकीर, झुला इ० इ० सारखे जवळजवळ ५ हजारांपर्यंत शब्द आहेत. शिवाय शब्द पटकन सापडण्यासाठी तीस पानांची शब्दसूची शेवटी दिलेली आहे. तसेच या कोशात ज्या ज्या पुस्तकांचे संदर्भ आले आहेत, त्या त्या पुस्तकांची पूर्ण नावे असलेली २० पानी एक यादीही दिलेली आहे. जिज्ञासूंनी या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यास या एक हजार पानी पुस्तकाच्या आवाक्याबद्दल अधिक माहिती मिळेल.

व्हिटवर्थचा शब्दकोश आणि हॉब्सन-जॉब्सन शब्दकोश हे दोन्ही संदर्भग्रंथ मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात संदर्भासाठी उपलब्ध आहेत.

अलका कानेटकर

302, तनुजा सोसायटी, प्रेमनगर, खारेगाव, कळवा (पश्चिम) 400605
दूरभाष : (022) 25372672
भ्रमणभाष : 09969445097

क्रियापदाचे बदलले स्थान

सलील वाघ

मराठी आहे एतद्देशीयांची भाषा. तिच्यात होत आहेत काही बदल, विशेष ठळक. काही गोष्टी जाणवतात. काही खुपतात. काही करतात संभ्रमित आणि विचारप्रवण. इंग्रजी भाषेच्या वाक्यरचनेत येते क्रियापद अगोदर. मराठीतही ते येत नाही असे नाही. ते येते, शक्यतो ललित साहित्यात किंवा अपवादात्मक परिस्थितीत. परंतु आता झाली आहे सर्वसाधारण परिस्थितीच अपवादात्मक! दूरदर्शनवर वाढली बातम्यांची चॅनेल्स. २००५ नंतर बनली परिस्थिती जास्त गंभीर. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्या कामगारांचा होता त्यात जास्त भरणा. त्यांची बोली गेली लगेच उचलली. हिंदीवर लगेचच पडला त्याचा प्रभाव. मराठी भाषा म्हणून रेटा किंवा रोध शून्य. कारण मराठी माणूस एकतर (परक्यांसाठी) मनमिळाऊ. त्यातून बुद्धिवादी. शिवाय सहिष्णू. वर समाजकारण राजकारणात माहीर. मात्र भाषेबद्दल अव्वल अनास्था. प्रस्तुत लेखकाने केले एक अनौपचारिक सर्वेक्षण. यात निरीक्षली मराठीतली प्रमुख वृत्तपत्रे, दोन हजार पाच सालापासून. 'महाराष्ट्र टाइम्स,' 'लोकसत्ता', 'सकाळ', 'केसरी', 'लोकमत', 'पुढारी' ही वृत्तपत्रे आणि आजतक, स्टार, अल्फा, झी, आयबीएन, साम ही बातम्यांची चॅनेल्स, यांचे केले वाचन - आणि घेतली नोंद. त्यातून लक्षात आली ही बाब. मराठीवर पडतो आहे प्रभाव. शब्दक्रमासहित वाक्यरचनेचे केले जाते आहे अनुकरण. त्यामुळे क्रियापदाचे बदलले स्थान! ही नुसती नाही निव्वळ एक भाषाशास्त्रीय गोष्ट. याला आहे उद्याची अनेक मानवी परिमाणे. आज संस्कारक्षम वयात असलेली (४ ते १४) मराठी पिढी मोठी होणार आहे ऐकून हीच भाषा. आपण होत चाललो आहोत का जास्त जास्त अ‍ॅक्शन ओरिएंटेड? आपल्याला हवी 'क्रिया' अगोदर म्हणून येत आहे 'क्रियापद' अगोदर. याला नाही केवळ एक व्याकरणिक परिमाण. याचे संदर्भ आहेत अजून खोलवर. क्रिया म्हणजे ‍अ‍ॅक्शन. अ‍ॅक्शन म्हणजे एक्साइटमेंट. समकालीन मराठीभाषकाचे सार्वजनिक जीवन झाले आहे सवंग. खाजगी जीवन झाले आहे खोखले. त्यामुळे ही दोन्हीकडची पोकळी भरून काढण्यासाठी त्याला काहीही करून हवी आहे एक्साइटमेंट. एक्साइटमेंटला वापरू इथे मराठी शब्द 'सनसनाटी'. मराठयांना हवी आहे सनसनाटी. म्हणून सरकले आहे क्रियापद आधी.

अनाग्रही सर्वसमावेशक संशोधन

सुबोध जावडेकर

(परीक्षित पुस्तक : 'ध्वनितांचें केणें' - मा०ना० आचार्य. पद्मगंधा प्रकाशन, पुणे. २००८. पृष्ठे २७८. किंमत रु०२५०/-)

'ध्वनितांचें केणें' हे पुस्तकाचे नाव आपल्याला कोडयात टाकतं. ध्वनित म्हणजे जे उघड नाही ते, आडवळणानं सांगितलेलं, हे आपल्याला माहीत असतं. तेव्हा ध्वनित म्हणजे सूचित किंवा गुह्य असणार. पण 'केणें' म्हणजे काय बुवा? असा प्रश्न बहुतेकांच्या चेहर्‍यावर उमटेल. केणें म्हणजे गाठोडं. 'ध्वनितांचें केणें' म्हणजे गूढार्थाचं गाठोडं. हा ज्ञानेश्वरीतला शब्दप्रयोग आहे. एखाद्या गोष्टीला वरवर दिसतो त्यापेक्षा काहीतरी खोल अर्थ दडलेला असतो अशा वेळी हा शब्दप्रयोग वापरतात. प्राचीन साहित्यामध्ये आणि संतवाङ्मयामध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्यांमध्ये वरकरणी दिसतं त्यापेक्षा काहीतरी वेगळंच लेखकाला सांगायचं असतं. अशा जागा नेमक्या हेरून मा०ना० आचार्यांनी हे गूढार्थाचं गाठोडं आपल्यासमोर सोडलेलं आहे.

मा०ना० आचार्य यांचा देवकथांचा, पुराणकथांचा, मिथकांचा दांडगा अभ्यास आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत या भाषांतील साहित्याचं त्यांचं भरपूर वाचन आहे. याचे पुरावे पुस्तकात जागोजागी विखुरलेले आहेत. प्राचीन भारतीय वाङ्मय, वेदपुराणे, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये, संतसाहित्य, याच्याबरोबरीनं आधुनिक साहित्य आणि समीक्षा या सर्व क्षेत्रांत त्यांचा सहज संचार चालू असतो. त्यांच्या या चतुरस्र व्यासंगाला सुरेख ललितशैलीची जोड मिळाल्यामुळे या पुस्तकाला रूढ समीक्षाग्रंथाचं स्वरूप न येता काव्यशास्त्रविनोदाच्या सुरेल मैफलीचं रूपडं आलं आहे.

एखाद्या गोष्टीकडे बघताना वेगवेगळया कोनांतून त्याच्यावर प्रकाश टाकायची आचार्यांना आवड आहे हे तर पुस्तक वाचताना सहजच लक्षात येतं. ज्याबद्दल लिहायचं त्याच्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती मिळवून ती वाचकांपुढे सादर करण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. पण हे करताना केवळ संदर्भांचा ढीग वाचकाच्या पुढयात ओतून त्याला चकित करावं, त्याचं डोकं भिरभिरवून टाकावं, असा त्यांचा उद्देश नसतो. तर एकाच विषयाचे अनेकविध पैलू दाखवून वाचकाला त्या विषयाचा सर्वांगानं परिचय करून देण्यावर त्यांचा भर असतो.

पण मला जाणवलेलं या पुस्तकाचं सर्वांत विलोभनीय वैशिष्ट्य म्हणजे लेखकाची अनाग्रही, सर्वसमावेशक भूमिका. एखाद्या घटनेचा किंवा कथेचा स्वत:ला जाणवलेला अन्वयार्थ सांगताना केवळ आपलीच बाजू खरी आणि इतरांची चुकीची असा दुराग्रह आचार्य मुळीच धरत नाहीत. उलट आपण सांगितल्यापेक्षा वेगळा अर्थ लावणारा संदर्भ कुठे सापडला तर त्याचा आवर्जून उल्लेख करायला ते बिचकत नाहीत. पुष्कळ पुस्तकांत असं लक्षात येतं की लेखकानं एक कुठलंतरी प्रमेय स्वीकारलेलं असतं. आणि मग स्वत:च्या दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ आपल्या बाजूचे पुरावे, आपल्या गृहिताला पुष्टी देणार्‍या गोष्टी, इतरांचे आपल्या भूमिकेला पाठिंबा देणारे अभिप्राय यांच्या याद्यांच्या याद्या तो लेखक पुस्तकातून सादर करत असतो. 'हा जय नावाचा इतिहास आहे', 'कर्ण खरा कोण होता?' अशी काही सहज आठवणारी उदाहरणे.

मा०ना० आचार्य यांनी मात्र कुठल्याच मुद्द्याच्या संदर्भात अशी बनचुकी भूमिका घेतलेली नाही. एखाद्या गोष्टीच्या अनुषंगाने जेवढे म्हणून उलटसुलट मुद्दे त्यांना आढळले ते सगळेच्या सगळे, काहीही न लपवता, कुठलीही संपादकीय कात्री न लावता, त्यांनी वाचकांच्या समोर ठेवले आहेत. पूर्वसूरींच्याबरोबरीनं समकालीन अभ्यासकांच्या मतांचीही चर्चा केली आहे. सर्व मुद्दे वाचकांसमोर यावेत आणि मग वाचकाने स्वत:च काय तो निष्कर्ष काढावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं. त्यांची भूमिका सच्च्या अभ्यासकाची आहे. विनम्र आणि काहीशी तटस्थ. कुठलाही अभिनिवेश नाही. चलाखी नाही. किंवा डावपेच नाहीत. पूर्वग्रहाचा किंवा अहंकाराचा वारासुध्दा त्यांना कुठं स्पर्शून गेलेला नाही. अशा स्वरूपाचे पुस्तक लिहिताना लेखकाची भूमिका कशी असावी याचा हा वस्तुपाठ आहे.

पुस्तकात पहिल्या भागाला त्यांनी 'भरती' हे नाव दिलंय. या विभागातल्या पाच लेखांत केंद्रीभूत विषयाच्या अनुषंगाने इतरही भरपूर माहिती त्यांनी दिली आहे. गणेश ही देवता, श्रीकृष्ण ही व्यक्ती, अश्वत्थ हा वृक्ष, खेचर ही भूतयोनीसारखी योनी आणि संत नामदेवांचं त्यांच्या अभंगांतून दिसणारं व्यक्तिमत्त्व असे हे पाच विषय आहेत. विषयांची ही केवळ यादी वाचूनच आपण थक्क होतो. किती नानाविध विषय आचार्यांना दिसतात आणि त्यावर लिहिताना ते किती रंगून जातात हे पाहायला मुळातून पुस्तकच वाचायला हवं.

दुसर्‍या 'झडती' या भागामध्ये मान्यवर संशोधकांनी कळत नकळत केलेल्या प्रमादांची झाडाझडती घेतलेली आहे. विवेचनाच्या ओघात डॉ० हे०वि० इनामदार, मंगरूळकर, केळकर, राजवाडे, दांडेकर, न०म० सोमण, गो०म० कुलकर्णी, दुर्गा भागवत, ना०गो० नांदापुरकर, सातवळेकर, स्वामी स्वरूपानंद अशा अनेक विद्वानांच्या मतमतांतराचा धांडोळा त्यांनी इथं घेतलेला आहे. अभंग, ओव्या, भारूड, भागवत, पुराणं, असा त्यांच्या अभ्यासाचा विस्तृत प्रदेश आहे. ज्या ज्या ठिकाणी काही चुकीचे अर्थ लावले गेले आहेत, विचार न करता काहीतरी ठोकून दिलं आहे, त्याचं पुरेपूर माप त्यांनी त्या त्या संशोधकाच्या पदरात घातलं आहे. 'व्यासपर्वाचा पैस' या मोठया लेखात दुर्गाबाईंच्या ललितरम्य भाषेला, अभिजात रसिकतेला, जीवनातलं नाटय नेमकेपणानं टिपणार्‍या प्रतिभेला दाद देतानाच दुर्गाबाईंनी केलेले घोटाळे, गफलती, वाचकांची वंचना यावर कठोर टीकाही केली आहे.

तिसर्‍या 'फिरती' या भागात तीन लेख आहेत. त्यात अहल्या, एकलव्य आणि पुरुरवा यांच्या मूळ कथेत, आणि त्यामुळे अर्थातच आशयात, झालेल्या बदलांचा मागोवा त्यांनी त्यांच्या शैलीत घेतला आहे. तो घेताना केवळ प्राचीन कवींचीच नाही तर विंदा करंदीकर आणि पु०शि० रेगे यांच्यासारख्या अर्वाचीन कवींचीही साक्ष त्यांनी काढलेली आहे. हे लेख लिहिताना त्यांनी केलेली काटेकोर मांडणी बघण्यासारखी आहे.

आचार्यांची भूमिका नम्र असली तरी कुठंही बोटचेपी, गुळमुळीत झालेली नाही. पहिल्या भागात तर अशा काही जागा आहेत की ज्यांच्याबद्दल लिहिताना त्यांना देवदेवतांबद्दल धीट शब्दात लिहावं लागलं आहे. एवढयातेवढयावरून भावना दुखावल्या जाणार्‍या आजच्या युगात अशा नाजूक जागांबद्दल लिहिणं म्हणजे तारेवरची कसरतच आहे. ती त्यांनी कशी साधली आहे ते बघण्यासाठी 'देवा तू चि गणेशु' या लेखातल्या गणेशजन्माची कथा मुद्दाम डोळयाखालून घालावी.

पुराणग्रंथांचा अभ्यास असला तरी आचार्यांची मनोधारणा अजिबात पारंपरिक, पुराणमतवादी, कोती नाही. उलट ती खरोखरीची उदारमतवादी, कित्येकदा तर प्रखर स्त्रीवादीही आहे हे लक्षात येतं. आपल्या प्राचीन धर्मग्रंथामध्ये स्त्रीच्या मुक्त वासनांचा आविष्कार अनेकदा मोकळेपणाने व्यक्त झाला आहे. स्त्रीच्या या आदिम कामभावाबद्दल लिहिताना आचार्यांची लेखणी कुठं अडखळल्याचं जाणवत नाही. द्रौपदी, अहल्या, लोपामुद्रा, यमी यांच्या चित्रणात हे प्रकर्षानं दिसून येतं. आनंदरामायणामध्ये आलेल्या पिंगलेच्या कथेत रामाला वसिष्ठांच्या पायांवर हात ठेवून शपथ घ्यावी लागते व सीतेला आपल्या शुध्दतेची खात्री पटवावी लागते हा भागही गमतीचा आहे. 'अहल्या शिळा...' हा लेख तर फारच सुरेख जमला आहे. त्यात ऋग्वेदापासून थेट विंदा करंदीकरांपर्यंत अनेकांनी अहल्येच्या कथेकडे कसं पाहिलं आहे याचा विचक्षणपणे आढावा घेतला आहे.

विनोद हा अभ्यासू वृत्तीला मारक असतो असा गैरसमज, का कुणास ठाऊक, आपल्याकडे प्रचलित आहे. अत्यंत गांभीर्याने केलेलं लिखाणसुध्दा काडेचिराईताचा काढा पिऊन करायची आवश्यकता नसते. अधूनमधून कोपरखळया, थट्टामस्करी, अवखळपणा असला तरी विषयाच्या गांभीर्याला मुळीच बाधा येत नाही अशी आचार्यांची धारणा आहे. 'अहल्या शिळा...' या लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या 'अपौरुषेय(!)' ओळी आणि त्या चुटक्यानं लेखाची सुरुवात करायची कल्पना तर अफलातूनच आहे. अशा प्रसन्न शैलीमुळे पुस्तकाची वाचनीयता कितीतरी पटीनं वाढली आहे यात शंका नाही.

पुस्तकाचं मुखपृष्ठ रविमुकुल यांचं आहे; त्याचा मुद्दाम उल्लेख करायला हवा. पिवळया पडलेल्या कागदावर जुन्या पोथ्यांत असतात तशी. बोरूने रेखलेली, फिकट होत चाललेली, ढबोळी अक्षरं आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर 'ध्वनिताचें केणें' असं काळयाभोर ठसठशीत अक्षरात ग्रंथाचं नाव, पुस्तकाचं स्वरूप आणि लेखकाची भूमिका याबद्दल बरंच सांगून जातं.

आचार्यांचं हे पुस्तक वाचताना त्यांची शैली, अभ्यास, भाषा, प्रतिभा, संदर्भसंपन्नता यांबाबतीत 'युगान्त' ह्या इरावती कर्व्यांच्या पुस्तकाची वारंवार आठवण होते. कोणत्याही पुस्तकाचा यापेक्षा जास्त गौरव कुठल्या शब्दांत करता येईल?

5, भागीरथी प्रसाद, 99 शिवाजी पार्क, दादर, मुंबई 400 028
दूरभाष : (022) 24466451

भ्रमणभाष: 09870369372

ई-मेल : subodh.jawadekar@hotmail.com

दिवाळी २००८: लेखक परिचय

     डॉ० कल्याण काळे : एम०ए०,पीएच०डी०(मराठी). बार्शी, नंदुरबार, पुणे येथे अध्यापन. पुणे विद्यापीठातून प्रोफेसर व विभाग प्रमुख म्हणून निवृत्त. २० पुस्तके, १५०पेक्षा अधिक लेख. भाषाविज्ञान, संतवाङ्मय हे विशेष अभ्यासाचे विषय. 'भाषा आणि जीवन'चे सुमारे आठ वर्षे प्रमुख संपादक.
     डॉ० बलवंत जेऊरकर : पुणे विद्यापीठातून हिंदी विषयात एम०ए०, एम०फिल०, पीएच०डी० विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे हिंदीचे अध्यापन. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त 'हम जो देखते है' या कवितासंग्रहाचा अनुवाद साहित्य अकादमीकडून प्रकाशित. 'दो पंक्तियों के बीच' या साहित्य अकादमी पारितोषिकप्राप्त कवितासंग्रहाचा अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर.
     डॉ० विद्यागौरी टिळक : मराठी विषयात एम०ए०, एम०फिल०, पीएच०डी० सोमेश्वरनगर (जि०पुणे) येथे १९८६ ते १९९६पर्यंत अध्यापन. १९९६पासून पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रपाठक. 'मराठी वाङ्मयाची सद्य:स्थिती' (सहसंपादन), 'वाङ्मयेतिहास-लेखन - स्वरूप आणि संपादन' (संपादन),’समीक्षा-विविधा'(संपादन) ही प्रकाशित पुस्तके. कथा, कविता, लेख इ० स्फुट लेखन.
     डॉ० माधुरी दाणी : एम०ए०, पीएच०डी० मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे मराठीचे अध्यापन. 'ओवी आईची' हे ओवीगीतांवरील पुस्तक प्रकाशित. दोन कथास्पर्धांत पारितोषिक. 'माहेर', 'मानिनी', 'मधुरा' इ० नियतकालिकांमध्ये कथा व लेख प्रकाशित.
     डॉ० लीला दीक्षित : एम०ए०, पीएच०डी० निवृत्त प्राध्यापिका. कथा, कादंबरी, समीक्षा, बालसाहित्य, संपादन इत्यादी प्रकारचे लेखन. राज्यसरकारसह इतरही अनेक पुरस्कार प्राप्त. 'शतकातील बालकविता' हे संपादन. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष (२००५). 'स्त्री साहित्याचा मागोवा' या बृहत्-संशोधन प्रकल्पाच्या एक संपादक. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या विश्वस्त.
     डॉ० शुभांगी अविनाश पातुरकर : 'मराठी मुक्तछंद' या विषयावर पीएच०डी० त्याच शीर्षकाचे पुस्तक १९९९मध्ये प्रकाशित. त्याला ग्रंथोत्तेजक सभा (पुणे), विदर्भ साहित्य संघ (नागपूर) यांचा म०म० वा०वि० मिराशी पुरस्कार व विदर्भ संशोधन मंडळ (नागपूर) यांचा डॉ० बाळाजी पुरस्कार असे पुरस्कार. 'मंतरलेले दिवस' (२००३) हा ललितलेखांचा संग्रह प्रकाशित.
     डॉ० विद्या वासुदेव प्रभुदेसाई : एम०ए०, एम०फिल०, पीएच०डी० नाईक महाविद्यालय, फर्मागुडी (फोंडा) येथे उपप्राचार्य. मराठीच्या प्रपाठक. अनेक नियतकालिकांतून संशोधनपर लेख प्रकाशित.
     डॉ० सुमन बेलवलकर : शिवाजी विद्यापीठातून एम०ए०, पीएच०डी० सर्व परीक्षांत प्रथम क्रमांक व अनेक पारितोषिके. राष्ट्रीय शिष्यवृत्तीने सन्मानित. पश्चिम विभागीय भाषाकेंद्र (पुणे) येथे अमराठी विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन. तेथील प्राचार्यपदावरून निवृत्त. 'बेलभाषा', (भाषाविषयक स्फुटलेखन) व 'मराठी शारदियेच्या चंद्रकळा' (संपादन) ही पुस्तके प्रकाशित.
     प्रकाश अर्जुन भामरे : एम०ए०, बी०एड०, एम०फिल० सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण. मराठी विभाग प्रमुख, ग०तु० पाटील महाविद्यालय, नंदुरबार. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सभासद, प्रथम व द्वितीय वर्ष, कला आणि प्रथम वर्ष वाणिज्य यासाठीच्या पाठ्यपुस्तक संपादन मंडळांचे सभासद, सामाजिक कार्यात सहभाग.
     शरदिनी मोहिते (बाबर) : एम०ए० (मराठी व संस्कृत), ६० नियतकालिकांत लेखन, समाज-शिक्षणमालेमध्ये साहित्य, इतिहास, भाषा, भूगोल, मानसशास्त्र इ० विषयांवरील पुस्तके प्रकाशित. बालांसाठी चार कादंबर्याब. 'थर्ड वेव्ह' (ऑल्विन टॉफ्लर), 'देवदास' व 'परिणीता' (शरच्चंसद्र चतर्जी) या पुस्तकांची भाषांतरे प्रकाशित.
     शुभांगी सीताराम रायकर : (जन्म १९४१) इंग्लिश भाषा व वाङ्मय या विषयात एम०ए०,एम०फिल०, पीएच०डी०(पुणे विद्यापीठ) फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे पदवी व पदव्युत्तर वर्गांना इंग्लिशचे ३२ वर्षे अध्यापन. 'जेजुरी : ए कॉमेंटरी ऍण्ड क्रिटिकल पर्स्पेक्टिव्हज' व 'इन्टरॉगेटिंग द राज' ह्या पुस्तकांचे संपादन. अनेक लेखांचे इंग्रजीतून मराठीत व मराठीतून इंग्रजीत भाषांतर. सध्या गणेश देवींच्या एका पुस्तकाचे भाषांतर करण्याचे काम सुरू आहे.
     यास्मिन शेख : एम०ए०, बी०टी०(मराठी-इंग्लिश),मुंबईतील साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात मराठीचे २५ वर्षे अध्यापन, त्यापैकी सहा वर्षे विभागप्रमुख. बालभारतीच्या मराठी विषयाच्या पुस्तकाच्या सात वर्षे सहसंपादक. 'मराठी लेखन मार्गदर्शिका' व 'मराठी शब्दलेखन कोश' ही पुस्तके प्रकाशित. 'अंतर्नाद' या मासिकाच्या व्याकरण-सल्लागार.
     डॉ० शंकर सखाराम (पाटील) : एम०ए०, बी०एड०, आचार्य व मराठे महाविद्यालय(चेंबूर) येथे मराठीचे अध्यापन. चित्रकार, मुद्रितशोधक, आकाशवाणी-मान्यताप्राप्त गीतकार, माध्यमिक व उच्चय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकांत संपादक म्हणून सहभाग. दलित ग्रामीण शब्दकोशाच्या संपादक मंडळाचे सभासद. अनेक नियतकालिकांत स्तंभलेखन. तीन कादंबर्याग, दोन कवितासंग्रह, तीन कथासंग्रह, तीन ललित-लेखसंग्रह, सहा बालकथासंग्रह आणि तीन बालकवितासंग्रह प्रकाशित. अनेक पुरस्कार.
     प्रा० अविनाश खंडो सप्रे : एम०ए०(इंग्लिश). विलिंग्डन महाविद्यालय व चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' येथे ३७ वर्षे इंग्रजीचे अध्यापन. डेक्ककन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य व काही काळ पूर्णवेळ कार्यवाह. एकवीस ग्रंथांमध्ये लेख समाविष्ट. 'सत्यकथा', 'प्रतिष्ठान', 'ललित', 'नवभारत', 'समाज प्रबोधन पत्रिका', 'अभिधानंतर', 'एनॅक्ट', 'खेळ', 'कंटेम्प्ररी लिटरेचर' इत्यादी नियतकालिकांतून समीक्षालेखन. विविध समित्यांचे सभासद. चर्चासत्रे व परिसंवादांमध्ये सहभाग. अनेक व्याख्यानमालांमध्ये व्याख्याने.

प्रतिसादः वर्‍हाडी बोलीची उच्चार प्रवृत्ती

[संदर्भ : 'पूर्व खानदेशच्या बोलींचा परस्परांवर प्रभाव : एक अभ्यास' - वासुदेव सोमाजी वले, 'भाषा आणि जीवन' २६ : १ (उन्हाळा २००८)]

वले यांनी अहिराणी, वर्‍हाडी, लेवापाटीदारी, तावडी ह्या बोलींमधील साम्य दाखविताना जी उदाहरणे दिली त्यांचा वर्‍हाडी बोलीसंबंधी विचार पुढीलप्रमाणे :
(१) बहिण-बहिन : वर्‍हा‍डीत मूर्धन्य 'ण' ऐवजी दन्त्य 'न'चा उच्चार होता. मात्र, प्रमाण मराठीतील काही शब्दांत स्वरांतर्गत 'ह' आल्यास वर्‍हाडीत त्याचा लोप होतो. 'बहीण' हा उच्चार वर्‍हाडीत 'बईन' असा आढळतो. (याप्रमाणे तहान -तान, नाही-नाई.)

(२) विळा-इया : 'इया' असा उच्चार अमरावतीकडे क्वचित तर अकोल्याकडे आढळत नाही. 'विळा' या शब्दाचा उच्चाचर मोठ्या प्रमाणात 'इवा' असा आढळतो.

(३) येथे/इथे - अढी/अढी
तेथे - तढी/तढी
कोठे - कुढी/कुढी
'येथे' ह्या प्रमाण मराठीतील क्रियाविशेषणाचा उच्चार अकोल्याकडे 'अती' तर अमरावतीकडे 'अथी' असा केला जातो. अकोल्याकडून बुलढाण्याकडे आपण जसजसे जातो तसतसा 'अठी/अटी' असा उच्चार भाषिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो.
याप्रमाणे 'अती'/'अथो'/'अठी' उच्चार केला जातो. मात्र, वरील उदाहरणातील 'अढी,' 'तढी', 'कुढी' यांचा उच्चार वर्‍हाडीत होत नाही. 'कुठी' या अर्थी वर्‍हाडीत 'कुकूळे'.

(४) ऐ - अय : यासंबंधित वल्यांनी उदाहरणे दिलेली नाहीत. वर्‍हाडीत 'ऐ' या संयुक्त स्वराचा उच्चार 'इ, अइ, अय, आय्' होतो.
ऐ > ई = म्हैस > म्हीस
ऐ > अई = चैन > चईन, बैल > बईल.
ऐ > अय = मैना > मयना, पैसा > पयसा, चैतन्य > चयतन
ऐ > आय = ऐक > आयक

(५) सौदेशी : स्वत: > सोता, सरस्वती > सरसोती ही प्रक्रिया वर्‍हाडीसंबंधी योग्य आहे. मात्र, 'सौदेशी' असा उच्चार वर्‍हाडीत आढळत नाही.

(६) अ > आ : वर्‍हाडीत 'अ' या स्वराऐवजी काही शब्दात 'आ' हा स्वर उच्चारला जातो.
उदा० अजून > आजूक. मात्र, (अवजड > आवजड) आवजड ह्या शब्दाऐवजी 'भारी' हा शब्द मोठ्या प्रमाणात उच्चारात आढळतो.
'असा' ऐवजी 'आसा' उच्चार वर्‍हाडीत नाही. येथे 'अ' चा 'आ' होत नसून 'अ' हा स्वरच उच्चारात आढळतो. उदा० 'असं कधी घळे? सासू जावयासाठी जळे?'

रावसाहेब काळे
मु० लोगी, पो० रिधोरा, ता० बाळापूर, जि० अकोला, बेळगाव ४४४ ३०२.

प्रतिसादः मराठी भाषेतील सौजन्य

'भाषा आणि जीवन'चा उन्हाळी अंक (एप्रिल २००८) आत्ताच वाचला. मराठी भाषा सौजन्यपूर्ण नाही याविषयी अच्युत ओक यांनी लिहिलेलं मत तितकसं बरोबर नाही, असं मला वाटतं.

आपण इतरांशी बोलताना 'जरा पाणी देता का?', 'जरा ती फाईल मला पाठवता का?' या अशा स्वरूपाच्या वाक्यात आपण 'जरा' हा शब्द वापरतो. 'कृपया' या शब्दाला 'जरा' हा प्रतिशब्द आहे. 'मी बोलू का?', 'मी भेटायला येऊ का?' 'अभिनंदन', 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' अशा तर्‍हेचे कितीतरी शब्द आपण नित्याच्या व्यवहारात वापरतो. या शब्दांमध्ये सौजन्य असतं. हे या शब्दांचं सौजन्य मुद्दाम वर्गात शिकवावं लागत नाही. घरात चांगले संस्कार असले तर मुलं आणि मुली हे शब्द नेहमी वापरतात. ज्येष्ठ व्यक्तींना आपण 'माननीय' किंवा 'आदरणीय' असे शब्द नेहमी वापरतो. माझ्या म्हणण्याचा आशय इतकाच की, मराठी भाषा सौजन्यपूर्ण आहे; पण बरीच मराठी माणसं वृत्तीने सौजन्यपूर्ण नसतात. आपल्या मनात दुसर्‍यांबद्दल आस्था आणि आदर असला तर आपण सौजन्यपूर्ण भाषेतच बोलतो.

तसेच आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला आपण 'आहो' 'जाहो' म्हणतो, 'तुम्ही', 'तुमचा', 'आपण' असे शब्द वापरतो तेही सौजन्य म्हणूनच. नाही तर 'अरे-तुरे'चीच भाषा सगळीकडे वापरली गेली असती.

आज्ञार्थी वाक्यांबद्दल सांगायचं झालं तर, लहान मुलांशी बोलताना घरातले लोक, विशेषत: आई, मुलाला 'अरे राजा (बाबा, सोन्या, बाळा अशी वेगवेगळी विशेषणे लावून आज्ञा करते) अंघोळ करून घे' ही विशेषणे प्रेमळ आणि सौजन्यपूर्णच असतात. उलट आपण मराठी भाषेत लहान मुलांशीसुद्धा सौजन्यपूर्ण भाषेतच बोलतो.

प्र.चिं.शेजवलकर
संचालक, एएसएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एज्युकेशन, पुणे ४११ ००४.

द.भि.कुलकर्णी यांचा प्रतिसाद

शब्दसंक्षेप, वाक्यसंक्षेप
द०भि० कुलकर्णी
संपा० 'भाजी' यांस
स०न०वि०वि०
आ० व 'भाजी'च्या संपा०समि०च्या एक सद० मृ०श० असे आ० दो०नी मि० लिहि० संपा० टि०वा०सं० : भाजी व० २५, अं०१, हि०'०७.
अबब! संक्षिप्त रूपात वाक्य लिहिणे किती जिकिरीचे ते आता लक्षात आले. अशा प्रयत्नात वेळ व श्रम, प्रारंभी तरी, वाचत नाहीत; वाचकासही, वाचक म्हणून असाच अनुभव येईल.
याचा अर्थ असा आहे का की, शब्दांचे संक्षेपीकरण सुलभ पण वाक्याचे संक्षेपीकरण अवघड? पत्राच्या अखेरीस आपण 'मो०न०ल०आ०' असे लिहितो, हा अपवाद.

दुसरी गोष्ट : दोन व्यक्तींमधील व्यक्तिगत व्यवहारात शब्द व वाक्य यांचे संक्षेप सुसह्य ठरतील; पण व्यक्ती व समाज यांच्यातील सार्वजनिक व ज्ञानात्मक व्यवहारांत ते इष्ट व उपयुक्त ठरणार नाहीत? मस्करी व जाहिरातकुसर म्हणून अधूनमधून फक्त ते क्षम्य ठरेल?

पूर्वी मोडीमध्ये असे विविध संक्षेप सर्रास वापरले जात; त्याचे कारण मोडी ही लिपी सार्वजनिक नव्हती; तर ती फक्त स्वत:च्या माहितीसाठी नोंद करण्यासाठी व दोन परिचितांमधील संवादापुरती वापरली जाणारी खासगी लिपी होती.

साहेब, सार्वजनिक लेखन लेखकासाठी नसते, वाचकांसाठी असते; म्हणून तर लेखनविषयक नियम लेखकाच्या सोयीने करावयाचे नसतात; वाचकाच्या सोयीने करावयाचे असतात; जसे, 'विशद' व 'विषाद' हा भेद लेखकास जाचक वाटला तरी चालेल; तो वाचकाच्या सोयीचाच असतो. 'सलील-सलिल', 'रुपे-रूपे', 'शिर सलामत तो पगडी पचास' - 'शीर सलामत तो बुगडी पचास' - (पु०शि० रेगे) ही अशी आणखी काही उदाहरणे. लेखनविषयक नियमांचे सुलभीकरण लेखनकाराच्या अंगाने कधीही होता कामा नये; लेखन-नियमांत जितकी सूक्ष्मता व विवक्षा येईल तितके ते लेखन वाचकाच्या दृष्टीने अर्थसुलभ होईल.

संक्षेपीकरणाची प्रवृत्ती लेखनकाराच्या अंगाने सोयीची पण वाचकाच्या, समाजाच्या अंगाने गैरसोयीची व अपायकारक आहे; सार्वजनिक व्यवहारात तिचा प्रसार होऊ देणे हितकारक नाही.
आता संक्षेपचिन्हाबाबत : चोखंदळ लेखक-मुद्रक कटाक्षाने संक्षेपचिन्ह (०) वापरतात; एरवी अधिकांश लेखक-मुद्रक संक्षेपचिन्हाऐवजी पूर्णविराम चिन्हच (.) वापरतात. माझ्या एका लेखनिकाला मी संक्षेपचिन्ह द्यायला सांगितले त्याचा परिणाम असा झाला की तो पूर्णविराम व अनुस्वारही पोकळ देऊ लागला; दुसर्‍या एका लेखनिकाने इंग्रजी लिहितानाही संक्षेपचिन्ह वापरणे सुरू केले. एकदा माझ्या टेलिफोन डायरीत 'डो बो कुलकर्णी' अशी नोंद मला दिसली. ''हा कोण?'' म्हणून विचारले तर महाशय म्हणतात काय, ''सर, हे तुमचंच नाव.'' त्याने नोंद केली होती, ''KULKARNI DO BO''

विरामचिन्हांचा विचारही लेखन-विषयक नियमांमध्ये नीट व्हायला हवा आहे.

तुम्ही हेमाडपंती लिपीतील काही शब्दांची संक्षिप्त रूपे दिली आहेत; जसे, सोा, वीाा, मुाा, इत्यादी. त्यावरून असे दिसते की मोडीमध्ये एक दंड (।) व दोन दंड(।।) ही चिन्हे संक्षेपचिन्ह म्हणून योजिली जात. आपण त्याऐवजी (०) चिन्ह वापरतो; आता या पर्यायी चिन्हाचाही विचार व्हायला हवा - खासगी भाषा व्यवहारासाठी.

ज्येष्ठांस नमस्कार, धाकट्यांस आशीर्वाद.
आपला स्नेहाकांक्षी
दत्ताजी भिकाजी कुलकर्णी ऊर्फ दभि
'वसुधा', ई-००४, डीएसके विश्व, ऑफ सिंहगड रोड, धायरी, पुणे ४११ ०४१.
दूरभाष (०२०)२४३८ ०८९४

Pages